बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

बाल्याची अटक एक कथा

 बाल्याची अटक टलली !

https://youtu.be/FUDRqrLC7zc


आमी सातवीत व्हतो तवाची गोष्ट. आमच्या वर्गात तीन तीनदा नापास झालीली दांडगी पोरं व्हती. त्यातला बाल्या माझा मैतर झालीला व्हता. त्या दिवशी बगा , शाला सुरू झाली. वर्गबी भरला. आमी समदे सावरूनबी बसलो.‌ पन गुरूजींचा पत्ताच नव्हता. असं कधी झालीलं नव्हतं . गुरूजी एकदम वक्तशीर मानूस.‌ त्यातच कधी नव्हं ता बाल्या जरा टेंशनमधी दिसत व्हता. मी बाल्याला इचारनार एवढयात गुरूजीच आत आलं. पण त्यांच्यासंगं हेडगुर्जी पण आलं. हेड गुरुजीं जाम चिडलीलं दिसत होतं.‌ आमास्नी काय समजंना.‌ आमी समदे उभे राहिलीलं. तेवढ्यात, हेडगुर्जी म्हनालं, " बाळ्या सोडून सगळे बसा. " उभा राहिलील्या बाल्याकडं बघून हेडगुर्जी गरजलं. " बाळया काल संध्याकाळी गुरुजींना काय बोललास ? पन बाल्या काय बोलंना. तसं हेडगुर्जीच बोललं. काय रे गाढवा, काय बोललास तू गुरूजींना ? तुला कोणाला काय बोलायचं ते कळतं का ? ते कुठल्या पदावर, तू कुठल्या पातळीवर ! पदाचा मानबीन कळतो की नाही तुला ? " बाल्या कायबी बोलंना हयं बघून हेडगुर्जींनी बाल्याच्या एक मुस्काटात ठेवून दिली ! आमी समदे गपगार झालीलं. पन बाल्या आपला उभाच. थोडासा गाल चोलया लागलीला इतकंच .‌ हेडगुर्जी पुन्हा गराजले. " निगरगट्टा, तुला अक्कल आहे का काही ? याच्यापुढे जर मोठ्या माणसाला असलं काही बोललास तर याद राख. पोलीसातच देतो तुला ! अटक झाली म्हणजे समजेल तुला ! " असं म्हनून मोठं गुर्जी त्यांच्या खोलीत गेलं.‌ इतक्यातच एकदम पोलीस गाडीचा सायरन वाजला. तं बाल्यानं सुंबाल्या केला. त्याला वाटलं पोलीस शालेकडंच येतायत. तं बाल्या धावत जो निंघाला ता एकदमच लेडीज मुतारीत जाऊन लपला ! मैदानात पोरी लगोरी खेलत व्हत्या. त्यांनी ध. रा. जवलकर बाईना सांगलं. त्यांनी बाल्याला हाका मारल्या. तसा बाल्या बोलला मी येतो बाहयर, पन मला जवल धरा. मला पोलीसांची जाम भीती वाटते बाईनु. इकडं काही पोरींना घाई झालीली व्हती. त्या बाईंना करंगळ्या झालाय लागलील्या. भयंकर अटीतटीचा प्रसंग व्हता तो.‌ बाईंचा इलाज चालंना, बाल्या बाहयर निघंना. शेवटी बाल्याची अट बाईंनी मान्य केली तसा बाल्या बाहयर आला आनि जवळकर बाईंना त्यानं घट्ट मिठीच मारली. समदया पोरी किंचालल्या आणि हेड गुरुजींचं लक्ष खिडकीतनं बाहयर गेलं. त्यांना बाल्याची भीती दिसलीच नाही. दिसलं तं भलतंच ! झालं, गुरुजींनी फोन फिरवला. पोलीस गाडी गावातच व्हती. दुसऱ्या मिनिटाला पोलीस आलं. त्यांनी बघला तो बाल्या थरथर कापया लागलीला. भीतीपायी त्यांनं जवलकर बाईंना आणखीनच जवल केलीलं ! बाईंना मिठीतनं सुटता येईना. शेवटी पोलीसांनी त्यांना सोडीवलं आणि सगल्यांना हेडगुर्जींच्या खोलीत नेलंनी .‌तिथं समद्यांच्या जबान्या झाल्या. जबानीतनं पोलीसांना सगला परकार कलला. ते हसू लागलं आनि बाल्याची अटक टलली ! हयं पोर आपल्याला टराकतं हय बघून पोलीस खुशीत निघून गेलं. पोलीस गेलं. शाला सुटली. आमी समदं बाहयर पडलो.‌ त्या समद्यात बाल्या गुरूजींना काय अपमानास्पद बोलला व्हता तं आम्हा पोरांपैकी कुनालाच कललं नाय. मी बाल्याला इचारलं तं ता म्होरलाच बोलून गेला. काय तं म्हने मी काय असा तसा वाटलो काय त्यांना ! समाजतात काय सौताला ? मला अटक करया यांचं बापजादं याया हवंत ! संध्याकाल होयत आली व्हती. घराकडं जावन मला कोंबडी झाकयाची व्हती. मी आपला गप व्हवून घरचा रस्ता धरला. 

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

कशासाठी पांडुरंगा

कशासाठी पांडुरंगा


कशासाठी पांडुरंगा तुझे गुण गाऊ ?

कशासाठी पंढरीला तुझ्या सांग येऊ ... || धृ ०||



आता कुठे आहे ज्ञाना, आता कुठे नामा ?

पाहतो रे जो तो आता, येतो कोण कामा !

माझ्यातला नि:स्वार्थी भाव कुठे ठेऊ ... || ०१ ||



आता कोणाला कोणाची राहिली न भीती !

आहे कुठे न्याय आता ? आहे कुठे नीती ? 

पाप हेच पुण्य होता... पुण्य कुठे नेऊ ... || ०२ ||



आता तुझी चंद्रभागा आटोनिया गेली

पायाखालची तुझ्या वीट कोरडी झाली

भक्तीचा ओलावा मी सांग कुणा देऊ ... || ०३ ||




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०९.२०२१

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

Birthday Celebration

 आम्ही इथे वाढदिवस साजरे करतो


वाढदिवस साधारणपणे आपण घरात किंवा अन्य बंदिस्त जागेत साजरे करतो. काही जण म्हणतात की वाढदिवस कशाला साजरे करायचे ? वाढदिवस म्हणजे खरं तर उलटी गणती सुरू असते. आयुष्यातले एक एक वर्षं किंवा दिवस कमी होत असतांनाच त्याला वाढदिवस तरी कसा म्हणता ? असा काहींचा प्रश्न असतो. तर काही जणांना आनंदासाठी काही ना काही निमित्त लागत असते. त्यांच्यासाठी तर वाढदिवस ही पर्वणीच ! काही जण मात्र इतरांचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि तेही वैशिष्ट्यपूर्ण जागेत ! निसर्गसंपन्न वातावरणात, मोकळ्या हवेत ! 



आमच्या गावातही अशी उत्साही तरूण मुलं आहेत ज्यांनी एका शेडचा उपयोग वाढदिवस साजरा करण्यासाठी केला आहे ! या मुलांच्या कलात्मक बुध्दीला नक्कीच दाद द्यावी लागेल !   


हे वाढदिवस सर्वच स्नेही मंडळींचे साजरे केले जातात. विशेष म्हणजे वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरे करूनही कुठेही गडबड गोंगाट नसतो. खऱ्या अर्थाने हे तरूण असूनही अत्यंत विवेकाने व आनंदाला कुठलेच गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने साजरे केले जातात ! म्हणूनच या मुलांचं खूप कौतुक करावं वाटतं. केवळ त्यांच्यासाठीच हा पोस्टप्रपंच ! 

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

अठरा ऑगस्ट

 नवा व्हिडिओ : अठरा ऑगस्ट 

यूट्युब वर Devidas Patil नावाचे माझे चॅनेल आहे. 


YouTube Channel DEVIDAS PATIL


त्यामध्ये  आयुष्याकडे बघतांना ही play list आहे.

Aayushyakade baghtana playlist in youtube channel DevidasPatil


त्यामध्ये मी दि. १८.०८.२०२१ रोजी " अठरा ऑगस्ट " हा नवा व्हिडिओ अपलोड केला आहे . ( 👆 नावात व्हिडिओची लिंक दिली आहे).

The newest part of the playlist Aayushyakade baghtana


दर वर्षी अठरा ऑगस्ट आला की ती मला हटकून आठवते बघा ! सुशिक्षित बेरोजगारीचे ते दिवस होते.  एकदा मी रत्नागिरीच्या जेलरोडवरून समाजकल्याण आॅफीसात नोकरीच्या चौकशीसाठी जात होतो. पोलीस परेड ग्राऊंडच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला मी तिला प्रथम पाठमोरी पाहिलं . जरा पुढे गेल्यावर तिचा थोडासा चेहरा मला दिसला. ती नळावर पाणी भरण्यापूर्वी तांब्याचा एक हंडा घासत होती. एवढी सुंदर तरुणी रस्त्याच्या कडेला भांडी घासतेय, पाणी भरतेय, हे बघून मला खरं तर कसंतरीच वाटलं होतं. मी  पुढे गेलो खरा पण मला ते सगळं आठवत राहिलं . 


The subject of a new video


काही दिवसांनी मला रत्नागिरीच्या एका आॅफीसात नोकरी लागली. मी हजर व्हायला गेलो , तर तीच तरूणी तिथे काम करतांना दिसली. ओळख झाल्यावर मी तिला तो प्रसंग ऐकवला, तेव्हा ती पोलीस हवालदाराची मुलगी असून पोलीस लाईनीत राहते असं तिनं मला सांगितलं.

Emotions do this.


 पुढे काही वर्षांनी तिचे वडील रिटायर झाले. त्याकाळी पेन्शन फार नव्हतीच. तिचे लहान भाऊ शिकत होते. प्रामुख्याने तिच्या पगारावरच आता घर चालत होतं. पुढेही काही वर्षे ते तसंच चालत राहिलं. सर्वांचे प्रश्न तिने सोडवले, पण तिचा प्रश्न कोणीच सोडवू शकला नाही. ती सुंदर आणि कमावती असल्याने तिच्याही उच्च अपेक्षा तिला नडत गेल्या असाव्यात .


When the family response is zero


 वय वाढत गेले . लग्नं होणे कठीण होत गेले तशी ती खचू लागली. निराशेच्या आहारी गेली. ज्या कुटुंबासाठी तिने तन, मन व धनही इतकी वर्षे अर्पण केले, ते कुटुंब तिच्यासाठी दुर्दैवाने काहीच करू शकले नाही, हे तिला फार लागलं असावं. 

The state of sorrow in one's life


तिला लग्न करायचं होतं, संसार करायचा होता. तिला कुणाचं तरी प्रेम हवं होतं. पण अखेरपर्यंत ती प्रेमाची भुकेलीच राहिली . तिला उभारी द्यायला, तिच्या स्वप्नातला तो देखणा, श्रीमंत व कर्तबगार राजकुमारही घोड्यावरून आला नाही. 

Dangerous Chakravyuv of life


साहजिकच, ती सतत आजारी पडू लागली. आता ती आजारांनाही कंटाळली होती. अखेर एके दिवशी आजारी अवस्थेतच तिचं देहावसान झालं. एक अत्यंत सुंदर कळी उमलायच्या आतच  जिवाला मुकली. समाजातलं एक कटू सत्य पुन्हा एकदा जिंकलं. जीवनावरचं एक प्रेम हरलं ते याच अठरा ऑगस्टला !



शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

सुरेश भट पुन्हा एकदा

 

फेसबूकवरून साभार 



परीस...


       सुरेश भटांच्या कवितांचे पुस्तक हातात आहे .

"सुरेश भट ह्यांची निवडक कविता -१९४६ ते १९९६" ....संपादन आणि प्रस्तावना केली आहे  "शिरीष पै " ह्यांनी .

पुस्तक काय हातात पडले, नव्हे.. खजिनाच मिळाला!  एक एक कविता... एक एक भावगीत ....एक एक गझल... हृदयात उतरते! 

      प्रथम तर शिरीष पै यांची प्रस्तावना ही कितीतरी सुंदर! खरेतर हे सर्व लोक खूप आदरास पात्र. साहित्याला जणू त्यांनी आपले जीवन वाहून घेतलेले .

     "सुरेश भट ह्यांची निवडक कविता" या पुस्तकातील सर्व कविता शिरीष पै यांनी सुरेश भटांच्या अनेक काव्य संग्रहातून निवडून एकत्र संपादित केल्या आहेत व प्रस्तावनाही लिहिली आहे. 

प्रस्तावना ही इतकी अभ्यासपूर्ण आणि सखोल आहे की पुनः पुनः  वाचत रहाविशी  वाटते .सुरेश भटांच्या विषयी  व त्यांच्या कवितांची पूर्ण ओळख  प्रस्तावनेत आपल्याला होते.         

        "रुपगंधा" हा सुरेश भटांचा पहिला काव्यसंग्रह. १९६१ साली प्रसिद्ध झाला ."रंग माझा वेगळा" हा दुसरा काव्यसंग्रह.( १९७०) "एल्गार" हा तिसरा काव्यसंग्रह. "झंजावात" हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह. 

       या चारही काव्यसंग्रहातून उत्कृष्ट कवितांची निवड करून शिरीष पै यांनी हे "निवडक कविता" पुस्तक संपादित केले आहे. सुरेश भटांच्या ज्या  काव्यप्रकारा मुळे त्यांच्या प्रतिभेला खरे उत्तेजन आणि प्रेरणा मिळाली आणि त्यांची प्रतिभा संपन्न झाली ...त्या "गझल" या काव्य प्रकाराला त्यांनी आद्य स्थान दिले आहे. 

    आपल्या प्रस्तावनेत शिरीष पै ह्यांनी "गझल"  साठी सुरेश भट  ह्यांनी जे  नियम सांगितले आहेत ते देखील लिखित स्वरूपात दिले आहेत. ते नवोदित गझलकार व नव कवींना खूप उपयुक्त आहेत .आपल्या प्रस्तावनेत शिरीष पै ह्या  "गझले "विषयी सुरेश भटांनी आपल्या "एल्गार" या काव्यसंग्रहातील प्रस्तावनेत व्यक्त केलेले विचार आपल्याला सांगतात. 

        सुरेश भट म्हणतात, "गझले विषयी " एक महत्त्वाची गोष्ट ही की केवळ "रचनाकौशल्य" म्हणजे गझल नव्हे!  नुसते तंत्र समजले आणि ते वृत्त (बहर )यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (रदीफ) इत्यादी राखून तंतोतंत अमलात आणले तरी ...अखेर... ....प्रभावीपणे काहीही सांगता आले नाही  तर तो शेर.. कोसळतो!! शेर रचला जात नाही.. तो कवितेतून ...त्यांच्या जगण्यातून... त्याच्या जीवनातून.. निर्माण व्हावा लागतो! त्याच्या रक्तातून तो वाहत येतो... आणि सामर्थ्यसंपन्न शब्दातून अनुभूतीचा स्फोट होतो!!        

       गझल ही एक जीवनशैली आहे. ते एक तत्त्वज्ञान आहे. मराठी गझलच्या  क्षेत्रात सुरेश भट हे अनभिषिक्त सम्राट होते. "१९४६ ते १९९६ पर्यंत केलेल्या पन्नास वर्षांच्या काव्य लेखनातील निवडक कवितांचा संग्रह म्हणजे "सुरेश भट ह्यांची निवडक कविता१९४६ ते १९९६"! 

  रसिकांनो! आपण आपल्या दैनंदिन आणि व्यावहारिक  जीवनामध्ये एवढे गुंग असतो की ,आपण पुस्तकांकडे वळत नाही! आणि वाचत नाही! महाराष्ट्रात अनेक कवी आणि लेखक होऊन गेले... त्यांच्या अजरामर साहित्यकृती आज ग्रंथालयात उपलब्ध आहेत. जेव्हा ते आपल्या दृष्टीस पडतात.. तेव्हा त्यांची महती कळते! सुरेश भटांची कितीतरी भावगीते आणि गझला आपण ऐकतो. त्या कानात गोड वाटतात .पण ते शब्द ..त्या कविता... त्या भावना... ज्या प्रतिभेने  कवी पानावर उतरवतो ...त्याला तोड नाही! आपण या प्रतिभेच्या पुढे नतमस्तक होतो. सुरेश भट यांच्या अनेक सुंदर गझला तुम्हाला ही माहीत आहेत . या पुस्तकात वाचलेल्या काही गझलांचा ओळी मी तुम्हाला वाचण्यासाठी येथे देत आहे.

    आनंद ....(गझल )

कवी -सुरेश भट.

आसवांना कोणता अधिकार होता ?

घाव जो केलास तो सुकुमार होता!

 चालण्यासाठी उन्हाची वाट होती,

 सांत्वनासाठी तुझा संसार होता!!!!!


मेघ ..(गझल)

 कवी -सुरेश भट.


पुन्हा तेजाब दुःखाचे उरी फेसाळूनि गेले !

पुन्हा ओठांवरी गाणे तुझे घोटाळुनी गेले !

मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हाका ?

मघाशी कोणते डोळे मला ओवाळूनी गेले?

निर्धार ...(गझल) 

कवी -सुरेश भट.

  माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे !

माझीया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे !

चालली माझी शिलेदारी जनांसाठीच माझ्या ,

गीत माझे माझिया हातातली तलवार आहे.!

                अत्यंत सुंदर असे निवडक कवितांचे पुस्तक, प्रत्येकाने वाचावे असे .

दुःख भेटे मला सांत्वनासारखे! गीत भेटे मला यौवनासारखे!

शेवटी शेवटी मी कशाला कण्हू ?हे मनासारखे ! ते मनासारखे!  ....सुरेश भट.                    

                                          

                                          सौ वर्षा दौंड.

                                         14/7/2021.


अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा . 

सोमवार, २६ जुलै, २०२१

मीच मजला पेश केले पाहिजे

 पेश करतो आहे : 

थोडी पार्श्वभूमी वाचा  ( मागील अतिशय छोटीशी पोस्ट )


आता प्रारंभ करूया....

यूट्युब वर Devidas Patil नावाचे माझे चॅनेल आहे. 



त्यामध्ये Dehsongs ही play list आहे.


या play listमध्ये काही वर्षांपूर्वी, मी जे व्हिडीओज अपलोड केले होते त्यांपैकी " मीच मजला पेश केले पाहिजे " हा एक व्हिडिओ ! 




About My Videos या पानासाठी मी हाच व्हिडिओ पहिला निवडण्यामागे खास कारण आहे बघा ! ही माझीच एक मराठी गझल आहे. व्हिडिओमध्ये ही मराठी गझल मी पेश केली होती. हा पेश शब्द माझ्यादृष्टीने फार महत्वाचा आहे . हा शब्द शिर्षकामध्ये आला आहे आणि शिवाय पहिल्या शेरामध्येही आला आहे . याबद्दल मी पुढे बोलणारच आहे . मराठी गझल ही सुरेश भटांनी खऱ्या अर्थाने सुरू केली, जोपासली व वाढवली.  याच गझलचा आता महावृक्ष झालेला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. रत्नागिरीत मराठी गझल अजीज हसन मुकरी व देवीदास हरिश्चंद्र पाटील यांनी सर्वप्रथम सन १९८४-८५ च्या दरम्याने सुरू केली. आमचा मार्ग सुकर केला तो अलिकडेच दुर्दैवाने निधन पावलेले माझे मित्र मधूसूदन नानिवडेकर यांनी. आम्हांला सुरेश भटसाहेबांचं मार्गदर्शन व प्रेम लाभलं, हे आमचं भाग्यच ! मराठी गझल दोन दोन ओळींच्या पाच शेरांची किंवा अधिक शेरांची असलेली रचना असते.  यामध्ये प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो किंवा एकाच विषयावरचे सर्व शेर असतात . मराठी गझल बाबत अधिक माहिती अशी शिका मराठी गझल या लेखात आहे.‌  माझी ही गझल पहिल्या प्रकारातली आहे. यामध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र आहे, स्वतंत्र विषयावरचा आहे. 

 आता आपण प्रत्येक शेराचा आशय पाहू.

पहिला शेर असा आहे : 

मीच मजला पेश केले पाहिजे

जगाच्या दारात नेले पाहिजे


खरे तर हा शेर मला दुनियेच्या आलेल्या अनुभवातून सुचलेला आहे !  तुमच्याकडे कलागुण असून उपयोगाचे नसते ते जगाला " कळायला ' लावावे ' लागतात ". स्वतःचे बाजारीकरण म्हणजेच मार्केटिंग करावे लागते . दुनिया तुम्हाला शोधत येणार नाही तर तुम्हाला तिच्या दारात जावे लागेल. उशिरा का होईना, मी सद्या हेच चालू केले आहे. याचं कारण असं आहे की मला पस्तीस वर्षांपूर्वीच माझे ( आणि माझ्याप्रमाणेच रत्नागिरीतील आद्य गझलकार असलेल्या अजिज हसन मुकरीचेही !! ) भवितव्य कळाले होते. सन १९८६ मध्ये लिहिलेल्या माझ्या सुप्रसिद्ध" तीर " नावाच्या गझलचा चौथा शेर आजही याची साक्ष आहे. शेरच पहा ना आणि मग सांगा कमेंट्स व्दारे. शेर असा आहे : 


कसोटी लागली तेव्हा निघालो मी खरे नाणे

तरीही मीच बाजारी कुठेही चाललो नाही 


कारण ? तेच ! मी स्वतःला जगाच्या दारात नेले नाही. मी स्वतःला जगापुढे " पेश " केले नाही. राग मानू नका, पण मी इतक्या वर्षांनी हेच करू लागलो आहे. दुर्दैव, दुसरं काय !!!


काही असो आपण पुढचा शेर पाहू : 


गुरू बनायचे असेल जर कधी

आधीच शोधले चेले पाहिजे


पूर्वी गुरु एवढे सामर्थ्यवान असायचे की त्यांची ख्याती सर्वदूर पसरायची.‌ चेलेच त्यांचा शोध घ्यायचे. आता स्वयंघोषित गुरू असतात .‌ आता गुरु बनण्यासाठी आधी नियोजन करावे लागते . म्हणजे गुरु बनायचं असेल तर आधी आपले काही चेले तयार करावे लागतात . गुरू म्हणून तुमची जोरदार प्रसिद्धी करू शकतील असे चेले आधी शोधायचे असतात , आणि मग तुमचा गुरु पदाचा मार्ग सुकर होतो. असा याचा अर्थ आहे .


यानंतरचा शेर  : 


जगायचे सुखी आयुष्य पुढे तर

रोजचेच आता मेले पाहिजे


हा शेरही तितकासा सरळ नाही . म्हणजे जीवनात एवढी दगदग भरलेली असते , भविष्यकाळ सुखाचा करण्यासाठी वर्तमानात रोजच्याच मरण यातना भोगाव्या लागतात असा याचा सरळ अर्थ आहे . पण ही खरे तर उद्विग्नता आहे , व्यथा आणि वेदनांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नसल्याने आलेली उपरोधिक असहाय्यता ‌आहे !


आता पुढचा शेर पाहू : 


त्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी

सोबती, बाटल्या, पेले पाहिजे


हाही शेर तसं म्हटलं तर उपरोधिकच आहे.  म्हणजे सुख व्यक्तीनिहाय असू शकते. काहींना दारू पिण्यामध्येही सुख असतं. त्यातही मग एकट्याने पिणं आणि मित्रांसह पिणं हे प्रकार आहेतच.‌ दुसऱ्या  प्रकारात सुख वाटत असल्यास असलं " भौतिक सुख " मिळवण्यासाठी सोबती, चाकणा , बाटली आणि पेले हवेतच !     


आता शेवटचा शेर.


अहंकार नष्ट व्हावा यासाठी

षड:रिपू वाहून गेले पाहिजे


हा शेवटचा शेर अगदी आध्यात्मिक आहे बरं का ! आध्यात्मिक असूनही त्याचा अर्थ अगदी सरळ आहे ! मोह, माया , मत्सरादि षड:रिपू वाहून गेले की मनातील अहंकारही नष्ट होईल व मन निर्मळ होईल , असा याचा सरळ अर्थ आहे. अर्थात सध्याच्या जगात हे असलं काही निर्मळ वगैरे होणे कठीणच आहे म्हणा ! पण आपण इथे अर्थापुरतेच मर्यादित राहू. 


लवकरच दुसऱ्या व्हिडिओ बद्दल नवीन पोस्ट घेऊन येतोय.‌ तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट्स अवश्य द्या !


मराठी गझलबद्दलचा अशी शिकावी मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .

... देवीदास हरिश्चंद्र पाटील 

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

About my videos

 रसिकहो, 

तुमच्या आवडत्या ओन्ली देवीदास या ब्लॉगवर About My Videos या नावाचे आणखी एक सुंदर पान जोडीत आहे ! माझे यू ट्यूब वरील व अन्य व्हिडिओज, त्यावरचे भाष्य, तुमच्यासारख्या रसिकांच्या आलेल्या प्रतिक्रिया व अन्य तपशिल यांनी हे सुंदर पान सजलेलं असेल. या पानाला आपला खूप सुंदर प्रतिसाद लाभेल, याची खात्री आहे ! आपल्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट पहात आहे !!

धन्यवाद !

काळजी घ्या. आपण, आपले कुटुंब व आपली मित्रमंडळी सुरक्षित रहा. 

मंगळवार, २० जुलै, २०२१

मागे पुढे बऱ्याच काळाने

खूप खूप कालावधीनंतर या पानावर लिहितो आहे. पूर्वी खूप सुंदर प्रतिसाद आपण दिलेला आहेच. आता तारीखवार लिहिले आहे. आपण आवर्जून प्रतिक्रिया द्यालच ! 


 ५ मार्च २०२१ : 

 प्रयास कार्यकारिणीची पहिली सभा

स्थळ: रत्नागिरी विश्रामगृह 

वेळ : दुपारी ४ ते ५.             (उपस्थित)

.................

०५.०३.२०२१


रत्नागिरी विश्रामगृहात ०३.४४ ला  पहिला मी आलो. सभा सूरू होण्याआधी. 

०४.१२ ला सौ.चा घरून फोन. आबाची आई गेली. दापोलीला. तिला रात्री आणणार. मिटींग कंटिन्यू केली. संध्याकाळी घरी आलो. रात्री साडेनऊ वाजता आबाकडे गेलो. सर्व आलेले होते पण आबांची एक मुलगी पुण्याहून निघाली होती. ती रात्री दोन वाजता आली. सगळे होऊन तीन वा. घरी आलो. आंघोळ करून चहा घेतली. खालच्या अंगणातली लाईट काढायला पुढे आलो तर समोरच्या बंगल्यात लाईटी लागलेल्या ! तितक्यात, क्रांती बंगल्याच्या कंपाऊंडकडे बोंबटत आली. तिच्या सासऱ्याला वांत्या होत होत्या, घाम फुटला होता, तळमळत होता. लगेच तिच्या नवऱ्याला फोन केला आणि आम्ही तिघेही बंगल्यात गेलो.‌ थोड्या वेळाने मेघाच्या घरी जाऊन तिला घेऊन आलो.‌ मग क्रांतीचा नवरा आला. त्याने बंटी व विकीला बोलावून आणले. शेवटी पाच वा. पेशंटला सिव्हील हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करायला विकी त्याच्या कारमधून घेऊन गेला आणि आम्ही घरी आलो. तोपर्यंत उजाडत आले होते.

...................‌


०९.११.२०२०


गेले २ - ३ दिवस राकेश तसा झालाय. 


शेवटच्या गझलकाराच्या गझला , परिचय , फोटो म. नानिवडेकरांकडे आजच पाठवल्या. 


सायं. ०६.३७ ला सुनील आडीवरेकरचा सावंतवाडीहून फोन आला. भाऊ सुधीर व दोन मित्र असे चौघेजण उद्या रत्नागिरीत व आमच्याकडेही येणार आहेत.


अरविंद ग्रील बसवायला आज येणार होता. आला नाही.‌ फोन करून उद्या यायला सांगितले. 

........


१०.११.२०२०


स. ०९.३० वा. सुनीलला फोन केला तर त्याच्या आईची तब्येत बिघडल्याने सुधीर येत नाही व सुनील आत्ताच मित्रांसह निघाल्याचे कळले. 


संध्या. ०४.३० वा. अरविंद व पब्यादादा चंदरकर ग्रीलचे साहित्य घेऊन आले व अंगणात ग्रील तयार करू लागले. 


.....तोच सुनीलची गाडी आली. सावंत , कंग्राळकर हे सावंतवाडीचे व मागाहून आलेले टाकळे मिऱ्याचेच असे चौघेजण आले.‌ एल एम एल बिझीनेस. नो इंटरेस्ट.



११.११.२०२०



काल रात्री एक गझल सुचली. पण मधल्या एका शेराची दुसरी ओळ स्फुरली पण दुसरी समर्पक ओळ येईना. अखेर आज सकाळी ती ओळ सुचली. 


काल सतीश टोपकर आमच्याकडे येणार होता तो आला नव्हता. खालच्या अंगणात ठेवलेल्या वाळूच्या २८ पिशव्यांपैकी ०२ कमी झाल्याचे लक्षात आल्याने सतीशला त्याच्या माणसांकरवी त्या आमच्या अंगणात ठेवायला सांगितले होते. आता हे नोंदीत असतानाच सतीश त्या पिशव्या हलवतोय. सकाळचे १०.२० झाले आहेत. तेव्हढ्यात उदू आलाय.‌ दिवस पुढे सुरू झाला आहे.



दुपारी जेवणाच्या वेळी समोर लक्ष गेले. तीन तरूण बंगल्याच्या रहाटाजवळ दिसले. कदाचित भैय्या भाभी सोडून गेल्याने रिकामा झालेल्या बंगल्यात काॅलेजकुमार रहायला येणार असतील किंवा ती मालकाची मुलेही असतील, असा विचार करून मी किचनकडे वळलो. 

संध्याकाळी केस कापायला गावातला मुलगा आला. मी केस कापून घेतले. उद्या सौ. ते रंगवणार आहे. केस कापले जातांना कडीपत्ता न्यायला विकास आला. त्याला 

विचारले तर बंगल्यात नवीन कोण रहायला येणार हे त्यालाही माहिती नाही म्हणाला.


संध्याकाळी पुढच्या दारी पायरीवर मोबाईल बघत बसलो होतो तर क्रांती आली. ती स्वत:च म्हणाली की ती बंगल्यात रहायला येतेय. म्हणजे लवकरच आमच्या शेजारी क्रांतीपर्व सुरू होणार...



........


१२.११.२०२०


आज वसुबारस. 



सकाळी स्वप्नं पडले. मी व नार्वेकर एका काॅलेज हाॅस्टेलमध्ये आहोत. आणखी तीन चार जणही आहेत. ते फिरायला जाणार आहेत. तत्पूर्वी नार्वेकर मला संगणकावर महाकोष दाखवण्यासाठी संगणक सुरु करीत असतात. मी पासवर्ड नीट बघून ठेवला पाहिजे, हे बाहेर गेले की पंचाईत नको, असा विचार करतो. प्रोग्रामच्या टचमध्ये राहिले पाहिजे, असे मी बोललो तर तेही म्हणाले की , नाही तर विसरायला होतं. तेवढ्यात दोन काॅलेजकुमारी काही तरी विचारतात. मी त्यांना तुम्हाला तिकडे रुम दिली आहे असे समोर बोट दाखवून सांगतो. इथेच स्वप्नं संपते. 



आज सकाळी सौ.ने माझे केस काळे केले. 



आज‌ मुलाने मला नवीन शर्ट आणला आणि हिच्यासाठी दोन साड्या आणल्या. तीनही सुंदर आहेत. मुलाने स्वत:ला मात्र सांगूनही काहीच घेतले नाही. त्याचा मूड नाही हे मला कळते आहे. पण मी काही करू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. आयुष्यात कधी नाही तेवढा मी हताश झालो आहे. काळाच्या मनात काय आहे ते कळत नाही. आज मी तुम्हांला काही सांगू शकत नाही.



आज क्रांती बंगल्यात येईल असे वाटले होते पण अजून तरी कुठे जाग नाही. 



दुपार झाली. अरविंद अजून तरी आलेला नाही. संध्याकाळी तरी येतोय का ते बघू. 



अरविंद आला नाहीच. पण संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बंगल्यात झाडलोट सुरू झाली. सतरा तारीखच्या आत रहायला येणार असं क्रांती माझ्या सौ.ला म्हणाली . 


.................


१३.११.२०२०


सकाळी ०७.३० वा. अरविंदला फोन केला. तो थोड्या वेळाने येतो म्हणाला. तासाभरात जोशी , चौगुले व अरविंद पण आला. आज दिवसभरात दुसरे ग्रील तयार होऊन दोघांनाही रंग पण काढून झाला. साडेपाच वाजता ते तिघेही निघून गेले. उद्या दिवाळी आहे. परवा येतो म्हणाले. 


संत्याने दोन्ही घरात आकाश कंदील लावून दिले.‌


स्वाती वहिनीने घरातली सगळी लादी पुसून काढली व ती गेली.  सौ.ने व मी पणत्या लावल्या. दोन्ही घरातील आकाश कंदील पेटवले. दरवर्षीप्रमाणे आम्ही लायटींगही केली आहे. पण खरं सांगू, आमच्या मनालाच उजेड हरवलाय. आताही रात्री साडेनऊ वाजता मुलगा गाडी घेऊन बाहेर गेला. बाहेर जातोय हे सांगितले पण आता रात्रीचा कुठे जातोयस विचारले तर जाऊन येतो म्हणाला आणि निघून गेला. मुलाचं हे विक्षिप्त वागणं आम्हां दोघांनाही अनाकलनीय झालंय. तो वीस मिनिटात परत आल्याने आमच्या जिवात जीव आला.‌



१४.११.२०२०


काही विशेष नाही.


१५.११.२०२०


आज दिवाळी. लक्ष्मीपूजनही. 


पहाटे स्वप्नं पडले. मी एका घरात पहिल्या मजल्यावर खिडकी जवळ खुर्चीत बसलेला. समोर कोणी तरी आहे. मी खिडकीतून बाहेर बघतो तर रिक्क्षाजवळ उभा असलेला रिक्षा ड्रायव्हर अगदी ओळखीचा असल्यासारखा मला हात दाखवून हसतो.‌ दुसऱ्याच क्षणी तो अनोळखी असल्याचे लक्षात येऊन मलाच विचित्र वाटते. मी खुर्चीतून खाली बसतो. पण तरीही तो मला दिसत असतो व त्यालाही मी दिसत असतो. तो पुढे येऊ लागतो. मी मान आणखी खाली घालतो. तो पुढे येऊन सांगतो की साॅरी हा, मला माझ्या ओळखीचेच वाटलात... म्हणून मी हात केला. त्यालाही आता ओशाळवाणे वाटत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.‌ इथे स्वप्नं संपले.




१६.११.२०२०


बंदूचे व त्याच्या वहिनीचे जोरदार भांडण झाले. सौ.चे आजारपण, मुलांचा गंभीर होणारा प्रश्र्न या पार्श्र्वभूमीवर एकूणच सगळे कठीण बनले आहे. 


 २७.११.२०२० ला तुळशी विवाहादिवशी अशोक व गार्गी आली.  


२९.११.२०२० ला अशोकच्या कारने वेंगुर्ल्याला गेलो.१.१२.२०२० ला सकाळी सावंतवाडीला गेलो.

वीस दिवस तिकडेच होतो. मुलांचे वर्क फ्राॅम होम सावंतवाडीतूनच चालू होते. सौ.च्या पायदुखीमुळे तिथल्या एका डाॅक्टरने तिच्या पायातून रक्तही काढले. नासके रक्त आहे म्हणाला.


मध्येच एक दिवस वेंगुर्ल्यात खवणे बीचला  पेडणेकर व हडकर फॅमिली बरोबर जाऊन आलो. तिथेही मुलाचा व सौ.चा खटका उडालाच.


वीस दिवसांनी घरी आलो.


२१.१२.२०२० पासून मुलाचे वर्क फ्राॅम होम नवीन बांधलेल्या वरच्या माळ्यावर सुरू झाले. 


२१.१२.२०२० ला बावादादा आला.


२५.१२.२०२० ख्रिसमस


मंगलला ११.४५ ला झोप लागल्यानंतर मुलगा खूप डिप्रेस्ड झाल्याचे लक्षात आल्याने , काल रात्री १२ ते १.३० पर्यंत त्याच्याशी बोललो. त्याला समजावून माळ्यावरुन खाली आलो आणि दोन वाजता सौ. अंगावर रॅशेस उठल्याने अंग खाजवत जागी झाली.  सुदैवाने मुलाचे काम लवकर संपले होते. मग आम्ही चार वाजेपर्यंत सौ. वर उपचार करीत राहिलो. नंतर थकून झोपलो तो ७.३० ला बावादादाने बेल मारली तेव्हा जागे झालो. असा आमचा हॅपी ख्रिसमस झाला.


.......

०२.०१.२०२१

मुलगा ३१.१२.२०२० रोजी रात्री मुंबईला गेला. आई आजारी असूनही थांबला नाही. त्याचा चेहरा बघून थांबवणेही जमले नाही. ०४ तारीखला सकाळी येतो म्हणालाय. 


भाची , तिचे मिस्टर, त्यांचा मामेभाऊ , दुसरी भाची तिची मुलगी गौरांगी असे कुडाळातून आले‌. जेवले आणि गेले पण. एवढ्या ला़बून येऊन थांबले नाहीत. 


संस्थेची पॅन अॅप्लीकेशनची रिसिप्ट आज ११ वा.  मिळाली. बॅंकेत फोन केला. बॅंकेचे साहेब म्हणाले , चार वा. या. गेलो. दिली. संस्था रजिस्ट्रेशनला एक वर्ष लागले ! आता बॅंक अकाऊंट कधी ओपन होणार त्याची वाट बघायची. जागतिक महासत्तेच्या स्वप्नांचा वेगच जास्त आहे. 


संध्याकाळी ०६ वा. पुण्याहून कांतीचा फोन आला. गेले काही दिवस आजारी असलेली विलासची छोटी गेली. अतिशय दुर्दैवी घटना.  


घरात सौ.ची पायदुखी वाढलीय. तेलाने माॅलीश करून इस्त्रीने शेकतोय. काय करावे तेच कळत नाहीय. 


...................


१०.०१.२०२१

आज सकाळी दादाची तब्ब्येत बिघडली. परकार हाॅस्पीटलला नेलं. बरा झाला. दादाची काळजी वाटते. 


दुपार चांगली गेली. संध्याकाळ सुंदर होती. 


पण रात्री साडे दहाला आम्हां तिघांचे घरगुती नाट्य सुरू झाले. ते दोन वाजेपर्यंत चालले. अडीचच्यानंतर कधीतरी झोप लागली असेल. 


.................


गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री असे द्रष्टे कवी सुरेश भट साहेब लिहून गेले. अशा ओळी कालातीत असतात. अमर असतात. अक्षय असतात. भटांनी केवळ विजा घेऊन येणाऱ्या पिढीलाच ओळखले होते असे नव्हे, तर आणखीही काही जणांची कुंडली त्यांना ज्ञात होती. म्हणूनच वाकुल्या दाखवी निकाल मला असेही ते लिहून गेले होते. उच्च पातळीवर काय होऊ शकते , हे सर्वसामान्य माणसाला कळतही नाही आणि कळू दिले जातही नाही. 


शिखंडी आडून येतो बाण एखादा

लबाडीने प्राण घेतो बाण एखादा


यंत्रणांना शिखंडी समजून त्यांच्याद्वारे अशी गत केली जाते. खास खोज्यांनी तशी व्यवस्था केलेली असते. भटांनी यावर कायम स्वरूपी मार्मिक भाष्य केले आहे. तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते हेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हे खोजे वेळकाढूपणा करणार. समिती जन्माला घालणार, भिजत घोंगडे ठेवणार आणि त्यांना सोईच्या वेळेला ते वरही काढणार . म्हणून भटसाहेबांनी त्यांना बेगुमान म्हटलेलं आहे. आपण काय म्हणायचे ते ठरवा आणि म्हणा पण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१

...............


२४.०१.२०२१ रविवार एका फाॅर्मसाठी निलेश पाटील ने माळनाक्यावर आहार रेस्टाॅरंटमध्ये बोलावले. दादा व मी सह्या करून आलो. 


२६.०१.२०२१ सुट्टी


२७.०१.२०२१ निलेश पाटील ना अॅक्सिस बॅंकेत जाऊन बावादादासह भेटलो. आवश्यक त्या अंतिम दुरूस्त्या करून दिलेल्या.निलेश पाटील म्हणाले, आता फक्त एक फाॅर्म ६०चं एक अॅप्रूव्हल राहिले आहे. एक आठवड्यात ते मिळेल. मग अकाऊंट ओपन होईल. तेव्हा तिथे शेजारचा  हर्षद हेमंत सावंत (अॅक्सिस बॅंक कर्मचारी ) आला. त्यालाही ही गोष्ट बोललो. तो म्हणाला मी बघतो. एका बॅंकेत खाते उघडायला महिना लागतो ही डिजीटल युगाची शोकांतिका आहे. 


२८.०१.२०२१ सकाळी बावादादा मुंबईला रवाना. सौ. व मी बावनदीला डाॅ. बनेंकडे आजपासून जायला सुरुवात केली. 

........

०७.०२.२०२१

आज बावनदीला जाण्याचा शेवटचा दिवस. घराजवळच रिक्षा भेटली. रिक्शावाला ओळखीचा निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याने रिक्शा थांबवली. सरपंचपदी निवड जवळजवळ निश्र्चित झालेल्या उमेदवाराचे त्याने अभिनंदन केले. मग आम्हीही केले. पुढे रहाटाघरातून पांगरीमार्गे देवरूख बसने नेहमीप्रमाणे बावनदीला गेलो. अडीच वाजता घरी आलो तर मुलगा शहरात निघालेला. नीटसं जेवलाही नव्हता. नीट बोललाही नाही. मी लवकर ये म्हटलं. तो हा म्हणाला. त्याचा मूड कालपासूनच ठीक नव्हता. काळजी वाटत होतीच. साडेपाच वाजले तरी तो आला नाही. म्हणून फोन करीत असतांनाच एक बाई पाटीलवाडीत सुनील पाटीलने आत्महत्या केल्याचं सांगत आली. आमच्या काळजात धस्स झालं. मुलाला फोन करीतच होतो, पण रिंग होऊनही तो उचलत नव्हता. आमचं टेंशन वाढतच होतं. आम्ही फोन करीतच होतो. शेवटी साडेसहाला त्याने फोन उचलला. घरी येतोय म्हणाला. आम्ही पुन्हा पुन्हा फोन करीत राहिलो. तो येतो म्हणत राहिला. शेवटी तो रात्री आठ वाजता आला तेव्हा आम्ही सुटकेचा श्वास सोडला. रात्री आमच्याजवळ झोपवला. आता उद्या काय होईल या विचारात झोप नीट लागलीच नाही.‌

............

१०.०२.२०२१

पहाटे पाच वाजता मला स्वप्नं पडलं. पुढच्या अंगणात दक्षिण दिशेला दादा उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला माझा मुलगा बहुतेक खाली बसलेला आहे. ते दोघे काही तरी शोधतायत. मी उत्तरेकडे उभा राहून काय शोधतायत ते विचारतो. दादा सांगतो की ते आमचा जुना खुणेचा दगड शोधतायत. माझ्या हातातल्या काठीने मी वायव्य आग्नेय अशी खूण करून तो दगड या पट्ट्यात कुठे तरी जमिनीत गाडला गेला आहे, असे सांगतो. इथे स्वप्नं संपलं. खरं तर तो दगड दादाच्याच अंगणात आमच्या शेवटच्या पायरीपासून दीडेएक फुटांवर पूर्वापार होता.  दादाने जुने घर पाडून नवे घर बांधले तेव्हा तो उभा दगड अंगणात घातलेल्या नवीन लादीखाली गेला. तो आम्हां तिघांनाही माहीत होता. मग दादा तो आताच का शोधत होता आणि मी छेद द्यावा तशी काठीने माझ्याच अंगणात रेषा आखून का दाखवतो ? काही तरी तिरकस घडणार या विचाराने मी दिवसभर अस्वस्थ होतो. तो छेद मनातून जात नव्हता. गेले काही दिवस मुलगाही विचित्र वागत होता. नीटसं जेवतही नव्हता. कुठलेच उत्तर सरळ आणि सहजतेने देत नव्हता. संध्याकाळी घाईघाईने शहरात गेला. परत आला तो चिडलेलाच होता. रात्री तो जेवलाच नाही. भूक नाही म्हणाला. आम्ही दोघंही टेंशनवरच होतो. काय झालंय तेही सांगेना.  रात्री अकरा वाजले तरी तो जेवायला तयार होईना.  आमचा जीव राहिना. अखेर मी जिन्याने वर जाऊन पुन्हा विचारले तर तो भडकलाच. मला एकट्याला राहुद्या म्हणाला. मी निराश होऊन खाली आलो. साडेअकरा वाजता त्याला वरती गारठा असल्याने खाली ये म्हणून हिने त्याला सांगितले. खूप मिनतवारीनंतर तो दणदणत खाली आला. शेजारी झोपला. पण रडू लागला. ही समजवायला गेली तर त्याने हिला झिडकारलंच. मी पण आमच्या दोघांच्या आजारपणांना आणि मुलांच्या ह्या विचित्र वागण्याला कंटाळलो होतो. मी माझ्या दुर्दैवाबद्दल काही तरी बोललो. त्यावर हिने मला दुजोरा दिला. त्यामुळे भडकून मुलगा हिला काही तरी बोलला ‌ झाले, मायलेकांचे भांडणं सुरू झाले. ही हायपर झाली. त्या उद्रेकामुळे हिच्या अंगाला खाज सुटली. हिचे दुखणे पुन्हा सुरू झाले. श्र्वास कोंडून ही तडफडू लागली. तसा तो माझ्या मदतीला आला. 


..............

१३.०२.२०२१ रात्रीच्या बसने मुलगा पुण्याला गेला. मित्राचे लग्नं आहे.

...............

१९.०२.२०२१ मित्राचे लग्न काल झाले. काल रात्री पुण्याहून निघून मुलगा आज सकाळी घरी आला. 

........... ( क्रमशः )

सोमवार, १४ जून, २०२१

Blog's updates


 Hi friends,

how are you ? 

Please stay at home, stay safe.

Keep your family safe too !


       Here are some updates of this blog for you.


Theses updates are of today the 14th June, 2021. Henceforth the updates will be displayed here timeto time. 


















मी सुंदर स्वप्नांचे

 मी सुंदर स्वप्नांचे


मी सुंदर स्वप्नांचे इमले बांधत असतो

वाळुवर पाण्याने चित्रे रेखत असतो



आयुष्य पुढे मागे सरकत बिरकत असते

माझ्याच हिशेबाने पण मी चालत असतो



होईल मनाजोगे... होईल कधी काळी...

मी आत असा माझ्या मज समजावत असतो



गावात कधी गेलो की आग्रह होतो अन्

मी पिंपळपारावर गोष्टी सांगत असतो 



हे दु:खं मला बघते बिलगून बसायाला

हटकून असा त्याला मीही टाळत असतो



संदर्भ जुने काही जातात पुन्हा लागुन

एकेक क्षणामधुनी मी मज शोधत असतो



ते फूल वहीमधले अजुनी छळते आहे

मी याद तुझी माझी अजुनी काढत असतो


हा बंद तुझा आता बाजार जगा झाला

घरट्यात स्वतःच्या मी आता हिंडत असतो


... देवीदास हरिश्चंद्र पाटील   


टीप  : मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



मंगळवार, १ जून, २०२१

आपली एस. टी....आपली माणसं..

आपली एस. टी....आपली माणसं...

१ जून १९४८ रोजी महाराष्ट्रात पहिली एस. टी. बस पुणे अहमदनगर मार्गावर धावली. 

आज तिचा ७४ वा वर्धापन दिन. 

त्यानिमित्त एस्.टी. शी संबंधित 

सर्वांचेच अभिनंदन !


आमच्या जाकीमिऱ्या गावात पहिली 

एस्. टी. बस सन १९६९ मध्ये आली. 

अगदी बालपणी. तेव्हा ती निळ्या, 

हिरव्या आणि पांढऱ्या रंगात 

होती. पुढे त्यात पिवळा रंग मिसळला. 

कधीतरी लाल रंगही आला. त्यांने 

बरीच वर्षे राज्य केलं. त्याचा मनावर 

एक पगडा बसलेला आहे.  अगदी " ये 

लाल रंग कब मुझे छोडेगा " या जुन्या

हिंदी गाण्याची आठवण यावी इतका. 

लाल डब्बा म्हणूनच एस. टी. फेमस झाली. 

आता पुढे ....

मग खाजगी गाड्यांच्या स्पर्धेमुळे एस. टी.ही चकचकीत झाली. रंगीतसंगीत झाली. आधुनिक झाली. 

काही झाले तरी एक गोष्ट मात्र कायम राहिली. दिवस रात्र थकण्याची पर्वा न करता अखंड प्रवास आणि आपुलकी !एस. टी. ची प्रवाश्यांबद्दलची  आपुलकी ! हजारो किलोमीटर, हजारो माणसे...!


पहिली बस धावली ती पोलीस बंदोबस्तात 

 पहिली बस धावली ती बेडफोर्ड कंपनीची ३० आसनक्षमतेची होती. 

शिवाजीनगर कार्पोरेट जवळ बसचा 

शेवटचा थांबा होता. खाजगी 

वाहतूकीच्या व्यवसायावर 

परिणाम होईल या भीतीने हल्ला होईल 

म्हणून माळीवाडा वेशीपासून 

पुण्यापर्यंत ही बस पोलीस बंदोबस्तात 

नेण्यात आल्याची माहिती मिळते. 

याप्रकारे, सुरुवातीपासूनच खाजगी 

वाहतूक, कच्चे रस्ते, अपुरी 

साधनसामग्री आणि इतर अनेक 

घटकांचे अडथळे पार करणारी आपली 

एस. टी. आजही अथक धावते आहे. 

अगदी रेल्वे आली तरी एस. टी. 

माणसे आणि बोज्यांची ने आण 

करतेच आहे. 

डबघाईला आली आली असं म्हणता 

म्हणता पुन्हा पुन्हा उभारी धरते आहे. 

ऊर्जितावस्थेला येते आहे.‌ संघर्ष सतत 

चालूच असणारी ही महाराष्ट्राची 

माऊली आहे.  तिच्या प्रत्येक 

कर्मचाऱ्यावर आणि प्रवाशावर विश्वास 

ठेवून , बहुजन हिताय बहुजन सुखाय 

या ब्रीदपूर्ततेसाठी ती सतत धावत 

आहे. 

चांगले वाईट सगळीकडेच असते. 

कच्चे दुवे सगळीकडेच असतात. एस्. 

टी. मध्येही आहेत, पण म्हणून ती काही वावगी ठरत नाही. ७४ वर्षे करोडो प्रवाशांची अखंड सेवा करणारी एस. टी. म्हणूनच आपल्याला आपली  वाटते.‌ 


पहिलेवहिले चालक वाहक 

 महाराष्ट्रात पहिली एस्. टी. 

अहमदनगर - पुणे मार्गावर ज्यांनी 

नेली ते चालक श्री. लक्ष्मण केवटे व 

वाहक श्री. किसन राऊत यांच्यासह 

आजपर्यंतचे सर्व चालक व 

वाहक म्हणूनच आम्हांला आपले 

वाटतात. इतकेच नव्हे तर एस्. टी. ला सतत तंदुरूस्त व उत्साही ठेवणारे 

महाराष्ट्रातले आजपर्यंतचे सर्व 

मेकॅनिक्स, कार्यशाळा, भांडार , 

कार्यालय यातील सर्व श्रेणीतील सर्व 

अधिकारी व कर्मचारी आपले वाटतात. 

यांच्याच जिवावर एस्. टी. अहोरात्र

धावते आहे. एस्. टी. ह्या 

जीवनरेखेची निर्मिती करणारे 

महाराष्ट्रातले सर्व संबंधित आम्हांला 

आमचे सगेसोयरे वाटतात.‌ 

महाराष्ट्राच्या ज्या मंत्र्यांनी , प्रशासकीय 

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एस्. 

टी.साठी मनापासून योगदान दिले आहे 

तेही सर्व आपलेच वाटतात . हा केवळ 

लाल डबा नाही, केवळ पत्रा नाही, 

एस् . टी. ही सजीव धावती 

गोष्ट आहे.  प्रवाशांप्रती तिचा 

समर्पित सेवाभाव अत्युच्च श्रेणीचा 

आहे. जी आपुलकी एस् . टी . ने 

चौऱ्याहत्तर वर्षे जपली आहे ती 

यापुढेही ती जपत राहील यात 

तीळमात्र शंका नाही.  प्रवाशीही 

एस्. टी. त्यांना जी आपुलकी 

देत आली आहे तशीच आपुलकी 

एस्.टी.ला देतील आणि महाराष्ट्राच्या 

ह्या वाहतूक जीवनरेखेशी सातत्याने 

ॠणानुबंध वाढवतील, जपतील, अशी 

खात्री बाळगतो आणि आपल्या

एस्.टी.ला मानाचा मुजरा 

करून इथेच थांबतो ! 


#मानाचा_मुजरा


... देवीदास हरिश्चंद्र पाटील




महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वेबसाईट 

https://msrtc.maharashtra.gov.in/



Maharashtra State Transport Corporation.

मंगळवार, २५ मे, २०२१

एक आवडलेली गोष्ट

 कोरोनाच्या ऐन भरातली ही डॉ . श्रीकृष्ण जोशी यांच्यासारख्या मातब्बर लेखकाकडून साकारलेली कथा.‌ तिच्यात काळजाला भिडणारं असं काही तरी नक्कीच आहे ! आपल्या ' मागे पुढे ' या पानासाठी बरेच दिवसांनी पोस्ट करीत आहे. अवश्य वाचा. व अभिप्राय द्या .‌‌‌‌‌...



*🌹इम्युनिटी अनलिमिटेड 🌹*


           *- डॉ . श्रीकृष्ण जोशी*


तिनं कटिंगचा ग्लास त्याच्यासमोर आदळला .

" हा चहा सातव्यांदा आणलाय , आता नाही म्हणालास तर..."

" सातव्यांदा ? मग माझ्या कसं लक्षात नाही आलं ? मग अगोदरच्या चहाचं काय झालं ?"

" आम्ही प्यालो ."

सगळे एका सुरात ओरडले .

" हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव . मोन्या , तुला आज नकला करून दाखवायच्या आहेत नाना नानी पार्क मध्ये , पण तिथल्या व्हीलचेअर वरच्या आजोबांचा हात हातात घे . त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही , याची काळजी घे . जगन , तू जिथं जाणार आहेस ,त्या अपार्टमेंटमध्ये चार जण पॉझिटिव्ह आहेत , त्या चारही जणांचे जेवणाचे डबे , त्यातलं अन्न गरम असेपर्यंत नेऊन दे . विन्या , त्या टीपॉय वर सामोसे , वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या आहेत , सगळ्या ऍम्ब्युलन्स मधल्या ड्रायव्हर्सना आणि स्मशान ड्युटी लागलेल्या सगळ्यांना दे आणि स्मशानात काम करणाऱ्या दादांना पण दे .कुणीही भुकेला राहता कामा नये . आता कोण राहिलं ? इरा , तुला दिलेल्या एरियातील हॉस्पिटलच्या बाहेर कुणी भांबावलेले , राहण्याची सोय नसलेले असे कुणी असतील तर त्यांची विचारपूस करून व्यवस्था कर , काही अडचण आली तर कॉल कर . नरेश तुझे पोलीस तुझी वाट पाहत असतील , त्यांना जेवणाचे पॅक नेऊन दे ."

" आणि तू काय करणार ? किमान तो चहा तरी पी ." आभा म्हणाली.


त्यानं चहा संपवला .


" - आणि कुठे कसं जायचं , आवश्यक ते फोननंबर्स अशी सगळी माहिती त्या टेबलावरच्या रजिस्टर मध्ये आहे . आणि हो , प्रत्येकाच्या नावाचं एक एक पाकीट ठेवलंय , त्यात खर्चासाठी लागणारी रक्कम आहे .ती कम्पलसरी घ्यायची आहे ."

" पण तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ."


" मी ? "


तो गप्प झाला .

त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं .

त्यानं ते वाहू दिलं .

" सॉरी वेदांत , आभानं असं विचारायला नको होतं , मी तिला सांगतो , ती नवखी आहे , उत्साहाच्या भरात विचारून गेली ."

जगननं त्याच्या खांद्यावर हात ठेवला .

" आम्हाला माहित्येय तू कुठे जाणार आहेस . " 

" ए चला रे , उशीर नको व्हायला ."


- सगळे निघाले .

आभा दारातून परत आली .

" सॉरी , माझं चुकलं " 

" इट्स ओके , चलता है , "

त्यानं डोळे पुसत आंगठा उंचावला .

ती बाहेर गेली .


त्यानं मोबाईल हाती घेतला . आणि व्हॉटसअपवर मेसेज टाइप करू लागला ...

" मित्रांनो , आभार नाही मानत मी तुमचे , पण कृतज्ञता व्यक्त करतो . तुम्ही आहात म्हणून इम्युनिटी अनलिमिटेड ला अर्थ आहे . थँक्स !"

मेसेज फॉरवर्ड करून तो उठला .

पुन्हा बसला .

 समोर भिंतीवर आजीआजोबांचं छायाचित्र होतं . 

त्यानं मनोमन नमस्कार केला .

आणि हृदयात कळ उठावी , तसा आभाचा प्रश्न मनात कल्लोळ माजवून गेला .

" तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ..."


काय सांगायचं ?

लहानपणी आईवडील गेल्यावर आजीआजोबांनी वाढवलं ते सांगायचं ?

की आजीआजोबांचा , दोघांचाही कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यावर बेड्स मिळाले नाहीत , ऑक्सिजन मिळाला नाही , ते सांगायचं ?

की ज्यावेळी ते तडफडत होते तेव्हा आपण मदत करू शकलो नाही हे सांगायचं ?

की खूप पैसे जवळ असूनही शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलायला , विचारपूस करायला आपल्याला जमलं नाही , शासकीय व्यवस्थेनं ते करू दिलं नाही , हे सांगायचं ?

की अंत्यदर्शनाऐवजी दोघांची डेथ सर्टिफिकेट्स तेव्हढी मिळाली , हे सांगायचं ?


-- विचार करकरून त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता .


आजीआजोबांना कुठं अग्नी दिला असेल ते माहीत नसल्यानं त्यानं स्मशानात अंदाजानं एका जागेसमोर उभं राहून हात जोडले . 

आणि जड पायानं परत फिरला .


थ्री बेडरूम किचनची मोठाली जागा त्याच्या अंगावर आली .

तो मटकन खाली बसला .


आजीआजोबांच्या छायाचित्राकडे बघताना त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं .


शेवटच्या दिवसात आजी आजोबांना काय वाटलं असेल ? 

त्यांची विचारपूस कुणी केली असेल का ? 

कुणी बोललं असेल का त्यांच्याशी ?

त्यांना वेळेवर जेवण मिळालं असेल का ?

तडफडत असताना माझ्या आठवणीनं हळवे झाले असतील का ?

आपण तरी ऑफिस टूर साठी जायलाच हवं होतं का ?

त्या सात आठ दिवसात सगळ्या भावविश्वात एवढी उलथापालथ ...?


सगळं चुकलंच म्हणायचं आपल्या कडून .


तो मनानं विदीर्ण झाला . खचला . 


पुढच्या आठदहा दिवसात तो वेड्यासारखा फिरत होता . 

हॉस्पिटल्स . 

स्मशानं.

ऍम्ब्युलन्स च्या जागा .

डॉक्टर्स , नर्सेस , सगळे कर्मचारी , पोलीस ...

सगळ्यांना भेटत होता ...


सगळ्यांचं एकच म्हणणं .

सगळ्यांनी इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे .

अन्न चांगलं हवं .

हवा शुद्ध हवी .

औषधं मुबलक हवीत .

शरीरापेक्षा मनानं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे .

आणि सर्वांनी संवाद वाढवला पाहिजे .


- ऍम्ब्युलन्स च्या एका ड्रायव्हरनं एकच वाक्य ऐकवलं .

तो म्हणाला ,

" विचारपूस करणारा कुणी असला की आम्हा सगळ्यांना बळ मिळतं . आणि माणूस कितीही आजारी असला तरी तो बरा होऊ शकतो ."


तो चक्रावला .

त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला .

तो तसाच घरी आला .

आणि त्याच्या डोक्यात अफलातून कल्पना आली .

त्याक्षणी त्यानं नोकरीचा राजीनामा पाठवून दिला , मेलनं .


आणि नव्या उपक्रमाची सुरुवात केली , *इम्युनिटी अनलिमिटेड* , या नावानं .

पुढच्या काही दिवसात तो पुन्हा सगळीकडे हिंडत राहिला .

आपल्यासारखे अनाथ झालेले शोधत राहिला .

त्यांच्या मनात तो उतरू लागला .

एकाचे दोन , दोनाचे सहा व्हायला वेळ लागला नाही .

काय करायचं ते स्पष्ट होतं .

पैशांचा प्रश्नच नव्हता त्याला .


संवाद साधायचा .

विचारपूस करायची .

कसलीही अभिलाषा न ठेवता , इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जेजे करता येईल ते करायचं .


आजी आजोबांना हीच श्रद्धांजली !


त्याला हवा तसा ग्रुप मिळाला आणि अल्पावधीत रिझल्ट्स मिळायलाही लागले .

दिवसेंदिवस ग्रुपमध्ये वाढ होत होती आणि अनेक ठिकाणाहून वाट पाहिली जात होती .


- तो उठला .

आभाच्या प्रश्नानं उठलेलं वादळ शमलं होतं .


त्यानं बॅग उचलली .

त्या बागेत असंख्य खेळणी , वैविध्यपूर्ण खाऊ , गोष्टीची पुस्तकं आणि बरंच काही होतं .


अगदी लहान वयात आईवडिलांचं छत्र हरपलेली अनेक बाळं , त्याची वाट पाहत होती .


डोळे पुसून , आजी आजोबांच्या छायाचित्राला नमस्कार करून तो बाहेर पडला ...


*- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी*

९४२३८७५८०६

-----------

कथा आवडली तर नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .


आणि हो , 

आपल्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अभिप्रायाची सुद्धा वाट पहात आहे .

मराठी गझल

 कोंडमारा


बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे

कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे


फिकाफिकासा ... उदासवाणा... मलूल आहे असा बिचारा...

अजून चाफा अबोल आहे... अजूनही दु:खं आत आहे


खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली 

तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे


 जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे

 तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे


 तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे


पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी 

रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !


अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे ...?

अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?


मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !

मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे ...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  





शुक्रवार, ७ मे, २०२१

नियोजित डीपी फौंडेशन

 


फौंडेशन, पेज व ग्रूपबद्दल थोडेसे : 

          डीपी फौंडेशन हे नियोजित फौंडेशन आहे.‌ त्याचा मूळ उद्देश वैचारिक जनजागृती हा आहे. फौंडेशनच्या नोंदणीबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल. मात्र कार्याची महती जाणून ते आधी सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे सद्या ऑफलाईन कार्य करणे कठीण झालेले आहे. मात्र जनजागृतीचे कार्य वैयक्तिक पातळीवर छोट्या स्वरूपात का होईना पण निश्चितपणे सुरू आहे. याला जोड म्हणून जनजागृतीचे कार्य ऑनलाईन सुरू करण्याचा निर्णय डीपी फौंडेशनने घेतला आहे. यासाठीच नियोजित डीपी फौंडेशनचे फेसबूक पेज दि. २९.०४.२०२१ रोजी तयार करण्यात आले आहे. 

        या पेजवर डीपीएफ जनजागृती ग्रूप हा ग्रूप बनवण्यात आला आहे. त्यावर 
दोन प्रश्नांची उत्तरे देऊन मराठीतून लेखन करणारी व्यक्ती अॅडमीनच्या परवानगीने प्रवेश घेऊ शकते. ह्या ग्रूपचा उद्देश अर्थातच ऑनलाईन वैचारिक जनजागृती हा आहे. 

          जनजागृती ही सतत करावी लागणारी प्रक्रिया आहे. सर्वसामान्यांना अनेकदा विविध संभ्रम, अफवा, क्लिष्ट माहिती इ.ना सामोरे जावे लागते. अनेकदा त्यांना गंडे घातले जातात.‌ तांत्रिक व अतांत्रिक अज्ञानाचा गैरफायदा घेतला जाऊन फार मोठी फसवणूक होते.‌ आपलेही फसवणूक करतात, परकेही फसवणूक करतात. कुटुंबात आणि उघड्या जगातही फसवणूक होते. काही वेळा स्वतःच्या अज्ञानामुळे, गैरसमजामुळे , चुकीमुळे वा दुर्दैवामुळेही माणसाची फसवणूक होते .‌ हे टाळण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे !

      आपणांस ग्रूपवर जाॅईन होऊन, दैनंदिन जीवनातील होणाऱ्या फसवणुकीपासून सावध करण्यासाठी लेख , कविता, चुटके, विनोद, स्फूट, चित्रे , आॅडीओ , व्हिडिओ यांचा उपयोग करून विपूल लेखन करता येईल असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फक्त विषय जनजागृतीबाबतच असावा. ग्रूपवर तसे काही विषय अॅडमीन देत असतातच. पण स्वतःला सुचलेले जनजागृतीबाबतचे विषयही लेखक मांडू शकतात.     

         ग्रूपवरील उत्तम लेखनास नियोजित पीडीएफ फौंडेशनच्या पेजवर मानाचे स्थान दिले जाईल. याशिवायही लेखकांना अन्य काही प्रकारे प्रोत्साहन दिले जाईल . 

          आपल्याला कुणाच्याही भावना न दुखावता लेखनातून जनजागृती करावयाची आहे. 

           आपल्याला कोणतेही आंदोलन करायचे नाही. कसलाही पाठपुरावा करायचा नाही. कोणतीही प्रकरणे हाताळायची नाहीत. 

            समयोचित व समतोल दृष्टीने  केलेले जनजागृतीवरील कसदार , उत्तम व मोजके आॅन लाईन लेखन ग्रूपवर अपेक्षित आहे. आपल्या वाचकांसाठी हेही खूप असेल. 

...................................... 

ग्रूपवरील विषय : 

१. कोरोनासंदर्भात अनेक माध्यमांकडून सतत माहिती दिली जात आहे. माहितीची विपुलता मोठ्या प्रमाणावर झाली की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत राहतो. कोरोनाबाबत असे होत आहे का व असल्यास त्यावर काय उपाययोजना करता येईल ? यावर भाष्य करा.

२. कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात काय काय मदत करता येईल ?

३. आपली ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपरिषद / महानगर पालिका याबाबत आपणांस काय माहिती आहे ?

४.फसवणूक ही ऑन लाईन आणि ऑफ लाईनही असते.‌ निवडणुकीत ऑन लाईन आणि ऑफ लाईनही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे ही मतदारांची फसवणूक ठरू शकते का ? चर्चा तर होणारच. (०५.०५.२०२१)

५. कोरोनामय मानसिकता (कोरोनाची भीती , कोरोना फोबिया) तयार होत आहे का ? 

(०७.०५.२०२१)

६. कुटुंबातल्या कुटुंबात कोणत्या प्रकारची फसवणूक होते ? 

(०७.०५.२०२१)


.........................................................


बुधवार, २८ एप्रिल, २०२१

स्फूट लेखन ७





दंतकथा पसरवणे हे आपले जुनेच काम आहे. दंतकथा मार्फत कोणाला तरी महात्मा बनवलं किंवा कसली तरी भीती समाजमनावर घातली की पिढयांपिढयांची सोय झालीच म्हणून समजा. खूप डोकं चालवलं बघा काहींनी !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

.............

माझे आॅफीसला उशिरा जाणे...


एके दिवशी मला आॅफीसला जायला उशिरा झाला. बाॅस जाम उखडला. दहा मिनिटे तो ताडताड तोंडसुख घेत होता. मी शांतपणे उभा होतो. मला माहीत होते मिस. राधिका अजून आली नव्हती व ती येण्याची वेळ झाली होती. तेवढ्यात तिच्या हाय हिल्सचा टाॅक टाॅक आवाज व्हरांड्यात आलाच. मी बाॅसला बोललो , सर राधिका आताच येतेय. तोपर्यंत ती लचकत मुरडत , पर्स हेलकावीत आमच्यासमोर येऊन उभी राहिलीही ! वर मधाळ हसत ती गुड मॉर्निंगही म्हणाली ! त्याचक्षणी मघाशी दहा मिनिटे मला ताडताड बोलणारा बाॅस माझ्याकडे न बघता यू टर्न घेऊन त्याच्या केबीनमध्ये अंतर्धान पावला ! विषय कट !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०३.२०२१    

............


भाईकाकांची रीतच न्यारी

अंधश्रद्धेला पडले लय भारी !


आमचे भाईकाका एकदम कडक माणूस. फक्त विमलाकाकींपुढे ते थोडेफार नरम पडायचे. काकींनी एकदा श्रध्दापूर्वक एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. काकांनी नाईलाज होऊन परवानगी दिली खरी. पण त्यांच्या मनात काही तरी घोळत होतं. वेळ रात्रीची होती. कार्यक्रम सुरू झाला. काकींनी चुलीत जाळ केला. धुपारटयात निखारे घेतले. त्यात धूप टाकला. धुपारटयासह त्या आत आल्या. सर्वत्र धूप पसरला. त्यासरशी काही एक महिला घुमू लागली. तिच्या अंगात आले होते.‌ थोड्याच वेळात आणखी महिला घुमूडोलू लागल्या. भाईकाका शांत चित्ताने पहात होते. ते चुलीकडे गेले. एका भांड्यात दोन तीन निखारे घेतले. झाकण लावून ते आत आले. तोपर्यंत घुमते जोरावर आले होते. जास्त घुमणाऱ्या बाईने विचारा काय विचारायचे आहे ते, असं म्हणताच काकांनी तू कोण आहेस, असं विचारलं. ती म्हणाली मी देव आहे. काका म्हणाले, सांग माझ्या हातात काय आहे ? तिने डोळे किरकिरे करून डबा म्हणून सांगितले. लोकांनी हात जोडले. डब्यात काय आहे, या प्रश्नावर ती अधिकच घुमू लागली. आरडाओरडा करू लागली. भाईकाका म्हणाले , सांग लवकर. ती काही सांगेना. भाईकाकांनी तिला हात पुढे करायला सांगितले. म्हणाले, देवा, तूच बघ काय आहे ते, असं म्हणत त्यांनी पटकन झाकण काढून निखारे देवाच्या हातात ओतले. देवाचे घुमते तिथेच थांबले आणि देव खरोखरचा आरडाओरडा करू लागला. काकींनी बर्नाॅल आणले आणि लावले. तोपर्यंत एकीमेकींचं बघून जोरजोरात घुमणाऱ्या आणि किंचाळणाऱ्या सर्व महिला तिथून गायब झालेल्या होत्या. भाईकाका शांतपणे सारं बघत बसले होते. त्यांच्या मनात घोळणारं हसू आता त्यांच्या गालावर पसरलं होतं.‌


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१     

.....................


देवाला जन्माला घालणारा माणूस 



                   देवाला जन्माला घालणारा माणूस मला सापडला ! तो चार अनुयायांना म्हणत होता , " मित्रांनो , हे विश्व कुणी निर्माण केले हे कुणालाच कळलेले नाही . अनेकांचा हातभार ह्या निर्मितीला लागला असणार . पण एकाचा वा अनेकांचाही शोध घेणे जमणारे नाही . असंख्यांची जंत्री करण्यापेक्षा हे विश्व कुणा एकानेच निर्मिले असे जाहीर करावे असे मला वाटते . "


                   यावर त्या चौघांनी सवयीनुसार माना डोलावल्या . यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला दूर निघून गेले . आपण हात जोडले, माथे टेकले आणि भक्तीत दंग झालो !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१

.....................


झाकली मूठ सव्वा लाखाची !


  देवाला जन्माला घालणारा तो म्होरक्या पुढे सांगू लागला , " असेही आहे की तो एक कोण आहे , कुठे आहे , कसा दिसतो हे प्रश्न विचारले गेले तर आपल्याला त्यांची उत्तरेही देत येणार नाहीत . यापेक्षा तो अदृश आहे असे सांगितल्याने हे सर्व प्रश्न आपोआपच संपुष्टात येतील ! ज्यांना शोध घ्यायचा असेल ते आयुष्यभर शोध घेत राहूदेत ! आपल्यापुरता हा प्रश्न आता कायमचा संपला आहे. हे विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे , तो सर्वशक्तिमान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो अदृश्य आहे , एवढेच आपण सांगायचे आहे . झाकली मूठ सव्वा लाखाची असते , एवढेच लक्षात ठेवा ! काय ? "


               यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला पुन्हा एकदा दूर निघून गेले . 


................


       एक माणूस स्वत:ला चौघांचा पुढारी म्हणवून घेत होता . तो त्यांना सांगत होता : " दोस्त हो , परमेश्वर मीच आहे ! तेव्हा माझ्या छत्राखाली या . जे येणार नाहीत ते माझे असणार नाहीत आणि जे माझे असणार नाहीत त्यांचे अस्तित्व सन 2021 नंतर राहणार नाही ! काय ? चला , लागा कामाला ! "



             गम्मत म्हणजे याही " काय ? " वर अनुयायांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ते माना हलवीत त्यांना सापडलेल्या परमेश्वराचा प्रसार करायला निघून गेले. ही बातमी आधुनिक मिडियाने पकडली आणि टीआरपी वाढवण्यासाठी दर तासांनी ब्रेकिंग न्यूजची सीडी लावून दिली !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१

..............

करणारे आणि ( ओरड ) करणारे 


सभेत जोरदार धूम:चक्री झाली. नेहमीचेच आरोप प्रत्यारोप झाले. सेक्स रॅकेट, बलात्कार हेच विषय होते. अखेर गुन्हेगारांना शासन केले जाईल या ग्वाहीवर ओरडणारे शांत झाले. त्यांना माहीत होते की जास्त ताणलं तर त्यांचीही लफडी वर आणली जातील. परवाच एकाने काॅमेंट केली होती. सेक्स रॅकेटबद्दल पण लिहा. खरं तर हे काही प्रथमच घडलेलं नाही. काही वर्षांपूर्वी शहरातल्या नामांकित शाळेच्या सहावी सातवीतल्या मुलांचं सेक्स रॅकेट गाजलं होतं. त्यावेळी करणारे आणि ओरड करणारेही वेगळे होते. त्यावेळी काॅमेंट करणारा कितवीत होता कोण जाणे ! आज करणारे आणि ओरड करणारे यांच्या केवळ जागा बदलल्या आहेत. सर्वोच्च अतीसभ्य संस्कृतीचे विकार तेच राहिले आहेत. जागा बदलून, सोयीनुसार आरडाओरडा करून उपयोग नाही. हे सर्व का होतं याचा विचार करून त्यावर उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. एकमेकांचे विरोधक बनण्यापेक्षा गुन्हेगारीवर एकत्रित काम झाले तर उत्तम. 



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०४.०३.२०२१

............................


माणूस हतबल झाला की त्याला काही सुचत नाही. तो सैरावैरा धावू लागतो. बुडत्याला काडीचाही आधार मिळत नाही. दररोज संकटांमागून संकटे येतात. अशा वेळी बहुतेक अखेरची आशा म्हणूनही तो भगत, बुवा , बाबा यांच्याकडे वळत असावा. नाईलाजाने अंधश्रद्ध होण्यावाचून त्याला पर्यायही रहात नसावा. याबाबत माणूसकीने पावले उचलली पाहिजेत.‌


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०६.०३.२०२१

............................

आपल्या मुलाचा विवाह करून देणे ही आई-वडिलांची प्रामाणिक ईच्छा असते. पण सगळयांच्याच जीवनात हे घडत नाही. काहींच्या मुलांची लग्नेच होत नाहीत. काही मुलेच स्वतंत्र निर्णय घेतात. काही आई वडिलांचेच मत वेगळे पडते ! काहीही असले तरी एक आंतरिक प्रामाणिक तळमळ पूर्ण होत नाही. त्या आई-वडिलांना व मुलांनाही काय वाटत असेल ! आयुष्यभर ते ह्या दु:खातून बाहेर पडू शकत नाहीत, हे त्यांचे दुर्दैव आहे ! यातून सर्वमान्य, सर्वांना आनंद देईल असा मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. वस्तु:स्थितीदर्शक व वास्तव विश्लेषण करून किमान उचित निर्णय घेणे आवश्यक आहे. 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०७.०३.२०२१

............................


काळाने खिंडीत गाठले आहे. काळ बेरकी गोलंदाज आहे. तो फिरकी टाकत नाही ; तर माझी फिरकी घेतो आहे. कालपरवापर्यंत मी त्याचा प्रत्येक चेंडू छान टोलवत आलो. सरळ , साधे जगत आलो. त्या लबाडाच्या हातून सतत निसटत आलो. तेल लावलेला ( किमान दुसऱ्या क्रमांकाचा तरी ) पैलवान ठरत आलो ! याचा राग त्यांने मनात ठेवला होता. आता ऐन साठीत त्यांने पाठीत घातलेल्या दणक्याने कात्रीत सापडलो आहे. रोजच कोंडमारा होतो आहे. मनावर घेऊ नका मित्रांनो. कधी तरी मी चिडेन आणि काळालाही भिडेन ! कारण अनेकदा, 


     माझ्यात बांधल्या मी पक्क्या अजिंक्य भिंती !

     माझी मला दिली मी सारी इथे उभारी !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०९.०३.२०२१

............................


मन लागो रे लागो रे...


एका ठिकाणी महिलांचे भजन सुरू होते . मन लागो रे लागो रे...भजन सम्राज्ञी लागो रे लागो रे , हे लागोरे लागोरे असे जोडून तल्लीन होऊन गात होती. शेजारीच भांडण सुरू होते. एक म्हातारी कुणा तरी बाईला म्हणत होती , लागोरा रांडू... विषय कट ! 



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०३.२०२१

............................

कोमावारसाहेबांनी मला गायकवाड साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटायला या असा निरोप द्यायला सांगितला. आॅफीस सुटण्याच्या वेळेलाच मी तिथे गेलो. दरवाजा बाहेरच बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते : फक्त सुपरिटेंडेंटनाच भेटून आपले म्हणणे सांगा. मी साहेबांना ओळखत नव्हतो. दबकत दबकत मी सुपरिटेंडेंटसमोर उभा राहिलो. टेबलावरची नेमप्लेट न बघताच मी बावळटपणाने इथे गायकवाड साहेब कोण ? असे विचारले. ते म्हणाले, " मीच. काय काम आहे ? " मी नेहमीच्या आवाजात कोमावारसाहेबांनी आपल्याला भेटायला बोलावलंय , असं सांगितलं. ते म्हणाले , " बसा, बसा , बसा. हळू बोला. " बसल्यावर मी पुन्हा आॅफीस सुटल्यावर बोलावलंय, असं सांगितलं. ते थोडे थांबले आणि माझ्याकडे बघत म्हणाले, " चेहऱ्यावरून तुम्ही कवी वाटता." मी उडालोच. त्यांनी अचूक कसे काय ओळखले हा प्रश्नं मला पडला. ते पुढे म्हणाले, " तुम्ही जा आणि त्यांना येतो म्हणून सांगा. आणि हो, असे निरोप हळूच सांगा. तुम्ही भाबडे आहात म्हणून सांगतो. " पुढेही या दुनियेचे व्यवहार कळायला मला खूप वर्षे लागली, हे सांगायला नकोच ! विषय कट !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०३.२०२१

............................


तुमच्याकडे कसं आहे ?


कुटुंबात तीन माणसे. तो, ती आणि मुलगा. तो मोबाईल मध्ये मग्नं. ती एकाच वेळी मोबाईल आणि टीव्हीमध्ये मग्नं. मुलगा मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये मग्नं. जुनी माणसं उगाच म्हणायची, " घरात माणसं असली तरच घराला घरपण असतं " . आता माणूस घरातल्या घरात जवळ असूनही दूरपण असतं ! विषय एवढाच ! बाकी तुमच्याकडे कसं आहे ?

 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०३.२०२१

............................

बबन एवढंच म्हणाला, बंड्याने अजून वाडीचा ग्रूप बनवला नाहीय. बबनची बायको लगेच म्हणाली, तुम्ही त्या टीव्हीवाल्याला आणि गिझरवाल्याला किती दिवस फोन करताय ! बबन गप्प ! 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२६.०३.२०२१

...........................

शाळेत जायच्या आधीच आई मला शिकवायची‌ . बबन कमळ बघ, हे मी छप्पन्न वर्षांपूर्वी वाचलेलं आणि लिहिलेल़ही पहिलं वाक्यं. काही कालची पोरं मी आजच कमळ बघतोय या समजूतीत आहेत म्हणून सांगितलं इतकंच 😁😁😁😁😄😄😀😀


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०३.२०२१

...........................

बागूलबुवा


लहानपणी अनेकांना त्यांच्या आज्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भीती घातली असेल. ते आता आजी-आजोबा झाले तरीही आज्ज्यांऐवजी मनावर भीती घालणारी यंत्रणा कार्यरत आहेच. अनेक गोष्टींचा बागूलबुवा आजही उभा केला जातो आहेच. समाजमाध्यमांचा यासाठी मोठ्या धूर्तपणे उपयोग केला जात आहे. एकूण काय , आपण कोणत्याही काळात दहशतीखालीच रहायचे. कोणाला ना कोणाला तरी घाबरूनच रहायचे. कुणी चुकून मुक्त जगा म्हटलंच तर तेही दबक्या आवाजात म्हणायचं. अनावश्यक भीती जनमानसावर घालणाऱ्यांचं काय करायचं हा प्रश्नंही कुठेतरी दबला जात असावा, असं वाटतं ! 

...........................

१९.०४.२०२१ : 


परवा एकाचा फोन आला. म्हणाला, तो मेसेज वाच. त्याचा मेसेज एका मंत्राच्या उच्चारणामुळे होणाऱ्या फायद्यांचा होता. मी म्हटले, वाचला. तो खूष झाला. चार दिवसांनी मी त्याला एक मेसेज पाठवला. चांगले वागण्याचे फायदे. मी पण फोन केला. म्हटले वाचलास का ? तर म्हणे , " अरे कुठचा वाचतोय ! बघितलाच नाहीय. सकाळपासून घरात भांडणं, शेजाऱ्यांशी पण भांडणं चाललीयत नुसती. " मी विषय सोडून दिला. 


...........................


          जास्त बोलण्यामुळे सिम्पेथिटेक नससंस्थेवर परिणाम होतो. एक तास बोलण्यामुळे पाच तास शारीरिक कामासाठी लागणारे रक्त व स्नायूंची शक्ती खर्च होते. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे हे ताणास निमंत्रण देण्यासारखे असते. 

...........................


२०.०४.२०२१

युगे युगे मी संभ्रमी ! 


कुछ तो गडबड हैं दया...दया दरवाजा तोड दो...दया...दरवाजा तोड दो....

या डायलाॅगची उगाचच आठवण येते...खरंच उगाचच असेल का हो ? दरवाज्याच्या आत खरेच कोरोना असेल का ? की काही नवीनच वाढून ठेवलंय तिथे ? रात्रीस खेळ चाले सुरू आहे. रघू सांगतोय, " तो आसा, तो बघताहा ! " खरेच तो आहे ? बघतो आहे ? घेणार आहे का जबाबदारी ? यापूर्वी तीन चार वा जास्त वेळाही असले भयावह आजार आणि संकटे जगावर कोसळलीयत राव ! सगळ्यांचा शेवट असाच... काय वाढून ठेवलंय पुढे , हा प्रश्नं प्रत्येक वेळीच उपस्थित झाला आहे. आजही ओठांवर येतोय. राजकारण करणारे राजकारणच करीत आहेत. लढणाऱ्यांचा अभिमन्यू होत चाललाय. प्रत्येक वेळी हे असेच का होत आहे ? सत्य नक्की काय आहे ? की मी आपला युगे युगे संभ्रमीच ? 

...........................

काही माणसे इकडचं तिकडे करण्यासाठीच फिरतात. दुसऱ्याकडे जायचे, तिसऱ्याचा साळसूदपणे विषय काढायचा. दुसरा काय बोलतो ते कानांत साठवायचे आणि तिसऱ्या चौथ्याकडे जाऊन आपले चार शब्द त्यात घालून आग लावून द्यायची. हेच यांचे छुपे उद्योग. काहींची प्यादी म्हणूनही ही मंडळी काम करतात. काही लोक तुमच्याशी गोड राहतात, पण तुमच्या मागे अशा प्यादयांचा वापर करून तुम्हांला उपद्रव देतात. तुम्हीच जर हलक्या कानाचे असाल आणि सहज हुकसवले जाऊ शकत असाल तर मग प्यादी आणि त्यांच्यामागे लपलेले उपद्रवी यांच्या हातात आयते कोलीत देता. माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर ते जाळीतच सुटणार. आग लागली. विषय संपला.


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०४.२०२१

............................