गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

स्फूटलेखन ४

  मेघ भरून येतात तितका पाऊस कोसळतोच असं नाही. काही मेघ तर हुलकावणी देत न बरसताच पुढे निघून जातात. आपण पुन्हा वाट पहात राहतो ... वाट पाहणे एवढेच आपल्या हातात असते. ढगांवर कसली तरी फवारणी करून आपल्याला हवा तेव्हा पाऊस पाडण्याची स्वप्नें आपण स्वत:ला थोडीच दाखवू शकतो ! हे स्वप्नं दाखवणे वगैरे काही आपली मक्तेदारी नाही. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२३.०१.२०२१

..................


निसर्गात विविध घटकांमध्ये काही ना काही साम्य असणारच. माणसांसारखी माणसे दिसतात. नीट निरीक्षण केले तर झाडांसाठी झाडेही दिसतीलच. पण काही माणसे झाडांसाठी दिसणे शक्य आहे आणि काही झाडे माणसांसारखी दिसणेही शक्य आहे. दिसण्यात आणि वागण्यातही एकमेकांचे काही गूण आढळतात. जीव वाचवणारी माणसे आहेत तश्या जीव घेणाऱ्या वनस्पतीही आहेतच. मोठे मासे लहान माश्यांना खातात. हा महत्त्वाचा गूण माणसातही आहेच की. अशी दिसण्याची आणि वागण्याची बरीच साम्यस्थळे निसर्गात आहेतच. आज एका मित्राने गदेसारखे दिसणाऱ्या फुलाचा फोटो फाॅरवर्ड केलाय आणि याला हनुमान गदा फूल म्हणतात, असं लिहिलंय. सोयीस्कर ठराविक ठिकाणी संदर्भ जोडण्याचा गूणही माणसात पूर्वापार आहे. हा गूण निसर्गातही अन्य घटकांत असेल आणि ते घटकही त्यांना सोयिस्कर माणसांची नांवे कशाशी तरी जोडत असतील. काही सांगता येत नाही. इथून तिथून सगळं सारखंच दिसतंय. एकच तत्व आहे ना सगळीकडे. 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०१.२०२१

..................

काही माणसांना मोठेपणा देऊन त्याव्दारे स्वत:ची तुंबडी भरून घेता येते , हे काहींनी पुराणकाळातच अचूक ओळखले होते. ज्यांच्याकडून फायदा करून घेतला गेला ते देव म्हटले गेले. देव ज्यांना घाबरून असायचे त्यांना राक्षस म्हटले गेले. देव महात्म्यबध्द झाले. पूजेला लावले गेले. पण राक्षस संपले नाहीत. आता हे राक्षस सगळ्यांनाच छळतात. 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०१.२०२१

..................

मेस्त्री उवाच


एका मेस्त्रीला घराचं काही काम दिलं होतं. मध्येच चार दिवस तो गायब होता. या लोकांचं हे नेहमीचं असतं. ते तरी काय करणार ? आमच्या एका कामावर त्यांचं पोट भरत नसतंच. चार ठिकाणची कामं केली तरच त्यांचं आणि त्यांच्या हाताखालच्यांचं पोट भरणार. हे समजून मी शांत होतो. पण माझंही काम होणं आवश्यक होतं, म्हणून पाचव्या दिवशी सकाळी मी फोन केला. तो कामात असल्याने त्याच्या माणसाने फोन उचलला. मी विचा‌रलं कुठे आहात ? तर तो माणूस उत्तरला : मिऱ्यावर. मी म्हटलं , कोणाकडे ? तर तो चक्क म्हणाला, देवदास पाटलांकडे. माझा त्याने देवदास करून टाकलाच वर माझ्याच घरात काम करतोय म्हणून मलाच सांगत होता !  शेवटी मी देवीदास पाटीलच माझ्या घरातूनच बोलतोय हे सांगितल्यावर तो उडालाच ! मीच सांभाळून घेत , " माझ्याकडे लवकर या . वाट बघतोय. मेस्त्रीना सांगा " असं म्हटलं आणि हसतहसत फोन बंद केला. संध्याकाळी दोघेही हजर. काम फत्ते ! 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०१.२०२१

..................

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन ३

 तीळ तीळ तुटतंय मन

अपुरं जीवन

फुलेल बघ

तू फक्त एकदा

तीळगुळ देऊन

गोड बोल म्हण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१ मकर संक्रांत

.............

होय आणि नाहीची असंख्य आंदोलने

आणि या दोन टोकांमध्ये हेलकावे खाणारे आपण

आयुष्य किती क्रूर आहे

संधीच देत नाही आपल्याला

पुढे काय होणार आहे हे कळण्याची

आणि काही करण्याचीही

कुठलाच डाव आपल्या हातात येत नाही

आपण हेलकावे खात राहतो पुन्हा पुन्हा आशेने

नक्की काहीच ठरत नाही

होय नाहीचे.....

.

.

.

.

फार तर 

निकाल आल्या नंतर पाहू

किंवा

निक्काल लागल्यानंतर पाहू....


.

.

.

.आज तरी काहीच सांगता येत नाही ....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०१.२०२१

..............

आयुष्य गणिताप्रमाणे आखून चालत नाही. आयुष्याचं एखादं गणित चुकलं तर बाकीची सगळी गणितंही चुकू शकतात. निदान काही गणितं तरी चुकतात. आयुष्याच्या गणितात कुठल्याच पायरीची हमी देता येत नाही. उद्या काय होईल आज नक्की सांगता येत नाही. आयुष्य चकवा देण्यात हुशार आहे. डाव आणि प्रतीडाव कधी उलटतील सांगता येत नाही. फाजील आत्मविश्वास नडतोच. समतोल वृत्तीने व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास आणि हार जीत वा यशापयश सहजतेने स्वीकारल्यास जीवनात पुढे जाणे सुकर होते. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१७.०१.२०२१

................

कधी कधी मनावर अनावर ढग दाटून येतात. पण बरसत नाहीत. सावट धरून बसतात. चावट होऊन लगट करीत राहतात. हाकलले तरी जात नाहीत. बरसला तर काळोख बरसतो. आशेच्या कवडशालाही वाव मिळत नाही असा चांगला वावभर पट्टा तयार होतो मनाभोवती. कमी जास्त दाबाचा. मन तसे कमी जास्त हेलकावे खात राहते. दोन टोकांना. आपण नक्की कुठले हेच कळत नाही. पण आपले आपल्यालाच सावध व्हावे लागते. आपल्याच मनातल्या भावनांचा उपसागर आपल्यालाच ऐकत नाही म्हणजे काय ? त्याला विवेकाने वठणीवर आणून आपल्यालाच आपली कोंडी फोडावी लागते. पाॅझिटीव्ह थिंकींग म्हणजे काय आहे की नाही ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

............

कसे आहे आपल्याही नकळत कोळी जाळं विणतो. आपण त्यात अलगद पडणार हे तो पक्के जाणून असतो. एकदा अडकलो की सुटका नाही. तेवढा चिकट आणि चिवट द्राव त्याने आधीच सोडून ठेवलेला असतो. आपल्या सभोवती अनेक कोळ्यांनी अशी यंत्रणारूपी जाळी पसरून ठेवलेली आहेत. फक्त पाऊल उचलण्यापूर्वी सावधपणे डोळ्यावरची बेसावधपणाची झापडे काढून पाहिले पाहिजे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

....................


Nothing happens. Looks still. Silent. No movements. No work. No objectives. No problems. No plans. No objections. No information. No explosion of information. Nothing to do. Nothing to worry. No reason to hurry. All stars are silent. World is silent. Universe is silent. Be silent and imagine this for a moment. The moment of silence. 


...Devidas Harishchandra Patil

18.01.2021

............


मला वाटते माणसाला सतत कशात तरी गुंतत रहायला आवडतं. समोर काही नसेल तर एक जीवघेणी पोकळी तयार होते. वेळ कसा घालवायचा हा प्रश्र्न पार बेचैन करून टाकतो. काही माणसांनी यासाठीही देव निर्माण केला नसेल ना ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१


........

फाॅर्म असो वा अंदाजेबयाॅं असो, अती डोक्यावर घेण्यात अर्थ नाही. ओघवते काव्य असले पाहिजे, वाचकाला लगेच कळले पाहिजे आणि वाचायची ओढ लागली पाहिजे. इतकेच. बाकी काय ? गझलबद्दल म्हणतोय मी. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१

.............


पैसा आपलं काम करतो. किंबहुना करतोच. त्यातही दिवसाच्या आणि रात्रीच्या पैशात फरक असू शकतो. ते काही असो. पैसा काम करतोच.‌ पण दरवेळी पैसाच काम करतो असं नाही. शब्दही काम करतात. त्यातही दिवसा दिलेले आणि रात्री दिलेले शब्द यात फरक असू शकतो, बरं का ? काही लोक पैशाला जागतात. काहींना पैशाची गरजच पडत नाही. ते शब्दालाच जागतात. काही जण पैसे घेऊनही उलटे फिरतात तर काही जण शब्द देऊनही तो फिरवतात. अगदी तुमच्यासोबत राहूनही , बरं का ! असे अनुभव रोज येतात. काहींना अगदी काल परवाही आले असतील !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

............

कधी ना कधी ....


अंधारातले काम उजेडात येते ; कधी ना कधी ! तो मी नव्हेच किंवा ती मी नव्हेचवाले साळसूद चेहरे सत्य नाकारतात . अगदी तोंडावर. डोळ्यात डोळे घालून. नजरेला नजर भिडवून. पडदयाआडचे सूत्रधार पडदयापुढेही येतात ; कधी ना कधी ! आज ना उद्या ! बदलत्या जगाची ही कहाणी आहे. कहाणीचे सत्य कळते ; कधी ना कधी !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

.................

कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१

....................

जवा नवीन पोपट हा...


हल्ली नेटला गती नाही मिळत पूर्वीसारखी. नेटच्या रस्त्यात गतीरोधक आल्यासारखे वाटते आहे. शायद समय बदल रहा हैं... परिवर्तन हो रहा हैं...बोलो हैं ना ...?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०१.२०२१

..................

दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

२२.०१.२०२१

.................

नेत्यांची मांडवली नि कार्यकर्त्यांची गोची ! ही नवी म्हण काही वेळा ऐकू येते.‌ कोण नेता कशासाठी कुठे उडी मारील आणि आपल्याच कार्यकर्त्यांचा कसा गोंधळ उडवील यांचा युती आणि आघाड्यांच्या जमान्यात काहीच भरोसा राहिलेला नाही. सत्तेच्या गणितात न पडता व स्वत:ची बुध्दी न वापरता मतदारांनी गोंधळून केलेले विस्कळीत मतदान हे युती आणि आघाड्यांना जन्म देताना दिसते आहे. मतदानातील संभ्रम पुढील गोंधळांना कारणीभूत होतो आहे. त्यातच पक्षाचा आदेश या गोंडस नावाखाली दिवसरात्र एक बाजू पूजारासारखी नेटाने लावून धरणाऱ्या कार्यकर्त्यांची नेत्यांच्या गणितांनी दमछाक होते आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण होते आहे आणि निर्माण झालेल्या त्रिशंकू अवस्थेकडे उदास लोकशाही हताशपणे बघते आहे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२३.०१.२०२१

..................


शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन २

 दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन

 कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१

शनिवार, २ जानेवारी, २०२१

Kahi kavita

 कवितेतून शोधत आलो 



कवितेत शोधत आलो 

जीवनभर दिलासा 

कधी वाट चुकतांना, 

कधी निराश होतांना

कवितेनेच धीर दिला...


बाकी आजूबाजुला माणसेच होती 

कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून ,

ज्यांना मी कवितेइतकीच माझी समजत आलो !

ठेवली नाही कधीच मी अपेक्षा 

की माझ्या कवितेला कुणी चांगलं म्हणावं,

कौतुक करावं ,

माझ्यासाठी एक छंद म्हणून मी लिहीत आलो

दु:खावरचे औषध म्हणून कविताच पीत आलो 

कवितेनेच कंठातील वीष भिनू दिलं नाही शरीरात

आणि बनू दिलं नाही रक्ताला व्देषयुक्त !



कवितेनेच धीर दिला 

कधी निराश होतांना

कधी वाट चुकतांना 

जीवनभर दिलासा

कवितेतच शोधत आलो....



जाऊ कुठे, जाणार कुठे 

कवितेशिवाय 

माणसे अशी कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून असतांना 


माणसापासूनच .....



... अर्थात आपलीच !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



....................


तुझ्यामुळे कवितेला

जाग माझ्या आली ;

एक एक ओळ माझी

तुझ्या श्रावणात न्हाली !



तुझ्या चांदण्यात माझा

शब्द शब्द मोहरला ;

तुझी साद येता कानी

जीव माझा आतूरला !



बघे आयुष्य नव्याने

पुन्हा वळायास मागे;

असे अचानक आले

बघ जुळायास धागे !



सुन्या सुन्या मैफिलीला

सूर नवा सापडला ; 

तू वाचताच कविता

देह सारा झंकारला !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील.




मेघांआडून चंद्रानं अधूनमधून डोकवावं 

तसं तुझं व्हाॅटसअॅपवर डोकावणं

मनाला भुरळ पाडून जातं...


असं कधी झालं नव्हतं

पण आज वाटतंय कुठे तरी

मनाला विचारावं स्वत:च्याच...


हे स्वप्नं आहे की सत्य ?

किती सांभाळलं होतं ...

आज ओठात आलंच ! 


पण कसं सांगू ? 

.........


कविता ओलांडते हद्द

अनावर होऊन बरसते

आषाढासारखी...



ऐकतच नाही मनाचं

मनालाच उतरवते

कागदावर....



कोणी तरी वाचील

ही धाकधूक मनात

असते तरी....


........


असे होऊ नये

असे वाटते तरी

असे होत आहे...



कधी होत नव्हते

कधी झाले नव्हते

तसे होत आहे...



आता प्रश्न हा

सुरु राहूदे का

जसे होत आहे....



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


............................................


उदास एकटेपण


उदास एकटेपण

रिते मन ;

कुणी न सोबती

 हे घुमेपण !


मूळचा देवीदास 

बिनधास्त ;

आता तसा

दुरापास्त !


चेहरा ओळखीचा

आरशास ;

प्रतिबिंब

हाच भास !


कळे न जातसे

कुठे जीवन ;

वळणामागून

येई वळण !


चालत राहणे

हेच हाती ;

विझेपर्यंत

जीवनवाती !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


रत्नागिरी. २०.१२.२०२० सायं. ०६.३५

............................................


असाच मी बसतो कुण्या संध्याकाळी

अंधाराला सोबत घेऊन 

कातरवेळेनंतर अंतर वाढत जाते उजेडापासूनचे 

दुस-या दिवशीचा सूर्य येईपर्यंत

काही पडला उजेड तर पडला माझ्याही डोक्यात

म्हणून असाच मी बसून राहतो डोक्यावर किरणे घेत 

बाकी काही नाही झाले तरी डोके उबदार होते

आणि सुचते एखादी कविता ही अशीच एखादी....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

29.12.2020

..........................

वाढलेल्या अपेक्षांचं ओझं वागवीत 

वाकलेल्या अवस्थेत चालत असतो

म्हातारपणाच्या दिशेने

अशा वेळी पावलं जड तर होणारच ना...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

29.12.2020

...............


अस्व:स्थ मनस्थितीत बाकी काहीच सुचलं नाही तरी कविता सुचते ! 

हे कसं होतं काहीच कळत नाही

पण होतं हे खरं आहे

कविता इतकी कशी अभिन्न आणि समजूतदार निघाली ?

कोण सांगू शकेल काय ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.१२.२०२०

.....................


इतक्या सगळ्या खस्ता खाल्ल्या त्या कशासाठी ?

आता अखेरच्या पर्वात तरी शांतता, समाधान मिळून मनाजोगते जगायला मिळावे ही अपेक्षा गैर वाटावी

असे जीवन पुन्हा वाट्यास का यावे ? 

सृष्टीचक्रात काही घोळ तर नाही ना ? 

की देवाचे आणि दैवाचे अस्तित्व जाणवावे म्हणून हा अट्टाहास आहे ? 

की काळच सूड उगवतोय माझ्यावर ? 

रावणाने अशाच कुणाची तरी सत्ता मानण्यास नकार दिल्यानेच त्याला मारण्यात आले का ? 

मला शरण आलेच पाहिजे हा मत्तपणा 

आणखी किती मानवांचे बळी घेणार आहे ? 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.१२.२०२०

........................


आता ते येतील पुन्हा पाच वर्षांनी हसत हसत

आणि आम्हीही तोंडदेखले तोंडभर हसतहसत

त्यांच्या आश्वासनांना आणि एकमेव मागणीला 

त्यांच्यासारख्याच मुखवटयाने प्रतिसाद देऊ😃

मास्कआडून😷😷😷😃😃😃😄😄😄


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०१.०१.२०२१

...................

गझल कळून घेतांना...


पटकन मला त्या शेराचा अर्थच कळला नाही .

असे का व्हावे ? माझ्यातील स्वयंघोषित गझलगुरूला

शेराचा अर्थ चटकन लागत नाही म्हणून कित्ती राग आला ! 


पण मग इथे माझ्यातील तथाकथित आकलनकर्त्याला राग का आला नाही ?


गझल काही वेळा कळूनही घ्यावी लागते

हे मला कळले गझल कळून घेतांना

तर किती बरे होईल 😃 😃😃


किमान माझ्यातला स्वयंघोषित गझलगुरू तरी हद्दपार होईल 😃😃😃😃😃

गझल कळून घेतांना.....


..... देवीदास हरिश्चंद्र पाटील


०१.०१.२०२१

...................

काही क्षण अस्वस्थ करतात

काही क्षण ती अस्वस्थता अधिकच वाढवतात

आणखी काही क्षणांनी हे शांत होईलही कदाचित

पण हे क्षण तरी असे अस्वस्थ करणारे आहेत हे नक्की 

पुढे तरी काय लिहू अस्वस्थ क्षणांच्या सोबतीत .....



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०१.२०२१


Suresh Bhatanchi Marathi Gazal

 फेसबुक वरून साभार....

सुरेश भटांची मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत


 मराठी कवितेच्या इतिहासाला कविवर्य सुरेश भटांचं नाव विसरता येणार नाही. गझलचा शक्तिशाली आकृतीबंध त्यांनी मराठी कवितेला दिला. स्वत:च्या मराठी गझलांनी त्यांनी मराठी कवितेचं दालन समृद्ध केलं.मराठी कविता अधिक श्रीमंत केली.

एखादं मिशन चालवावं इतक्या निष्ठेने त्यांनी मराठी गझलचा प्रसार-प्रचार केला. उर्दू गझलकारांच्या परंपरेप्रमाणे उस्तादाच्या भूमिकेतून नव्याने गझल लिहिणा-या कवींच्या गझलात दुरूस्त्या सुचविल्या. त्यांना ‘इस्लाह’ दिला. मराठी कवितेच्या परंपरेत एखाद्या जेष्ठ कवीने अशा प्रकारे नव्या कवींच्या रचनात दुरूस्त्या करणे बसणारे नव्हते. म्हणून त्यांच्यावर टीकाही खूप झाली. ‘नव्या कवींची एक पिढी त्यांनी वाया घालवली’ असा इल्जाम त्यांच्यावर लावण्यात आला. पण त्यांनी अशा प्रकारच्या टीकेला भीक न घालता, समीक्षकांच्या तथाकथित विरोधाला न जुमानता आपले मिशन अधिक नेटाने, अधिक जोमाने पुढे नेले.

 केवळ गझल ह्या एखाद्या काव्यप्रकाराला वाहिलेली संमेलनं आज भरवली जातात. आणि ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाइतकीच साहित्येतर कारणांसाठी गाजतातही. मराठीतल्या ह्या गझल प्रेमाचे मूळ कविवर्य सुरेश भटांच्या ‘गझल मिशन’ मध्ये आहे, हे विसरून चालणार नाही.

 मराठी गझलचा हा सिलसिला आजपासून जवळपास पन्नास वर्षांआधी सुरू झाला आहे. १९५५ पासून सुरेश भटांनी मराठी गझल लेखनास प्रारंभ केला. एकाहत्तर वर्षांच्या आयुष्यातली पन्नास वर्षे सुरेश भटांनी मराठी गझलला दिली आहेत. तेव्हा कुठे आत्ता आत्ता अलीकडे तिला प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. गझल प्रेमाच्या वेडाने झपाटलेला हा अर्धशतकाचा कालखंड पाहिला की सहजपणे उर्दूतील श्रेष्ठ गझलकार गालिबचा शेर आठवावा -


‘आह को चाहिए इक उम्र असर होने तक

कौन जिता है तेरी जुल्फ के सर होने तक’


 आपल्या आयुष्यातली पन्नास वर्षे मराठी गझलला अदा केल्याची पावती म्हणून मराठी रसिकांनी सुरेश भटांना ‘गझल सम्राट’ हा किताब बहाल केला. हे जग कोणालाच काही फूकट देत नाही. त्याची पुरेपूर किंमत वसूल करून घेते.इतरांच्या यशावर असूयेने जळत आणि आत्मवंचनेने कुंथत राहणा-यांना म्हणूनच तर ते कबीराच्या तो-यात सांगतात -


‘फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे

घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही’


इथे आपल्याला चटकन कबीराची आठवण होते-


‘कबीर खडा बजार मे लिए लू काठी हाथ

जो घर जारे आपना चले हमारे साथ’


 असे खडे बोल सुनावणा-या कबीराचा ‘एल्गार‘ आणि दंभावर प्रहार करणा-या तुकारामाचा ‘झंझावात’ त्यांच्या गझलेत बेमालूम एकरूप झालेला दिसतो.


‘इथे मागून ही माझी समाधी बांधली गेली

जिथे मी गाडला गेलो अरे ही तीच आळंदी’


ज्ञानेश्वरांच्या समाधीला एक प्रतिमारूप देताना चमत्कारिक इतिहासाविषयी त्यांनी व्यक्त केलेली काव्यात्मक प्रतिक्रिया आपल्याला ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’याचा पुन:प्रत्यय देणारी आहे.

 सुरेश भटांच्या नावावर आजच्या घडीला सहा कविता संग्रह जमा आहेत. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ ‘सप्तरंग’ आणि ‘रसवंतीचा मुजरा’अशी त्यांची शीर्षकं आहेत.

 यापैकी निव्वळ गझलांचे म्हणता येतील असे संग्रह म्हणजे ‘एल्गार’आणि ‘झंझावात’. भटांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि आक्रमकता त्यांच्या गझलांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होते तशीच त्यांच्या संग्रहांच्या ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ शीर्षकांतूनही अभिव्यक्त होते.

 मराठी कवितेवरील आक्रमण आणि मराठी कवितेतील वादळ म्हणजे गझल असा आशय सूचविणारी ती शीर्षके आहेत.

 सुरेश भटांच्या मराठी गझलांचा प्रवास आजही कालानुक्रमे न्याहाळायचा झाल्यास आपल्याला त्यांच्या ‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहापासून सुरूवात करावी लागेल. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात एकूण ७२ कविता आहेत. त्यापैकी फक्त सात रचनाच गझल प्रकारात आहेत.


‘मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे

मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे


रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी

मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे!’


 १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘रूपगंधा’ या शीर्षकाच्या अशा मल्मली श्रृंगारांच्या रेशमी गझलने संग्रहाची सुरूवात होते.उर्दूत एकच विषय उलगडत नेणा-या गझलला ‘मुसलसल गझल‘ म्हणतात. भटांच्या सुरूवातीच्या अनेक गझला या प्रकारात मोडणा-या आहेत.याच संग्रहातल्या विविध विषयाच्या इतर गझला पाहिल्या तरी त्यांच्यात आशयाचे एकत्र सूत्र पाण्यातल्या तरंगासारखे विस्तारताना आपल्याला दिसते.


‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी

जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी’


 ‘वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही’ असं जगणं चाललेलं असताना मृत्यूचं असलेलं स्वाभाविक आकर्षण नंतरच्या संग्रहातूनही त्यांच्या गझलात निनादत राहिलं.


‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’


किंवा


‘मेल्यावरी जगाचे आभार मानले मी

जाऊ दिले मला हे उपकार मानले मी’


 सुरूवातीच्या मृत्यूचं आकर्षण परिपक्व होत होत उदात्ततेकडे झुकताना आपल्याला दिसतं.‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहातील आणखी एक प्रसिद्ध गझल अशी आहे-


‘माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे!

माझिया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे!


हेलकावे मी पुढे येता मिठी सा-या फुलांची,

हे बरे झाले... इथे माझ्या उरी अंगार आहे!’


 नंतरच्या गझल लेखनाची नांदीच एकप्रकारे या गझलच्या ओळीतून आपल्याला जाणवते.

 फुलांच्या मिठीचा नाजुक साजुक श्रृंगार आणि उरात विश्वाच्या व्यथेचा धगधगता अंगार अशा दोन धृवात सुरेश भटांच्या सर्व गझला हेलकावत राहिल्या.

 गझल लेखनाला प्रारंभ केल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा गझल संग्रह १९७४ साली प्रसिद्ध झाला. ह्या संग्रहात एकूण ८२ कविता आहेत. त्यापैकी ३४ कविता ह्या गझल प्रकारातील आहेत.

 ह्या संग्रहातील बहुतांश गझला देखील एकच आशय उलगडून दाखविणा-या आहेत. प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र असलाच पाहिजे अशी गझलची आग्रही व्याख्या ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध होईपर्यंत तरी भटांनी स्वीकारल्याचे त्यांच्या गझल लेखनातून जाणवत नाही.


‘समजावुनी व्यथेला समजावता न आले

मज दोन आसवांना हुलकावता न आले’


किंवा


‘जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही’


किंवा


‘दिवस हे जाती कसे अन् ऋतू असे छळतात का

विसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का?’


किंवा


‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले!

एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!’


 -अशी कितीतरी उदाहरणे घेता येतील. माधव जूलियनांनी दिलेल्या संज्ञेत बोलावयाचे तर अशा सर्व गझला ‘एक पिण्डी भावगीतासारख्या’ उलगडत जाणा-या आहेत.


 ‘रंग माझा वेगळा’ हे भटांच्या काव्यप्रवासाचे एक महत्त्वाचे वळण आहे. ज्या वळणावर त्यांचे गीत लेखन मागे सुटले आहे. आणि ‘मुसलसल गझल’ देखील मागे पडली आहे.आणखी एक महत्त्वाची गोष्ट ‘रंग माझा वेगळा‘ नंतर घडलेली आपल्याला आढळते. एखाद्या गझलेत जास्तीत जास्त नऊ शेर लिहिणारे भट मात्र ‘एल्गार’ मध्ये सुचतील तेवढे तेरा शेर एकाच गझलमध्ये घालताना दिसतात.आशयदृष्ट्या शेरांची विविधता लक्षात घेतली तरी एकसंध काव्यकलाकृतीला उणेपणा आणत एखादा शेर गझलची विण सैलसर करतो.

 निव्वळ गझलांचे असलेले भटांचे दोन संग्रह म्हणजे ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’.

 ‘एल्गार‘मधे ११९ कविता आहेत. त्यापैकी ९४ गझल प्रकारातल्या आहेत. तर झंझावातामध्ये एकूण ९६ कविता आहेत आणि त्यापैकी ७३ गझला आहेत.

 संख्यात्मक वाढीच्या दृष्टीने ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ हे त्यांच्या गझल प्रकारातले महत्त्वाचे पडाव आहेत. पण गुणात्मक वाढीच्या दृष्टीने मात्र ते ‘रंग माझा वेगळा’ इतके गोळीबंद गझल देणारे वाटत नाहीत. आकाराच्या बाह्य अंगाने त्याचे महत्त्वाचे कारण सूचतील तेवढे शेर एका गझलेत घालणे हे जसे असावे, तसेच अंतरंगाच्या अंगाने तपासून पाहिले तर त्याच त्या लाडक्या आणि आवडत्या प्रतिमांची पुनरावर्तने हे दुसरे कारण असावे..

 ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत भटांनी लिहीलेले एक वाक्य आहे ‘मानवी प्रेम जगाला सुंदर बनवते, पण ज्या जगात प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य आणि अजून कितीतरी सुंदर गोष्टी आहेत. ते जग हृदय असलेल्या जिवंत माणसांनी जगण्याच्या लायकीचे बनवले पाहिजे’.

 या त्यांच्या वाक्यातील प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य ही जी यादी आहे. त्यात अश्रु आणि स्वप्ने मिळवली की तेच त्यांच्या गझलातील प्रतिमा विश्वाचे वर्तुळ पूर्ण होते.

 आणि दुसरीकडे सामान्य माणसांच्या दु:ख दारिद्र्याचा कैवार घेण्यासाठी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक दंभावर घनाघाती प्रहार करताना त्यांच्या गझला जेव्हा चीड, संताप व्यक्त करतात तेंव्हा त्यांच्यातली सूचकता नष्ट होऊन त्यांच्या शब्दांचा स्वर अधिक चढा झाल्यासारखा जाणवतो. त्यांना अपेक्षित काव्यातील प्रासादिकतेलाही तो कधी कधी ढोबळपणाची बाधा आणत तर नाहीना,असे वाटते.

 ‘सप्तरंग’ या त्यांच्या शेवटच्या संग्रहात एकूण ८० कविता आहेत. त्यापैकी ४६ गझला आहेत. एकूण समाविष्ट कवितांच्या तुलनेत हे प्रमाण बरेचसे ओसरल्या सारखे वाटते. ब-याचशा जुन्या कविता ज्या इतर संग्रहात समाविष्ट होऊ शकल्या नाहीत त्या या संग्रहात समाविष्ट करून संग्रह सिद्ध केल्यामुळे ते घडले असावे.

 ४ फेब्रु. २००७ ला नागपूर येथे संपन्न झालेल्या ८० व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील स्व. सुरेश भट गझलवाचन सत्रात माझ्या हस्ते प्रकाशित झालेल्या सुरेश भटांच्या ‘रसवंतीचा मुजरा’ ह्या अखेरच्या संग्रहात एकूण ८३ कविता आहेत.त्यापैकी केवळ ६ गझला आहेत. सुरेश भटांच्या नावावर असलेल्या ह्या सहा संग्रहात समाविष्ट एकूण  कवितांपैकी संग्रहनिहाय गझला -

संग्रहानुसार कविता/ गझला

रूपगंधा ७२ / ०७

रंग माझा वेगळा ८२ /३४

एल्गार ११९ /९४

झंझावात ९६/७३

सप्तरंग  ८०/ ४६

रसवंतीचा मुजरा ८३ /०६

...........................

एकुण५३२ /२६०

अशा एकूण ५३२ कवितांपैकी निम्म्याहून अधिक २६० गझला आहेत.

 ‘सप्तरंग’ ह्या संग्रहात समाविष्ट ‘ह्म्द’(पृ.३९) ‘न आत शरीफ’(पृ.४०) आणि ‘पाच वर्षांनी!’(पृ.६६)आणि ‘खुलासा’(पृ.७६)दोन हझला अशा चार रचनांचा आकृतिबंध गझलांचाच आहे.त्यांना धरून गझलांची संख्या २६४ होईल.‘न आत शरीफ’ ही रचना ‘झंझावात’ ह्या संग्रहातही पृ.५० वर समाविष्ट आहे.

 वरील आकडेवारीत मुसलसल गझलांचाही समावेश आहे.ज्यांना ‘रंग माझा वेगळा’नंतरच्या कालखंडात सुरेश भट गझलांच्या फॉर्म मधल्या कविता म्हणत असत.

 ‘सप्तरंग’ वाचताना आपण ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ मधल्या गझलाच पुन्हा पुन्हा वाचतो आहोत की काय असा भास व्हावा एवढा प्रतिमांचा सारखेपणा जाणवतो.

 एकंदर गझलात हे जिथे जिथे नाही तिथे प्रतिमांचे नावीन्य आणि आशयाची उत्कटता आपल्याला थेटपणे भिडते. त्या ओळी आपल्या स्मरणात राहतात आणि भाषिक उपयोजन करण्याएवढे सुभाषितत्वही त्यांना लाभते उदाहरणार्थ -


‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री

मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’


किंवा


‘संपली ती रात्र होती मानतो आम्ही, परंतू

जो निघाला सूर्य त्याचा चेहरा काळा कशाला?’


किंवा


‘चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती

ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?’


किंवा


‘राग नाही तुझ्या नकाराचा

चीड आली तुझ्या बहाण्याची!’


किंवा


‘अता आजन्म कोणाला कुणी सांगायचे नाही-

कुणापाशी कुणी वेडा प्रवासी थांबला होता.’


 भटांच्या सहा संग्रहातल्या मुसलसल आणि गैर मुलससल अशा दोन्ही प्रकारच्या गझलांची एकूण संख्या २५४ इतकी आहे. त्यासाठी त्यांनी पन्नास वर्षे सातत्याने गझला लिहिल्या आहेत.

 १९७४ मध्ये ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत तीन दशकं त्यांच्या गझलांनी मराठी कवितेवर चेटूक केले आहे.

 भटांच्या गझलांचा हा ताळेबंद मांडताना त्यांनीच केलेल्या कवितेच्या यशाची एक व्याख्या सहजपणे आठवली. ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत ते लिहितात - ‘जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीच्या जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!’   

 आपल्या गझलांचे समर्थन करण्यासाठी भट आज हयात नाहीत पण काळाच्या कठोर समीक्षेला पुरून रसिकांच्या स्मरणात पिढ्यानुपिढ्या उरेल एवढे गुण त्यांच्या गझलात नक्कीच आहेत म्हणूनच तर त्यांच्या ह्या ओळी अधिक अर्थपूर्ण वाटतात-


‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’


श्रीकृष्ण राऊत 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .