मंगळवार, १६ जुलै, २०२४

उद्याचा विचार

 

उद्याचा विचार


हो, कितीही झालं तरी काल , काल रहातच नाही. नाही म्हणजे कितीही कालमध्ये म्हणजे भूतकाळात रमलात तरी वर्तमानात यावंच लागतं ! दुनिया व्यवहारांवर चालते राव ! स्वप्नरंजनात फार काळ राहता येत नाही. मनात मांडे खात राहिले तर आपलीच लाथ मडक्यावर बसते , मडकेही फुटते आणि स्वप्नंही तुटते ! हाती धुपाटणे येते. आपण अब की बार कशाच्या पार जाऊन पोचतो ते कळतच नाही. स्वप्ने पाहणे वेगळे आणि काहीच कृती न करता ती नुसतीच पहात बसणे वेगळे ! भानावर यावेच लागते. जसा आजचा विचार पडतो तसाच उद्याचाही विचार पडतोच. अर्थात जो विचारी असतो त्यालाच विचार पडतो म्हणा. बरोबर ना ? तुम्ही पण हाच विचार करताय ना ? विचारी आहात ! करणारच. दुसरा कसला विचार नाही पडलाय मला. उद्या लेखनासाठी कुठला विषय सुचतोय , हाच एकमेव विचार पडलाय मला ! मारून मुटकून आपण लिहीत नाही. तुम्हांला काय वाटलं ? नाही म्हणजे, तुम्हांला वेगळं वाटणं अगदी स्वाभाविकच आहे ! कारण, अनेक विचार पडतात माणसाला ! काय काय व्याप आणि उपदव्याप करावे लागतात ते ज्याचे त्यालाच माहिती ! बरोबर ना ? भोग असतात ते ! भोगायलाच लागतात ! त्याशिवाय पुढे जाताच येत नाही.

भीष्म पितामहांचा एक संदर्भ

ह्या भोगांवरून आठवलं. परवाच एक व्हिडीओ तोही व्हाॅटस अॅपवर पाहण्यात आला. त्यात भीष्म पितामहांचा एक संदर्भ देण्यात आला होता. त्यांना शरपंजरी मरण येणार ते पूर्वजन्मातील घटनेमुळे येणार असं श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. तेही मागच्या ५२ व्या वर्षातील घटनेमुळे. भीष्मांना एवढे पूर्वजन्म पाहण्याची शक्ती होती. आपल्याला याच जन्मातील कालचं आज आठवत नाही. ५२ पूर्वजन्म कुठले आठवणार ! ते न आठवो, पण एक प्रश्नं मात्र इथे पडतोच. तो म्हणजे भीष्मांच्या आयुष्यात ती घटना कोणी निर्माण केली ? तो सरडा त्यांच्या नेमका वाटेत कोणी आणला आणि बाणाच्या टोकाने त्याला उडवायची सणक भीष्मांना त्या पूर्वजन्मात आली कशी ? असा विचार त्यांच्या मनात आला कसा ? बरं, आला आणि त्यांनी तो सरडा बाणाच्याच टोकाने का उडवला ? उडवलाच का ? त्याला त्याच्या वाटेनं जाऊ का नाही दिलं ? तोही निवडुंगावर जाऊन पडलाच कसा ? तिथे नेमकं निवडुंगच कसं उगवून राहिलं होतं ? हे नियोजन इतक्या कल्पकतेने आणि अचूकपणे कोणी केलं असावं ? ही त्या मास्टरमाईंडची नैतिकवगैरे जबाबदारी नाही का ? हा कोण कट टू कट मास्टरमाईंड आहे ? कुणाला सापडला तर सांगा. तोवर उद्या कोणत्या विषयावर लिहावे याचे मी चिंतन करतो. तोपर्यंत आजचा लेख तर तयार झाला ! हेही नसे थोडके ! आता उद्याचा विचार...


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: