रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

स्फूट लेखन ६

 जीवन शिक्षण


शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात. संवाद, वादविवाद आणि मग वाद होतात. स्थानिक राजकारण आणि समाजकारण यांचे व्दंव्द यात हिरीरीने भर घालते. शैक्षणिक विकास हा विषय कधीच गायब होतो. उरतात ते आरोप प्रतीआरोप आणि वैयक्तिक हेवेदावे ! सामाजिक विषय वैयक्तिक पातळीवर हमरीतुमरीवर येतो. पूर्ण वेळ शाळा अर्धवेळ होत होत अखेर बंद होते. पिक्चर संपता संपताच पुन्हा सुरू होतो. पालक मुलांना दुसऱ्या शाळेत घालतात. तिथेही शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात... पूर्णवेळ.. अर्धवेळ.. .. होत....तीही शाळा अखेर बंद होते आणि हाच पिक्चर ठिकाणं बदलून चालूच राहतो ! पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१


.................

जलद, विश्वसनीय सेवा...जगभर


मुंबईहून आठ तारखेला कुरीयर केलं गेलं. केल्याची कुरीयरवाल्याची स्लीप मला कुरीयर करणाऱ्याने लगेच व्हाॅटस अॅपवर पाठवली. कुरीयर किमान तिसऱ्या दिवशी येणे अपेक्षित होते. तीन दिवस फोनवर नकारघंटा ऐकून चौथ्या दिवशी कुरीयर आॅफीसलाच गेलो. तिथल्या माणसाला स्लीप दाखवली. म्हटलं आज चौथा दिवस उजाडला. एक लखोटा यायला एवढे दिवस लागतील असं वाटतं नाही. तसा आतला दुसरा माणूस बोलला , लखोटा आहे का, मला पार्सल बोलले होते. लखोटा बघतो हा. मी आशेने हो म्हणालो. पण दोन मिनिटे शोधून तो मान हलवत नाही म्हणाला. मी निराश ! तसा पहिल्या माणसाने मुंबई आॅफीसला फोन लावला. स्लीपचा फोटोही व्हाॅटस अॅपवर पाठवला. मुंबईवाला बोलला बघून सांगतो. मी म्हटलं आम्ही सांगून बघितलं, तू बघून सांग ! मी थांबतो. पंधरा मिनिटे झाली तसा समोरचा माणूस बोलला, तुमचा नंबर द्या, मी फोन करतो. नंबर देतांना माझं लक्ष समोरच्या बोर्डाकडे गेलं. त्यावर जाड ठसठशीत ठळक अक्षरात छापलं होतं : जलद, विश्वसनीय सेवा...जगभर ! मी जग विसरून जलदगतीने घर गाठलं !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

विषय कट !


पोरं कसली तरी वर्गणी गोळा करीत होती. नेमके त्याचवेळी त्यातल्याच कुणाच्या तरी मोबाईलवर गाणे सुरू होते : " तुझ्या नामाचा व्यवहार ..." . विषय कट !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

देवळासाठी निधी संकलन


काही वर्षांपूर्वी गावातील देवळासाठी निधी संकलन करीत होतो. मी देवळाच्या शेजारीच राहतो. शेजारधर्म म्हणून मीही पावती पुस्तक घेऊन शहरात गेलो. ओळखीचे लोक भेटत होते. कोणी पावती फाडत होते, कोणी बहाणे सांगून सटकत होते. एकाने कहर केला. तोही ग्रामीण भागात राहणारा होता. त्याचं गांव तर अवघ्या दहा किमी वर होतं. गावातली परिस्थिती त्याला चांगलीच माहिती होती . त्यामुळे मला वाटलं तो चांगलीच पावती फाडेल. मी देवाचे आभार मानले. झालं भलतंच. तो म्हणाला, " मी राहतो दहा किमी वर. तुमच्या गावच्या देवळाचा मला काय फायदा? मी तर तिकडे कधी येत पण नाही. " आणि तो निघून गेला. अवघ्या दहा किमी अंतरावरच्या माणसाची ही कथा !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०२.२०२१

.................


बाबू, ये पब्लीक हैं !


मांजर भलेही चोरून दूध पितांना डोळे झाकत असेल; पण ते दूध पितानाचा चपाचपा किंवा पचापचा येणारा आवाज काही थांबवू शकत नाही. जग उघड्या डोळ्यांनी ( आणि कानांनी पण ! ) बघते ! बाबू, ये पब्लीक हैं , सब जानती हैं ! बोलो हैं ना ...?


   अरे हो, 💞💞 हॅपी व्हॅलेंटाईन डे !💕💕


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०२.२०२१

.................

गांवपॅनेल : लोकशाहीची नवी दिशा


नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी गांवपॅनेल्सनी बाजी मारली. गांवपॅनेल्सचा हा प्रवास राजकीय पाठिंब्यावर की अराजकीय लोकमतातून झाला हे पाहणे आवश्यक आहे. राजकीय पाठिंब्यावर निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्या व पूर्णत: अराजकीय लोकमतातून निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्याही अभ्यासली जाणे आवश्यक आहे. गांवपॅनेलला विरोध झाला का आणि झाला तर तो पक्ष , काही राजकीय / अराजकीय लोक की दोन्हींकडून झाला , हे पाहणेही आवश्यक आहे. तसेच गांवपॅनेल्सच्या पुढील प्रवासाबाबतही विचारमंथन झाल्यास ते महत्त्वाचे ठरेल. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०२.२०२१

...................

जया

आज त्याची आठवण आली. सुधरीन वहिनी सौ.ला कुवरी खातेस काय म्हणून विचारत होती. जया अशाच कुवऱ्या विकायला यायचा. तो माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. जया घरंदाज कुटुंबातला मुलगा. केवळ दारू प्यायला पैसे हवेत म्हणून दारोदारी कुवऱ्या विकायचा. माझ्या लग्नापूर्वीची ही सत्यकथा आहे. अखेरीला त्याची हालत बघवत नव्हती. दारूने त्याला पोखरलं होतं. खूप वाईट वाटायचं. आम्ही कधी कधी कुवऱ्या घ्यायचो. तो मागेल ते पैसे द्यायचो. जया ढोल खूप छान वाजवायचा. पण शिमग्यात ढोल वाजवण्यावरून त्याच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. खरं तर तेव्हा माऱ्यामाऱ्या हा ट्रेंडच होता. आता बरीच सुधारणा झाली. जया आता असता तर सुधारला असता का, हा विचार मनात येतो. 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०२.२०२१

...............


आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

काही वेळा आपल्याला चांगली परिस्थिती मिळते. तिचा उपयोग जीवन अधिक चांगले करण्यासाठी आपण किती करतो, हे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन इथून पुढे सुखी झाले पाहिजे, ही आपली प्रामाणिक ईच्छा असली पाहिजे. यासाठी वास्तवतेने विचार केला पाहिजे. मिळालेल्या छान परिस्थितीचा लाभ कसा घ्यायचा हे लक्षपूर्वक तपासले पाहिजे. आताची एक चूक सुंदर वर्तमान आणि भावी जीवन , दोन्हीही उध्वस्त करू शकतात.‌ इथे भावनेने नव्हे तर वास्तव विचार केला पाहिजे. असे केले तर काय होईल, तसे केले तर काय होईल, हे कागदावर निरपेक्षपणे मांडले पाहिजे. उत्तर मिळेल. वास्तव निर्णय घेतला तर आहे ती परिस्थिती आणि पुढचीही परिस्थिती चांगली राहीलच. पुढचे आयुष्य अधिक सुंदर होईल. आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०२.२०२१

...............


मी नाही त्यातली ....


सार्वजनिक अव्यवस्थेबद्दलचा काहींचा पुळका हा तात्कालिक विरोधासाठी किंवा फायद्यासाठी असू शकतो. सोयीस्कर असू शकतो. म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे ! अगदी नालायक कार्टे ! अंदरकी बात अशी असते की त्याच नालायक कार्ट्याशी विरोधकांची आतून व्यावसायिक भागीदारी पण असू शकते ! म्हणजेच साळसूदपणे वरून कीर्तन, आतून तमाशा ! त्यामुळे विरोधही , खबरदारी घेऊनच , तुटणार नाही अशा पद्धतीनेच होतो. कारण दोघांची लफडी दोघांना माहीत असतात. तंगडयात तंगडी, लंगडयात फुगडी चालतेच ! मी नाही त्यातली , कडी घाला आतली , यातलाच हा सोज्वळ प्रकार ! आता भ्रष्टाचार निर्मूलन कसे करायचे ब्बा ! 😃😄😃😄 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०२.२०२१

..............

देवाक काळजी 

हतबल सामान्य माणूस देवाक काळजी असं म्हणून सगळं देवावर सोडून देतो आणि देव म्हणतो, ही तुझी लढाई आहे, तू लढ ! वर फळाची (म्हणजे जिंकण्याचीही) ईच्छा धरू नकोस असं सांगतो ! काय करावं बा, चांगल्या सामान्य माणसांनी ?


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

...............

एका लग्नाला गेलो होतो. कोरोनाची दाट छाया कुठेही जाणवत नव्हती. सोशल डिस्टंसिंगवगैरे काही भानगड नव्हतीच. काहींनी मास्क घातले होते. काहींचे मास्क गळ्यात टांगलेले होते. काहींनी नियमानुरूप ठेवले होते. महिलावर्गाची काहीशी गोची होत होती. मास्क सौंदर्याला मारक की तारक हा त्यांच्याबाबतीत संशोधनाचा विषय होता. लग्नं लागलं . आईस्क्रीम आलं. त्यासरशी माझ्यासहीत होती तीही मास्क गळ्यात आलीत. विषय संपला !

....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

................

२५.०२.२०२१

वाह वाह वाह....सगळेच शेर अप्रतिम...

किती खुल्या मनाची असतात नाही माणसं ! पटकन दाद देऊन मोकळी होतात.‌ ही खरी माणसं.‌ शेर पूर्ण व्हायच्या आधीच ह्यांची दाद पूर्ण झालेली असते. कवी महाराजांनाही आता सराव झालेला असतो आणि ते उफाळून येऊन कविता सादर करीत असतात. तेव्हाही त्यांच्या मनात आपल्यालाही दुसऱ्या कवींना अशीच दाद द्यायची आहे हा एकमेव उदात्त विचारच असतो. 

हा त्याला म्हणतो, तो हयाला म्हणतो . दोघांनाही दाद हवी, दुसरे काय ? ते ठराविक वर्तुळातले ' अखिल विश्व एकमेकांची पाठ थोपटू ' मंडळातले कवी असतात. त्यांची पाठ थोपटायला कोणी येतच नाहीत. मग कवी तरी काय करणार ! हा कवी असो वा तो कवी असो ; शेवटी कवीला दाद तर हवीच असते ना मित्रांनो ! देव जसा भावाचा भुकेला असतो तसा कवी (पित्ताच्या नव्हे !) दादीचा भुकेला असतोच की ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: