book review लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
book review लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ९ जून, २०२४

ओळखीच्या खुणा

ओळखीच्या खुणा 

काव्यसंग्रह


 ओळखीच्या खुणा हा अविनाश फणसेकर सरांचा काव्यसंग्रह. आज मी ह्या काव्यसंग्रहातील काही कवितांवरच लिहिणार आहे. खरे तर, त्यात मला सापडलेल्या रत्नागिरीच्या मराठी गझलच्या ओळखीच्या पाऊलखुणांबद्दल मी इथे लिहिणार आहे. सर गणिताचे प्राध्यापक होते पण त्यांचे मन कवींचे होते. कलंदर कवींचे होते.‌ त्यांचा हा काव्यसंग्रह रत्नागिरीच्या कीर पब्लिकेशनने मार्च २०१४ मध्ये प्रकाशित केला . दुर्दैवाने सर तेव्हा हयात नव्हते.‌ दहा वर्षांनी या काव्यसंग्रहाची आठवण व्हायचे कारण म्हणजे या काव्यसंग्रहातील आदरणीय प्र. ल. मयेकर यांचे भावनोत्कट मनोगत . त्यात ते म्हणतात , " ...त्यांच्या प्रतिभेमध्ये आसमंत उजळून किंवा जाळूनही टाकण्याची शक्ती नक्कीच होती. पण त्यांनी स्वतःच तो अग्नी गिळून टाकला होता. कुठून आणली या माणसाने ही संतांची करूणा ? फणसेकर सर आपल्यासोबत या प्रश्नाचं उत्तरही घेऊन गेलेले आहेत..." 


माझा दावा नाही पण...

प्र. लं. सारख्या थोर व्यक्तीला जे उत्तर सापडले नाही ते मला सापडले असा मी दावा करणे हास्यास्पद आहे व तो मी करीतही नाही. पण मला प्र. लं. च्या त्या प्रश्नांतील संतांची करूणा या शब्दांनी फणसेकर सरांच्या कवितेकडे अधिक ओढलं हे मात्र खरं !  फणसेकर सरांचा मला काही वर्षेच सहवास लाभला. ते विव्दान प्राध्यापक , नाटककार व कलंदर कवी. तर मी नुकताच काव्यमैफिलींमध्ये दिसू लागलेला.  सुरूवातीला तर त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीतीच वाटायची. पण तरीही माझा स्नेह त्यांच्याशी जुळला यात त्यांचाच वाटा फार मोठा होता. सन १९८५-९० चा तो काळ होता. रत्नागिरीत साहित्यिक कार्यक्रम फार दुर्मिळ असायचे. पण स्मिताताई राजवाडे , विनय परांजपे यासारखी सतत धडपडणारी माणसे किमान छोटेखानी कवी संमेलन तरी अधूनमधून घडवायचीच. मी त्यांच्यासोबतच असायचो . बरेचदा फणसेकर सर व्यासपीठावर असायचे. तिथूनच ते सांगायचेत , " देवीदास, आज तुझी गझल झालीच पाहिजे " . कधी कधी तर हक्काने माझ्या पाठीवर थाप मारून ते तसं सांगायचेत.  खरं तर सरांचा पिंड गझलकाराचा होता. त्यांची कलंदरी गझलियतशी मिळतीजुळती होती. पण चुकूनही कधी मी गझल लिहितो किंवा मी माझी गझल सादर करतो असं ते म्हणाले नाहीत. उलट माझ्यासारख्या यत्किंचित कवीला ते गझल सादर करायला आवडीने सांगायचे. 

अशा या थोर मनाच्या माणसाच्या काळजात कुठेतरी खोल गझल होती. मला वाटतं, प्र. लं. सर म्हणाले ती संतांची करुणा पेलण्याचं सामर्थ्य फणसेकर सरांना गझलेनेच दिलं असावं. ' तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही ' हे शब्द सुरेश भटांनी किती खात्रीने लिहिले असतील ! सुरेश भटांना हे सामर्थ्य गझलनेच दिलं असावं आणि त्याच पध्दतीने संतांची करुणा पेलण्याचं सामर्थ्य फणसेकर सरांना गझलेनेच दिलं असावं. कारण, संकट काळात मन मजबूत करण्याचं सामर्थ्य गझलमध्ये आहे, हे जीवन संघर्षात मी अनेकदा अनुभवले आहे, अगदी आजही, हा लेख लिहीत असतांनाही अनुभवतो आहे. 

फणसेकर सरांची कविता समजून घेण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व जाणणंही  आवश्यक आहे. मराठी गझल ही वृत्तात लिहिली जाते. पण फणसेकर सर कलंदरी वृत्तीचे. स्वच्छंद कवी. पण गझलची वृत्ती भिनलेले कवी. आदरणीय सुरेश भट ज्याला गझलची वृत्ती म्हणतात ती फणसेकर सरांकडे ठासून भरलेली होती. गझलेचा भाव, आवेश आणि आवेगही त्यांच्या रचना व सादरीकरणातही भरपूर असायचा. ते मोकळेढाकळे असल्याने वृत्तांच्या खटपटीत ते अडकले नसावेत. पण त्यांनी गझलच्या ढंगाने जाणाऱ्या कविताच नव्हे तर गीतेही लिहिली आहेत, याचा पुरावा म्हणून या काव्यसंग्रहाकडे पाहता येते ! 

या संग्रहातल्या पहिल्याच गीतात मला त्यांच्यातला गझलकार दिसला ! या गीताच्या पहिल्या दोन ओळीत गझलेतले यमक, अंत्ययमक डोकावते. आपण प्रत्यक्षच पाहुया : 

मी स्वप्नात पाहिलेले कुणी एक गाव होते 

आठवूनी आठवेना काय त्याचे नाव होते

यानंतरच्या कडव्यांच्या शेवटच्या ओळींही याच धर्तीवर लिहिलेल्या आहेत. पहा,

कुठे पहारे भासले चोरापरी ते, अंतरीचे साव होते

रस्त्यात भेटणारे रंक तेथील राव होते

भक्ताच्या चेहऱ्यावर देवतांचे भाव होते ...


अशीच गझलमयता ' नाहीच योग आता ' या गीतात व यापुढील काही गीतातही आढळते. काही कविताही गझलसदृष्य आहेत.  ' हासू ‌नकोस आता ' ही तर गझलच्या खूप जवळ जाणारी कविता. हिचे शिर्षकही गझलेच्याच ढंगाने जाणारे. तुमचे हजार सूर्य हीसुध्दा गझलचीच वृत्ती दाखवणारी. सूर एकदाच अपुले , मीही कुणीतरी आहे, बदनाम हा जगी या , नशेची खुमारी , खुद्द गजल या नावाच्या दोन रचना, कधी भेटलीस तर, जिंकुनी मैफिल गेली, आता नशेत आहे, चंद्र माझ्या मनीचा, त्यानंतर कागदाच्या या फुलांना , एका मुशाफिराला, दोस्तांनो, यांची शिर्षकेच नव्हेत तर यातल्या सर्व ओळी पाहिल्या की सर किती गझलमय झाले होते याची कल्पना येते. सरांनी गझलबद्दल तेव्हा चर्चा केली असती तर नक्कीच चित्र वेगळे दिसले असते. पण तो योग कधी आलाच नाही.‌ मीही नुकताच गझलसदृष्यतेतून बाहेर पडलो असल्याने गझलबाबत काही सांगावे या कुवतीचा नव्हतो . ते माझ्या साध्याशा गझलांवरही प्रेम का करत होते, मला गझल सादर करायचा आग्रह का करत होते, ते स्वतःच्या गझलचं प्रतिबिंब तर माझ्या गझलांमध्ये पहात नव्हते इ.  प्रश्नांचे उत्तर म्हणजे त्यांच्याच हृदयात खोल बसून राहिलेली गझल होय !  होय, याच गझलने त्यांना संतांची करुणा पेलण्याचे सामर्थ्य दिले असावे असे आज हटकून वाटते ! 

तुम्हांला याबद्दल काय वाटते ते नक्की कळवा, ही विनंती.‌


....देवीदास हरिश्चंद्र पाटील.‌



 

गुरुवार, २१ मार्च, २०२४

रत्नागिरीची गझलरत्ने

 मी नव्या खांद्यावरी... ( फेसबूकवरून साभार )

रत्नागिरी जिल्ह्याच्या #मराठी_गझल चा पस्तीस वर्षांंचा इतिहास व सद्याचे पंचवीस गझलकार अंतर्भूत असलेल्या रत्नागिरीची गझलरत्ने या पुस्तकाचे प्रकाशन. 


Marathi gazal in Ratnagiri

Marathi_gazal_in_ratnagiri


रविवार, ८ एप्रिल, २०१८

“ डोळ्यात आसवांच्या ”

“ डोळ्यात आसवांच्या ”



शोधतो मी रंग त्याचा मझिया रंगांमधे
काल जो सांगून गेला रंग माझावेगळा !

       हे जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हाच मी ओळखले की मीही तोच रंग तीस वर्षापूर्वी शोधत होतो ! तो आणखी असेही बोलला “ मी वरवर कोठे जगलो , आयुष्य गझलमय होते ! ” तेव्हाच मला त्याच्या खोलीचा अंदाज आला होता ! बंगल्यामधुनी निघाल्या चळवळी , घेत साध्या झोपड्यामधले बळी ”  , असे त्याने लिहिले आणि तो मला अधिक पटू लागला ! पुढे , “ मी दाखवतो डोळ्यांना जगण्याचे वास्तव माझ्या  स्वप्नांच्या येण्यावर केव्हाच विसंबत नाही ”, असाही त्याचा शेर भेटला ! होय , मी त्याच गझलगोविंदाबद्दल बोलतोय जो भयानक वास्तव गझलांमधून सहजतेने मांडतो आणि त्याच वेळी , “  कोण अंकुरले मघाशी माझिया गात्रांतुनी , हा कुणाचा श्वास आहे पाकळ्यांहुन कोवळा ”, असेही म्हणतोय ! “ पान अळवाचे तशी तू .. थेंब पाण्याचा असा मी , भेट होते .. स्पर्श होतो .. पण बिलगता येत नाही ! ” ही तरल लाडीक तक्रारही तो किती सहजतेने करतोय ! “  डोळे भरून माझ्या वाचू नकोस गझला , पडतील शब्द माझे प्रेमात आसवांच्या ” , असे गोविंद नाईक या ताज्या दमाच्या गझलकाराने सांगितल्यामुळे मग “ डोळ्यात आसवांच्या ” ह्या त्याच्या पहिल्या गझलसंग्रहाकडे वळणे स्वाभाविकच होते ! तसा मी वळलोही. पण गेले काही महिने त्यासाठी पुरेसा वेळ देवू शकलो नाही , याबद्दल मला अपराधीपणा जाणवतो .

        रंग पुन्हा ह्या रानाचा हिरवा झाला तर ?
        ढग एखादा ओलेता हळवा झाला तर ?

        असा हळवा होणारा गोविंदा ,

        एक तिरंगा जपून ठेवा काळजातही
        रंग उध्या झेंड्याचाही भगवा झाला तर ?

        असे उध्याचे वास्तव छातीठोकपणे लिहितो !

        पुतळ्यांनी आकाश गाठले
        माणुसकी तळ गाठत आहे

        अशी उंची ह्या संग्रहात गाठतोय ! पुढे तो असेही सांगतोय –

        सोडुनी गेलेत जे रण काळजी त्यांची नको
        जे उभे आहेत त्यांचे धैर्य टिकले पाहिजे !
         मग खरी समजेल रामाच्या मनाची थोरवी
          रावणाने शिवधनुष्याला उचलले पाहिजे ! म्हणजेच आपण फक्त एकाच बाजूचे कौतुक न  
    करता आयुष्याची दुसरी बाजूही तितक्याच समतोलपणे पाहिली पाहिजे ! हा खरा गझलकाराचा दृष्टीकोण असला पाहिजे आणि तो गोविंदाकडे आहेही !

          आसपासचे भयाण वास्तव गझलकारांने टिपून त्यावर तितकेच प्रत्यंतकारी लिहिले पाहिजे . केवळ स्वप्नंरंजन आणि मनोरंजन हा गझलचा हेतू नाही ! हे गोविंद जाणतो आणि म्हणूनच तो लिहितो -         
   केवढा श्रीमंत होता बाप .. कळले
   राख पोरांनी विकाया काढल्यावर !

हे तो लिहू शकतो , कारण , “ शिकवते बाराखडी आयुष्य माझे , पुस्तके मी पाळली नाहीत कुठली ! असे त्याचे आयुष्य त्याला शिकवून चुकले आहे !

           कधी तरी बघ डोळे उघडून वर देताना
           काय तुझ्या चरणावर अर्पण होते आहे … आणि
          
           दूरदूर माणसे चालती माणसांतली
           हे कुठल्या शतकात पदार्पण होते आहे , तसेच

           हळू हळू वाढत जाते इच्छांची उंची
           रोज तोकडी नशिबाची चादर आठवते

           हे शेर माणसांना विचार करायला लावणारे आहेत !

           अशाच काही सुंदर , प्रभावशाली ओळी मला ह्या संग्रहात मिळाल्या –

           मलाच देण्यास मी दिलासा फिरुन माझ्याकडे निघालो , बघून आक्रोश चाललेला समोर लाचार यौवनाचा , घरात मी घेतले उगीचच अनोळखी चेह-यास माझ्या , धरून हातात हात माझा कुठे तुझी सावली निघाली , अखेर मारेकरीच माझा जिवास माझ्या फितूर झाला, असे कसे हे भरून प्याले समोर तू ठेवलेस दैवा , हरेक क्षण ऐकवून गेला जगावयाची उदात्त गीता इ. मात्र , शेरांच्या ह्या पहिल्या ओळींना दुस-या ओळींची अधिक उंचीची साथ लाभायला हवी होती , म्हणजे गझलची अधिक मजा घेता आली असती , असे वाटते ! अर्थात , मी जुना गझलकार असलो तरी मी काही समीक्षक नाही . एक रसिक म्हणून लिहिले आहे . तेव्हा चुकल्यास जाणकारांनी क्षमा करावी . गोविंदाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतांना एक आश्वासकता जाणवते आहे . ती ही की तो यशाची हवा डोक्यात जावू देणार नाही ! जो रंग तो शोधतो आहे , त्या रंगाने डोक्यात हवा जावू देवू नका आणि अधिकाधिक चांगले लिहा असेच त्याच्यासोबतच्या आणि त्याच्या नंतर विजा घेवून येणा-या प्रत्येक गझलकाराला सांगितले आहे ! तो रंग म्हणजेच आदरणीय सुरेश भट ! मराठी गझलचा खराखुरा रंग ! गोविंद नाईक हा रंग नक्कीच ओळखतो !


…. श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील