Marathi Gazal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi Gazal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ मे, २०२४

तीर पुन्हा चर्चेत...

तीर पुन्हा चर्चेत ....


#मराठीगझल हा विषय तसा आजकाल आपल्यासमोर अनेकदा येतो. #सुरेशभट , #भीमरावपांचाळे , #मभाचव्हाण ते #नितीनदेशमुख, #सतिशदराडे अशी अनेक नांवे मराठी गझलसंदर्भात घेतली जातात. आदरणीय सुरेश भट यांच्या हयातीत कोकणातील त्यांनी घडविलेले गझलकार म्हणून देवीदास हरिश्चंद्र पाटील यांचे नांव घेतले जाते. देवीदास पाटील यांनी रत्नागिरीत मराठी गझल पहिल्यांदा आणली. त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र अजिज हसन मुक्री हेही त्यांच्याबरोबर मराठी गझल लिहू लागले व नावारूपास आले. 

देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची तीर ही सुप्रसिध्द गझल आहे. तिचे दोन‌ शेर मराठी गझलसाठी जिवाचे रान करणारे गझलनवाज श्री.  भीमरावजी पांचाळे हे अनेकदा देशोविदेशातील मैफिलींमध्ये सुरूवातीलाच गाऊन मैफिलीचा माहौल तयार करतात व मैफील एका उंचीवर नेऊन ठेवतात . हे अनेक श्रोते ही सांगतात.

वाचकांनीही या शेरांबद्दल बोलक्या प्रतिक्रिया #फेसबूकवर दिल्या आहेत. त्या पोस्टचा फोटो खाली दिला आहे. तसेच, वरती " तीर पुन्हा चर्चेत " या शब्दांना क्लिक केल्यास आपल्याला ती पोस्टही प्रत्यक्ष पाहता येईल व कमेंट्स करता येतील. 

मराठी गझल


रविवार, २४ मार्च, २०२४

गझलेची प्रक्रिया व वृत्ताची अनाठायी भीती


मराठी गझलचे अंतरंग ...

काही वेळा हटकून पूर्ण गझल येतेच. त्यावेळी तुमची प्रतिभा तळमळून तीव्रतेने व्यक्त होते. मात्र  तुमची प्रतिभा कायम सर्वोच्च पातळीवर राहू शकत नाही. मग पुन्हा सुरूवातीच्या पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न हा सरावाचाच भाग असतो. 


खरे तर, पहिल्या ओळीतच गझल , गीत की कविता होणार हे ठरते. कवीने इथेच ठरवायचे असते. यालाच जमीन निश्चित करणे म्हणतात. लिहिण्याच्या ओघात आपण सजग राहणे कठीण असते. आपली तंद्री लागली की आपण भावनिक झाल्याने सजगता डळमळते. इथेच लक्ष ठेवावे लागते. एकदा लेखनाचे स्वरूप ठरवलात की पुढे जाण्यास प्रतिभेला वाव मिळतो. त्यामुळे आपले शब्द कोणते स्वरुप ( कविता, गीत , गझल इ. फॉर्मॅट) घेत आहेत , हे सुरूवातीलाच निश्चित करावे. 


तुमच्या स्वभावातच गझलेची तीव्र ओढ असेल तर तुमच्यात आपोआपच गझलियत असते. अशावेळी गझलियत किंवा गझलेची वृत्ती ही तुमच्या आतच असते. ती सरावाची वाट बघत बसत नाही. गझलेतच व्यक्त होते. गझलियत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गझलेचे अंगभूत सौंदर्य असते. व्यक्त होण्यात सशक्तता असते. गझल म्हणूनच अधिक प्रभावी माध्यम बनते. त्यात जोरकसता असते. ठामपणा असतो. तरलताही तितकीच उत्कट असते. 


गझल ही शिकवण्याची गोष्ट नाही. ते गणित नाही. व्यवहारात येणारे अनुभव कवीच्या भावनाविश्वाला खोलवर छेडतात वा छेदतात तेथे प्रभावी गझलकाव्य निर्माण होते. क्वचित प्रसंगी निसर्गतः व काही वेळा सरावाने निर्माण होते . मात्र सराव म्हणजे केवळ वृत्तांचे गिरवणे नव्हे. यमकांची घोकंपट्टी नव्हे. सुरूवातीला हे ठीक आहे. मात्र त्यातच गुंतून राहिल्यास यमके सापडतील पण तुमची गझल तुम्हांला सापडणार नाही. तुमची गझल तुमच्यातच असते. म्हणूनच सुरेश भट नेहमी सांगायचे की स्वतःवर विश्वास ठेवून लिहा. 


नेहमी संपूर्ण गझल होत नसते हे अगदी बरोबर आहे. कारण आपण पहिल्यासारखी तल्लीनता टिकवू शकत नसतो. म्हणूनच गझल लिहिताना अस्वस्थपणा जाणवतो. पण पुढे लिहितांना सततचा आटापिटाही निरर्थक ठरतो. र ला ट जोडून गझल होत नसते. इथे सरावापेक्षाही तुमच्या प्रतिभेच्या पुन्हा पहिल्याच पातळीवर येऊन लिहावे लागते. ती पातळी पुन्हा मिळाली की एकसंध गझल कालांतराने पूर्ण होते. शेवटी हा प्रत्येक कवीच्या अंतर्गत भावविश्वाचा, ओढीचा,  सरावाचाही भाग असतो. हे सर्व मिळून गझल बनते.


वृत्तांची भीती अगदी निरर्थक असते. सराव केलात तर आपोआपच तुमची कल्पना योग्य त्या वृत्तात उतरतेच. गझल वृत्तात लिहिली जाते हे कळायच्या आधीच मी गझल लिहू लागलो होतो ते केवळ सुरेश भटांच्या गझलांतील शब्दक्रमाच्या लयीवर फिदा होऊन. जसे गीताच्या चालीवर दुसरे गीत सुचावे व लिहावे तसे. सुरेश भटांना मान्य झालेल्या काही गझलांनंतर मी पुस्तकातल्या वृत्तांकडे वळलो. पण तेव्हाही आणि आजही मी अमूक एका वृत्तात लिहायचे आहे असे ठरवून लिहीत नाही. *ओळ ओठांवर येते तेव्हा ती तिला योग्य त्याच वृत्तात येते. ही नैसर्गिक प्रक्रिया केवळ गझलच्या तीव्र  ओढीमुळे होत असते.* तीस पस्तीस वर्षे गझल लिहूनही ती ओढ टिकून आहे, हे गझलचे मोठेपण आहे. गझल हळुवारपणे तुमचा हात पकडते, पण पकडल्यावर ती सोडत नाही. प्रेयसीची बायको झाली तरी 😀😀.


#मराठी_गझल_कशी_लिहावी


.... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०३.२०२४ सायं. ०६.००

.............

मराठी गझलचे सुलभीकरण 

मराठी गझलबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. अगदी सुरेश भटांच्या हयातीतही ते होते . आजही आहेत. ते तसे असणारच. ते तसे असले तरी भटांनीच ठणकावून सांगितल्याप्रमाणे " दिवस अमुचा येत आहे , तो घरी बसणार नाही " असं म्हणत प्रत्येक नवा गझलकार गझल लिहितोच आहे. खुद्द मराठी गझलकारांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. खरे तर, सुरेश भटांनी उभे आयुष्य वेचून मराठी गझलची रचना तयार केली. त्यांचा उर्दू, हिंदी व मराठी भाषांचा दांडगा अभ्यास, संगीताची उत्तम जाण आणि अलौकिक प्रतिभा पाहता त्यांनी शुध्द गझलचा आग्रह धरणे योग्यच आहे.‌ परंतु, त्यांच्या इतक्या तरल व प्रभावी गझला आजवर कोणालाही न जमल्याने अगदी नाईलाजास्तव मराठी गझलचे सुलभीकरण सुरू झाले. हे खरे तर भटांच्या कारकिर्दीतच सुरू झाले. भटांनी सांगितलेली वृत्तबध्दता काहींनी थोड्या वेगळ्या अंगाने घेतली. भटांनी अक्षर गणवृत्तात गझल हवी असे म्हटले. त्यातही त्यांचे एक वाक्य : " पहिल्या ओळीतील अक्षरक्रम शेवटच्या ओळीपर्यंत कायम हवा " हे सोयीने स्वीकारण्यात आले. म्हणजे , पुस्तकातली वृत्ते न घेता जशी पहिली ओळ सुचेल तसा अक्षरक्रम शेवटपर्यंंत ठेवून रचना लिहिण्यात आल्या. तशा आजही लिहिल्या जातात. खरे तर यामुळे नवनवीन वृत्ते तयार झाली असे म्हणता येईल.‌ मूळात पुस्तकी वृत्ते ही लयीसाठी व अनावश्यक शब्दांना लगाम घालण्यासाठी असतात. पण जर या दोन्ही गोष्टी पुस्तकबाह्य अक्षरक्रमाने साध्य होत असतील , ओघवतेपणाला बाधा येत नसेल, तर पुस्तकबाह्य वृत्ते तयार होण्यात अडचण नसावी, असा एक विचारही यामागे असावा.‌ काही असो, सुरेश भटांच्या हयातीतच हे घडू लागले होते . मराठी गझलच्या *सुलभीकरणाचा* हा *पहिला टप्पा* म्हणता येईल.

 (क्रमशः:)

#मराठी_गझल

... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२७.०३.२०२४

बुधवार, २९ मार्च, २०२३

ती टाळते की भाळते...

मराठी गझल

मराठी गझल



ही एक #मराठी_गझल आहे.‌ 

यामध्ये ज्या दोन दोन ओळी दिसत आहेत त्या प्रत्येकीला #शेर म्हणतात. शेर हा वेगळा काढून वाचला तरी तो अर्थपूर्ण असतो. गझलच्या पहिल्या दोन ओळीतच ( याला गझलचा मतला म्हणतात ) तिची  जमीन तयार होते.‌ म्हणजे , गझलचे #वृत्त , यमक , अंत्ययमक इ.सह अर्थातच रचना तयार होते. मूळात कोणतीही रचना कविता होणार आहे , गीत होणार आहे की गझल होणार आहे , हे प्रामुख्याने पहिल्या ओळीतच ठरते. आता वरती जी रचना आहे , तिची पहिली ओळच सांगून जाते की ही गझल होणार आहे. तर ही गझल झाली आहे.  यात मिळते , जाळते , माळते , चालते , फेटाळते , पाळते ही ' अ ' अलामत असलेली #यमके आहेत , तर ' माहीत नाही ' हे #अंत्ययमक आहे. गझलच्या शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात . मक्त्यामध्ये कवी स्वतःचे नांव गझलच्या वृत्तात बसेल असे लिहू शकतो. 


रसिक वाचकांना विशेष विनंती

यातले सर्व शेर सुटे घेऊन वाचा. ज्यांचा स्वतंत्रपणे वाचल्यावर अर्थबोध होत नाही , अशा कोणत्याही एकत्रित असलेल्या दोन ओळी मला कमेंट द्वारे कळवा. तुमची प्रतिक्रिया मला माझ्या लेखनात #सुधारणा घडविण्यासाठी आवश्यक आहे !

मराठी गझल ही कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. यामध्ये रचनेचा म्हणजेच तंत्राचा आणि मंत्राचा म्हणजेच गझलीयतचा  किंवा वृत्तीचा सामावेश असतो.‌ यात प्रामुख्याने अनेकांना प्रश्न पडतो तो वृत्ताचा !  

.........................................................

अशी शिका मराठी गझल या लिंकवर आपण वाचू शकता मराठी गझलबाबत एक विशेष लेख.

.........................................................

हा लेख वाचल्यानंतरही मराठी गझल लेखनाबाबत काही शंका असल्यास त्याही अवश्य विचाराव्यात , ही विनंती.‌ 

#अशी_शिका_मराठी_गझल

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

Teer once again पुन्हा एकदा तीर

 पुन्हा एकदा " तीर " गझल 

( दोन प्रसिद्ध शेर )



https://youtu.be/pJJz7h5qHcY



#bhimrao_panchale

मा. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नुकतीच ही गझल त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर अपलोड केली आहे. ही गझल आहे गझलकार श्री. दिलीप पांढरपट्टे यांची ! 

त्या गझलच्या अगदी सुरुवातीला आलापी नंतर मा. भीमरावजींनी श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील यांच्या तीर या मराठी गझलचे दोन सुप्रसिद्ध शेर गायले आहेत व प्रस्तावनेत याबद्दल त्यांनी आवर्जून लिहिलेही आहे.


असा मी तीर होतो जो चुकीने मारला गेलो


 ओन्ली देवीदास या आपल्या ब्लॉगच्या रसिक चाहत्यांसाठी हा उल्लेख इथे केला आहे. आपण अवश्य व्हिडिओ पहावा व कमेंट करावी, ही विनंती. 

......................

पूर्वी मी म्हणालो होतो : 

" मीच मजला पेश केले पाहिजे

जगाच्या दारात नेले पाहिजे "

थोडक्यात, जग आपल्याकडे येणार नाही , तर आपल्याला जगाच्या दारात स्वतःला नेले पाहिजे. आज तीस चाळीस वर्षांनी जगापुढे स्वतःला पेश करतात करता , जग माझ्याकडे येऊ लागले आहे, असा निदान भास तरी आता होऊ लागला आहे, हेही कमी नाही 😀😀😀😀😀 .


मराठी गझलबद्दलचा अशी शिकावी मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा : 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील .

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

सुरेश भट पुन्हा एकदा

 

फेसबूकवरून साभार 



परीस...


       सुरेश भटांच्या कवितांचे पुस्तक हातात आहे .

"सुरेश भट ह्यांची निवडक कविता -१९४६ ते १९९६" ....संपादन आणि प्रस्तावना केली आहे  "शिरीष पै " ह्यांनी .

पुस्तक काय हातात पडले, नव्हे.. खजिनाच मिळाला!  एक एक कविता... एक एक भावगीत ....एक एक गझल... हृदयात उतरते! 

      प्रथम तर शिरीष पै यांची प्रस्तावना ही कितीतरी सुंदर! खरेतर हे सर्व लोक खूप आदरास पात्र. साहित्याला जणू त्यांनी आपले जीवन वाहून घेतलेले .

     "सुरेश भट ह्यांची निवडक कविता" या पुस्तकातील सर्व कविता शिरीष पै यांनी सुरेश भटांच्या अनेक काव्य संग्रहातून निवडून एकत्र संपादित केल्या आहेत व प्रस्तावनाही लिहिली आहे. 

प्रस्तावना ही इतकी अभ्यासपूर्ण आणि सखोल आहे की पुनः पुनः  वाचत रहाविशी  वाटते .सुरेश भटांच्या विषयी  व त्यांच्या कवितांची पूर्ण ओळख  प्रस्तावनेत आपल्याला होते.         

        "रुपगंधा" हा सुरेश भटांचा पहिला काव्यसंग्रह. १९६१ साली प्रसिद्ध झाला ."रंग माझा वेगळा" हा दुसरा काव्यसंग्रह.( १९७०) "एल्गार" हा तिसरा काव्यसंग्रह. "झंजावात" हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह. 

       या चारही काव्यसंग्रहातून उत्कृष्ट कवितांची निवड करून शिरीष पै यांनी हे "निवडक कविता" पुस्तक संपादित केले आहे. सुरेश भटांच्या ज्या  काव्यप्रकारा मुळे त्यांच्या प्रतिभेला खरे उत्तेजन आणि प्रेरणा मिळाली आणि त्यांची प्रतिभा संपन्न झाली ...त्या "गझल" या काव्य प्रकाराला त्यांनी आद्य स्थान दिले आहे. 

    आपल्या प्रस्तावनेत शिरीष पै ह्यांनी "गझल"  साठी सुरेश भट  ह्यांनी जे  नियम सांगितले आहेत ते देखील लिखित स्वरूपात दिले आहेत. ते नवोदित गझलकार व नव कवींना खूप उपयुक्त आहेत .आपल्या प्रस्तावनेत शिरीष पै ह्या  "गझले "विषयी सुरेश भटांनी आपल्या "एल्गार" या काव्यसंग्रहातील प्रस्तावनेत व्यक्त केलेले विचार आपल्याला सांगतात. 

        सुरेश भट म्हणतात, "गझले विषयी " एक महत्त्वाची गोष्ट ही की केवळ "रचनाकौशल्य" म्हणजे गझल नव्हे!  नुसते तंत्र समजले आणि ते वृत्त (बहर )यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (रदीफ) इत्यादी राखून तंतोतंत अमलात आणले तरी ...अखेर... ....प्रभावीपणे काहीही सांगता आले नाही  तर तो शेर.. कोसळतो!! शेर रचला जात नाही.. तो कवितेतून ...त्यांच्या जगण्यातून... त्याच्या जीवनातून.. निर्माण व्हावा लागतो! त्याच्या रक्तातून तो वाहत येतो... आणि सामर्थ्यसंपन्न शब्दातून अनुभूतीचा स्फोट होतो!!        

       गझल ही एक जीवनशैली आहे. ते एक तत्त्वज्ञान आहे. मराठी गझलच्या  क्षेत्रात सुरेश भट हे अनभिषिक्त सम्राट होते. "१९४६ ते १९९६ पर्यंत केलेल्या पन्नास वर्षांच्या काव्य लेखनातील निवडक कवितांचा संग्रह म्हणजे "सुरेश भट ह्यांची निवडक कविता१९४६ ते १९९६"! 

  रसिकांनो! आपण आपल्या दैनंदिन आणि व्यावहारिक  जीवनामध्ये एवढे गुंग असतो की ,आपण पुस्तकांकडे वळत नाही! आणि वाचत नाही! महाराष्ट्रात अनेक कवी आणि लेखक होऊन गेले... त्यांच्या अजरामर साहित्यकृती आज ग्रंथालयात उपलब्ध आहेत. जेव्हा ते आपल्या दृष्टीस पडतात.. तेव्हा त्यांची महती कळते! सुरेश भटांची कितीतरी भावगीते आणि गझला आपण ऐकतो. त्या कानात गोड वाटतात .पण ते शब्द ..त्या कविता... त्या भावना... ज्या प्रतिभेने  कवी पानावर उतरवतो ...त्याला तोड नाही! आपण या प्रतिभेच्या पुढे नतमस्तक होतो. सुरेश भट यांच्या अनेक सुंदर गझला तुम्हाला ही माहीत आहेत . या पुस्तकात वाचलेल्या काही गझलांचा ओळी मी तुम्हाला वाचण्यासाठी येथे देत आहे.

    आनंद ....(गझल )

कवी -सुरेश भट.

आसवांना कोणता अधिकार होता ?

घाव जो केलास तो सुकुमार होता!

 चालण्यासाठी उन्हाची वाट होती,

 सांत्वनासाठी तुझा संसार होता!!!!!


मेघ ..(गझल)

 कवी -सुरेश भट.


पुन्हा तेजाब दुःखाचे उरी फेसाळूनि गेले !

पुन्हा ओठांवरी गाणे तुझे घोटाळुनी गेले !

मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हाका ?

मघाशी कोणते डोळे मला ओवाळूनी गेले?

निर्धार ...(गझल) 

कवी -सुरेश भट.

  माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे !

माझीया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे !

चालली माझी शिलेदारी जनांसाठीच माझ्या ,

गीत माझे माझिया हातातली तलवार आहे.!

                अत्यंत सुंदर असे निवडक कवितांचे पुस्तक, प्रत्येकाने वाचावे असे .

दुःख भेटे मला सांत्वनासारखे! गीत भेटे मला यौवनासारखे!

शेवटी शेवटी मी कशाला कण्हू ?हे मनासारखे ! ते मनासारखे!  ....सुरेश भट.                    

                                          

                                          सौ वर्षा दौंड.

                                         14/7/2021.


अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा . 

सोमवार, २६ जुलै, २०२१

मीच मजला पेश केले पाहिजे

 पेश करतो आहे : 

थोडी पार्श्वभूमी वाचा  ( मागील अतिशय छोटीशी पोस्ट )


आता प्रारंभ करूया....

यूट्युब वर Devidas Patil Creation नावाचे माझे चॅनेल आहे. 



त्यामध्ये Dehsongs ही play list आहे.


या play listमध्ये काही वर्षांपूर्वी, मी जे व्हिडीओज अपलोड केले होते त्यांपैकी " मीच मजला पेश केले पाहिजे " हा एक व्हिडिओ ! 




या पानासाठी मी हाच व्हिडिओ पहिला निवडण्यामागे खास कारण आहे बघा ! ही माझीच एक मराठी गझल आहे. व्हिडिओमध्ये ही मराठी गझल मी पेश केली होती. हा पेश शब्द माझ्यादृष्टीने फार महत्वाचा आहे . हा शब्द शिर्षकामध्ये आला आहे आणि शिवाय पहिल्या शेरामध्येही आला आहे . याबद्दल मी पुढे बोलणारच आहे . मराठी गझल ही सुरेश भटांनी खऱ्या अर्थाने सुरू केली, जोपासली व वाढवली.  याच गझलचा आता महावृक्ष झालेला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. रत्नागिरीत मराठी गझल अजीज हसन मुकरी व देवीदास हरिश्चंद्र पाटील यांनी सर्वप्रथम सन १९८४-८५ च्या दरम्याने सुरू केली. आमचा मार्ग सुकर केला तो अलिकडेच दुर्दैवाने निधन पावलेले माझे मित्र मधूसूदन नानिवडेकर यांनी. आम्हांला सुरेश भटसाहेबांचं मार्गदर्शन व प्रेम लाभलं, हे आमचं भाग्यच ! मराठी गझल दोन दोन ओळींच्या पाच शेरांची किंवा अधिक शेरांची असलेली रचना असते.  यामध्ये प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो किंवा एकाच विषयावरचे सर्व शेर असतात . मराठी गझल बाबत अधिक माहिती अशी शिका मराठी गझल या लेखात आहे.‌  माझी ही गझल पहिल्या प्रकारातली आहे. यामध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र आहे, स्वतंत्र विषयावरचा आहे. 

 आता आपण प्रत्येक शेराचा आशय पाहू.

पहिला शेर असा आहे : 

मीच मजला पेश केले पाहिजे

जगाच्या दारात नेले पाहिजे


खरे तर हा शेर मला दुनियेच्या आलेल्या अनुभवातून सुचलेला आहे !  तुमच्याकडे कलागुण असून उपयोगाचे नसते ते जगाला " कळायला ' लावावे ' लागतात ". स्वतःचे बाजारीकरण म्हणजेच मार्केटिंग करावे लागते . दुनिया तुम्हाला शोधत येणार नाही तर तुम्हाला तिच्या दारात जावे लागेल. उशिरा का होईना, मी सद्या हेच चालू केले आहे. याचं कारण असं आहे की मला पस्तीस वर्षांपूर्वीच माझे ( आणि माझ्याप्रमाणेच रत्नागिरीतील आद्य गझलकार असलेल्या अजिज हसन मुकरीचेही !! ) भवितव्य कळाले होते. सन १९८६ मध्ये लिहिलेल्या माझ्या सुप्रसिद्ध" तीर " नावाच्या गझलचा चौथा शेर आजही याची साक्ष आहे. शेरच पहा ना आणि मग सांगा कमेंट्स व्दारे. शेर असा आहे : 


कसोटी लागली तेव्हा निघालो मी खरे नाणे

तरीही मीच बाजारी कुठेही चाललो नाही 

कारण ? तेच ! मी स्वतःला जगाच्या दारात नेले नाही. मी स्वतःला जगापुढे " पेश " केले नाही. राग मानू नका, पण मी इतक्या वर्षांनी हेच करू लागलो आहे. दुर्दैव, दुसरं काय !!!


काही असो आपण पुढचा शेर पाहू : 


गुरू बनायचे असेल जर कधी

आधीच शोधले चेले पाहिजे


पूर्वी गुरु एवढे सामर्थ्यवान असायचे की त्यांची ख्याती सर्वदूर पसरायची.‌ चेलेच त्यांचा शोध घ्यायचे. आता स्वयंघोषित गुरू असतात .‌ आता गुरु बनण्यासाठी आधी नियोजन करावे लागते . म्हणजे गुरु बनायचं असेल तर आधी आपले काही चेले तयार करावे लागतात . गुरू म्हणून तुमची जोरदार प्रसिद्धी करू शकतील असे चेले आधी शोधायचे असतात , आणि मग तुमचा गुरु पदाचा मार्ग सुकर होतो. असा याचा अर्थ आहे .


यानंतरचा शेर  : 


जगायचे सुखी आयुष्य पुढे तर

रोजचेच आता मेले पाहिजे


हा शेरही तितकासा सरळ नाही . म्हणजे जीवनात एवढी दगदग भरलेली असते , भविष्यकाळ सुखाचा करण्यासाठी वर्तमानात रोजच्याच मरण यातना भोगाव्या लागतात असा याचा सरळ अर्थ आहे . पण ही खरे तर उद्विग्नता आहे , व्यथा आणि वेदनांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नसल्याने आलेली उपरोधिक असहाय्यता ‌आहे !


आता पुढचा शेर पाहू : 


त्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी

सोबती, बाटल्या, पेले पाहिजे


हाही शेर तसं म्हटलं तर उपरोधिकच आहे.  म्हणजे सुख व्यक्तीनिहाय असू शकते. काहींना दारू पिण्यामध्येही सुख असतं. त्यातही मग एकट्याने पिणं आणि मित्रांसह पिणं हे प्रकार आहेतच.‌ दुसऱ्या  प्रकारात सुख वाटत असल्यास असलं " भौतिक सुख " मिळवण्यासाठी सोबती, चाकणा , बाटली आणि पेले हवेतच !     


आता शेवटचा शेर.


अहंकार नष्ट व्हावा यासाठी

षड:रिपू वाहून गेले पाहिजे


हा शेवटचा शेर अगदी आध्यात्मिक आहे बरं का ! आध्यात्मिक असूनही त्याचा अर्थ अगदी सरळ आहे ! मोह, माया , मत्सरादि षड:रिपू वाहून गेले की मनातील अहंकारही नष्ट होईल व मन निर्मळ होईल , असा याचा सरळ अर्थ आहे. अर्थात सध्याच्या जगात हे असलं काही निर्मळ वगैरे होणे कठीणच आहे म्हणा ! पण आपण इथे अर्थापुरतेच मर्यादित राहू. 


लवकरच दुसऱ्या व्हिडिओ बद्दल नवीन पोस्ट घेऊन येतोय.‌ तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट्स अवश्य द्या !


मराठी गझलबद्दलचा अशी शिकावी मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .

... देवीदास हरिश्चंद्र पाटील 

सोमवार, १४ जून, २०२१

मी सुंदर स्वप्नांचे

 मी सुंदर स्वप्नांचे


मी सुंदर स्वप्नांचे इमले बांधत असतो

वाळुवर पाण्याने चित्रे रेखत असतो



आयुष्य पुढे मागे सरकत बिरकत असते

माझ्याच हिशेबाने पण मी चालत असतो



होईल मनाजोगे... होईल कधी काळी...

मी आत असा माझ्या मज समजावत असतो



गावात कधी गेलो की आग्रह होतो अन्

मी पिंपळपारावर गोष्टी सांगत असतो 



हे दु:खं मला बघते बिलगून बसायाला

हटकून असा त्याला मीही टाळत असतो



संदर्भ जुने काही जातात पुन्हा लागुन

एकेक क्षणामधुनी मी मज शोधत असतो



ते फूल वहीमधले अजुनी छळते आहे

मी याद तुझी माझी अजुनी काढत असतो


हा बंद तुझा आता बाजार जगा झाला

घरट्यात स्वतःच्या मी आता हिंडत असतो


... देवीदास हरिश्चंद्र पाटील   


टीप  : मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



मंगळवार, २५ मे, २०२१

मराठी गझल

 कोंडमारा


बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे

कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे


फिकाफिकासा ... उदासवाणा... मलूल आहे असा बिचारा...

अजून चाफा अबोल आहे... अजूनही दु:खं आत आहे


खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली 

तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे


 जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे

 तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे


 तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे


पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी 

रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !


अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे ...?

अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?


मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !

मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे ...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  





रविवार, १८ एप्रिल, २०२१

कोरोना

        



जी अफवा पसरत आहे
ती निव्वळ दहशत आहे !



काही नाही त्यालाही
काहीही समजत आहे !



टाळूवरच्या लोण्याला
सत्ताज्वर चाटत आहे !



जो तो मरतो भीतीने !
कोणाची धडगत आहे ?



लोभाची चांदी झाली !
सोने का घसरत आहे ?



ही हलतीडुलती दुनिया
ठप्प कुणी बनवत आहे !



चोरांच्या टोळीसाठी
कोरोना मिळकत आहे ! 



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील.

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

अशी शिका मराठी गझल

 




मराठी गझल कशी लिहावी ?

मंगळवार , 03.11.2020


तुम्हां सर्वांना सस्नेह नमस्कार व तुम्हा सर्वांचे स्वागत ! 


तुम्ही सर्व गझलबाबत जाणून घ्यायला उत्सूक आहात  आणि माझ्या बडबडीने मी तुमचा रसभंग करावा हे ठीक नाही.


 पण गझलची सर्वात महत्त्वाची पार्श्वभूमी तेवढी सांगतो.


 तुम्ही गझल समजून घेऊ इच्छिता तशीच माणसेही समजून घेतल्यास गझल लिहिणे अधिक सोपे होते. कारण गझल बरीचशी मानवी प्रवृत्तींवर लिहिली जाते.


 सर्वात माणूस महत्त्वाचा. माणूसकी महत्त्वाची. आपुलकी महत्त्वाची. मनाचा मोठेपणा महत्त्वाचा. आपुलकी व मनाचा मोठेपणा ठेवून आपण गझल लिहूया. 


थोडीशी सुरूवात :


गझलच्या अंगभूत लयीमुळे गझलची ओढ निर्माण होते. आपली प्रत्येक रचना गझलच झाली पाहिजे असे गझलची ओढ मनात असल्याने वाटणे स्वाभाविक आहे. 


मात्र , आपण मूळचे कवी असल्याने , कोणती रचना गझल होईल आणि कोणती रचना इतर काव्यप्रकारात पुढे जाईल , हे आपण बहुतेक पहिल्याच ओळीत ओळखू शकतो. 


 रचनेची पहिली ओळ काव्यप्रकाराचे स्वरूप घेऊनच येते. 


   उरलेला भाग गझलेच्या रचनेचा आहे. खरे सांगायचे तर सुरेश भटांनी हे ओळखूनच गझलेची बाराखडी दिली आहे. 


मराठी गझल निर्माण करणाऱ्या सुरेश भटांच्या गझला वाचा. आपोआप गझलेची लय व बैठक पक्की होईल.


कल्पनेची कविता करायची, गीत करायचे , गझल करायची की मुक्त छंदात लिहायचे हा एक प्रश्न असतो व तोच प्रथम सोडवायचा असतो.  हे झाले की आपण बरेचसे मोकळे होतो.


एकदा  हे झाले की पुढे कल्पनेचे काय करायचे ते आपण ठरवू शकतो. 


      गझल होऊ शकेल अशी सुरूवातीची कल्पना किंवा ओळ असेल किंवा गझलच्या ओढीमुळे गझलच व्हावी, असे वाटले तर प्रथम रचनेची माहिती करून घ्यायला हवी. सुरेश भटांची गझलची बाराखडी वाचावी. त्यांच्या गझला वाचाव्यात. इतरांच्या प्रमाणित गझलाही वाचाव्यात. हया दोन गोष्टींचे काही काळ नीट मनापासून अवलोकन केले तर रचना कळतेच कळते. त्यात फार मोठे असे काही नाही. गझल ही वृत्तातच लिहावी . मात्र वृत्तांची भीती अजिबात बाळगू नका. असलीच तर मी ती समर्थपणे काढीन . पुढे याबाबत मी सविस्तर लिहीनच.


    गझलेबाबत सर्वात महत्वाचे म्हणजे आपली काव्यप्रतिभा आटेल, रचनेत क्लिष्टता येईल , इतका आटापिटा कधीच करू नये ! यासाठीच , गझल थोडी मोकळीही सोडली पाहिजे. म्हणजेच, अक्षरगणात लिहितांना ओळीच्या दोन भागात यतीभंग होणार नाही , हेच पहावे. त्यापेक्षा अधिक तुकडे ( खंड ) पाडण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथेच गुंता वाढतो ! 


जे वृत्त दोन समान लगावल्यांनी बनलेले असते , त्या दोन समान लगावल्यांच्यामध्ये अक्षरे जोडल्यास वाचतांना खटकते. यालाच यतीभंग म्हणतात. हे टाळावे. मात्र, डावीकडील वा उजवीकडील भागात आपणांस कसेही शब्द जोडण्याचे स्वातंत्र्य आहे. ( तेवढे तरी हवेच , नाही का 😃😃😃)

 गझलेच्या नियमात पहिले येते ते वृत्त. विशेषत: अक्षरगणवृत्त. खरे तर त्यामुळेच गझलांना स्वत:ची सुंदर लय येते आणि आपली प्रतिभाही उंचावते.  


 गझला मात्रा वृत्तातही लिहितात.

-----------


शब्दांचे ओघवतेपण हे गझलेचे खरे सौंदर्य आहे.


एखादी कल्पना आपल्या मनात असते. तिची ओळ बनून आपसूक ओठावर येते तरी किंवा आपण तिचे काव्यात रूपांतर करायचा प्रयत्न तरी करतो. 


  

गझलमध्ये रचना , काव्य व चपखल बसणारे अर्थपूर्ण शब्द यांचे स्थान महत्त्वाचे आहे. 


गझलची रचना म्हणजे विशिष्ट नियमांनी बनलेला तिचा फाॅर्म किंवा स्वरूप होय. 


गझल शेरांनी बनते. शेर ही दोन ओळींची एक स्वतंत्र व संपूर्ण कविताच असते. पहिल्या ओळीत कवीला जे सांगायचे आहे त्याची प्रस्तावना असते तर दुसऱ्या ओळीत त्याचा समारोप असतो. मात्र या दोन्ही ओळींचा  परस्परांशी अर्थपूर्ण संबंध असणे अपरिहार्य आहे. गझल कमीत कमी ५ शेरांची असते.

गझलमध्ये शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असणे आवश्यक आहेच व तो संबंध वाचकांना किंवा श्रोत्यांना सहज कळेल असा असणेही आवश्यक आहे. थोडक्यात, तो संबंध ओढून ताणून आलेला नसावा , खूप दुरून आलेला नसावा. हा संबंध थेट असला तरी गझलकाराने मात्र तो सूचक शब्दांतून, प्रतिकांचा वापर करून व पुन्हा काव्यमयता जिवंत ठेऊन व्यक्त करावा , असे अभिप्रेत आहे. थोडक्यात, स्वतःच्या शेरांना स्वतःच एक उंची  प्राप्त करून देणे होय. या कसोट्यांवर आपण त्रयस्थपणे आपली गझल तपासून पहावी. बरेचदा आपले आपल्यालाच छान पर्यायी सुचून जाते . 


गझल यमक  ( काफिया ) व अंत्ययमक ( रदीफ ) असलेली  किंवा नुसत्याच यमकांची असते. 


अलामत हा यमकाचा भाग आहे. सर्व यमकात शेवटचे अक्षर समान असते. अलामत किंवा स्वरचिन्ह नेमके त्याच्याआधीच्या अक्षरात येते. 


.........

कोरा.काॅमवर मराठी गझलचा मंच 



........

अजून खूप आहे. पण आपल्याला कंटाळा न येता, अलगद आणि मजेत गझल पहायची आहे. टप्प्याने पण आत्मविश्वासाने पाहू.  दरम्यान शंका अवश्य विचारा.

.............. 

प्रथम जमेल तसे लिहाच. लिहिलेले गुणगुणून बघा. गाता आल्यास उत्तमच ! नियम आपोआप सवयीचे होतील. 

पाहिजे तर लिहिलेले मला स्वतंत्रपणे पाठवा.

गझलेच्या नियमात पहिले येते ते वृत्त. विशेषत: अक्षरगणवृत्त. खरे तर त्यामुळेच गझलांना स्वत:ची सुंदर लय येते आणि आपली प्रतिभाही उंचावते.  


 गझला मात्रा वृत्तातही लिहितात.


 वृत्तांचीच भीती अनेकांना जास्त वाटते. पण सरावाने सगळे जमते. तेव्हा तुम्ही चिंता करु नका. मी सतत सोबत आहेच.

 *गझलांमधे वापरली जाणारी काही वृत्ते*

१) वृत्त : आनंदकंद

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा


२) वृत्त : चामर

लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा


३) वृत्त : वियदगंगा

लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा


४) वृत्त : हिरण्यकेशी

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा


५) वृत्त : मनोरमा

लगावली : गालगागा गालगागा


६) वृत्त : कालगंगा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा


७) वृत्त : विद्युल्लता

लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा


८) वृत्त : कलिंदनंदिनी

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा


९) वृत्त : मंजुघोषा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा


१०) वृत्त : मंदाकिनी

लगावलीही : गागालगा गागालगा गागालगा गागालगा


११) वृत्त : लज्जिता

लगावली : गालगा गालगा लगागागा


१२) वृत्त : मृगाक्षी

लगावली : लगागागा लगागागा लगागा


१३) वृत्त : सती जलौघवेगा

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा


१४) वृत्त : पादाकुलक

लगावली : गागागागा गागागागा


१५) वृत्त : श्येनिका

लगावली : गालगाल गालगाल गालगा


१६) वृत्त : मनोरमा

लगावली : गालगागा गालगागा


१७) वृत्त : भुजंगप्रयात

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा


१८) वृत्त : सुमंदारमाला

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


१९) वृत्त : तोटक

लगावली : ललगा ललगा ललगा ललगा


२०) वृत्त : रंगराग

लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा


२१) वृत्त : वनहरिणी 

मात्रावृत्त : अष्ट मात्रिक ४ आवर्तने 


२२) वृत्त : राधा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा


२३) वृत्त : मेनका

लगावली : गालगागा गालगागा गालगा


 २४) वृत्त : व्योमगंगा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा


२५) वृत्त : रसना ( विनोद  द्विरावृत्ता )

लगावली : गा गालगाल गा+ ,गा गालगाल गा+

( + म्हणजे निश्चित गुरू )

 

२६) मात्रावृत्त : विधाता 

लक्षणे : एकूण मात्रा २८ ( १४+१४ )


२७) वृत्त : देवराज

लगावली : गालगाल गालगाल गलगाल गालगा


२८) वृत्त : वरमंगला

लगावली : गालगा गालगा गालगा गालगा


२९) मात्रावृत्त : भूपति

लक्षणे : [ - l प l प l - + ] २२ मात्रा.

 प म्हणजे ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू . 


३०) वृत्त : पद्मावर्त

लक्षणे : गागागागा गागागागा गागा


३१) वृत्त : प्रेय

लगावली : गाललगा गालगा गाललगा गालगा


३२) मात्रावृत्त : मध्यरजनी

लक्षणे : गालगागा गालगागा गालगागा गालगा+ .

( + म्हणजे निश्चित गुरू )


३३) मात्रावृत्त : अनलज्वाला

लक्षणे : एकूण मात्रा २४ ( प + प  + प )  प म्हणजे ८ मात्रा.


३४) वृत्त : मानसभंजनी

लगावली : गाललगा लगालगा गाललगा लगालगा


३५) वृत्त : मातंगी

लक्षणे : गागागा ! गागागा

 

३६) वृत्त : भामिनी

लगावली : गालगा गालगा गलगा गा

 

३७) वृत्त : सुकामिनी द्विरावृत्ता

लगावली : गालगाल गालगा गालगाल गालगा


३८) वृत्त : वियतगंगा

दगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा


३९) वृत्त : रम्याकृति

लगावली : गागाल लगागाल लगागा

 

४०) वृत्त : जलोद्धतगती

गण : लगालललगा  लगालललगा


४१) वृत्त : मानसहंस

गण : ललगालगा ललगालगा ललगालगा

 

४२) वृत्त : प्रभाव

गण : लगालगा लगालगा लगालगा लगा 

 

४३) मात्रावृत्त : शुभगंगा

मात्रा २२ ( ८ + ८ + ६ )


४४) वृत्त : श्येनिका

गण : गालगाल गालगाल गालगा


४५) वृत्त : मयूरसारिणी

गण : गालगा लगालगा लगागा


४६) वृत्त : पाणिबंध

गण : गालगाल गाललगा गालगाल गाललगा

.................


 वृत्तांचीच भीती अनेकांना जास्त वाटते. पण सरावाने सगळे जमते. तेव्हा तुम्ही चिंता करु नका. मी सतत सोबत आहेच.

 अगदी सुरुवातीला कठीण वृत्तात लिहू नका. कठीण व अपरिचित शब्दही टाळा.सुरूवातीला आनंदकंद किंवा भुजंगप्रयात ह्या वा अशा सोप्या वृत्तात लिहा व मला पाठवा.

-----------------


अक्षरगणवृत्तात समजा गा गा ल गा .... हा अक्षरक्रम आहे. गा म्हणजे गुरु किंवा दीर्घ आणि  ल  म्हणजे लघु किंवा -हस्व . 


 हा  मात्रा क्रम नाही. इथे मात्रा मोजायच्याच नाहीत. 


पहिल्या ओळीतील गा गा ल गा...हा अक्षरक्रम शेवटच्या शेरापर्यंत सांभाळायचाय.‌ 


अक्षरगण वृतत व मात्रा वृत्त हे दोन्ही स्वतंत्र प्रकार आहेत. त्यांची कधीच गल्लत करायची नाही.

इथे मात्रा म्हणजे गुरूला २ व लघुला १ अशा प्रकारे काही मोजायचे वगैरे नाही. 


दोन्ही मिक्स करायचे नाहीत.

मनात अनेक सुटे शेर जन्मतात. पण अनेकदा संपूर्ण गझल होतेच असे नाही. त्यावेळी ते शेर तसेच राहू द्या. अट्टाहासाने, घाईघाईने, गझल पूर्ण करायला जाऊ नका. गझल कळी आहे, ती आपसूक उमलू द्या.


........................

अलामत हा यमकाचा भाग आहे. सर्व यमकात शेवटचे अक्षर समान असते. अलामत किंवा स्वरचिन्ह नेमके त्याच्याआधीच्या अक्षरात येते .


एका गझलची यमके पाहू. 


 लागायचा

    जायचा

 भेटायचा

गंधाळायचा

      यायचा

     गायचा

  वागायचा


      यांमध्ये ' यचा ' ही  यमकांतली न बदलणारी अक्षरे आहेत. 


      मात्र त्यांच्या लगत डावीकडील अक्षरे बदलती आहेत. काय बदल आहे त्यात ? तर केवळ ही अक्षरे जरूर बदलली आहेत, पण त्या अक्षरांच्या उच्चारातला स्वर बदलला आहे का ; तर नाही. या सर्व अक्षरांत ' आ ' हा स्वर कायम आहे. ती स्वरचिन्ह म्हणजेच अलामत आहे.

अती अभ्यास नको. मोजक्याच गोष्टी सांभाळा. 

वृत्तांची भीती अजिबात बाळगू नका. सवय होईपर्यंत पुस्तकातल्या वृत्त्तात लिहिण्याचा सराव करा.

सुरेश भटांची गझलची बाराखडी . सुरेश भटांनी स्पष्ट नियम दिले आहेत. गझल वृत्तात लिहायची आहे हेही स्पष्ट केलेले आहे. मात्र अनवट, क्लिष्ट व तुमच्या प्रतिभेला मारक ठरतील अशी वृत्ते वापरू नयेत. साधी सरळ व ओघवती वृत्ते वापरावीत. लगावलीत  यतीभंग होणार नाही , म्हणजेच डावीकडे व उजवीकडे समान क्रम असल्यास ते दोन भाग जोडले जाणार नाहीत, एवढेच पहावे. वृत्त हे लयीसाठी आहे. लय भिनली की वृत्ती बनते किंवा वृत्ती ही मूळातच असते. गझलची वृत्ती असणे सर्वात महत्त्वाचे.

..................एक सांगतो नियमांची काळजी करू नका. सरावाने सर्व सोपे होते. तुम्ही निश्र्चितच चांगले लिहाल.


 फक्त शेराच्या दोन ओळीतला  तुम्हांला अभिप्रेत असलेला परस्पर संबंध,  ज्याला गझल माहीत नाही त्यालाही शक्यतो सहजपणे कळेल , असे पहा. काही वेळा लिहिण्याच्या ओघात आपण लिहून जातो व आपल्या दृष्टीने ते बरोबरही वाटते, पण आपली लिहिण्यामागची भूमिका वाचकाला माहीत नसल्याने वाचकाला तो शेर समजून घ्यावा लागतो. अशा वेळी आपण आणि वाचक यात अंतर पडते.

.................

गालगागा   गालगागा  , गालगागा    गालगागा


स्वल्पविराम पाहिलात ? त्याच्या डावीकडील शेवटचे व उजवीकडील पहिले अक्षर जोडून  शब्द करू नयेत. त्यालाच यतीभंग  म्हणतात.

.....................


शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

दोन मराठी गझला

      सत्य 


रोखलेली आसवें मोकळी कर !

काळजाशी तू मला एकदा धर !


कोणते हे अंतरी दु:खं आहे ?

कोंडलेले हुंदके बोलु दे तर !


मेघ हृदयी थांबले का कळेना...

सांग हृदयी थांबली का बरे सर...


हया उन्हाला रोजचे सोसशी तू 

काय बोलू ; सावली भाजते जर !


कोणते हे सत्य जे झाकशी तू ?

हा कशाला चेहरा चेह-यावर ?



.... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील


..............................................


        दरी 


मला आता जरा शंका तुझी आली खरी आहे

सुखा तू थांब दाराशी ; व्यथा माझ्या घरी आहे !


कधीपासून ते मीही स्वत:शी बोललो नाही

तुला जे सांगतो आहे मनाच्या मंदिरी आहे !


तुला आता हवी आहे कथा माझ्या जवानीची

तुलाही वाटते आहे ... तिथे काही तरी आहे ... !


तुझ्यावर शेर एखादा मला आता करू दे ना...

मला तू सांग आता जे तुझ्याही अंतरी आहे !


कितीसे खोल जावे मी ... कितीसे खोल जावे तू ...

कळेना खोल प्रेमाची कितीशी ही दरी आहे !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



गुरुवार, २३ जुलै, २०२०

मराठी गझल संमेलन आठवण

काही आठवणी कायमच्या हृदयात कोरलेल्या असतात.  मा. भीमरावजी पांचाळे यांच्या आग्रहामुळे व गझलच्या ओढीने मी वाईला गेलो होतो.   




https://m.facebook.com/story.php?story_fbid=3746145842068697&id=100000199538367#मराठीगझल
  या लिंकवर याची  फेसबूकीय पोस्ट .

टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .