ते सांत्वनासाठी आले होते .... तेच मारेकरी होते....
ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
Pages
- ABOUT ME
- Privacy Policy
- पान परिचय
- अशी शिका मराठी गझल व गझलविषयक अन्य लेख
- माझ्या मराठी गझला
- माझ्या हिंदी गझला
- माझे कार्यक्रम माझी भाषणे
- विचित्र स्वप्ने भयानक घटना
- माझ्या मराठी कविता
- माझी मराठी गाणी
- माझी मराठी भक्ती गीते
- आवडती गाणी
- माझे मराठी लेख
- राजकीय लेख
- मागे पुढे
- कोरोनाचा काळ
- स्फूट लेखन
- नवलाई पावणाई मंदिर , जाकीमिऱ्या
- कुटुंबासाठी
- पुस्तक परिक्षण
- सुंदर संदेश
- बोलके काव्य
गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४
बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४
शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३
काव्यसुगंध कार्यक्रम
काव्यसुगंध कार्यक्रम
शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरगांव, ता . चिपळूण येथील काव्यसुगंध कार्यक्रम.
#रयत_शिक्षण_संस्थेच्या शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरगांव, ता . चिपळूण येथे दि. 12.01.2023 रोजी भेट देण्याचा योग आला. प्रयोजन होते तेथील विभागप्रमुख मा. श्री. रमेश बाजीराव शिंदे सरांच्या सेवा सदिच्छा सत्कार समारंभाचे.
त्यासोबतच सुरु असलेल्या विज्ञान प्रदर्शन व सायंकाळी सुरू होणारे स्नेहसंमेलन यातूनही काव्यसुगंध या कवितांच्या कार्यक्रमाचे आवर्जून आयोजन करण्यात आले होते. कवितेसाठी केवढी ही धडपड ! खरंच, खूप कौतुक वाटले !
निमंत्रित कवी म्हणून माझ्यासोबत कवयित्री सौ. सुनेत्रा जोशी होत्या . सौ. सुनेत्रा जोशी यांनीही सुंदर कवितांनी कार्यक्रमात रंगत आणली !
आमचा हा एकत्रित असा पहिलाच #कार्यक्रम आणि तिथेही आम्ही नवखेच होतो ! माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसमोर कोणत्या कविता म्हणायच्या वा गायच्या हा तसा प्रश्नच होता. पण मिळालेल्या प्रतिसादामुळे कार्यक्रम रंगतच गेला. ज्याच्या कारने आम्ही गेलो होतो तो मयूर घोसाळेही मध्येच कार्यक्रमात येऊन बसला होता , यावरून कार्यक्रमाच्या रंगण्याची कल्पना तुम्हांला येईलच.
विविध कार्यक्रमांतूनही कवितांचा कार्यक्रम ठेवण्यावरून शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह व कवितेप्रती असलेले प्रेम दिसून आले.
कवितांचा हा कार्यक्रम आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला झाला ते आपुलकीने केलेले आदरातिथ्य व उत्तम प्रतिसादामुळे. शिक्षक शिक्षिकांची दाद तर मिळत होतीच , पण आठवी नववीतले विद्यार्थीही अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत टाळ्या पिटून वारंवार योग्य ठिकाणी दाद देत होते . इतकेच नाही तर कार्यक्रम संपल्यानंतरही कविता आवडल्याचे विद्यार्थी - विद्यार्थीनींनी आम्हांला भेटून सांगितले, हे विशेष ! यामागे शिक्षकांचे संस्कारही दिसून आले ! शिक्षकवर्गाचा उत्साह खूपच होता. त्यांनी तर आम्ही कोणी सेलिब्रिटी असल्यासारखे आमचे खूप फोटो काढले. यात आघाडीवर होते ते रसायनशास्त्राचे श्री. पवार सर. त्यांनी आमच्यासोबत सेल्फीही काढले आणि नंतर आठवणपूर्वक ते सगळे फोटो आम्हांला काही तासांतच पाठवलेही ! या सगळयांमागे मुख्याध्यापक श्री. रोकडे सर हे आधारस्तंभ भासत होते !
सेवानिवृत्त झालेले श्री. रमेश बाजीराव शिंदे सर तर सेवानिवृत्त झाले आहेत असे वाटतच नव्हते. त्यांनी आणि त्यांच्या सौ. यांनी तर आपुलकी आणि आदरातिथ्य यात कसलीही उणीव ठेवली नाही ! खरा सत्कार त्यांचाच असूनही त्यांनीच अगदी आगत्याने शाल , श्रीफळ व मानधनही देऊन आमचा सत्कार सोहळा घडवून आणला ! अशी व्यक्तिमत्वे भेटणे हा फार मोठा दुर्मिळ योग म्हणावा लागेल !
या कार्यक्रमाशी आम्ही जोडले गेलो त्या मा. श्री. श्रीकृष्ण साबणे सरांशी माझे कालच फोनवरून बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले होते की तिथे शिंदे सर आहेत ते तुम्हांला काही कमी पडू देणार नाहीत , ते अक्षरशः खरे निघाले !
या सर्व आपल्याच माणसांचे आभार मानणे म्हणजे त्यांच्या आमच्यावरच्या व कवितेवरच्याही प्रेमाला गालबोट लावण्यासारखे आहे. पण या सर्वांसाठी प्रेमाचा एक आदरपूर्वक नमस्कार तर क्रमप्राप्तच ठरतो ! खरंच, या सर्वांना नमस्कार ! कुणाचा उल्लेख राहून गेल्यास दिलगिरी व्यक्त करतो. तसेच , श्री. आर. बी. शिंदे सरांसह सर्वांनाच त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹 !
... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील.
दि. 13.01.2023
सकाळ 08.20
शनिवार, २ जानेवारी, २०२१
Kahi kavita
कवितेतून शोधत आलो
कवितेत शोधत आलो
जीवनभर दिलासा
कधी वाट चुकतांना,
कधी निराश होतांना
कवितेनेच धीर दिला...
बाकी आजूबाजुला माणसेच होती
कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून ,
ज्यांना मी कवितेइतकीच माझी समजत आलो !
ठेवली नाही कधीच मी अपेक्षा
की माझ्या कवितेला कुणी चांगलं म्हणावं,
कौतुक करावं ,
माझ्यासाठी एक छंद म्हणून मी लिहीत आलो
दु:खावरचे औषध म्हणून कविताच पीत आलो
कवितेनेच कंठातील वीष भिनू दिलं नाही शरीरात
आणि बनू दिलं नाही रक्ताला व्देषयुक्त !
कवितेनेच धीर दिला
कधी निराश होतांना
कधी वाट चुकतांना
जीवनभर दिलासा
कवितेतच शोधत आलो....
जाऊ कुठे, जाणार कुठे
कवितेशिवाय
माणसे अशी कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून असतांना
माणसापासूनच .....
... अर्थात आपलीच !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
....................
तुझ्यामुळे कवितेला
जाग माझ्या आली ;
एक एक ओळ माझी
तुझ्या श्रावणात न्हाली !
तुझ्या चांदण्यात माझा
शब्द शब्द मोहरला ;
तुझी साद येता कानी
जीव माझा आतूरला !
बघे आयुष्य नव्याने
पुन्हा वळायास मागे;
असे अचानक आले
बघ जुळायास धागे !
सुन्या सुन्या मैफिलीला
सूर नवा सापडला ;
तू वाचताच कविता
देह सारा झंकारला !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील.
मेघांआडून चंद्रानं अधूनमधून डोकवावं
तसं तुझं व्हाॅटसअॅपवर डोकावणं
मनाला भुरळ पाडून जातं...
असं कधी झालं नव्हतं
पण आज वाटतंय कुठे तरी
मनाला विचारावं स्वत:च्याच...
हे स्वप्नं आहे की सत्य ?
किती सांभाळलं होतं ...
आज ओठात आलंच !
पण कसं सांगू ?
.........
कविता ओलांडते हद्द
अनावर होऊन बरसते
आषाढासारखी...
ऐकतच नाही मनाचं
मनालाच उतरवते
कागदावर....
कोणी तरी वाचील
ही धाकधूक मनात
असते तरी....
........
असे होऊ नये
असे वाटते तरी
असे होत आहे...
कधी होत नव्हते
कधी झाले नव्हते
तसे होत आहे...
आता प्रश्न हा
सुरु राहूदे का
जसे होत आहे....
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
............................................
उदास एकटेपण
उदास एकटेपण
रिते मन ;
कुणी न सोबती
हे घुमेपण !
मूळचा देवीदास
बिनधास्त ;
आता तसा
दुरापास्त !
चेहरा ओळखीचा
आरशास ;
प्रतिबिंब
हाच भास !
कळे न जातसे
कुठे जीवन ;
वळणामागून
येई वळण !
चालत राहणे
हेच हाती ;
विझेपर्यंत
जीवनवाती !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
रत्नागिरी. २०.१२.२०२० सायं. ०६.३५
............................................
असाच मी बसतो कुण्या संध्याकाळी
अंधाराला सोबत घेऊन
कातरवेळेनंतर अंतर वाढत जाते उजेडापासूनचे
दुस-या दिवशीचा सूर्य येईपर्यंत
काही पडला उजेड तर पडला माझ्याही डोक्यात
म्हणून असाच मी बसून राहतो डोक्यावर किरणे घेत
बाकी काही नाही झाले तरी डोके उबदार होते
आणि सुचते एखादी कविता ही अशीच एखादी....
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
29.12.2020
..........................
वाढलेल्या अपेक्षांचं ओझं वागवीत
वाकलेल्या अवस्थेत चालत असतो
म्हातारपणाच्या दिशेने
अशा वेळी पावलं जड तर होणारच ना...
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
29.12.2020
...............
अस्व:स्थ मनस्थितीत बाकी काहीच सुचलं नाही तरी कविता सुचते !
हे कसं होतं काहीच कळत नाही
पण होतं हे खरं आहे
कविता इतकी कशी अभिन्न आणि समजूतदार निघाली ?
कोण सांगू शकेल काय ?
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
३०.१२.२०२०
.....................
इतक्या सगळ्या खस्ता खाल्ल्या त्या कशासाठी ?
आता अखेरच्या पर्वात तरी शांतता, समाधान मिळून मनाजोगते जगायला मिळावे ही अपेक्षा गैर वाटावी
असे जीवन पुन्हा वाट्यास का यावे ?
सृष्टीचक्रात काही घोळ तर नाही ना ?
की देवाचे आणि दैवाचे अस्तित्व जाणवावे म्हणून हा अट्टाहास आहे ?
की काळच सूड उगवतोय माझ्यावर ?
रावणाने अशाच कुणाची तरी सत्ता मानण्यास नकार दिल्यानेच त्याला मारण्यात आले का ?
मला शरण आलेच पाहिजे हा मत्तपणा
आणखी किती मानवांचे बळी घेणार आहे ?
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
३०.१२.२०२०
........................
आता ते येतील पुन्हा पाच वर्षांनी हसत हसत
आणि आम्हीही तोंडदेखले तोंडभर हसतहसत
त्यांच्या आश्वासनांना आणि एकमेव मागणीला
त्यांच्यासारख्याच मुखवटयाने प्रतिसाद देऊ😃
मास्कआडून😷😷😷😃😃😃😄😄😄
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०१.०१.२०२१
...................
गझल कळून घेतांना...
पटकन मला त्या शेराचा अर्थच कळला नाही .
असे का व्हावे ? माझ्यातील स्वयंघोषित गझलगुरूला
शेराचा अर्थ चटकन लागत नाही म्हणून कित्ती राग आला !
पण मग इथे माझ्यातील तथाकथित आकलनकर्त्याला राग का आला नाही ?
गझल काही वेळा कळूनही घ्यावी लागते
हे मला कळले गझल कळून घेतांना
तर किती बरे होईल 😃 😃😃
किमान माझ्यातला स्वयंघोषित गझलगुरू तरी हद्दपार होईल 😃😃😃😃😃
गझल कळून घेतांना.....
..... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०१.०१.२०२१
...................
काही क्षण अस्वस्थ करतात
काही क्षण ती अस्वस्थता अधिकच वाढवतात
आणखी काही क्षणांनी हे शांत होईलही कदाचित
पण हे क्षण तरी असे अस्वस्थ करणारे आहेत हे नक्की
पुढे तरी काय लिहू अस्वस्थ क्षणांच्या सोबतीत .....
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०२.०१.२०२१
सोमवार, २२ जून, २०२०
kavita quarantine Ratnagiri
बुधवार, २७ मे, २०२०
Ek gazalmay aathavan
गझलमय आठवण
आज आदरणीय अरुणोदयजी भाटकर आपल्यात नाहीत ... त्यामुळे तर ही आठवण अधिक तीव्र झाली आहे . एक गझल मित्र आपण हरवला आहे...दर भेटीत पुस्तके देणारे अरुणोदयजी भाटकर ...गझलेवर अतोनात प्रेम करणारे अरुणोदयजी भाटकर ...ही आठवण माझ्या हया मित्रास समर्पित.....









