शनिवार, ३० मार्च, २०२४

नारी शक्ती

 ०८ मार्च रोजीचा जागतिक महिला दिन जाकीमिऱ्या - भाटीमिऱ्या ग्रूप ग्रामपंचायतीत दिमाखात साजरा . 


जागतिक महिला दिनी जगाच्या एका कोपऱ्यात वसलेला जाकीमिऱ्या हा छोटासा भूभाग. त्याच्या शेजारी असलेला भाटीमिऱ्या हा भागही छोटासाच. या दोन्ही भागांची ग्रूप ग्रामपंचायत म्हणजेच जाकीमिऱ्या - भाटीमिऱ्या ग्रूप ग्रामपंचायत. 

या ग्रामपंचायतीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा झाला. खूप सुंदर कार्यक्रमांमधून स्त्री शक्तीचे दर्शन घडविण्यात आले. स्त्रीयांचे अनेक प्रश्नं मांडण्यात आले. माध्यमे म्हणून पथनाट्य , नाच, गाणी इ. चा छान उपयोग करण्याची कल्पकता सर्व सहभागींनी व ग्रामपंचायत स्टाफने दाखवली. सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही खूप छान झाले. 

या कार्यक्रमांतून एक नंबर मिळालेल्या पथनाटयाचा यू ट्यूबवरील व्हिडीओ आपण आता पाहू या. 


जाकीमिऱ्यातील देऊळवाडी महिला मंडळाने या प्रथम क्रमांक मिळविलेल्या कार्यक्रमाबरोबरच नारी शक्तीचे एक सुंदर गीतही सादर केले. 


रविवार, २४ मार्च, २०२४

गझलेची प्रक्रिया व वृत्ताची अनाठायी भीती


मराठी गझलचे अंतरंग ...

काही वेळा हटकून पूर्ण गझल येतेच. त्यावेळी तुमची प्रतिभा तळमळून तीव्रतेने व्यक्त होते. मात्र  तुमची प्रतिभा कायम सर्वोच्च पातळीवर राहू शकत नाही. मग पुन्हा सुरूवातीच्या पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न हा सरावाचाच भाग असतो. 


खरे तर, पहिल्या ओळीतच गझल , गीत की कविता होणार हे ठरते. कवीने इथेच ठरवायचे असते. यालाच जमीन निश्चित करणे म्हणतात. लिहिण्याच्या ओघात आपण सजग राहणे कठीण असते. आपली तंद्री लागली की आपण भावनिक झाल्याने सजगता डळमळते. इथेच लक्ष ठेवावे लागते. एकदा लेखनाचे स्वरूप ठरवलात की पुढे जाण्यास प्रतिभेला वाव मिळतो. त्यामुळे आपले शब्द कोणते स्वरुप ( कविता, गीत , गझल इ. फॉर्मॅट) घेत आहेत , हे सुरूवातीलाच निश्चित करावे. 


तुमच्या स्वभावातच गझलेची तीव्र ओढ असेल तर तुमच्यात आपोआपच गझलियत असते. अशावेळी गझलियत किंवा गझलेची वृत्ती ही तुमच्या आतच असते. ती सरावाची वाट बघत बसत नाही. गझलेतच व्यक्त होते. गझलियत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गझलेचे अंगभूत सौंदर्य असते. व्यक्त होण्यात सशक्तता असते. गझल म्हणूनच अधिक प्रभावी माध्यम बनते. त्यात जोरकसता असते. ठामपणा असतो. तरलताही तितकीच उत्कट असते. 


गझल ही शिकवण्याची गोष्ट नाही. ते गणित नाही. व्यवहारात येणारे अनुभव कवीच्या भावनाविश्वाला खोलवर छेडतात वा छेदतात तेथे प्रभावी गझलकाव्य निर्माण होते. क्वचित प्रसंगी निसर्गतः व काही वेळा सरावाने निर्माण होते . मात्र सराव म्हणजे केवळ वृत्तांचे गिरवणे नव्हे. यमकांची घोकंपट्टी नव्हे. सुरूवातीला हे ठीक आहे. मात्र त्यातच गुंतून राहिल्यास यमके सापडतील पण तुमची गझल तुम्हांला सापडणार नाही. तुमची गझल तुमच्यातच असते. म्हणूनच सुरेश भट नेहमी सांगायचे की स्वतःवर विश्वास ठेवून लिहा. 


नेहमी संपूर्ण गझल होत नसते हे अगदी बरोबर आहे. कारण आपण पहिल्यासारखी तल्लीनता टिकवू शकत नसतो. म्हणूनच गझल लिहिताना अस्वस्थपणा जाणवतो. पण पुढे लिहितांना सततचा आटापिटाही निरर्थक ठरतो. र ला ट जोडून गझल होत नसते. इथे सरावापेक्षाही तुमच्या प्रतिभेच्या पुन्हा पहिल्याच पातळीवर येऊन लिहावे लागते. ती पातळी पुन्हा मिळाली की एकसंध गझल कालांतराने पूर्ण होते. शेवटी हा प्रत्येक कवीच्या अंतर्गत भावविश्वाचा, ओढीचा,  सरावाचाही भाग असतो. हे सर्व मिळून गझल बनते.


वृत्तांची भीती अगदी निरर्थक असते. सराव केलात तर आपोआपच तुमची कल्पना योग्य त्या वृत्तात उतरतेच. गझल वृत्तात लिहिली जाते हे कळायच्या आधीच मी गझल लिहू लागलो होतो ते केवळ सुरेश भटांच्या गझलांतील शब्दक्रमाच्या लयीवर फिदा होऊन. जसे गीताच्या चालीवर दुसरे गीत सुचावे व लिहावे तसे. सुरेश भटांना मान्य झालेल्या काही गझलांनंतर मी पुस्तकातल्या वृत्तांकडे वळलो. पण तेव्हाही आणि आजही मी अमूक एका वृत्तात लिहायचे आहे असे ठरवून लिहीत नाही. *ओळ ओठांवर येते तेव्हा ती तिला योग्य त्याच वृत्तात येते. ही नैसर्गिक प्रक्रिया केवळ गझलच्या तीव्र  ओढीमुळे होत असते.* तीस पस्तीस वर्षे गझल लिहूनही ती ओढ टिकून आहे, हे गझलचे मोठेपण आहे. गझल हळुवारपणे तुमचा हात पकडते, पण पकडल्यावर ती सोडत नाही. प्रेयसीची बायको झाली तरी 😀😀.


#मराठी_गझल_कशी_लिहावी


.... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०३.२०२४ सायं. ०६.००

.............

मराठी गझलचे सुलभीकरण 

मराठी गझलबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. अगदी सुरेश भटांच्या हयातीतही ते होते . आजही आहेत. ते तसे असणारच. ते तसे असले तरी भटांनीच ठणकावून सांगितल्याप्रमाणे " दिवस अमुचा येत आहे , तो घरी बसणार नाही " असं म्हणत प्रत्येक नवा गझलकार गझल लिहितोच आहे. खुद्द मराठी गझलकारांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. खरे तर, सुरेश भटांनी उभे आयुष्य वेचून मराठी गझलची रचना तयार केली. त्यांचा उर्दू, हिंदी व मराठी भाषांचा दांडगा अभ्यास, संगीताची उत्तम जाण आणि अलौकिक प्रतिभा पाहता त्यांनी शुध्द गझलचा आग्रह धरणे योग्यच आहे.‌ परंतु, त्यांच्या इतक्या तरल व प्रभावी गझला आजवर कोणालाही न जमल्याने अगदी नाईलाजास्तव मराठी गझलचे सुलभीकरण सुरू झाले. हे खरे तर भटांच्या कारकिर्दीतच सुरू झाले. भटांनी सांगितलेली वृत्तबध्दता काहींनी थोड्या वेगळ्या अंगाने घेतली. भटांनी अक्षर गणवृत्तात गझल हवी असे म्हटले. त्यातही त्यांचे एक वाक्य : " पहिल्या ओळीतील अक्षरक्रम शेवटच्या ओळीपर्यंत कायम हवा " हे सोयीने स्वीकारण्यात आले. म्हणजे , पुस्तकातली वृत्ते न घेता जशी पहिली ओळ सुचेल तसा अक्षरक्रम शेवटपर्यंंत ठेवून रचना लिहिण्यात आल्या. तशा आजही लिहिल्या जातात. खरे तर यामुळे नवनवीन वृत्ते तयार झाली असे म्हणता येईल.‌ मूळात पुस्तकी वृत्ते ही लयीसाठी व अनावश्यक शब्दांना लगाम घालण्यासाठी असतात. पण जर या दोन्ही गोष्टी पुस्तकबाह्य अक्षरक्रमाने साध्य होत असतील , ओघवतेपणाला बाधा येत नसेल, तर पुस्तकबाह्य वृत्ते तयार होण्यात अडचण नसावी, असा एक विचारही यामागे असावा.‌ काही असो, सुरेश भटांच्या हयातीतच हे घडू लागले होते . मराठी गझलच्या *सुलभीकरणाचा* हा *पहिला टप्पा* म्हणता येईल.

 (क्रमशः:)

#मराठी_गझल

... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२७.०३.२०२४

गुरुवार, २१ मार्च, २०२४

रत्नागिरीची गझलरत्ने

 मी नव्या खांद्यावरी... ( फेसबूकवरून साभार )

रत्नागिरी जिल्ह्याच्या #मराठी_गझल चा पस्तीस वर्षांंचा इतिहास व सद्याचे पंचवीस गझलकार अंतर्भूत असलेल्या रत्नागिरीची गझलरत्ने या पुस्तकाचे प्रकाशन. 


Marathi gazal in Ratnagiri

Marathi_gazal_in_ratnagiri