मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

आपल्याला कळले नाही

आपल्याला कळले नाही !


आपले कर्तृत्व थिटे पडते . मग आपण आपल्याभोवती एक सुरक्षित कवच निर्माण करू पाहतो . एक तर आपण पांघरूण घेवून झोपतो किंवा चवताळून उठतो आणि एक प्रतीसृष्टी -आपली सृष्टी - निर्माण करू पाहतो . वसिष्ठ ऋषींचे काहीसे असेच झाले असावे. त्यांनी प्रतीसृष्टी निर्माण केली . आपण ? आपण ना  पांघरूण घेवून झोपू शकलो , ना  प्रतीसृष्टी निर्माण करू शकलो . आपल्याला आपला मार्गच सापडला नाही ! आपला शोधही अपूर्णच होता . त्यात जगाची हुशारी नव्हती ; स्वार्थकेन्द्री वृत्ती नव्हती !

निसगार्चे अवलोकन


आपण आठव्या इयत्तेतच निसगार्चे अवलोकन करायला गेलो. तिथेच थांबलो नाही तर त्यावर लेखन करू लागलो ! निसर्गातल्या माणूस सोडून सर्व घटकांची भूल आपल्याला पडली ! माणसे भेटली . तात्पुरती भेटली . पण माणूसपण आधीच वजा झाले होते. ना कुणाचा विश्वास वाटला ; ना कुणाची खात्री ! चूक आपलीच होती. आपला दुबळेपणा आपल्याला नडला. त्याचेही भांडवल करता आले नाही . मूळात आपले काही भले करायचे असते हेच मुळी आपल्याला कळले नाही ! परिस्थितीचे अचूक भान आपल्याला कधीच आले नाही .

भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ  !


जगात भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ असतो हे आपल्याला कधीच कळले नाही .आपण दैवते पुजत बसलो ! तन, मन, धन अर्पून बसलो . तिकडे जगाने त्याच दैवतांचे बाजारीकरण केले . स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:चे कायदे केले ! दैवतांना जाणीवपूर्वक मोठे करता करता जग स्वत:च मोठे होऊन गेले ! ते खरे व्यवहारचतूर !


सोडवणारा वाईट ठरतो !

 
कळायला लागल्यापासून आजी आणि आई मधली भांडणे मिटवायची सवय आपल्याला नडली. घरातले वेगळे दारातले वेगळे हे आपल्याला कळलेच नाही ! आपल्याला वाटायचे निदान आपल्या आसपास तरी भांडणे असता नयेत. सर्वांनी गोडीगुलाबीने रहावे . पण शेवटी त्या भांडणाऱ्या माणसांचीच गोडीगुलाबी होते आणि सोडवणारा वाईट ठरतो, हे आपल्याला कळले नाही . दोघांच्या भांडणात पडून आपण आपले तोंड फोडून घेतले . ते लबाड स्वार्थी ; आपण निस्वार्थी मूर्ख !    माझ्या एका गझलेच्या शेरात मी काहीसा असाच व्यक्त झालो आहे :

          आयुष्यभर मी माझा भाबडेपणा जपला
           मी टग्यांशी लढाई नेहमी हरलो होतो !

तो म्हणाला गॅस एजन्सीकडून आलोय !


मला कोणाचेच अंतरंग कधीच कळले नाहीत . त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा , कुणावर ठेवू नये , याचे जलद राहुदेत , पण कुणी फसवून गेल्यावरही त्याने आपल्याला फसवले आहे , याचे सावकाशपणीही आकलन झाले नाही . माझ्या वडीलांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी संध्याकाळी एक तरूण माझ्या घरी आला . गॅस एजन्सीकडून आलोय म्हणाला . मला खरंच वाटलं . त्याने सिलेंडरच्या खाली ठेवण्याची ट्राॅली दाखवली . तिचे उपयोग पाहून शेजारपाजारच्या लोकांनी ब-याच  ट्राँलीज घेतल्या , असं सांगून त्याने दोन नग माझ्या गळ्यात मारले आणि हजार रूपये घेऊन तो गेला पण ! तरी मी त्याची ती कंपनी कुठली होती , हेच त्याला का विचारले नाही याचाच विचार 
करीत किती तरी वेळ  बसलो होतो . तो गॅस एजन्सीकडून आला होता का किंवा त्या ट्राॅलीज कोणत्या कंपनीच्या आहेत , याचीही विचारणा मी केली नव्हती ! असा मी ....

जीवनाच्या महाभारतात मी गोंधळून गेलो... 
जग कुठले कळणार जिथे ; मलाच मी कळलो नाही ! 

#महाभारत

#जीवनाचे_महाभारत

#mahabharat

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

कोणीतरी आहे तिथे

                     चाहूल  ...

सारे मजेत चालले होते . कालपर्यंत . तसे आज थोडेसे बिनसले . आपली मनात शंका येते ना ! पुन्हा ग्रह फिरले की काय ? पुन्हा संकटांची सुरूवात ? जरा आपण काही ठीक केले की कुठेतरी बिनसते . असे तरी का व्हावे ? सतत सगळे सुरळीत का चालू नये ? नवे प्रसंग , नवी वाट , नवी लढाई की काय ? आपले मनात येते. बाकी तसे ठीक आहे. फारसे बिघडले नाही . थोडी चाहूल मात्र लागली. पाहूया काय होते ते . . .


निराळा अनुभव 


नाही . वाटले होते तसे आणि तितके काहीच वाईट झाले नाही. उलट परिस्थिती माझ्याच हातात आली ! तसा हा अनुभव मला तरी निराळाच आहे .  अनेक वर्षे झाली . सुखाची साधी चाहूलही लागली नव्हती . आता सुख बरेचसे मला ओळखू लागले आहे. प्रथम आपण स्थिर होणे आवश्यक आहे. ईश्वर तेही करीलच . त्यानेच तर एवढे केले आहे. मी प्रथमच त्याचा मनापासून आभारी आहे. शेवटी त्याच्याशिवाय आपले कोणी नाही . तो तर सर्वांचाच आहे.

तीन महिन्यानंतर :


तीन महिन्यानंतर थोडासा वाईट अनुभव आला . पण प्रसंगावर प्रसंगावधानाने मात करता येते हेही आपण अनुभवले ते त्या ईश्वरामुळेच ! ईश्वर सर्वाना सद्बुद्धी देईलच ! काही वेळा कळत नाही.  खरंच कळत नाही.  आपल्या हातात काहीच नसते,  असे वाटते. आपण फक्त पुढे जात रहायचं . आपले आयुष्य आपले असतेच कुठे  ? म्हणजे आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच ! कोण घडवतो हे सगळे ? दिसत नाही पण कोणी तरी आहे तिथे ! त्यालाच आपण ईश्वर म्हणतो का ?

२० जून , २०२३

ये रे माझ्या मागल्या 

अनेक वर्षांनंतर असे अनुभव येत आहेत की ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच मनात शंका निर्माण होत आहे. शंकाच काय , दोन तीनदा तर खात्रीच होत गेली.... पण पुन्हा आपले ये रे माझ्या मागले होत आहे ! आपण केवढे , विश्व केवढे ! आपल्याला यातले नक्की काय कळते ? हा जो अज्ञानीपणा आपण घेत आहोत ना तो चिकित्सकपणाला आणि संशोधनाला मारक ठरतो आहे . पण आपण तरी काय करणार ? काय ते नक्की होत नाहीय. असलाच परमेश्वर तर त्याने यावे की समोर ! तो असा लपून का बसला आहे ? जीवनात इतकी उलथापालथ होत असतांना तो कुठे झोपून राहिला आहे , हेच कळत नाही. चांगले वागा , वाईट वागा , जीवनात दु:खं आहेच ! शांती करा , नवस बोला, काहीही करा , भोग टळता टळत नाहीत ! अशा वेळी ज्याचा #आधार घ्यायचा तोच बेपत्ता ! त्या अज्ञाताची #KYC कशी करायची ? तो आहे तर संभ्रमात का टाकतो आहे ? की त्यालाही कधी प्रगट व्हायचं हा संभ्रम पडलाय ? त्याचाही ये रे माझ्या मागल्या झालाय ?  आपला मेंदू माणूस म्हणे दहा टक्केच वापरतो. पण मग नव्वद टक्के कुठे लपून राहिलाय ? तो कसा कळणार ? त्याला कुठे शोधायचे ? की नुसतेच म्हणत बसायचे : कोणी तरी आहे तिथे ! खरंच का आहे तो तिथे ? दिसला , भेटला कधी तुम्हांला तर सांगा मला !

#kyc


#kyc_of_god


#kycofunknown


#somebody_is_there


#कोणीतरीआहेतिथे

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

मना तुला सलाम !


माझ्या मना, तुला सलाम !


आता असे काही विशेष नाही. पुन्हा केव्हातरी बघू.  भेटू.  बोलू.  थोडं विचित्र  वाटत असेल पण त्याला इलाज नाही. काही काही वेळेला हे असेच असते. त्याला तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार ? बरोबर ना ? हुशार  आहेस. बरोबर ओळखलंस. . . . . .


एक वर्षानंतर :

आपण दोघे आहोतच कुठे ?

माझ्या मना , एक वर्षापूर्वी मी हे तुझ्याशी बोललो होतो ! एक वर्षानंतर आपण इथे  भेटतोय ! तसे आपण खूप ठिकाणी सतत भेटत आलोय . आपण दोघे आहोतच कुठे ? आपण एकच तर आहोत. हे माझ्या मना , एक वर्ष आपण ह्या पोस्टवर भेटलोच नाही . पण आपलं स्वगत चालूच होतं ! अनेक प्रसंग या दरम्यान आले . बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले . आपण दोघांनी ते मिळून पहिले ! अनेक  विसंगत बाबी आयुष्यात आल्या . आपणच त्या सुसंगत करीत गेलो ! अश्यावेळी तुझी साथ नसती तर ? माझे एकट्याचे काय झाले असते कोणजाणे ! पण तू सतत सोबत राहिलास ! अनेकदा मी नाउमेद झालो ! खचून गेलो ! डोळ्यात पाणी भरून आले ! पण तू धीर दिलास ! समजावलेस ! खरेच मी तुझा किती आभारी आहे याची कदाचित तुलाही कल्पना नसेल !

शनीच्या साडेसातीतले ते दिवस


शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होतो ! खूप खोल घाव झाले होते ! पण माझ्या बरोबरीने तू ते सारे सोसलेस ! तू  माझा सखा झालास . तू माझा परमेश्वर झालास ! माझे  प्रत्येक खचणारे पाऊल तू उचलून धरलेस ! कधीही तोल जाऊ दिलास नाही !  हे माझ्या मना , केवळ तू होतास म्हणून मी तरलो !

तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता . त्यातला गेल्या वर्षभरातला कालावधी तर अंत पाहणारा होता .  पण तुझ्या सोबतीने हा सारा प्रवास बराच सौम्य झाला ! आज १२ नोव्हेंबर २०१२ . दिवाळीचा आधला दिवस . ह्या पवित्र दिवशी , माझ्या मना, माझा तुला सलाम !


.............

सहा वर्षांनंतर....


आज 30.01.2018 ! सहा वर्षांनी मनाला पुन्हा सलाम करावासा वाटला ! 24.01.2018 ला 11.00 , 11.15 च्या दरम्याने माझ्या आईचे निधन झाले . ती नव्वद वर्षे जगली . वडील गेल्यानंतरही 17 वर्षे ती माझ्या सोबत होती . खरे तर , माझ्यापेक्षा माझ्या पत्नीच्या सोबत होती ! माझ्या पत्नीचे आणि तिचे नाते सासू सुनेचे कधीच नव्हते ! माझ्या लग्नाला 27 वर्षे झाली . एवढ्या वर्षात सासू सुनेची भांडणे झालीच नाहीत , असे स्वप्नवत विधान मी करणार नाही . माझी आई तशी कडकच ! पण माझ्या पत्नीने तिकडे पूर्णपणे कानाडोळा करून तिला माया लावून बरीच नरम केली होती . आई , आई म्हणून तिने आईला आपलीशी केली होती . संपूर्ण गावात सून कशी हवी , याचं उदाहरण म्हणून लोक माझ्या पत्नीचं नांव गेली कित्येक वर्षे घेत होते. तेव्हा आईच्या जाण्याचा धक्का तिलाच अधिक बसला . जाण्याच्या आदल्या रात्री आई यमयांतनांनी विव्हळत होती . ते बघून पत्नीला ताप आला . आजपर्यंत ती त्यातून सावरलेली नाही . 23.01.2018 च्या रात्रीपासून आजपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा नाही !  मना , तू सोबत आहेस म्हणून मी उभा आहे . म्हणूनच , तुला सलाम !

.......

०७ जून , २०२३ सकाळ ०९.२४


मी पूर्वी लिहिले होते : 

शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होतो ! खूप खोल घाव झाले होते ! ... आणि ...

तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता.‌

आणि आता...

त्या भयानक कालखंडातून बाहेर पडलो खरा... पण ....

आगीतून फुफाट्यात....


त्याहूनही खराब कालावधी सेवानिवृत्तीनंतर आला ! ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मी सेवानिवृत्त झालो ! नोकरीचा तो निरोपाचा क्षण... वाटलं आता आयुष्य साधं , सरळ, सहजसोपं जगता येईल. पण तसं व्हायचं नव्हतं...

आतापर्यंत तसं आयुष्य सरळ चाललच नव्हतं. पण आता नोकरीतील दगदग संपली होती. उशिरा का आलात , लवकर का चाललाय , रजा कशाला हवी , असले प्रश्नं आता तरी कोणी विचारणारे नव्हतं. तुम्हांला अमक्या ठिकाणी जावंच लागेल , तुमची तमक्या ठिकाणी बदलीच करतो , असंही धमकावणारं आता कोणीच नव्हतं. त्यामुळे मला हवं तसं निवांत आयुष्य आखता येईल आणि त्यानुसार चालता येईल , असं वाटलं तर वावगं नव्हतं. बरोबर ना ?  फार मोठ्या अपेक्षा नव्हत्याच , फार हौसमौज करायची नव्हतीच . पण किमान मुलाचं चांगलं लग्नं करावं , चांगल्या घराण्यातील, सालस पण खमकी , व्यवहारी सून मिळावी , आमच्या सारखीच हसून खेळून रहावी , घराचे गोकुळ व्हावे , हीच साधी अपेक्षा होती. पण... हाच गळ्याचा फास होऊन बसला....

मुलाची निवड त्याच्या आईला मान्य नाही. त्याने विचारताक्षणीच , हे होणार नाही , ही काळया दगडावरची रेघ आहे , हे तिचे उत्तर होते ! त्याला आता चार वर्षे झाली . या चार वर्षांत एकही क्षण खऱ्या अर्थाने सुखाचा झालेला नाही.  

गेली चार वर्षे घरात दोन विरूध्द प्रवृतींना सांभाळत जगतोय . कधी दोघांना फटकारून भानावर आणावं लागतं , कधी आंजारागोंजारावं लागतं... तर कधी दोघांनाही उमेद दयावी लागते. उभारी द्यावी लागते. उभे करावे लागते. पण मी ? मी कसा उभा रहात असेन ? मला कोण उभा करीत असेल ? 

अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या दोन ओळी सतत आठवत राहतात : 

माझ्यात बांधल्या मी साऱ्या अजिंक्य भींती
माझी मला दिली मी सारी इथे उभारी !


इथे हे मना, मी म्हणजे केवळ मी एकटा नव्हे ! तू सोबत आहेस ! बुध्दी साथ देते आहे आणि शरीर हे सर्व सहन करते आहे. पण हे मना , तू खंबीर आहेस , म्हणून मी उभा आहे ! तुला पुन्हा एकदा सलाम ! 

थोडं अधिक अवघड झालं आहे 

आज २९ जून , २०२३ .‌ आज पायाचा पट्टा डाॅक्टरला दाखवण्यासाठी सौ. ला दवाखान्यात न्यायचे होते. पण सकाळपासूनच धुंवाधार पाऊस सुरू झाला तो तू पाहिलासच. तीही म्हणाली आज नको जाऊया. तू हेही ऐकलंस .‌ आपण दोघेही घरीच थांबलो मग. पण माझी कमरदुखी आज वाढलीय. हे प्रकरण आता थोडं अधिक अवघड झालं आहे. हे कधी बरं होणार ? मला हिंडता फिरता येणार नाही का ? कुठेच प्रवास करता येणार नाही का ?  माझ्या मना ,  तू खंबीर रहा. मला लुळं पडायचं नाहीय.‌ 


#salute_to_mind

#mostpowerfulmind

#mindispowerful

#मनाला_सलाम

#मन

#मन आणि शरीर
 
#मनाचे आरोग्य

#मनशांती

#मनाची शक्ती

#मनाचे विचार

#भावनांचे व्यवस्थापन

#मनाचे तंत्र

#स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

#जीवनशैली आणि मन

#आत्मपरीक्षण