आमची दहीहंडी
श्रीकृष्णाने दहीहंडी सुरू केली तेव्हा बाळगोपाळांच्या मनात शिंक्यावरच्या हंडीतले दही, दूध , लोणीच होते. श्रीकृष्णाचे खेळ श्रीकृष्णाला माहीत होते . पण सोबत्यांचे तसे नव्हते. त्यांच्या मनात फक्त आणि फक्त दही , दूध, लोणीच पक्के ठसले होते. युग बदलले. माणसे बदलली. पण स्वभाव बदलले नाहीत. तेव्हा एकच श्रीकृष्ण होता. कोणी कितीही लिहून ठेवले तरी तो पुन्हा आला नाही. येणारही नाही. कारण त्याच्या सोबत्यातूनच पुढे अनेक श्रीकृष्ण निर्माण झाले. ते त्याला येऊच देणार नाहीत. एवढे तंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या गूप्त प्रयोगशाळांमधून विकसित केले आहे. कोरोनाच्या वेळी प्रयोगशाळा काय करू शकते याच्या बातम्या आपण पाहिल्याच आहेत.
तेव्हा एकटाच श्रीकृष्ण एकाच वेळी सर्वत्र दिसायचा . आता एकाच वेळी अनेक श्रीकृष्ण अनेक ठिकाणी अनेक उद्योग करतांना दिसतात. आज एकूण लोकसंख्येच्या मानाने ते मोजकेच आहेत. उद्या ते वाढतील .आज ते कमी संख्येने एकत्र आले आहेत. जगभर एकत्र आले आहेत. उद्या ते अधिक संख्येने एकत्र येतील. ते उद्याचे जगावर राज्य करणारे नवे हुकूमशहा असतील. वसाहतवाद संपला नाही मित्रांनो. ते जगाच्या नव्या एमायडीश्या करतील. नवा वसाहतवाद आणतील.
एकूण काय तर तो परमात्मा श्रीकृष्ण अवघे विश्व व्यापून वर दशांगुळे उरलाच आहे. पण तरीही बदल होतो आहे. त्याला नकोसा बदल होतो आहे. एक गोष्ट तशीच आहे. आजही अनेक श्रीकृष्ण आणि त्यांचे पेंदे दही, दूध , लोण्यावर लक्ष ठेवून आहेत. शिंके हा प्रकार बदलला तरी दही, दूध , लोण्यांनी भरलेले हंडे आहेतच . काळ विरजण लावतोच आहे. माणूस त्याच्याभोवती फेर धरतो आहे. अनेक श्रीकृष्णांना आणि त्यांच्या साथीदारांना हवा तसाच नाचतो आहे. आजचे अनेक श्रीकृष्ण आणि त्यांचे अनेक साथीदार आमचेच दही, दूध, लोणी आमच्याच घरातून चोरून आपल्याच सोबत्यांना आधी देत आहेत. उरलेसुरले काही तुकडे आमच्या तोंडावर फेकत आहेत. आम्ही लाचारीने ते चघळत आहोत. ते सोबती हेच आहेत ज्यांना कोणतीही गरीबांसाठीची योजना आधी कळते आणि त्याचा ते गैरफायदा घेतात. आम्ही आनंदाने त्यांच्याच भोवती फेर धरुन बेहोशपणे नाचत आहोत. सगळ्यात खालच्या थरावर माना खाली घालून वर वर कोण चढत चालले आहेत हे बघण्याचे टाळत आमची दहीहंडी आपण मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत !
....देवीदास हरिश्चंद्र पाटील
२७.०८.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा