how to learn Marathi Gazal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
how to learn Marathi Gazal लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

Teer once again पुन्हा एकदा तीर

 पुन्हा एकदा " तीर " गझल 

( दोन प्रसिद्ध शेर )



https://youtu.be/pJJz7h5qHcY



#bhimrao_panchale

मा. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नुकतीच ही गझल त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर अपलोड केली आहे. ही गझल आहे गझलकार श्री. दिलीप पांढरपट्टे यांची ! 

त्या गझलच्या अगदी सुरुवातीला आलापी नंतर मा. भीमरावजींनी श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील यांच्या तीर या मराठी गझलचे दोन सुप्रसिद्ध शेर गायले आहेत व प्रस्तावनेत याबद्दल त्यांनी आवर्जून लिहिलेही आहे.


असा मी तीर होतो जो चुकीने मारला गेलो


 ओन्ली देवीदास या आपल्या ब्लॉगच्या रसिक चाहत्यांसाठी हा उल्लेख इथे केला आहे. आपण अवश्य व्हिडिओ पहावा व कमेंट करावी, ही विनंती. 

......................

पूर्वी मी म्हणालो होतो : 

" मीच मजला पेश केले पाहिजे

जगाच्या दारात नेले पाहिजे "

थोडक्यात, जग आपल्याकडे येणार नाही , तर आपल्याला जगाच्या दारात स्वतःला नेले पाहिजे. आज तीस चाळीस वर्षांनी जगापुढे स्वतःला पेश करतात करता , जग माझ्याकडे येऊ लागले आहे, असा निदान भास तरी आता होऊ लागला आहे, हेही कमी नाही 😀😀😀😀😀 .


मराठी गझलबद्दलचा अशी शिकावी मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा : 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील .

शनिवार, २ जानेवारी, २०२१

Suresh Bhatanchi Marathi Gazal

 फेसबुक वरून साभार....

सुरेश भटांची मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत


 मराठी कवितेच्या इतिहासाला कविवर्य सुरेश भटांचं नाव विसरता येणार नाही. गझलचा शक्तिशाली आकृतीबंध त्यांनी मराठी कवितेला दिला. स्वत:च्या मराठी गझलांनी त्यांनी मराठी कवितेचं दालन समृद्ध केलं.मराठी कविता अधिक श्रीमंत केली.

एखादं मिशन चालवावं इतक्या निष्ठेने त्यांनी मराठी गझलचा प्रसार-प्रचार केला. उर्दू गझलकारांच्या परंपरेप्रमाणे उस्तादाच्या भूमिकेतून नव्याने गझल लिहिणा-या कवींच्या गझलात दुरूस्त्या सुचविल्या. त्यांना ‘इस्लाह’ दिला. मराठी कवितेच्या परंपरेत एखाद्या जेष्ठ कवीने अशा प्रकारे नव्या कवींच्या रचनात दुरूस्त्या करणे बसणारे नव्हते. म्हणून त्यांच्यावर टीकाही खूप झाली. ‘नव्या कवींची एक पिढी त्यांनी वाया घालवली’ असा इल्जाम त्यांच्यावर लावण्यात आला. पण त्यांनी अशा प्रकारच्या टीकेला भीक न घालता, समीक्षकांच्या तथाकथित विरोधाला न जुमानता आपले मिशन अधिक नेटाने, अधिक जोमाने पुढे नेले.

 केवळ गझल ह्या एखाद्या काव्यप्रकाराला वाहिलेली संमेलनं आज भरवली जातात. आणि ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाइतकीच साहित्येतर कारणांसाठी गाजतातही. मराठीतल्या ह्या गझल प्रेमाचे मूळ कविवर्य सुरेश भटांच्या ‘गझल मिशन’ मध्ये आहे, हे विसरून चालणार नाही.

 मराठी गझलचा हा सिलसिला आजपासून जवळपास पन्नास वर्षांआधी सुरू झाला आहे. १९५५ पासून सुरेश भटांनी मराठी गझल लेखनास प्रारंभ केला. एकाहत्तर वर्षांच्या आयुष्यातली पन्नास वर्षे सुरेश भटांनी मराठी गझलला दिली आहेत. तेव्हा कुठे आत्ता आत्ता अलीकडे तिला प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. गझल प्रेमाच्या वेडाने झपाटलेला हा अर्धशतकाचा कालखंड पाहिला की सहजपणे उर्दूतील श्रेष्ठ गझलकार गालिबचा शेर आठवावा -


‘आह को चाहिए इक उम्र असर होने तक

कौन जिता है तेरी जुल्फ के सर होने तक’


 आपल्या आयुष्यातली पन्नास वर्षे मराठी गझलला अदा केल्याची पावती म्हणून मराठी रसिकांनी सुरेश भटांना ‘गझल सम्राट’ हा किताब बहाल केला. हे जग कोणालाच काही फूकट देत नाही. त्याची पुरेपूर किंमत वसूल करून घेते.इतरांच्या यशावर असूयेने जळत आणि आत्मवंचनेने कुंथत राहणा-यांना म्हणूनच तर ते कबीराच्या तो-यात सांगतात -


‘फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे

घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही’


इथे आपल्याला चटकन कबीराची आठवण होते-


‘कबीर खडा बजार मे लिए लू काठी हाथ

जो घर जारे आपना चले हमारे साथ’


 असे खडे बोल सुनावणा-या कबीराचा ‘एल्गार‘ आणि दंभावर प्रहार करणा-या तुकारामाचा ‘झंझावात’ त्यांच्या गझलेत बेमालूम एकरूप झालेला दिसतो.


‘इथे मागून ही माझी समाधी बांधली गेली

जिथे मी गाडला गेलो अरे ही तीच आळंदी’


ज्ञानेश्वरांच्या समाधीला एक प्रतिमारूप देताना चमत्कारिक इतिहासाविषयी त्यांनी व्यक्त केलेली काव्यात्मक प्रतिक्रिया आपल्याला ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’याचा पुन:प्रत्यय देणारी आहे.

 सुरेश भटांच्या नावावर आजच्या घडीला सहा कविता संग्रह जमा आहेत. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ ‘सप्तरंग’ आणि ‘रसवंतीचा मुजरा’अशी त्यांची शीर्षकं आहेत.

 यापैकी निव्वळ गझलांचे म्हणता येतील असे संग्रह म्हणजे ‘एल्गार’आणि ‘झंझावात’. भटांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि आक्रमकता त्यांच्या गझलांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होते तशीच त्यांच्या संग्रहांच्या ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ शीर्षकांतूनही अभिव्यक्त होते.

 मराठी कवितेवरील आक्रमण आणि मराठी कवितेतील वादळ म्हणजे गझल असा आशय सूचविणारी ती शीर्षके आहेत.

 सुरेश भटांच्या मराठी गझलांचा प्रवास आजही कालानुक्रमे न्याहाळायचा झाल्यास आपल्याला त्यांच्या ‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहापासून सुरूवात करावी लागेल. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात एकूण ७२ कविता आहेत. त्यापैकी फक्त सात रचनाच गझल प्रकारात आहेत.


‘मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे

मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे


रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी

मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे!’


 १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘रूपगंधा’ या शीर्षकाच्या अशा मल्मली श्रृंगारांच्या रेशमी गझलने संग्रहाची सुरूवात होते.उर्दूत एकच विषय उलगडत नेणा-या गझलला ‘मुसलसल गझल‘ म्हणतात. भटांच्या सुरूवातीच्या अनेक गझला या प्रकारात मोडणा-या आहेत.याच संग्रहातल्या विविध विषयाच्या इतर गझला पाहिल्या तरी त्यांच्यात आशयाचे एकत्र सूत्र पाण्यातल्या तरंगासारखे विस्तारताना आपल्याला दिसते.


‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी

जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी’


 ‘वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही’ असं जगणं चाललेलं असताना मृत्यूचं असलेलं स्वाभाविक आकर्षण नंतरच्या संग्रहातूनही त्यांच्या गझलात निनादत राहिलं.


‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’


किंवा


‘मेल्यावरी जगाचे आभार मानले मी

जाऊ दिले मला हे उपकार मानले मी’


 सुरूवातीच्या मृत्यूचं आकर्षण परिपक्व होत होत उदात्ततेकडे झुकताना आपल्याला दिसतं.‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहातील आणखी एक प्रसिद्ध गझल अशी आहे-


‘माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे!

माझिया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे!


हेलकावे मी पुढे येता मिठी सा-या फुलांची,

हे बरे झाले... इथे माझ्या उरी अंगार आहे!’


 नंतरच्या गझल लेखनाची नांदीच एकप्रकारे या गझलच्या ओळीतून आपल्याला जाणवते.

 फुलांच्या मिठीचा नाजुक साजुक श्रृंगार आणि उरात विश्वाच्या व्यथेचा धगधगता अंगार अशा दोन धृवात सुरेश भटांच्या सर्व गझला हेलकावत राहिल्या.

 गझल लेखनाला प्रारंभ केल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा गझल संग्रह १९७४ साली प्रसिद्ध झाला. ह्या संग्रहात एकूण ८२ कविता आहेत. त्यापैकी ३४ कविता ह्या गझल प्रकारातील आहेत.

 ह्या संग्रहातील बहुतांश गझला देखील एकच आशय उलगडून दाखविणा-या आहेत. प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र असलाच पाहिजे अशी गझलची आग्रही व्याख्या ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध होईपर्यंत तरी भटांनी स्वीकारल्याचे त्यांच्या गझल लेखनातून जाणवत नाही.


‘समजावुनी व्यथेला समजावता न आले

मज दोन आसवांना हुलकावता न आले’


किंवा


‘जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही’


किंवा


‘दिवस हे जाती कसे अन् ऋतू असे छळतात का

विसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का?’


किंवा


‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले!

एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!’


 -अशी कितीतरी उदाहरणे घेता येतील. माधव जूलियनांनी दिलेल्या संज्ञेत बोलावयाचे तर अशा सर्व गझला ‘एक पिण्डी भावगीतासारख्या’ उलगडत जाणा-या आहेत.


 ‘रंग माझा वेगळा’ हे भटांच्या काव्यप्रवासाचे एक महत्त्वाचे वळण आहे. ज्या वळणावर त्यांचे गीत लेखन मागे सुटले आहे. आणि ‘मुसलसल गझल’ देखील मागे पडली आहे.आणखी एक महत्त्वाची गोष्ट ‘रंग माझा वेगळा‘ नंतर घडलेली आपल्याला आढळते. एखाद्या गझलेत जास्तीत जास्त नऊ शेर लिहिणारे भट मात्र ‘एल्गार’ मध्ये सुचतील तेवढे तेरा शेर एकाच गझलमध्ये घालताना दिसतात.आशयदृष्ट्या शेरांची विविधता लक्षात घेतली तरी एकसंध काव्यकलाकृतीला उणेपणा आणत एखादा शेर गझलची विण सैलसर करतो.

 निव्वळ गझलांचे असलेले भटांचे दोन संग्रह म्हणजे ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’.

 ‘एल्गार‘मधे ११९ कविता आहेत. त्यापैकी ९४ गझल प्रकारातल्या आहेत. तर झंझावातामध्ये एकूण ९६ कविता आहेत आणि त्यापैकी ७३ गझला आहेत.

 संख्यात्मक वाढीच्या दृष्टीने ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ हे त्यांच्या गझल प्रकारातले महत्त्वाचे पडाव आहेत. पण गुणात्मक वाढीच्या दृष्टीने मात्र ते ‘रंग माझा वेगळा’ इतके गोळीबंद गझल देणारे वाटत नाहीत. आकाराच्या बाह्य अंगाने त्याचे महत्त्वाचे कारण सूचतील तेवढे शेर एका गझलेत घालणे हे जसे असावे, तसेच अंतरंगाच्या अंगाने तपासून पाहिले तर त्याच त्या लाडक्या आणि आवडत्या प्रतिमांची पुनरावर्तने हे दुसरे कारण असावे..

 ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत भटांनी लिहीलेले एक वाक्य आहे ‘मानवी प्रेम जगाला सुंदर बनवते, पण ज्या जगात प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य आणि अजून कितीतरी सुंदर गोष्टी आहेत. ते जग हृदय असलेल्या जिवंत माणसांनी जगण्याच्या लायकीचे बनवले पाहिजे’.

 या त्यांच्या वाक्यातील प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य ही जी यादी आहे. त्यात अश्रु आणि स्वप्ने मिळवली की तेच त्यांच्या गझलातील प्रतिमा विश्वाचे वर्तुळ पूर्ण होते.

 आणि दुसरीकडे सामान्य माणसांच्या दु:ख दारिद्र्याचा कैवार घेण्यासाठी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक दंभावर घनाघाती प्रहार करताना त्यांच्या गझला जेव्हा चीड, संताप व्यक्त करतात तेंव्हा त्यांच्यातली सूचकता नष्ट होऊन त्यांच्या शब्दांचा स्वर अधिक चढा झाल्यासारखा जाणवतो. त्यांना अपेक्षित काव्यातील प्रासादिकतेलाही तो कधी कधी ढोबळपणाची बाधा आणत तर नाहीना,असे वाटते.

 ‘सप्तरंग’ या त्यांच्या शेवटच्या संग्रहात एकूण ८० कविता आहेत. त्यापैकी ४६ गझला आहेत. एकूण समाविष्ट कवितांच्या तुलनेत हे प्रमाण बरेचसे ओसरल्या सारखे वाटते. ब-याचशा जुन्या कविता ज्या इतर संग्रहात समाविष्ट होऊ शकल्या नाहीत त्या या संग्रहात समाविष्ट करून संग्रह सिद्ध केल्यामुळे ते घडले असावे.

 ४ फेब्रु. २००७ ला नागपूर येथे संपन्न झालेल्या ८० व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील स्व. सुरेश भट गझलवाचन सत्रात माझ्या हस्ते प्रकाशित झालेल्या सुरेश भटांच्या ‘रसवंतीचा मुजरा’ ह्या अखेरच्या संग्रहात एकूण ८३ कविता आहेत.त्यापैकी केवळ ६ गझला आहेत. सुरेश भटांच्या नावावर असलेल्या ह्या सहा संग्रहात समाविष्ट एकूण  कवितांपैकी संग्रहनिहाय गझला -

संग्रहानुसार कविता/ गझला

रूपगंधा ७२ / ०७

रंग माझा वेगळा ८२ /३४

एल्गार ११९ /९४

झंझावात ९६/७३

सप्तरंग  ८०/ ४६

रसवंतीचा मुजरा ८३ /०६

...........................

एकुण५३२ /२६०

अशा एकूण ५३२ कवितांपैकी निम्म्याहून अधिक २६० गझला आहेत.

 ‘सप्तरंग’ ह्या संग्रहात समाविष्ट ‘ह्म्द’(पृ.३९) ‘न आत शरीफ’(पृ.४०) आणि ‘पाच वर्षांनी!’(पृ.६६)आणि ‘खुलासा’(पृ.७६)दोन हझला अशा चार रचनांचा आकृतिबंध गझलांचाच आहे.त्यांना धरून गझलांची संख्या २६४ होईल.‘न आत शरीफ’ ही रचना ‘झंझावात’ ह्या संग्रहातही पृ.५० वर समाविष्ट आहे.

 वरील आकडेवारीत मुसलसल गझलांचाही समावेश आहे.ज्यांना ‘रंग माझा वेगळा’नंतरच्या कालखंडात सुरेश भट गझलांच्या फॉर्म मधल्या कविता म्हणत असत.

 ‘सप्तरंग’ वाचताना आपण ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ मधल्या गझलाच पुन्हा पुन्हा वाचतो आहोत की काय असा भास व्हावा एवढा प्रतिमांचा सारखेपणा जाणवतो.

 एकंदर गझलात हे जिथे जिथे नाही तिथे प्रतिमांचे नावीन्य आणि आशयाची उत्कटता आपल्याला थेटपणे भिडते. त्या ओळी आपल्या स्मरणात राहतात आणि भाषिक उपयोजन करण्याएवढे सुभाषितत्वही त्यांना लाभते उदाहरणार्थ -


‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री

मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’


किंवा


‘संपली ती रात्र होती मानतो आम्ही, परंतू

जो निघाला सूर्य त्याचा चेहरा काळा कशाला?’


किंवा


‘चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती

ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?’


किंवा


‘राग नाही तुझ्या नकाराचा

चीड आली तुझ्या बहाण्याची!’


किंवा


‘अता आजन्म कोणाला कुणी सांगायचे नाही-

कुणापाशी कुणी वेडा प्रवासी थांबला होता.’


 भटांच्या सहा संग्रहातल्या मुसलसल आणि गैर मुलससल अशा दोन्ही प्रकारच्या गझलांची एकूण संख्या २५४ इतकी आहे. त्यासाठी त्यांनी पन्नास वर्षे सातत्याने गझला लिहिल्या आहेत.

 १९७४ मध्ये ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत तीन दशकं त्यांच्या गझलांनी मराठी कवितेवर चेटूक केले आहे.

 भटांच्या गझलांचा हा ताळेबंद मांडताना त्यांनीच केलेल्या कवितेच्या यशाची एक व्याख्या सहजपणे आठवली. ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत ते लिहितात - ‘जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीच्या जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!’   

 आपल्या गझलांचे समर्थन करण्यासाठी भट आज हयात नाहीत पण काळाच्या कठोर समीक्षेला पुरून रसिकांच्या स्मरणात पिढ्यानुपिढ्या उरेल एवढे गुण त्यांच्या गझलात नक्कीच आहेत म्हणूनच तर त्यांच्या ह्या ओळी अधिक अर्थपूर्ण वाटतात-


‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’


श्रीकृष्ण राऊत 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  


बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

सहवास गझलांचा




मी न केला अती अभ्यास गझलांचा

अंतरी ठेवला मी ध्यास गझलांचा


मी न सांभाळली वृत्ते पुस्तकी ती

फक्त ' वृत्ती ' त होता श्वास गझलांचा


हात सोडून गेली माणसे होती

लाभला हात पण हमखास गझलांचा


ओळ सुचली तशी लिहिली गझल होती

गुणगुणत राहिलो मधुमास गझलांचा


मज दिली गझल बापाने गझलच्या अन् 

आवडू लागला सहवास गझलांचा


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील. 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

अशी शिका मराठी गझल

 




मराठी गझल कशी लिहावी ?

मंगळवार , 03.11.2020


तुम्हां सर्वांना सस्नेह नमस्कार व तुम्हा सर्वांचे स्वागत ! 


तुम्ही सर्व गझलबाबत जाणून घ्यायला उत्सूक आहात  आणि माझ्या बडबडीने मी तुमचा रसभंग करावा हे ठीक नाही.


 पण गझलची सर्वात महत्त्वाची पार्श्वभूमी तेवढी सांगतो.


 तुम्ही गझल समजून घेऊ इच्छिता तशीच माणसेही समजून घेतल्यास गझल लिहिणे अधिक सोपे होते. कारण गझल बरीचशी मानवी प्रवृत्तींवर लिहिली जाते.


 सर्वात माणूस महत्त्वाचा. माणूसकी महत्त्वाची. आपुलकी महत्त्वाची. मनाचा मोठेपणा महत्त्वाचा. आपुलकी व मनाचा मोठेपणा ठेवून आपण गझल लिहूया. 


थोडीशी सुरूवात :


गझलच्या अंगभूत लयीमुळे गझलची ओढ निर्माण होते. आपली प्रत्येक रचना गझलच झाली पाहिजे असे गझलची ओढ मनात असल्याने वाटणे स्वाभाविक आहे. 


मात्र , आपण मूळचे कवी असल्याने , कोणती रचना गझल होईल आणि कोणती रचना इतर काव्यप्रकारात पुढे जाईल , हे आपण बहुतेक पहिल्याच ओळीत ओळखू शकतो. 


 रचनेची पहिली ओळ काव्यप्रकाराचे स्वरूप घेऊनच येते. 


   उरलेला भाग गझलेच्या रचनेचा आहे. खरे सांगायचे तर सुरेश भटांनी हे ओळखूनच गझलेची बाराखडी दिली आहे. 


मराठी गझल निर्माण करणाऱ्या सुरेश भटांच्या गझला वाचा. आपोआप गझलेची लय व बैठक पक्की होईल.


कल्पनेची कविता करायची, गीत करायचे , गझल करायची की मुक्त छंदात लिहायचे हा एक प्रश्न असतो व तोच प्रथम सोडवायचा असतो.  हे झाले की आपण बरेचसे मोकळे होतो.


एकदा  हे झाले की पुढे कल्पनेचे काय करायचे ते आपण ठरवू शकतो. 


      गझल होऊ शकेल अशी सुरूवातीची कल्पना किंवा ओळ असेल किंवा गझलच्या ओढीमुळे गझलच व्हावी, असे वाटले तर प्रथम रचनेची माहिती करून घ्यायला हवी. सुरेश भटांची गझलची बाराखडी वाचावी. त्यांच्या गझला वाचाव्यात. इतरांच्या प्रमाणित गझलाही वाचाव्यात. हया दोन गोष्टींचे काही काळ नीट मनापासून अवलोकन केले तर रचना कळतेच कळते. त्यात फार मोठे असे काही नाही. गझल ही वृत्तातच लिहावी . मात्र वृत्तांची भीती अजिबात बाळगू नका. असलीच तर मी ती समर्थपणे काढीन . पुढे याबाबत मी सविस्तर लिहीनच.


    गझलेबाबत सर्वात महत्वाचे म्हणजे आपली काव्यप्रतिभा आटेल, रचनेत क्लिष्टता येईल , इतका आटापिटा कधीच करू नये ! यासाठीच , गझल थोडी मोकळीही सोडली पाहिजे. म्हणजेच, अक्षरगणात लिहितांना ओळीच्या दोन भागात यतीभंग होणार नाही , हेच पहावे. त्यापेक्षा अधिक तुकडे ( खंड ) पाडण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथेच गुंता वाढतो ! 


जे वृत्त दोन समान लगावल्यांनी बनलेले असते , त्या दोन समान लगावल्यांच्यामध्ये अक्षरे जोडल्यास वाचतांना खटकते. यालाच यतीभंग म्हणतात. हे टाळावे. मात्र, डावीकडील वा उजवीकडील भागात आपणांस कसेही शब्द जोडण्याचे स्वातंत्र्य आहे. ( तेवढे तरी हवेच , नाही का 😃😃😃)

 गझलेच्या नियमात पहिले येते ते वृत्त. विशेषत: अक्षरगणवृत्त. खरे तर त्यामुळेच गझलांना स्वत:ची सुंदर लय येते आणि आपली प्रतिभाही उंचावते.  


 गझला मात्रा वृत्तातही लिहितात.

-----------


शब्दांचे ओघवतेपण हे गझलेचे खरे सौंदर्य आहे.


एखादी कल्पना आपल्या मनात असते. तिची ओळ बनून आपसूक ओठावर येते तरी किंवा आपण तिचे काव्यात रूपांतर करायचा प्रयत्न तरी करतो. 


  

गझलमध्ये रचना , काव्य व चपखल बसणारे अर्थपूर्ण शब्द यांचे स्थान महत्त्वाचे आहे. 


गझलची रचना म्हणजे विशिष्ट नियमांनी बनलेला तिचा फाॅर्म किंवा स्वरूप होय. 


गझल शेरांनी बनते. शेर ही दोन ओळींची एक स्वतंत्र व संपूर्ण कविताच असते. पहिल्या ओळीत कवीला जे सांगायचे आहे त्याची प्रस्तावना असते तर दुसऱ्या ओळीत त्याचा समारोप असतो. मात्र या दोन्ही ओळींचा  परस्परांशी अर्थपूर्ण संबंध असणे अपरिहार्य आहे. गझल कमीत कमी ५ शेरांची असते.

गझलमध्ये शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असणे आवश्यक आहेच व तो संबंध वाचकांना किंवा श्रोत्यांना सहज कळेल असा असणेही आवश्यक आहे. थोडक्यात, तो संबंध ओढून ताणून आलेला नसावा , खूप दुरून आलेला नसावा. हा संबंध थेट असला तरी गझलकाराने मात्र तो सूचक शब्दांतून, प्रतिकांचा वापर करून व पुन्हा काव्यमयता जिवंत ठेऊन व्यक्त करावा , असे अभिप्रेत आहे. थोडक्यात, स्वतःच्या शेरांना स्वतःच एक उंची  प्राप्त करून देणे होय. या कसोट्यांवर आपण त्रयस्थपणे आपली गझल तपासून पहावी. बरेचदा आपले आपल्यालाच छान पर्यायी सुचून जाते . 


गझल यमक  ( काफिया ) व अंत्ययमक ( रदीफ ) असलेली  किंवा नुसत्याच यमकांची असते. 


अलामत हा यमकाचा भाग आहे. सर्व यमकात शेवटचे अक्षर समान असते. अलामत किंवा स्वरचिन्ह नेमके त्याच्याआधीच्या अक्षरात येते. 


.........

कोरा.काॅमवर मराठी गझलचा मंच 



........

अजून खूप आहे. पण आपल्याला कंटाळा न येता, अलगद आणि मजेत गझल पहायची आहे. टप्प्याने पण आत्मविश्वासाने पाहू.  दरम्यान शंका अवश्य विचारा.

.............. 

प्रथम जमेल तसे लिहाच. लिहिलेले गुणगुणून बघा. गाता आल्यास उत्तमच ! नियम आपोआप सवयीचे होतील. 

पाहिजे तर लिहिलेले मला स्वतंत्रपणे पाठवा.

गझलेच्या नियमात पहिले येते ते वृत्त. विशेषत: अक्षरगणवृत्त. खरे तर त्यामुळेच गझलांना स्वत:ची सुंदर लय येते आणि आपली प्रतिभाही उंचावते.  


 गझला मात्रा वृत्तातही लिहितात.


 वृत्तांचीच भीती अनेकांना जास्त वाटते. पण सरावाने सगळे जमते. तेव्हा तुम्ही चिंता करु नका. मी सतत सोबत आहेच.

 *गझलांमधे वापरली जाणारी काही वृत्ते*

१) वृत्त : आनंदकंद

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा


२) वृत्त : चामर

लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा


३) वृत्त : वियदगंगा

लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा


४) वृत्त : हिरण्यकेशी

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा


५) वृत्त : मनोरमा

लगावली : गालगागा गालगागा


६) वृत्त : कालगंगा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा


७) वृत्त : विद्युल्लता

लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा


८) वृत्त : कलिंदनंदिनी

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा


९) वृत्त : मंजुघोषा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा


१०) वृत्त : मंदाकिनी

लगावलीही : गागालगा गागालगा गागालगा गागालगा


११) वृत्त : लज्जिता

लगावली : गालगा गालगा लगागागा


१२) वृत्त : मृगाक्षी

लगावली : लगागागा लगागागा लगागा


१३) वृत्त : सती जलौघवेगा

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा


१४) वृत्त : पादाकुलक

लगावली : गागागागा गागागागा


१५) वृत्त : श्येनिका

लगावली : गालगाल गालगाल गालगा


१६) वृत्त : मनोरमा

लगावली : गालगागा गालगागा


१७) वृत्त : भुजंगप्रयात

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा


१८) वृत्त : सुमंदारमाला

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


१९) वृत्त : तोटक

लगावली : ललगा ललगा ललगा ललगा


२०) वृत्त : रंगराग

लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा


२१) वृत्त : वनहरिणी 

मात्रावृत्त : अष्ट मात्रिक ४ आवर्तने 


२२) वृत्त : राधा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा


२३) वृत्त : मेनका

लगावली : गालगागा गालगागा गालगा


 २४) वृत्त : व्योमगंगा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा


२५) वृत्त : रसना ( विनोद  द्विरावृत्ता )

लगावली : गा गालगाल गा+ ,गा गालगाल गा+

( + म्हणजे निश्चित गुरू )

 

२६) मात्रावृत्त : विधाता 

लक्षणे : एकूण मात्रा २८ ( १४+१४ )


२७) वृत्त : देवराज

लगावली : गालगाल गालगाल गलगाल गालगा


२८) वृत्त : वरमंगला

लगावली : गालगा गालगा गालगा गालगा


२९) मात्रावृत्त : भूपति

लक्षणे : [ - l प l प l - + ] २२ मात्रा.

 प म्हणजे ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू . 


३०) वृत्त : पद्मावर्त

लक्षणे : गागागागा गागागागा गागा


३१) वृत्त : प्रेय

लगावली : गाललगा गालगा गाललगा गालगा


३२) मात्रावृत्त : मध्यरजनी

लक्षणे : गालगागा गालगागा गालगागा गालगा+ .

( + म्हणजे निश्चित गुरू )


३३) मात्रावृत्त : अनलज्वाला

लक्षणे : एकूण मात्रा २४ ( प + प  + प )  प म्हणजे ८ मात्रा.


३४) वृत्त : मानसभंजनी

लगावली : गाललगा लगालगा गाललगा लगालगा


३५) वृत्त : मातंगी

लक्षणे : गागागा ! गागागा

 

३६) वृत्त : भामिनी

लगावली : गालगा गालगा गलगा गा

 

३७) वृत्त : सुकामिनी द्विरावृत्ता

लगावली : गालगाल गालगा गालगाल गालगा


३८) वृत्त : वियतगंगा

दगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा


३९) वृत्त : रम्याकृति

लगावली : गागाल लगागाल लगागा

 

४०) वृत्त : जलोद्धतगती

गण : लगालललगा  लगालललगा


४१) वृत्त : मानसहंस

गण : ललगालगा ललगालगा ललगालगा

 

४२) वृत्त : प्रभाव

गण : लगालगा लगालगा लगालगा लगा 

 

४३) मात्रावृत्त : शुभगंगा

मात्रा २२ ( ८ + ८ + ६ )


४४) वृत्त : श्येनिका

गण : गालगाल गालगाल गालगा


४५) वृत्त : मयूरसारिणी

गण : गालगा लगालगा लगागा


४६) वृत्त : पाणिबंध

गण : गालगाल गाललगा गालगाल गाललगा

.................


 वृत्तांचीच भीती अनेकांना जास्त वाटते. पण सरावाने सगळे जमते. तेव्हा तुम्ही चिंता करु नका. मी सतत सोबत आहेच.

 अगदी सुरुवातीला कठीण वृत्तात लिहू नका. कठीण व अपरिचित शब्दही टाळा.सुरूवातीला आनंदकंद किंवा भुजंगप्रयात ह्या वा अशा सोप्या वृत्तात लिहा व मला पाठवा.

-----------------


अक्षरगणवृत्तात समजा गा गा ल गा .... हा अक्षरक्रम आहे. गा म्हणजे गुरु किंवा दीर्घ आणि  ल  म्हणजे लघु किंवा -हस्व . 


 हा  मात्रा क्रम नाही. इथे मात्रा मोजायच्याच नाहीत. 


पहिल्या ओळीतील गा गा ल गा...हा अक्षरक्रम शेवटच्या शेरापर्यंत सांभाळायचाय.‌ 


अक्षरगण वृतत व मात्रा वृत्त हे दोन्ही स्वतंत्र प्रकार आहेत. त्यांची कधीच गल्लत करायची नाही.

इथे मात्रा म्हणजे गुरूला २ व लघुला १ अशा प्रकारे काही मोजायचे वगैरे नाही. 


दोन्ही मिक्स करायचे नाहीत.

मनात अनेक सुटे शेर जन्मतात. पण अनेकदा संपूर्ण गझल होतेच असे नाही. त्यावेळी ते शेर तसेच राहू द्या. अट्टाहासाने, घाईघाईने, गझल पूर्ण करायला जाऊ नका. गझल कळी आहे, ती आपसूक उमलू द्या.


........................

अलामत हा यमकाचा भाग आहे. सर्व यमकात शेवटचे अक्षर समान असते. अलामत किंवा स्वरचिन्ह नेमके त्याच्याआधीच्या अक्षरात येते .


एका गझलची यमके पाहू. 


 लागायचा

    जायचा

 भेटायचा

गंधाळायचा

      यायचा

     गायचा

  वागायचा


      यांमध्ये ' यचा ' ही  यमकांतली न बदलणारी अक्षरे आहेत. 


      मात्र त्यांच्या लगत डावीकडील अक्षरे बदलती आहेत. काय बदल आहे त्यात ? तर केवळ ही अक्षरे जरूर बदलली आहेत, पण त्या अक्षरांच्या उच्चारातला स्वर बदलला आहे का ; तर नाही. या सर्व अक्षरांत ' आ ' हा स्वर कायम आहे. ती स्वरचिन्ह म्हणजेच अलामत आहे.

अती अभ्यास नको. मोजक्याच गोष्टी सांभाळा. 

वृत्तांची भीती अजिबात बाळगू नका. सवय होईपर्यंत पुस्तकातल्या वृत्त्तात लिहिण्याचा सराव करा.

सुरेश भटांची गझलची बाराखडी . सुरेश भटांनी स्पष्ट नियम दिले आहेत. गझल वृत्तात लिहायची आहे हेही स्पष्ट केलेले आहे. मात्र अनवट, क्लिष्ट व तुमच्या प्रतिभेला मारक ठरतील अशी वृत्ते वापरू नयेत. साधी सरळ व ओघवती वृत्ते वापरावीत. लगावलीत  यतीभंग होणार नाही , म्हणजेच डावीकडे व उजवीकडे समान क्रम असल्यास ते दोन भाग जोडले जाणार नाहीत, एवढेच पहावे. वृत्त हे लयीसाठी आहे. लय भिनली की वृत्ती बनते किंवा वृत्ती ही मूळातच असते. गझलची वृत्ती असणे सर्वात महत्त्वाचे.

..................एक सांगतो नियमांची काळजी करू नका. सरावाने सर्व सोपे होते. तुम्ही निश्र्चितच चांगले लिहाल.


 फक्त शेराच्या दोन ओळीतला  तुम्हांला अभिप्रेत असलेला परस्पर संबंध,  ज्याला गझल माहीत नाही त्यालाही शक्यतो सहजपणे कळेल , असे पहा. काही वेळा लिहिण्याच्या ओघात आपण लिहून जातो व आपल्या दृष्टीने ते बरोबरही वाटते, पण आपली लिहिण्यामागची भूमिका वाचकाला माहीत नसल्याने वाचकाला तो शेर समजून घ्यावा लागतो. अशा वेळी आपण आणि वाचक यात अंतर पडते.

.................

गालगागा   गालगागा  , गालगागा    गालगागा


स्वल्पविराम पाहिलात ? त्याच्या डावीकडील शेवटचे व उजवीकडील पहिले अक्षर जोडून  शब्द करू नयेत. त्यालाच यतीभंग  म्हणतात.

.....................