रविवार, ८ एप्रिल, २०१८

“ डोळ्यात आसवांच्या ”

“ डोळ्यात आसवांच्या ”



शोधतो मी रंग त्याचा मझिया रंगांमधे
काल जो सांगून गेला रंग माझावेगळा !

       हे जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हाच मी ओळखले की मीही तोच रंग तीस वर्षापूर्वी शोधत होतो ! तो आणखी असेही बोलला “ मी वरवर कोठे जगलो , आयुष्य गझलमय होते ! ” तेव्हाच मला त्याच्या खोलीचा अंदाज आला होता ! बंगल्यामधुनी निघाल्या चळवळी , घेत साध्या झोपड्यामधले बळी ”  , असे त्याने लिहिले आणि तो मला अधिक पटू लागला ! पुढे , “ मी दाखवतो डोळ्यांना जगण्याचे वास्तव माझ्या  स्वप्नांच्या येण्यावर केव्हाच विसंबत नाही ”, असाही त्याचा शेर भेटला ! होय , मी त्याच गझलगोविंदाबद्दल बोलतोय जो भयानक वास्तव गझलांमधून सहजतेने मांडतो आणि त्याच वेळी , “  कोण अंकुरले मघाशी माझिया गात्रांतुनी , हा कुणाचा श्वास आहे पाकळ्यांहुन कोवळा ”, असेही म्हणतोय ! “ पान अळवाचे तशी तू .. थेंब पाण्याचा असा मी , भेट होते .. स्पर्श होतो .. पण बिलगता येत नाही ! ” ही तरल लाडीक तक्रारही तो किती सहजतेने करतोय ! “  डोळे भरून माझ्या वाचू नकोस गझला , पडतील शब्द माझे प्रेमात आसवांच्या ” , असे गोविंद नाईक या ताज्या दमाच्या गझलकाराने सांगितल्यामुळे मग “ डोळ्यात आसवांच्या ” ह्या त्याच्या पहिल्या गझलसंग्रहाकडे वळणे स्वाभाविकच होते ! तसा मी वळलोही. पण गेले काही महिने त्यासाठी पुरेसा वेळ देवू शकलो नाही , याबद्दल मला अपराधीपणा जाणवतो .

        रंग पुन्हा ह्या रानाचा हिरवा झाला तर ?
        ढग एखादा ओलेता हळवा झाला तर ?

        असा हळवा होणारा गोविंदा ,

        एक तिरंगा जपून ठेवा काळजातही
        रंग उध्या झेंड्याचाही भगवा झाला तर ?

        असे उध्याचे वास्तव छातीठोकपणे लिहितो !

        पुतळ्यांनी आकाश गाठले
        माणुसकी तळ गाठत आहे

        अशी उंची ह्या संग्रहात गाठतोय ! पुढे तो असेही सांगतोय –

        सोडुनी गेलेत जे रण काळजी त्यांची नको
        जे उभे आहेत त्यांचे धैर्य टिकले पाहिजे !
         मग खरी समजेल रामाच्या मनाची थोरवी
          रावणाने शिवधनुष्याला उचलले पाहिजे ! म्हणजेच आपण फक्त एकाच बाजूचे कौतुक न  
    करता आयुष्याची दुसरी बाजूही तितक्याच समतोलपणे पाहिली पाहिजे ! हा खरा गझलकाराचा दृष्टीकोण असला पाहिजे आणि तो गोविंदाकडे आहेही !

          आसपासचे भयाण वास्तव गझलकारांने टिपून त्यावर तितकेच प्रत्यंतकारी लिहिले पाहिजे . केवळ स्वप्नंरंजन आणि मनोरंजन हा गझलचा हेतू नाही ! हे गोविंद जाणतो आणि म्हणूनच तो लिहितो -         
   केवढा श्रीमंत होता बाप .. कळले
   राख पोरांनी विकाया काढल्यावर !

हे तो लिहू शकतो , कारण , “ शिकवते बाराखडी आयुष्य माझे , पुस्तके मी पाळली नाहीत कुठली ! असे त्याचे आयुष्य त्याला शिकवून चुकले आहे !

           कधी तरी बघ डोळे उघडून वर देताना
           काय तुझ्या चरणावर अर्पण होते आहे … आणि
          
           दूरदूर माणसे चालती माणसांतली
           हे कुठल्या शतकात पदार्पण होते आहे , तसेच

           हळू हळू वाढत जाते इच्छांची उंची
           रोज तोकडी नशिबाची चादर आठवते

           हे शेर माणसांना विचार करायला लावणारे आहेत !

           अशाच काही सुंदर , प्रभावशाली ओळी मला ह्या संग्रहात मिळाल्या –

           मलाच देण्यास मी दिलासा फिरुन माझ्याकडे निघालो , बघून आक्रोश चाललेला समोर लाचार यौवनाचा , घरात मी घेतले उगीचच अनोळखी चेह-यास माझ्या , धरून हातात हात माझा कुठे तुझी सावली निघाली , अखेर मारेकरीच माझा जिवास माझ्या फितूर झाला, असे कसे हे भरून प्याले समोर तू ठेवलेस दैवा , हरेक क्षण ऐकवून गेला जगावयाची उदात्त गीता इ. मात्र , शेरांच्या ह्या पहिल्या ओळींना दुस-या ओळींची अधिक उंचीची साथ लाभायला हवी होती , म्हणजे गझलची अधिक मजा घेता आली असती , असे वाटते ! अर्थात , मी जुना गझलकार असलो तरी मी काही समीक्षक नाही . एक रसिक म्हणून लिहिले आहे . तेव्हा चुकल्यास जाणकारांनी क्षमा करावी . गोविंदाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतांना एक आश्वासकता जाणवते आहे . ती ही की तो यशाची हवा डोक्यात जावू देणार नाही ! जो रंग तो शोधतो आहे , त्या रंगाने डोक्यात हवा जावू देवू नका आणि अधिकाधिक चांगले लिहा असेच त्याच्यासोबतच्या आणि त्याच्या नंतर विजा घेवून येणा-या प्रत्येक गझलकाराला सांगितले आहे ! तो रंग म्हणजेच आदरणीय सुरेश भट ! मराठी गझलचा खराखुरा रंग ! गोविंद नाईक हा रंग नक्कीच ओळखतो !


…. श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील



       


शुक्रवार, ३० मार्च, २०१८

मराठी गझल : लोकशाही बंद झाली !

लोकशाही बंद झाली !



लोकशाही बंद झाली !
हुकुमशाही छंद झाली !

रंग बेरंगास आला !
संयमी स्वच्छंद झाली !

बेबनावाशीच नाते !
भावकी बेबंद झाली !

सभ्यता शरमे न आता !
शरमही बेधुंद झाली !

प्रतिक्रिया उमटे न कोठे !
माणसे का मंद झाली !

.... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील

मराठी गझल : सत्य ते गंगेस ठावे !

सत्य ते गंगेस ठावे !  


सत्य ते गंगेस ठावे !  मी कहाणी सांगणारा !
पाप न्हाते , पुण्य होते ; धन्य होतो नाहणारा !

ठेवले बगलेत ज्यांनी लपवुनी आहे सु-याला
वाटते त्यांना तसा तो राम नाही पावणारा !

भावनांना हात जेव्हा घातला काही खुळ्यांनी
कायद्याने हात त्यांचा कलम केला वाढणारा !

एक वेडा दाखवाया लागला स्वप्नें नको ती ...
वाटला त्याला अडाणी काय जो तो भेटणारा  ?

देश म्हणजे गावचा तो पार नाही बैठकीचा
गावगप्पांनी कधी हा देश नाही चालणारा !

... देह उर्फ देवीदास हरिश्चंद्र पाटील

मराठी गझल : अर्धे अर्धे !

Life is half half ... No full satisfaction you get from many incidents in life. This half half situation in life is described in the following marathi gazal . 


आयुष्य कसे अर्धे अर्धेसे ... ब-याच गोष्टी अशा अर्ध्या अर्ध्याच राहतात ! बोलणे अर्धे , आजमावणेही अर्धे ! रस्ता , चालणे , पौर्णिमा चांदणेही अर्धेच असते ! जीव जडतो तोही अर्धा आणि त्याचे किंवा तिचेही दुरावणेही अर्धेच ! असा आयुष्याचा रंग उडता उडता ... स्वाभाविकपणे रंगणेही अर्धेच राहते  ! आयुष्यात धड काही पूर्णत्वाने घडतच नाही ! अशा वेळी काय करायचे ?..... मग अशी मराठी गझल जन्मते !


कसे बोलणे होते ... अर्धे अर्धे !
आजमावणे होते ...अर्धे अर्धे !

कसा संपतो रस्ता फिरता फिरता ...
कसे चालणे होते  ... अर्धे अर्धे !

कशी पौर्णिमा होती अर्धी अर्धी !
कसे चांदणे होते ... अर्धे अर्धे !

कसा जीवही जडला अर्धा अर्धा
कसे तोडणे होते  ... अर्धे अर्धे !

कसा रंग होता तो उडता उडता ...
कसे रंगणे होते ... अर्धे अर्धे !

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !


खरेच सांगतो , ही कपोलकल्पित कहाणी नाही ! माझ्या दुस-या ब्लाँगवर मी इंग्रजी भाषेत यापूर्वी या  विषयावर लिहिले आहेच . काल म्हणजे 10 जानेवारी 2018 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्याने मी अगदी जागा असतांना आणि पत्नीशी बोलत असतांना माझ्या डोळ्यांसमोर जे दिसले , त्याची प्रचिती दुस-या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता आलेल्या फोनमुळे आली ! हा विषय तसा थोडा विचित्रच आहे . सुरूवातीला तरी मलाच विचित्र वाटला होता ! तसे हे सारेच अविश्वसनीय आहे ! माझाही यावर विश्वास बसला नव्हता ! किमान मला पूर्ण जागेपणी , उघड्या डोळ्यांनी काही घटना घडत असतांना दिसतात ! काही माणसे , काही ठिकाणे बसल्या ठिकाणी दिसतात ! नंतर त्या घटना प्रत्यक्षात जशाच्यातशा किंवा थोड्याफार बदलाने घडतात !  !  अगदी अलिकडच्याच दोन घटना पहा . त्यानंतर 11 जानेवारी 2018 रोजी काय घडले ते सांगतो  !

2017 च्या डिसेंबर महिन्यात मी आजारी पडल्याने मला एका हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते . सकाळची वेळ होती . सलाईन लाऊन नर्स गेली होती . माझी पत्नी माझ्याशी बोलत होती . अशक्तपणामुळे मी डोळे मिटून बोलत होतो . अचानक मला आमच्या स्पेशल रूममध्ये पाद्री , नन आणि काही जण क्राँस घेऊन आलेले दिसले . माझ्या ऊशाशी त्यांनी क्राँस ठेवला आणि मी डोळे उघडून पाहिले तर तिथे फक्त माझी पत्नीच होती . मी दरवाजाकडे बघितले तर दरवाजा चक्क बंद होता ! मी पत्नीला ह्या चमत्कारिक  देखाव्याबद्दल सांगितले . तेवढयातच  वरच्या मजल्यावर जाणा-या जिन्यावर दाणदाण असे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले ! पाच मिनिटांनी चक्क प्रार्थनेचे शब्द माझ्या कांनी पडले ! डावीकडच्या खिडकीतून पाहिले तर त्या दिशेने वरच्या मजल्यावरून ते शब्द येत होते . तेव्हा मला मघाचच्या पाद्री , नन , क्राँसचा अर्थबोध झाला  ! हे तसे लगेचच आलेले प्रत्यंतर ! मात्र ,  दुस-या दिवशी दिसलेल्या घटनेचे प्रत्यंतर दोन तीन दिवसांनी आले !

 ती घटना जबरदस्त आहे आणि जगाच्या चिंतेत भर घालणारी आहे !  त्या दिवशीही मला सलाईन लावलेलेच होते. मी आणि माझी पत्नी बोलत होतो . दुपारची वेळ होती . बोलणं थांबलं . मी क्षणभर डोळे मिटले ...आणि मला जे दिसले ते फार भयानक होते ! माझ्या रूमच्या समोरच्या रूममधून एक जगभरात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी बाहेर पडतांना दिसला ! त्याची पँसेजमध्ये पडणारी पावले मी पाहिली ! पिवळसर सफेद झब्ब्यातल्या त्याला मी स्पष्ट पाहिले ! अवघ्या काही फुटांवरून चालतांना !  त्याच्या चेह-यावर गूढ स्मित होते ! मला या स्मिताचा अर्थ दोन तीन दिवसांनी तो त्याच्याच देशाच्या नजरकैदेतून सुटल्याची बातमी टीव्हीवर पाहिली , तेव्हा कळला ! माझ्या पत्नीलाही या प्रकाराने धक्काच बसला ! पुढे होणा-या घटना मला आधी अगदी जागेपणीसुध्दा दिसतात , यावर आता तिचाही विश्वास बसू लागला होता !

तर पहिल्या परिच्छेदातली ताजी घटना सांगतो . 10 जानेवारी 2018 ला मी माझ्या एका काकांच्या घरात एका खोलीत उभा दिसलो . वेळ रात्री 08 ते 09 ची असावी .  माझ्यासमोर माझे काका अंथरूणावर बसलेले आणि त्यांचे कुटुंबीय अंथरूणात आडवे झालेले दिसले . मी तिथे गेलो तेव्हा ते आपसात बोलत असावेत . मला एवढेच दिसले की माझे काका माझ्याकडे कटाक्ष टाकीत आहेत . ते खूप बारीक झालेले माझ्या लक्षात आले आणि माझी लिंक तुटली . प्रत्यक्षात माझ्या त्या काकांचे निधन होऊन दोन वर्षे झालेली आहेत . मयत काका जिवंत परंतु अतिशय बारीक  दिसले . असं कसं दिसलं असावं , याबद्दल माझी व पत्नीची चर्चा झाली आणि स्मरणकेंद्रात पडून राहिलेल्या काही घटना अशा अचानक डोळयासमोर तरळतात , असे आम्ही दोघेही म्हणालो . मला पटत नसूनही झोप महत्वाची असल्याने मी चर्चेला पूरणविराम देऊन झोपी गेलो . पण मला काही तरी खटकत होते . मला भीती वाटत होती . काही तरी होणार , अशी मी मनाशी खूणगाठ बांधली होती . झालेही तसेच . मात्र मी शहरामध्ये माझ्या कामात काहीसा व्यस्त असल्याने मी काहीसा गाफील झालो होतो . पण घडणारे घडलेच होते . दुपारी 03.15 ला मला माझ्या एका शेजा-याचा फोन आला . बातमी वाईट होती . माझ्या मित्राच्या पत्नीचे निधन झाले होते ! काल डोळयासमोर मयत काका जिवंत दिसले होते आणि आज जिवंत वहिनी मयत झाली होती . ती नेमकी त्या काकांच्या मागच्या बाजुच्या लगतच्या घरातलीच ! ती बरीच वर्षे आजारीच होती आणि खूप बारीकही झाली होती ! माझ्या मनात ते काकांचे बारीकपण घोळू लागले आणि सगळी उकल झाली ! मी माझे काम गुंडाळले आणि तडक मित्राचे घर गाठले !