short stories लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
short stories लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ मार्च, २०२१

Palas

 पळसाला पाने तीनच 


            ती लग्नं होऊन सासरी आली … बावरलेली … स्वतःचे सर्व काही सोडून सासरी आली …. मनात धाकधूक होतीच... नवीन परिस्थिती... नवीन माणसं … नवीन नाती ... सगळंच तिला नवीन होतं . ते घर ... हे घर … गैरसमजातून बेघर व्हायची तर वेळ येणार नाही ना ? ती जरा साशंकच होती . तिचंही बरोबर होतं . तिच्या काही मैत्रिणींचेही असं झालं होतं . 


            अनेक ठिकाणी असं होतं . अशावेळी जी मुलगी आपल्या कुटुंबाचा नवी सदस्य झाली आहे तिला समजून घेताना सासर कमी पडतं . बावरलेल्या , गोंधळलेल्या अवस्थेमुळे काही चुकलं तर तिला सांभाळून घेणे , समजावून सांगणे सासरच्यांना कठीण जाते . गंमत अशी आहे की बायकाच बायकांना जास्त छळतात.  काही नातीच गैरसमज निर्माण करणारी आहेत . सासू सून आणि नणंद भावजय ही दोन नाती म्हणजे तर कळसच ! गैरसमज आणि भांडण हे यांचे खास मित्र ! त्यातही जाणीवपूर्वक पसरवलेले गैरसमज आणि मुद्दाम उकरून काढलेली भांडणे हे तर खडाजंगीतले चौकार-षटकार ! निमित्ते तर पाचवीलाच पुजलेली ! निमित्ते तयार करण्यात या जोड्यांचा हात , ज्याने ह्यांना निर्माण केलं असं म्हणतात तो खुद्द परमेश्वरही धरू शकणार नाही ! कांगावखोरपणा हा यांचा सर्वोत्तम जन्मजात आदर्श गूण ! कुरघोडी करणे त्यांच्या हातचा मळच ! कळ काढण्यात ह्या हुशार !  अपवादात्मक परिस्थितीत सन्माननीय अपवाद ठरण्याचा विक्रमही ह्याच करू जाणोत ! स्त्रियांना स्त्रियांच इतक्या का छळतात हे एवढं रामायण होऊनही सांगणे कठीण आहे ! राम जाणे ! बाकी काय !


             हजारो वर्षे झाली तरी स्त्रीच्या नशिबीचा प्रामुख्याने स्त्रीकडून केलेला सासुरवास काही टळत नाही ! स्त्रीला देवता समजणारी आपली उच्च संस्कृती स्त्रीची प्रत्यक्षात कशी पूजा करते ते पाहण्याजोगे आहे ! हतबल पुरूष द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेसारखे माना खाली घालून आजही गप्प बसतात !  आजच्या तथाकथित स्त्री स्वातंत्र्य युगातही हे कमी झालेले नाही हे विशेष !  घरोघरी त्याच चुली, बोलत नाही तीच बरी ही म्हण यामुळेच इतकी वर्षे टिकून आहे. विषय आलाच आहे म्हणून सांगतो . दुसरीही एक म्हण अशीच टिकून आहे . ती आहे पळसाशी संबंधित . वसंत ऋतूत पळस बहरतो . पळस आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पळस त्वचारोग नाहीस करतो असं म्हणतात . लाल केशरी व किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पळस  लक्ष वेधून घेतो. पळस माझं लक्ष वेधून घेतो तो आणखी एका सामाजिक कारणासाठी. बेल आणि  निर्गुंडी यांनाही पळसाप्रमाणे तीनच पाने असतात.  पण पळसाला पाने तीनच ही म्हण पळसालाच का चिकटली हा प्रश्न मला पडतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे घरोघरीच्या चुली आपला गुण काही केल्या सोडत नाहीत. आपला गूण न सोडण्याची ही प्रवृत्ती मला पळसाला पाने तीनच या म्हणीच्या जवळची वाटते . काहीही केले तरी पळसाला पाने तीनच येणार ! अखेर,  अनेक नववधूंचे रडवेलले चेहरे आणि त्यांचा सासुरवास मला टोचत राहतो . मनात एक बेचैनी भरून राहते.



…. देवीदास हरिश्चंद्र पाटील, रत्नागिरी. 

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

स्फूट लेखन ६

 जीवन शिक्षण


शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात. संवाद, वादविवाद आणि मग वाद होतात. स्थानिक राजकारण आणि समाजकारण यांचे व्दंव्द यात हिरीरीने भर घालते. शैक्षणिक विकास हा विषय कधीच गायब होतो. उरतात ते आरोप प्रतीआरोप आणि वैयक्तिक हेवेदावे ! सामाजिक विषय वैयक्तिक पातळीवर हमरीतुमरीवर येतो. पूर्ण वेळ शाळा अर्धवेळ होत होत अखेर बंद होते. पिक्चर संपता संपताच पुन्हा सुरू होतो. पालक मुलांना दुसऱ्या शाळेत घालतात. तिथेही शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात... पूर्णवेळ.. अर्धवेळ.. .. होत....तीही शाळा अखेर बंद होते आणि हाच पिक्चर ठिकाणं बदलून चालूच राहतो ! पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१


.................

जलद, विश्वसनीय सेवा...जगभर


मुंबईहून आठ तारखेला कुरीयर केलं गेलं. केल्याची कुरीयरवाल्याची स्लीप मला कुरीयर करणाऱ्याने लगेच व्हाॅटस अॅपवर पाठवली. कुरीयर किमान तिसऱ्या दिवशी येणे अपेक्षित होते. तीन दिवस फोनवर नकारघंटा ऐकून चौथ्या दिवशी कुरीयर आॅफीसलाच गेलो. तिथल्या माणसाला स्लीप दाखवली. म्हटलं आज चौथा दिवस उजाडला. एक लखोटा यायला एवढे दिवस लागतील असं वाटतं नाही. तसा आतला दुसरा माणूस बोलला , लखोटा आहे का, मला पार्सल बोलले होते. लखोटा बघतो हा. मी आशेने हो म्हणालो. पण दोन मिनिटे शोधून तो मान हलवत नाही म्हणाला. मी निराश ! तसा पहिल्या माणसाने मुंबई आॅफीसला फोन लावला. स्लीपचा फोटोही व्हाॅटस अॅपवर पाठवला. मुंबईवाला बोलला बघून सांगतो. मी म्हटलं आम्ही सांगून बघितलं, तू बघून सांग ! मी थांबतो. पंधरा मिनिटे झाली तसा समोरचा माणूस बोलला, तुमचा नंबर द्या, मी फोन करतो. नंबर देतांना माझं लक्ष समोरच्या बोर्डाकडे गेलं. त्यावर जाड ठसठशीत ठळक अक्षरात छापलं होतं : जलद, विश्वसनीय सेवा...जगभर ! मी जग विसरून जलदगतीने घर गाठलं !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

विषय कट !


पोरं कसली तरी वर्गणी गोळा करीत होती. नेमके त्याचवेळी त्यातल्याच कुणाच्या तरी मोबाईलवर गाणे सुरू होते : " तुझ्या नामाचा व्यवहार ..." . विषय कट !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

देवळासाठी निधी संकलन


काही वर्षांपूर्वी गावातील देवळासाठी निधी संकलन करीत होतो. मी देवळाच्या शेजारीच राहतो. शेजारधर्म म्हणून मीही पावती पुस्तक घेऊन शहरात गेलो. ओळखीचे लोक भेटत होते. कोणी पावती फाडत होते, कोणी बहाणे सांगून सटकत होते. एकाने कहर केला. तोही ग्रामीण भागात राहणारा होता. त्याचं गांव तर अवघ्या दहा किमी वर होतं. गावातली परिस्थिती त्याला चांगलीच माहिती होती . त्यामुळे मला वाटलं तो चांगलीच पावती फाडेल. मी देवाचे आभार मानले. झालं भलतंच. तो म्हणाला, " मी राहतो दहा किमी वर. तुमच्या गावच्या देवळाचा मला काय फायदा? मी तर तिकडे कधी येत पण नाही. " आणि तो निघून गेला. अवघ्या दहा किमी अंतरावरच्या माणसाची ही कथा !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०२.२०२१

.................


बाबू, ये पब्लीक हैं !


मांजर भलेही चोरून दूध पितांना डोळे झाकत असेल; पण ते दूध पितानाचा चपाचपा किंवा पचापचा येणारा आवाज काही थांबवू शकत नाही. जग उघड्या डोळ्यांनी ( आणि कानांनी पण ! ) बघते ! बाबू, ये पब्लीक हैं , सब जानती हैं ! बोलो हैं ना ...?


   अरे हो, 💞💞 हॅपी व्हॅलेंटाईन डे !💕💕


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०२.२०२१

.................

गांवपॅनेल : लोकशाहीची नवी दिशा


नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी गांवपॅनेल्सनी बाजी मारली. गांवपॅनेल्सचा हा प्रवास राजकीय पाठिंब्यावर की अराजकीय लोकमतातून झाला हे पाहणे आवश्यक आहे. राजकीय पाठिंब्यावर निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्या व पूर्णत: अराजकीय लोकमतातून निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्याही अभ्यासली जाणे आवश्यक आहे. गांवपॅनेलला विरोध झाला का आणि झाला तर तो पक्ष , काही राजकीय / अराजकीय लोक की दोन्हींकडून झाला , हे पाहणेही आवश्यक आहे. तसेच गांवपॅनेल्सच्या पुढील प्रवासाबाबतही विचारमंथन झाल्यास ते महत्त्वाचे ठरेल. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०२.२०२१

...................

जया

आज त्याची आठवण आली. सुधरीन वहिनी सौ.ला कुवरी खातेस काय म्हणून विचारत होती. जया अशाच कुवऱ्या विकायला यायचा. तो माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. जया घरंदाज कुटुंबातला मुलगा. केवळ दारू प्यायला पैसे हवेत म्हणून दारोदारी कुवऱ्या विकायचा. माझ्या लग्नापूर्वीची ही सत्यकथा आहे. अखेरीला त्याची हालत बघवत नव्हती. दारूने त्याला पोखरलं होतं. खूप वाईट वाटायचं. आम्ही कधी कधी कुवऱ्या घ्यायचो. तो मागेल ते पैसे द्यायचो. जया ढोल खूप छान वाजवायचा. पण शिमग्यात ढोल वाजवण्यावरून त्याच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. खरं तर तेव्हा माऱ्यामाऱ्या हा ट्रेंडच होता. आता बरीच सुधारणा झाली. जया आता असता तर सुधारला असता का, हा विचार मनात येतो. 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०२.२०२१

...............


आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

काही वेळा आपल्याला चांगली परिस्थिती मिळते. तिचा उपयोग जीवन अधिक चांगले करण्यासाठी आपण किती करतो, हे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन इथून पुढे सुखी झाले पाहिजे, ही आपली प्रामाणिक ईच्छा असली पाहिजे. यासाठी वास्तवतेने विचार केला पाहिजे. मिळालेल्या छान परिस्थितीचा लाभ कसा घ्यायचा हे लक्षपूर्वक तपासले पाहिजे. आताची एक चूक सुंदर वर्तमान आणि भावी जीवन , दोन्हीही उध्वस्त करू शकतात.‌ इथे भावनेने नव्हे तर वास्तव विचार केला पाहिजे. असे केले तर काय होईल, तसे केले तर काय होईल, हे कागदावर निरपेक्षपणे मांडले पाहिजे. उत्तर मिळेल. वास्तव निर्णय घेतला तर आहे ती परिस्थिती आणि पुढचीही परिस्थिती चांगली राहीलच. पुढचे आयुष्य अधिक सुंदर होईल. आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०२.२०२१

...............


मी नाही त्यातली ....


सार्वजनिक अव्यवस्थेबद्दलचा काहींचा पुळका हा तात्कालिक विरोधासाठी किंवा फायद्यासाठी असू शकतो. सोयीस्कर असू शकतो. म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे ! अगदी नालायक कार्टे ! अंदरकी बात अशी असते की त्याच नालायक कार्ट्याशी विरोधकांची आतून व्यावसायिक भागीदारी पण असू शकते ! म्हणजेच साळसूदपणे वरून कीर्तन, आतून तमाशा ! त्यामुळे विरोधही , खबरदारी घेऊनच , तुटणार नाही अशा पद्धतीनेच होतो. कारण दोघांची लफडी दोघांना माहीत असतात. तंगडयात तंगडी, लंगडयात फुगडी चालतेच ! मी नाही त्यातली , कडी घाला आतली , यातलाच हा सोज्वळ प्रकार ! आता भ्रष्टाचार निर्मूलन कसे करायचे ब्बा ! 😃😄😃😄 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०२.२०२१

..............

देवाक काळजी 

हतबल सामान्य माणूस देवाक काळजी असं म्हणून सगळं देवावर सोडून देतो आणि देव म्हणतो, ही तुझी लढाई आहे, तू लढ ! वर फळाची (म्हणजे जिंकण्याचीही) ईच्छा धरू नकोस असं सांगतो ! काय करावं बा, चांगल्या सामान्य माणसांनी ?


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

...............

एका लग्नाला गेलो होतो. कोरोनाची दाट छाया कुठेही जाणवत नव्हती. सोशल डिस्टंसिंगवगैरे काही भानगड नव्हतीच. काहींनी मास्क घातले होते. काहींचे मास्क गळ्यात टांगलेले होते. काहींनी नियमानुरूप ठेवले होते. महिलावर्गाची काहीशी गोची होत होती. मास्क सौंदर्याला मारक की तारक हा त्यांच्याबाबतीत संशोधनाचा विषय होता. लग्नं लागलं . आईस्क्रीम आलं. त्यासरशी माझ्यासहीत होती तीही मास्क गळ्यात आलीत. विषय संपला !

....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

................

२५.०२.२०२१

वाह वाह वाह....सगळेच शेर अप्रतिम...

किती खुल्या मनाची असतात नाही माणसं ! पटकन दाद देऊन मोकळी होतात.‌ ही खरी माणसं.‌ शेर पूर्ण व्हायच्या आधीच ह्यांची दाद पूर्ण झालेली असते. कवी महाराजांनाही आता सराव झालेला असतो आणि ते उफाळून येऊन कविता सादर करीत असतात. तेव्हाही त्यांच्या मनात आपल्यालाही दुसऱ्या कवींना अशीच दाद द्यायची आहे हा एकमेव उदात्त विचारच असतो. 

हा त्याला म्हणतो, तो हयाला म्हणतो . दोघांनाही दाद हवी, दुसरे काय ? ते ठराविक वर्तुळातले ' अखिल विश्व एकमेकांची पाठ थोपटू ' मंडळातले कवी असतात. त्यांची पाठ थोपटायला कोणी येतच नाहीत. मग कवी तरी काय करणार ! हा कवी असो वा तो कवी असो ; शेवटी कवीला दाद तर हवीच असते ना मित्रांनो ! देव जसा भावाचा भुकेला असतो तसा कवी (पित्ताच्या नव्हे !) दादीचा भुकेला असतोच की ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

Short stories - 5

 स्फूट


बंडखोर संतकवी


आठवीत होतो. कवितेचा तास होता. सर संत , पंत, तंत कवींबद्दल सांगत होते. संत कवींबद्दल सर म्हणाले संत कवी हे बंडखोर कवी होते. त्यांनी अन्यायावर कठोर शब्दप्रहार केले. झाले. सरांचे हे वाक्य माझ्या डोक्यात जाऊन बसले. माझ्या बुद्धीमान डोक्यात बंडखोरपणा शिरला. मला अन्याय दिसू लागला. शिक्षकही काही वेळा मुलांवर अन्याय करतात असे मला दिसून येऊ लागले. मी शिक्षकांविरूध्दच बंडखोरी करू लागलो ! अक्कल ठिकाणावर येईपर्यंत हे चालूच होते. तोपर्यंत शाळेत आणि शाळेतल्या तक्रारी घरी आल्याने घरीही बराच (+बौध्दिक!) मार पडला होता !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२१

...............................


काही तरी असेलच ना ?

परवा एकाकडे बऱ्याच वर्षांनी जायचा योग आला. घरात दोघंजणच दिसली. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोन मुलांपैकी एकही दिसेना. ती दोघंही मुलांबद्दल काहीच बोलत नाहीत हे लक्षात आल्याने मलाही विचारण्याचा धीर झाला नाही. अखेर मी निघालो. पण मनात एकच विचार आला म्हातारा म्हातारी ब्लाॅकमध्ये बंदिस्त. पंख फुटलेली पाखरे स्वाभाविकपणे उडून गेली असावीत. पण त्यांचा विषयही आई वडिलांनी का काढला नसावा ? काही तरी असेलच ना ? हसऱ्या चेहऱ्याआडही काही दु:खं असेलच ना ?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२

................................


फुटुराचा तवा


परवा शेजारणीची घरभरणी होती. घर म्हणजे चाळीस लाखांचा सुंदर बंगलाच तो ! स्विमिंग पूल नाही एवढीच त्रुटी फारतर ! बाकी तिच्यासारखाच भरभक्कम बंगला ‌. घरभरणी पण सुंदर झाली. कशात कमतरता नव्हती. पण शेजारणीला एक कमतरता जाणवलीच ! ती माझ्या सौ.ला म्हणाली, " मला प्रेझेंट म्हणून पाकीटातून पैसे घालू नकोस. तवा दे, तो पण फुटुराचाच दे ! " दिला. आम्ही हजार रूपयाचा फुटुराचा तवाच तिला प्रेझेंट म्हणून आणून दिला ! आमचे (मनातले !) आणखीचे हजार रूपये वाचले म्हणून आम्ही खूश आणि तवा मिळाला म्हणून शेजारीण खूश ! करना पडता हैं भाई !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.०१.२०२१

...............................


तावातावाने....


नोकरीत असतानाचा एक प्रसंग. एक कर्मचारी तावातावाने बोलत माझ्या टेबलसमोर उभा राहिला. मी शांतपणे त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. माझी ती पध्दतच होती. हो ना करता करता तो अखेर बसला. काय झालंय , एवढा का वैतागलायस , असं मी विचारता तो घुश्श्यातच बोलला, किती दिवस झाले माझं तुम्ही कामच करीत नाहीयत. हे काय चाललंय ? त्यावेळी मी नेमकं त्याचंच काम करीत होतो. मी कागद पुढे केले. हे बघ मित्रा तू यायच्या आधीच मी तुझंच तर काम हातात घेतलेलं आहे. यावर किंचित नरमून तो म्हणाला, होय पण किती दिवस लावलेत ? मी शांतपणे त्याला त्याच्या विभागाकडून माझ्याकडे त्याचा अर्ज पाठविल्याची आणि माझ्याकडे अर्ज आल्याची तारीख दाखवली. आजच माझ्याकडे अर्ज आल्याचं आणि मी आजच त्यावर कार्यवाही करीत असल्याचं बघून तो गडबडलाच ! आठ दिवस त्याचा अर्ज त्याच्याच विभागात होता हे बघून त्याने माझी क्षमा मागितली आणि धन्यवादही दिले. पुढच्याच क्षणी , मघाशी ज्या तावातावाने तो माझ्याकडे आला होता त्याच तावातावाने तो त्याच्या विभागाकडे भांडायला निघून गेला ! तिकडे काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०२.२०२१

....................

भविष्य जाणले कुणी ?

वास्तव ओळखूनही पुढे काय होणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. अनेकदा भविष्यात असेही होते, तसेही होते. सर्वसाधारण आकलन होऊनही तारूण्याच्या उर्मीमुळे वा बुध्दीला पडलेल्या भुलीमुळे मन मानत नाही. मन ऐकत नाही; बुध्दी चालत नाही अशी अवस्था होते ! हेलकावे खात खात शेवटी काही तरी निर्णय घ्यावाच लागतो. तो बरोबर निघाला तर आनंदच. पण  तो चुकीचा निघाला की वाईट वाटतेच, पण वेळ निघून गेलेली असते. दुर्दैव आहे ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०८.०२.२०२१

.........................................................

पोटदुखीसे मजबूर !

तो आज त्या पदापर्यंत पोचला तशी काहींची पोटदुखी जागी झाली. हा जगभरातला आजार. कायमचा. कोरोनापेक्षाही चिवट. काहींनी तो इथपर्यंत कसा पोचला याची खमंग चर्चा सुरू केली. कोण म्हणाला कोणाच्या तरी पाठी फिरून, तर कोण म्हणाला , बायकोचे योगदान आणि ते सारे छद्मी हसले. पण कोणीच म्हणाला नाही की तिथपर्यंत येण्यासाठी त्याने काय काय आणि किती किती सोसले ! किती वर्ष पड खाऊन काय काय भोगले ! त्याची ही किंमत कोणीच जाणली नाही. पोटदुखीसे मजबूर ! काय करणार !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

........................................................

डॅंबीस

" तो तसो चांगलो हाय, पण त्याच्याभवती जे हायत ना, ते डॅंबीस हायत " एक अशिशित खेडूत महिला एका राजकारण्याला सर्टिफिकेट देतांना म्हणाली. खरं तर, राजकारणात आता चांगलेपणाचा उपयोग आणि एकूणच राजकारणाची पातळी यातून सर्वत्र जे पसरायचे ते पसरले तर नवल नाही  ! आता हेच बघांना, जिने हे सर्टिफिकेट दिलं ते काय तिचं खरं मत थोडंच होतं ! तिला त्या नेत्याकडून पैसे उकळायचे होते ( तीच म्हणाली !) ! न जाणो तो पक्का डॅंबीस आहे हे तिचं खरं मत ती माझ्याशी बोलली आणि मी ते त्यालाच सांगितलं तर....या हुशारीने तिने सराईतपणे भाषा बदलली होती. गंमत म्हणजे तो नेता तिला अशिक्षित, अडाणी , गरीब बाई म्हणतो ! आता यात नक्की डॅंबीस कोण ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

................

रोजगार उद्योगाची गंमत


नुकतीच बातमी वाचली. सगळ्या योजना तालुक्यातील एकाच गावात राबवून तरूणांना रोजगारामार्फत उद्योगशील बनवायचे व एक आदर्श गाव तयार करायचा , ही  योजना एका चांगल्या संस्थेने सदहेतूने जनकल्याणार्थ जाहीर केली होती. पण जाहीर केलेल्या योजनेला शून्य प्रतिसाद मिळाल्याचे संयोजकांना जाहीर करून पुन्हा जाहीर आवाहन करावे लागले आहे.‌ बहुतेक तरूणवर्ग तालुक्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील काही 'उद्योगा'त गुंतवला गेला असावा ! कोण म्हणतो युवक बेरोजगार आहेत म्हणून आणि त्यांना 'उद्योग' नाहीत म्हणून ? 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

११.०२.२०२१

................

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन ३

 तीळ तीळ तुटतंय मन

अपुरं जीवन

फुलेल बघ

तू फक्त एकदा

तीळगुळ देऊन

गोड बोल म्हण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१ मकर संक्रांत

.............

होय आणि नाहीची असंख्य आंदोलने

आणि या दोन टोकांमध्ये हेलकावे खाणारे आपण

आयुष्य किती क्रूर आहे

संधीच देत नाही आपल्याला

पुढे काय होणार आहे हे कळण्याची

आणि काही करण्याचीही

कुठलाच डाव आपल्या हातात येत नाही

आपण हेलकावे खात राहतो पुन्हा पुन्हा आशेने

नक्की काहीच ठरत नाही

होय नाहीचे.....

.

.

.

.

फार तर 

निकाल आल्या नंतर पाहू

किंवा

निक्काल लागल्यानंतर पाहू....


.

.

.

.आज तरी काहीच सांगता येत नाही ....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०१.२०२१

..............

आयुष्य गणिताप्रमाणे आखून चालत नाही. आयुष्याचं एखादं गणित चुकलं तर बाकीची सगळी गणितंही चुकू शकतात. निदान काही गणितं तरी चुकतात. आयुष्याच्या गणितात कुठल्याच पायरीची हमी देता येत नाही. उद्या काय होईल आज नक्की सांगता येत नाही. आयुष्य चकवा देण्यात हुशार आहे. डाव आणि प्रतीडाव कधी उलटतील सांगता येत नाही. फाजील आत्मविश्वास नडतोच. समतोल वृत्तीने व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास आणि हार जीत वा यशापयश सहजतेने स्वीकारल्यास जीवनात पुढे जाणे सुकर होते. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१७.०१.२०२१

................

कधी कधी मनावर अनावर ढग दाटून येतात. पण बरसत नाहीत. सावट धरून बसतात. चावट होऊन लगट करीत राहतात. हाकलले तरी जात नाहीत. बरसला तर काळोख बरसतो. आशेच्या कवडशालाही वाव मिळत नाही असा चांगला वावभर पट्टा तयार होतो मनाभोवती. कमी जास्त दाबाचा. मन तसे कमी जास्त हेलकावे खात राहते. दोन टोकांना. आपण नक्की कुठले हेच कळत नाही. पण आपले आपल्यालाच सावध व्हावे लागते. आपल्याच मनातल्या भावनांचा उपसागर आपल्यालाच ऐकत नाही म्हणजे काय ? त्याला विवेकाने वठणीवर आणून आपल्यालाच आपली कोंडी फोडावी लागते. पाॅझिटीव्ह थिंकींग म्हणजे काय आहे की नाही ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

............

कसे आहे आपल्याही नकळत कोळी जाळं विणतो. आपण त्यात अलगद पडणार हे तो पक्के जाणून असतो. एकदा अडकलो की सुटका नाही. तेवढा चिकट आणि चिवट द्राव त्याने आधीच सोडून ठेवलेला असतो. आपल्या सभोवती अनेक कोळ्यांनी अशी यंत्रणारूपी जाळी पसरून ठेवलेली आहेत. फक्त पाऊल उचलण्यापूर्वी सावधपणे डोळ्यावरची बेसावधपणाची झापडे काढून पाहिले पाहिजे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

....................


Nothing happens. Looks still. Silent. No movements. No work. No objectives. No problems. No plans. No objections. No information. No explosion of information. Nothing to do. Nothing to worry. No reason to hurry. All stars are silent. World is silent. Universe is silent. Be silent and imagine this for a moment. The moment of silence. 


...Devidas Harishchandra Patil

18.01.2021

............


मला वाटते माणसाला सतत कशात तरी गुंतत रहायला आवडतं. समोर काही नसेल तर एक जीवघेणी पोकळी तयार होते. वेळ कसा घालवायचा हा प्रश्र्न पार बेचैन करून टाकतो. काही माणसांनी यासाठीही देव निर्माण केला नसेल ना ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१


........

फाॅर्म असो वा अंदाजेबयाॅं असो, अती डोक्यावर घेण्यात अर्थ नाही. ओघवते काव्य असले पाहिजे, वाचकाला लगेच कळले पाहिजे आणि वाचायची ओढ लागली पाहिजे. इतकेच. बाकी काय ? गझलबद्दल म्हणतोय मी. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१

.............


पैसा आपलं काम करतो. किंबहुना करतोच. त्यातही दिवसाच्या आणि रात्रीच्या पैशात फरक असू शकतो. ते काही असो. पैसा काम करतोच.‌ पण दरवेळी पैसाच काम करतो असं नाही. शब्दही काम करतात. त्यातही दिवसा दिलेले आणि रात्री दिलेले शब्द यात फरक असू शकतो, बरं का ? काही लोक पैशाला जागतात. काहींना पैशाची गरजच पडत नाही. ते शब्दालाच जागतात. काही जण पैसे घेऊनही उलटे फिरतात तर काही जण शब्द देऊनही तो फिरवतात. अगदी तुमच्यासोबत राहूनही , बरं का ! असे अनुभव रोज येतात. काहींना अगदी काल परवाही आले असतील !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

............

कधी ना कधी ....


अंधारातले काम उजेडात येते ; कधी ना कधी ! तो मी नव्हेच किंवा ती मी नव्हेचवाले साळसूद चेहरे सत्य नाकारतात . अगदी तोंडावर. डोळ्यात डोळे घालून. नजरेला नजर भिडवून. पडदयाआडचे सूत्रधार पडदयापुढेही येतात ; कधी ना कधी ! आज ना उद्या ! बदलत्या जगाची ही कहाणी आहे. कहाणीचे सत्य कळते ; कधी ना कधी !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

.................

कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१

....................

जवा नवीन पोपट हा...


हल्ली नेटला गती नाही मिळत पूर्वीसारखी. नेटच्या रस्त्यात गतीरोधक आल्यासारखे वाटते आहे. शायद समय बदल रहा हैं... परिवर्तन हो रहा हैं...बोलो हैं ना ...?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०१.२०२१

..................

दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

२२.०१.२०२१

.................

नेत्यांची मांडवली नि कार्यकर्त्यांची गोची ! ही नवी म्हण काही वेळा ऐकू येते.‌ कोण नेता कशासाठी कुठे उडी मारील आणि आपल्याच कार्यकर्त्यांचा कसा गोंधळ उडवील यांचा युती आणि आघाड्यांच्या जमान्यात काहीच भरोसा राहिलेला नाही. सत्तेच्या गणितात न पडता व स्वत:ची बुध्दी न वापरता मतदारांनी गोंधळून केलेले विस्कळीत मतदान हे युती आणि आघाड्यांना जन्म देताना दिसते आहे. मतदानातील संभ्रम पुढील गोंधळांना कारणीभूत होतो आहे. त्यातच पक्षाचा आदेश या गोंडस नावाखाली दिवसरात्र एक बाजू पूजारासारखी नेटाने लावून धरणाऱ्या कार्यकर्त्यांची नेत्यांच्या गणितांनी दमछाक होते आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण होते आहे आणि निर्माण झालेल्या त्रिशंकू अवस्थेकडे उदास लोकशाही हताशपणे बघते आहे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२३.०१.२०२१

..................


शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन २

 दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन

 कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१