शनिवार, २३ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन ३

 तीळ तीळ तुटतंय मन

अपुरं जीवन

फुलेल बघ

तू फक्त एकदा

तीळगुळ देऊन

गोड बोल म्हण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१ मकर संक्रांत

.............

होय आणि नाहीची असंख्य आंदोलने

आणि या दोन टोकांमध्ये हेलकावे खाणारे आपण

आयुष्य किती क्रूर आहे

संधीच देत नाही आपल्याला

पुढे काय होणार आहे हे कळण्याची

आणि काही करण्याचीही

कुठलाच डाव आपल्या हातात येत नाही

आपण हेलकावे खात राहतो पुन्हा पुन्हा आशेने

नक्की काहीच ठरत नाही

होय नाहीचे.....

.

.

.

.

फार तर 

निकाल आल्या नंतर पाहू

किंवा

निक्काल लागल्यानंतर पाहू....


.

.

.

.आज तरी काहीच सांगता येत नाही ....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०१.२०२१

..............

आयुष्य गणिताप्रमाणे आखून चालत नाही. आयुष्याचं एखादं गणित चुकलं तर बाकीची सगळी गणितंही चुकू शकतात. निदान काही गणितं तरी चुकतात. आयुष्याच्या गणितात कुठल्याच पायरीची हमी देता येत नाही. उद्या काय होईल आज नक्की सांगता येत नाही. आयुष्य चकवा देण्यात हुशार आहे. डाव आणि प्रतीडाव कधी उलटतील सांगता येत नाही. फाजील आत्मविश्वास नडतोच. समतोल वृत्तीने व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास आणि हार जीत वा यशापयश सहजतेने स्वीकारल्यास जीवनात पुढे जाणे सुकर होते. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१७.०१.२०२१

................

कधी कधी मनावर अनावर ढग दाटून येतात. पण बरसत नाहीत. सावट धरून बसतात. चावट होऊन लगट करीत राहतात. हाकलले तरी जात नाहीत. बरसला तर काळोख बरसतो. आशेच्या कवडशालाही वाव मिळत नाही असा चांगला वावभर पट्टा तयार होतो मनाभोवती. कमी जास्त दाबाचा. मन तसे कमी जास्त हेलकावे खात राहते. दोन टोकांना. आपण नक्की कुठले हेच कळत नाही. पण आपले आपल्यालाच सावध व्हावे लागते. आपल्याच मनातल्या भावनांचा उपसागर आपल्यालाच ऐकत नाही म्हणजे काय ? त्याला विवेकाने वठणीवर आणून आपल्यालाच आपली कोंडी फोडावी लागते. पाॅझिटीव्ह थिंकींग म्हणजे काय आहे की नाही ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

............

कसे आहे आपल्याही नकळत कोळी जाळं विणतो. आपण त्यात अलगद पडणार हे तो पक्के जाणून असतो. एकदा अडकलो की सुटका नाही. तेवढा चिकट आणि चिवट द्राव त्याने आधीच सोडून ठेवलेला असतो. आपल्या सभोवती अनेक कोळ्यांनी अशी यंत्रणारूपी जाळी पसरून ठेवलेली आहेत. फक्त पाऊल उचलण्यापूर्वी सावधपणे डोळ्यावरची बेसावधपणाची झापडे काढून पाहिले पाहिजे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

....................


Nothing happens. Looks still. Silent. No movements. No work. No objectives. No problems. No plans. No objections. No information. No explosion of information. Nothing to do. Nothing to worry. No reason to hurry. All stars are silent. World is silent. Universe is silent. Be silent and imagine this for a moment. The moment of silence. 


...Devidas Harishchandra Patil

18.01.2021

............


मला वाटते माणसाला सतत कशात तरी गुंतत रहायला आवडतं. समोर काही नसेल तर एक जीवघेणी पोकळी तयार होते. वेळ कसा घालवायचा हा प्रश्र्न पार बेचैन करून टाकतो. काही माणसांनी यासाठीही देव निर्माण केला नसेल ना ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१


........

फाॅर्म असो वा अंदाजेबयाॅं असो, अती डोक्यावर घेण्यात अर्थ नाही. ओघवते काव्य असले पाहिजे, वाचकाला लगेच कळले पाहिजे आणि वाचायची ओढ लागली पाहिजे. इतकेच. बाकी काय ? गझलबद्दल म्हणतोय मी. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१

.............


पैसा आपलं काम करतो. किंबहुना करतोच. त्यातही दिवसाच्या आणि रात्रीच्या पैशात फरक असू शकतो. ते काही असो. पैसा काम करतोच.‌ पण दरवेळी पैसाच काम करतो असं नाही. शब्दही काम करतात. त्यातही दिवसा दिलेले आणि रात्री दिलेले शब्द यात फरक असू शकतो, बरं का ? काही लोक पैशाला जागतात. काहींना पैशाची गरजच पडत नाही. ते शब्दालाच जागतात. काही जण पैसे घेऊनही उलटे फिरतात तर काही जण शब्द देऊनही तो फिरवतात. अगदी तुमच्यासोबत राहूनही , बरं का ! असे अनुभव रोज येतात. काहींना अगदी काल परवाही आले असतील !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

............

कधी ना कधी ....


अंधारातले काम उजेडात येते ; कधी ना कधी ! तो मी नव्हेच किंवा ती मी नव्हेचवाले साळसूद चेहरे सत्य नाकारतात . अगदी तोंडावर. डोळ्यात डोळे घालून. नजरेला नजर भिडवून. पडदयाआडचे सूत्रधार पडदयापुढेही येतात ; कधी ना कधी ! आज ना उद्या ! बदलत्या जगाची ही कहाणी आहे. कहाणीचे सत्य कळते ; कधी ना कधी !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

.................

कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१

....................

जवा नवीन पोपट हा...


हल्ली नेटला गती नाही मिळत पूर्वीसारखी. नेटच्या रस्त्यात गतीरोधक आल्यासारखे वाटते आहे. शायद समय बदल रहा हैं... परिवर्तन हो रहा हैं...बोलो हैं ना ...?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०१.२०२१

..................

दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

२२.०१.२०२१

.................

नेत्यांची मांडवली नि कार्यकर्त्यांची गोची ! ही नवी म्हण काही वेळा ऐकू येते.‌ कोण नेता कशासाठी कुठे उडी मारील आणि आपल्याच कार्यकर्त्यांचा कसा गोंधळ उडवील यांचा युती आणि आघाड्यांच्या जमान्यात काहीच भरोसा राहिलेला नाही. सत्तेच्या गणितात न पडता व स्वत:ची बुध्दी न वापरता मतदारांनी गोंधळून केलेले विस्कळीत मतदान हे युती आणि आघाड्यांना जन्म देताना दिसते आहे. मतदानातील संभ्रम पुढील गोंधळांना कारणीभूत होतो आहे. त्यातच पक्षाचा आदेश या गोंडस नावाखाली दिवसरात्र एक बाजू पूजारासारखी नेटाने लावून धरणाऱ्या कार्यकर्त्यांची नेत्यांच्या गणितांनी दमछाक होते आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण होते आहे आणि निर्माण झालेल्या त्रिशंकू अवस्थेकडे उदास लोकशाही हताशपणे बघते आहे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२३.०१.२०२१

..................


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: