मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

Namsaptah 2023 part 2

नामसप्ताहाची सुरूवात : भाग २

मराठवाडीच्या पहिल्या पहाऱ्याची सुरूवात तर आपण पहिल्या भागातील  व्हिडिओत पाहिली. आता त्यानंतरच्या पहाऱ्याची म्हणजे देऊळवाडीच्या पहाऱ्याची काही भजने आपण पुढील व्हिडिओत पाहू. 

देऊळवाडी

व्हिडीओ पाहण्यापूर्वी देऊळवाडीतील थोडी माहिती घेऊ.‌ देऊळवाडी म्हणजे देवळापासून सुरू होऊन देवळाच्या मागे ३५-४० घरांचा पसरलेला अर्धवर्तुळाकार पसरलेला भूभाग . देऊळवाडीतील महिलाही मंदिरात नामसप्ताहाच्या पहाऱ्यात भजन करतात. इतकेच नव्हे तर एरव्हीही दर मंगळवारी त्या नवलाई पावणाई मंदिरात भजन करतात. फक्त हे भजन उभे राहून न करता बसून केले जाते. या महिलांच्या भजनाचा एक व्हिडिओच आता आपण पाहू : 


तर अशा देऊळवाडीचा पहारा हा आजकाल पुरूष आणि महिला असा मिश्रित स्वरूपाचा असतो. पुरूष वर्गामध्ये पूर्वापार पहारे करण्याची एक परंपरा आहे. प्रामुख्याने कै. नारायण भाटकर यांचे नांव यासंदर्भात आदर्श म्हणून घेतले जाते. त्यांच्याकडे तीन तास न थकता गायन करण्याचे सामर्थ्य होते. आजची कर्ती पिढी ही त्यावेळी बाल्यावस्थेत होती. या पिढीला साठ वर्षांची नामसप्ताहाची माहिती आहे. या पिढीला कै. नारायण भाटकर यांना भजन करतांना पाहण्याचे भाग्य लाभले आहे. कै. नारायण भाटकर यांचे त्यावेळचे सहकारी शिरधनकर , कीर , हातिसकर , पेडणेकर हेही या नामसप्ताहातील वैशिष्ट्यपूर्ण सहभागाबद्दल नावाजलेले होते. ही पिढी जबरदस्त शिस्तप्रिय होती व त्यांना पहारा सुरू असतांना कोणतेही वावगे कृत्य चालत नसे. इतकेच नव्हे ; तर कुठल्या मुलाचा ताल वा ठेका चुकला तर ते हातातला टाळ मारायलाही मागे पुढे बघत नसायचे. आजच्या कर्त्या पिढीने आजोबांच्या पिढीकडून असा मार कित्येक वेळा खाल्लेला आहे. 

मधली व्रात्य पिढी


खरं तर , नातवंडांच्या अंगात जो हूडपणा आला होता तो मूळातच मधल्या म्हणजे वडिलांच्या पिढीकडून आला होता. आजोबांना करडी शिस्त , भजनातील तल्लीनता अभिप्रेत होती खरी , पण त्यांच्याच तरूण , विवाहित मुलांनी हळूहळू ही शिस्त मोडीत काढायला सुरूवात केली होती . मात्र त्यांच्यामध्येही भजनातील आवड आणि तल्लीनता कायम होती. या व्रात्य पिढीत शंकर हातिसकर ,  मधूकर कीर ,  वामन पेडणेकर , अंकुश पेडणेकर , मुरारी हातिसकर ही नांवे आघाडीवर होती. हे सगळे चांगले गाणारे होते . यातले मधुकर कीर तर गवळण अतिशय गोड आवाजात व पूर्ण तादात्मतेने म्हणायचे. मात्र या पिढीने गाण्यातून एकमेकांना टोमणे मारण्याची कला खूपच विकसित केली होती. पण हे टोमणेही  ते खिलाडू वृत्तीने घ्यायचे , हे विशेष. त्यांच्या पुढील पिढीने मात्र टोमणे न मारता भजन करायला सुरूवात केली हेही विशेष ! या पिढीने हे पहारे करड्या शिस्तीला फाटा देत मोकळ्या वातावरणात , हसतखेळत होतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले , हेही विशेष ! आज त्यांची मुले व नातवंडेही हाच कित्ता गिरवून नामसप्ताह आनंदाने पार पाडीत आहेत ! आज  पन्नाशी- साठीतल्या या पिढीत श्री. शैलेंद्र शंकर हातिसकर व श्री. दीपक मधुकर कीर हे भजनीबुवा देऊळवाडीचे आदर्श आहेत. त्यांच्या बरोबरीने श्री. सुनिल तुकाराम भाटकर , श्री. कमलाकर तुकाराम भाटकर, श्री. अजित वसंत भाटकर,  श्री. ययाती उदय हातिसकर ,  श्री. निलेश चंद्रकांत पेडणेकर, श्री. मंदार  महेंद्र लिंगायत हे सुंदर गायन करत आहेत. सुनिल व कमलाकर या भाटकर बंधूंनी तर थेट त्यांच्या आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. ते न थकता बराच काळ सलग भजने म्हणतात ! अजित भाटकर हा त्यांचा चुलत भाऊही चांगला गातो . विशेषत: साईबाबांची भजने तो खूप तल्लीन होऊन गातो. 

एक हृद्य आठवण : 


अशीच एक हृद्य आठवण आहे ती एका हरहुन्नरी हसमुख कलाकाराची. भानुदास हातिसकर. जो गेल्या वर्षीच्या नामसप्ताहात उत्साहाने सहभागी होता ! पण यंदाच्या नामसप्ताहात त्याचे चैतन्यदायी व्यक्तिमत्व पाहण्याचे आमच्या भाग्यात नव्हते. त्याचे जाणे खऱ्या अर्थाने चटका लावून गेले ! भालचंद्र हा बाबा या टोपण नावाने सुपरिचित होता. 

गेल्या वर्षीच्या नामसप्ताहातील बाबाच्या आठवणी जागवणारे काही व्हिडीओ : 




बाबा स्वतःची रिक्षा चालवायचा. तो इतका प्रसिध्द होता की त्याच्या निधनानंतर शहरात काही ठिकाणी फ्लेक्स लागले होते. देऊळवाडीत तर त्याचे घरच आहे.‌ पण बरीच वर्षे ही हातिसकर मंडळी शहरात राहतात. तिथूनच बाबा नामसप्ताहाला यायचा. नुकतीच त्याची मुलगी यशश्री नवलाई पावणाई मंदिरातील नामसप्ताहात येऊन गेली. जिथे बाबा पेटी वाजवत असायचा त्याच जागेजवळ तिची भेट झाली आणि बाबाच्या आठवणी दाटून आल्या...

Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवर नामसप्ताहाचे व्हिडीओ उपलब्ध...

नामसप्ताहाचे व्हिडीओ Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करण्यात येत आहेत.‌ त्यापैकी काही तुमच्यासाठी यू ट्यूब वरून इथे शेअर करीत आहोत. 







नामसप्ताहात संस्कृतीची देवाणघेवाण

जेव्हा संस्कृती विकसित होत असते तेव्हा तिचा इतर संस्कृतींशी संपर्क येतो. या नामसप्ताहाचेही असेच आहे. जाकीमिऱ्यात हा नामसप्ताह जसा जसा अन्य गावांतील भजनी कलाकारांना माहिती होत गेला , तसे तसे हे बाहेरगावचे कलाकार जाकीमिऱ्यामध्ये प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या नामसप्ताहात येऊ लागले. इथल्या लोकांनीही त्यांना नामसप्ताहात भजन सादर करण्यास आनंदाने मोकळीक दिली. संस्कृतींचे हे आदानप्रदान यावर्षीही दिसून आले . 

यावर्षी नारायणमळी गावचा मोर्या ग्रूप मंदिरात आला व त्यांनी अतिशय सुरेल अशी भजने सादर केली. त्यातल्या काही भजनांची झलक पुढील व्हिडीओमध्ये तुम्हांला आढळून येईल. त्यांच्या आणि इथल्या गायन व वादन पध्दतीतला फरकही आपल्या लक्षात येईल . चला तर आपण devidas patil creation या  यू टयूब चॅनेलवरून प्रत्यक्ष व्हिडीओच पाहू.‌


अशा प्रकारे , नामसप्ताह सुरू आहे. त्याचं वार्तांकनही सुरू राहीलच. पण तूर्तास इथेच थांबू ! तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा . 

गझल , तूम मेरी जिंदगी बन गयी हो ...

तेरा मतला मेरा काफिया 


जो न मौका मिला था कभी, वो मौका मिलने लगा 

बढ़ने लगी मुलाकाते ....  प्यार में रंग भरने लगा ...


चेहरे पे हंसी आ गयी, दिल में उमंग छा गयी

तिरछी नजर का इशारा अब समझने लगा


नींद ऐसी लगी... ख्वाब ऐसे आये के पूछो मत

किसी तालाब में चांद उतरकर थिरकने लगा


न जाने ये क्या हो गया, न जाने ये कैसे हो गया

तेरी आखो में मेरा खयाल अब झलकने लगा 

 

गझल, तुम मेरी जिंदगी बन गयी हो,  क्या कहूँ ? 

तेरा मतला मेरा काफिया इक दुजेमें ढलने लगा !


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०८.२०२३ दोपहर ०३.३०

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

Namsaptah 2023 Part 1

शंभर वर्षाहून जुन्या मंदिरातील 

नामसप्ताह २०२३ ...

रत्नागिरीतील जाकीमिऱ्या गावच्या नवलाई पावणाई मंदिरातील सालाबादप्रमाणेचा नामसप्ताह 

Namsaptah 2023 at Navalai Pavnai Temple

मंदिर स्थापना : सन १९१३ . जिर्णोध्दार : सन २०१७


17.08.2023 रोजी दुपारी ०१.०० वाजता सुरूवात. 



नामसप्ताह २०२३ पाहण्यापूर्वी ...


प्रथम आपण नामसप्ताह २०२२ ची झलक पाहू.... Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवरून  व्हिडिओज साभार ....







श्रावण मासारंभ !


तर आज श्रावण मासारंभ ! श्रावणातल्या या पहिल्याच दिवशी जाकीमिऱ्या येथील नवलाई पावणाई मंदिरात नामसप्ताहाची दरवर्षी सुरूवात होते ! यंदाही ती तशी होत आहे. मंदिर व्यवस्थापन समिती यंदा बदलली असून तिचा हा पहिलाच नामसप्ताह आहे. 

नूतन मंदिर व्यवस्थापन समिती





नामसप्ताहाला सप्ता असेही म्हणतात.  नामसप्ताहात तीन तीन तासांच्या अवधीने अखंड भजन केले जाते. जाकीमिऱ्यात मराठवाडी , देऊळवाडी , शिवलकर वाडी , तळेकर वाडी व पाटील वाडी असे पाच पोटविभाग आहेत.  प्रत्येक पोटविभागाला वाडी असे संबोधले जाते. दर तीन तासाने एक वाडी भजन करते. दर तीन तासांनी बदलणाऱ्या या भजनाला पहारा असे म्हटले जाते.  दिवसाचे चोवीस तास असे आठवडाभर सलग उभे राहून खांद्यावर वीणा घेऊन टाळ मृदुंगाच्या साथीने हे भजन करण्यात येते.

कालपासूनच मंदिरात नामसप्ताह प्रतिष्ठापनेची विविध कामे सुरू आहेत. आज सकाळी या कामांनी वेग घेतला आहे. दुपारी एक वाजता नामसप्ताह प्रतिष्ठापना होऊन नामसप्ताहाची सुरूवात होईल. 

गेले काही दिवस इकडे पाऊस गायब झाला होता . पण नामसप्ताहात हटकून पाऊस पडतो. आता सकाळचे दहा वाजत आहेत आणि जाकीमिऱ्यामध्ये पहिली श्रावणसर सुरू झाली आहे. आपण पुढील व्हिडीओमधून तिचा आनंद घ्यावा.  



नामसप्ताहाची सुरूवात 

साडेबारा वाजता मंदिरामध्ये नामसप्ताह प्रतिष्ठापनेला सुरूवात झाली.  बरोबर एक वाजता नामसप्ताहाला सुरूवात झाली. आता पर्यंत पाचही वाडयांचे मृदुंग एकसाथ वाजत होते. पण आता बाकीचे मृदुंग थांबवून पहिला पहारा असलेल्या मराठवाडीच्या मृदुंगावर थाप पडली आणि पहिला पहारा सुरू झाला.  त्याची झलक दाखवणारा छोटासा व्हिडीओ पहा : 



एक वाजता सुरू झालेला मराठवाडीचा पहिला पहारा चार वाजता सुटेल व त्याचवेळी पुढील वाडीचा म्हणजे देऊळवाडीचा पहारा भरेल. तो सात वाजता सुटेल. पहारा जितके वाजता सुटतो त्यापासून बरोब्बर बारा तासांनी त्या वाडीचा पुढचा पहारा येतो. उदा. मराठवाडीचा आज संध्याकाळी चार वाजता सुटलेला पहारा बरोबर बारा तासांनी उद्या पहाटे चार वाजता भरेल. तसेच, देऊळवाडीचा आज संध्याकाळी सात वाजता सुटणारा पहारा उद्या सकाळी सात वाजता पुन्हा भरेल. अशा पध्दतीने सलगपणे सात दिवस मंदिरात नामघोष सुरू राहील . याचा वृत्तांत वेळोवेळी इथे देणार आहोत.‌ 

क्रमशः ....


#देवाचिये व्दारी

#अभंग

#नवलाईपावणाई

#नामसप्ताह

#सप्ता





गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

Manus aatmhattya ka karto

माणूस आत्महत्त्या का करतो ?

व्यवहाराच्या कसोटीवर भावनेचा संयम टिकत नाही तेव्हाच माणूस टोकाचा निर्णय घेतो.‌ आत्महत्या ही एका क्षणात झालेली नसते , खूप अगोदर पासून ढग जमू लागलेले असतात. दु:खद पाऊस नंतर कोसळतो. जीव कोणाला नको असतो ? पण अखेरच्या पर्यायांचाही पर्याय उरत नाही , तेव्हा हे दुर्दैवी कृत्य घडते. असे घडू नये... कधीही...कुणाच्याही बाबतीत....

Nitin Desai


नितीन देसाईंबाबत फेसबूकवरची पोस्ट ...

नुकताच नितीन देसाईंच्या आत्महत्त्येने प्रचंड धक्का दिला. आत्महत्या नेहमीच धक्कादायक असते. त्यात ती नितीन देसाईंसारख्या  एका महान कला दिग्दर्शकाची , सिने दिग्दर्शकाची , कलाकाराची आत्महत्या ही अधिकच धक्कादायक असते. अनेकांना चटका लावणारी असते. समाजमाध्यमांमध्ये यावर खूप काही येत असते. तसे ते आलेच व अजूनही येत आहे.  

नुकतीच नितीन देसाईंच्या आत्महत्येवर फेसबूकवर अशीच एक पोस्ट वाचली. तेव्हा मनात वरील विचार आले. खरेच , माणूस आत्महत्या का करतो ? अनेक कारणं असतात. आत्महत्या करण्यामागची १ , २ , ३..... कारणे... अशी यादी बरीच करता येते. पण त्या यादीत माणसाच्या होत गेलेल्या कोंडीची नेमकी भावना कशी पकडता येईल ? ही कोंडी काही एकाएकी झालेली नसते. मग ही कोंडी कशी कशी होत गेली ? कोंडी इतकी वाढावी की अनेकांना आधार देणाऱ्या , आयुष्यात उभे करणाऱ्या विचारी माणसाने स्वतःच मृत्यूला कवटाळावे ? आत्महत्येच्या निर्णयाचा आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा तो नेमका क्षण कसा पाहता येईल ? कसा पकडता येईल ?  आता काही जण आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतिम उपयोग करून स्वतःच्याच आत्महत्तेचा व्हिडीओही बनवतात ! केवढी सुधारणा झाली आहे पहा ! माणसाचे जीवन सुधारण्यासाठी झालेली सुधारणा त्याचा आत्मघात चित्रित करण्यासाठी माणसालाच उपयोगी पडावी , हे किती दुर्दैवी आहे ! हे खूपच यातनादायी आहे ! 

घालमेल आणि उलाघाल


कारणे कोणतीही असोत , माणूस एका सर्वात अप्रिय निर्णयाला अंतिम स्वरूप देतो हे खरे ! इथपर्यंत यायला त्याला किती प्रयास पडले असतील ! त्याची केवढी घुसमट झाली असेल ! ही घुसमट माणूस कुणाशीच व्यक्त का करू शकत नाही ? त्याच्या मनाची घालमेल का होते ? उलाघाल का होते ?  आत्महत्येत नेमके हेच का होते ?  इतके आप्तस्वकीय असतात , इतके मित्र असतात ! आतापर्यंत त्याची अशी आख्खी दुनिया त्याच्या अवतीभवती नुसती फेर धरून असते , ती नेमकी याच वेळी त्याला परकी का वाटते ? इतकी परकी की एक गोष्ट , फक्त एक गोष्ट त्याला त्यातल्या कोणालाच सांगावीशी का वाटत नाही ? अगदी आजपर्यंत गळ्यात गळे घालून असलेल्या मित्रांपैकी कुणा एकालाही त्याला आपले दु:खं सांगताच येऊ नये ? का वाटत नाही त्याला कुणाशीच मन मोकळे करावेसे ? बोलून तरी बघायला काय हरकत असते ? नंतर चुकचुकणाऱ्यांच्या मनात ही एक शंकाही हुरहुरत राहते.

तो का बोलू शकत नाही ?


खरेच आत्महत्या करणाऱ्याला कुणाशीच बोलावेसे वाटत नसेल ? वाटत असले  तरी तो बोलू शकत नाही , हा कटू अनुभव आहे. तो का बोलू शकत नाही ? एक तर हे बोलणे बोलणाऱ्याला खूप क्लेशदायक असते. कोणाला कसे सांगावे हा प्रश्न खूप वेळ खातो. हे सांगणेही तसे कठीणच असते ! उराच्या  तळात जपलेले गूपित सांगताना खूप कष्ट पडतात . त्यातही हे गूपित बरेचदा सांगण्यासारखे नसते. ही दुनिया चांगली नाही. हशा होऊ शकतो. तमाशा होऊ शकतो. त्यात पुन्हा आपले आपल्याला काय म्हणतील , समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहील , त्यावेळी मेल्याहू़न मेले होण्यापेक्षा खरोखरचे मेलेलेच बरे , असे वाटून माणूस कोणाशीच बोलत नाही. खरे तर ही चूक होते . बदनामीपेक्षा जीव मोठा असतो.‌ देशाला चुना लावून परदेशात उजळ माथ्याने फिरणारे काही कमी नाहीत. आसपासच्या समाजातही नको ते धंदे उघडपणे करून मी नाही त्यातली , कडी लावा आतली अशा प्रवृत्तीची किती तरी लबाड माणसे उजळमाथ्याने सहज  फिरताना  आढळतात. ती आत्महत्या करीत नाहीत , मात्र प्रामाणिक , पापभीरू माणूस खोट्या पाप पुण्याच्या कल्पनांना व प्रतिष्ठेला भुलून जीव गमावतो. हे ठीक नाही . पण असे होते हे खरे आणि हेच दुर्दैवी आहे !

सारे काही संपल्याची तीव्र भावना

माणसाला सारेच संपल्याचे जाणवते तेव्हाच तो आपले जीवन संपवतो ! सारेच संपल्याची , कोणताच मार्ग किंवा उपाय आता शिल्लक राहिला नसल्याची जाणीव माणसाला नक्की केव्हा आणि कशी होते ? का होते ? हे सांगणे आपल्याला कठीण आहे , पण अशी भावना प्रबळ होते आणि माणूस आत्महत्त्या करतो हे सत्य आहे. नितीन देसाईंसारख्या कलाकाराच्या हृदयात दबलेले दु:खं आणि आत्महत्त्या करण्यापर्यंतची विवशता त्यांच्यापुरती तरी त्यांच्यासोबतच अनंतात विलीन झाली आहे , हे खरे ! परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो , हीच परमेश्वरचरणी प्रार्थना !

#nitin_desai
#suicide
#facebook_story 

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

Gadkari as ka bolale : Asle Faltu dhandhe band kara

 असले फालतू धंदे बंद करा 😀😀😀 काय छान झापलंय राव !

नितीन गडकरींचा व्हिडीओ 

Nitin Gadkari talks


वरील " असले फालतू धंदे बंद करा " या लिंकवर क्लिक करा आणि नितीन गडकरींचा व्हिडीओ पहा. 

व्हिडीओमध्ये नितीन गडकरी जे बोलले आहेत ते त्यांच्या कानपिचक्या देण्याच्या शैलीला साजेसेच आहे. गडकरी हे अनेकदा या शैलीचा भरपूर उपयोग करतात. काहीसे मिश्किल बोलतांना हसत हसत पण योग्य जागी चिमटे काढण्याचे कसब गडकरींकडे आहे , यात काही वाद नाही. आपल्याकडे काही तरी वेगळेपणा आहे याची झलक गडकरींच्या भाषणांमध्ये बरेचदा झळकते , तशीच ती आताही झळकली आहे. त्यांच्या मिश्किल भाषेमुळे कोणाला जखम होत नाही, हे विशेष .  या व्हिडीओत त्यांची भाषा बावनकुळेंबाबतही काहीशी अशीच आहे. 

बावनकुळेंचे जातीचे राजकारण

बावनकुळेंचे जातीचे राजकारण असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले . बावनकुळेंचे जातीचे हे राजकारण गडकरींना तितकेसे पसंत दिसत नाही. पण गडकरीनी स्वतःही पूर्वी असे जातींचे सेल केल्याचे जाहीरपणे सांगतात.‌ कदाचित त्यांना इथे स्वतःचा प्रामाणिकपणा दाखविण्याचा मोह आवरला नसावा. गेल्या काही वर्षात राजकारणाने जी हीन पातळी गाठली आहे त्यातूनच त्याची काही वैशिष्ट्येही निर्माण झाली आहेत. चाॅकलेटस वाटण्याचा किस्सा काय किंवा लाॅलीपाॅपचा किस्सा काय , यातले एक वैशिष्ठ्य सांगून जातो. ते म्हणजे , मोठे नेतेच काही विधाने बेधडकरित्या उघडपणे व्यक्त करू लागले आहेत व यातूनच जाहीरपणे बेलगाम वक्तव्ये करण्याचा सपाटा इतर नेते , उपनेते व कार्यकर्ते यांच्याकडूनही  लावला जातो आहे. आपण करतोय ते आता उघड उघड सांगण्यासारखेच आहे असे उघड उघड मानून हे सर्व उघड उघड बोलू लागले आहेत. हेही चांगलेच होते आहे . कारण यामुळे लोकांना एकूणच मतदानाचे आपले पवित्र कर्तव्य कशाच्या आधारावर उभे राहते आहे , आपण कसल्याकसल्या वाटपाला बळी पडून हे महान कर्तव्य पार पाडीत आहोत याचे हळूहळू का होईना , पण आकलन होऊ लागल्याचे दिसत आहे . बहूतेक गोपाळ गणेश आगरकरांना अभिप्रेत असलेले शहाणपण हे राजकीय नेतेच लोकांना देत आहेत , हे विशेष ! बाकी काहीशी पुनरुक्ती होऊनही  गडकरींनी बावनकुळेंना चांगलंच झापलंय म्हणा ! 

बावनकुळेंचे काय चालले आहे यापेक्षा...

इथे बावनकुळेंचे काय चालले आहे व ते बरोबर नाही , हे गडकरी दाखवून देत आहेत. कधी कधी कार्यकर्ते आणि इतर जनता जनार्दनातले उत्साही प्रेक्षक भरात येऊन वक्त्याला जोरदार प्रतिसाद देतात . वक्ताही याचा अर्थ फारच जोरदार लावून  ऐन भरात येतो आणि उत्साहाच्या भरात हवे नको ते बोलून जातो. मग मिडिया त्याला वेगवेगळे रंग देतो. कारण त्याला तसे करणे म्हणे भाग असते ! हल्ली हे म्हणे जरा जास्तच होते आहे असे तुम्हांला वाटते का ? नाही म्हणजे , दुसऱ्याच दिवशी वक्त्याला घूमजाव करावं लागतं , मी बोललोच नाही पासून ते माझे वाक्यं तोडून मोडून दाखवले किंवा माझ्या  प्रामाणिक (!) बोलण्याचा विपर्यास केला गेला ते अगदी हेतूपुरस्सर भलताच अर्थ काढला गेला , इथपर्यंत ही मोडस ऑपरेंडी जाते ! पुन्हा लोक संभ्रमातच  ! कधी कधी मी मारल्यासारखे करायचे तू रडल्यासारखे करायचे असेही चालते ! तेव्हा कोण काय किती बोलतोय यापेक्षा लोकांसाठी किती तळमळीने बोलतोय आणि लोकांना त्या बोलण्याचा किती उपयोग होतोय , हे महत्वाचे ! बाकी उत्तम वक्तृत्वाची अलंकारिक हास्यरसयुक्त वा रडरसयुक्त भावनिक राजकीय भाषणेच झडायची आणि भोळी जनता ऐकूनच तृप्त व्हायची 😀😀 !

#bhashan_kase_karave

#howtospeech

#फालतू_धंदे

#video

#nitin_gadkari