काळजी घ्या मित्रांनो !
तुमचे आजार तुम्हीच निर्माण करता असं मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही आणि बसला तरी तुम्ही मान्य करणार नाही ! स्वतःवर कोण घेतो ! अनेकांची आजारपणं अनुभवली. स्वतः चौसष्ट वर्षात अनेक आजारपणातून गेलो ! सगळ्या आजारांची एक कार्यपध्दती असते. बरेचदा आजार कसल्या तरी माध्यमातून येतात. आधी व्हायरल आजार होतो आणि मग त्याची चर्चा व्हायरल होते. कोरोनाचे हेच झाले ! चर्चेनेच दहशत पसरली आणि अनेक लोक धक्क्यानेच गेले ! त्यांना तो आजार झालेलाच नव्हता ! किंबहुना ते निरोगी होते ! शोले सिनेमातला गब्बर सिंगचा, " जो डरेगा वो मरेगा " हा डायलॉग ते विसरले ! त्यांनी त्यांचा नसलेला आजार स्वतःच निर्माण केला आणि ते प्राणास मुकले ! त्यांची वेळच आली हे समाधान आम्ही करुन घेतले !
मी माझा खूप जुना अनुभव सांगतो ! कॉलेजला असताना मी दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाने आजारी पडायचो. खरं तर ते वय लव्हेरियाने आजारी पडायचं होतं , पण ते आपल्या नशिबातच नव्हतं ( असं आपलं समाधान करून घ्यायचं ! दुसरं तरी काय करणार , नाही का ! ) मी पावसाळ्यातच आजारी पडायचो याचं कारण उघड होतं ! मी पावसात भिजल्यानेच मला थंडी भरून ताप यायचा. मी का भिजायचो तर मी कॉलेजकुमार होतो ! कॉलेजकुमार कसा रस्त्याने बेडरपणे पाऊस झेलत झेलत चालला पाहिजे ! छत्री धरुन कॉलेजकुमार रस्त्याने चालला आहे हे चित्र बावळट दिसतं ! काय विचित्र कल्पना होत्या तेव्हा ! रेनकोट मध्ये आपण चंद्रावरचा माणूस नाही तर ससा दिसणार असं वाटायचं ! ती तारूण्याची मस्ती होती आणि सिनेमातल्या हिरोंचा पगडा होता ! म्हणूनच माझा पावसाशी झगडा होता ! त्यामुळे मी पावसाला भीक न घालता गोगटे कॉलेज ते बसस्थानक असा टेचात भिजत जायचो ! हे तीन चार दिवस झाले की पुढील किमान पंधरा दिवसांसाठी तरी मी अंथरूणात पडायचो ! आता मला सांगा माझा दरवर्षीचा हा आजार काय पावसाने निर्माण केला होता !
माझ्यासहीत अनेकांचे आजार अभ्यासले तेव्हा एक गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतांना आढळली ! काही आजार सुरू होण्याच्या आधी त्याचा विचार त्यांच्या मनात यायचा ! हे मी स्वतः माझ्याच काही आजारपणात अनुभवलं आहे ! असा विचार मनात आला म्हणून तो आजार मला झाला की पुढे जे होणार आहे त्याची लिंक कुठून तरी मनाला मिळाली ? मी आजारी पडणार हे मनाने आधीच ताडले होते की मनात आजाराचा विषय आल्यामुळे त्या धसक्यानेच मी आजारी पडायचो ? याच गोष्टी इतरांच्याही बाबतीत घडतांना मी पाहिले होते व म्हणूनच या निष्कर्षापर्यंत मी आलो ! माझा आणखी एक अनुभव असा की, आजाराची कसलीही कल्पना नसतांना मी काही दिवस जास्त वेळा बिस्कीटे खाऊ लागतो आणि विशेषतः बिस्कीटे खातांना माझ्या तोंडातील लाळ सुटण्याचे प्रमाण वाढते ! त्यानंतर मला कसले ना कसले आजारपण येते किंवा दुखापत होऊन तरी मी आजारी पडतो ! आता मी सावध झाल्याने जास्त खाणे आणि लाळ प्रकरण सुरू झाले की मी जास्त खाणेच बंद करतो आणि शक्यतो दुखापत होणार नाही ही काळजी घेतो ! असे अनुभव व विचार अनेकांना आलेले असतील म्हणूनच या मुद्द्यांवर अधिक चर्चा होणे गरजेचे आहे.
एक नक्की, कोणताही आजार ही एक विचित्र परिस्थिती असते ! अशा वेळी माणूस दडपणाखाली येतो व अधिक आजारी पडतो. एक पक्के लक्षात ठेवा : दडपण झुगारू शकलात तर परिस्थितीच्या वर रहाल ! अन्यथा, तुम्ही स्वतःला स्वतःच परिस्थितीच्या खाली न्याल ! म्हणजे आजारी पडून बेड रेस्ट आणि औषधे घेत रहाल ! सद्या पावसाळा आहे. २६ जुलैही जवळ येतोय. काळजी घ्या मित्रांनो !
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१५.०७.२०२४ सकाळी ०६.००