शुक्रवार, २६ जुलै, २०२४

काळजी घ्या मित्रांनो !

काळजी घ्या मित्रांनो !

तुमचे आजार तुम्हीच निर्माण करता असं मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही आणि बसला तरी तुम्ही मान्य करणार नाही ! स्वतःवर कोण घेतो ! अनेकांची आजारपणं अनुभवली. स्वतः चौसष्ट वर्षात अनेक आजारपणातून गेलो ! सगळ्या आजारांची एक कार्यपध्दती असते. बरेचदा आजार कसल्या तरी माध्यमातून येतात. आधी व्हायरल आजार होतो आणि मग त्याची चर्चा व्हायरल होते. कोरोनाचे हेच झाले ! चर्चेनेच दहशत पसरली आणि अनेक लोक धक्क्यानेच गेले ! त्यांना तो आजार झालेलाच नव्हता ! किंबहुना ते निरोगी होते ! शोले सिनेमातला गब्बर सिंगचा, " जो डरेगा‌ वो मरेगा " हा डायलॉग ते विसरले ! त्यांनी त्यांचा नसलेला आजार स्वतःच निर्माण केला आणि ते प्राणास मुकले ! त्यांची वेळच आली हे समाधान आम्ही करुन घेतले !

मी माझा खूप जुना अनुभव सांगतो ! कॉलेजला असताना मी दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाने आजारी पडायचो. खरं तर ते वय लव्हेरियाने आजारी पडायचं होतं , पण ते आपल्या नशिबातच नव्हतं ( असं आपलं समाधान करून घ्यायचं ! दुसरं तरी काय करणार , नाही का ! )  मी पावसाळ्यातच आजारी पडायचो याचं कारण उघड होतं ! मी पावसात भिजल्यानेच मला थंडी भरून ताप यायचा. मी का भिजायचो तर मी कॉलेजकुमार होतो ! कॉलेजकुमार कसा रस्त्याने बेडरपणे पाऊस झेलत झेलत चालला पाहिजे ! छत्री धरुन कॉलेजकुमार रस्त्याने चालला आहे हे चित्र बावळट दिसतं ! काय विचित्र कल्पना होत्या तेव्हा ! रेनकोट मध्ये आपण चंद्रावरचा माणूस नाही तर ससा दिसणार असं वाटायचं ! ती तारूण्याची मस्ती होती आणि सिनेमातल्या हिरोंचा पगडा होता ! म्हणूनच माझा पावसाशी झगडा होता ! त्यामुळे मी पावसाला भीक न घालता गोगटे कॉलेज ते बसस्थानक असा टेचात भिजत जायचो ! हे तीन चार दिवस झाले की पुढील किमान  पंधरा दिवसांसाठी तरी मी अंथरूणात पडायचो ! आता मला सांगा माझा दरवर्षीचा हा आजार काय पावसाने निर्माण केला होता !

माझ्यासहीत अनेकांचे आजार अभ्यासले तेव्हा एक गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतांना आढळली ! काही आजार सुरू होण्याच्या आधी त्याचा विचार त्यांच्या मनात यायचा ! हे मी स्वतः माझ्याच काही आजारपणात अनुभवलं आहे ! असा विचार मनात आला म्हणून तो आजार मला झाला की पुढे जे होणार आहे त्याची लिंक कुठून तरी मनाला मिळाली ? मी आजारी पडणार हे मनाने आधीच ताडले होते की मनात आजाराचा विषय आल्यामुळे त्या धसक्यानेच मी आजारी पडायचो ? याच गोष्टी इतरांच्याही बाबतीत घडतांना मी पाहिले होते व म्हणूनच या निष्कर्षापर्यंत मी आलो ! माझा आणखी एक अनुभव असा की, आजाराची कसलीही कल्पना नसतांना मी काही दिवस जास्त वेळा बिस्कीटे खाऊ लागतो आणि विशेषतः बिस्कीटे खातांना माझ्या तोंडातील लाळ सुटण्याचे प्रमाण वाढते ! त्यानंतर मला कसले ना कसले आजारपण येते किंवा दुखापत होऊन तरी मी आजारी पडतो ! आता मी सावध झाल्याने जास्त खाणे आणि लाळ प्रकरण सुरू झाले की मी जास्त खाणेच बंद करतो  आणि शक्यतो दुखापत होणार नाही ही काळजी घेतो ! असे अनुभव व विचार अनेकांना आलेले असतील म्हणूनच या मुद्द्यांवर अधिक चर्चा होणे गरजेचे आहे.

एक नक्की, कोणताही आजार ही एक विचित्र परिस्थिती असते ! अशा वेळी माणूस दडपणाखाली येतो व अधिक  आजारी पडतो. एक पक्के लक्षात ठेवा : दडपण झुगारू शकलात तर  परिस्थितीच्या वर रहाल ! अन्यथा, तुम्ही स्वतःला स्वतःच परिस्थितीच्या खाली न्याल ! म्हणजे आजारी पडून बेड रेस्ट आणि औषधे घेत रहाल ! सद्या पावसाळा आहे. २६ जुलैही जवळ येतोय. काळजी घ्या मित्रांनो !

... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१५.०७.२०२४ सकाळी ०६.००

चाला ... चालत रहा...

  चाला ... चालत रहा...

चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण...पाय हे माणसाच्या उमेदीवर उभे असतात. टेंशनने माणूस खचला की तो पायातच मोडतो.‌ त्याला चालत जा म्हणणे  सोपे आहे, पण आधार देणे, उभे करणे कठीण आहे. हे टेंशन फार घातक असतं.

आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांच्या नावाचा एक संदेश व्हॉट्स अॅपवर वाचनात आला. त्यात ते म्हणतात :

" *वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*
*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !! ....* चाला.▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते▪️.... *३६५ दिवस चाला*▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.... " असं त्यांनी खूप लिहिलंय. कळकळीने लिहिलंय.

🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️

खूप छान संदेश आहे. पण एवढे पुरेसे नाही. म्हणूनच मी सुरूवातीला म्हटलंय : चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण... हा पण आज फार महत्वाचा आहे. खरंच, जीवनातील वाढत्या व्यापांमुळे जीवनात अनेक संकटे येतात. अनेक धक्के बसतात. हे सगळंच पचवून बसणं एवढं सोपं नसतं. त्यांचा परिणाम शरीरावर होतोच ! माणूस मनाने खचतो आणि तो खचला की पहिले पाय खचतात. पायातली शक्तीच निघून जाते.‌ कोरोना काळानंतर तर अनेक माणसे लंगडतानाच दिसतात. पाण्यातच खचलेली दिसतात. काही जण याचा बूस्टर डोसशीही संबंध जोडतात, पण त्याबाबत अधिकृत तपशिल हाती आलेला नाही. काय असेल ते असो , पण मन खचल्याने पायातली ताकत जाते, हे खरे !

आपल्या आसपास अशी खचलेल्या मनाची, लंगडणाऱ्या पायांची लटपटती माणसं दिसतात. तेव्हा एक विचार स्पर्शून जातो. ही माणसे कोणत्या धक्क्याने खचली असतील ? त्यापूर्वी तर ती धडधाकटपणे सहज चालत असतील. मग त्यानंतर काय झाले असेल त्यांच्या आयुष्यात ? खचलेली ती माणसे पुन्हा उभारी धरावीत म्हणून काय करता येईल ? ईश्वरानं त्यांना उभं करण्याचं सामर्थ्य मला दिलं तर त्यांना उभं करण्याची माझी इच्छा नक्कीच आहे !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०५.०७.२०२४ सकाळी ०६.००

मंगळवार, १६ जुलै, २०२४

उद्याचा विचार

 

उद्याचा विचार


हो, कितीही झालं तरी काल , काल रहातच नाही. नाही म्हणजे कितीही कालमध्ये म्हणजे भूतकाळात रमलात तरी वर्तमानात यावंच लागतं ! दुनिया व्यवहारांवर चालते राव ! स्वप्नरंजनात फार काळ राहता येत नाही. मनात मांडे खात राहिले तर आपलीच लाथ मडक्यावर बसते , मडकेही फुटते आणि स्वप्नंही तुटते ! हाती धुपाटणे येते. आपण अब की बार कशाच्या पार जाऊन पोचतो ते कळतच नाही. स्वप्ने पाहणे वेगळे आणि काहीच कृती न करता ती नुसतीच पहात बसणे वेगळे ! भानावर यावेच लागते. जसा आजचा विचार पडतो तसाच उद्याचाही विचार पडतोच. अर्थात जो विचारी असतो त्यालाच विचार पडतो म्हणा. बरोबर ना ? तुम्ही पण हाच विचार करताय ना ? विचारी आहात ! करणारच. दुसरा कसला विचार नाही पडलाय मला. उद्या लेखनासाठी कुठला विषय सुचतोय , हाच एकमेव विचार पडलाय मला ! मारून मुटकून आपण लिहीत नाही. तुम्हांला काय वाटलं ? नाही म्हणजे, तुम्हांला वेगळं वाटणं अगदी स्वाभाविकच आहे ! कारण, अनेक विचार पडतात माणसाला ! काय काय व्याप आणि उपदव्याप करावे लागतात ते ज्याचे त्यालाच माहिती ! बरोबर ना ? भोग असतात ते ! भोगायलाच लागतात ! त्याशिवाय पुढे जाताच येत नाही.

भीष्म पितामहांचा एक संदर्भ

ह्या भोगांवरून आठवलं. परवाच एक व्हिडीओ तोही व्हाॅटस अॅपवर पाहण्यात आला. त्यात भीष्म पितामहांचा एक संदर्भ देण्यात आला होता. त्यांना शरपंजरी मरण येणार ते पूर्वजन्मातील घटनेमुळे येणार असं श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. तेही मागच्या ५२ व्या वर्षातील घटनेमुळे. भीष्मांना एवढे पूर्वजन्म पाहण्याची शक्ती होती. आपल्याला याच जन्मातील कालचं आज आठवत नाही. ५२ पूर्वजन्म कुठले आठवणार ! ते न आठवो, पण एक प्रश्नं मात्र इथे पडतोच. तो म्हणजे भीष्मांच्या आयुष्यात ती घटना कोणी निर्माण केली ? तो सरडा त्यांच्या नेमका वाटेत कोणी आणला आणि बाणाच्या टोकाने त्याला उडवायची सणक भीष्मांना त्या पूर्वजन्मात आली कशी ? असा विचार त्यांच्या मनात आला कसा ? बरं, आला आणि त्यांनी तो सरडा बाणाच्याच टोकाने का उडवला ? उडवलाच का ? त्याला त्याच्या वाटेनं जाऊ का नाही दिलं ? तोही निवडुंगावर जाऊन पडलाच कसा ? तिथे नेमकं निवडुंगच कसं उगवून राहिलं होतं ? हे नियोजन इतक्या कल्पकतेने आणि अचूकपणे कोणी केलं असावं ? ही त्या मास्टरमाईंडची नैतिकवगैरे जबाबदारी नाही का ? हा कोण कट टू कट मास्टरमाईंड आहे ? कुणाला सापडला तर सांगा. तोवर उद्या कोणत्या विषयावर लिहावे याचे मी चिंतन करतो. तोपर्यंत आजचा लेख तर तयार झाला ! हेही नसे थोडके ! आता उद्याचा विचार...


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

पुढच्या वर्गात गेल्याबद्दल बक्षिस

 मोफत वह्या वाटप

गेली तीन वर्षे आम्ही दोघे बंधू शाळांमध्ये जमेल तेवढं  मोफत वह्या वाटप करतो. मी वाटप व्यवस्था बघतो.  वाटप करतांना एक गोष्ट लक्षात आली. काही मुलांनाच मोफत वह्या नको असतात. कदाचित , त्यांचा या सगळ्या सामाजिक कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकेल. कदाचित, त्यांच्या पालकांना ते आवडत नसावे. घरात या विषयावर बोलणे होत असावे. पालक श्रीमंत असोत वा गरीब असोत. ते स्वाभिमानी असू शकतात. त्यांना कोणाची मदत घेणे आवडत नसावे. ते त्यांच्या पाल्यांना वह्या विकत घेऊन देण्यास सक्षम असतील. साहजिकच,  त्यांच्या मुलांनाही काही मोफत घेणे आवडत नसावे. संस्कार असू शकतात. अशी मुलं वर्गातही घरच्या संस्कारांना अनुसरून मोफत वह्या घेण्यास नकार देतात यात गैर काहीच नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. मात्र, त्याचा परिणाम इतर विशेषतः गरीब मुलांवरही होऊ शकतो. गरज असूनही मदत ही भीक समजून विचार होऊ लागला तर प्रश्न उभा राहतोच.

In the school with students

मग हा प्रश्नं मुलांचा स्वाभिमान न दुखावता कसा सोडवता येईल याबाबत विचार सुरू केला. कारण , काहींचे ठीकच होते. ते वह्या विकत घेऊ शकत होते किंवा परवडत नसतांनाही विकत घेऊन स्वाभिमान जपू शकत होते. काही अपवादही असतात, तसेच समजायचे. म्हटलं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊदे.‌ तेही चुकत नसतील. आपणही चुकायचं नाही. आपण आपल्या मार्गाने जाऊ, पण मोफत वह्या वाटप करुच. विशेषत: ग्रामीण भागात याची फार मोठी आवश्यकता असल्याचे गेल्या तीन वर्षांत आढळून आले होते. पण आवश्यकता असूनही काही पालकांचा म्हणा, मुलांचा म्हणा, स्वाभिमान आडवा येत होता. नजरेसमोर गरजू दिसत होते. या मानसिकतेतून गरजूंना बाहेर कसे काढायचे ? गरजूंमध्ये अशा चुकीच्या प्रकारे स्वाभिमानाची साथ पसरली तर ते समाजहीताच्या दृष्टीने योग्य होणार नव्हते.  माझी तगमग, अस्वस्थता वाढत चालली होती.  काही तरी करणे भाग होते. कारण या वर्षीच्या वह्या वाटपाला सुरूवात करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती. शाळा पंधरा जूनला सुरू होणार होत्या.

अखेर , १४ जून उजाडला ! संस्कारवाली एक विद्यार्थीनीं घरासमोरच्या रस्त्याने जातांना दिसली आणि उत्तर सापडले ! मी तिला लगेच हाक मारून बोलावले. ती आलीही. मी उद्यापासून वह्या वाटप करणार आहे हे तिला सांगतानाच हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे, असं सांगितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती म्हणाली, " काका, उद्यापासून कशाला ? मला आजच, आताच द्या की वह्या ! " मी तिथेच यंदाच्या मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ केला ! आता मी ज्या शाळेत जातो तिथे आवर्जून ' हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे ' हे वाक्य ऐकवतो ! मुलं हसून वह्या स्वीकारतात. मुलं चांगली असतात. निर्मळ मनाची असतात. त्यांना फक्त योग्य प्रकारे संस्कारांकडे वळवावं लागतं , हा अनुभव आणि हे उत्तरही २०२४ च्या वह्या वाटपात सापडले !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

गुरुवार, ४ जुलै, २०२४

खोके नि पेट्या मिळवा

 राजकीय लावणी


खोके नि पेट्या मिळवा 

राया तुम्ही संपत्ती कमवा  || धृ ० ||  राया तुम्ही...


सत्ताधारी असो वा परका

तुम्ही गळाभेट घ्या बरं का ...

काढा फोटो, सोबत मिरवा...   || ०१ || राया तुम्ही...


बघू नका रंग हिरवा 

करू नका हट्ट भगवा

स्वार्थाचे चित्र रंगवा ...           || ०२ || राया तुम्ही...


बघा कोण किती देतो

कोण सोबतीने नेतो

हवी तेव्हा टोपी फिरवा...        || ०३ ||  राया तुम्ही...


बसून खातील पिढ्या सात

पडणार नाही कसली ददात

बंगले नि माड्या बनवा...        || ०४ || राया तुम्ही...


सोडा शामळूपणा आता

तुम्ही बाईकने का हो जाता ?

चार चाकी गाड्या उडवा....     || ०५ || राया तुम्ही...


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

०४.०७.२०२४ सकाळी०९.१०

सोमवार, १ जुलै, २०२४

गझलकार देवीदास पाटील यांची मुलाखत प्रक्षेपित

 गझलसम्राट सुरेश भटांचे शिष्य मराठी गझलकार देवीदास पाटील यांची रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून मुलाखत प्रक्षेपित 

मुलाखतीचा व्हिडीओ पहा : 


आकाशवाणी रत्नागिरीवर कवीवर्य सुरेश भटांचे शिष्य व रत्नागिरीमध्ये मराठी गझल प्रथमतः सुरू केली त्या देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून अलिकडेच प्रसारित झाली होती. ती वरीलप्रमाणे  व्हिडीओ स्वरूपात यू ट्यूबवर दि. ०१.०७.२०२४ रोजी अपलोड करण्यात आली आहे. रसिक त्यांचा आनंद घेत आहेत. 

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र

#interview

#AIR