शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

माझ्या मराठी गझला



                              आपण


जखमेवरती मीठ दुज्याच्या चोळत बसतो आपण
पुन्हा पुन्हा ही एकच संधी शोधत बसतो आपण

ज्याचे त्याचे भविष्य ज्याच्या त्याच्या हाती असते
तरीही ज्योतिष्याच्या नादी लागत बसतो आपण

सर्वज्ञानी स्वतःस समजून आपण बोलत जातो
खुळ्यापरी अकलेचे तारे तोडत बसतो आपण

जिकडे तिकडे माणूस म्हणुनी मिरवत असलो तरी
माणूसकीवर खुनी हल्ले चढवत बसतो आपण

किती चोरटे , किती लफंगे , किती बुवा अन बाबा !
फसूनसुध्दा त्यांच्या नादी लागत बसतो आपण

स्वतः स्वतःच्या निर्मळतेची जाहिरात करतो अन
क्षुद्र मनाची दूषित छिद्रे झाकत बसतो आपण


कंपू करूनी नको नको त्या चर्चा करतो सा-या 

नसेल त्याच्या पाठीमागे बोलत बसतो आपण


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील

-----------------------------------------------------



काही नवेनवेसे... 




काही नवेनवेसे . . . काही जुनेजुनेसे . . .

मज आजकाल बाई . . .वाटे हवेहवेसे . . .!


हातात हात माझ्या जेव्हा दिला तयाने . . .

मज वाटलेच नाही तेही खरेखरेसे !


तो चोर काळजाला घालीत हात आहे

लागे  ठाव त्याचा पण ते वाटे बरेबरेसे !


मज आजकाल माझा अंदाज येत नाही !

गिरकीत हाय करते मागे पुढेपुढेसे . . . !


हा तोच आरसा अन् हा तोच चेहराही !

बघणे मुळी  होई मजला पुरेपुरेसे . . . !


झाले तरी कळेना माझे असे कशाने . . .

बेचैन आतुनी मी ! होते कसेकसेसे !




... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील


खास   

 

       काही तरी खास होते !

       का होत हे भास होते ?


         जादू कशाची कळेना

         फुलले किती श्वास होते !


                होवून सेकंद गेले

               पण वाटले तास होते !


                       होते हवेहवेसे. . .

                      काही असे त्रास होते !


                               चाहूल लागे जराशी

                              कोणी आसपास होते !





... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील


---------------------------------------------------------------------------------

कड़े अन कपार मला

कड़े अन कपार मला
कुठे ना उतार मला !

कसे मी हसू उसने ?
इथे दू:ख्ख फार मला !

फुले देवुनी वर त्या --
फुलानी मार मला !

इथे माणसे फसवी
कशी तारणार मला !

अहा ! मानवी दृष्टी
चिरी जातवार मला !



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
----------------------------------------------------------------------

मन विषण्ण होते तेव्हा ....


मन विषण्ण होते तेव्हा त्यास कुठेतरी रमवावे लागते  !
एका विषयाकडून दुस-या विषयाकडे वळवावे लागते !

दुस-याला शिकवणे तसे हल्ली फारच सोपे झाले आहे !
विसरतात बरेच लोक की आधी स्वत:स शिकवावे लागते !

यशस्वी माणूस जाणीत होता त्याच्या यशामागचे वाक्य --
काहीतरी कमविण्यासाठी काहीतरी गमवावे लागते  !

कश्या सावल्या शोधीत येती उन्हास ह्या गरिबाच्या घरी ?
जिथे कवडसे जराश्या आशेचे ; ज्यांना लपवावे लागते !

रणांगणावर लढण्यावाचून खुला पर्यायच नसतो कुठला !
हारजीत ही नंतर ... आधी रणांगणाला पचवावे लागते !

....*********/////////-------@@@@@@@@@*****///+++++-



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील

मीच मजला पेश केले पाहिजे
जगाच्या दारात नेेले पाहिजे

गुरू बनायचे असेल जर कधी
आधीच शोधले चेले पाहिजे

जगायचे सुखी आयुष्य पुढे तर
रोजचेच आता मेेले पाहिजे

अहंकार नष्ट व्हावा यासाठी
षढरिपू वागून  गेले पाहिजे

'  त्या ' भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी
सोबती , बाटल्या , पेेले पाहिजे

.............***//////*@@@@@@$$$$$$$$$#######



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील

सोसणे                                     

हे कसे माझे तुझेही बोलणे झाले                      
जे खरे बोलायचे ते टाळणे झाले                      

मी किती आतुर होतो भेटण्यासाठी                   
शेवटी भेटीत खोटे भेटणे झाले                       

जे कधीकाळी तुझ्या ओठावरी होते                 
तेच माझे नाव आता शोधणे झाले                

कोठुनी आणू पुन्हा त्या चांदराती मी ?            
हे फिके माझेच आता चांदणे झाले !           
   
काय आयुष्यात आलो  सोसण्यासाठी 
सोसणेही एकट्याने सोसणे झाले ! 
                             
खुशाल आता चाखतो मजा  ह्या  जीवनाची 
मजेत आता लोक हो जगाया लागलो मी !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
-----------------------------------------------------------------------------------

                 
 शब्द                        
लोक जे वाचाळ काही सारखे चर्चीत होते                              
ते रिकामे लोक होते हे मला माहीत होते                              

बंगले बांधून गेले . . . झुंबरे लाऊन गेले                             
कोठुनी झाली कमाई उत्तरे टाळीत होते !                    

हाय हे चिक्कार गुत्ते हाय ही चिक्कार दारू                      
सर्व हप्ते बांधलेले जे नको ते पीत होते !                       

या दुकानी माल खोटा त्या दुकानी माल खोटा                      
ग्राहकांना हे लुटारू सारखे फसवीत होते !                            

जीवघेणे वार होते . . . जीवघेणी धार होती . . .                   
ह्या अश्या शब्दांस माझे अर्पिले मी गीत होते !                    



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
----------------------------------------------------------------------------------

             
 हट्ट               

हा तुझा हट्ट असा चंद्र बघायासाठी !                    
हात हातात असा घट्ट धरायासाठी   !                   

चित्त चोरून तुझे आज कुणी नेले ?                    
काय कारण झाले जीव जडायासाठी !                                          

हाय !  सरकेल जशी रात पुढे एकांती . . .            
जीव होतील पिसे एक बनायासाठी !                   

ठेव संकोच तुझा दूर अश्या ह्या वेळी                 
ही  आहेच घडी दूर सरायासाठी !                   

सरीमागून सरी कोसळती प्रेमाच्या !                   
ये अशी बिलग मला चिंब भिजायासाठी !           


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
---------------------------------------------------------------------------------
             भास                    


का फुलांचे वार व्हाया लागले                                
हाय काटेही फुलाया लागले !                            


मी तुझ्याशी आज थोडे हासलो                            
लोक सारे का जळाया लागले ?                          


लाख कानांनी कहाणी ऐकली                              
मोजके डोळे गळाया लागले !                                  


वाट माझी सांडली मागेच मी                                  
पाय आता सापडाया लागले !                                


 माळतो आहे तुला मी मोगरा                                
की मला हे भास व्हाया लागले ?      


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
                     
-------------------------------------------------------------------------------

आयुष्य आग आहे                                

आयुष्य आग आहे                                                                    
जळणेच भाग आहे !                                                                    

करतोस दुष्ट दैवा                                                                      
का पाठलाग आहे ?                                                                    

सारी उजाड राने                                                                        
उध्वस्त बाग आहे !                                                                        

साधा कटाक्षसुद्धा                                                                            
झाला महाग आहे !                                                                    

कुठल्या मनात गंगा ,                                                                  
काशी , प्रयाग आहे ?                                                                  

जे जे घडून गेले                                                                            
त्याचा  राग आहे !                                                                  

सूर्यास वेदना अन
चंद्रास डाग आहे !

... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
===================================


  हसून  दु:ख्खे      

 हसून  दु:ख्खे साजरी कराया लागलो मी 
सुखापरी  दु:ख्खातही हसाया लागलो मी !


हवे कशाला सोबती तरी खोट्या मनाचे ? 
खराखुरा माझा सखा बनाया लागलो मी !


 
नमून आता राहणार नाही दांभिकानो 
 नसानसानी पेटुनी उठाया लागलो मी !


तुझ्या ऋतुनी पाडल्या फिक्या ह्या चांदराती 
तुझ्या ऋतूना पाहुनी फुलाया लागलो मी !


खुशाल आता चाखतो मजा  ह्या  जीवनाची 
मजेत आता लोक हो जगाया लागलो मी !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
-----------------------------------------------------------------------------------

        
चेहरा  

 
आसवे  ढाळतो 
 मी हसून राहतो !


 
अंतरात माझिया 
 मी तुलाच पाहतो !


 संपले ऋतू जरी 
 मी तरी  संपतो !


 
मी तुझ्या मनातली 
 चांदरात मागतो !


 
मी तुझाच,  हे तुझा 
 चेहराच सांगतो !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
----------------------------------------------------------------------------------   

तुझ्या मालकीचे ! 


 सूर छेडू नको बासरीचे 
वेड लावू नको संगतीचे !


थांब थोडे ! जरा ऐक माझे !
रंग उधळू नको पंचमीचे !       
                  

बोल काही तरी बोल आता . . .
बोल काही तरी अंतरीचे   !


खातरी ना तुझ्या वागण्याची !       
भेटणेही तुला जोखमीचे !



 
रामपारी तुझा स्पर्श झाला  . . .
 श्वास झाले तुझ्या मालकीचे !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
---------------------------------------------------------------------------------


प्रश्न जेव्हा विचारला 

 प्रश्न जेव्हा विचारला
उत्तराने दगा दिला !


चेहऱ्यावर फुले जरी        
आत काटा विसावला !


घे नशीबा हसून तू
सूर्य माझा ढगाळला !


नाव माझी  भंगली
पण किनारा दुरावला !


  मी सुपाशी कसा लढू ?
  मीच दाणा सुपातला !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
-------------------------------------------------------------------------------
           सूर्य

    भंगला जरी आरसा
    चेहरा जसाच्या तसा !

    हे तुझे ऋतू कोठले ?
    मी दिला तुला हा वसा !

    शोभशील राजा घरी
    राहिला  राजा असा !

    राहूदेत कुंकू तरी
    तेवढाच माझा ठसा !

    लोक हे जरी बोलले
    ऐकतो कुठे मी तसा !

 सूर्य शेवटी भेटला . ..               
 सोडताच मी कवडसा !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
=========================


                        इशारे



कशी कोमेजली सारी फुलांची बाग ही लवकर ?
कसे काळीज हे झाले तुझेही सांग ना पत्थर !

असे काही तरी होते , असे काही तरी आहे !
असे आयुष्यही झाले  तुझ्या हातातले जर तर !

मला बोलायचे होते ... तरी मी बोललो नाही !
तुझी ती चौकशीसुद्धा तशी होती खरी वरवर !

सुगंधी श्वास ते होते तुझे मी ठेवले सोबत ...
कधी मी शिंपडू म्हटले तरी का सांग ना अत्तर !

तुझ्या सा-याच प्रश्नांची दिली मी उत्तरे होती !
अता एकाच प्रश्नाचे .... मला दे एक तू उत्तर !

जिथे मज जायचे होते ... तिथे मी पोचलो नाही !
तुझ्या डोळ्यातले काही ... इशारे जाणले नंतर !



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
     

                  जीवना

सोसली तुझी उन्हे ; सोसल्या तुझ्या झळा 
जीवना तरी मला ... लागला तुझा लळा ! 

रोजचेच वीष मी आत आत घेतले !
हा उगाच काय रे कंठ जाहला निळा ?

पीत पीत आसवे झिंग झिंग झिंगलो !
गोड गोड बोलुनी कापलास तू गळा !

पाहिले तुझेच मी चेह-यात चेहरे !
पाहिला तुझाच मी रंग रंग वेगळा !

दु:खं दु:खं वेचले मी कळयाफुलांपरी !
हासुनी व्यथेसवे शिंपला तुझा मळा !

एक एक वाट तू घेरलीस जीवना !
पाय टाकला तिथे लावलास सापळा !



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
            

                   कौतुक

हलकेच चंद्र माझा माझ्या कुशीत आला !
हलकेच देह माझा कोजागरीत न्हाला !

कळले मला न केव्हा पडली मिठी फुलांची !
कळले मला न केव्हा माझा सुगंध झाला !

आता कुठे जरासा दिसलो म्हणे मला मी !
माझाच चेहरा का नयनी तुझ्या निघाला !

जपले अबोल काही क्षण मी मनात हळवे ...
गेली करून लाली साराच बोलबाला !

पडतात रोज स्वप्नें मजला कशी गुलाबी ?
पडते धुके गुलाबी  ... माझ्या कसे उशाला !

घेवू तरी कसे मी माझेच नांव आता ?
माझ्यात पाहतो मी दुस-या तरी कुणाला !

अजुनी तुझे मला का इतके म्हणून कौतुक  ?
स्मरतो तुलाच आहे विसरून का स्वत:ला ?




... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील



            आयुष्यभर

तू बोलतांना तुला ऐकत रहावेसे वाटते 
तू एकसासारखे मग बोलत रहावेसे वाटते 

तू ती आग आहेस जी आग माझी शांत करते
तू जिवाला सारखे जाळत रहावेसे वाटते 

तुझ्या माझ्यातले अंतर ... जरी हे वाढले नंतर
पुन्हा जुन्या वाटेवर भेटत रहावेसे वाटते

कितीही पाहिले तरी हे मन भरतच नाही
कितीही पाहिले तरी पाहत रहावेसे वाटते

चार पावलांनी फारसे समाधान होत नाही
आयुष्यभर सोबत चालत रहावेसे वाटते




... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील



माझे प्रकाशित मराठी लेख





















 


























     


















               



















         
                       
















       

















     






















गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

अविस्मरणीय जैतापूर !


जैतापूर : तुझा विसर न होई  !



नुकताच जैतापूरला जाऊन आलो . खरं म्हणजे , जाऊन आलो म्हणण्यापेक्षा पुन्हा (आणि बहुतेक पुन्हा पुन्हा ) जाण्यासाठीची पाहणी करून आलो . काही महिन्यांपूर्वीच मला माझ्या दहावीतल्या वर्गमित्रांना भेटण्याची ईच्छा झाली . त्या काळात मोबाईल नव्हते . कोण कोण कुठे कुठे आणि कसे कसे आहेत , हे चाळीस वर्षांनी बघण्याचे औत्सुक्य अचानक एके दिवशी मला का वाटावे , याचा विचार करण्यापेक्षा  अलिकडे माझ्या संपर्कात असलेल्या श्री . अश्रफ हसन मुक्री याला मला जैतापूरचा संपर्क दुवा देण्याची विनंती केली . त्यानुसार , त्यांने माझा वर्गमित्र श्री . विकास मांजरेकरचा अनेक वर्षांनी हल्लीच संपर्क घडवला होता . काल माझ्या मनात जैतापूरला जाण्याचा विचार येताच मी माझे तंत्रनिकेतनचे सहकारी मित्र श्री . शालिकराम लष्कर चव्हाण यांना विचारले . त्यांनी दुस-या दिवशी जाण्यास लगेच होकार कळवला . त्यानुसार , दि. 13.01.2019 रोजी दुपारी बाईकने जैतापूरला विकासकडे आम्ही दाखल झालो ! विकासबरोबर प्राथमिक गप्पा झाल्यावर त्याच्या मेडीकल स्टोअर्सला भेट दिली . त्याच्यापासून पन्नास पावलांवर असलेल्या आमच्या उदय भोपळे नामक वर्गमित्राचे चिकन सेंटर पाहिले. उदयही ब-याच काळानंतर भेटला . पुन्हा आम्ही विकासकडे आलो . तिथे  वहिनींनी एकटीने कमीत कमी वेळेत इतके सुंदर जेवण बनवले होते की ते जेवून आम्ही अगदी तृप्त झालो ! त्याची चव जिभेवर ठेवून विकास सोबत जैतापूरात फेरफटका मारला .

            पहिली पावले अर्थातच शाळेकडे वळली . शाळेच्या समोरच आमचा मित्र श्री . हरिदास देवळेकर राहतो . त्याला हाक दिली पण तो बाहेर गेल्याचे कळले . आमचे ज्येष्ठ मित्र श्री. दिवाकर आडविरकर हायस्कूलमध्येच भेटणार हा अंदाज खरा ठरला . अशा व्यक्ती जिथे उभ्या असतात तिथे चांगले कार्य निश्चितपणे घडत असते . समोरच हायस्कूलच्या सुशोभीकरणाचे कार्य सुरू होते . दिवाकरजी पटांगणातच होते.  त्यानंतर आम्ही हायस्कूलमध्ये प्रवेश केला . ज्या न्यू इंग्लिश स्कूल , जैतापूरच्या संस्कारांनी मी घडलो , त्या माझ्या शाळेपुढे आज अनेक वर्षांनी पुन्हा नतमस्तक झालो ! खूप समाधान वाटले . आपण इतकी वर्षे इकडे आलो नाही , ही बोचही थोडी कमी झाली . शाळेकडे माजी विद्यार्थ्यांनी लक्ष टाकणे गरजेचे आहे , हे दिवाकरजींचे म्हणणे कळकळीचे व खरे असल्याचे लक्षात आले . खरोखरच , दरवर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी बँचनिहाय मदत केल्यास शाळेच्या भरभराटीस हातभारच लागेल . हा विचार घेवूनच आम्ही शाळेचा आणि दिवाकरजींचाही निरोप घेतला . तितक्यात मशिदीतील आझान कानावर पडली . हया आवाजाने मला मांडवीकडे खेचले नसते , तरच नवल होतेे ! 

             वाटेत गुलाम हुसैनजींचा मेडिकल स्टोअर भेटला .  हया स्टोअरमध्ये त्यांचे सदैव हसमुख आणि बोलके व्यक्तीमत्व पाहून औषधे घ्यायला आलेला पेशंट किवा त्याचा नातेवाईक काही क्षण का होईना दु:खं विसरून जायचा ! आज त्यांना मला भेटता आलं नाही . नव्वदीत ते काळाबरोबर हासत विनोद करीत असल्याचा भास मला झाला आणि आम्ही सुनिता नारकरच्या घराजवळच्या जेटीकडे आम्ही वळलो . जेटीबद्दल विकास सांगत होता तेव्हा माझे मन समोरच्या खाडीच्या पाण्यावर तरंगत पलिकडच्या धाऊलवल्लीत गेले . त्याच काठावर मी जैतापूरला येण्यासाठी होडीत बसण्याकरिता आई , वडील आणि आजीबरोबर पहिले पाऊल उचलले होते .... तेव्हा मी बहुधा तीन चार वर्षांचा असेन ! तेव्हा लाटांवर वरखाली होणा-या होडीमधून मी जैतापूरच्या याच जेटीवर पहिले पाऊल टाकले होते ! तिथूनच बाजारपेठमार्गे  मांडवीकडचा माझा प्रवास सुरू झाला होता ! तेव्हा वाटेत समाधान हाँटेलमधून वडिलांनी घेतलेले नानकटक मला एवढे आवडले की मी त्यासाठी हट्ट करू लागलो होतो . नंतर दरवर्षी मी स्वत:च जाऊन ते नानकटक आणून खावू लागलो होतो . आम्ही याच समाधान हाँटेलसमोरून बाजारपेठेतून मांडवीकडे निघालो . वाटेत दत्ता टेलर अनेक वर्षांनी दिसला आणि पहिली फूलपँट त्याच्याकडे शिवल्याची आठवण आली . विकास मला दत्ताकडेही घेवून गेला . 

         दत्ताच्याच थोडे पुढे अाजही असलेले खुदबूचे दुकान आहे . हा खुदबू खूप प्रेमळ होता ! लहान मुले चणे शेंगदाणे विकत घ्यायला आली की तो स्वत: त्यांना मोफत गूळ दयायचा ! '' खुदबू वायच गाॅड दी '' असं जैतापूरी भाषेत मुलं सतत मागणी करतांना मी त्यावेळी खूपदा पाहिलं होतं . मीही हया खुदबू चाच्याचं आवडतं छोटं गि-हाईक होतो याचा मला आजही अभिमान आहे ! खुदबूचा नातू ते दुकान आता चालवतो . 

            तिथून पुढे निघालो . ती जुनी विहीर , खलील काझी व फाफा आजी यांची घरे आणि त्यापुढे कष्टम चाळ ! हयाच चाळीत दोन नंबरच्या रूममध्ये आम्ही रहायचो ! आता चाळ पडून बरीच वर्षे झाली . नवीन बांधलेली इमारतही पडायला आलीय . सर्वात दु:खं झालं ते चाळीसमोर बंदिस्त कंपाऊंड बघून ! तेव्हाची ती मोकळी हवा आता बंदिस्त झाली आहे ! पुढे गेलो तर मांडवी चौपाटीही अशीच बंदिस्त केलेली ! समोरच्या करगुटकरांच्या वाडयाचे कंपाउंडही साध्या दगडमातीचे उरले नव्हते . तेही पक्के बांधण्यात आले होते . कष्टम चाळीची ती दुरावस्था मला बघवेना ! कोणी तरी हृदयावर दगड ठेवले असल्याचे मला जाणवले ! मी मांडवीकडे सरकलो.  मांडवीत मोकळ्या वा-यावर , समोरच्या खाडीच्या पाण्यावर हेलकावणा-या लाटा आणि त्या लाटांवर हेलकावणा-या होडया पहात किती तरी वेळ त्या काळी बसलो होतो ... कधी वडिलांबरोबर , कधी मित्रांबरोबर तर कधी एकटाच .... ती बंदिस्त मांडवी बघून मी सून्नच झालो . कष्टम आँफीस तर बंदच होते . त्याच्यासमोरच्या महापुरूषाचे देऊळ मात् त्यामानाने सुस्थितीत होते . मला वडिलांची खूप आठवण आली ! दर सोमवारी इथे नारळ दयायचा मान माझ्या वडिलांचाच असायचा . माझे डोळे माझ्याही नकळत भरून आले . मी महापुरूषाच्यासमोर झुकलो . चाळीस वर्षापूर्वी याच मांडवीत मी किती तरी स्वप्नं पाहिली होती . इथेच मी आयुष्यातली पहिली कविता केली होती ; पहिला लेख लिहिला होता ! ती गजबजलेली मांडवी आज ओस पडली होती ! खरंच मांडवीची ती निर्मनुष्य अवस्था अधिक वेळ बघणे शक्यच नव्हते ... मी निघू या म्हटले व उदास अंत:करणाने चालू लागलो , तसे विकास व चव्हाण माझ्यासोबत परत फिरले . पुढे गेलो तोवर नमाज संपला होता . युसूफच्या घरातून त्याच्या पत्नीने आवाज दिला , पण पुढच्या वेळी नक्की येतो , असं सांगून पुढे निघालो . मशिदीसमोर थांबलो . हयाच मशिदीतली बांग ऐकून पहाटे लवकर उठण्याची सवय मला बालवयातच लागली होती . परमेश्वर आपल्याला असं किती वेळा जागे करीत असतो ! बालमित्र खलील आणि त्याचा छोटा भाऊ युसूफ बाहेर येताच पुन्हा एकदा आम्ही बालवयाच्या आठवणीत रमलो . वेळ खूप झाला होता . मी माझ्यासोबत चव्हाणांना आणले होते . वहिनी व त्यांची लहान मुलगी लक्षिता रत्नागिरीत एकटयाच होत्या . मी चव्हाणांचा फार वेळ घेतला आहे हे दुपारपासूनच मला जाणवत होतं. सायंकाळचे पाच वाजत आले होते . आता निघणे गरजेचे होते . आम्ही विकासच्या घरी आलो . वहिनी व विकासचा निरोप घेतला व बाईकवरून परत रत्नागिरीकडे निघालो तेव्हा जैतापूरच्या आठवणी दाटून आल्या होत्या . मनातले जैतापूरचे स्थान सायंकाळसारखेच अधिकाधिक गडद होत चालले होते !

            
..............

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

वाईतील गझलप्रेमी




                  Due to the great Bhimraoji Panchale and love for the great Suresh Bhat's marathi gazal , I was at Wai in Satara district.  It was one of the grand programmes . It was a lovely function ! I still have the sweet memories in my mind . Many Marathi Gazalkars were also there . It was a fantastic travel of Marathi Gazal that brought all of us at Wai . It was totally a different atmosphere and we all enjoyed it lot . I also presented my gazal and got a loud of applause and once more too to my gazal named Teer meaning arrow . I generally write with social angle . The gazal lovers really liked it ! The love of the viewers at Wai I will remember fovever !

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

मराठी गझल : गाणे


                       गाणे 


भेटल्या खाचखळग्यांचा वाटला आधार होता
हा असा रस्ता निघाला चालण्याच्या पार होता


मी जरी बोलून गेलो शब्द थोडेसेच होतो
लागले होते जिव्हारी...खोल झाला वार होता ...


बोललो नाही कधी मी हया उजेडाची कहाणी
हया उजेडामागचा मी पाहिला अंधार होता


फक्त दु:खानेच केली साथ आयुष्यास होती !
तू कधी माझा सुखा रे घेतला कैवार होता .... ?


जे नको ते छेडले मी ...एकदा गाणे जरासे ...
ओठ माझे पोळले अन् ; कंठही बेजार होता !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

गझल तुझी नि माझी एक आठवण कोल्हापूरची


sadarkarte Abhijat Marathi


शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?

हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?


निकालोत्तर धूमश्चक्री 


गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यात निवडणूक निकालोत्तर धूमश्चक्री चालू आहे . युती म्हणून निवडणूक लढून आणि जिंकूनही दोन मोठे पक्ष मोठा भाऊ छोटा भाऊच्या भाऊबंदकीत अडकले आहेत . यापैकी सर्वात मोठ्या पक्षाने सरकार स्थापनेत पुढाकार घेणे किंवा युतीधर्म म्हणून संपूर्ण युतीनेच पुढाकार घेवून सहजशक्य असलेले सरकार स्थापन करणे अपेक्षित होते .  निकालानंतर दहा दिवस उलटत आले तरी राज्यासमोरचे लोकांचे प्रश्न बाजूला ठेवण्याईतपत कोणते अडथळे आहेत , हे कोणीही जाहीर करीत नाहीत . मी येणार , मी येणारच्या अतीउत्साही आरोळयाही केव्हाच हवेत विरल्या आहेत . अजूनही कोणी वाघ बनतो आहे तर कोणी वनरक्षक बनतो आहे . हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ? कोण गाजराची शेती करतो आहे तर कोण राष्ट्रपती राजवटीचे भीतीयुक्त गाजर दाखवतो आहे . एकूण शिवरायांच्या या महाराष्ट्रात रयतेला राज्यकारभाराच्या पध्दतीचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे ! ही लढाई खरी आहे की लुटूपुटूची आहे , हेही जनतेला कळत नाहीय. निवडणूकीपूर्वी मोठमोठी भाषणे करून जनतेकडे मते मागायची आणि निवडून आल्यानंतर आपसात भांडत बसायचे , हे अनाकलनीय आहे . राजकीय अपरिपक्वतेचीच ही निशाणी आहे . राज्य ही गोष्ट गंभीरपणे घ्यायची असते . कोलांट्या  माकडउडयांसाठी कुणाला दिलेले मोकळे मैदान म्हणजे राज्य नव्हे . राज्यकारभार गंभीरपणे आणि खंबीरपणे करावयाची बाब आहे . त्यासाठी स्थिर सरकार देणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे . वैयक्तिक किंवा पक्षाच्या हीत वा अहंकारापेक्षा राज्य किंवा राष्ट्र नेहमीच मोठे असले पाहिजे .

उशीर होऊ शकतो , पण... 

सरकार स्थापनेला उशीर होऊ शकतो . पण त्याबाबतीतल्या हालचालींचे संकेत तरी लोकांना दिसले पाहिजेत. काही वेळा म्हणे ज्योतिषाला विचारून सत्ता स्थापनेचा मुहुर्त जाहीर केला जातो . पण इथे ठोस तारीख जाहीरच होत नाही . दहा दिवसात दोन पक्षात याबाबत कोणतीही चर्चाच होवू नये , हे संयुक्तिक नाही. दिवाळी असली तर तीही राज्याच्या सर्वात महत्वाच्या कामांसमोर किती दिवस करायची , हाही प्रश्न उरतोच. अती झाले की दिवाळीचाही शिमगा व्हायला वेळ लागत नाही . लोकांनी पारदर्शक वागावे ही अपेक्षा करतांना सरकारनेही तितकेच पारदर्शक असणेही महत्वाचे असते . पारदर्शक राज्यकारभार ही नंतरची गोष्ट झाली . राज्यकारभाराला शुभारंभ नक्की कधी होणार , हे तरी लोकांना वेळेवर कळले पाहिजे . नुसती मतदानाची लोकांना घाई करायला सांगून उपयोग नाही . त्यांनी केलेल्या मतदानाचा योग्य आदर राज्यकर्त्यांकडून झालाच पाहिजे . थोडक्यात , लोकांना अधिकृतपणे माहिती कळलीच पाहिजे . सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी चालविलेली एक यंत्रणा आहे . हया यंत्रणेने निवडून आल्यानंतर लोकांना अंधारात ठेवणे योग्य नाही .


लोकशाहीचे भान 

काही गोष्टी अशा असतात की तुमच्याही नकळत त्या तुमच्याविरूध्द आपोआप साचत असतात. सत्तेच्या धुंदीत वा अती कर्तव्यकठोर झाल्याने तुम्ही त्या केल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाहीत .  तुमची वेळ भरली की त्या तुमच्यासमोर उभ्या राहतात. या देशात लोकशाही आहे , याचे भान सतत ठेवावे लागते . ज्यांनी या देशाचा पाया रचला त्यांना पुढे तुम्ही काय करणार याची कल्पना होती . त्यांनी तुमच्या सगळया चावटपणावर आधीच इलाज करून ठेवला आहे आणि त्याची प्रचिती तुमचा फाजीलपणा वाढला की तुमच्या फाजील आत्मविश्वासाला      जाणा-या तडयातून तुम्हांला येतेच येते . लोकशाही ही कुणाला भीती दाखवून किंवा सतत गाजर दाखवून फार काळ करता येत नाही. ईतिहास नाकारला तर तोच बोकांडी बसतो ! मग सगळे सुरळीत होत असतांना अश्वमेधाचा वारूही रोखला जातो . कमावलेली किंवा नशिबाने लाभलेली ईज्जत पार धुळीस मिळते ! फाजील तोंड आणि फाजील आत्मविश्वास तोंडघशीच पाडतात !


सरकार स्थापन होणे आवश्यक आहे 


आता ही गेलेली ईज्जत मिळवायची झाली तर त्यासाठीही एकच मार्ग आहे . निमूटपणे लोकांना जाहीर सत्य निवेदन करून मुकाटपणे ,  आता अबकी बार वगैरे कुचकामी ठरलेल्या घोषणा न देता , कोणी तरी सरकार स्थापन करणे , म्हणजे लोकांचे काम शत प्रतिशत होईल . तेच होणे आवश्यक आहे .

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

कवितांचा पाऊस आणि मी

जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनी कवितांचा पाऊस!
काव्यसंमेलनाला उत्तम प्रतिसाद; काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
BOI



सविस्तर बातमीसाठी लिंक्ला क्लिक करा : janaseva granthalay ratnagiri new



बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

संमेलनात बरसल्या काव्यधारा!


संमेलनात बरसल्या काव्यधारा!
रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
BOI
जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित काव्यसंमेलनात व्यासपीठावर सहभागी झालेल्या निमंत्रित कवींमध्ये डॉ. स्वप्नजा मोहिते, नितीन देशमुख, देविदास पाटील, रश्मी कशेळकर, जयश्री बर्वे.
अधिक माहितीसाठी खलील लिंकला क्लिक करा
presiding the program