मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

आपल्याला कळले नाही

आपल्याला कळले नाही !


आपले कर्तृत्व थिटे पडते . मग आपण आपल्याभोवती एक सुरक्षित कवच निर्माण करू पाहतो . एक तर आपण पांघरूण घेवून झोपतो किंवा चवताळून उठतो आणि एक प्रतीसृष्टी -आपली सृष्टी - निर्माण करू पाहतो . वसिष्ठ ऋषींचे काहीसे असेच झाले असावे. त्यांनी प्रतीसृष्टी निर्माण केली . आपण ? आपण ना  पांघरूण घेवून झोपू शकलो , ना  प्रतीसृष्टी निर्माण करू शकलो . आपल्याला आपला मार्गच सापडला नाही ! आपला शोधही अपूर्णच होता . त्यात जगाची हुशारी नव्हती ; स्वार्थकेन्द्री वृत्ती नव्हती !

निसगार्चे अवलोकन


आपण आठव्या इयत्तेतच निसगार्चे अवलोकन करायला गेलो. तिथेच थांबलो नाही तर त्यावर लेखन करू लागलो ! निसर्गातल्या माणूस सोडून सर्व घटकांची भूल आपल्याला पडली ! माणसे भेटली . तात्पुरती भेटली . पण माणूसपण आधीच वजा झाले होते. ना कुणाचा विश्वास वाटला ; ना कुणाची खात्री ! चूक आपलीच होती. आपला दुबळेपणा आपल्याला नडला. त्याचेही भांडवल करता आले नाही . मूळात आपले काही भले करायचे असते हेच मुळी आपल्याला कळले नाही ! परिस्थितीचे अचूक भान आपल्याला कधीच आले नाही .

भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ  !


जगात भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ असतो हे आपल्याला कधीच कळले नाही .आपण दैवते पुजत बसलो ! तन, मन, धन अर्पून बसलो . तिकडे जगाने त्याच दैवतांचे बाजारीकरण केले . स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:चे कायदे केले ! दैवतांना जाणीवपूर्वक मोठे करता करता जग स्वत:च मोठे होऊन गेले ! ते खरे व्यवहारचतूर !


सोडवणारा वाईट ठरतो !

 
कळायला लागल्यापासून आजी आणि आई मधली भांडणे मिटवायची सवय आपल्याला नडली. घरातले वेगळे दारातले वेगळे हे आपल्याला कळलेच नाही ! आपल्याला वाटायचे निदान आपल्या आसपास तरी भांडणे असता नयेत. सर्वांनी गोडीगुलाबीने रहावे . पण शेवटी त्या भांडणाऱ्या माणसांचीच गोडीगुलाबी होते आणि सोडवणारा वाईट ठरतो, हे आपल्याला कळले नाही . दोघांच्या भांडणात पडून आपण आपले तोंड फोडून घेतले . ते लबाड स्वार्थी ; आपण निस्वार्थी मूर्ख !    माझ्या एका गझलेच्या शेरात मी काहीसा असाच व्यक्त झालो आहे :

          आयुष्यभर मी माझा भाबडेपणा जपला
           मी टग्यांशी लढाई नेहमी हरलो होतो !

तो म्हणाला गॅस एजन्सीकडून आलोय !


मला कोणाचेच अंतरंग कधीच कळले नाहीत . त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा , कुणावर ठेवू नये , याचे जलद राहुदेत , पण कुणी फसवून गेल्यावरही त्याने आपल्याला फसवले आहे , याचे सावकाशपणीही आकलन झाले नाही . माझ्या वडीलांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी संध्याकाळी एक तरूण माझ्या घरी आला . गॅस एजन्सीकडून आलोय म्हणाला . मला खरंच वाटलं . त्याने सिलेंडरच्या खाली ठेवण्याची ट्राॅली दाखवली . तिचे उपयोग पाहून शेजारपाजारच्या लोकांनी ब-याच  ट्राँलीज घेतल्या , असं सांगून त्याने दोन नग माझ्या गळ्यात मारले आणि हजार रूपये घेऊन तो गेला पण ! तरी मी त्याची ती कंपनी कुठली होती , हेच त्याला का विचारले नाही याचाच विचार 
करीत किती तरी वेळ  बसलो होतो . तो गॅस एजन्सीकडून आला होता का किंवा त्या ट्राॅलीज कोणत्या कंपनीच्या आहेत , याचीही विचारणा मी केली नव्हती ! असा मी ....

जीवनाच्या महाभारतात मी गोंधळून गेलो... 
जग कुठले कळणार जिथे ; मलाच मी कळलो नाही ! 

#महाभारत

#जीवनाचे_महाभारत

#mahabharat

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

कोणीतरी आहे तिथे

                     चाहूल  ...

सारे मजेत चालले होते . कालपर्यंत . तसे आज थोडेसे बिनसले . आपली मनात शंका येते ना ! पुन्हा ग्रह फिरले की काय ? पुन्हा संकटांची सुरूवात ? जरा आपण काही ठीक केले की कुठेतरी बिनसते . असे तरी का व्हावे ? सतत सगळे सुरळीत का चालू नये ? नवे प्रसंग , नवी वाट , नवी लढाई की काय ? आपले मनात येते. बाकी तसे ठीक आहे. फारसे बिघडले नाही . थोडी चाहूल मात्र लागली. पाहूया काय होते ते . . .


निराळा अनुभव 


नाही . वाटले होते तसे आणि तितके काहीच वाईट झाले नाही. उलट परिस्थिती माझ्याच हातात आली ! तसा हा अनुभव मला तरी निराळाच आहे .  अनेक वर्षे झाली . सुखाची साधी चाहूलही लागली नव्हती . आता सुख बरेचसे मला ओळखू लागले आहे. प्रथम आपण स्थिर होणे आवश्यक आहे. ईश्वर तेही करीलच . त्यानेच तर एवढे केले आहे. मी प्रथमच त्याचा मनापासून आभारी आहे. शेवटी त्याच्याशिवाय आपले कोणी नाही . तो तर सर्वांचाच आहे.

तीन महिन्यानंतर :


तीन महिन्यानंतर थोडासा वाईट अनुभव आला . पण प्रसंगावर प्रसंगावधानाने मात करता येते हेही आपण अनुभवले ते त्या ईश्वरामुळेच ! ईश्वर सर्वाना सद्बुद्धी देईलच ! काही वेळा कळत नाही.  खरंच कळत नाही.  आपल्या हातात काहीच नसते,  असे वाटते. आपण फक्त पुढे जात रहायचं . आपले आयुष्य आपले असतेच कुठे  ? म्हणजे आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच ! कोण घडवतो हे सगळे ? दिसत नाही पण कोणी तरी आहे तिथे ! त्यालाच आपण ईश्वर म्हणतो का ?

२० जून , २०२३

ये रे माझ्या मागल्या 

अनेक वर्षांनंतर असे अनुभव येत आहेत की ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच मनात शंका निर्माण होत आहे. शंकाच काय , दोन तीनदा तर खात्रीच होत गेली.... पण पुन्हा आपले ये रे माझ्या मागले होत आहे ! आपण केवढे , विश्व केवढे ! आपल्याला यातले नक्की काय कळते ? हा जो अज्ञानीपणा आपण घेत आहोत ना तो चिकित्सकपणाला आणि संशोधनाला मारक ठरतो आहे . पण आपण तरी काय करणार ? काय ते नक्की होत नाहीय. असलाच परमेश्वर तर त्याने यावे की समोर ! तो असा लपून का बसला आहे ? जीवनात इतकी उलथापालथ होत असतांना तो कुठे झोपून राहिला आहे , हेच कळत नाही. चांगले वागा , वाईट वागा , जीवनात दु:खं आहेच ! शांती करा , नवस बोला, काहीही करा , भोग टळता टळत नाहीत ! अशा वेळी ज्याचा #आधार घ्यायचा तोच बेपत्ता ! त्या अज्ञाताची #KYC कशी करायची ? तो आहे तर संभ्रमात का टाकतो आहे ? की त्यालाही कधी प्रगट व्हायचं हा संभ्रम पडलाय ? त्याचाही ये रे माझ्या मागल्या झालाय ?  आपला मेंदू माणूस म्हणे दहा टक्केच वापरतो. पण मग नव्वद टक्के कुठे लपून राहिलाय ? तो कसा कळणार ? त्याला कुठे शोधायचे ? की नुसतेच म्हणत बसायचे : कोणी तरी आहे तिथे ! खरंच का आहे तो तिथे ? दिसला , भेटला कधी तुम्हांला तर सांगा मला !

#kyc


#kyc_of_god


#kycofunknown


#somebody_is_there


#कोणीतरीआहेतिथे