बुधवार, ३० मार्च, २०२२

तारण : मराठी गझल

 तारण 

#gazal

#marathi_gazal


सोडून व्हायचे मी साजण दिले कधीचे

तेव्हा तसे तिनेही कारण दिले कधीचे...



जमिनीवरीच माझा संसार थाटला मी 

आकाश पाखरांना आंदण दिले कधीचे...



मजलाच हाय माझे झाले नकोनकोसे

सोडून हाय मीही भांडण दिले कधीचे 



माझा अखेर मीही झालो समुद्र होतो

त्यांना चिपीतले मी खाजण दिले कधीचे



आयुष्य सर्व माझे गेले तिच्याचसाठी !

गझलेस मीच माझ्या तारण दिले कधीचे



... देवीदास हरिश्चंद्र पाटील



शुक्रवार, १८ मार्च, २०२२

Superb Facebook Post

 गुरूवर्य सुरेश भटांची एक आठवण...

#sureshbhat


आदरणीय सुरेश भटांना मी एक गझल पाठविली होती, जी त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करीत होती. गेली अनेक वर्षे मी ही गझल आणि माझ्या त्यासंदर्भातील भावना याबद्दल कोठेही लिहिले नव्हते.‌ पण आजच्या विशेष दिनी ती माझ्या रसिक चाहत्यांसाठी फेसबूकवर पोस्ट केली . त्या फेसबूक पोस्टची ही लिंक  ओन्ली देवीदास वरील माझ्या रसिक चाहत्यांसाठीही इथे देत आहे. फेसबूकवर खूप सुंदर अभिप्राय आले आहेत ; आपलाही अभिप्राय इथे जरूर द्यावा, ही विनंती. 

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

Teer once again पुन्हा एकदा तीर

 पुन्हा एकदा " तीर " गझल 

( दोन प्रसिद्ध शेर )



https://youtu.be/pJJz7h5qHcY



#bhimrao_panchale

मा. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नुकतीच ही गझल त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर अपलोड केली आहे. ही गझल आहे गझलकार श्री. दिलीप पांढरपट्टे यांची ! 

त्या गझलच्या अगदी सुरुवातीला आलापी नंतर मा. भीमरावजींनी श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील यांच्या तीर या मराठी गझलचे दोन सुप्रसिद्ध शेर गायले आहेत व प्रस्तावनेत याबद्दल त्यांनी आवर्जून लिहिलेही आहे.


असा मी तीर होतो जो चुकीने मारला गेलो


 ओन्ली देवीदास या आपल्या ब्लॉगच्या रसिक चाहत्यांसाठी हा उल्लेख इथे केला आहे. आपण अवश्य व्हिडिओ पहावा व कमेंट करावी, ही विनंती. 

......................

पूर्वी मी म्हणालो होतो : 

" मीच मजला पेश केले पाहिजे

जगाच्या दारात नेले पाहिजे "

थोडक्यात, जग आपल्याकडे येणार नाही , तर आपल्याला जगाच्या दारात स्वतःला नेले पाहिजे. आज तीस चाळीस वर्षांनी जगापुढे स्वतःला पेश करतात करता , जग माझ्याकडे येऊ लागले आहे, असा निदान भास तरी आता होऊ लागला आहे, हेही कमी नाही 😀😀😀😀😀 .


मराठी गझलबद्दलचा अशी शिकावी मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा : 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील .

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

Supuchya lagnala

मागे पुढे मागे पुढे होऊ नको बाय

सुपूच्या लग्नाला जायाचं हाय ....‌ || धृ ० ||


हळद लावली सुपूला काल

आज घाणा नि निमाची धमाल

आता नवरीला बाहेर काढायची हाय ... || ०१ ||


सासरची ओढ वाटते गोड

पण माहेराला नाही तोड

सुपूचा निघता निघेना पाय ... || ०२ ||


कसली हाय सुपूची आय

तुला बी मला बी ठावं हाय 

उशीर तिला गं खपायचा नाय ... || ०३ ||



....‌देवीदास हरिश्चंद्र पाटील


सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

The man who brought first rikshaw in Ratnagiri

 31 जानेवारी - 


कोकणात पर्यायाने रत्नागिरी शहरात पहिली पॅसेंजर रिक्षा आणणारे विष्णू लक्ष्मण गोगटे यांचा वाढदिवस / जयंती - 


जन्म -  31 जानेवारी, 1937 .
मृत्यू - 17 डिसेंबर, 2020 .


विष्णू यांचा जन्म 31 जानेवारी, 1937 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे व माध्यमिक  शालेय शिक्षण रत्नागिरी येथे झाले. फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथून 1956 साली ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांचे रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे ल. V. Gogate & Sons नावाने दुकान होते.  घरच्या व्यवसायात सन 1956 ते 1970 या काळात जात असत.  


त्याकाळची रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक

त्याकाळी रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक बैलांची सारवट, सायकल किंवा टॅक्सी मधून होत असे. 1970 च्या सुमारास वाघधरे  यांच्या गलबतातून त्यांना कालिकत येथे जाण्याची संधी मिळाली होती. कालिकत हे शहर रत्नागिरी शहरासारखेच. त्या परिसरात त्यावेळी रिक्षा व्यवसाय सुरू झाला होता. तिथूनच त्यांना त्यांच्या मनात असलेला रिक्षा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली  व त्यांनी पॅसेंजर ऑटो रिक्षा परमिट असलेली आणण्याचे ठरवले. 


रिक्षा परमिट मिळवण्यासाठी

त्यांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु परमिट मिळवण्यासाठी त्यांना 2 - वर्षे सतत पाठपुरावा करावा लागला होता. याकामी राजाभाऊ लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 


शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान

बजाज कंपनीची रिक्षा बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन त्यांनी आणली होती. रत्नागिरी शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान त्यांचाच. " वैशाली "हे त्यांच्या रिक्षाचे नाव. 7 फेब्रुवारी, 1972 रोजी लोकनेते शामराव पेजे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांनी रिक्षा व्यवसायाला प्रारंभ केला. शंकरराव पटवर्धन हे त्यांचे पहिले प्रवासी होत. 

रिक्षा व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. सन 1998 पर्यंत ते रिक्षा व्यवसायात कार्यरत होते. रत्नागिरी रिक्षा संघटनेचे अनेक वर्षे ते पदाधिकारी होते.


25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल सत्कार

त्यानंतर तिलक नगर परिसरात गोगटे कम्युनिकेशन अँड जनरल स्टोअर्स नावाने काही वर्षे व्यवसाय केला होता. सन 2012 सालच्या मे महिन्यात 25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती व सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने तत्कालिन मा. जिल्हा न्यायाधीश विजय मुन्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शालेय जीवनात पोहण्याची त्यांना विशेष आवड होती. याव्यतिरिक्त बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो -खो , कबड्डी इत्यादि मैदानी खेळातही त्यांचा सहभाग असायचा. 


उत्तम बॅडमिंटनपटू

रिक्षा व्यवसाय होताच असे असले तरी ते उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होते. बरीच वर्षे ते बॅडमिंटन स्वतः जरी खेळत होते तरीही ते कोच म्हणूनही प्रसिद्ध होते. रत्नागिरी शहरातील अनेक बॅडमिंटनपटू त्यांनी तयार केले. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता व अनेक बक्षीसेही मिळवली होती.  

रत्नागिरी बॅडमिंटनमध्ये रत्नागिरीतील आणखीन एक बॅडमिंटनपटू कै. डॉ. मु. न. पानवलकर यांच्यासोबत बॅडमिंटन डबल्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. रत्नागिरी शहरातील ही बॅडमिंटनमधली अभेद्य जोडी मानली जात होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर 45 वर्षांवरील वयोगटातील डबल्सचे उपविजेतेपद या जोडीने मिळवले होते. 

याव्यतिरिक्त अहमदनगर व  पुणे येथे सन 1982, 1984,1987,1992,1997 मध्ये खेळल्या गेलेल्या ओल्ड मॉंक्स व्हेट्रन बॅडमिंटन स्पर्धेत पाच वेळा ही जोडी विजयी ठरली होती.

1 ऑगस्ट, 2019 रोजी सर्वंकष विद्यामंदीरच्या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन गोगटे- पानवलकर या जोडीच्या हस्ते झाले होते. 


17 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली. 


अशा या विविधांगी  व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन . 


माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

History in Konkan Railway

  *कोकण रेल्वे मार्गांवर आज धावली पहिली विजेवरील दिवा - रत्नागिरी पॅसेंजर* 


*रत्नागिरीच्या सुपुत्रांनी केले पहिल्या गाडीचे सारथ्य!* 


 *रत्नागिरी-* कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी काल गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला.


*पहिल्या गाडीचे सारथ्य यांनी केले*


*लोको पायलट- शैलेश पवार

सहाय्यक लोको पायलट- सचिन पाडळकर

गार्ड -प्रणय तांबे.


गेल्या वर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या.


*कोकण रेल्वे मार्गावर प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु*


कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला.


गेल्यावर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. रात्री पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर येणार आहे.


विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. 

विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दरम्यान दिवा ते रत्नागिरी धावणारी गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.

काल गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे विद्युत इंजिनसह धावली. पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रात्री रत्नागिरी स्थानकावर येणार आहे. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. 

यावेळी रेल्वे युनियनचे विलास खेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला. गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दरम्यान दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक इंजिनसह धावणार आहे.

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

बाल्याची अटक एक कथा

 बाल्याची अटक टलली !

https://youtu.be/FUDRqrLC7zc


आमी सातवीत व्हतो तवाची गोष्ट. आमच्या वर्गात तीन तीनदा नापास झालीली दांडगी पोरं व्हती. त्यातला बाल्या माझा मैतर झालीला व्हता. त्या दिवशी बगा , शाला सुरू झाली. वर्गबी भरला. आमी समदे सावरूनबी बसलो.‌ पन गुरूजींचा पत्ताच नव्हता. असं कधी झालीलं नव्हतं . गुरूजी एकदम वक्तशीर मानूस.‌ त्यातच कधी नव्हं ता बाल्या जरा टेंशनमधी दिसत व्हता. मी बाल्याला इचारनार एवढयात गुरूजीच आत आलं. पण त्यांच्यासंगं हेडगुर्जी पण आलं. हेड गुरुजीं जाम चिडलीलं दिसत होतं.‌ आमास्नी काय समजंना.‌ आमी समदे उभे राहिलीलं. तेवढ्यात, हेडगुर्जी म्हनालं, " बाळ्या सोडून सगळे बसा. " उभा राहिलील्या बाल्याकडं बघून हेडगुर्जी गरजलं. " बाळया काल संध्याकाळी गुरुजींना काय बोललास ? पन बाल्या काय बोलंना. तसं हेडगुर्जीच बोललं. काय रे गाढवा, काय बोललास तू गुरूजींना ? तुला कोणाला काय बोलायचं ते कळतं का ? ते कुठल्या पदावर, तू कुठल्या पातळीवर ! पदाचा मानबीन कळतो की नाही तुला ? " बाल्या कायबी बोलंना हयं बघून हेडगुर्जींनी बाल्याच्या एक मुस्काटात ठेवून दिली ! आमी समदे गपगार झालीलं. पन बाल्या आपला उभाच. थोडासा गाल चोलया लागलीला इतकंच .‌ हेडगुर्जी पुन्हा गराजले. " निगरगट्टा, तुला अक्कल आहे का काही ? याच्यापुढे जर मोठ्या माणसाला असलं काही बोललास तर याद राख. पोलीसातच देतो तुला ! अटक झाली म्हणजे समजेल तुला ! " असं म्हनून मोठं गुर्जी त्यांच्या खोलीत गेलं.‌ इतक्यातच एकदम पोलीस गाडीचा सायरन वाजला. तं बाल्यानं सुंबाल्या केला. त्याला वाटलं पोलीस शालेकडंच येतायत. तं बाल्या धावत जो निंघाला ता एकदमच लेडीज मुतारीत जाऊन लपला ! मैदानात पोरी लगोरी खेलत व्हत्या. त्यांनी ध. रा. जवलकर बाईना सांगलं. त्यांनी बाल्याला हाका मारल्या. तसा बाल्या बोलला मी येतो बाहयर, पन मला जवल धरा. मला पोलीसांची जाम भीती वाटते बाईनु. इकडं काही पोरींना घाई झालीली व्हती. त्या बाईंना करंगळ्या झालाय लागलील्या. भयंकर अटीतटीचा प्रसंग व्हता तो.‌ बाईंचा इलाज चालंना, बाल्या बाहयर निघंना. शेवटी बाल्याची अट बाईंनी मान्य केली तसा बाल्या बाहयर आला आनि जवळकर बाईंना त्यानं घट्ट मिठीच मारली. समदया पोरी किंचालल्या आणि हेड गुरुजींचं लक्ष खिडकीतनं बाहयर गेलं. त्यांना बाल्याची भीती दिसलीच नाही. दिसलं तं भलतंच ! झालं, गुरुजींनी फोन फिरवला. पोलीस गाडी गावातच व्हती. दुसऱ्या मिनिटाला पोलीस आलं. त्यांनी बघला तो बाल्या थरथर कापया लागलीला. भीतीपायी त्यांनं जवलकर बाईंना आणखीनच जवल केलीलं ! बाईंना मिठीतनं सुटता येईना. शेवटी पोलीसांनी त्यांना सोडीवलं आणि सगल्यांना हेडगुर्जींच्या खोलीत नेलंनी .‌तिथं समद्यांच्या जबान्या झाल्या. जबानीतनं पोलीसांना सगला परकार कलला. ते हसू लागलं आनि बाल्याची अटक टलली ! हयं पोर आपल्याला टराकतं हय बघून पोलीस खुशीत निघून गेलं. पोलीस गेलं. शाला सुटली. आमी समदं बाहयर पडलो.‌ त्या समद्यात बाल्या गुरूजींना काय अपमानास्पद बोलला व्हता तं आम्हा पोरांपैकी कुनालाच कललं नाय. मी बाल्याला इचारलं तं ता म्होरलाच बोलून गेला. काय तं म्हने मी काय असा तसा वाटलो काय त्यांना ! समाजतात काय सौताला ? मला अटक करया यांचं बापजादं याया हवंत ! संध्याकाल होयत आली व्हती. घराकडं जावन मला कोंबडी झाकयाची व्हती. मी आपला गप व्हवून घरचा रस्ता धरला. 

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

कशासाठी पांडुरंगा

कशासाठी पांडुरंगा


कशासाठी पांडुरंगा तुझे गुण गाऊ ?

कशासाठी पंढरीला तुझ्या सांग येऊ ... || धृ ०||



आता कुठे आहे ज्ञाना, आता कुठे नामा ?

पाहतो रे जो तो आता, येतो कोण कामा !

माझ्यातला नि:स्वार्थी भाव कुठे ठेऊ ... || ०१ ||



आता कोणाला कोणाची राहिली न भीती !

आहे कुठे न्याय आता ? आहे कुठे नीती ? 

पाप हेच पुण्य होता... पुण्य कुठे नेऊ ... || ०२ ||



आता तुझी चंद्रभागा आटोनिया गेली

पायाखालची तुझ्या वीट कोरडी झाली

भक्तीचा ओलावा मी सांग कुणा देऊ ... || ०३ ||




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०९.२०२१

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

Birthday Celebration

 आम्ही इथे वाढदिवस साजरे करतो


वाढदिवस साधारणपणे आपण घरात किंवा अन्य बंदिस्त जागेत साजरे करतो. काही जण म्हणतात की वाढदिवस कशाला साजरे करायचे ? वाढदिवस म्हणजे खरं तर उलटी गणती सुरू असते. आयुष्यातले एक एक वर्षं किंवा दिवस कमी होत असतांनाच त्याला वाढदिवस तरी कसा म्हणता ? असा काहींचा प्रश्न असतो. तर काही जणांना आनंदासाठी काही ना काही निमित्त लागत असते. त्यांच्यासाठी तर वाढदिवस ही पर्वणीच ! काही जण मात्र इतरांचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि तेही वैशिष्ट्यपूर्ण जागेत ! निसर्गसंपन्न वातावरणात, मोकळ्या हवेत ! 



आमच्या गावातही अशी उत्साही तरूण मुलं आहेत ज्यांनी एका शेडचा उपयोग वाढदिवस साजरा करण्यासाठी केला आहे ! या मुलांच्या कलात्मक बुध्दीला नक्कीच दाद द्यावी लागेल !   


हे वाढदिवस सर्वच स्नेही मंडळींचे साजरे केले जातात. विशेष म्हणजे वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरे करूनही कुठेही गडबड गोंगाट नसतो. खऱ्या अर्थाने हे तरूण असूनही अत्यंत विवेकाने व आनंदाला कुठलेच गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने वाढदिवस साजरे केले जातात ! म्हणूनच या मुलांचं खूप कौतुक करावं वाटतं. केवळ त्यांच्यासाठीच हा पोस्टप्रपंच ! 

....................

गालबोट लागलेच ! 

काही काळापूर्वी वरीलप्रमाणे पोस्टप्रपंच केला खरा ; पण परिस्थिती सतत बदलत असते. चांगल्याला दृष्ट लागली म्हणा किंवा कायम तीच स्थिती रहात नाही म्हणा...पण काही तरी घडल्याने हे वाढदिवस साजरे होणे वर्षभरानंतर बंद झाले. कुठे तरी माशी शिंकली खरी ! काहींना आसपास चांगले घडतेय याचेच दु:खं असते . अशा कोणी तरी मोडता घातला असावा किंवा तरूणाईचाच पाय घसरला असावा. काही असो , वाढदिवस साजरे होणे बंद झाले हे नक्की. शेवटी गालबोट लागलेच !