Sphoot lekhan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sphoot lekhan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !

 आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !

परवा निवेंडीवाडीच्या शाळेत वह्या वाटप करण्यासाठी गेलो होतो. सौ. निरजा शेट्येला तिच्या घरून‌ गाडीत घेतलं. ती ग्रामपंचायत सदस्य आहे. निवेंडीवाडीची शाळा तिनेच सुचवली होती. तिने तिथली अधिक माहिती असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्या सौ. भरणकर यांनाही वाटेत सोबत घेतलं.‌ त्या असल्याने प्रवास योग्य रस्त्यावरून झाला. पाऊस सुरूच होता. वाट बिकट होती. निरजाचा भाऊ निलेश‌ पेडणेकर गाडी चालवत होता. त्याने गाडी सफाईने चालवली. शाळेच्या थोडं पुढे गाडी पार्क करावी लागली. आम्ही चौघेही पाऊस थांबण्याची वाट पहात बसलो.‌ दहा मिनिटे वाट पाहूनही पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसेना. माझी एकमेव छत्री कारमध्ये होती. तिचा आधार घेऊन एकाने शाळेत जावे , मग कोणी जावे , वह्या आणि छत्री एकाच वेळी कसे धरायचे आणि वह्या न भिजवता शाळेत कसे पोचायचे यावर पुढची पाच मिनिटे चर्चा करून झाल्या. आता काय करायचं याच प्रश्नावर चर्चेची गाडी पुन्हा थांबली. आम्ही उगाचच अडकून पडल्यासारखे झालो होतो. उगाचच टेंशन वाढले होते.  ते तिघे समस्येवर चर्चा करत होते आणि मी सोल्यूशनवर विचार करत होतो. मला उत्तरही सुचले. मी निरजाला म्हणालो, शाळेत फोन कर आणि मुलांना छत्र्या घेऊन पाठवायला सांग. झाले, तिच्याकडे मुख्याद्यापकांचा नंबर असल्याने, त्यानुसार तिने फोन केला आणि चार मिनिटातच चार मुलं छत्र्या घेऊन गाडीजवळ आली.  आम्ही आणि वह्याही शाळेत सुखरूप गेलो ! थोडक्यात, परिस्थिती आपण कशी घेतो हे फार महत्वाचे असते.

अशाच घटना अनेकदा आयुष्यात घडतात. ही घटना तर किरकोळ होती, पण त्यावर चर्चा किती मिनिटे  झाली ! मनाचा गोंधळ किती उडाला ! घटनेची सुरूवात हा घटनेचा सुरूवातीचा बिंदू . पण हा एकच बिंदू रहात नाही. या एका घटनेतून पुढे अनेक घटना घडू लागतात. हेच तुमचे कालचक्र असते. जीवन असते. अशा अनेक घटनांचे बिंदू पुढे सरकत राहतात. याच बिंदूंची एक रेषा बनते. कोणत्याही घटनेच्या सुरूवातीपासून निघालेली ही रेषा पुढे पुढे होत जाणाऱ्या घटनांना घेऊन पुढे सरकत राहते. तेव्हा आपण सावध झाले पाहिजे. ही रेषा कुठपर्यंत जाईल , तिची दिशा काय असेल याचा विचार सर्वसामान्य माणूस करत नाही. असं काही असतं हेच मुळी त्याच्या गावी नसतं. आपण काही घडलं की हबकून जातो. आपला गोंधळ उडतो. आपण विचार आणि विश्लेषण करत नाही. शक्याशक्यता पडताळून पहात नाही. आपण जे जीवन जगतो किंवा आपल्या वाटेला जे काही जीवन म्हणून येतं , त्या सर्व शक्यता असतात. त्या आधीपासूनच अस्तित्वात असतात. आपण त्यांना कुठे तरी भेटतो. नकळत सामोरे जातो. कोणत्या तरी अक्षांश रेखांशांवर ही भेट होते ! जे काही घडायला सुरूवात झाली आहे त्यात हे पण घडू शकते , घडेल ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही ! आपण अक्षांश रेखांशही काल्पनिक समजतो. पण इथे काहीच काल्पनिक नाही. ते अगोदरपासूनच अस्तित्वात असते म्हणून तर त्याचा विचार मानवी मेंदूत येतो. काही काळाने सत्य समोर येते पण तितका काळ खोटे असतेच ! काही काळ का होईना ; खोट्याचेही अस्तित्व असतेच ! थोडक्यात , शक्यतांचं अस्तित्व आधीपासूनच अस्तित्वात असतं. याचाच उपयोग करून काही जण प्रकरणांचा छडा लावतात ! आपण आपल्या आयुष्यात नवीन घटना घडायला सुरूवात झाली की ती चांगली असेल तर आनंदून जातो आणि वाईट असेल तर गोंधळून जातो. समस्यांमुळे तर आपण खचून जातो . स्वतःला स्थिर न करता अधिकच अस्थिर करतो . आपल्याला काही समजेनासं होतं. छोट्याश्या समस्येला आपण पार शनीच्या पीडेपर्यंत भिडवतो ! आपलं असं होणं हे अगदी स्वाभाविक असतं. हे असं का होतं ? एक तर मागील पिढ्यांनी वारंवर भीतीचे संस्कार केलेले असतात आणि दुसरे असे की आपलीही चूक होते ! आपण एखादी घटना कशी घेतो यावरच खरे तर तिच्या आपल्यावरील होणाऱ्या मनोकायिक परिणामांची तीव्रता व व्याप्ती अवलंबून असते. साधीच घटना घ्या. केळ्याच्या सालीवरून आपण घसरून पडलो तर आपणही हसतो की चार लोक आपल्याला हसले म्हणून आपल्या मनाला ते खूपच लागते ? खरं तर ही क्षणिक घटना असते. पण मनाला लावून घेतले तर त्या क्षणिक घटनेतूनही अगदी मारामारीचे प्रसंगही जन्म घेतात. थोडक्यात, आपण परिस्थितीच्या किती आहारी जातो , भावनेच्या भरात कसे अविचाराने वागतो , कसा विवेक हरवून बसतो , हे इथे लक्षात येते. इथे आपण हसत हसत उठून पुढे चालत गेलो असतो तर ते हसणारे लोक कधीच मागे पडले असते आणि आपल्यालाही त्या घटनेचा लगेचच विसर पडला असता. प्रकरण हातघाईवर येऊन राडा झाला नसता. शनीच्या पीडेचा तर मनास विचारही  शिवला नसता ! थोडक्यात , आपण परिस्थितीच्या दडपणाखाली येतो. परिस्थितीचा समतोलपणे विचार करत नाही . बरेचदा, परिस्थिती चुकीच्या पध्दतीने घेतल्यामुळे आपण दुष्टचक्रात सापडतो. स्वतःवरचा विश्वास हरवून वेगळ्याच मार्गाला लागतो . हे बदलता येतं . फक्त त्यासाठी आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे असते.


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

स्फूट लेखन ७





दंतकथा पसरवणे हे आपले जुनेच काम आहे. दंतकथा मार्फत कोणाला तरी महात्मा बनवलं किंवा कसली तरी भीती समाजमनावर घातली की पिढयांपिढयांची सोय झालीच म्हणून समजा. खूप डोकं चालवलं बघा काहींनी !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

.............

माझे आॅफीसला उशिरा जाणे...


एके दिवशी मला आॅफीसला जायला उशिरा झाला. बाॅस जाम उखडला. दहा मिनिटे तो ताडताड तोंडसुख घेत होता. मी शांतपणे उभा होतो. मला माहीत होते मिस. राधिका अजून आली नव्हती व ती येण्याची वेळ झाली होती. तेवढ्यात तिच्या हाय हिल्सचा टाॅक टाॅक आवाज व्हरांड्यात आलाच. मी बाॅसला बोललो , सर राधिका आताच येतेय. तोपर्यंत ती लचकत मुरडत , पर्स हेलकावीत आमच्यासमोर येऊन उभी राहिलीही ! वर मधाळ हसत ती गुड मॉर्निंगही म्हणाली ! त्याचक्षणी मघाशी दहा मिनिटे मला ताडताड बोलणारा बाॅस माझ्याकडे न बघता यू टर्न घेऊन त्याच्या केबीनमध्ये अंतर्धान पावला ! विषय कट !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०३.२०२१    

............


भाईकाकांची रीतच न्यारी

अंधश्रद्धेला पडले लय भारी !


आमचे भाईकाका एकदम कडक माणूस. फक्त विमलाकाकींपुढे ते थोडेफार नरम पडायचे. काकींनी एकदा श्रध्दापूर्वक एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. काकांनी नाईलाज होऊन परवानगी दिली खरी. पण त्यांच्या मनात काही तरी घोळत होतं. वेळ रात्रीची होती. कार्यक्रम सुरू झाला. काकींनी चुलीत जाळ केला. धुपारटयात निखारे घेतले. त्यात धूप टाकला. धुपारटयासह त्या आत आल्या. सर्वत्र धूप पसरला. त्यासरशी काही एक महिला घुमू लागली. तिच्या अंगात आले होते.‌ थोड्याच वेळात आणखी महिला घुमूडोलू लागल्या. भाईकाका शांत चित्ताने पहात होते. ते चुलीकडे गेले. एका भांड्यात दोन तीन निखारे घेतले. झाकण लावून ते आत आले. तोपर्यंत घुमते जोरावर आले होते. जास्त घुमणाऱ्या बाईने विचारा काय विचारायचे आहे ते, असं म्हणताच काकांनी तू कोण आहेस, असं विचारलं. ती म्हणाली मी देव आहे. काका म्हणाले, सांग माझ्या हातात काय आहे ? तिने डोळे किरकिरे करून डबा म्हणून सांगितले. लोकांनी हात जोडले. डब्यात काय आहे, या प्रश्नावर ती अधिकच घुमू लागली. आरडाओरडा करू लागली. भाईकाका म्हणाले , सांग लवकर. ती काही सांगेना. भाईकाकांनी तिला हात पुढे करायला सांगितले. म्हणाले, देवा, तूच बघ काय आहे ते, असं म्हणत त्यांनी पटकन झाकण काढून निखारे देवाच्या हातात ओतले. देवाचे घुमते तिथेच थांबले आणि देव खरोखरचा आरडाओरडा करू लागला. काकींनी बर्नाॅल आणले आणि लावले. तोपर्यंत एकीमेकींचं बघून जोरजोरात घुमणाऱ्या आणि किंचाळणाऱ्या सर्व महिला तिथून गायब झालेल्या होत्या. भाईकाका शांतपणे सारं बघत बसले होते. त्यांच्या मनात घोळणारं हसू आता त्यांच्या गालावर पसरलं होतं.‌


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१     

.....................


देवाला जन्माला घालणारा माणूस 



                   देवाला जन्माला घालणारा माणूस मला सापडला ! तो चार अनुयायांना म्हणत होता , " मित्रांनो , हे विश्व कुणी निर्माण केले हे कुणालाच कळलेले नाही . अनेकांचा हातभार ह्या निर्मितीला लागला असणार . पण एकाचा वा अनेकांचाही शोध घेणे जमणारे नाही . असंख्यांची जंत्री करण्यापेक्षा हे विश्व कुणा एकानेच निर्मिले असे जाहीर करावे असे मला वाटते . "


                   यावर त्या चौघांनी सवयीनुसार माना डोलावल्या . यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला दूर निघून गेले . आपण हात जोडले, माथे टेकले आणि भक्तीत दंग झालो !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१

.....................


झाकली मूठ सव्वा लाखाची !


  देवाला जन्माला घालणारा तो म्होरक्या पुढे सांगू लागला , " असेही आहे की तो एक कोण आहे , कुठे आहे , कसा दिसतो हे प्रश्न विचारले गेले तर आपल्याला त्यांची उत्तरेही देत येणार नाहीत . यापेक्षा तो अदृश आहे असे सांगितल्याने हे सर्व प्रश्न आपोआपच संपुष्टात येतील ! ज्यांना शोध घ्यायचा असेल ते आयुष्यभर शोध घेत राहूदेत ! आपल्यापुरता हा प्रश्न आता कायमचा संपला आहे. हे विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे , तो सर्वशक्तिमान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो अदृश्य आहे , एवढेच आपण सांगायचे आहे . झाकली मूठ सव्वा लाखाची असते , एवढेच लक्षात ठेवा ! काय ? "


               यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला पुन्हा एकदा दूर निघून गेले . 


................


       एक माणूस स्वत:ला चौघांचा पुढारी म्हणवून घेत होता . तो त्यांना सांगत होता : " दोस्त हो , परमेश्वर मीच आहे ! तेव्हा माझ्या छत्राखाली या . जे येणार नाहीत ते माझे असणार नाहीत आणि जे माझे असणार नाहीत त्यांचे अस्तित्व सन 2021 नंतर राहणार नाही ! काय ? चला , लागा कामाला ! "



             गम्मत म्हणजे याही " काय ? " वर अनुयायांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ते माना हलवीत त्यांना सापडलेल्या परमेश्वराचा प्रसार करायला निघून गेले. ही बातमी आधुनिक मिडियाने पकडली आणि टीआरपी वाढवण्यासाठी दर तासांनी ब्रेकिंग न्यूजची सीडी लावून दिली !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१

..............

करणारे आणि ( ओरड ) करणारे 


सभेत जोरदार धूम:चक्री झाली. नेहमीचेच आरोप प्रत्यारोप झाले. सेक्स रॅकेट, बलात्कार हेच विषय होते. अखेर गुन्हेगारांना शासन केले जाईल या ग्वाहीवर ओरडणारे शांत झाले. त्यांना माहीत होते की जास्त ताणलं तर त्यांचीही लफडी वर आणली जातील. परवाच एकाने काॅमेंट केली होती. सेक्स रॅकेटबद्दल पण लिहा. खरं तर हे काही प्रथमच घडलेलं नाही. काही वर्षांपूर्वी शहरातल्या नामांकित शाळेच्या सहावी सातवीतल्या मुलांचं सेक्स रॅकेट गाजलं होतं. त्यावेळी करणारे आणि ओरड करणारेही वेगळे होते. त्यावेळी काॅमेंट करणारा कितवीत होता कोण जाणे ! आज करणारे आणि ओरड करणारे यांच्या केवळ जागा बदलल्या आहेत. सर्वोच्च अतीसभ्य संस्कृतीचे विकार तेच राहिले आहेत. जागा बदलून, सोयीनुसार आरडाओरडा करून उपयोग नाही. हे सर्व का होतं याचा विचार करून त्यावर उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. एकमेकांचे विरोधक बनण्यापेक्षा गुन्हेगारीवर एकत्रित काम झाले तर उत्तम. 



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०४.०३.२०२१

............................


माणूस हतबल झाला की त्याला काही सुचत नाही. तो सैरावैरा धावू लागतो. बुडत्याला काडीचाही आधार मिळत नाही. दररोज संकटांमागून संकटे येतात. अशा वेळी बहुतेक अखेरची आशा म्हणूनही तो भगत, बुवा , बाबा यांच्याकडे वळत असावा. नाईलाजाने अंधश्रद्ध होण्यावाचून त्याला पर्यायही रहात नसावा. याबाबत माणूसकीने पावले उचलली पाहिजेत.‌


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०६.०३.२०२१

............................

आपल्या मुलाचा विवाह करून देणे ही आई-वडिलांची प्रामाणिक ईच्छा असते. पण सगळयांच्याच जीवनात हे घडत नाही. काहींच्या मुलांची लग्नेच होत नाहीत. काही मुलेच स्वतंत्र निर्णय घेतात. काही आई वडिलांचेच मत वेगळे पडते ! काहीही असले तरी एक आंतरिक प्रामाणिक तळमळ पूर्ण होत नाही. त्या आई-वडिलांना व मुलांनाही काय वाटत असेल ! आयुष्यभर ते ह्या दु:खातून बाहेर पडू शकत नाहीत, हे त्यांचे दुर्दैव आहे ! यातून सर्वमान्य, सर्वांना आनंद देईल असा मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. वस्तु:स्थितीदर्शक व वास्तव विश्लेषण करून किमान उचित निर्णय घेणे आवश्यक आहे. 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०७.०३.२०२१

............................


काळाने खिंडीत गाठले आहे. काळ बेरकी गोलंदाज आहे. तो फिरकी टाकत नाही ; तर माझी फिरकी घेतो आहे. कालपरवापर्यंत मी त्याचा प्रत्येक चेंडू छान टोलवत आलो. सरळ , साधे जगत आलो. त्या लबाडाच्या हातून सतत निसटत आलो. तेल लावलेला ( किमान दुसऱ्या क्रमांकाचा तरी ) पैलवान ठरत आलो ! याचा राग त्यांने मनात ठेवला होता. आता ऐन साठीत त्यांने पाठीत घातलेल्या दणक्याने कात्रीत सापडलो आहे. रोजच कोंडमारा होतो आहे. मनावर घेऊ नका मित्रांनो. कधी तरी मी चिडेन आणि काळालाही भिडेन ! कारण अनेकदा, 


     माझ्यात बांधल्या मी पक्क्या अजिंक्य भिंती !

     माझी मला दिली मी सारी इथे उभारी !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०९.०३.२०२१

............................


मन लागो रे लागो रे...


एका ठिकाणी महिलांचे भजन सुरू होते . मन लागो रे लागो रे...भजन सम्राज्ञी लागो रे लागो रे , हे लागोरे लागोरे असे जोडून तल्लीन होऊन गात होती. शेजारीच भांडण सुरू होते. एक म्हातारी कुणा तरी बाईला म्हणत होती , लागोरा रांडू... विषय कट ! 



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०३.२०२१

............................

कोमावारसाहेबांनी मला गायकवाड साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटायला या असा निरोप द्यायला सांगितला. आॅफीस सुटण्याच्या वेळेलाच मी तिथे गेलो. दरवाजा बाहेरच बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते : फक्त सुपरिटेंडेंटनाच भेटून आपले म्हणणे सांगा. मी साहेबांना ओळखत नव्हतो. दबकत दबकत मी सुपरिटेंडेंटसमोर उभा राहिलो. टेबलावरची नेमप्लेट न बघताच मी बावळटपणाने इथे गायकवाड साहेब कोण ? असे विचारले. ते म्हणाले, " मीच. काय काम आहे ? " मी नेहमीच्या आवाजात कोमावारसाहेबांनी आपल्याला भेटायला बोलावलंय , असं सांगितलं. ते म्हणाले , " बसा, बसा , बसा. हळू बोला. " बसल्यावर मी पुन्हा आॅफीस सुटल्यावर बोलावलंय, असं सांगितलं. ते थोडे थांबले आणि माझ्याकडे बघत म्हणाले, " चेहऱ्यावरून तुम्ही कवी वाटता." मी उडालोच. त्यांनी अचूक कसे काय ओळखले हा प्रश्नं मला पडला. ते पुढे म्हणाले, " तुम्ही जा आणि त्यांना येतो म्हणून सांगा. आणि हो, असे निरोप हळूच सांगा. तुम्ही भाबडे आहात म्हणून सांगतो. " पुढेही या दुनियेचे व्यवहार कळायला मला खूप वर्षे लागली, हे सांगायला नकोच ! विषय कट !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०३.२०२१

............................


तुमच्याकडे कसं आहे ?


कुटुंबात तीन माणसे. तो, ती आणि मुलगा. तो मोबाईल मध्ये मग्नं. ती एकाच वेळी मोबाईल आणि टीव्हीमध्ये मग्नं. मुलगा मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये मग्नं. जुनी माणसं उगाच म्हणायची, " घरात माणसं असली तरच घराला घरपण असतं " . आता माणूस घरातल्या घरात जवळ असूनही दूरपण असतं ! विषय एवढाच ! बाकी तुमच्याकडे कसं आहे ?

 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०३.२०२१

............................

बबन एवढंच म्हणाला, बंड्याने अजून वाडीचा ग्रूप बनवला नाहीय. बबनची बायको लगेच म्हणाली, तुम्ही त्या टीव्हीवाल्याला आणि गिझरवाल्याला किती दिवस फोन करताय ! बबन गप्प ! 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२६.०३.२०२१

...........................

शाळेत जायच्या आधीच आई मला शिकवायची‌ . बबन कमळ बघ, हे मी छप्पन्न वर्षांपूर्वी वाचलेलं आणि लिहिलेल़ही पहिलं वाक्यं. काही कालची पोरं मी आजच कमळ बघतोय या समजूतीत आहेत म्हणून सांगितलं इतकंच 😁😁😁😁😄😄😀😀


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०३.२०२१

...........................

बागूलबुवा


लहानपणी अनेकांना त्यांच्या आज्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भीती घातली असेल. ते आता आजी-आजोबा झाले तरीही आज्ज्यांऐवजी मनावर भीती घालणारी यंत्रणा कार्यरत आहेच. अनेक गोष्टींचा बागूलबुवा आजही उभा केला जातो आहेच. समाजमाध्यमांचा यासाठी मोठ्या धूर्तपणे उपयोग केला जात आहे. एकूण काय , आपण कोणत्याही काळात दहशतीखालीच रहायचे. कोणाला ना कोणाला तरी घाबरूनच रहायचे. कुणी चुकून मुक्त जगा म्हटलंच तर तेही दबक्या आवाजात म्हणायचं. अनावश्यक भीती जनमानसावर घालणाऱ्यांचं काय करायचं हा प्रश्नंही कुठेतरी दबला जात असावा, असं वाटतं ! 

...........................

१९.०४.२०२१ : 


परवा एकाचा फोन आला. म्हणाला, तो मेसेज वाच. त्याचा मेसेज एका मंत्राच्या उच्चारणामुळे होणाऱ्या फायद्यांचा होता. मी म्हटले, वाचला. तो खूष झाला. चार दिवसांनी मी त्याला एक मेसेज पाठवला. चांगले वागण्याचे फायदे. मी पण फोन केला. म्हटले वाचलास का ? तर म्हणे , " अरे कुठचा वाचतोय ! बघितलाच नाहीय. सकाळपासून घरात भांडणं, शेजाऱ्यांशी पण भांडणं चाललीयत नुसती. " मी विषय सोडून दिला. 


...........................


          जास्त बोलण्यामुळे सिम्पेथिटेक नससंस्थेवर परिणाम होतो. एक तास बोलण्यामुळे पाच तास शारीरिक कामासाठी लागणारे रक्त व स्नायूंची शक्ती खर्च होते. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे हे ताणास निमंत्रण देण्यासारखे असते. 

...........................


२०.०४.२०२१

युगे युगे मी संभ्रमी ! 


कुछ तो गडबड हैं दया...दया दरवाजा तोड दो...दया...दरवाजा तोड दो....

या डायलाॅगची उगाचच आठवण येते...खरंच उगाचच असेल का हो ? दरवाज्याच्या आत खरेच कोरोना असेल का ? की काही नवीनच वाढून ठेवलंय तिथे ? रात्रीस खेळ चाले सुरू आहे. रघू सांगतोय, " तो आसा, तो बघताहा ! " खरेच तो आहे ? बघतो आहे ? घेणार आहे का जबाबदारी ? यापूर्वी तीन चार वा जास्त वेळाही असले भयावह आजार आणि संकटे जगावर कोसळलीयत राव ! सगळ्यांचा शेवट असाच... काय वाढून ठेवलंय पुढे , हा प्रश्नं प्रत्येक वेळीच उपस्थित झाला आहे. आजही ओठांवर येतोय. राजकारण करणारे राजकारणच करीत आहेत. लढणाऱ्यांचा अभिमन्यू होत चाललाय. प्रत्येक वेळी हे असेच का होत आहे ? सत्य नक्की काय आहे ? की मी आपला युगे युगे संभ्रमीच ? 

...........................

काही माणसे इकडचं तिकडे करण्यासाठीच फिरतात. दुसऱ्याकडे जायचे, तिसऱ्याचा साळसूदपणे विषय काढायचा. दुसरा काय बोलतो ते कानांत साठवायचे आणि तिसऱ्या चौथ्याकडे जाऊन आपले चार शब्द त्यात घालून आग लावून द्यायची. हेच यांचे छुपे उद्योग. काहींची प्यादी म्हणूनही ही मंडळी काम करतात. काही लोक तुमच्याशी गोड राहतात, पण तुमच्या मागे अशा प्यादयांचा वापर करून तुम्हांला उपद्रव देतात. तुम्हीच जर हलक्या कानाचे असाल आणि सहज हुकसवले जाऊ शकत असाल तर मग प्यादी आणि त्यांच्यामागे लपलेले उपद्रवी यांच्या हातात आयते कोलीत देता. माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर ते जाळीतच सुटणार. आग लागली. विषय संपला.


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०४.२०२१

............................

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

स्फूट लेखन ६

 जीवन शिक्षण


शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात. संवाद, वादविवाद आणि मग वाद होतात. स्थानिक राजकारण आणि समाजकारण यांचे व्दंव्द यात हिरीरीने भर घालते. शैक्षणिक विकास हा विषय कधीच गायब होतो. उरतात ते आरोप प्रतीआरोप आणि वैयक्तिक हेवेदावे ! सामाजिक विषय वैयक्तिक पातळीवर हमरीतुमरीवर येतो. पूर्ण वेळ शाळा अर्धवेळ होत होत अखेर बंद होते. पिक्चर संपता संपताच पुन्हा सुरू होतो. पालक मुलांना दुसऱ्या शाळेत घालतात. तिथेही शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात... पूर्णवेळ.. अर्धवेळ.. .. होत....तीही शाळा अखेर बंद होते आणि हाच पिक्चर ठिकाणं बदलून चालूच राहतो ! पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१


.................

जलद, विश्वसनीय सेवा...जगभर


मुंबईहून आठ तारखेला कुरीयर केलं गेलं. केल्याची कुरीयरवाल्याची स्लीप मला कुरीयर करणाऱ्याने लगेच व्हाॅटस अॅपवर पाठवली. कुरीयर किमान तिसऱ्या दिवशी येणे अपेक्षित होते. तीन दिवस फोनवर नकारघंटा ऐकून चौथ्या दिवशी कुरीयर आॅफीसलाच गेलो. तिथल्या माणसाला स्लीप दाखवली. म्हटलं आज चौथा दिवस उजाडला. एक लखोटा यायला एवढे दिवस लागतील असं वाटतं नाही. तसा आतला दुसरा माणूस बोलला , लखोटा आहे का, मला पार्सल बोलले होते. लखोटा बघतो हा. मी आशेने हो म्हणालो. पण दोन मिनिटे शोधून तो मान हलवत नाही म्हणाला. मी निराश ! तसा पहिल्या माणसाने मुंबई आॅफीसला फोन लावला. स्लीपचा फोटोही व्हाॅटस अॅपवर पाठवला. मुंबईवाला बोलला बघून सांगतो. मी म्हटलं आम्ही सांगून बघितलं, तू बघून सांग ! मी थांबतो. पंधरा मिनिटे झाली तसा समोरचा माणूस बोलला, तुमचा नंबर द्या, मी फोन करतो. नंबर देतांना माझं लक्ष समोरच्या बोर्डाकडे गेलं. त्यावर जाड ठसठशीत ठळक अक्षरात छापलं होतं : जलद, विश्वसनीय सेवा...जगभर ! मी जग विसरून जलदगतीने घर गाठलं !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

विषय कट !


पोरं कसली तरी वर्गणी गोळा करीत होती. नेमके त्याचवेळी त्यातल्याच कुणाच्या तरी मोबाईलवर गाणे सुरू होते : " तुझ्या नामाचा व्यवहार ..." . विषय कट !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

देवळासाठी निधी संकलन


काही वर्षांपूर्वी गावातील देवळासाठी निधी संकलन करीत होतो. मी देवळाच्या शेजारीच राहतो. शेजारधर्म म्हणून मीही पावती पुस्तक घेऊन शहरात गेलो. ओळखीचे लोक भेटत होते. कोणी पावती फाडत होते, कोणी बहाणे सांगून सटकत होते. एकाने कहर केला. तोही ग्रामीण भागात राहणारा होता. त्याचं गांव तर अवघ्या दहा किमी वर होतं. गावातली परिस्थिती त्याला चांगलीच माहिती होती . त्यामुळे मला वाटलं तो चांगलीच पावती फाडेल. मी देवाचे आभार मानले. झालं भलतंच. तो म्हणाला, " मी राहतो दहा किमी वर. तुमच्या गावच्या देवळाचा मला काय फायदा? मी तर तिकडे कधी येत पण नाही. " आणि तो निघून गेला. अवघ्या दहा किमी अंतरावरच्या माणसाची ही कथा !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०२.२०२१

.................


बाबू, ये पब्लीक हैं !


मांजर भलेही चोरून दूध पितांना डोळे झाकत असेल; पण ते दूध पितानाचा चपाचपा किंवा पचापचा येणारा आवाज काही थांबवू शकत नाही. जग उघड्या डोळ्यांनी ( आणि कानांनी पण ! ) बघते ! बाबू, ये पब्लीक हैं , सब जानती हैं ! बोलो हैं ना ...?


   अरे हो, 💞💞 हॅपी व्हॅलेंटाईन डे !💕💕


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०२.२०२१

.................

गांवपॅनेल : लोकशाहीची नवी दिशा


नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी गांवपॅनेल्सनी बाजी मारली. गांवपॅनेल्सचा हा प्रवास राजकीय पाठिंब्यावर की अराजकीय लोकमतातून झाला हे पाहणे आवश्यक आहे. राजकीय पाठिंब्यावर निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्या व पूर्णत: अराजकीय लोकमतातून निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्याही अभ्यासली जाणे आवश्यक आहे. गांवपॅनेलला विरोध झाला का आणि झाला तर तो पक्ष , काही राजकीय / अराजकीय लोक की दोन्हींकडून झाला , हे पाहणेही आवश्यक आहे. तसेच गांवपॅनेल्सच्या पुढील प्रवासाबाबतही विचारमंथन झाल्यास ते महत्त्वाचे ठरेल. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०२.२०२१

...................

जया

आज त्याची आठवण आली. सुधरीन वहिनी सौ.ला कुवरी खातेस काय म्हणून विचारत होती. जया अशाच कुवऱ्या विकायला यायचा. तो माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. जया घरंदाज कुटुंबातला मुलगा. केवळ दारू प्यायला पैसे हवेत म्हणून दारोदारी कुवऱ्या विकायचा. माझ्या लग्नापूर्वीची ही सत्यकथा आहे. अखेरीला त्याची हालत बघवत नव्हती. दारूने त्याला पोखरलं होतं. खूप वाईट वाटायचं. आम्ही कधी कधी कुवऱ्या घ्यायचो. तो मागेल ते पैसे द्यायचो. जया ढोल खूप छान वाजवायचा. पण शिमग्यात ढोल वाजवण्यावरून त्याच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. खरं तर तेव्हा माऱ्यामाऱ्या हा ट्रेंडच होता. आता बरीच सुधारणा झाली. जया आता असता तर सुधारला असता का, हा विचार मनात येतो. 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०२.२०२१

...............


आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

काही वेळा आपल्याला चांगली परिस्थिती मिळते. तिचा उपयोग जीवन अधिक चांगले करण्यासाठी आपण किती करतो, हे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन इथून पुढे सुखी झाले पाहिजे, ही आपली प्रामाणिक ईच्छा असली पाहिजे. यासाठी वास्तवतेने विचार केला पाहिजे. मिळालेल्या छान परिस्थितीचा लाभ कसा घ्यायचा हे लक्षपूर्वक तपासले पाहिजे. आताची एक चूक सुंदर वर्तमान आणि भावी जीवन , दोन्हीही उध्वस्त करू शकतात.‌ इथे भावनेने नव्हे तर वास्तव विचार केला पाहिजे. असे केले तर काय होईल, तसे केले तर काय होईल, हे कागदावर निरपेक्षपणे मांडले पाहिजे. उत्तर मिळेल. वास्तव निर्णय घेतला तर आहे ती परिस्थिती आणि पुढचीही परिस्थिती चांगली राहीलच. पुढचे आयुष्य अधिक सुंदर होईल. आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०२.२०२१

...............


मी नाही त्यातली ....


सार्वजनिक अव्यवस्थेबद्दलचा काहींचा पुळका हा तात्कालिक विरोधासाठी किंवा फायद्यासाठी असू शकतो. सोयीस्कर असू शकतो. म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे ! अगदी नालायक कार्टे ! अंदरकी बात अशी असते की त्याच नालायक कार्ट्याशी विरोधकांची आतून व्यावसायिक भागीदारी पण असू शकते ! म्हणजेच साळसूदपणे वरून कीर्तन, आतून तमाशा ! त्यामुळे विरोधही , खबरदारी घेऊनच , तुटणार नाही अशा पद्धतीनेच होतो. कारण दोघांची लफडी दोघांना माहीत असतात. तंगडयात तंगडी, लंगडयात फुगडी चालतेच ! मी नाही त्यातली , कडी घाला आतली , यातलाच हा सोज्वळ प्रकार ! आता भ्रष्टाचार निर्मूलन कसे करायचे ब्बा ! 😃😄😃😄 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०२.२०२१

..............

देवाक काळजी 

हतबल सामान्य माणूस देवाक काळजी असं म्हणून सगळं देवावर सोडून देतो आणि देव म्हणतो, ही तुझी लढाई आहे, तू लढ ! वर फळाची (म्हणजे जिंकण्याचीही) ईच्छा धरू नकोस असं सांगतो ! काय करावं बा, चांगल्या सामान्य माणसांनी ?


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

...............

एका लग्नाला गेलो होतो. कोरोनाची दाट छाया कुठेही जाणवत नव्हती. सोशल डिस्टंसिंगवगैरे काही भानगड नव्हतीच. काहींनी मास्क घातले होते. काहींचे मास्क गळ्यात टांगलेले होते. काहींनी नियमानुरूप ठेवले होते. महिलावर्गाची काहीशी गोची होत होती. मास्क सौंदर्याला मारक की तारक हा त्यांच्याबाबतीत संशोधनाचा विषय होता. लग्नं लागलं . आईस्क्रीम आलं. त्यासरशी माझ्यासहीत होती तीही मास्क गळ्यात आलीत. विषय संपला !

....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

................

२५.०२.२०२१

वाह वाह वाह....सगळेच शेर अप्रतिम...

किती खुल्या मनाची असतात नाही माणसं ! पटकन दाद देऊन मोकळी होतात.‌ ही खरी माणसं.‌ शेर पूर्ण व्हायच्या आधीच ह्यांची दाद पूर्ण झालेली असते. कवी महाराजांनाही आता सराव झालेला असतो आणि ते उफाळून येऊन कविता सादर करीत असतात. तेव्हाही त्यांच्या मनात आपल्यालाही दुसऱ्या कवींना अशीच दाद द्यायची आहे हा एकमेव उदात्त विचारच असतो. 

हा त्याला म्हणतो, तो हयाला म्हणतो . दोघांनाही दाद हवी, दुसरे काय ? ते ठराविक वर्तुळातले ' अखिल विश्व एकमेकांची पाठ थोपटू ' मंडळातले कवी असतात. त्यांची पाठ थोपटायला कोणी येतच नाहीत. मग कवी तरी काय करणार ! हा कवी असो वा तो कवी असो ; शेवटी कवीला दाद तर हवीच असते ना मित्रांनो ! देव जसा भावाचा भुकेला असतो तसा कवी (पित्ताच्या नव्हे !) दादीचा भुकेला असतोच की ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

Short stories - 5

 स्फूट


बंडखोर संतकवी


आठवीत होतो. कवितेचा तास होता. सर संत , पंत, तंत कवींबद्दल सांगत होते. संत कवींबद्दल सर म्हणाले संत कवी हे बंडखोर कवी होते. त्यांनी अन्यायावर कठोर शब्दप्रहार केले. झाले. सरांचे हे वाक्य माझ्या डोक्यात जाऊन बसले. माझ्या बुद्धीमान डोक्यात बंडखोरपणा शिरला. मला अन्याय दिसू लागला. शिक्षकही काही वेळा मुलांवर अन्याय करतात असे मला दिसून येऊ लागले. मी शिक्षकांविरूध्दच बंडखोरी करू लागलो ! अक्कल ठिकाणावर येईपर्यंत हे चालूच होते. तोपर्यंत शाळेत आणि शाळेतल्या तक्रारी घरी आल्याने घरीही बराच (+बौध्दिक!) मार पडला होता !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२१

...............................


काही तरी असेलच ना ?

परवा एकाकडे बऱ्याच वर्षांनी जायचा योग आला. घरात दोघंजणच दिसली. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोन मुलांपैकी एकही दिसेना. ती दोघंही मुलांबद्दल काहीच बोलत नाहीत हे लक्षात आल्याने मलाही विचारण्याचा धीर झाला नाही. अखेर मी निघालो. पण मनात एकच विचार आला म्हातारा म्हातारी ब्लाॅकमध्ये बंदिस्त. पंख फुटलेली पाखरे स्वाभाविकपणे उडून गेली असावीत. पण त्यांचा विषयही आई वडिलांनी का काढला नसावा ? काही तरी असेलच ना ? हसऱ्या चेहऱ्याआडही काही दु:खं असेलच ना ?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२

................................


फुटुराचा तवा


परवा शेजारणीची घरभरणी होती. घर म्हणजे चाळीस लाखांचा सुंदर बंगलाच तो ! स्विमिंग पूल नाही एवढीच त्रुटी फारतर ! बाकी तिच्यासारखाच भरभक्कम बंगला ‌. घरभरणी पण सुंदर झाली. कशात कमतरता नव्हती. पण शेजारणीला एक कमतरता जाणवलीच ! ती माझ्या सौ.ला म्हणाली, " मला प्रेझेंट म्हणून पाकीटातून पैसे घालू नकोस. तवा दे, तो पण फुटुराचाच दे ! " दिला. आम्ही हजार रूपयाचा फुटुराचा तवाच तिला प्रेझेंट म्हणून आणून दिला ! आमचे (मनातले !) आणखीचे हजार रूपये वाचले म्हणून आम्ही खूश आणि तवा मिळाला म्हणून शेजारीण खूश ! करना पडता हैं भाई !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.०१.२०२१

...............................


तावातावाने....


नोकरीत असतानाचा एक प्रसंग. एक कर्मचारी तावातावाने बोलत माझ्या टेबलसमोर उभा राहिला. मी शांतपणे त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. माझी ती पध्दतच होती. हो ना करता करता तो अखेर बसला. काय झालंय , एवढा का वैतागलायस , असं मी विचारता तो घुश्श्यातच बोलला, किती दिवस झाले माझं तुम्ही कामच करीत नाहीयत. हे काय चाललंय ? त्यावेळी मी नेमकं त्याचंच काम करीत होतो. मी कागद पुढे केले. हे बघ मित्रा तू यायच्या आधीच मी तुझंच तर काम हातात घेतलेलं आहे. यावर किंचित नरमून तो म्हणाला, होय पण किती दिवस लावलेत ? मी शांतपणे त्याला त्याच्या विभागाकडून माझ्याकडे त्याचा अर्ज पाठविल्याची आणि माझ्याकडे अर्ज आल्याची तारीख दाखवली. आजच माझ्याकडे अर्ज आल्याचं आणि मी आजच त्यावर कार्यवाही करीत असल्याचं बघून तो गडबडलाच ! आठ दिवस त्याचा अर्ज त्याच्याच विभागात होता हे बघून त्याने माझी क्षमा मागितली आणि धन्यवादही दिले. पुढच्याच क्षणी , मघाशी ज्या तावातावाने तो माझ्याकडे आला होता त्याच तावातावाने तो त्याच्या विभागाकडे भांडायला निघून गेला ! तिकडे काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०२.२०२१

....................

भविष्य जाणले कुणी ?

वास्तव ओळखूनही पुढे काय होणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. अनेकदा भविष्यात असेही होते, तसेही होते. सर्वसाधारण आकलन होऊनही तारूण्याच्या उर्मीमुळे वा बुध्दीला पडलेल्या भुलीमुळे मन मानत नाही. मन ऐकत नाही; बुध्दी चालत नाही अशी अवस्था होते ! हेलकावे खात खात शेवटी काही तरी निर्णय घ्यावाच लागतो. तो बरोबर निघाला तर आनंदच. पण  तो चुकीचा निघाला की वाईट वाटतेच, पण वेळ निघून गेलेली असते. दुर्दैव आहे ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०८.०२.२०२१

.........................................................

पोटदुखीसे मजबूर !

तो आज त्या पदापर्यंत पोचला तशी काहींची पोटदुखी जागी झाली. हा जगभरातला आजार. कायमचा. कोरोनापेक्षाही चिवट. काहींनी तो इथपर्यंत कसा पोचला याची खमंग चर्चा सुरू केली. कोण म्हणाला कोणाच्या तरी पाठी फिरून, तर कोण म्हणाला , बायकोचे योगदान आणि ते सारे छद्मी हसले. पण कोणीच म्हणाला नाही की तिथपर्यंत येण्यासाठी त्याने काय काय आणि किती किती सोसले ! किती वर्ष पड खाऊन काय काय भोगले ! त्याची ही किंमत कोणीच जाणली नाही. पोटदुखीसे मजबूर ! काय करणार !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

........................................................

डॅंबीस

" तो तसो चांगलो हाय, पण त्याच्याभवती जे हायत ना, ते डॅंबीस हायत " एक अशिशित खेडूत महिला एका राजकारण्याला सर्टिफिकेट देतांना म्हणाली. खरं तर, राजकारणात आता चांगलेपणाचा उपयोग आणि एकूणच राजकारणाची पातळी यातून सर्वत्र जे पसरायचे ते पसरले तर नवल नाही  ! आता हेच बघांना, जिने हे सर्टिफिकेट दिलं ते काय तिचं खरं मत थोडंच होतं ! तिला त्या नेत्याकडून पैसे उकळायचे होते ( तीच म्हणाली !) ! न जाणो तो पक्का डॅंबीस आहे हे तिचं खरं मत ती माझ्याशी बोलली आणि मी ते त्यालाच सांगितलं तर....या हुशारीने तिने सराईतपणे भाषा बदलली होती. गंमत म्हणजे तो नेता तिला अशिक्षित, अडाणी , गरीब बाई म्हणतो ! आता यात नक्की डॅंबीस कोण ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

................

रोजगार उद्योगाची गंमत


नुकतीच बातमी वाचली. सगळ्या योजना तालुक्यातील एकाच गावात राबवून तरूणांना रोजगारामार्फत उद्योगशील बनवायचे व एक आदर्श गाव तयार करायचा , ही  योजना एका चांगल्या संस्थेने सदहेतूने जनकल्याणार्थ जाहीर केली होती. पण जाहीर केलेल्या योजनेला शून्य प्रतिसाद मिळाल्याचे संयोजकांना जाहीर करून पुन्हा जाहीर आवाहन करावे लागले आहे.‌ बहुतेक तरूणवर्ग तालुक्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील काही 'उद्योगा'त गुंतवला गेला असावा ! कोण म्हणतो युवक बेरोजगार आहेत म्हणून आणि त्यांना 'उद्योग' नाहीत म्हणून ? 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

११.०२.२०२१

................

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

स्फूटलेखन ४

  मेघ भरून येतात तितका पाऊस कोसळतोच असं नाही. काही मेघ तर हुलकावणी देत न बरसताच पुढे निघून जातात. आपण पुन्हा वाट पहात राहतो ... वाट पाहणे एवढेच आपल्या हातात असते. ढगांवर कसली तरी फवारणी करून आपल्याला हवा तेव्हा पाऊस पाडण्याची स्वप्नें आपण स्वत:ला थोडीच दाखवू शकतो ! हे स्वप्नं दाखवणे वगैरे काही आपली मक्तेदारी नाही. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२३.०१.२०२१

..................


निसर्गात विविध घटकांमध्ये काही ना काही साम्य असणारच. माणसांसारखी माणसे दिसतात. नीट निरीक्षण केले तर झाडांसाठी झाडेही दिसतीलच. पण काही माणसे झाडांसाठी दिसणे शक्य आहे आणि काही झाडे माणसांसारखी दिसणेही शक्य आहे. दिसण्यात आणि वागण्यातही एकमेकांचे काही गूण आढळतात. जीव वाचवणारी माणसे आहेत तश्या जीव घेणाऱ्या वनस्पतीही आहेतच. मोठे मासे लहान माश्यांना खातात. हा महत्त्वाचा गूण माणसातही आहेच की. अशी दिसण्याची आणि वागण्याची बरीच साम्यस्थळे निसर्गात आहेतच. आज एका मित्राने गदेसारखे दिसणाऱ्या फुलाचा फोटो फाॅरवर्ड केलाय आणि याला हनुमान गदा फूल म्हणतात, असं लिहिलंय. सोयीस्कर ठराविक ठिकाणी संदर्भ जोडण्याचा गूणही माणसात पूर्वापार आहे. हा गूण निसर्गातही अन्य घटकांत असेल आणि ते घटकही त्यांना सोयिस्कर माणसांची नांवे कशाशी तरी जोडत असतील. काही सांगता येत नाही. इथून तिथून सगळं सारखंच दिसतंय. एकच तत्व आहे ना सगळीकडे. 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०१.२०२१

..................

काही माणसांना मोठेपणा देऊन त्याव्दारे स्वत:ची तुंबडी भरून घेता येते , हे काहींनी पुराणकाळातच अचूक ओळखले होते. ज्यांच्याकडून फायदा करून घेतला गेला ते देव म्हटले गेले. देव ज्यांना घाबरून असायचे त्यांना राक्षस म्हटले गेले. देव महात्म्यबध्द झाले. पूजेला लावले गेले. पण राक्षस संपले नाहीत. आता हे राक्षस सगळ्यांनाच छळतात. 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०१.२०२१

..................

मेस्त्री उवाच


एका मेस्त्रीला घराचं काही काम दिलं होतं. मध्येच चार दिवस तो गायब होता. या लोकांचं हे नेहमीचं असतं. ते तरी काय करणार ? आमच्या एका कामावर त्यांचं पोट भरत नसतंच. चार ठिकाणची कामं केली तरच त्यांचं आणि त्यांच्या हाताखालच्यांचं पोट भरणार. हे समजून मी शांत होतो. पण माझंही काम होणं आवश्यक होतं, म्हणून पाचव्या दिवशी सकाळी मी फोन केला. तो कामात असल्याने त्याच्या माणसाने फोन उचलला. मी विचा‌रलं कुठे आहात ? तर तो माणूस उत्तरला : मिऱ्यावर. मी म्हटलं , कोणाकडे ? तर तो चक्क म्हणाला, देवदास पाटलांकडे. माझा त्याने देवदास करून टाकलाच वर माझ्याच घरात काम करतोय म्हणून मलाच सांगत होता !  शेवटी मी देवीदास पाटीलच माझ्या घरातूनच बोलतोय हे सांगितल्यावर तो उडालाच ! मीच सांभाळून घेत , " माझ्याकडे लवकर या . वाट बघतोय. मेस्त्रीना सांगा " असं म्हटलं आणि हसतहसत फोन बंद केला. संध्याकाळी दोघेही हजर. काम फत्ते ! 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०१.२०२१

..................

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन ३

 तीळ तीळ तुटतंय मन

अपुरं जीवन

फुलेल बघ

तू फक्त एकदा

तीळगुळ देऊन

गोड बोल म्हण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१ मकर संक्रांत

.............

होय आणि नाहीची असंख्य आंदोलने

आणि या दोन टोकांमध्ये हेलकावे खाणारे आपण

आयुष्य किती क्रूर आहे

संधीच देत नाही आपल्याला

पुढे काय होणार आहे हे कळण्याची

आणि काही करण्याचीही

कुठलाच डाव आपल्या हातात येत नाही

आपण हेलकावे खात राहतो पुन्हा पुन्हा आशेने

नक्की काहीच ठरत नाही

होय नाहीचे.....

.

.

.

.

फार तर 

निकाल आल्या नंतर पाहू

किंवा

निक्काल लागल्यानंतर पाहू....


.

.

.

.आज तरी काहीच सांगता येत नाही ....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०१.२०२१

..............

आयुष्य गणिताप्रमाणे आखून चालत नाही. आयुष्याचं एखादं गणित चुकलं तर बाकीची सगळी गणितंही चुकू शकतात. निदान काही गणितं तरी चुकतात. आयुष्याच्या गणितात कुठल्याच पायरीची हमी देता येत नाही. उद्या काय होईल आज नक्की सांगता येत नाही. आयुष्य चकवा देण्यात हुशार आहे. डाव आणि प्रतीडाव कधी उलटतील सांगता येत नाही. फाजील आत्मविश्वास नडतोच. समतोल वृत्तीने व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास आणि हार जीत वा यशापयश सहजतेने स्वीकारल्यास जीवनात पुढे जाणे सुकर होते. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१७.०१.२०२१

................

कधी कधी मनावर अनावर ढग दाटून येतात. पण बरसत नाहीत. सावट धरून बसतात. चावट होऊन लगट करीत राहतात. हाकलले तरी जात नाहीत. बरसला तर काळोख बरसतो. आशेच्या कवडशालाही वाव मिळत नाही असा चांगला वावभर पट्टा तयार होतो मनाभोवती. कमी जास्त दाबाचा. मन तसे कमी जास्त हेलकावे खात राहते. दोन टोकांना. आपण नक्की कुठले हेच कळत नाही. पण आपले आपल्यालाच सावध व्हावे लागते. आपल्याच मनातल्या भावनांचा उपसागर आपल्यालाच ऐकत नाही म्हणजे काय ? त्याला विवेकाने वठणीवर आणून आपल्यालाच आपली कोंडी फोडावी लागते. पाॅझिटीव्ह थिंकींग म्हणजे काय आहे की नाही ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

............

कसे आहे आपल्याही नकळत कोळी जाळं विणतो. आपण त्यात अलगद पडणार हे तो पक्के जाणून असतो. एकदा अडकलो की सुटका नाही. तेवढा चिकट आणि चिवट द्राव त्याने आधीच सोडून ठेवलेला असतो. आपल्या सभोवती अनेक कोळ्यांनी अशी यंत्रणारूपी जाळी पसरून ठेवलेली आहेत. फक्त पाऊल उचलण्यापूर्वी सावधपणे डोळ्यावरची बेसावधपणाची झापडे काढून पाहिले पाहिजे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

....................


Nothing happens. Looks still. Silent. No movements. No work. No objectives. No problems. No plans. No objections. No information. No explosion of information. Nothing to do. Nothing to worry. No reason to hurry. All stars are silent. World is silent. Universe is silent. Be silent and imagine this for a moment. The moment of silence. 


...Devidas Harishchandra Patil

18.01.2021

............


मला वाटते माणसाला सतत कशात तरी गुंतत रहायला आवडतं. समोर काही नसेल तर एक जीवघेणी पोकळी तयार होते. वेळ कसा घालवायचा हा प्रश्र्न पार बेचैन करून टाकतो. काही माणसांनी यासाठीही देव निर्माण केला नसेल ना ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१


........

फाॅर्म असो वा अंदाजेबयाॅं असो, अती डोक्यावर घेण्यात अर्थ नाही. ओघवते काव्य असले पाहिजे, वाचकाला लगेच कळले पाहिजे आणि वाचायची ओढ लागली पाहिजे. इतकेच. बाकी काय ? गझलबद्दल म्हणतोय मी. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१

.............


पैसा आपलं काम करतो. किंबहुना करतोच. त्यातही दिवसाच्या आणि रात्रीच्या पैशात फरक असू शकतो. ते काही असो. पैसा काम करतोच.‌ पण दरवेळी पैसाच काम करतो असं नाही. शब्दही काम करतात. त्यातही दिवसा दिलेले आणि रात्री दिलेले शब्द यात फरक असू शकतो, बरं का ? काही लोक पैशाला जागतात. काहींना पैशाची गरजच पडत नाही. ते शब्दालाच जागतात. काही जण पैसे घेऊनही उलटे फिरतात तर काही जण शब्द देऊनही तो फिरवतात. अगदी तुमच्यासोबत राहूनही , बरं का ! असे अनुभव रोज येतात. काहींना अगदी काल परवाही आले असतील !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

............

कधी ना कधी ....


अंधारातले काम उजेडात येते ; कधी ना कधी ! तो मी नव्हेच किंवा ती मी नव्हेचवाले साळसूद चेहरे सत्य नाकारतात . अगदी तोंडावर. डोळ्यात डोळे घालून. नजरेला नजर भिडवून. पडदयाआडचे सूत्रधार पडदयापुढेही येतात ; कधी ना कधी ! आज ना उद्या ! बदलत्या जगाची ही कहाणी आहे. कहाणीचे सत्य कळते ; कधी ना कधी !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

.................

कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१

....................

जवा नवीन पोपट हा...


हल्ली नेटला गती नाही मिळत पूर्वीसारखी. नेटच्या रस्त्यात गतीरोधक आल्यासारखे वाटते आहे. शायद समय बदल रहा हैं... परिवर्तन हो रहा हैं...बोलो हैं ना ...?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०१.२०२१

..................

दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

२२.०१.२०२१

.................

नेत्यांची मांडवली नि कार्यकर्त्यांची गोची ! ही नवी म्हण काही वेळा ऐकू येते.‌ कोण नेता कशासाठी कुठे उडी मारील आणि आपल्याच कार्यकर्त्यांचा कसा गोंधळ उडवील यांचा युती आणि आघाड्यांच्या जमान्यात काहीच भरोसा राहिलेला नाही. सत्तेच्या गणितात न पडता व स्वत:ची बुध्दी न वापरता मतदारांनी गोंधळून केलेले विस्कळीत मतदान हे युती आणि आघाड्यांना जन्म देताना दिसते आहे. मतदानातील संभ्रम पुढील गोंधळांना कारणीभूत होतो आहे. त्यातच पक्षाचा आदेश या गोंडस नावाखाली दिवसरात्र एक बाजू पूजारासारखी नेटाने लावून धरणाऱ्या कार्यकर्त्यांची नेत्यांच्या गणितांनी दमछाक होते आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण होते आहे आणि निर्माण झालेल्या त्रिशंकू अवस्थेकडे उदास लोकशाही हताशपणे बघते आहे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२३.०१.२०२१

..................


शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन २

 दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन

 कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१