शनिवार, २ जानेवारी, २०२१

Kahi kavita

 कवितेतून शोधत आलो 



कवितेत शोधत आलो 

जीवनभर दिलासा 

कधी वाट चुकतांना, 

कधी निराश होतांना

कवितेनेच धीर दिला...


बाकी आजूबाजुला माणसेच होती 

कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून ,

ज्यांना मी कवितेइतकीच माझी समजत आलो !

ठेवली नाही कधीच मी अपेक्षा 

की माझ्या कवितेला कुणी चांगलं म्हणावं,

कौतुक करावं ,

माझ्यासाठी एक छंद म्हणून मी लिहीत आलो

दु:खावरचे औषध म्हणून कविताच पीत आलो 

कवितेनेच कंठातील वीष भिनू दिलं नाही शरीरात

आणि बनू दिलं नाही रक्ताला व्देषयुक्त !



कवितेनेच धीर दिला 

कधी निराश होतांना

कधी वाट चुकतांना 

जीवनभर दिलासा

कवितेतच शोधत आलो....



जाऊ कुठे, जाणार कुठे 

कवितेशिवाय 

माणसे अशी कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून असतांना 


माणसापासूनच .....



... अर्थात आपलीच !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



....................


तुझ्यामुळे कवितेला

जाग माझ्या आली ;

एक एक ओळ माझी

तुझ्या श्रावणात न्हाली !



तुझ्या चांदण्यात माझा

शब्द शब्द मोहरला ;

तुझी साद येता कानी

जीव माझा आतूरला !



बघे आयुष्य नव्याने

पुन्हा वळायास मागे;

असे अचानक आले

बघ जुळायास धागे !



सुन्या सुन्या मैफिलीला

सूर नवा सापडला ; 

तू वाचताच कविता

देह सारा झंकारला !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील.




मेघांआडून चंद्रानं अधूनमधून डोकवावं 

तसं तुझं व्हाॅटसअॅपवर डोकावणं

मनाला भुरळ पाडून जातं...


असं कधी झालं नव्हतं

पण आज वाटतंय कुठे तरी

मनाला विचारावं स्वत:च्याच...


हे स्वप्नं आहे की सत्य ?

किती सांभाळलं होतं ...

आज ओठात आलंच ! 


पण कसं सांगू ? 

.........


कविता ओलांडते हद्द

अनावर होऊन बरसते

आषाढासारखी...



ऐकतच नाही मनाचं

मनालाच उतरवते

कागदावर....



कोणी तरी वाचील

ही धाकधूक मनात

असते तरी....


........


असे होऊ नये

असे वाटते तरी

असे होत आहे...



कधी होत नव्हते

कधी झाले नव्हते

तसे होत आहे...



आता प्रश्न हा

सुरु राहूदे का

जसे होत आहे....



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


............................................


उदास एकटेपण


उदास एकटेपण

रिते मन ;

कुणी न सोबती

 हे घुमेपण !


मूळचा देवीदास 

बिनधास्त ;

आता तसा

दुरापास्त !


चेहरा ओळखीचा

आरशास ;

प्रतिबिंब

हाच भास !


कळे न जातसे

कुठे जीवन ;

वळणामागून

येई वळण !


चालत राहणे

हेच हाती ;

विझेपर्यंत

जीवनवाती !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


रत्नागिरी. २०.१२.२०२० सायं. ०६.३५

............................................


असाच मी बसतो कुण्या संध्याकाळी

अंधाराला सोबत घेऊन 

कातरवेळेनंतर अंतर वाढत जाते उजेडापासूनचे 

दुस-या दिवशीचा सूर्य येईपर्यंत

काही पडला उजेड तर पडला माझ्याही डोक्यात

म्हणून असाच मी बसून राहतो डोक्यावर किरणे घेत 

बाकी काही नाही झाले तरी डोके उबदार होते

आणि सुचते एखादी कविता ही अशीच एखादी....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

29.12.2020

..........................

वाढलेल्या अपेक्षांचं ओझं वागवीत 

वाकलेल्या अवस्थेत चालत असतो

म्हातारपणाच्या दिशेने

अशा वेळी पावलं जड तर होणारच ना...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

29.12.2020

...............


अस्व:स्थ मनस्थितीत बाकी काहीच सुचलं नाही तरी कविता सुचते ! 

हे कसं होतं काहीच कळत नाही

पण होतं हे खरं आहे

कविता इतकी कशी अभिन्न आणि समजूतदार निघाली ?

कोण सांगू शकेल काय ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.१२.२०२०

.....................


इतक्या सगळ्या खस्ता खाल्ल्या त्या कशासाठी ?

आता अखेरच्या पर्वात तरी शांतता, समाधान मिळून मनाजोगते जगायला मिळावे ही अपेक्षा गैर वाटावी

असे जीवन पुन्हा वाट्यास का यावे ? 

सृष्टीचक्रात काही घोळ तर नाही ना ? 

की देवाचे आणि दैवाचे अस्तित्व जाणवावे म्हणून हा अट्टाहास आहे ? 

की काळच सूड उगवतोय माझ्यावर ? 

रावणाने अशाच कुणाची तरी सत्ता मानण्यास नकार दिल्यानेच त्याला मारण्यात आले का ? 

मला शरण आलेच पाहिजे हा मत्तपणा 

आणखी किती मानवांचे बळी घेणार आहे ? 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.१२.२०२०

........................


आता ते येतील पुन्हा पाच वर्षांनी हसत हसत

आणि आम्हीही तोंडदेखले तोंडभर हसतहसत

त्यांच्या आश्वासनांना आणि एकमेव मागणीला 

त्यांच्यासारख्याच मुखवटयाने प्रतिसाद देऊ😃

मास्कआडून😷😷😷😃😃😃😄😄😄


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०१.०१.२०२१

...................

गझल कळून घेतांना...


पटकन मला त्या शेराचा अर्थच कळला नाही .

असे का व्हावे ? माझ्यातील स्वयंघोषित गझलगुरूला

शेराचा अर्थ चटकन लागत नाही म्हणून कित्ती राग आला ! 


पण मग इथे माझ्यातील तथाकथित आकलनकर्त्याला राग का आला नाही ?


गझल काही वेळा कळूनही घ्यावी लागते

हे मला कळले गझल कळून घेतांना

तर किती बरे होईल 😃 😃😃


किमान माझ्यातला स्वयंघोषित गझलगुरू तरी हद्दपार होईल 😃😃😃😃😃

गझल कळून घेतांना.....


..... देवीदास हरिश्चंद्र पाटील


०१.०१.२०२१

...................

काही क्षण अस्वस्थ करतात

काही क्षण ती अस्वस्थता अधिकच वाढवतात

आणखी काही क्षणांनी हे शांत होईलही कदाचित

पण हे क्षण तरी असे अस्वस्थ करणारे आहेत हे नक्की 

पुढे तरी काय लिहू अस्वस्थ क्षणांच्या सोबतीत .....



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०१.२०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: