चाला ... चालत रहा...
चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण...पाय हे माणसाच्या उमेदीवर उभे असतात. टेंशनने माणूस खचला की तो पायातच मोडतो. त्याला चालत जा म्हणणे सोपे आहे, पण आधार देणे, उभे करणे कठीण आहे. हे टेंशन फार घातक असतं.
आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांच्या नावाचा एक संदेश व्हॉट्स अॅपवर वाचनात आला. त्यात ते म्हणतात :
" *वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*
*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !! ....* चाला.▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते▪️.... *३६५ दिवस चाला*▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.... " असं त्यांनी खूप लिहिलंय. कळकळीने लिहिलंय.
🚶🏻♀️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♀️🚶🏻♀️
खूप छान संदेश आहे. पण एवढे पुरेसे नाही. म्हणूनच मी सुरूवातीला म्हटलंय : चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण... हा पण आज फार महत्वाचा आहे. खरंच, जीवनातील वाढत्या व्यापांमुळे जीवनात अनेक संकटे येतात. अनेक धक्के बसतात. हे सगळंच पचवून बसणं एवढं सोपं नसतं. त्यांचा परिणाम शरीरावर होतोच ! माणूस मनाने खचतो आणि तो खचला की पहिले पाय खचतात. पायातली शक्तीच निघून जाते. कोरोना काळानंतर तर अनेक माणसे लंगडतानाच दिसतात. पाण्यातच खचलेली दिसतात. काही जण याचा बूस्टर डोसशीही संबंध जोडतात, पण त्याबाबत अधिकृत तपशिल हाती आलेला नाही. काय असेल ते असो , पण मन खचल्याने पायातली ताकत जाते, हे खरे !
आपल्या आसपास अशी खचलेल्या मनाची, लंगडणाऱ्या पायांची लटपटती माणसं दिसतात. तेव्हा एक विचार स्पर्शून जातो. ही माणसे कोणत्या धक्क्याने खचली असतील ? त्यापूर्वी तर ती धडधाकटपणे सहज चालत असतील. मग त्यानंतर काय झाले असेल त्यांच्या आयुष्यात ? खचलेली ती माणसे पुन्हा उभारी धरावीत म्हणून काय करता येईल ? ईश्वरानं त्यांना उभं करण्याचं सामर्थ्य मला दिलं तर त्यांना उभं करण्याची माझी इच्छा नक्कीच आहे !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०५.०७.२०२४ सकाळी ०६.००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा