शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

कायम ठणठणीत !

कायम ठणठणीत !

तुम्ही एक पाहिलंय का , ज्यांना आजार होतात, त्यांनाच आजार होतात. काही माणसं कशी कायम निरोगी, कायम ठणठणीत असतात ! अजूनही काही लोक दवाखान्याची पायरी चढत नाहीत ! काही म्हणा काही माणसं जन्मापासूनच धडधाकट असतात. आमच्या शेजारची एक आजी ( माझी आजी नव्हे ! ) तिच्या पतीच्या निरोगीपणाबद्दल गौरवोद्गार काढायची :   म्हणायची, " ह्यांचा पिंडच दगडाचा ! " आणि मग हळू आवाजात पुटपुटायची , " दगडावर डोकं आपटण्यात अर्थ नाही ! " अनुभवाचे बोल होते ते !😀😀 ते आजोबा होतेच तसे दगडासारखे ! सत्तरीतही एकदम ठणठणीत ! आणखी एक काका होते. तेही असेच कायम निरोगी ! त्यांना एकमेव वाईट खोड होती ती दारू पिण्याची ! ते आजोबा आपले निर्व्यसनी होते, पण हे काका पक्के दारूडे होते. म्हणजे ते सगळा डे दारूनेच साजरा करायचे. तेही सत्तर वर्षेच जगले. पण अखेरपर्यंत कधीही आजारी पडले नाहीत ! आम्ही पोरं तेव्हा लहान होतो. मोठी माणसं बोलायची ते कानावर पडायचं.एवढी पितो पण कधी आजारी पडत नाही. बहुतेक दारूमुळे ते अधिक मस्तवाल, बेडर, बेछूट, निडर बनले असावेत, म्हणूनच त्यांना आजारसुध्दा घाबरत असावेत , असं काहीसं मोठी माणसं म्हणायची . असेल का हो तसं ? दुसरीकडे दारूने पोखरलेली, रस्त्यात पडलेली काही पाप्यांची पितरेही आम्ही बघत होतोच की ! मग ते का असे रोगी होतात , हा प्रश्न तेव्हा पडायचा. तोच आजही पडतो !

मला तर वाटते की ती शेजारची आजी बरोबर बोलायची. येणारा प्रत्येक जण स्वतःचा पिंडच घेऊन जन्माला येतो. तुम्हांला सांगतो, कोरोनाच्या काळात सरकारी दवाखान्यात प्रेतं बाहेर काढायला आमचा एक असाच एकदम ठणठणीत मित्र जायचा. बिनधास्त जायचा ! समाजसेवा करायला म्हणून जायचा. कोरोनाच्या कहराच्या काळात महिना दोन महिने तो जात होता. प्रेते बाहेर काढून देत होता . विशेष म्हणजे तो मास्कही वापरत नव्हता ! हे कळलं तेव्हा काळजीच्या सुरात काही मित्रांनी असं करू नकोस , मास्क वापरच, असं त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो एवढंच म्हणाला, " अरे तुम्ही घरात बसून सल्ला देताय. तिकडे येऊन बघा. माणूसकी हरत चाललीय. प्रेतांची विल्हेवाट लावायला कोणीच पुढे येत नाही. उद्या ही प्रेते सडली तर ती दुर्गंधी तुमच्या घरापर्यंत येईल. तेव्हा तुमच्या मास्कचाही उपयोग होणार नाही. मग तुम्हीही मरणारच. घरात बसलात म्हणून तो तुम्हांला सोडील या भ्रमात राहू नका. त्याला भिडावेच लागेल.  आज ना उद्या मरायचेच आहे. कोणाच्या तरी उपयोगी पडून तरी मरू या. " त्याचं ते म्हणणं खबरदारीच्या ( आणि मित्रांच्याही ! ) पलिकडचं होतं... पण निधड्या छातीच्या माणूसकीचं होतं ! आजही तो एकदम ठणठणीत दिसतो आहे ! तोही ठणठणीत पिंड घेऊनच जन्माला आला आहे ! पटलं ना मी काय म्हणतो ते !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०७.०७.२०२४ सकाळी ११.००

....................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: