गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

प्रवेश कुठे घ्यायचा ... ?

 प्रवेश कुठे घ्यायचा ... ? 

Where to take admission ?


शिक्षणाची ऐशी तैशी पासून ते शिक्षणाच्या आयचा घो ... पर्यंत शैक्षणिक प्रवास करुन आपण सारे इथपर्यंत आलो आहोत ! हेही कमी नसे !  तरीही परीक्षा, निकाल अशा क्रमातून अखेर प्रवेशावर आपली गाडी येऊन रेंगाळतेच. ज्या विद्यार्थ्यांचे अमूक एका ठिकाणी जायचे ठरलेलेच असते , ज्यांना हवा तिथे प्रवेश मिळण्याची खात्री झालेली असते, त्यांचा प्रश्नच नसतो. पण ज्यांचे असे नसते असे अनेक भांबावलेले चेहरे दिसतात. अशा वेळी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणेही किती कठीण होऊन बसले आहे, हे लक्षात येते. दहावी आणि बारावीचे निकाल लागले रे लागले की प्रवेश हा परवलीचा शब्द होऊन जातो. काही जणांनी अगदी खोलवर संशोधन केलेले असते , काही जण वरवर शोध घेतात तर काही जण तहान लागली की विहीर खणायला धावतात. काहीही असले तरी बहुतांशी पालकांनी हा प्रश्न मनावर घेतलेला असतो. बरीचशी मुलं एक तर भांबावलेली असतात किंवा आई वडील बघतील काय ते म्हणत मोबाईलमध्ये तोंड खुपसून असतात. मुलांचेही काही प्रकार असतात. काही मुले पालकांना त्रास होऊ नये म्हणून स्वतःच प्रवेश प्रक्रियेतून जातात. ही मुले स्वतःचा मार्ग स्वतःच काढणारी असतात. परिस्थितीची खरी जाणीव त्यांना असते . काही मुले पालकांना म्हणतात तुम्ही घातलंत ना शाळेत मग आता तुम्हीच बघा काय ते. ही ऐतखाऊ असतात व पुढेही आईवडिलांना पिळून पिळून खातात. आईवडील आपल्या मुलाला त्रास पडू नये म्हणून स्वतः खस्ता खातात आणि मुलं मात्र कसं पदरात पाडून घेतलं म्हणून मनात हसत असतात. ही मुलं पुढे जाऊन पुरती निगरगट्ट होतात आणि स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. ती आईवडीलांचंच काय, कोणाचंच ऐकत नाहीत. ही मुलं वाममार्गालाही जाऊ शकतात. दहावी किंवा बारावी पास बाळांचे पाय पाळण्यात दिसत नसले तरी प्रवेशावेळचे हे चित्र पुढे अधिक भयावह होते. अशा मुलांना आयतेगिरीची घातक सवय होते , पण हे त्या त्या वेळी पालकांच्या लक्षात येत नाही. ते तेव्हा पाल्याच्या प्रवेशाच्या विवंचनेत अडकलेले असतात. या विषयावर आपण नंतर लिहू. सद्या मी लिहिणार आहे ते कोंकणातील एका नवीन अभ्यासक्रमाबाबत. 


त्याचं असं झालं की रत्नागिरी आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमातील एक व्हिडीओ कालच माझ्या पाहण्यात आला. यामध्ये कोंकणात परफॉर्मिंग आर्टस या नावाचा चार वर्षांचा डिग्री अभ्यासक्रम सुरू होतोय आणि त्याची अभ्यासपूर्ण माहिती असि. प्रोफे. डॉ. आनंद आंबेकर यांनी अतिशय विस्तृत स्वरूपात आकाशवाणी रत्नागिरीच्या या कार्यक्रमात दिली आहे. कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हया अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतो.‌ हा अभ्यासक्रम येथे झाल्याने एक इंडस्ट्रीच इथे उभी राहील व अनेक कलाकारांच्या स्वप्नांना वास्तव रोजगार मिळेल. त्यांच्या विविध कलांना व्यावसायिक फिनिशिंग मिळू़न कोंकणची कला लोकल ते ग्लोबल होईल, असे या कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे.  हेही नसे थोडके ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील



गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

प्रदीप मालगुंडकर

 प्रदीप मालगुंडकर 


सन १९८५ ची गोष्ट. कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नाही. कुटुंबात आईवडिलांचा शाळेतले धडे , कविता आणि  शिवलीलामृत वाचण्यापुरताच साहित्याशी संबंध.‌ मीही तेव्हा नवोदित कवी ! तेव्हा साहित्यक्षेत्री अनुभव शून्यच ! पण साहित्यक्षेत्रात व्यवसाय करायचा हे वेड होतेच ! ते वाढले ते प्रदीप मालगुंडकरमुळे.‌  त्यानेच माझी  ' राजकारण गेलं चुलीत '  ही कविता दै. रत्नभूमीत नेऊन दिली होती व ती १४ एप्रिल १९८५ रोजी प्रसिध्दही झाली होती. तेव्हा आदरणीय दत्तात्रय नाचणकर हे रत्नभूमीचे संपादक होते. प्रदीप त्यांच्याकडे जायचा.‌ प्रदीपमुळेच त्यांच्याशी नंतर ओळख झाली.  माझी प्रदीपशी ओळख होती. आम्ही एकाच रस्त्याचे प्रवासी. मी जाकीमिऱ्यात व तो पंधरा माड परिसरात . पंधरावीस मिनिटांचे अंतर . मी तेव्हा रत्नागिरीत क्वचितच होणाऱ्या कवितांच्या कार्यक्रमात कधी कधी सहभागी असायचो.‌ मी सन १९७४ ते १९८४ पर्यंत मी कविता लिहितो हे कुणाला सांगितलेच नव्हते. इतकी    वर्षे मी कविता वहीतल्या वहीतच लिहीत होतो. कविता वाचायची म्हटलं की प्राथमिक शाळेत जे टेंशन आले होते ते १९८५-८६ पर्यंत थोडेबहूत कायम होते ! मी भिडस्त, भित्रा ! आकाशवाणीत महेश केळूसकर नेहमीच सांभाळून घ्यायचा. बरेचदा तो रेकॉर्डिंगला स्वतः उपस्थित रहायचा.‌ पुढे त्याच्या आपुलकीच्या आग्रहाखातर जिल्हा नगर वाचनालयातल्या कवितांच्या कार्यक्रमांना जावेच लागे.‌ कविता वाचावीच लागे. नंतर स्मिता राजवाडे , अविनाश फणसेकर , विनय परांजपे इ.च्या आग्रहामुळे गाडीतळावरच्या जनसेवा वाचनालयात बरेचदा कविता वाचनात सहभागी व्हायचो. जनसेवाचे प्रकाश दळवी , सिनकर मॅडम , अमोल पालये व सर्व सहकारी आजही तितकेच प्रेम माझ्यावर करतात.‌


तर सन १९८५ मध्ये एकदा असाच जनसेवा वाचनालयातून बाहेर पडलो तोच प्रदीप भेटला. तो मिऱ्या बसस्टॉपवर बसची वाट बघत होता. तिथे त्याला मी कविता करतो हे कळले आणि तो मला समोरच्याच मोकळ्या पटांगणात घेऊन गेला. तिथे भाषणे व्हायची, अजूनही होतात.‌ माझ्या हातातली वही त्यांने घेतली आणि चाळली. तो कवी नसला तरी त्याला खूप उत्सुकता होती, आजही आहे. मी सन १९७४ पासून कविता लिहितो पण इतकी वर्षे कुठल्याच वर्तमानपत्राकडे मी कविता पाठवली नाही हे जाणून तो चिडला . त्यांने स्वतःच पाच सहा कविता निवडल्या आणि माझ्याकडून तिथेच लिहून घेतल्या ! शिवाय त्याच दिवशी त्या रत्नभूमी कार्यालयात नेऊनही दिल्या ! याचीच परिणती १४ डिसेंबरला माझी वर्तमानपत्रातील पहिली कविता छापून येण्यात झाली होती ! पुढे माझ्या अनेक कविता दै. रत्नभूमीत व दै. रत्नागिरी टाइम्समध्ये छापून आल्या. याची सुरूवात प्रदीप मालगुंडकरने केली. तो प्रकाशित करत असलेल्या एक दोन अनियतकालिकांचा त्याने मला कार्यकारी संपादकही बनवले होते ! पण पुढे मी सरकारी नोकरी व कुटुंब यात अडकलो , मी स्वतःचे परमप्रिय हे त्रैमासिकही एक वर्षात बंद केले आणि तो त्याच्या स्वप्नाळू स्वभावामुळे एकाकी पडला. आजही तो स्वप्नेच उराशी कवटाळून आयुष्याशी एकाकी झुंज देत आहे. त्याला मी आजपर्यंत एका मर्यादेच्या बाहेर जाऊन काहीच मदत करू शकलो नाही ही माझी कृतघ्नता आहे ! ही बोच माझ्या अंतरात कायम असते ! 


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.१०.२०२४ सकाळी ०६.२०


सांत्वन

 ते सांत्वनासाठी आले होते .... तेच मारेकरी होते....




आपण कसे आहोत ?

 आपण कसे आहोत ? काही कल्पना आहे का ? 

बघा तर या व्हिडीओत.... आणखी एक बोलके काव्य ! 




बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

जरासा पाऊस पडला अन्....

 जरासा पाऊस पडला अन्....

#पाऊसप्रेमी




पुन्हा भरून येण्यासाठी...

 पुन्हा भरून येण्यासाठी... 

#आभाळ 



काळ्याशार मेघांचा थवा....

 

काळ्याशार मेघांचा थवा....

#पाऊस



मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

वादळ

 येत्या ४८ तासात वादळ येऊ घातलाय...विश्रांती घेऊ लागलेला पाऊस अचानक वादळी बनून परत फिरतोय. #नवरात्र तोंडावर आहे. परवा ०३ तारीखलाच. इकडे आकाशात विजा चमकतायत..... आणि पावसाच्या कल्पनेने शहारलेला वेडि प्रेमवीर कवी काय म्हणतोय ? पहा तर....खालील व्हिडीओत ...




गुलाबाचे मनोगत

 बागेत आज एक गुलाब फुलले होते. सहज त्यांच्याजवळ गेलो तर ते म्हणाले ....




काही आक्षेप आहेत

आजपासून बोलके काव्य हे नवे पान जोडत आहे . हे बोलके काव्य आहे व्हिडीओ स्वरूपात. हल्ली रील्स म्हणतो आपण त्यांना. 

यातले पहिले बोलके काव्य तुमच्यासाठी सादर करतोय‌.‌

" काही आक्षेप आहेत "