गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

Corona virus capturing minds

मागे - पुढे

29.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग छत्तीसावा दिवस.  पिंपळपानाचा काढा उकळत ठेवला आणि पावणेसातला नेहमीच्या वेळेवर पाणी बघायला मागच्या दारी आलो. पाणी आलेले नाही.  तिकडे बंदू वाट बघतोय आणि  इकडे मी. अखेर सात वाजता पाणी आले. मी सौ. ला उठवले आणि पाणी भरायला आलो. पाणी भरून झाले तसा पुढे हाँलमध्ये येवून आत येणारी सूर्यकिरणे अंगावर घेत बसलो. साडेसातपर्यंत सूर्यप्रकाश बरा होता. पण मग आकाशात ढग जमू लागले. चहा पिऊन होईपर्यंत बारीक बारीक पाऊस पडू लागला ! लहानपणी या पहिल्या पावसाचे किती अप्रूप असायचे ! तेव्हा ऋतूचक्र कसे नियमित असायचे.  पण आता  कोणताही ऋतू कधीही सुरू होतो. अवेळी पाऊस येतो तरी किती वेळा ? निसर्गा , तुझे आता फारसे अप्रूप राहिले नाही, कदाचित माझी पिढी आता साठीत आली म्हणूनही असेल कदाचित ! याच साठीतल्या आणि पन्नाशीतल्या काही बायका डोंगरावर सकाळच चिकनपार्टी करायला चालल्या आहेत ! तिकडे खाली मासेबाजारात गर्दी झाली आहे . आज बुधवार आहे. वार कोणताही असो, महामारी असो वा पाऊस असो , माणसे जिथे जायची तिथे जातातच आणि करायचे ते करतातच ! गंमत म्हणजे माझ्या या शब्दांशी सौ. चिकनपार्टीला निघता निघता सहमती दर्शवत होती ! स्नेहाचे फोन येत होते. पाऊस नुसताच जरासा  रिमझिमला आणि गेला . ही बाहेर पडली तेव्हा सूर्य आशेची किरणे पुन्हा दाखऊ लागला होता. पावणेनऊ वाजता पुन्हा सूर्यकिरणे गायब झालीत तेव्हा मी मागच्या दारी आलो. बंदूच्या घरात नुकताच सत्त्या स्थानापन्न होऊन घाम पुसत बसला आहे. आजकी बात सुरू झाली आहे. हळूहळू बंदूमंडळातील इतर सभासद येतील. पुढच्या दारी आलो तर गेट उघडून लंबूवहिनी अलगद गच्चीवर सुकवण घालायला जाते आहे. मीही अलगदपणे दरवाजा लावला . म्हणजे मांजर जर डोळे पिऊन दूध पीत असेल व तिला वाटत असेल की आपल्याला कोणी पहात नाही , तर राहू दे ना तिला तिच्या भ्रमात ! सुकवण घालून झाले तशी लंबूवहिनी गेट उघडून मांजराच्या आल्या पावलांनी जाते आहे. आज काही बातमी नसावी ! त्यात ही घरात नाही ती बातमी तिला आधीच लागलेली आहे ! माणसे चँप्टर का असतात ? ती साधीसरळ का वागत नाहीत ?

       आंघोळीनंतर श्रीपाद श्रीवल्लभांवरील पुस्तकातली आरती म्हणून बाहेर आलो तोच ज्येष्ट गझलकार मित्र वा. न. सरदेसाईंचा फोन आला. सद्या ते भांडूपमध्येच आहेत. त्यांचा मुलगा प्रमोद हाच त्यांची प्रसिध्दी करत असतो ! आजकाल हे फारच दुर्मिळ आहे ! मला प्रमोदचे खूप अप्रूप वाटले. माझ्याही मुलाचा मी काय लिहितो इकडे बारीक लक्ष असतो , पण प्रमोद त्याही पलीकडे आहे. वडिलांच्या कविता, गझलावगैरे तोच प्रसारीत करीत असतो ! हा फोन झाला आणि दुसरा फोन आला. अननोन नंबरवरून . पण ती मुलगी विचारत मात्र होती की , '' पाटील सर , संकूलची चावी तुमच्याकडे आहे ना ? '' बोलणारी माणसं कोण बोलतंय हे न सांगताच सरळ बोलत सुटतात. मी संभ्रमात ! मी नाही म्हणालो आणि कोण बोल...म्हणतोय तोपर्यंत फोनच कट केला गेला ! तिला हवा होता तो मीच पाटील सर होतो की आणखी कुणी पाटील सरांना तिने माझ्याच नंबरवर फोन केला होता ? बरं सौ.कडे कोणी चावी दिल्याचंही ती बोललेली नाही ! दिवस असा पुढे सरकतो आहे. सौ. तिकडे साळकायामाळकायांसोबत हड्डी  तोडत असणार. मी इकडे लिहीतोय ! वागवली परिसरातले काही फोटो पहा .
 
 
 

 जाधव  मॅडमच्या गझलची आठवण झाली आहे. त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या गझलला व्हॉट्सॲपवरच थोडे लाईनवर आणतो आहे. नवी पिढी हुशार आहे. फारसा हात फिरवावा लागत नाही. लवकर पीकअप करतात. जाधव  मॅडम महाविद्यालयीन शिक्षिका असल्याने खूप बिझी असतात.  त्यांना गझलसंर्भात फोनवर चर्चा करणे वेळेअभावी शक्य नव्हते. म्हटले चला, आपण त्यांच्या मनाने त्यांची गझल समजून घेऊ आणि आवश्यक असेल तरच बदल करू. तेही थेट व्हॉट्सॲपवरच !  आवश्यक तो बदल करून गझल व्हॉट्सॲपवरच पाठवून दिली आहे ! मलाही हा नवा प्रयोग आहे. कागदावर मांडून वेळ घालवण्यापेक्षा थेट मोबाईलवर काँपीपेस्ट करून बदल करणे बरे वाटले ! जाधव  मॅडमचा आलेला प्रतिसाद पाहता मला हे ब-यापैकी जमेल असे दिसते आहे.  नव्या पिढीकडून अशा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गझल संपल्यानंतर सव्वा वाजता एकटाच जेवलो.  नंतर शतपावली तर दोन तास झाली ! वामकुक्षी काही जमलीच नाही. मोबाईलवरच होतो. टीव्ही मात्र लावला नाही. तेवढीच शांतता ! फेसबुकवर अभिनेता इमरान खान  गेल्याच्या पोस्टस् आल्यायत. एक कसलेला उमदा अभिनेता चटका लावून गेला.  भावपूर्ण श्रध्दांजली.

        चार वाजता पुन्हा आकाश भरून आले. हयावेळी खूपच . दहापंधरा मिनिटातच वारा आणि पाऊसही सुरू झाला. तो पंधरावीस मिनिटं पडला. पावसामुळे सौ. पार्टी डोंगरावरच अडकली होती. सव्वा पाच वाजता ती घरी आली. सहा वाजता लाईट गेली ती पावणेआठ वाजता आली. सौ. ने टीव्ही लावला आहे. केंद्राने प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नसल्याचे म्हटले असले तरी लीलावती रूग्णालयातील कोरोनाबाधितावर त्याव्दारेच यशस्वी उपचार झाले , अशी बातमी सुरू आहे. धारावीत 24 कोरोना फायटर्स स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहेत . याला खरी छाती म्हणतात, खरी हिंमत म्हणतात !  सर्वत्र कोरोनाचा विषय आहे. सर्वात वाईट म्हणजे काही थिल्लर बिनडोक अर्धवटराव याही स्थितीत राजकारण करत आहेत ! याहून वाईट म्हणजे त्यांच्याकडे आपली अक्कल गहाण टाकलेली शेंबडी पोरे फेसबूकवर राजकारण करत आहेत ! शिकूनही अडाणी असलेली काही कच्ची मडकी एकमेकांना अंधभक्त आणि गुलाम म्हणू लागली आहेत , यावरून यांना देश आणि देशभक्ती किती कळते, यांची पोच किती , हे कळते. कोरोनाने अनेकांच्या डोक्यावर परिणाम केलेला दिसत आहे. आपण झोपायला गेलेले बरे, कारण आपली साठी सुरू आहे ! बुध्दी नाठी होऊन उपयोग नाही !  झोपायला जाता जाता व्हॉट्सॲप पाहिले तर अमेय धोपटकरांचा मेसेज आलेला. त्यांनी कविता क्वारंटाईन या पेजवर माझा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याची लिंक येथे देत आहे. कविता क्वारंटाईनमध्ये गझल
( क्रमश: )
...........







   








मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

असा एक दिवस...

मागे - पुढे

28.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग पस्तीसावा दिवस. काल संपूर्ण रात्र दोघांनाही झोप लागली नाही. गोळी न घेतल्याचा परिणाम. रात्री दीड वाजता मुलाला फोन केला तर त्याचे वर्क फ्राँम होम सुरू होते. मग ही यूट्यूबवर व्हिडीओ बघत बसली आणि मी कोरावर उत्तरे देत बसलो. मला माझाच एक शेर आठवून हसू आले. तो असा आहे : 

        माझ्यापाशी जगाला हवी ती उत्तरे नव्हती !
        मी असा प्रश्न होतो जो कुणाला पडलो नाही !
....आणि असा मी रात्री दोन तीन वाजता कोरावरच्या प्रश्नांना उत्तरे देत बसलो होतो ! .... काय बोलणार ! तर....कित्येक वर्षांनी ही पहाटे पावणेपाचला उठली व नित्यकर्माला लागली. तिथपर्यंत मीही टक्क जागा होतो. नंतर माझा डोळा लागला असावा. सहाला जाग आली तेव्हा मी नुकताच स्वप्नातून बाहेर पडलो होतो. स्वप्नं अगदी बेकार पडले . अगदी विचित्रच ! आम्ही कुठल्या तरी बिल्डींगमध्ये दोघेही एका भींतीला डोकी लाऊन उभे आहोत. डोक्यापासून पायापर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत. सगळया शरीरावर रक्तच रक्त पसरलेले आहे. मी सौ.ला सांगतो की आपल्या आधीचे जोडपे भींतीला लागलेली डोकी काढून बाजुला न झाल्याने गत:प्राण होऊन बाजुला पडलेले आहे. आपल्याला काहीही करून भींतीला लावलेली डोकी मागे घेऊन इथून पटकन गेले पाहिजे. त्या प्रयत्नात असतानांच मला जाग आली. मी हे स्वप्नं सौ. ला सांगितले नाहीय. आज काय घडेल सांगता येत नाही. काही वाईट घडू दे नको म्हणजे झाले. आता धक्के सहन होत नाहीत. आज तिने परिसर सफाई केली.  वरच्या टाकीत पाणीही चढवले . पिंपळपानांचा काढा पिऊन व मला प्यायला सांगून ही झोपली ती आठ वाजता उठली . दरम्याने मी नळाचे पाणी भरले . आज व्हिडीओ करून अमेय धोपटकरना पाठवायचा आहे , त्याची तयारी केली. दोन तीन सुटे शेर व एक संपूर्ण गझल निवडून ठेवली. कलाकाराला अशावेळी शांतता लागते. सलग शांतता लागते. आमच्याकडे कागदपेन घ्यायचा विचार करतो नाही तोच अर्जंट प्रापंचिक हाक येते , अहो, तो नारळ फोडा , कडीपत्त्याचे टाळे आणा नाही तर आधी आंघोळ करा, एकवीस दुर्वा काढा वगैरे वगैरे ! स्वयंपाकघरातून ही हाकही अशी नेमकी वेळेवर येते ना... म्हणजे कमालच म्हणायला हवी...लग्नाचा मुहुर्त एक वेळ चुकेल , पण हा मुहुर्त कधीच चुकला नाही ! एवढे परफेक्ट टायमिंग सचिन तेंडूलकरकडे पण नाही (त्याच्या पत्नीकडे असणारच !) . आज अठ्ठावीस वर्षे सतत हा एकच जिवंत अनुभव घेतो आहे ! प्रपंच नेटका करण्यात कोणतीही कसूर न ठेवणारा मीही कधीकधी ऐन वेळच्या हया हाकांनी त्रस्त होत असतो. बरे ही हाकही इतकी अधीर असते ना की आपणाला क्षणाची उसंत मिळू शकत नाही. अशावेळी माझ्यातला नवरा माझ्यातल्या कलाकारावर सवयीने मात करत राहतो . शेवटी सौ.चाही नाईलाज असतो. तिलाही कामे असतातच व हक्काचे असे स्वयंपाकघरातील कामे करणारे तिसरे कुणीच नाही !( कोरोनाच्या काळात धर्मयुध्द खेळत बसणारी लंबूवहिनी तर आपल्याला परवडणारच नाही ! ) अठ्ठावीस वर्षे तेच तर करत आलो आहे. सवय झाली आहे आता. यातूनच काही तरी निर्मिती करण्याचा , छंद जोपासण्याचा कसाबसा प्रयत्न करत जगतो आहे. मनाप्रमाणे जगायचा विचार केला तरीही क्षणाप्रमाणेच विचार करावा लागतो. दुपारी बारा वाजता ही मिलेशच्या गाडीवरून मसाल्याच्या गिरणीत गेली तेव्हा मी व्हिडीओकडे वळायचा विचार करत होतो. खुर्चीसमोर टेबल ओढले तोच वरच्या बाजूस अगदी घराशेजारीच आंबे काढायला गडी आले . मग त्यांचा आरडाओरडा सुरू झाला. आता कसला डोंबलाचा व्हिडीओ बनवणार ! सांगितलेना क्षणापूर्वी की मनापेक्षा क्षणाप्रमाणेच जगावे लागते ! क्षणापुढे शरणागती पत्करून गप्प बसलो. सौ. गिरणीतून आली. नंतर आम्ही जेवलो. आता जेवल्याजेवल्या ही रूपाचा फोन आल्याने उन्हातून धावत तिच्याकडे गेली आहे. मागचे दार उघडले तर शेजारीच वबीनाच्या अंगणात शिरकाव करून विरेश कुठून तरी धान्य मिळवून आणून वाटप करीत बसलाय. ही बहुतेक तिकडेच धावली . खरोखरच्या गरीबांना धान्य मिळायला हवे आहे. आम्हांला निदान आता तरी देणे चूक आहे. पण बायकोपुढे बोलणेही चूक आहे !  अशावेळी आपण काय बोलणार , नाही का ? क्षणाप्रमाणेच जगणार ! जाऊदे ! आता बघा किमान तासभर तरी मला रिकामा वेळ आहे , पण जेवल्याजेवल्या रेकाँर्डींगही योग्य नाही , म्हणून शतपावली सुरूवात केली. अर्ध्या तासाने रेकाँर्डींगची जुळवाजुळव केली आणि सुरूवातही केली. गझलच्या  पाचपैकी चौथ्या शेरावर आलो आणि खालचे गेट वाजले. व्यत्यय आलाच. मी रेकाँर्डींग बंद केले आणि बघतो तर लंबूवहिनी आलेली. मी खिडकीतूनच सौ. घरी नाहीय म्हणून सांगितले तशी ती गेली. पाच मिनिटांनी मी नव्याने सुरूवात केली तर पहिला शेर संपतासंपता पुन्हा गेट वाजले. सौ. आली ! दुसरा व्यत्यय आला ! मग मी माझा गाशा माझ्या घरातून गुंडाळलाच आणि खालच्या घरात जाऊन रेकाँर्डींग करून परत आलो तर ही झोपलेली ! रेकाँर्डींग फारसे चांगले झाले नाही. एक तर कालच्या रात्रीचे जागरण , वयानुसार आवाजावर आलेली बंधने आणि सकाळपासून येत गेलेले व्यत्यय बघता मात्र ते ठीक झाले असे म्हणता येईल.  खालच्या घरात असतांना गेट वाजवत कोणी आले नाही , हे नशिब ! तरी सुरूवातीची दोन तीन मिनिटं कावळ्यांनी व्यत्यय आणलाच ! त्यांच्या कर्कश पार्श्वसंगीत सुरूवातीला तरी लाभलंय बुवा !  काय करणार, क्षणाप्रमाणे जगतो आहे. मनाप्रमाणे थोडाच जगतो आहे !अमेय धोपटकरांना सर्व साहित्य पाठवलं तोपर्यंत चहाची वेळ झाली. मग काय लवंडताही आलं नाही. पुन्हा क्षणाप्रमाणेच ! 

          चहा झाल्यानंतर उद्याच्या लेडीज मटन पार्टीच्या वाटपासाठी लसूण सोलून दिली. ही कांदालसूण शेगडीवर ढवळत असतांना लंबूवहिनी कांदेवाला आलाय म्हणून किंचाळत धावत आली ! ती धावली म्हणून ही धावली. जवळपासच्या सगळया धावल्या ! ही बायकांची सवयच असते. मी कांदालसूण ढवळत राहिलो. ही कांदे घेऊन आली तेव्हा मी सुटलो. पुढच्या पायरीवर लेखन करीत बसलोय. पावणेसहा वाजलेयत. मुलाला फोन केला. तेवढयात स्नेहा आली. पांडवीनकाकी आली. ही मैफील जमली. तेवढयात बंदूही वरती आला. तोही सामील झाला. अखेर मी झाडांना पाणी द्यायला उठलो तशी मैफीलही उठली. आज खालच्या बागेतल्या झाडांना पाणी दिले. सायंकाळ नेहमीसारखीच ढळली. कातरवेळ सरली. रात्र आली. आता नऊ वाजून गेलेत. सौ. ने सात वाजताच गोळी घेतली आहे. मी आता घेतोय. बघूया किती वाजेपर्यंत झोप येते ती. तसा आजचा दिवस चांगला नव्हताच. अर्धा दिवस तर मूड गेलाच होता. सकाळी एखादं माणूस आपला मूड बिघडवतं , मग दुपारपर्यंत याचीच पुनरावृत्ती करणारी माणसे भेटत राहतात. हे चक्रच असते. दुपारनंतर जरा बरी परिस्थिती आली. मूडही जरा बरा होता. संध्याकाळी झाडांना पाणी मिळाल्यावर तर खूपच फ्रेश वाटले. अरे हो, आज दिवस असा काही गेला की जाधव मॅडमच्या गझलकडे लक्ष द्यायलाच विसरलो. (आज स्वत:च्याच गझलचा विचार करण्यात बराचसा वेळ गेला ! ) जाधव मॅडमची क्षमा मागितली पाहिजे. कालच्या त्यांच्या *भारत शिक्षण मंडळाचे,  देव-घैसास-कीर कला,वाणिज्य ,विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय,रत्नागिरी* यांच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष (IQAC) सहाय्याने *कोरोना कोविड १९* विषाणूमूळे महाराष्ट्र व भारत सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांची दैनंदिन जीवनशैली बदलून गेली आहे. हा बदल एक भारतीय सुजाण नागरीक म्हणून *लॉकडाऊन काळातील बदललेली जीवनशैली* हा बदल कसा स्वीकारत आहात, याबद्दलचे सर्वेक्षण महाविद्यालयामार्फत करीत आहोत.यासाठी 
https://forms.gle/v3JKyffkmkD6AGYW7
दिलेल्या लिंकवरती क्लिक करा व त्यानंतर येणारी प्रश्नावली  सोडवा.  या संदेशानुसार,  लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनशैली बदलून गेल्याबाबतची प्रश्नावली आताच सोडवली. 


( क्रमश: )
...........







     








सोमवार, २७ एप्रिल, २०२०

लाॅकडाऊन पुढे चालू....

मागे - पुढे

27.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चौतीसावा दिवस. आज सोमवार आहे म्हणजे पाणी येणार नाही. त्यामुळे संध्याकाळी पाण्याचा शिल्लक साठा बघूनच झाडे शिंपायचा विचार करू. मागे जाऊन वरच्या टाकीत पंपाने पाणी चढवून घेतले व इतर कामांकडे वळलो. साडेनऊच्या सुमारास पांडवीन काकी माड साफ करणा-याला घेऊन आली. मग त्याच्याकडून माड साफ करून घेतले . तो म्हणाला लॉक डाऊन आहे म्हणून मी सापडलो. नाही तर राजापूरवगैरे लांबच्या भागात माडाची कामे नाही तर आंबे काढायला गेलो असतो. त्याचं नांव घाणेकर. त्याच्याकडून आमच्या भागातील  तीन चार जणांनी माड साफ करून घेतले व नारळही पाडून घेतले. लॉक डाऊन काळात बिचा-याला थोडी कमाई झाली. माड साफ करीत असतांना लंबूवहिनीची मुलगी येऊन गेली. लंबूवहिनी चिंगूळ फँक्टरीत गेल्याचे कळले. ही फँक्टरी गावातच आमच्यापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. दुपारी बीना येऊन सौ.शी बराच वेळ बोलत बसली होती. तिच्या मनातून मुख्य बोच जात नाही तोपर्यंत ती अशीच अवांतर विषयांवर बोलत राहणार. आपण आनंदी आहोत असे भासवत राहणार.  लग्नाचे वय होऊन चालले की काय वाटते ते तिच्याकडे बघितल्यावर कळते. खूप वाईट वाटते , पण काही करता येत नाही. बीना गेली तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. आज सोमवार असल्याने सकाळी दहा वाजताच लाईट गेलेली आहे. ती दुपारी अडीचतीनच्या दरम्याने येईल. लाईट नसल्याने सौ. ला जेवतांना टीव्ही लावता आला नाही. एक बरे झाले म्हणजे कोरोनाच्या त्या भीतीदायक व सततच्या बातम्या निदान आज तरी जेवतांना बघाव्या , ऐकाव्या लागल्या नाहीत ! किती तरी दिवसांत जरा शांतपणे जेवता तरी आले. त्याचा परिणाम असा झाला की नंतर वामकुक्षी घेताघेता चांगलीच झोप लागली. म्हणजे तीन ते पाच वाजेपर्यंत ! जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने गावात माणसे जरा रस्त्यावर दिसू लागली आहेत. अर्थात मास्क लावूनच फिरतायत. 

       संध्याकाळ झाली आहे. लंबूवहिनीने गावातून दूध आणून दिले आहे. आज ती कामाला गेली होती , तिचे चलन सुरू झाल्याने ती फ्रेश दिसते आहे. आज पाणी कमी शिल्लक असल्याने खालच्या बागेतल्या झाडांना शिंपता आले नाही. मात्र आमच्या मागच्या दारच्या कलमाला व माडाला थोडेसे पाणी लावले. उन्हाळा असल्याने माती टणक झाली आहे. त्यामुळे झाडांच्या भोवतीची माती थोडी थोडी सैल करतो आहे.  त्यामुळे झाडांभोवती पाणी खेळू लागले आहे व भवतालच्या जमिनीतही मुरू लागले आहे. झाडांभोवती पाणी गोलगोल खेळू लागले की खूप छान वाटते.
 
खालच्या बागेत हे काम ब-यापैकी आधीच केले आहे.  तिकडे वेंगुर्ल्यातून भाचीने पाठवलेले पेरूचे छोटेसे कलमही आता ब-यापैकी वर आले आहे.
बागकामातून वेगळाच आनंद मिळतो. मला व्यवहारी गणित जमत नाही म्हणून नाही तर फळबाग करून समाधान व उत्पन्नही मिळवता आले असते. नोकरीत तेहतीस वर्षे गेली. आता काही गणितेही बदलली आहेत. मुलाला नोकरी आहे व त्यालाही तीच करावी लागेल असे दिसते आहे. फळबागेचे गणित जमले असते व दरमहा किमान त्याच्या पगाराइतका पैसा मिळाला असता तरी नोकरीतून त्याची सुटका करून त्याला फळबागायतदार बनवला असता. पण शेवटी कोणताही धंदा बेभरवशी असतो , हे पूर्वी मीच दोनतीनदा फटके आणि चटके खाल्ल्यामुळे चांगलेच कळलेले आहे. मी नोकरी सोडली नाही हेच नशिब ! पण कसला तरी व्यावसायिक व्हायचे हे माझे नोकरीला लागायच्या आधीपासूनचे मनसुबे. ते मनसुबेच राहिले आहेत. कुठे तरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते , हे सुरेश भटांनी जणू माझ्याचबाबतीत लिहिले असावे , इतके दैवाने मला हेलकावे दिले आहेत , अजूनही देत आहे ! पण मीही ' माझ्यात बांधल्या मी पक्क्या अजिंक्य भींती, माझी मला दिली मी सारी इथे उभारी ! ' या माझ्याच शब्दांनी मला धीर देत लढत आहे. आता रात्र झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. सौ.ने बातम्या लावल्या आहेत. मी पुढे बाहेर पायरीवर बसून लेखन करतो आहे. छान गझला लिहिणारे  विजयानंद जोशी यांच्याशी गझलबाबत चर्चा होतेच. काल अभ्यासू  शुभम कदमबरोबर गझलबाबत चर्चा सुरू होती . तर आज वसुंधरा जाधवांशी गझलसंदर्भातच बातचीत सुरू आहे. त्यांचीही गझल आता वेगळया टप्प्यावर आली आहे. गझलची ओढ आणि लय याच्यातच गझलीयत लपली आहे. परवा अमोल पालयेचा कविता क्वारंटाईनच्या अमेय धोपटकर यांचा फोन येईल असा मेसेज आला होता. तो फोन थोडया वेळापूर्वीच आला. त्यांना उद्या व्हिडीओ पाठवतो म्हणून सांगितले आहे. अमेय धोपटकरांचा हा उपक्रम रत्नागिरीतील काव्यविश्वाला नवसंजीवनी देणारा तसेच काव्य निर्मितीला प्रोत्साहनही ठरेल , यात शंकाच नाही. हया सर्व ताज्या दमाच्या निर्मितीकारांना शुभेच्छा देऊन आज इथेच थांबू .


( क्रमश: )
...........







     








जे काय असेल ते....

मागे - पुढे

26.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग तेहत्तीसावा दिवस. आज पाणी कमी आले आहे. उद्या सोमवार आहे म्हणजे उद्या पाणी येणार नाही. त्यामुळे किमान आज झाडे शिंपता येणार नाहीत. आज रविवार असल्याने सौ. मासे घेऊन आली आहे. मागच्या दारी ती ते नीट करीत आहे . मी मागच्या पायरीवर बसलो आहे त्यामुळे कावळे आणि मांजरे लांबूनच मी इथून जाण्याची वाट बघत थांबली आहेत. मला त्यांची दया येते पण भलत्याच बाबतीत दया परवडत नाही ! मागे बंदूकडे बंदूमंडळ जमा झाले आहे. सत्त्या , संत्या , विसू, विकू सारे चर्चेत सहभागी आहेत. जशी काही कोरोनाच्या लसीसंदर्भात गंभीर चर्चा सुरू असावी. कदाचित केंद्रीय पथकं आणि काही राज्य यांच्यात कोरोनासंदर्भातल्या चर्चेचासंदर्भ हयांना मिळाला की काय असे त्यांचे चेहरे दिसतायत. पुढे आलो तर टेबलावरच्या बचत गटाच्या बैठक अहवाल नोंदवहीकडे लक्ष गेले. ती अपडेट करायला सौ. ला हातभार लावला पाहिजे. कारकुनी करीत सेवानिवृत्त झालो . आता सेवानिवृत्तीनंतरही कारकुनीच करावी लागतेय ! एखादयाच्या नशिबात काही गोष्टी कायम असतात. त्या टाळताच येत नाहीत. आज अक्षय तृतीया. खूप जण वेगवेगळे संदेश देत आहेत . मी माझा वेगळा संदेश दिला आहे...........

           आज अक्षय तृतीयावगैरे असली तरी रविवार पण आहे. संस्कृती, पाप पुण्य , उपासतपास वगैरे बोलायलाच ठीक असते हे कित्येक वर्षे उघडउघड दिसतेच आहे. उच्च व स्वच्छ संस्कृतीचा टेंभा मिरवणारेच संस्कृतीला तोंडघशी पाडतात व साडेतीन मुहुर्तालाही मासळीबाजारात धावतात ! हक्काचा रविवार सोडतो कोण ! सोय महत्वाची ! आणि भांडणाची खाज भागवण्यासाठी संस्कृतीचा उपयोग करण्याचीही सोय महत्वाची ! शेवटी सारे कसे सोयीनुसार असते. हयालाच जीवन म्हणायचे असते. जगणे महत्वाचे असते. बाकी सारे झूठ असते. पण ढोंगी लोक आडूनआडून सारे करूनही आपण तेवढे निर्मळ , सदाचारी असे दाखवण्यात वाकबगार असतात. मुँहमें राम , बगल में छुरी आणि मी नाही त्यातली नि कडी लावा आतली , असा हा सगळा प्रकार आहे ! वेश्या तोंड वर करून बोलते आणि पतिव्रता मान खाली घालूनच चालते , असा हा प्रकार आहे. ओळखणारे ओळखतातच ! मांजर कितीही डोळे झाकून दूध पिऊदेत. आमच्या आसपासही हेच प्रकार आहेत. तंगडयात तंगडे असल्याने म्हणजेच व्यवहारात गुरफटल्याने एकामेकांचे उणेदुणे काढत नाहीत इतकेच ! काढले तरी मर्यादेतच आणि भांडले तरी लगेच एकमेकांना चिकटतातच ! शेवटी एकमेकांची बिळे एकमेकांना माहीत असतातच ना ! कोणालाही आपल्या भानगडींची वाच्यता परवडण्यातली नसते ! असो ! 

         आज दुपारी जेवल्यानंतर मात्र वामकुक्षी छानच झाली. वामकुक्षीपेक्षा चांगली झोपच झाली. मी पावणेतीन वाजता लवंडलो तो साडेचार वाजता उठलो.  छान वाटले. बरेच दिवसांनी हा सुखद अनुभव आला. पुन्हा एकदा हळूहळू संध्याकाळ झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. खालच्या अंगणात आजही स्नेहा सौ.ला भेटायला आली आहे. बुधवारच्या डोंगरी मटणपार्टीचा बेत अधिकच पक्का केला जातो आहे.  चंगळवाद पुन्हा बोकाळणारच आहे. कोरोनाचीही भीती काही शिकवू शकत नाही , ही वस्तू:स्थिती आहे. मूळ स्वभाव काही केल्या जात नाही. मी अंगणात फिरतो आहे. हे चक्र असेच फिरत राहणार आहे. अनादिअनंत काळ. 


( क्रमश: )
...........







     








रविवार, २६ एप्रिल, २०२०

Marathi kavita pravah Don asale tari

प्रवाह दोन असले तरी....


प्रवाह दोन असले तरी 
सागर एकच असायला हवा ना  !
सागरातून प्रवाह वेगळा काढता येईल ?
एक प्रवाह वेगळा काढायचा की
दुसरा प्रवाह वेगळा काढायचा 
आपल्याच शरीराच्या सागरातून ?
हया प्रवाहाच्या लाटा
त्या प्रवाहाहून वेगळया रंगाच्या आहेत
पण त्या आधी लाटा आहेत की
एकीकडे किना-याकडे येऊन परततात 
आणि दुसरीकडे परततच नाहीत
असं काही अगम्य त्यांच्याबाबतीत आहे का ?
कोण आहे लाटा उठवणारा ?



... देवीदास हरिश्चंद्र पाटील

Marathi Gazal visar mala

विसर मला....


मनात धर 
मलाच वर !

हवा गांव
नको शहर !

करून बघ 
बघून कर !

कोरोना
खरे जहर !

विसर मला
स्मरून तर !



....देवीदास हरिश्चंद्र पाटील

Koronapasun aapan ky shiku shakto ka ? ?

मागे - पुढे

25.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग बत्त्तीसावा दिवस. आज सकाळी सौ.चा फोन चार्जिंगला लावतांना मुलाच्या मेसेजचे नोटीफिकेशन वरती दिसले. कधी नव्हे तो सकाळच त्याचा मेसेज का,  म्हणून मेसेज वाचला. माझ्या त्याला उद्देशून लिहिलेल्या सबुरीच्या सल्लावजा एका कवितेला त्याने कवितेतूनच दिलेले उत्तर होते ते ! आधीच मनावर ताण होता. मला दोन चार ओळींच्या पुढे वाचवेचना. मी सरळ मोबाईल चार्जींगला लावला आणि सहा वाजून गेल्याने नित्य कर्मांकडे वळलो. आता मुलाला उद्देशून कधीही कविता करायची नाही हा कानाला खडा लावला ! चहानंतर मी सौ.ला चिरंजीवही कवी झाल्याचे सांगितले. तिने ती कविता वाचली. म्हणाली त्याला फोन करते. मी तिला थांबवले. तो तिथे चक्रव्युहात एकटाच आहे. त्याची मन:स्थिती चांगली राहिली पाहिजे. कडू घोट हे मोठयांनीच मोठया मनाने गिळायचे असतात.  आता परत भांडण करू नका. व्यक्तींमधली भांडणे कुटुंबात पसरली , कुटुंबातली गावभर झाली , गावाची गावागावांशी व शहरांशी भांडणे झाली, शहरांची शहरांशी , राज्याशी , राज्याराज्यांची राज्याराज्यांशी अशी भांडणे देशभर पसरली आणि मग देशादेशांची देशादेशांशी भांडणे सुरू झाली. याच भांडणांनी कोरोनाला देशादेशात निमंत्रण दिलं आहे ! निदान या महामारीत तरी सावध व्हा. प्लीज , आता कोणीच भांडू नका. माझे हे कळकळीचे सांगणे सौ.लाही पटले असावे . ती म्हणाली तोच फोन करू देत किंवा मी केला तर हा विषय काढत नाही. मी म्हटले चला विषयच संपला ! आज शनिवार. मासे नाहीत. रिता , सुना बाजार. भाजीही मिळत नाही. शहरात चालत जाणे शक्य नाही. कधी तरी एवढे चालले तर या वयात त्रासच होणार. शिवाय , शहरातही भाजी कितपत मिळेल हे सांगता येत नाही. मासे लॉक डाऊन . भाजी लॉक डाऊन . कडधान्य झिंदाबाद ! दुपारी तेच केलं. आज संध्याकाळपर्यंत लंबूवहिनी आली नाही. आता कमीच येते. आली तरी फारशी उत्साहात नसते. बहुतेक खात्यात अपेक्षित पैसे पडले नसावेत. पैसा बोलतो. राजकीय वक्तव्यांना किती महत्व द्यायचे हे काही शिकलेल्यांना कळत नाही तिथे हया अशिक्षित बाईला कुठून कळणार ! त्यात गरीबी माणसाला हतबल करते. काय काय करायला लावते. एक मात्र जाणवले की तिला चिथवणारे मास्टरमाईंडसच थंडावलेले आहेत ! मा. मुख्यमंत्र्यांनी भरलेला दमच त्यांना पुरेसा पडला ! काहीही घडले की त्याला एकच रंग द्यायचा , एवढेच हया व्देषप्रसारकांना माहीत असते. हयांनी आपली अक्कल गहाण टाकलेली असते . रिकामा वेळही भरपूर असतो , त्याचा सदुपयोग करायचीही बुध्दी त्यांना नसते. मग पडदयाआडून समाजात लंबूवहिनीसारख्यांना चिथवून द्यायचेे , एवढाच खेळ उरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका खेडयात कसले विचारमंथन होते ते बघा ! चांगले समाजकार्य करणे तर दूरच , दारूमटणाच्या पार्ट्यात पैसे उडवायला सांगायलाही लागत नाही ! ही माणसे खरी तर वाईट नसतात , पण ती दुष्टांच्या कटकारस्थांनाना चटकन बळी पडतात. त्यांच्या हातात सापडलेले आयते कोलीत म्हणजे हे दारूमटणाला हपापलेले छुपे रुस्तम ! हयांच्यामार्फत विषारी विचार पसरवणे काहींना किती सोपे झाले असेल ते बघा ! आपण परदेशांच्या नावाने बोंबा मारतो , पण आपणच दूषित केलेली आपलीच गंगा स्वच्छ करायचा आपल्यात दम नाही , हे मान्य करीत नाही. त्यासाठी कोरोना यावा लागतो ! कोरोना हे विषाचे फळ आहे. 

            हळूहळू संध्याकाळ झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. आज स्नेहा सौ.ला भेटायला आली आहे. बायकाही आता पार्ट्या करू लागल्या आहेत. तेही दूर डोंगरात जाऊन ! तोच बेत शिजतो आहे ! कोरोनाने हाच चंगळवाद संपेल व लोक घरचे अन्न घरातच शिजवून घरातच खातील , आपल्या माणसांना खरे आपलेसे करतील व असेल ते घरातच सुखाने मिळूनमिसळून , हसूनखेळून खातील, पर्यटनाचा अतिरेक थांबेल , ही आशा कोरोना जगभर थैमान घालीत असतांना हया खेडयातच फोल ठरते आहे ! एका खेडयातल्या बायकांची ही एवढी प्रगती आहे , तिथे शहरातल्या हुशार लोकांचे काय सांगावे ब्बा ! हे विचार अनेकांना झोंबतील , पण अजून वेळ गेलेली नाही . पाचसहा महिन्यांपूर्वी ओठांवर आलेल्या दोन ओळी मला इथे आठवतात :

             तुला आता जरी सुखाची मजा येत आहे 
             सुखामागून बघ सुखाची सजा येत आहे

       खरेच सांगतो , तेव्हा मला ती सजा कोरोनाच्या रूपात असेल हे स्वप्नातही आले नव्हते. पण सुखाच्या अतिरेकी पर्यटकीय चंगळवादाची आणि माणसानेच माणसाला हीन मानण्याची ही शिक्षा आहे हे नक्की ! मगर हम नहीं सुधरेंगे !
      

( क्रमश: )
.......







     








शनिवार, २५ एप्रिल, २०२०

Corona progresses

मागे - पुढे

24.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकतीसावा दिवस. काल रात्री मन स्थिर करण्याची गोळी घेऊन झोपलो आणि खरंच मन स्थिर झालं असावं. ब-याच महिन्यांनी शांत झोपलो. रात्रीत एकदाही उठलो नाही. आज पाणी येणार नाही तरी सहा वाजताच उठलोय. साफसफाईत तासभर गेलाच. पिंपळपाने उकळत ठेवलीयत.  सौ.लाही उठवलं आहे. वरच्या टाकीला भर लावायला मागे गेलो तर बीनाचे कुटुंब सत्त्याकडून उर्मिलाच्या विहीरीचे पाणी पंपाने भरून घरात नेतेय. नळाला पाणी नसले की हे असेच हाल होतात. पुढच्या दारी आलो तर आज शुक्रवार असल्याने मासळी बाजार फूल भरला होता. थोडया वेळाने सौ. ने जाऊन रेणव्या (मासे) आणल्या. त्या नीट करायला ही मागे गेली आणि कावळे व मांजरे हाकवायला मी ! आता ते मला एवढं ओळखतात की मी मागच्या दरवाजाकडे येतोय हे दिसले तरी पळत सुटतात ! तर मागच्या दारी बंदूकडे पाण्याचा टँकर आणलाय . काय करणार , नळाला एक तर आठवडयातून दोनदा पाणी नसते आणि आलेच तरी नेहमीच पुरेसे येईल असे नसते. #पाणीहवादिलवस्ती !
         
          आमची माजी विद्यार्थीनी व लोकमत कार्यालयातील शोभना कांबळेकडून स. 09.34 ला मेसेज आलाय .
*काय केले तुम्ही लॉकडाऊनमध्ये*♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

लॉकडाऊनच्या सुरुवातीला सर्वांनाच त्याचं अप्रुप वाटलं. पण कालावधी वाढत गेला तशी बेचैनी आणि कंटाळा वाढत गेला.

पण काही लोक त्यातही मजा शोधली. मन रमवायचा आपापला मार्ग शोधला. गप्पा, पत्ते, कॕरम, बुद्धीबळ यासारख्या बैठ्या खेळांमुळे अनेकांचा वेळ मजेत गेला.. जातोय.

तुम्ही काय केलेत लॉकडाऊनमध्ये? लादलेला असला तरी तो एन्जॉय केलात का? तुमच्या गमतीजमती इतरांपर्यंत नेऊ या आणि इतरांच्या आपणही जाणून घेऊन.... ✒ त्यासाठी अर्थातच *लोकमत* तुमच्यासोबात आहेच.

लॉकडाऊन काळात तुम्ही काय काय धमाल केलीत ते फक्त दहा ओळींमध्ये लिहा आणि आपले नाव व पासपोर्ट फोटोसह 9420528788 या क्रमांकावर शुक्रवार २४ एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत पाठवा..
                  वरील मेसेजला माझा हा प्रतिसाद लगेच स. 10.28 ला पाठवलाय.
मी माझ्या काही इंग्रजी ब्लाॅग्जवर अनेक वर्षे लिखाण करीत होतो . पण त्यामानाने मराठी ब्लाॅगवर लिखाण कमीच होते. लॉक डाऊनच्या काळात मला कोरोना लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर घराच्या मागे पुढे घडणा-या व जगातही घडणा-या घटनांवर मराठीतून लिहिण्याची अभिनव कल्पना सुचली व लॉक डाऊनच्या काळात मी दररोज त्याबाबत एका खेडयातून लेखन करीत आहे. माझ्या हया ब्लाॅगचे नांव ओन्लीदेवीदास (onlydevidas) आहे व त्याची लिंक https://onlydevidas.blogspot.com ही आहे.  कोरोना गेल्यानंतरही एका खेडयात घडणा-या व जगात घडणा-या घटना या खेडयाच्या चष्म्यातून पाहण्याचा हा प्रयत्न सुरूच राहणार आहे. अवश्य वाचा , ही सर्व रसिकांना नम्र विनंती.

नांव : श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील
                   
             दुपारी जेवण झालं. वामकुक्षी कालच्यासारखीच झाली ! म्हणजे ती व्हिडीओ बघत बसली , मी डोळे मिटून ऐकत लवंडलो ! काय करणार ! संध्याकाळ तर होतेच. ती झालीही. आज झाडांना देण्याएवढे पाणी दोन दिवस साठवत होतो त्यामुळे भरपूर पाणी दिले. दिवाबत्ती केली. कोरोनाच्या बातम्यांचा आलेख हेलकावतो आहे. त्याप्रमाणेच आमच्या काळजांचाही ! आज जड जेवण न घेता उकडया तांदळाची पेज प्यायलो. पेज पीता पीता जनसेवा ग्रंथालय वाचकगट या
व्हॉट्सॲप ग्रूप वर श्री. प्रसाद सुजाता सुरेश पाष्टे यांची पोस्ट वाचनात आली. ती अशी :
*https://youtu.be/sSaVwHFY3oQ*
*काल quarantine मध्ये अनेकांनी घराच्या घरी पुस्तक दिन साजरा केला.* *तसा आम्हीही काही प्रमाणात केला. या quarantine मध्ये मी संवेदनशीलतेने पाहिलेलं या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून एक पहिलीच चित्रफीत (video) केली आहे.* *त्यामध्ये पुस्तकांविषयीची एक कविता आणि लीळा पुस्तकांच्या या पुस्तकातील छोटासा भाग वाचलेला आहे. माझा हा पहिलाच प्रयोग आहे, आपल्याला अपेक्षित बदल आणि आपल्या दृष्टीतील नाविन्यता जरूर कळवा. सोबत लिंक जोडत आहे. पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देऊन, चॅनेलला लाईक, शेअर, आणि सबस्क्राईब कराल. धन्यवाद.*
https://youtu.be/sSaVwHFY3oQ या चँनेलला मी लाईक, शेअर, आणि सबस्क्राईबही केले.
          त्यातच,  जनसेवा ग्रंथालय वाचकगटवर लेखकमित्र श्री. अमोल पालये याने आणखी एक यूट्युब चॅनेल https://youtu.be/VHiP5LTRmwM कविता क्वारंटाईन बाबत पोस्ट केली. हेही सुंदर यूट्युब चॅनेल आहे.
                   त्याचवेळी कवयित्री शिक्षिका सौ. वसुंधरा जाधव यांचा व्हॉट्सॲपवर मेसेज आला. https://youtu.be/Y-9NhQadpMg हे यूट्युब चॅनेल मी सूरू केल आहे तरी कृपया याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही करा जेणे करून मला प्रोत्साहन मिळेल🙏🏻🍫🍫 मी जाधवांच्या https://youtu.be/Y-9NhQadpMg या चँनेललाही  लाईक, शेअर, आणि सबस्क्राईबही केले. त्यांची कवितेबाबतची अभ्यासूवृत्ती व चॅनेलची मुख्य कल्पना मला खूप आवडली. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे.
             आमचा रत्नागिरी जिल्हा आजच कोरोनामुक्त झालाय. त्याबाबत सर्व रत्नागिरीकरांचे अभिनंदन करणारा लेख माझ्या mycityratnagiri या ब्लाॅगवर प्रकाशित केला. https://mycityratnagiri.blogspot.com/2020/04/Coronafree-district-ratnagiri.html?m=1 या सगळयात अकरा कधी वाजले ते कळले नाही. चला, तर मग झोपायला. गुड नाईट.
   

( क्रमश: )

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

Jugglery of corona virus

मागे - पुढे

22.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकोणतीसावा दिवस. काल संपूर्ण रात्री दोघांनाही झोप आली नाही. लादीवर झोपूनही उपयोग झाला नाही. पंखा आणि गूड नाईट मँट लाऊनही नाईट काही गूड झाली नाही. तिकडे पुण्यात मुलगा वर्क फ्राँम होम करतोय. अजूनही त्याला रात्रीचेच संगणकावर काम करावे लागते आहे.  रात्री दीड वाजता मुलाला फोन केला , तर तो काम सांभाळून चक्क जेवण बनवत होता ! अर्थात , त्याला जसे जमेल तसे ! कोरोनाने सगळे वेळापत्रकच बदलून टाकले आहे. पहाटे कधी तरी थोडा वेळ डोळा लागला असावा. कारण स्वप्नं पडले . स्वप्नात एका फळयावर भावाने एक कोडे तयार केलेले होते व मुलगा ते सोडवत होता. भाऊ त्याला काही तरी क्ल्यू देणार तोच मी बोलतो की थांब , तू काही सांगू नकोस. त्याचा तोच सोडवू दे. तो ते सोडवीलच. इथपर्यंत सारे नाँर्मल होते. पण दुस-याच क्षणी भावाच्या ठिकाणी मला चक्क देव श्रीकृष्ण हसतांना दिसतो. तोच निळा सावळा, घनश्यामल कृष्ण आपला ! मी कौतुकाने त्याच्याकडे बघत असतांनाच मला जाग आली. चुकचुकल्यासारखे झाले. स्वप्नात का होईना पण साक्षात श्रीकृष्णाशी बोलायची संधी हुकली होती ! जवळजवळ रात्रभर झोप लागली नसतांनाही मी सवयीने सहा वाजता उठलोच. पावणेसात वाजता पाणी आलेच. मी पाण्याची व्यवस्थित व्यवस्था लावली आणि पिंपळपानांकडे वळलो. 

         काल संध्याकाळी खालच्या अंगणात फिरतांना सौ. ने पिंपळपाने खुडून आणली होती. रात्रीच पाण्यात भिजत ठेवली होती. मी ती सकाळी उकळत ठेवली. उकळल्यावर नीट झाकून ठेवली. ही उशिरा उठणार हे नक्कीच होते. तिला सहाच्या दरम्यानच झोप लागली होती. मी तिला स्वत:लाच उठायला द्यायचे ठरवले व इतर कामांकडे वळलो. मागच्या दारावर सगळे संत्याबंत्या आपापल्या उद्योगात मग्न होते. नुकताच सत्त्या जयच्या घराचे बांधकाम शिंपून बंदूच्या घरात शिरतोय. त्याच्याकडे चहापाणी , गप्पाटप्पा होतील. त्यात लमाने , विसू व विकूही यथावकाश सामील होतील . मी मागचा दरवाजा बंद करून पुढे आलो. अंगणात आलो . खालच्या दिशेने मासळी बाजार पूर्ण जोरात आहे. कोरोनाची कुठलीच वार्ता तिथे नसावी असे निदान जे दिसते आहे त्यावरून म्हणता येते. दुपारपर्यंत बीना दोनदा येऊन हिला भेटून गेली. आम्ही जेवतांना तिस-यांदा येऊन गेली. मध्येच चार दिवस ती एकदाही आली नव्हती. तिचे मूडस् वारंवार बदलतात. हे दुष्टचक्र बराच काळ सुरू आहे. सगळयांना तिची काळजी वाटते. जेवतांना घासाबरोबर बातम्याही गिळाव्या लागतात. जेवल्यानंतर मी लिहीत बसलोय. ही वामकुक्षी करतेय. थोडया वेळाने मीही जरा लवंडलो. चार वाजले तोच हिच्या दूरच्या दुर्मिला मावशीचा डोंबिवलीहून फोन आला. त्या अर्धा तास बोलतच होत्या. 

             चहापानानंतर बातम्या लावल्या. अजूनही संचारबंदीत माँर्निंग वाॅक प्रकरण सुरू आहे. लोक खरेदीसाठी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत धावत आहेत. हे सर्वसामान्य लोक इतक्या संख्येने कायदे धुडकावून का लावत आहेत ? कोरोनासोबत एक वर एक मोफत असे काही पँकेज तर आलेले नाही ना , जे सर्वसामान्य जनतेच्या मेंदूवरच आक्रमण करून त्यांना विचित्र वागायला लावेल  ?  अन्यथा ही माणसे अशी वागलीही नसती कदाचित. कोरोनाचे हे काही गौडबंगाल तर नाही ना ? शेवटी हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर ताबा मिळवण्यासाठीचे काहींचे कारस्थान तर नाही ना ? उत्तर कोरियाच्या जोनच्या बातम्याही येत आहेत. ते आणखीच वेगळे प्रकरण निघण्याची शक्यता आहे. तिकडे अमेरिका चीनवर उशिराने आरोप करते आहे आणि चीनही पलटवार करतो आहे. हे काय गौडबंगाल आहे ? भारतातही एकमेकांकडे बोटे दाखवण्याची परंपराच आहे. जगभर मरणारे सर्वसामान्य लोक उल्लू बनत आहेत का ? कोरोनाने असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत व छोटयाश्या खेडयात बसून मी त्याबाबत विचार करतो आहे ! मी बातम्या बंद करून झाडे शिंपायला आलोय. आज पाणी भरपूर मिळाले.  मनसोक्त पाणी शिंपले. बरे वाटले . आज भावाच्या घरात झोपायला जायचे रद्द झाले आहे. आजही उकाडयाने झोप आली नाही तर उद्या तिकडे एसीचा गारवा घेत झोपायचा विचार आहे. बरेच महिने एसी लावलेलाही नाहीय. तो लावला पाहिजे. बघू उद्या काय काय होते ते. आता रात्रीचे अकरा वाजत आले आहेत. मुलाला फोन करून झाला आहे. तर आजपुरते थांबू. उद्या भेटूच. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. तुमच्या घरातच थांबा आणि हो, उद्याही तुमच्याच घरी थांबून कोरोनाला घालवा. 


( क्रमश: )

     








मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

News are not good

मागे - पुढे

21.04.2020

               आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग अठ्ठावीसावा दिवस.  काल रात्री दहा वाजता पुढच्या अंगणात पाणी मारलेले. थंडाव्यासाठी. खूप उकाडा आहे. रात्री बेडवर झोपच येईना. अंग भाजून निघू लागले. शेवटी एक वाजता खाली लादीवर झोपलो. थोडे बरे वाटले पण पुरेशी झोप मिळालीच नाही. पहाटे आम्हां दोघांनाही एकाच वेळेस स्वप्नं पडत होते. गंमत म्हणजे आम्ही प्रवासात होतो. ही तर कर्नाटकात पोचली होती.  मला स्वप्नातले स्थळ काही समजले नाही. आम्ही एकदम जागे झालो तेव्हा पहाट झाली होती.  जराशी झोप लागली नाही तोच सहा वाजले. जाग आलीच. पण पडून रहावेसेच वाटले. नशीब,  सहापस्तीसला धडपडत उठलो. पाण्याची वेळ झाली होती. पावणेसातला पाणी आले. ते भरले. पाण्याची टाकी कालच खाली करून ठेवली होती. ती काठोकाठ भरली. पाणी गेले. 

                 पाणी गेले तसा मी खालच्या कंपाऊंडमधल्या पिंपळाच्या छोटया झाडाकडे वळलो. गेल्या तीन चार महिन्यांपासून पिंपळाच्या पानांचा रस प्यायचा हे आमच्या कुटुंबाने ठरवलेले होते. पण काही ना काही होऊन हा कार्यक्रम पुढेच जात होता. प्रत्येक घटनेची वेळ यावी लागते हेच खरे ! (माझ्या  dehpatilbestwords या ब्लाॅगवरील  What will happennext या लिंकवर what will happen  next ही पोष्ट वाचा ).  तर पिंपळपानांचा रस घेण्याची वेळ आज आली. मी आठ पाने आणून ती पाण्यात उकळत ठेवली. नंतर सौ.ला उठवले. थोडया वेळाने पिंपळपानांचा तो रस प्यालो. चव थोडी ओळखीचा वाटली. कुठल्या तरी काढयासारखी. कोणत्या तरी काढयात पिंपळपाने घातली जात असणारच. आता पंधरा दिवस दररोज पिंपळपानांचा रस प्यायचा आहे.  अकरा वाजता सौ. मिलेशच्या बाईकवरून शहरात गेली ती एक वाजता आली. औषधे व थोडा जिन्नस घेऊन आली. आज मंगळवार. आज शाकाहारीच जेवण.  मी बराचसा शाकाहारीच आहे. अधूनमधून मांसाहारही करतो. दुपारी वाट्याण्याची आमटी मस्त झाली. थोडा भात जास्त खाल्ला. हल्ली आम्ही चपात्या सकाळी नाश्त्यालाच खातो. बातम्या पाहवत नाहीत , ताण येतो. त्यातही काही लोक त्यांच्या सोईचे राजकारण करीत आहेतच. लाखो लोक जगात मरत आहेत. जगातच नव्हे तर आपल्या दारात मरत आहेत. पण काहींना या वेळीही राजकारण केल्याशिवाय चैन पडत नाही. राजकारण ही दारू झाली असावी आणि हे पक्के बेवडे झाले असावेत, अशी अवस्था आहे. जुनेच पत्ते पुन्हा पुन्हा टाकून काहीच साध्य होत नाही , त्यामुळे ते अधिकच वेडे होत आहेत. बातम्यांनी ताण वाढवला तरी पुण्यामुंबईच्या बातम्या बघाव्याच लागतात. मुंबईत भाऊ आणि इतर नातेवाईक व मित्र आहेत , पुण्यात तर मुलगा आहे . मुलगा राहतो ते घरमालक आहेत. परिस्थिती निवळून निदान तीन मे नंतर तरी पुण्याला जायला मिळू दे, या विचारातच आम्ही जेवलो. जेवण तसे वेळेवर झाले . दुपार असल्याने तापमान खूपच वाढले आहे. वामकुक्षीला पाठ लादीवर टाकली तर बेडरूममधली लादीही गरम लागत होती. अवकाळी पाऊस आसपास  घोटाळतो आहे. साडेतीन वाजता हिला स्नेहाचा फोन आला. सुरूवातीचा विषय कधीच बाजुला पडून उखाळयापाखाळ्यांचे विषय सुरू झाले. मी अधूनमधून मुद्याचे बोला, मुद्याचे बोला , असे टोकूनही काही उपयोग झाला नाही. त्यांनी अर्धा तास चैत्रीच्या दिवशीचा एकच विषय चघळला . शेवटी त्या थांबल्या. नंतर आम्ही चहा घेतला. तोपर्यंत पावणेपाच वाजले. 

          मी पुढच्या दारी पायरीवर बसलो . लेखन केले. नंतर झाडांना पाणी दिले. आज दिवसभरात बीना तीनदा येऊन गेली. काय करायचं या मुलीचं ? घडीत असं बोलते, घडीत तसंं बोलते. हीचे भवितव्य काय ? काळजी वाटते. ती ख-या अर्थाने मूळ विषयातून बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणीच काही करू शकणार नाही , हे खरे आहे. संध्याकाळी लंबूवहिनी आणि एक काकी येवून गेली. बाकी कोणी विशेष असे आले नाहीत. गेला तासभर बातम्या बघतोय. पुणे शहर संपूर्ण सील केले आहे. तरी लोक चक्क माँर्निंग वाॅकला रस्त्यावर येत आहेत. पोलीस वेगवेगळ्या शिक्षा करीत आहेत. आता अश्यांचे पार्श्वभाग सुजवण्याबरोबरच त्यांच्या वैचारिक पार्श्वभूमीचाही शोध घेणे गरजेचे झाले आहे, असे दिसते. हे काही विशिष्ट विचारधारेचे लोक तर नाहीत ना ? हे तपासले पाहिजे. संचारबंदीलाच त्यांचा विरोध नाही ना ? हजारोंनी माणसे बाधित होत असतांना हे लोक स्वत:च्याही जीवावर इतके उदार का होत आहेत ? हे तपासावे लागेल.  केवळ हिंडणे हा हेतू फारसा पटण्यातला दिसत नाही.  महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात यावर नियंत्रण ठेवावेच लागेल. या विचारातच आज जेवण न घेता दूध बिस्कीटस् खाऊन आम्ही अंगणात शतपावली करू लागलो आहोत. अजून कोणी बोलायला आले तर ठीकच , नाही तर अकरा वाजता बेडरूमच्या लादीवर अंग टाकूच. थोडक्यात, रात्रीची बात उद्या ! भेटूच तर ...उद्याही !


( क्रमश: )









सोमवार, २० एप्रिल, २०२०

One more day

मागे - पुढे

20.04.2020

              आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सत्तावीसावा दिवस.  काल रात्री सौ. ला साडेनऊ वाजताच झोप आली .  कधी गोळी लवकर लागू पडते. कधी कधी दुस-या दिवशी सकाळी अंमल सुरू होतो. ती दहाच्या सुमारास झोपली पण मला बराच काळ झोप येतच नव्हती. सर्फींग करत बसलो. कधी तरी झोप आली तसा मोबाईल बंद केला व झोपलो. आज पहाटे पाच वाजता जाग आली. काही तरी स्वप्नं पडलं जे नंतर आठवलंच नाही. पुन्हा मी सहा वाजता उठलोच. मागे जाऊन वरच्या टाकीत पाणी फूल केले. आज सोमवार. नळाला पाणी येणार नसल्याने साफसफाईकडे मोर्चा वळवला. पुढचे , मागचे अंगण साफ झाल्यानंतर खालच्या अंगणात गेलो. आज गच्चीच्या पाय-याही साफ केल्या.  परिसर स्वच्छता झाली. घरे साफ झाली. चांगलाच घाम आला. आज पाण्याची गडबड नसल्याने सफाईला बराच वेळ मिळावा. 

             आज दुपारी एक वाजता माझे एक चाहते व दहीगांवचे रहिवासी श्री. सुबोध रेचे यांचा ब-याच काळाने फोन आला. ते बराच काळ बोलत होते. ते सद्या अमरावतीत त्यांच्या घरापासून पन्नास किमीवर असलेल्या मुलीच्या घरी सपत्नीक रहात आहेत. त्यांचा मुलगा व सून रायगडमध्ये अडकून पडले आहेत. त्यांचा मुलगा एस.टी. त कंडक्टर आहे. सुबोधजी माझी आपुलकीने चौकशी करीत होते.  मी माझ्या मुलाचीही हकीगत सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे राजू परत शहरातील त्याच्या निवासस्थानी रहायला गेला. खरे तर तो काल सकाळी माझ्याकडे गप्पा मारायला येणार होता. पण तो असा अचानक गेला. सौ. शेजाराहून येतांना तिला ते कुटुंब रस्त्यात भेटले. राजूच्या मुलीने नेलेल्या दोरी उडया आठवणीने परत केल्या. राजूचीही स्वतंत्र कहाणी आहे. ती नंतर कधी तरी. 

        आजचा कोरोनाचा दिवसही भयावहच आहे. आकडेवारी वाढते आहे. संपूर्ण पुणे शहर सील झाले आहे. आमचे प्राण कंठाशी येऊ लागले आहेत. मुलांच्या काळजीने आमच्यासारखेच किती तरी लोक हैराण असतील. आपल्या भागात रोजगाराच्या संधी नसल्या की मुले अशी नोकरीसाठी  आईवडिलांपासून दूर एकटी राहतात. कोरोनासारख्या परिस्थितीत तर फारच ताण येतो. पण कोणाला सांगणार आणि सांगून उपयोग तरी काय म्हणा !  त्यात सर्वसामान्यांचे हाल तर सर्वत्रच असतात. त्यांना स्वत:च्या मनाप्रमाणे जगताच येत नाही. सुरेश भटांची , कुठे तरी मी उभाच होतो , कुठेतरी दैव नेत होते , सारखीच माझ्याही आयुष्याची त-हा झालेली आहे. सुरेश भट माझ्या मनात घर करून राहण्याचे हेही एक कारण आहे. 

          हळूहळू संध्याकाळ झाली आहे. मुलाला फोन करून झाला आहे. मनात चिंता उरली आहे. सौ. शेजारच्या अंगणात ईव्हीनिंग वॉक करते आहे. मी झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर हे लेखन मोबाईलवर करीत आहे. दिवाबत्तीची वेळ होत आली आहे. थोडया वेळाने शेजारच्या मंदिरात घंटानाद होईल. मग दिवाबत्ती, टीव्ही, जेवण , अजून कोणी शेजारचे आलेच तर, मग झोप आणि पुन्हा उद्या......भेटूच.


( क्रमश: )









Ek mazi Gazal mala pureshi

एक माझी गझल



मांडले मी मला तुझ्या पटावर
खेळणे हे अता तुझ्या मनावर


आसवे रोखली जरी किती मी 
हुंदक्यांचा तरी सुरूच वावर !


हे ऋतू अंग चोरुनी उभे अन्
मी असा आवरूनही अनावर !


एक माझी गझल मला पुरेशी
(भट म्हणाले मला , तिलाच सावर !)
मी कशाला मरू दुज्या कुणावर !


नांव बदलूनही जुना तोच मी !
भ्रमर येतो जसा पुन्हा फुलावर !




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

The carona nightmare

मागे - पुढे

19.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सव्वीसावा दिवस.  काल संपूर्ण रात्रभर झोप आली नाही. नेहमीप्रमाणे दीड वाजेपर्यंत झोप आलीच नव्हती . नंतर झोप लागेल असे म्हणून पडून होतो. दोन वाजल्यापासून मागच्या दारी पत्र्यावर रेवा म्हणजे अगदी बारीक दगड मारल्याचा आवाज येऊ लागला.  एक तर रात्रीचेे दोन वाजलेले.  डावी उजवीकडे शेजार नाही. डाव्या बाजुला तर जंगलच. मागचे पुढचे शेजारी ऐन झोपेत. सकाळीच दंगलीचे स्वप्नं पडलेले. त्यात सोबत पत्नी. तीही भित्री. जाम टरकली होती. मी काय प्रकार आहे ते बघतो म्हटलं तर तिने मला उठूच दिलं नाही. साडेतीन वाजेपर्यंत मी कानोसा घेत होतो. त्यातच उत्तरेकडच्या खिडकीतून जंगलाच्या भागातून विजेरीचा प्रकाशझोत पडला. कोणी तरी आहे तिथे असेच वाटू लागले. मला खिडकीतून बाहेरचे स्पष्ट दिसू शकत नव्हते , पण बाहेरून आतले दिसत असेल तर ? हे कधी आपण तपासलेच नव्हते. अनेक प्रश्न पडू लागले. आता मलाही थोडी भीती आणि काळजीही वाटू लागली. वरच्या बाजुच्या बागेतल्या  अवघ्या दोनच कलमांवर आंबे होते. ते चोरायला कोण आले असावेत , असा एकूण परिस्थितीतून अंदाज येत होता. पण बराच वेळ झाला तरी पुन्हा विजेरीचा झोत पडला नाही , म्हणजेच तो उजेड वरच्या वळणावर गाडी वळतांना पडलेला हेड लाईटसचा असावा. या विचाराने मलाही जरा धीर आला. मी शांत होऊन पत्र्यावरचे आवाज ऐकू लागलो. पुढच्या दारात अधून मधून वा-याचा आवाज येत होता. मग मी पडलेल्या स्थितीतच मागच्या दाराचाही कानोसा घेतला. तेव्हा मला आज वारा सुटल्याचे नक्की कळले. वा-याने पानगळ होत होती व तिचा आवाज मागच्या पत्र्यावर येत होता. बहुतेक अधूनमधून झाडाची एक फांदी वा-यामुळे कोप-यावर पत्र्याला घासतही असावी. पण वारा नसतांनाही रेव्याचा अधूनमधून येतच होता. मग लक्षात आले की झाडावर पक्षी जागे झाले असावेत व त्यांच्या हालचालींनी मोहोर व पाने गळून आवाज येत होते. वारा आणि पक्षी यांचा हा कावा होता तर. मी हे हळू आवाजात सौ.ला समजावून सांगितले व भिण्याचे काहीच कारण नसल्याचेही सांगितले. पण ती घाबरलेलीच होती. अखेर ती आपण हॉलऐवजी बेडरूममध्येच झोपू म्हणाली. तिथे फॅन जवळ असल्याने कसले आवाजच येत नाहीत. मग आम्ही बेडरूममध्ये जाऊन झोपलो. तरी एकदा मोठा वारा आल्याने आवाज आलाच. तो मी सौ. ला दाखवला . ती जरा शांत झाली. पण तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. सहा वाजता मी उठण्याचा प्रयत्न केला पण डोळेच उघडत नव्हते. मग मी झोपून दिले आणि नेमकी मला झोप लागली. सात वाजता शेजारची मम्मी खालच्या रस्त्स्याने चालली होती . तिला खालच्या टाकीतले पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहतांना दिसले, तशी ती बोंबटत आली. तिने पुढच्या दारावर थापा मारल्या. तरी आम्ही डाराडूर होतो. मग तिने बेडरूमच्या खिडकीवर टकटक केली तशी मला जाग आली. सौ.सुघ्दा धडपडत उठली. मम्मीचे धन्यवाद मानून आम्ही पाण्याकडे धावलो. पाणी जातच आले होते. जेमतेम एक हंडा व कळशीभर पाणी भेटले. आम्हां दोन माणसांना दिवसाला ते पुरेसे होते ! पाणी भरून झाल्यानंतर मी साफसफाईला पुढच्या बाजुला आलो तेव्हा माझे लक्ष दरवाजावरच्या तोरणाकडे गेले. ते मध्यभागीच्या चुकेतून निसटून थोडे खाली लोंबत होते. म्हणजे , खरेच कोणी तरी रात्री दरवाजाकडे काही तरी करीत होते की काय ? कदाचित , ते मम्मीचा हात लागून तर खाली आले नसेल ना ? पण मम्मीची उंची पाहता ते शक्य वाटत नाही. मी मम्मीच्या दरवाजावर हात मारण्यामुळेच ते तसे झाले असणार असे बोलून ते तोरण व्यवस्थित लावले. 

             बाकी दिवस नेहमीसारखाच असला तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढवणाराच ठरला. कमी होतोय असे वाटत असतांनाच एकदम वाढ झाली. बहुतेक रविवार असल्याने आज चिकनची दुकाने उघडी ठेवल्याचा हा परिणाम असावा. कोरोना आणला कोणी , सुरूवातीला पसरवला कोणी हे प्रश्न आता मागे पडले असून आता हे गर्दी करणारे , भाजी , चिकन प्रेमी व मॉर्निंग वॉकप्रेमी कोरोना प्रसारक कोण आहेत , याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 

( क्रमश: )


रविवार, १९ एप्रिल, २०२०

ओळ : Marathi Gazal

              ओळ


पान पान आयुष्याचे पलटत गेलो
मी असाच माझा मजला चाळत गेलो


तेवढाच आयुष्याला अर्थ मिळाला
उत्सवात जगण्याच्या मी हरवत गेलो


वेचला न केव्हा कणकण माझा मीही
मी स्वत:स वा-यावर उधळत गेलो


जो दिसून आला तोही भासच होता
त्यात मीच माझी स्वप्नें मिसळत गेलो


मी अजून माझा मजला सुचलो नाही
ओळ येत गेली तीही विसरत गेलो



...देवीदास हरिश्चंद्र पाटील. 

टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  


Home qurantine

मागे - पुढे

18.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग पंचवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो.  आज नळाला पाणी आले. तशी काल रात्रीही गरम्यामुळे नीट झोप लागली नाहीच. डोळा लागला तर भयानक स्वप्नं पडले. खालच्या रस्त्यावरून सुमारे तीस फूट उंचीच्या घोडयावरून  पप्पू चाललेला आहे. त्याच्या हातात तलवार आहे. मी व सौ. दक्षिण दिशेच्या दरवाजात बसलेलो  असतो. मला पप्पू सांगतो की अरे मुंबईला बघ काय चाललंय ते . दंगा उसळलाय . तो पूर्वेकडे बोट दाखवतो तसा मी धावतच पुढच्या दारात येतो. पूर्वेकडच्या डोंगरावरून तलवारी घेऊन काही लोक धावतींना दिसतात .  खरे तर , मुंबई आमच्या उत्तरेला आहे , हे माझ्या पूर्वेकडे पाहतांना लक्षातच आले नाही. 

            आज विशेषत: मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्या स्वप्नात दंगा दिसला होता , तोच तर हा कोरोनाचा कहर नाही ना ? कोरोनाचा दंगाच. पुण्यातही आज कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. कालचा दिलासा आज क्षणभंगूर ठरतो आहे.   लोकांचे नको ते गूण मात्र फारसे कमी झालेले नाहीत.  अजूनही लोक गर्दी करतातच.  अजूनही अवैधरित्या जात आहेत. गर्दीमुळे कोरोना प्रसारक मोकळे फिरत आहेत. एक कोरोनाबाधित पोलीसच मुंबईतून सोलापूरात गेल्याने तिकडे प्रसार वाढला. आपण आपले सैन्य कमकुवत करीत चाललो आहोत. वैद्यकीय , पोलीस आणि सैन्यदलातही कोरोनाचा शिरकाव होतो आहे. आपण आपल्याच सुरक्षा व्यवस्थेला भगदाड पाडत आहोत. सतत बेशिस्त टारगटांना शिस्त लावणा-या पोलीसांवरच हात उगारला जातोय.  संचारबंदी काळात रस्त्यावर हिंडणारे हे बेभान हजारो देशद्रोही गेली काही वर्षे सतत पोकळ देशभक्तीचा डंका पिटणा-यांना दिसत नाहीत का ? ते देशभक्तीवाले लोक आज कुठे आहेत ? आजही भारतीय लोकशाही मतांच्याच विकासाभोवती फिरते आहे आणि लोकशिक्षणाचा विकास शुन्याकडे सरकतो आहे. संस्कृतीच्या उच्चतेचे डंके पिटून उपयोगी नसते , ती योग्य प्रकारे प्रत्यक्षात आचरणात दिसावी लागते. 

             विचार करून मन थकले आणि जेवणानंतर झोपी गेले. संध्याकाळी स्नेहा, क्रांती आणि कलू आते आली. तेव्हा मी खालच्या बागेत झाडे शिंपायला गेलो आणि थोडया वेळाने सौ.सुध्दा गप्पा आटोपत्या घेऊन बीनाच्या आईकडे गेली. काही दिवसांपूर्वी रात्री बीना येवून आमच्याबरोबर बोलत बसली होती. तेव्हा त्यांच्या भावकीत पिशाच्च फिरत राहिल्याने कोणीच सुखी नाही असं काही तरी ती म्हणाली. त्यावर , तुमच्या भावकीत लोक एकमेकांवर खूप जळतात, तेच खरं पिशाच्च आहे , असं स्वाभाविकपणे व सरळ मनाने मी बोललो. थोडयाच वेळात ती येते म्हणून सांगून निघून गेली. तेव्हापासून ती आलेलीच नाहीय. बीनाचा प्रश्न बराच गुंतागुंतीचा आहे. ती लवकर त्यातून बाहेर पडावी, हीच सदिच्छा. 
         


                मी पाणी शिंपत होतो आणि सौ. बीनाकडे होती त्यादरम्याने राजूच्या बायकोचा फोन येवून गेला होता. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. मी दिवाबत्ती व प्रार्थना करून झाल्यानंतर सव्वासात वाजता तो मिसकॉल पाहिला. मग दोघांना फोनवरूनच शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे जाऊही शकत नाही. राजू बराच वेळ बोलत होता. जुन्या आठवणी निघाल्या. तेव्हा ही मुलं बरेचदा आमच्याकडेच असायचीत. तेव्हा भावना प्रबळ होत्या , आता व्यवहार प्रबळ झाले आहेत. माणसाचे माणसाकडे हक्काने जाणे येणे आता होत नाही. आता माणसांमाणसांत भिंती निर्माण झाल्या आहेत. कोरोना ही परिस्थिती बदलण्यासाठी तर आला नाही ना ? किमान हया भिंती तुटण्याची नांदी ठरू दे , या माझ्या शब्दांनी आमचा संवाद संपला.  नंतर रात्र झाल्याने मागची पुढची दारे बंद करून आम्ही कोरोना पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन होऊन गेलो.
          

( क्रमश: )


शनिवार, १८ एप्रिल, २०२०

Nivadnuk Marathi Gazal

            निवडणूक


ते कौलारू घर कुठे दिसते का ते बघ !
गोठयात उभी गाय हंबरते का ते बघ !


उरल्यासुरल्या माणसांचा शोध घे !
मातीत , राखेत कुणी मिळते का ते बघ !


अंतर ठेव , पण कधी अंतर करू नकोस !
कोणासाठी काळीज जळते का ते बघ !


नवे विषाणू येत राहतील , सावध हो !
आयुष्याची किंमत समजते का ते बघ !


मानवाच्या अस्तित्वाचीच ही लढाई !
ही निवडणूक नाही , हे कळते का ते बघ !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

Corona virus pandemic

मागे - पुढे

17.04.2020


  1.                   आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चौवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो.  आज नळाला पाणी येणार नव्हते. आता उन्हाळा कडक होत चालला आहे. पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने दर शुक्रवारी नळाला पाणी येणार नाही. आज शुक्रवार असल्याने पाणी येणार नाही. सबब मी करीत असलेला हलका व्यायाम दहा मिनिटांनी वाढवला. नेमका सात वाजता बंदिनी वहिनीनी फोन केला. मला वाटले पाणी आले की काय ! मी पटकन फोन घेतला. ऐकतो तर पाणी येणार नाहीच. मी म्हटले, छान ! आज सौ.ला (तिच्याच) हुकुमावरून सकाळी सात वाजता उठवले. आज तिच्या आईचा प्रथम स्मृती दिन आहे. गेल्या वर्षी 28 एप्रिलला तिच्या आईचे देहावसान झाले. तिथीनुसार तो मागे आला आहे.  आज आठ वाजताच बीनाची आई मासे आणायला निघाली तिच्याबरोबर हिने जाऊन मासे आणले. त्याची आमटी केली. मग जेवण बनवल्यानंतर तिने तिच्या आईला वाडी दाखवली तेव्हा त्यात मासे ठेवले . तिकडे माझ्या सासरवाडीला वर्षश्राध्दाचे कार्य सुरू झाले तसा आम्हांला फोन आला. तिकडून जतीनने व्हिडीओ कॉल केला. त्यामुळे कोरोनामुळे प्रत्यक्ष जाता आले नाही तरी याचि देही याचि डोळा ते पाहता आले. जतीनने मग पुण्यातल्या माझ्या मुलाला आणि मुंबईतल्या हिच्या मावसबहिणीलाही अॅड केले. ते कार्य संपल्यानंतर आम्ही जेवलो.


            आज प्रथमच कोरोनाचा वेग देशभरात थोडा मंदावलेला दिसला. महाराष्ट्रालाही थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र , लोकांना अजूनही धावणे , गर्दी करणे , अफवा पसरवणे , व्देष पसरवणे , अवैध वाहतूक करणे यात रस आहेच. परिस्थितीचे भान मरणाच्याही दारात नसणारे लोक आपल्या देशात आहेत. मेरा भारत महान ! या महानतेच्या बातम्या टीव्हीवर सुरू आहेत. वाहनावर ' अत्यावश्यक ' असा बोर्ड लावून दारूची वाहतूक करतांना काहींना पकडले आहे. आपल्या महान देशात ' अत्यावश्यक ' काय तर दारू ! दुसरा प्रभावी धंदा म्हणजे अफवा पसरविणे . त्याचीच दुसरी बातमी आहे. एका भागात दरोडेखोर आल्याची अफवा काहींनी पसरविली होती. तिथल्या लोकांनी दरोडेखोर समजून तीन साधूंनाच यमसदनाला पाठवले आहे. हा देश साधूसंतांचा आहे ! चोर , लुटेरे, खुनी , दरोडेखोर , बलात्कारी हे अफवांमधूनच येतात ! आज दुपारपर्यंत तरी लंबूवहिनीसहीत कोणीही आमच्याकडे आलेले नाही. आज आम्ही वामकुक्षी करायला हॉलमध्ये पहुडलो. हिने टीव्ही लावलेलाच होता आणि बाळाचे बाप ब्रम्हचारी हा विनोदी चित्रपट लागलेला होता. मग कसली वामकुक्षी न काय ! ब-याच दिवसांनी मनसोक्त हसता आले , हे मात्र खरे.
       
              संध्याकाळी लंबूवहिनी येऊन गेली. हल्ली तिला जास्त बोलूच देत नाही. तिचे लक्ष इतरांवर जास्त असते. कुणाच्या खात्यात पाचशे रूपये जमा झाले , कुणी दिवे लावले , कोण कुठे चाललाय , कोण कोणाशी केव्हा काय बोलतंय यातच तिला स्वारस्य . बरे कुठली गोष्ट ती स्वत:कडे ठेवीत नाही. कधी एकदा दुस-याला ती बातमी तिखटमीठ लावून सांगते , असं तिला होऊन जातं. बातम्या काढण्यासाठी आणि त्या हव्या तिथे पेरण्यासाठी ती दिवसभर सर्वत्र संचार करीत असते. कामावर येऊ नको सांगितल्यानंतर बरीचशी आमच्याकडे यायची कमी झाली आहे. पण आली की कान , नाक , डोळे आणि जीभ उघडी ठेऊन असते. तिची श्रवणशक्ती इतकी जबरदस्त आहे की मी अंगणात फिरतांना आमच्या पुढच्या दारी मला कोणी रस्त्यावरून जरी हाक मारली तरी ती मागच्या दारावरून कानोसा घेऊन विचारते, कोन हो ता बावा ?म्हणजे बघा ! बरे एवढे करून ती थांबत नाहीच. तिला मी सांगितले की तुझ्यापर्यंत काही नाही म्हणून तरी ती घरातून बाहेर येऊन बघते ! मग डोकं फिरणारच ना !

           अशी दोन चार माणसं येऊन गेली तोवर सात वाजले. देवळात घंटानाद सुरू झाला. मीही दोन्ही घरातली दिवाबत्ती केली. रोजच्याप्रमाणे कोरोना जगातून नष्ट कर म्हणून देवाकडे प्रार्थना केली. नंतर टीव्ही , बातम्या , मालिका , गाणी , यासह रात्रीचे जेवण आणि झोपेकडे मोर्चा ....


( क्रमश: )

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

Corona virus plus Saree

मागे - पुढे

16.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग तेवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो.  सकाळी मागच्या पुढच्या दरवाजावर नेहमीच्याच गोष्टी घडत गेल्या. पाणी लावले. पाणी भरले. आठ वाजता सत्त्या जयच्या घराच्या कोरोनामुळे अर्धवट राहिलेल्या बांधकामावर नेहमीप्रमाणे पाणी मारू लागला. नंतर संत्या , सत्तू , बंदू , विशू , विकू यांची रोजची मैफील बंदूच्या दारात सुरू झाली. विशू हा बंदूचा मित्र आहे. तो  विकूच्याच थोडा पुढे राहतो पण उजाडले की सत्त्यासारखाच बंदूकडे येतो. विकू जरा उशिरा येऊन सहभागी होतो. मूळचा आमच्या भागातला विकू गेली काही वर्षे कौटुंबिक विभागणीमुळे दुस-या भागात घर बांधून राहतो . ही एक वेगळी कथा आहे. आमच्याकडे प्रत्येकाची वेगळी अशी खास कथा आहे. कोरोना संपल्यानंतर त्या सर्व कथा आपोआपच मागच्या पुढच्या दारातून व्यक्त होतीलच. आमचा नाश्ता , आंघोळ , देवपूजा , वाचन , मनन, चिंतन संपन्न होऊन दुपार झाली. रोज रोज ते भात आमटी पोळी भाजी जेवायचा कंटाळा आला होता.  त्यामुळे आज नेहमीचे जेवण करू नकोस , काही तरी खीरवगैरे कर , म्हणजे पोटालाही आराम, असे मी हिला सकाळीच बोललो होतो . म्हणून आज तिने शेवयाची खीर केली आहे.  तेच आमचं दुपारचं जेवण.


  1.             आजही कोरोनाचा प्रभाव वाढता आहे. अजूनही काहींचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. भरपूर चिखल ज्यांच्याकडे शिल्लक आहे ते तो उडवत आहेत. फेसबूकवर काही शेंबडी पोरे स्वत:ची अक्कल काहींकडे गहाण टाकून घाणेरडया भाषेत पोस्टस् करत आहेत किंवा अशा पोस्टस् शेअर करीत आहेत , अर्वाच्च्य टीकाटिप्पण्या करीत आहेत. मागच्या पिढीलाही देशप्रेम शिकवणारे आजच्या पिढीतले काही सभ्य संस्कृतीचे आदर्शवीर त्यांच्या आदर्शांकडे पाणी भरीत असल्यासारखे बाललीला करीत समाजमाध्यमांवर लिहिण्याची लायकी नसल्याने ,  दर्जाहीन लेखन करीत आहेत.  कोरोना आपला विळखा क्षणाक्षणाला विळखा घट्ट करतो आहे. वेळ काय, आपण करतो काय , हे ज्यांना कळत नाही ते स्वत:लाच कळते अशा अविर्भावात बोलत आहेत.  तिकडे देशाची अर्थव्यवस्था शुन्याकडे सरकते आहे अशा बातम्या सांगताहेत. म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था ! काहींचे लक्ष काही विषयांवरून वळविण्यासाठी काहींचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. इकडचे आणि तिकडचे आपला तो बाब्या याच न्यायाने एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. त्या वेडयांना आपण सुरक्षित आहोत असेच वाटते आहे.  काहींचा गेल्या काही वर्षापासूनचा उन्माद अजूनही ओसरलेला नाहीय. त्यासाठी चीनमध्ये पुन्हा कोरोना उद्भवतो आहे आणि आपल्याकडे कोरोनामागून सारी आला आहेच . तोही वाढतो आहे.  त्यातच देशात काही ठिकाणी लोक गावी जाण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. यांमागे कटकारस्थाने असल्याचेही संशय व्यक्त होत आहेत. मूळात कोरोनाही एक कट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काही लोक पायी , काही बाईकने , काही कारने लपूनछपून गावी पळत आहेत. काही पकडले जात आहेत . काही लोक जत्रा , साखरपुडे , लग्ने , वाढदिवस गर्दी करूनच साजरे करीत आहेत. काही प्रार्थनास्थळांचा आधार घेत आहेत. काही अडाणी आणि काही सुशिक्षित अडाणी जुन्याच गोष्टींना धरून अडून बसले आहेत. काही स्वार्थी लोक कोणत्याही परिस्थितीत स्वार्थच साधतात. या काळातही नफेखोरी करणारे लोक आहेत.  यासंदर्भात इथे एक कविता देतो :


रंजलागांजला तुकाराम

ज्ञानेश्वरांच्या निर्मळ मनातून आलेल्या
जो जो वांछील ते तो तो लाहो हया उक्तीला प्रथम उचलून
काही लबाडांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवणा-या तुकारामाचा खून केला ...
आणि पुंडलिकाला पुढे करून
विठ्ठलाला विटेतच कायमचे बंदिस्त करून टाकले
तेव्हापासूनच प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हैवान
अधिक मोकाट सुटलेयत...
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लुटालूट करणारे हे संधीसाधू
नफेखोरी करीत राजरोस उजळ माथ्याने फिरत आहेत
ज्ञानेश्वरांना खिशात घालून
आणि
रंजलागांजला तुकाराम
कधीही न सुटू शकणा-या त्यांच्या बेडीतल्या विठ्ठलाचा धावा करतोय
पुन्हा पुन्हा आपलाच खून करून घेत
त्या पापी , बलात्कारी , पापी हातांकडून ..

...देवीदास हरिश्चंद्र पाटील


  1.        दुपार नंतर संध्याकाळ आणि संघ्याकाळ नंतर रात्र ओघाने आलीच. आज काही विशेष झाले नाही. पुढच्या दारी बसायला आज कोणी विशेष आले नाही. काही फोन मात्र या वेळात झाले. दिवाबत्तीनंतर सौ. ने टीव्ही लावला. मी हिला बातम्या बघूच नको , त्यापेक्षा कंटाळवाण्यासुध्दा मालिका बघितल्यास तरी चालतील , असे मी सौ. ला सांगितले. उगाच प्रेशर वाढवून घेण्यात अर्थ नाही. रात्रीही शेवयाची खीर खाल्ली. हल्ली दिवस रात्री कोरोनामुळे तणावच असतो. तणाव कमी होऊन कधी तरी पहाटे झोप लागते.


( क्रमश: )

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

Savali Marathi Gazal

सावली

तू न भेटलास तर मी कुणीच ना इथे !
नांव-गांव कोठले ? ती हमीच ना इथे !

घे मला तुझ्याजवळ... साथ दे तुझी मला ...
पाहिजे मला तशी जिंदगीच ना इथे !

नेहमीच हा तुझा संग लाभु दे मला !
सांग भेटशील तू नेहमीच ना इथे !

आरशात हे तुझे सारखे दिसे हसू
अन् तयार झाकण्या पापणीच ना इथे !

गावही तुझे कसे ... दूर तारकांपरी....!
काय चालले तिथे ? ... बातमीच ना इथे !

काय चांदण्या करू ? काय चंद्रही करू ?
साथ जी हवी तुझी नेमकीच ना इथे !

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

Corona lock down in process

मागे - पुढे

15.04.2020

               आज लॉक डाऊनचा बावीसावा दिवस. काल रात्री आम्ही झोपण्याची जागाच बदलली. बेडरूममधून सरळ हॉलमध्ये झोपायला सुरूवात केली. बेडरूममध्ये पलंगावरच्या गादीमुळेही खूप गरम होत होते. झोपण्यापूर्वी अंगणातल्या लादीवर पाणी मारले जेणेकरून हॉलमध्ये थंडावा मारील. पण तसे वेळेवर झोपूनही सौ.ला झोपच येत नव्हती. मला झोप येऊनही मी झोपू शकत नव्हतो. अखेर रात्री सव्वा वाजता तिने विचारचक्र थांबवण्यासाठी गोळी घेतली.  ती झोपल्यानंतर मी कटाक्षाने जागा राहण्याचे प्रयत्न सोडून झोपेच्या अधीन झालो तेव्हा बहुतेक रात्रीचे अडीच वाजले असावेत. सकाळी सहाला जाग आली तसा मी उठलोच. इथे झोपलो असतो तर पाणी येवून गेल्यानंतरही ब-याच वेळाने उठलो असतो. ते उपयोगाचे नव्हते. पावणेसातला पाणी येईपर्यंत शक्य तेवढी इतर कामे आटोपली. पाणी आल्यावर पाणी भरले. पाणी भरतानाच मला पडलेले स्वप्नं आठवले. अगदी छोटे. मी एस. टी. बस मध्ये उभा असतो. गर्दी असते. बस एका ठिकाणी थांबते आणि माझ्या बाजुच्या सीटवरची सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आजी उठते व बसमधून उतरते. ती चहा घेऊन परत येईल की ती खरोखरच तिच्या मुक्कामावर उतरली हा विचार मनात येत असतांनाच काही असो आपण बसून घ्यावे , असा विचार करून मी  रिकाम्या जागेवर बसतो. इतक्यातच मला जाग आली. त्यानंतर माझे व्यवहार सुरू झाले. आज सौ. लवकर उठणे शक्यच नव्हते.


              आज गुरूवर्य सुरेश भट यांची जयंती.  खरे तर इयत्ता नववीपासूनच मी कविता लिहीत होतो. माझी वाटचाल कवितेकडून गीतकाराकडे होत असतानाच 1984 च्या दिवाळी अंकात मला दादासाहेबांची गझल प्रथम वाचनात आली . त्या एकाच रचनेने मी सुरेश भटांकडे ओढला गेलो.  तेव्हा मराठी गझल हा प्रकारच मी ऐकला नव्हता .  पण त्यानंतर भटांच्या आणि म.भा. चव्हाण , सर्वोत्तम केतकर , दीपक करंदीकर....यांसारख्यांच्या गझलाही वाचनात आल्या. दादासाहेबांचे रंग माझा वेगळा आणि एल्गार हे संग्रह तर मी झपाटल्यासारखे वाचले. त्यातल्या गझलांची लय माझ्या मनावर कोरली गेली. तर पुढे मी ब-यापैकी गझल हा काव्यप्रकार लिहू लागल्यावर ' सावली ' ही गझल खुद्द सुरेश भटांना उद्देशून लिहिली . ती पुढे दैनिक मुंबई रविवार सकाळ मध्ये दि. 28.02.1993 रोजी प्रसिध्द झाली.  त्यावेळी दादासाहेब कधी नागपूरला तर कधी पुण्याला असायचे. त्यावेळी वाहतुकीची साधनेही अपुरी होती. मला त्यांना भेटायची ओढ लागली होती. पण ते शक्य होत नव्हते.  व्याकुळ होऊन मी गझल लिहिली, ती अशी होती :

                  सावली

तू न भेटलास तर मी कुणीच ना इथे !
नांव-गांव कोठले ? ती हमीच ना इथे !

घे मला तुझ्याजवळ... साथ दे तुझी मला ...
पाहिजे मला तशी जिंदगीच ना इथे !

नेहमीच हा तुझा संग लाभु दे मला !
सांग भेटशील तू नेहमीच ना इथे !

आरशात हे तुझे सारखे दिसे हसू
अन् तयार झाकण्या पापणीच ना इथे !

गावही तुझे कसे ... दूर तारकांपरी....!
काय चालले तिथे ? ... बातमीच ना इथे !

काय चांदण्या करू ? काय चंद्रही करू ?
साथ जी हवी तुझी नेमकीच ना इथे !

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !

            खरंच होतं , नागपूर ते रत्नागिरी हे हजार किमी.चं अंतर. एवढया अंतरावरून दादासाहेबांनी रत्नागिरीतल्या जाकीमि-या गावच्या धुळीतलं फूल उचललं ! ते नसते तर मी गझलकार म्हणून कुणीच नसतो. त्या काळातच नव्हे तर त्यानंतरही अनेक वर्षे रत्नागिरीत मराठी गझल लिहिणारे कोणीही नव्हते. ( सुदैवाने, आता आताशी परिस्थिती बदलते आहे ! ) गझलची कसलीही माहिती त्यावेळी रत्नागिरीत कोणी देऊ शकत नव्हते. माझा मित्र अजिज हसन मुकरी फक्त माझ्यासोबत होता. आम्हीच आमचे परीक्षक होतो. समीक्षक होतो. भटसाहेबही कधी नागपूर तर कधी पुणे असे वास्तव्य करायचे. म्हणूनच मी म्हटले होते :

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !

              सुरेश भटांच्या आठवणीतच दुपार झाली. जेवण , वामकुक्षी , लेखन , वाचन यात दुपार जाऊन संध्याकाळ आली. एक एक करता पाच सहाजणी आमच्याकडे जमल्या आणि काही वेळातच कलकलू लागल्या. गंमत म्हणजे वाद दोघीतच होता . पण बाकीच्या त्यात प्रचंड उत्साहाने उतरल्या. बराच वेळ बायांचे धिमशान चालूच होते. अखेर मी दम दिला आणि फक्त दोघीनीच काय ते बोला आणि तेही मोठयाने बोलायचे असेल तर तुमच्या घरी जाऊन बोला. आता पोलीसांची गाडी येण्याची वेळ झालीच आहे. हे सांगताच पाच मिनिटात सगळया सरळ आल्या. सात वाजले तसे आम्ही दिवाबत्तीकडे वळलो. मग त्याही आपापल्या घरी गेल्या. रात्री लवकर झोप लागत नव्हतीच . साडे अकरा वाजता अंथरूणावर पडलो. पण बाराच्या दरम्याने झोप लागली. सौ. ने गोळी घेतली होती. दीड वाजता ती जागी झाली. परत पाच मिनिटात झोपी गेली. पण मला आलेली जाग चालूच राहिली. मला पहाटे कधी तरी झोप लागली.

( क्रमश: )

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

Corona lock down extended

मागे - पुढे

14.04.2020

                  आज लॉक्ड डाऊनचा एकविसावा दिवस. आज भारताच्चे महान सुपूत्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. पस्तीस वर्षापूर्वी याच दिवशी माझी पहिली कविता दै. रत्नभूमी मध्ये छापून आली होती आणि तिचं शिर्षक होतं :     ' राजकारण गेलं चुलीत ! ' मी पुढे कसा झालो ते सांगायला नकोच ! सर्वसामान्यांसाठी सतत लढणा-या नि:स्वार्थी  महात्म्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणा-या लबाडांनी अनेक महात्म्यांच्या नावालाच काळीमा फासला आहे ! कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. या अवस्थेतही काही लोक राजकारण आणि राजकीय टिप्पण्या यातच मश्गूल आहेत. स्वत:चे घर जळायला आले तरी दुस-यांच्या घरात आगी लावणारे गेल्या काही वर्षात वाढलेले आहेत. त्यांच्याकडे लोकांनी आपली  अक्कल गहाण टाकली आहे , हे ओळखण्याइतके ते बेरकी नक्कीच आहेत. इकडे लोक थाळया , टाळया वाजवायला सांगितल्यावर आणि दिवे लावायला सांगितल्यावर गर्दी करून ड्रम आणि फटाके वाजवत आहेत. पाचशे रूपयांसाठी बँकांच्या दारात सोशल डिस्टन्सचे बारा वाजवून गर्दी करत आहेत. कधी खाल्ले नाही तसे भाज्या आणि मासे याकरिता लोक जीव धोक्यात घालून गर्दी करीत आहेत. गेल्या काही वर्षात लोक उद्देशहीन होऊन अधिक भरकटत आहेत. या लोकांना आवाहने करतांना तारतम्य बाळगणेही कठीण झाले आहे. चार लबाडांकडे  अक्कल गहाण टाकल्यावर माणसांची अशी मेंढरे झाली नसती तरच नवल ! सर्वत्र बेभानपणे धावून आपलीच माणसे कोरोनाचा जाहीर प्रसार करीत आहेत. कोरोना मेंदूवर ताबा मिळवतो अशी एक शंका आहे.  काल रात्रीही ब-यापैकी झोपलो. आज एकही स्वप्नं पडले नाही. नेहमीसारखी सहाला जाग आली. मागच्या दारी जाऊन पंपाने पाणी वरच्या टाकीत चढवले. साफसफाई  केली. तोवर पाणी आले ते भरले. आजही झोपेच्या गोळीचा अंमल लांबल्याने सौ. सातनंतरच उठली. आज फारसे कोणी आलेच नाही. आज कोरोना संचारबंदी तीस एप्रिलऐवजी तीन मे पर्यंत वाढवण्यात आली .  दुपारी जेवणापूर्वी मुलाने व्हिडीओ कॉल केला. जरा फ्रेश दिसत होता. सुरूवातीला चांगला बोलला पण काय झाले कुणास ठाऊक , कदाचित संचारबंदी लांबल्याने आमचे पुण्याला जाणे लांबल्याने त्याच्या मनावरचा ताण वाढला असावा. तो घर फिरून दाखवा म्हणाला. घर बघूनही त्याचे मन भरून आले .  बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले. तो रडल्याने आम्हां दोघांनाही रडू आवरले नाही. अखेर त्याला समजावून शांत केला. त्यानंतर थोडे बोलल्यानंतर मग तिघांनाही बरे वाटले. फोन झाल्यानंतर आम्ही जेवलो. जेवणात मन लागतच नव्हते. जेवायचे म्हणून जेवलो.

          दुपारी मी वामकुक्षी केली. संध्याकाळी दोघी तिघी येऊन सौ. शी बोलत बसल्या. मी अंगणात फिरत होतो. मग मी पाणी शिंपायला गेलो आणि दरवाजा बंद करून ही बीनाच्या आईकडे गेली. ती आली तोवर सात वाजले. तिने आमच्या देवाजवळ दिवाबत्ती केली . मी भावाच्या घरात दिवाबत्ती केली. रात्रीही फारसे काही घडले नाही. तसे लवकरच झोपलो.


( क्रमश: )

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

Corona virus lock down continues

मागे - पुढे

13.04.2020

                  आज लॉक्ड डाऊनचा विसावा दिवस. काल रात्री  सौ.ची तब्ब्येत व्यवस्थित असल्याने ब-याच काळाने ब-यापैकी झोपलो. एकदा साडेतीनला उठलो तेव्हा काही मिनिटांपूर्वी स्वप्नं पडल्याचे आठवले . एकदम गणपती विसर्जनाची मिरवणूकच दिसते. तीही दरवर्षी विसर्जन करतात त्या खालच्या बाजूच्या समुद्राच्या दिशेने नव्हे तर उलट दिशेने उत्तरेकडून पूर्व भागातील खाडीच्या दिशेने चाललेली. घरापासून वरच्या दिशेच्या चढावावर उत्तरेकडून पूर्वेला वळणारी. माझा मुलगा डोक्यावर गणपती घेऊन सर्वात शेवटी चालत असतो व मी त्याच्याही मागे चालत वळणापर्यंत पोचलेला असतो. त्याक्षणी मला उजवीकडे आणखी एक रस्ता दिसतो पण त्याने हे लोक जात नाहीयत. त्या रस्त्याच्या वरच्या बाजूला लगतच लाकडी कंपाऊंड घातलेले असते . कोणी तरी मला सांगतो तिकडे जाऊ नका. तिथून खालच्या बाजूचा एरिया सील केलेला आहे. मी मुलाच्या पाठोपाठ चालू लागतो . इथेच स्वप्नं संपते. म्हणजे आमच्या गावातही कोरोना येवून जवळचाच भाग सील करावा लागणार की काय ? सील केलेल्या त्या भागात कोणी कोरोनाग्रस्त तर सापडणार नसेल ना  ? हा कोरोना गणपती विसर्जनापर्यंत लांबणार की काय ? महत्वाचे म्हणजे नेहमीच्या दक्षिण समुद्रात विसर्जन का नाहीय ? तिथे काय होणार आहे ? समुद्राऐवजी खाडीत का विसर्जन करायची वेळ येणार आहे ? समुद्राचे पाणी काही भूभाग तर गिळंकृत करणार नाही ना ? पावसाळयात काही विचित्र घडणार आहे का ? की  गणपतीपर्यंत मुलाची भेट होणार नाहीय ? अनेक प्रश्न  ! तणाव वाढवणारे. काल दुपारी मुलाशी झालेले बोलणे मनात होतेच. एका बाजुला पत्नीचा अती चिंता करण्याचा स्वभाव , कोरोनाचा प्रभाव आणि स्वत:ला फीट राखण्याची साठीतली माझी कसरत ! 

           आज सोमवार . नळाला पाणी येणार नाही.  पण बाकीची कामे होतीच. आज सौ. चक्क नऊ वाजता उठली. पहाटे साडेतीननंतर ती चांगलीच झोपली. झोपेची गोळी तिला चांगलीच लागली. चहा घेऊनही तिच्या डोळयांवर झापडच येत होती. कुठे तरी झेप जाऊन पडण्यापेक्षा झोप म्हणून सांगितलं, तशी ती झोपली.  लंबू वहिनी उन्हात गहू सुकत घालायला आली, तेव्हा ही झोपलेलीच होती. वहिनी मग बाहेरच्या बाहेर गेली . तिने अर्ध्या तासाने उठून आंघोळ , जेवण वगैरे केलं. दरम्यान मुलाला फोन केला. मी बोलून हिला बोलायला दिले.  दोघेही नीट बोलल्याने भांडण मिटले .  मला समाधान वाटले. दुपारी जेवलो. ही वामकुक्षीकडे वळली. आज तिचा उजवा पाय पुन्हा दुखू लागला. मी राईच्या तेलाने रगडले.  बरे वाटताच ही झोपली. एका गझलचा एक शेर बाकी होता.  सकाळपासून मनासारखा जमत नव्हता आणि जमवण्याची मन:स्थितीही नव्हती. आता सगळे ठीक होते . मी गझलकडे नजर टाकली. थोडया वेळाने तो शेर जरा मनासारखा झाला.   
       मी दिले व्यथेस माझ्या धुमारे नवनिर्मितीचे अन्
      अश्रुत मिसळले हास्य मी, हुंदक्यांना हसवण्यासाठी !
 या ब्लाॅगवर संपूर्ण गझल मी पोस्ट केली आहे. तसे याच ब्लाॅगवर माझ्या मराठी गझलांचे पान आहे. तिथेही ती मिळेल. आज आम्ही चहा चार वाजताच घेतला. ही टीव्ही लावून बसली तोच काळी भाभी भेटायला आली. ती बोलत असतांनाच अनमोलची आई आली. आज जरा सावरलेली दिसली. तिने गरम गरम फणसाची भाजी आणली ती मी ओट्यावर नेऊन ठेवली व परत अंगणात फे-या मारू लागलो. त्या तिघीही पायरीवर बसून गप्पा मारू लागल्या. अनमोलच्या आईने काल ठरल्याप्रमाणे दारात ज्यादा असलेली जुनी तुळस नेली. तिच्या तुळशीवर गडगा कोसळल्याने आम्ही तिला ही तुळस न्यायला सांगितले होते.  ती पैसे देत होती ते आम्ही घेतले नाहीत.  टीव्ही लावला तर पुण्यात आणखी 22 ठिकाणे सील करणार अशी बातमी आली. चिंता वाढल्याने मी टीव्ही बंदच केला. 

            गंमत म्हणजे , आज दिवसभरात बीना किंवा तिची आई अजिबात आलेली नाही. रात्री नऊ वाजता सौ. ने फोन करून बोलावल्यावर लंबूवबिनी आली. तिचे दोन्ही नातू मोठया पोरांच्या नादाला लागून देवळाच्या आसपास गप्पा मारत बसतात. त्यामुळे ती चिंतेत आहे. पोलीसांच्या राऊंडमध्ये सापडले तर गरीबाला कोणीच मदत करणार नाही. हे तिचे बोल सत्य आहेत. उच्च वर्तुळातील लोकांना सारे माफ होते , पण गरीबांचा कोणीच वाली नसतो . उच्च संस्कृतीचा टेंभा मिरवणा-यांनी आचरणाच्या नावाने शून्य कमाई केलेली असते. माणसामाणसांत भेदभाव करणारी संस्कृती व्यवहाराच्या विळख्यात काहींनी जखडली आहे. स्वाभाविकपणे तिचे महात्म्य घसरले आहे. उच्च मुल्ये पायदळी तुडवल्यानंतरची ही कोरोना स्थिती आली आहे ती उगाच नव्हे. सौ. ने लंबूवहिनीसाठी राखून ठेवलेले जेवण तिला दिले ते घेऊन ती गेली. हया जेवणाची चव लागल्याने लंबूवहिनीचे नातू काकींसारखे जेवण कर म्हणून तिला सांगू लागले आहेत.

           त्याच वेळी माझे जैतापूरचे मुंबईस्थित सहकार्यशील सन्माननीय मित्र जगदीश आडविरकर यांचा मेसेज आला. तो. असा : CM Fund किंवा PM Fund यात दान देताना आपल्या आजुबाजुला पण जरा बघा की कोणी आपला शेजारी, मित्र किंवा नातेवाईक तर आर्थिक विवंचनेत नाहीये ना ? असेल तर पहिली त्यांना मदत करा कारण त्यांच्या मदतीसाठी कोणी PM अथवा CM येणार नाही तर तुम्हीच त्यांच्या पर्यत पोहोचु शकता. हे तुमचे लोक कदाचित तुमच्याकडे मागायला लाजत असतील किंवा फार स्वाभिमानी असतील तरी कृपया त्यांना मदत करा.

 *बघा फार बरे वाटेल.*

           हा माणुसकीचा संदेश .    त्यांना मी जेवण घेवून जाणा-या लंबूवहिनीकडे बघतच लगेच मेसेज केला : अगदी बरोबर. आम्हीही शक्य ती मदत जवळपासच्या गरीब कुटुुंबांना अगोदर पासूनच करतो आहोत. आज हे फारच गरजेचे झाले आहे व हीच खरी माणूसकी आहे. त्याला त्यांनी चिन्हांकित उत्तर दिले ते असे :  👏💐 .  तोवर दहा वाजायला आले. मी खालच्या घरातले दिवे मालवले व ते घर बंद करून आलो. सौ.ला झोप येऊ लागली होती . मग आम्ही बेडरूमकडे वळलो.

( क्रमश: )

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

Gidhade Marathi Gazal


                           गिधाडे


विजयोन्माद वाढतो पराभूतांना खिजवण्यासाठी
पुढे काळ बदलतो चक्र , विजेत्यांची जिरवण्यासाठी !


काय नेतो सोबत सांग दुनियेचा निरोप घेतांना ?
आयुष्यभर असते धडपड , आयुष्यच हरवण्यासाठी !


युगे युगे हे गूढ कुणाला कळले नाही सृष्टीचे
काहींना मारले जाते, काहींना जगवण्यासाठी  !


मी दिले व्यथेस माझ्या धुमारे नवनिर्मितीचे अन्
अश्रुत मिसळले हास्य मी, हुंदक्यांना हसवण्यासाठी !


प्रेताच्या टाळूवरचे लोणी खातातच केव्हाही ....
जगतात गिधाडे ही फक्त स्मशानात मिरवण्यासाठी !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

Corona locked down nineteenth day

मागे - पुढे

12.04.2020

  1.                   आज लॉक्ड डाऊनचा एकोणीसावा दिवस. काल सौ.ची तब्ब्येत बिघडल्याने घरगुती उपाय करता करता पहाट झाली. तिला चक्कर येत होती. ताकत संपल्यासारखे झाले होते. ती झोपल्यानंतरच पहाटे मी झोपलो. सकाळी सहा वाजता जाग आलीच. आज निग्रहाने उठलोच कारण पाणी लवकर येणार ही आठवण आज मनात होतीच.  पावणेसात वाजता पाणी आले. मीच ते भरले. आज ती उठूच शकत नव्हती. मी तिला उठवलेही नाही. मी कालच्या फेसबूकवरील अभिनंदनांना धन्यवाद देत राहिलो. लाईक्सची नोंद घेत राहिलो. हल्ली व्हॉट्सॲपवर मी अकरा साडेअकराच्या सुमारासच गुड माँर्निंग करायचो ती वेळ ब-याच दिवसांनी सातची केली ! संदेश स्वीकारणा-यांनाही आश्चर्य वाटले असणार . होते असे कधी कधी. 😀😀😀😀 चालायचेच. बरे नसले तरी सौ. झोपून राहण्यातली नाहीच. आठ वाजता ती उठलीच. जरा फ्रेश झाली. आम्ही चहा घेतला. मी आज चहानंतरच परिसर स्वच्छता केली. आता कसे असते की कुठेही जायचे नसते. कोणी पाहुणेही कुठून येणार नसतात. कोरोनाचा प्रभाव आहे. पण काही लोकही जरा आरामदायी वागू लागल्याचे माझ्या पाहण्यात व ऐकण्यातही आले आहे. आमच्या गोव्यात याला सुशेगादपणा म्हणतात ! नऊ वाजले तसा पुन्हा हिला अशक्तपणा जाणवू लागला. मी हिला बेडवर झोपवले . मीठसाखरपाणी करून उठवले व प्यायला लावले. तिला जरा बरे वाटले. मग जरा झोपते म्हणाली. मग तिला झोपू दिलं व मी इतर उद्योगांकडे वळलो. दहा वाजता ही पुन्हा उठली व आंघोळीला गेली. आंघोळीनंतर मात्र तिला खूप बरं वाटलं. मग तिने जेवण करण्यास सुरूवात केली. मी मुलाला फोन केला. आम्ही त्याच्याशी बोललो. उद्यापासून त्याच्या एरियात तीन दिवस बाहेर पडायचे नाहीय. आमच्याकडे अजून काही नवीन बातमी नाही. आमचा वार्ताहरही अजून आलेला नाही. पेपरवाला आला तेव्हा बातम्या वाचायला मिळाल्या. कोरोनाशीच संबंधित बातम्या. 


            दुपारी जेवलो. ही वामकुक्षीकडे वळली.  आज मीही सततच्या जागरणांनी थकलो होतो. पण सौ. ला अशक्तपणामुळे तहानवगैरे लागली किंवा उठण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला तर , या विचारांनी मी जवळच शतपावली करीत होतो. चार वाजायला आले तसा पाठ टेकावी म्हणून मी खाली वाकतच होतो तितक्यात मुलाचा फोन आला.  काल दुपारपासून त्याच्या आईचे व त्याचे भांडण सुरू होते. तो व्यथित होऊन बोलत होता. मी त्याला पाऊण तास समजावत होतो. पण त्याचा होणारा कोंडमारा त्याला सहन होत नव्हता. मी सौ.लाही परोपरीने सांगितले होते की वेळ कसली आहे ते बघ. तो तिथे परक्या ठिकाणी एकाकी आहे. त्याची मानसिक स्थिती खालावली तर त्याची प्रतिकारशक्ती कमी होईल. आज कोरेनाच्याबाबतीत जे सांगितलं जातंय ते प्रतिकार शक्तीचंच महत्व सांगितलं जातंय. आज भांडून उपयोग नाही. तुमचे दोघांत जे काही मुद्दे आहेत ते नंतरही बघता येण्यासारखे आहेत. अपेक्षांचे ओझे सतत बाळगू नये , कुणाच्याही मानेवर सतत ठेवू नये. प्रत्येकाला त्याचे स्वत:चे असे थोडे तरी आकाश हवे असते. मी स्वभावाला मुरड घातली म्हणून तोही घालू शकेल असे नाही. सगळेच आपल्या मनासारखे आणि आपल्याला हवे तेव्हा होत नाही . आयुष्यात खूप धीर धरावा लागतो. धीर धरूनही नेहमीच खीर मिळतेच असेही नाही. त्यालाही आपण तयार असलो पाहिजे. प्रश्नातच अडकून उपयेगाचे नसते तर प्रश्न निर्माण झाल्या क्षणीच आपण उत्तराच्या दिशेने कूच केले पाहिजे. मी मुलालाही हेच सांगितले आणि कोणत्याही परिस्थितीत नाउमेद होऊ नकोस , कारण परिस्थिती नेहमीच बदलत असते.  असे पाऊण तास बोलल्यावर तो निदान वरवर तरी थोडा शांत आला. मग त्यानेच फोन बंद करा , मी आता झोपतो म्हणून सांगितले. तो फोन सुरू असतांनाच लंबूवहिनीने कालवी आणून दिली. मी भांडे घेतले आणि ही नुकतीच झोपली आहे म्हणून सांगितले. ती नंतर येते असे सांगून गेली. मी ये म्हणालो.  कालवीचे भांडे मी फ्रीजमध्ये ठेवले. फोन संपला तोवर पावणे पाच झाले होते. मी जरा पाठ टेकली तर पाच मिनिटांनी सौ. जागी झाली. चहा घेऊया म्हणाली. मी टेकलेल्या पाठीसह उठलो. चहा घेतला. बाहेर येवून पायरीवर बसलो. अजून मुलाचे विचार जात नव्हते. मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. त्याची कधी भेट होणार, तो कसा असेल , या कल्पनेने मन व्याकुळ होत होते. सौ.ही याच विचाराने हैराण झाली आहे. 

           साडेपाच वाजता लंबूवबिनी आली.  मग बीनाची आई आणि धंज्या आले. धंज्या गेला आणि संत्या आला. मी अंगणात फिरत फिरत त्यांच्याशी बोलत राहिलो. अशी माणसे सोबत असतात तेवढा वेळ तरी मनावरचे दडपण जाणवत नाही. उद्या पाणी येणार नसल्याने आज झाडे शिंपायचाही प्रश्न नव्हताच.  बीनाची आई  गेली तरी लंबूवहिनी व संत्या होतेच. सौ.ही गप्पात सामील होती. विषय कोरोना काळात मिळणा-या सवलतींचा होता. आमचे रेशनकार्डच मुळी पांढरे आहे, त्यामुळे आमचा संबंध नव्हताच.  तरी पण ज्यांना गरज आहे त्यांना काही मिळत असेल तर त्यांना आम्ही जरूर माहिती देतो. कोरोनासारख्या परिस्थितीत तेवढीच खारीची का होईना मदत ! संत्याला गावातल्या सेंटरवर फाँर्म भरायला सांगितले आहे. ज्यांना खरोखरच सवलतींचा आधार आवश्यक असतो त्यांना सवलती द्यायला काहीच हरकत नाही. पण ऊठसूट सवलतींचाच पाऊस पाडून माणसाची उद्यमशीलता  , कल्पकता व कष्ट करण्याची प्रवृत्ती नष्ट करणे चूक आहे . ते कोरोनासाठी रेड , आँरेंज , ग्रीन झोन पाडले ना , तसे सवलतींचे पण झोन पाडले तर सवलतींचा गैरफायदा घेणा-या लबाड चोरांना बराचसा पायबंद बसेल. शासन हे बरेचदा पक्षबाधित असते व पक्ष विस्ताराला आवश्यक म्हणून मते मिळवण्यासाठी सवलतींचा बेमालूम वापर करते. यासाठी प्रथम शासन बनले की त्याची पक्षीय नाळ तोडली पाहिजे व लोककल्याणकारी , वास्तव , निरपेक्ष निर्णय शासनाने घेतले पाहिजेत. असो, हे सद्या तरी अवास्तव वाटते आहे ! 😀😀😀😀

              संध्याकाळ संपून रात्र झाली.  आमच्याकडे जमलेली मानवपाखरे त्यांच्या घरटयात गेली. आम्ही जेवण केलं आणि शतपावली करीत होतो कोच लंबूवहिनी आली. काही थोडेफार तिच्यासाठी राखून ठेवलेले हिने तिला दिले. तिने नको नको म्हणतानांही भांडी घासली व ती गेली. मग दहा वाजता सौ. कालच्यासारखंच लवकर झोपूया म्हणाली. काल ती असं बोलली आणि ती रात्र भयंकर गेली. आज तसे काही होऊ दे नको , असे म्हणतच मी पुढचा दरवाजा लावला आणि झोपायला गेलो. 

( क्रमश: )

रविवार, १२ एप्रिल, २०२०

Corona virus becoming dangerous

मागे - पुढे

11.04.2020


  1.                   आज लॉक्ड डाऊनचा अठरावा दिवस. काल रात्रभर झोप लागलीच नाही. सौ.ला तर झोपेची गोळी घेऊन झोप लागली नाही. अखेर सहा वाजता उठलोच. पण काय वाटले कुणास ठाऊक पुन्हा पडलो. नेमका डोळा लागला. काल सत्त्या सकाळी सात वाजता पाणी येईल म्हणून बोलला होता. पण माझ्या डोक्यातच तो विषय सकाळी आला नाही. नशीब बंदिनी वहिनीनी फोन करून पाणी आल्याचे सांगितले. धडपडत उठलो आणि पाणी भरायला मागच्या दारी गेलो. पण पाणी जात आल्याने एक हंडाच पाणी मिळाले. खालच्या अंगणातली टाकी मात्र पूर्ण भरली होती. आज शहरातून उर्मिला आली. ती म्हणाली खाली बाजाराच्या इथे पोलीस चौकी टाकणार आहेत. बरे झाले. मासे खरेदीसाठी शहरातले अनोळखी लोक यायला लागले होते व ही चिंतेची बाब होती. लॉक्ड डाऊनला अजूनही लोक गंभीरपणे घेत नाहीत . कोरोनाचा प्रसार जगभर ज्या झपाटयाने होतो आहे ते पाहता कोरोना स्पर्शाशिवायही होतोय की काय अशी शंका येऊ लागली आहे. जगाने आताच त्यावर मात करायची उचल खाल्ली पाहिजे .  यासाठी आधी लोकांना आपली जबाबदारी कळली पाहिजे. हा विचार डोक्यात होताच. सकाळीच ते कागदावर गझल स्वरूपात उतरले. तीच रचना मी फेसबूकवर पोस्ट केली.  ती अशी 


ते कौलारू घर कुठे दिसते का ते बघ !
गोठयात उभी गाय हंबरते का ते बघ !

उरल्यासुरल्या माणसांचा शोध घे !
मातीत , राखेत कुणी मिळते का ते बघ !

अंतर ठेव , पण कधी अंतर करू नकोस !
कोणासाठी काळीज जळते का ते बघ !

नवे विषाणू येत राहतील , सावध हो !
आयुष्याची किंमत समजते का ते बघ !

मानवाच्या अस्तित्वाचीच ही लढाई !
ही निवडणुक नाही , हे कळते का ते बघ !
   
...देवीदास हरिश्चंद्र पाटील

       आज सकाळी आण्णीन आली. तिच्या नव-याला आण्णा म्हणायचे , म्हणून ती आण्णीन. तिने तिच्या माहेरच्या पुढच्या गावातल्या तीन डाँक्टरांना पोलीसांनी तपासणीला सिव्हीलला नेल्याचे सांगितले. एका डाँक्टरने तर एका रूग्णाला तपासून कोरोनाची शंका आल्याने स्वत:च सिव्हीलला जायला सांगितले आणि आपण मात्र आणखी पेशंटस तपासले. पोलीसांना कळताच त्यांनी तो दवाखाना बंद करून डाँक्टरला सिव्हीलला नेले.  आण्णीनने भाजी चिरून दिली आणि ती गेली. दुपारी जेवायला बसलो . चार घास खातोय तेवढयात कांदयाबटाटयाचा टेंपो आला. खालच्या बाजूला असलेल्या भावाच्या घराशेजारीच मागील भागात जाणारा रस्ता आहे. तो नेमका गेटजवळच थांबला. लंबूवहिनी वासावरच असल्यासारखी धावत आली. तिची केवढी घाई उडालेली.  ती बोंबटत आल्याबरोबर माझी सौ. पण जेवण अर्धवट टाकून  पिशवी व पैसे घेऊन तिकडे गेली. तिकडे ब-याच बायका आणि काही ( हौशी ! ) पुरूषही जमले होते हे कलकलाटावरून कळून येत होते. मी व्यवस्थित जेवलो. हिचे ताट ओटयावर नेऊन झाकून ठेवले. अर्धा तास तरी हा गोंधळ संपणार नव्हता . लॉक्ड डाऊन करा नाही तर आणखी काही करा , लोक करायचे तेच करतात. थाळया वाजवायला सांगितल्या तरी गर्दी करून फटाकेच वाजवतात ! पणत्या लावायच्या वेळीही लोकांनी फटाकेच लावले !  सुधारक आगरकर किती अचूक होते , ते हया लोकांवरून समजते. शेवटी कांदे खरेदी करून ही आली आणि त्यानंतर जेवली. पोत्यातले कांदे कसे आहेत ते पोते सोडल्यानंतरच कळेल ! हिच्या जेवणानंतर ती वामकुक्षीकडे वळणार तोच मुलाचा फोन आला. त्याने खिचडी बनवली होती आणि ती खाता खाता तो बोलत होता. त्यात अर्धा तास गेला. फोन संपतोय नाही ताेच सत्त्याची बायको कंपाऊंडमधल्या दुर्वा काढायला आली. मी झाडे शिंपतो त्या ठिकाणी दुर्वा आल्या आहेत. दुर्वा काढल्यानंतर ती नंतर अर्धापाऊण तास बोलत बसली. कोरोनामुळे तिच्या कमावत्या मुलाचे काम गेले आहे. कुटुंबात कोणीही कमावते नाही. काय करायचे या विचाराने ती हैराण आहे. यंदा मुलाचे लग्नं करायच्या तिच्या विचारांची कोरोनाने पार वाट लावली आहे.  आमच्याबराेबर तिने मन मोकळे केले. ती गेली तोच अनमोलची आई रडत आली ! तिला मन मोकळे करायचे होते आणि सल्लाही हवा होता. प्रत्येकाची एक कथा आहे. प्रत्येकाची एक व्यथा आहे. सख्ख्या मुलाने खोली दे , मी भाडे देतो असे सांगितल्याने तिच्या मनाला फारच लागले होते. खरे तर त्याच्या दोन मुली आता वयात येत आहेत. घर अपुरे पडू लागले आहे. भाडेकरूची खोली रिकामीच होती. त्याने मुलींची पुढे दरमहा येणारी आणि होणारी अडचण समजून खोली मागितली असणार. आई देणार नाही म्हणून कदाचित त्या अनमोल रतनने भाडयाचा उल्लेख केला असावा. तरी तो चुकीचाच होता. हे सौ. च हे हुशारीपूर्ण उत्तर तिला पटले व ती जरा शांत आली. तिला जरा हलके वाटले. ती म्हणाली मलाही नातींसाठी खोली दयावीशी वाटतेच , पण मुलाने हे असे विचारले. काय करू तो सल्ला दया. आम्ही दोघींनीही एकाच वेळी खोली अवश्य दे म्हणून सांगितल्याने तिला बरे वाटले. मनमोकळे झाल्याच्या आनंदात ती निघून गेली. तोपर्यंत साडेपाच वाजले. मग आम्ही चहा पिण्यासाठी किचनमध्ये गेलो तोच लंबूवहिनी आली. तिलाही चहा दिला. दहा मिनीटांनी ही बीनाच्या आईकडे गेली . तिच्याबरोबर लंबूवहिनीही गेली. मी झाडांना पाणी द्यायला गेलो.  नंतर दिवाबत्ती केली. आमच्या अंगणात फिरलो.  तोपर्यंत सौ. इव्हीनिंग वाँक करून आली. तिने टीव्ही लावला.  लॉक्ड डाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढला आहे. 

                मी पुढच्या दाराच्या पायरीवर बसून फेसबूक उघडले. तोच मला कोकण किनारा ग्रूपने जाहीर केलेल्या गुणवंताच्या यादीत पहिला मान देऊन गौरविल्याची पोस्ट दिसली. पाठोपाठ अनेक जण अभिनंदनही करू लागले होते. त्या पोस्टची लिंक सर्व वाचकमित्रांसाठी इथे देत आहे :

Konkana kinara fb post

               हा माझ्यासाठी अचानक आलेला सुखद धक्का होता . कोरोनाने मन विषण्ण झाल्या अवस्थेत तर तो खूपच दिलासादायक व मन दुसरीकडे वळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त होता. मी कोकण किनारा ग्रूपचे आभार मानणारी पोस्ट केली. त्याचीही लिंक अशी :

My fb post

                      अभिनंदनांची नोंद घेता घेता मला काही दिवसांपूर्वी पडलेले स्वप्नं आठवले. ते स्वप्नं मी माझ्या '  ओन्ली देवीदास  ' ( याच ) मराठी ब्लाॅगवर मागे पुढे सदरात नमूद केले आहे.  स्वप्नात माझा मित्र प्रदीप मालगुंडकर हा माझ्या घरी येवून माझ्या लेखनासंदर्भात काही तरी बोलतोय व त्याच्यासोबत असलेल्या मित्राकडे माझे लक्ष जाण्यापूर्वी माझे डोळे उघडतात . तो न दिसलेला मित्र म्हणजेच यासिन पटेल ! त्याचे न दिसणे पण तिथे असल्याची जाणीव होणे म्हणजेच तो स्वत: मागे राहून मला पुढे आणीत असल्याची पावती होती ! मी ती पोस्ट सौ. ला दाखवली. तिलाही आनंद झाला. मग मी पोस्टची लिंक सौ.च्या विभावहिनीला पाठवली. विभा  उच्चशिक्षित आहे. वेंगुर्ल्यात माध्यमिक शिक्षिका आहे. तिला साहित्याची चांगली जाण आहे . तिचा अभिनंदनाचा संदेशही आला. 

            आज दूध प्यावे की जेवावे यापैकी जेवावे हा अाॅप्शन निश्चित करून आम्ही जेवलो. दोनच दिवसांपूर्वी आम्ही दूध पिऊन झोपलो होतो. जेवल्यानंतर आम्ही अंगणात शतपावली करू लागलो. तोच लंबूवहिनी आली. पाठोपाठ तिचा नातू राज आला. तो वीस वर्षाचा आहे. त्याच्या डोक्यात कोरोना प्रसाराबाबत काहीनी भरवलेले गैरसमज काढून टाकले. त्याच्या आजीलाही हे डोस होते. ती त्यावर विरोधात्मक व हिरीरीने असे काही बोलली नाही. तिलाही आता थोडीफार वास्तव बाजू पटू लागली असावी. मानव वंश प्रथम वाचवणे महत्वाचे आहे. काही लोक चुकतात , घाणेरडे वागतात , देशद्रोही असतात हे अगदी खरे आहे. पण ते दोन्हीकडे असतात आणि सगळयानाच एका मापाने मोजणे चुकीचे आहे. त्यातच हेतूपुरस्सर चिथावणीखोर अफवा पसरवणे हा तर गुन्हा आहे. ब-याच कच्च्या मडक्यांना हे माहीतही नाही. गप्पा मारता मारता आम्ही फिरत असतांना पावणे दहा वाजता सौ. ला अस्वस्थ वाटू लागले. ती म्हणाली चला , झोपूया. तिचे डोळे जड होऊ लागले होते. असे कधी झाले नव्हते. पण काल संपूर्ण रात्र ती टक्क जागीच होती , दुपारी कांदा खरेदीत जेवण अर्धवट टाकून उन्हात फिरली होती आणि माणसं येत गेल्याने जमिनीला पाठही लावू शकली नव्हती. तिला चक्कर आल्यासारखे झाले. मी तिला धरून बेडवर झोपवले. थोडया वेळाने मीठसाखरपाणी दिले. ताकत गेल्याने ती घाबरली होती. आम्ही दोघेच असल्याने मला घाबरून जाणे परवडणारे नव्हतेच. मी तिच्या डोक्याला व पोटाला बाम लावला . ढेकर आल्यावर तिला जरे बरे वाटले. तेवढयात विभाचाच फोन आला. तिला मी हिच्याविषयी सांगितले व हिलाही बोलायला दिले. अर्धवट ग्लानीतच ही बोलली. नंतर ग्लानीतच पडून राहिली. मी बारा वाजेपर्यंत बसूनच होतो. पुन्हा साडेबारा वाजता आणि नंतर पावणेतीन वाजता हिला बाथरूमला नेऊन आणले. पाणी प्यायला दिले. तीन साडेतीन वाजता बेडवर खूपच गरम होऊ लागल्याने लादीवर चटई अंथरू की चादर टाकू असे तिला विचारले तर ती म्हणाली चटईच टाका. मी चटई टाकून हिला खाली झोपवली व मीही पाठ टेकली. अधूनमधून मी उठून बघतच होतो. पण ती पहाटे झोपी गेली व मीही तासदीड तास बरा झोपलो. 


( क्रमश: )

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

Corona terrifies

मागे - पुढे

10.04.2020

                  आज लॉक्ड डाऊनचा सतरावा दिवस. काल रात्री अपेक्षेप्रमाणे फारशी झोप लागलीच नाही. कोरोनाच्या बातम्यांनी दोघांवरचा ताण एवढा वाढला की बारा वाजेपर्यंत बेडरूमकडे वळायची ईच्छाच झाली नाही. बारा वाजता बेडवर अंग टाकले. त्यानंतरही अधूनमधून जाग येतच होती. पण काल रात्री मिटलेल्या वा उघडया डोळयांसमोरही काही आले नाही. एकदम पहाटे सव्वापाचच्या दरम्याने मात्र विचित्रच स्वप्नं पडले. मी घरासमोरील प-यात खालच्या अंगणाच्या दक्षिण टोकाला कुठून आलेलो असतो काही कळत नाही. पण प-यात बरेचसे गवत , माडाच्या काही झावळा आणि कचरा असतो. मी त्याच्यावर बसलेला असतो. मी बसलो आहे तो उंचवटा असतो व मी पाय खाली सोडून बसलेला आहे. खाली पाणी आणि वेलीवगैरे आहेत. विशेष म्हणजे पोट-यांपासून खाली माझे पाय पाण्यात असूनही मला पाण्याचा वा वेलींचा स्पर्श अजिबात जाणवत नाहीय. मी पाय हलवू पाहतो पण ते हलतच नाहीत. मी चक्क कमरेखाली लुळा पडल्याचे माझ्या लक्षात येते. प-याच्या टोकाला सागाच्या पानांसारखी अगदी हिरवीगार पाने असलेली एक वेल एका रेषेत असते ती दुस-या  टोकाकडून चक्क हलू लागते आणि माझ्या डाव्या बाजूला येवून थांबते. पुन्हा पाच फुटावर पाण्यात हालचाल होते. त्याचे तरंगही काटकोनात वळतांना दिसतात . तो साप असणार आणि मला चावायला येणार हे मी ओळखतो. मी उजव्या कठडयाला हात धरून पाय हलवण्याचा जोरात प्रयत्न करतो. पण माझा फक्त उजवा पाय हलतो तोही थोडासाच ! आता आपले काही खरे नाही , तो साप आपल्यापर्यंत पोचण्याच्या आत पुन्हा हालचाल केली पाहिजे आणि कठडयावरून उडी मारली पाहिजे , या विचारात असतांनाच माझे डोळे उघडले. तेव्हा साडेपाच वाजल्याचे मी घडयाळात पाहिले. मला परत झोप लागली आणि काही मिनिटातच दुसरे स्वप्नं पडले. माझा मित्र प्रदीप मालगुंडकर हा माझ्या लेखनाबाबत काही तरी बोलायला पुढच्या दरवाज्यातून आत येतो आणि लेखनासंदर्भात काही तरी उभ्याउभ्याच बोलतो. त्याच्यासोबत आणखी कोणी तरी मित्र असल्याचे मला जाणवते .  पण माझे लक्ष त्याच्याकडे जात नाही. त्याअगोदरच डोळे उघडतात. मी जागा होवून घडयाळात पाहिले तर सहा वाजले होते. मग मी सरळ बेडमधून बाहेरच आलोे. म्हटले आता झोपलो तर तिसरे स्वप्नं पडायचे ! स्वप्नांचे असेच असते. त्यांची मालिकाही असू शकते ! सन 1990 मध्ये मला हायपर अॅसिडीटी झाली होती तेव्हा मी अनेकदा भयानक स्वप्नांच्या किती तरी मालिका अनुभवल्या होत्या. त्यातल्या एका स्वप्नात तर मी चक्क अमेरिकेत आयझँक न्यूटनना भेटलो होतो. त्यांच्याशी बराच वेळ बोललो होतो. त्यांच्या प्रयोगशाळेत हिंडलो होतो. विशेष म्हणजे प्रयोगशाळेतून बाहेर पडून रस्त्यात चालू लागल्यानंतर एका ठिकाणी मी थांबतो. प्रयोगशाळेकडे पहावे म्हणून मागे वळून पाहतो आणि दुस-याच क्षणाला माझी बोबडी वळते. मागे रस्ताच नसतो. फक्त आकाशरूपी पोकळी असते. आता पुढे जाण्यावाचून पर्यायच नसतो. मी चार पावले पुढे जाऊन धीर एकवटून मागे बघतो . पुन्हा तेच घडते ! मी जसा पाऊल पुढे टाकतो तसा पावलामागे रस्ता तुटत जात असतो. मी नक्की कुठे चाललेला असतो तेही मला कळत नसते . हया स्वप्नातून जागा झालो तेव्हा माझे पूर्ण अंग घामाने डबडबले होते. त्या रात्री मी झोपलोच नाही ! इतक्या वर्षांनीही मी ते स्वप्नं विसरू शकलो नाही , म्हणजे तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल ते बघा !

                  आज नळाला पाणी येणार नाही. मात्र साठयाचे पाणी वरच्या टाकीत चढवून ती फूल करून घेतली. पुढे आलो तर समोरच्या बंगल्यातल्या भाभीने स्वप्नातल्या त्या प-यालगतच कचरा जाळला होता. वा-याने त्याचा धूर आमच्या अंगणातून घरातही घुसत होता. मी एकदा मासळी बाजाराकडे लक्ष टाकले आणि पुढचा दरवाजा आणि खिडक्या बंद केल्या. पंधरावीस मिनिटांनी धूर ओसरला तसा मी पुन्हा बाहेर आलो. आज शुक्रवार असल्याने मासळी बाजारात गर्दी होती. गेले काही दिवस हया गर्दीचे मला नवल वाटत होते. पण आज सौ. मासे आणायला गेली केव्हा कळले की तिथे गावातल्यापेक्षा शहरातलेच अनोळखी चेहरे जास्त होते ! काल हे नव्हते इथे , आज हे आले कसे ? शहरातून येणारे लोक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती घातक ठरू शकतात , हे गावातल्यांना कळत नसेल काय ? निदान , त्यांना आवश्यक ती खबरदारी तरी घ्यायला सांगायची. पण बहुधा , उपजिविकेपुढे ते हतबल असावेत. पैसा माणसाला इतका हतबल बनवतो की तो आपले आयुष्यही त्याच्यासाठी पणाला लावतो ! सर्वत्र हेच झाले आहे. कोरोनाला देशात आणणा-यांइतकेच कोरोनाच्या प्रसारास हातभार लावणारेही जबाबदार आहेत ! त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत नाहीय. कुणी माश्यासाठी तर कुणी भाजीसाठी गर्दी करतोय . काही ठिकाणी विक्रेताच कोरोनाबाधित होतोय आणि वस्तू घरोघरी जात आहेत ! विनाशकाले विपरीत बुध्दी म्हणतात ती हीच ! संस्कृतीच्या उच्चतेची शेखी मिरवून छाती ताणण्यात अर्थ नसतो , तर ती संस्कृती आचरणात दिसावी लागते. नाही तर मग ते इंग्रजी शाळेत पोरे असणा-यांनी मराठीच्या अस्तित्वाबद्दल गळे काढावेत ना तशी अवस्था होते ! पुन्हा वादाचा मुद्दा आला. सद्य स्थितीत वाद नकोत. वाद निर्माण करणारी लंबू वहिनी सकाळी कुठून तरी फिरून आली ती थेट स्वयंपाकघरापर्यंत घुसत गेली. तिने मास्कही लावलेला नव्हता. तिच्या नंतर विकीला आली ती मास्क लावूनच आली आणि आत बोलावूनही बाहेरच पायरीवर बसते म्हणाली आणि बसलीही.  हा फरक आहे आणि यानेच खूप फरक पडतो , हे आता सिध्द झाले आहे. 

           शहरात आता ताज्या दमाचे गझलकार चांगल्या गझला लिहू लागले आहेत. विजयानंद जोशी , कौस्तुभ आठले,  वसुंधरा जाधव , शुभम कदम , विकास ढोकणे हे छान लिहीत आहेत. कोरोनानंतर त्यांना शहरात व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. सन 1986 पासूनचे माझे ते स्वप्नं आहे. त्याबाबत विजयानंद जोशीना मी सकाळीच मेसेज केला होता व त्यांचे हुरूप वाढवणारे उत्तरही आले आहे. शुभम कदमशी व्हॉट्सॲपवर आज माझा दिवसभर गझल संवाद चालू आहे.  

            उद्या नळाला पाणी  येणार असल्याचे सत्त्याने सांगताच ,  सव्वा सहा वाजले तसा मी झाडांना पाणी लावायला गेलो. सौ. आमचे घर बंद करून खालच्या घराच्या अंगणात इव्हीनिंग वाँक करीत होती.  पाणी शेंदून मी दिवाबत्ती केली. तेवढयात लंबूवहिनी दूधपिशव्या घेऊन आली. मी अंगणातच त्या घेतल्या , बेसीनमध्ये धूतल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या. आता रात्र झाली आहे. टीव्हीवर कोरोनाचा प्रसार वाढल्याच्याच बातम्या. आज शहरात पाचवा कोरोनाग्रस्त रूग्ण झाला. सगळे कठीण होते आहे. लोक अजूनही ऐकत नाहीत. फेसबूकवर तर वेळ काय आणि पोस्टस काय अशी वेळ काहींनी आणली आहे. आज एक रचना मी फेसबूकवर टाकली आहे. ती अशी :

          अता घरी रहायचे  ....

खरोखरी घरोघरी ...  अता घरी रहायचे
स्वतः न जायचे कुठे , कुणा न बोलवायचे

अता न काळही बरा... अता न वेळही बरी..
उगाच हिंडुनी कुठे ... नको तसेच व्हायचे !

खुशाल तू तिथे गडया तुझ्या घरी सुखी रहा  !
घराविना कुठे न तू .... इथे तिथे फिरायचे ...

म्हणेल बायको तसे निमूट वाग राजसा ....
म्हणेल ती तसेच तू ... बसायचे , उठायचे  !

उदंड कालच्या तुझ्या ऊनाडक्या स्मरून तू
घरात आपल्याच रे .... हरी हरी करायचे... !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

         संध्याकाळी सात वाजता गेलेली लंबूवहिनी साडेनऊला परत आली आहे. मी अंगणात फिरतो आहे. ती सव्वा दहा वाजता गेली. तिला दुस-यांच्या बातम्या सांगण्यात आणि काढण्यात आसुरी आनंद मिळतो, हे दुर्दैवी आहे. आम्ही तिच्याशी जेवढयास तेवढेच बोलतो आहेत. ती गेली  , तरी आम्ही अंगणात फिरतच होतो. अखेर अकरा वाजता सौ.ला झोप आली. आम्ही झोपायला गेलो. मात्र तिने झोपेची गोळी घेऊनही रात्रभर तिला झोप आली नाही. मीही जागाच राहिलो.


         ( क्रमश: )