सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

मराठी गझल : आपण

            आपण


जखमेवरती मीठ दुज्याच्या चोळत बसतो आपण

पुन्हा पुन्हा ही एकच संधी शोधत बसतो आपण


ज्याचे त्याचे भविष्य ज्याच्या त्याच्या हाती असते

तरीही ज्योतिष्याच्या नादी लागत बसतो आपण


सर्वज्ञानी स्वतःस समजून आपण बोलत जातो

खुळ्यापरी अकलेचे तारे तोडत बसतो आपण


जिकडे तिकडे माणूस म्हणुनी मिरवत असलो तरी

माणूसकीवर खुनी हल्ले चढवत बसतो आपण


किती चोरटे , किती लफंगे , किती बुवा अन बाबा !

फसूनसुध्दा त्यांच्या नादी लागत बसतो आपण


स्वतः स्वतःच्या निर्मळतेची जाहिरात करतो अन
क्षुद्र मनाची दूषित छिद्रे झाकत बसतो आपण



कंपू करूनी नको नको त्या चर्चा करतो सा-या
नसेल त्याच्या पाठीमागे बोलत बसतो आपण

=====================================

..............

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

देवाला जन्माला घालणारा माणूस


देवाला जन्माला घालणारा माणूस 

देवाला जन्माला घालणारा माणूस मला सापडला तेव्हा मला प्रत्यक्ष देवच सापडल्यासारखे झाले ! मी समाधिस्त असताना, माणसाला जेव्हा भाषा बोलता येऊ लागली त्या काळात भ्रमण करीत होतो . त्या काळात माणूस भाषासंपन्न झाला होता . तो आपले विचार दुसऱ्याला समजावून सांगू लागला होता . एकाचे विचार इतर काहीजण ऐकू लागले होते. त्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडू लागला होता. 


ते एक जंगल होते ....

भ्रमण करताना मला असेच काहीसे चित्र दिसले. मी मानवी स्वभावाला अनुसरून तिथला रस्ता धरला . ते एक जंगल होते . मी पाहिले , एक जण चार माणसांना काही तरी सांगत होता . ते शब्द ऐकू येत असले तरी ती त्या काळची भाषा मला कळत नव्हती .मी विज्ञान युगातला असल्याने भाषायंत्र सुरु करताच मला माझ्या भाषेत सारे कळू लागले .

असंख्यांची जंत्री करण्यापेक्षा एकच बरा..


तो त्यांचा म्होरक्या होता. तो म्हणत होता , " मित्रांनो , हे विश्व फार मोठे आहे . ते कुणी निर्माण केले हे कुणालाच कळलेले नाही . खरे तर अनेकांचा हातभार ह्या निर्मितीला लागला असणार . पण एकाचा वा अनेकांचाही शोध घेणे आपल्याला जमणारे नाही . पुन्हा याचे क्रेडीट घेण्यावरून सुंदोपसुंदी होईल ती वेगळीच ! यातून एक मार्ग आहे . तो म्हणजे , असंख्यांची जंत्री करण्यापेक्षा हे विश्व कुणा एकानेच निर्मिले असे जाहीर करावे असे मला वाटते . "

झाकली मूठ सव्वा लाखाची...


यावर चौघांनी माना डोलावल्या . म्होरक्या पुढे सांगू लागला , " असेही आहे की तो एक कोण आहे , कुठे आहे , कसा दिसतो हे प्रश्न विचारले गेले तर आपल्याला त्यांची उत्तरेही देता येणार नाहीत . यापेक्षा तो अदृश्य आहे असे सांगितल्याने हे सर्व प्रश्न आपोआपच संपुष्टात येतील ! ज्यांना शोध घ्यायचा असेल ते आयुष्यभर शोध घेत राहूदेत ! आपल्यापुरता हा प्रश्न आता कायमचा संपला आहे. हे विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे , तो सर्वशक्तिमान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो अदृश्य आहे , एवढेच आपण सांगायचे आहे . झाकली मूठ सव्वा लाखाची असते , एवढेच लक्षात ठेवा ! काय ? "

यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला दूर निघून गेले . माझ्या रेंजच्या बाहेर असल्याने मला त्यांचे पुढील बोलणे ऐकू आले नाही. पण एक कळले की तो माणूस मानव जातीतला महावस्ताद असला पाहिजे ! माणूस अदृष्याला घाबरतो , अदृष्याच्या नावावर काहीही खपवता येते आणि ते सर्व माना डोलवून मान्य करतात , हे त्याने पक्के जाणले होते .

मी पुन्हा आपल्या काळात आलो . बाहेर पहिले तर तसाच एक माणूस चार माणसांना काही तरी सांगत होता . नीट कान देवून ऐकले आणि मी उडालोच ! हा माणूस स्वत:ला त्या चौघांचा पुढारी म्हणवून घेत होता . हा तर त्या जुन्या काळातल्या महावस्ताद माणसाचाही बाप निघाला होता ! तो त्यांना सांगत होता : " दोस्त हो , परमेश्वर मीच आहे ! तेव्हा माझ्या छत्राखाली या . जे येणार नाहीत ते माझे असणार नाहीत आणि जे माझे असणार नाहीत त्यांचे अस्तित्व सन 2015 नंतर राहणार नाही ! काय ? चला , लागा कामाला ! "

अंधभक्तीची सुरूवात !


गंमत म्हणजे याही " काय ? " वर अनुयायांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ते माना हलवीत त्यांना सापडलेल्या परमेश्वराचा प्रसार करायला निघून गेले ! मित्र हो , ती अंधभक्तीची सुरूवात होती ! 
..............

26.08.2020

वरील लेख 2015 मध्ये लिहिला होता. त्या लेखाशी सुसंगत लेख तंत्रशिक्षण समन्वय या व्हाॅटसअप ग्रूपवर सापडला , तो वाचकांसाठी इथे देत आहे. 

मी तुझा का भक्त होऊ सांग देवा ?
-
ज्ञानेश वाकुडकर 
•••
देव ही संकल्पना ज्या कुणाच्या मनात सर्वात आधी आली असेल, त्याच्या मनात भीती असावी, कुतूहल असावं की कृतज्ञता.. हे नक्की सांगता येणार नाही. पण जेव्हा एखादं फुल उमलताना पाहिलं तेव्हा त्याला देव आठवला असेल का ? एखादा महापूर, एखादं वादळ, निसर्गाचं रौद्र रूप किंवा एखादा भूकंप पाहून त्याला वाटलं असेल का, की ह्या साऱ्याच्या मागे एक अज्ञात शक्ती आहे ? ह्या साऱ्या घटना आपण कंट्रोल करू शकत नाही, म्हणजेच कुणीतरी मोठी शक्ती तिच्या मर्जीनुसार हे सारं घडवून आणते ? हे लक्षात आल्यावर माणसाला वाटलं असेल का, की आपण कुणाच्या तरी हातातील खेळणं आहोत ? अचानक आभाळातून वीज पडते आणि ज्यावर पडते त्याचा बघता बघता कोळसा होऊन जातो, हे बघून त्याला वाटलं असेल का की वर आकाशात कुणीतरी बसलं आहे आणि तीच शक्ती आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्याचा कोप झाला की आग लागू शकते, महापूर येवू शकतो, भूकंप होऊ शकतो ? आणि मग त्याला काहीतरी नाव द्यायचं म्हणून त्यानं देव म्हटलं असेल का ? गॉड म्हटलं असेल का किंवा अल्ला म्हटलं असेल का ? पण पहिला शब्द कोणताही असो, तो निश्चितच निसर्गाला उद्देशून होता या बद्दल शंका नाही !
-
मात्र काळ पुढं सरकत गेला. माणूस अनुभवातून शिकत गेला. त्याबरोबर काही हुशार लोकांना निसर्ग चक्राची कल्पना यायला लागली. त्यातल्याच काही धूर्त लोकांनी मग इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी, आपल्या वर्चस्वासाठी आणि नंतर शोषणासाठी देव या संकल्पनेला जन्म दिला ! आपल्या सोयीनुसार वापरणं सुरू केलं ! पण मुळात देव असो, गॉड असो की अल्ला असो, ही संकल्पना निश्चितच निसर्गासाठी होती ! त्यात काही चूक होती असंही नाही. नंतर मात्र त्यात बदमाशी घुसली. भेसळ झाली. अंधश्रद्धा आली. भुतप्रेत आले. जादुटोणा आला. चमत्कार आले..! एकदा देव आला म्हणजे त्याचा विरोधी पक्षही आला. खरं तर, जग म्हणजे सजीवाच्या जन्मापासून आजपर्यंत अखंड चालू असलेलं अफलातून महानाट्य आहे. माणसानं त्यात विशेष रंगत आणली एवढंच ! असंख्य हिरो, असंख्य व्हिलन, असंख्य पात्र आणि असंख्य नाट्यमय घडामोडी !
-
निसर्ग व्यवहाराचा आधार घेवून देव ही संकल्पना आधी वेगळी काढण्यात आली ! सर्वात आधी देव आणि निसर्गाची फारकत करण्यात आली ! त्याचे नियम, कायदे, कथा माणसांनीच तयार केले ! त्या अर्थानं माणूस हाच देवाचा बाप आहे ! देवानं माणूस निर्माण केला नाही ! माणसानच देव निर्माण केला ! स्वतः माणूस हा निसर्गाची अद्वितीय निर्मिती आहे !  
-
देव आला म्हणजे, मग त्याचा आणि पर्यायानं आपला दरारा कायम राहावा यासाठी धर्म निर्माण केला गेला. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक अशी आमिषं आणि भीती निर्माण केली गेली. अर्थात त्यातले जे लोक सभ्य होते, त्यांनी धर्माचा सकारात्मक वापर केला, जे स्वार्थी होते, कपटी होते, त्यांनी दुरुपयोग केला. धर्म असो की कोणतीही व्यवस्था, त्यात ह्या दोन्ही प्रवृत्ती प्रत्येक काळात कमी अधिक प्रमाणात असतातच ! अगदी अलीकडचीच गोष्ट पाहिली तर ज्यावेळी गरिबापासून श्रीमंतापर्यंत सारा देश एकजूट होऊन इंग्रजांच्या विरोधात लढत होता, त्याचवेळी काही लोक मात्र इंग्रजांची दलाली करत होते. मालगुजारी, वतनदारी मिळविण्यासाठी सारी नीतिमत्ता गुंडाळून बसले होते. देशाशी गद्दारी करत होते ! धर्म हा त्याला अपवाद असू शकत नाही.
-
स्वतःच्या जगण्यातला आनंद शोधतांना आणि इतरांच्या जगण्यात मिठाचा खडा न घालता, साखर घालण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच धर्म..! 
-
देवाचं अस्तित्व मानणारे आणि न मानणारे असे दोन वर्ग जगात आहेत. संतांनी सुद्धा देव आहे म्हणत म्हणत देव नाकारण्याचाच प्रयत्न त्यांच्या साहित्यातून केला आहे. खरा देव माणूस आणि स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे.  पण धूर्त लोकांनी प्रत्येक प्रवाह गढूळ करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. संत, महापुरुषांच्या शिकवणी मध्ये अनेक गोष्टी मुद्दाम घुसवल्या गेल्यात. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात जर एवढ्या खोट्या गोष्टी पसरवल्या जाऊ शकतात, मग तेव्हा तर रानच मोकळं होतं. महात्मा फुल्यांनी सुद्धा देव नाकारताना निर्मिक हा शब्द वापरला. अर्थातच तो निसर्गाला उद्देशून आहे, यात संशय नाही. मला स्वतःला 'उपरवाला' हा शब्द झकास वाटतो. कारण तो दोघांनाही चालू शकतो.
-
अर्थात, निसर्ग हाच आपला सर्वांचा जन्मदाता आहे. तोच सर्वांचा बाप आहे. तोच सर्वशक्तिमान आहे. निसर्गाच्या एका तडाख्यात सारं सारं उध्वस्त होऊ शकते, यात संशय नाही. पण म्हणून त्या भीतीनं मुंगीनं वारूळ बांधूच नये का ? चिमणीनं घरटं आणि माणसानं घर बांधूच नये का ? 

मला मूर्तीमधला देव मान्य नाही. मला व्यक्तिपूजा असो की मूर्तिपूजा मुळीच मान्य नाही. मी कुणाचाही भक्त नाही. होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! मात्र दोस्ती ही माझ्यासाठी सर्वोत्तम आनंददायी गोष्ट आहे ! दोस्ती एकदुसऱ्याला समजून घ्यायला शिकवते ! सहअस्तित्व मान्य करायला शिकवते !  

मला दोस्ती करायचीच झाली, तर निसर्गाशी करीन ! किंवा निसर्गासारखा नितळपणा जिथं जिथं दिसेल तिथं माझ्या मैत्रीला जागा असेल ! खऱ्या अर्थानं निसर्ग हाच माझा देव आहे ! तोच माझा अन्नदाता आहे ! तोच मला तारणारा आहे.. तोच मला मारणाराही आहे ! त्याशिवाय दुसरा कोणताही देव अस्तित्वात नाही, याची मला खात्री आहे. तसा माझा ठाम विश्वास आहे. देव असलाच तर तो माणसात आहे. माणसाच्या सेवेत आहे. करूणेत आहे ! शुद्ध आचरणात आहे ! कुठल्याही पोथीत नाही, पुराणात नाही, पुस्तकात नाही. मंदिरात नाही, मशिदीत नाही, चर्च मध्ये नाही, गुरूद्वारा मध्ये नाही ! कुठल्याही प्रार्थनेत नाही. तो फक्त आणि फक्त आपल्या आचरणात आहे ! प्रार्थना वेगळी आणि आचरण वेगळे, समतेशी विसंगत असेल, कपटी असेल, मनात द्वेष असेल, तर साऱ्या प्रार्थना, साऱ्या प्रतिज्ञा निरर्थक आहेत ! बकवास आहेत !

मी तुझा का भक्त होऊ सांग देवा
वाटले तर छान पैकी दोस्त होऊ !

तूर्तास एवढंच..
-
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
-
( #टीप - माझे सर्व लेख, कविता कुणालाही सोशल मीडिया, प्रिंट मीडिया किंवा अन्यत्र सामाजिक उद्देशाने वापरण्यासाठी, कॉपी करण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी, पाठविण्यासाठी माझी वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. हीच परवानगी समजावी. धन्यवाद. )
-
संपर्क - 9822278988 /  9325589603 /  8055502228 / 9004397917 / 9545025189

...........

#अंधभक्ती

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

स्वभावाला औषध नाही ?

स्वभावाला औषध नाही ...?


माणसे नेमकी कशी वागतील हे सांगता येत नाही . कधीच सांगता येत नाही . एखादा माणूसही कोणत्या वेळी कसा वागेल हे खुद्द तोही सांगू शकणार नाही . #मानवी_स्वभाव हा असा आहे . काय करणार ? 

#स्वभावाला_औषध_नाही . #स्वभाव हा असा आजार आहे की ज्याच्यावर आजही १०० टक्के  औषध   सापडलेले नाही , असे म्हटले जाते. खरे तर , हे खरे आहे का ? हे तपासण्यासाठी मी माझ्याच स्वभावाचा मागोवा घेतला. त्याचीच ही एक गमतीदार गोष्ट ( तुम्हांला म्हणून सांगतो ) ! 

माझा स्वभाव कसा होता ?

एकाच शब्दात सांगायचे तर भित्रा होता ! समजायला लागले तेव्हापासून भीती मला ओळखत होती आणि भीतीला मी ओळखत होतो ! सगळ्यात पहिली वडिलधाऱ्यांची भीती होती ; त्यातही खुद्द आईची भीती सर्वात जास्त होती ! ती अतिशय कडक होती . शिस्तप्रिय होती. तिनेच मला त्या काळात वयोमर्यादेपेक्षा शाळेत लवकर घालण्याचा हट्ट धरला होता. मुख्याध्यापकांनी तो अमान्य केला व माझा शाळा प्रवेश एक वर्षाने लांबला. पण तिने मला घरीच शिकवायला सुरूवात केली ! ती केवळ दुसरी शिकलेली होती पण मी दुसरीत असतानाच बाहेरगावी नोकरी करीत असलेल्या माझ्या वडिलांना पत्र लिहू लागलो होतो , इतके तिने मला  छान शिकवले होते ! म्हणजे , स्वतःजवळ जे आहे त्याचाच पुरेपूर वापर केला तर माणूस खूप काही करून जातो ! आईची भीती असूनही मी तिच्याकडूनच शिकलो !

शैक्षणिक धोरण बदलले !


पुढे शाळेत शिक्षकांची भीती वाटायची. कोपऱ्यात उभी केलेली छडी माझ्याकडेच डोळे वटारून पाहतेय असे सारखे वाटायचे ! त्यामुळे शिक्षक प्रश्नं विचारू लागले की मी आधीच #छडीग्रस्त झालेलो असायचो ! त्यांनी फक्त शिकवावे , प्रश्न विचारूच नये , असे मला वाटायचे. पुढे फक्त शिक्षण असावे , परीक्षा असूच नये असे यामुळेच तर मला  सारखे वाटायचे . (  पुढे माझे हे मत चाळीस एक वर्षांनंतर मायबाप सरकारला अखेर पटले व सरकारने परीक्षारहीत धोरण स्वीकारल्याचेही मला पहायला मिळाले ! आता पुन्हा पाचवी ते आठवीची परीक्षा घेणार असे या जून २०२३ मधले ताजे वृत्त आहे ! ) . पण शिक्षणाची भीती असूनही मी वाणिज्य शाखेचा पदवीधर होईपर्यंत शिकलो !

भीती बालमित्रांची ...😀😀😀


खरे तर , अगदी बालवयातच मला माझ्या बालमित्रांचीही भीती वाटायची. अगदी खेळतांनासुध्दा ! मी लहानपणापासून इतरांपेक्षा किरकोळ प्रकृतीचा . शिवाय मागच्या बाजूचे माझे शेजारी मित्र पटकन एक व्हायचे. एकदा तर खेळता खेळता चक्क गंमत म्हणून सहा सात जण माझ्या अंगावर पडले. मी म्हणजे एकदमच जमीनदोस्त झालो होतो. जमिनीशी माझी ही दोस्ती जुनीच ! मी पटकन पडायचो. बरेचदा ढोपरं फुटायची . ढोपरं फुटणे हा वाक्प्रचार तरुणपणी वेगळाच ठरतो , हे कळायला मला बरीच वर्षे लागली होती ! तर मी जमिनीवर पालथा पाडला गेलेलो , ते सगळे मला आणखीन चेपू लागलेले , माझा श्वास कोंडू लागलेला आणि उठण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत असलेला....एवढासा मी ...माझे अस्तित्वच संपू लागलेले...तेवढ्यात  काय झाले कोणास ठाऊक , बहूतेक कोणीतरी मोठे जवळपास आले असावे , तयामुळे की काय कोण जाणे , पण ते खिदळत उठले ! त्यांना माझे खाली काय होत होते हे कळलेच नव्हते ! त्या अजाण , निष्पाप , आडदांड बालकांना तो सगळा खेळच वाटला होता. त्यांचा खेळ होत असतांना माझा जीव जात आला होता . विशेष म्हणजे हे त्यांच्या गावीच नव्हते. तर त्या प्रसंगाने माझ्या गावातल्या शेजारच्याच बालमित्रांची भीती माझ्या मनात खूप लहानपणीच बसली होती ! तरीही मी पुढे अनेकांचा मित्र झालो , अनेकजण माझे मित्र झाले ! 

हायस्कूल आणि काॅलेजमध्येही मला माझ्या किरकोळ प्रकृतीमुळे पी.टी.चा तास म्हणजे शिक्षाच वाटायची. इतकी पी.टी. शिक्षकांची मला भीती वाटत असे. तरी पण मी त्यांच्या सांगण्यानुसार कसरती करून मोकळा झालोच की !  गणिताची भीती तर सुरूवातीपासूनच होती पण चक्क कवितेची भीती माझ्या मनात दुसरी तिसरीपासूनच निर्माण झाली होती ! तरीही मी नवव्या इयत्तेतच कविता लिहू लागलो ! त्याहीपुढे जाऊन मी गुरूवर्य सुरेश भट यांची मराठी गझल लिहू लागलो आणि गेली अडतीस वर्षे गझलकार म्हणून माझ्यावर शिक्काच बसला ! 

आता मला सांगा...


भीतीचे असे अजूनही कित्येक किस्से माझ्या रोज धडपडत्या आयुष्यात घडले आहेत , घडत आहेतही ! भीती वाटणे हा माझा जणू स्वभावच होऊन गेला होता ! असे असले तरी हा चुकीचा स्वभाव आहे हे ओळखून मी प्रत्येक भीतीवर मात करीत आलो आहे ! स्वभावाला औषध नाही असे कोणी कितीही म्हटले तरी मी माझा स्वभाव बदलला आहे ! स्वभाव नक्कीच बदलता येतो , एकदा तुम्ही ठरवलेत आणि ठरविल्याप्रमाणे वागू लागलात की स्वभाव सहज बदलून जातो ! मला सांगा , आता तुम्हांला स्वभावाला औषध नाही असे म्हणावेसे वाटते का ? 😀😀
(२८.०६.२०२३ सायंकाळी ०६.००)

#मनुष्य_स्वभाव

#स्वभाव_meaning_in

#मानवी_स्वभावाचे_प्रकार

#मानवी_स्वभाव_कसा_ओळखावा

#स्वभाव_आणि_यश


रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

पुन्हा सुरूवात


आज २३ नोव्हेंबर २०१४. 


हे मना, 
आपण कसे कसे तुटत गेलो , पुन्हा पुन्हा कसे कसे जुळत गेलो , हे तुला चांगलेच माहीत आहे ! 
कालपासून तुटलेले दुवे जोडायला आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली !

आपल्या जुन्या ब्लॉग्जवर नव्याने लिहायला सुरुवात केली ! आपण लिहिता लिहिता जुळत गेलो ! एकसंध होत गेलो !

आपण एकसंध होत गेलो, हे किती बरे झाले ! फारच छान ! आनंद वाटला ! 

पुन्हा आपण आपल्याला भेटलो ! आपण आपले झालो !

पुन्हा सुरुवात .....

आज देवदिवाळी किंवा देवदीपावली ! 

शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरात देव फुलांनी सजले आहेत ! 












आपण या शुभ दिनी साहित्य शारदेला शब्दफुलांनी सजवूया !

सर्वांना शुभेछा देवू या !

#देवदिवाळी

#देवदीपावली







मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

आपल्याला कळले नाही

आपल्याला कळले नाही !


आपले कर्तृत्व थिटे पडते . मग आपण आपल्याभोवती एक सुरक्षित कवच निर्माण करू पाहतो . एक तर आपण पांघरूण घेवून झोपतो किंवा चवताळून उठतो आणि एक प्रतीसृष्टी -आपली सृष्टी - निर्माण करू पाहतो . वसिष्ठ ऋषींचे काहीसे असेच झाले असावे. त्यांनी प्रतीसृष्टी निर्माण केली . आपण ? आपण ना  पांघरूण घेवून झोपू शकलो , ना  प्रतीसृष्टी निर्माण करू शकलो . आपल्याला आपला मार्गच सापडला नाही ! आपला शोधही अपूर्णच होता . त्यात जगाची हुशारी नव्हती ; स्वार्थकेन्द्री वृत्ती नव्हती !

निसगार्चे अवलोकन


आपण आठव्या इयत्तेतच निसगार्चे अवलोकन करायला गेलो. तिथेच थांबलो नाही तर त्यावर लेखन करू लागलो ! निसर्गातल्या माणूस सोडून सर्व घटकांची भूल आपल्याला पडली ! माणसे भेटली . तात्पुरती भेटली . पण माणूसपण आधीच वजा झाले होते. ना कुणाचा विश्वास वाटला ; ना कुणाची खात्री ! चूक आपलीच होती. आपला दुबळेपणा आपल्याला नडला. त्याचेही भांडवल करता आले नाही . मूळात आपले काही भले करायचे असते हेच मुळी आपल्याला कळले नाही ! परिस्थितीचे अचूक भान आपल्याला कधीच आले नाही .

भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ  !


जगात भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ असतो हे आपल्याला कधीच कळले नाही .आपण दैवते पुजत बसलो ! तन, मन, धन अर्पून बसलो . तिकडे जगाने त्याच दैवतांचे बाजारीकरण केले . स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:चे कायदे केले ! दैवतांना जाणीवपूर्वक मोठे करता करता जग स्वत:च मोठे होऊन गेले ! ते खरे व्यवहारचतूर !


सोडवणारा वाईट ठरतो !

 
कळायला लागल्यापासून आजी आणि आई मधली भांडणे मिटवायची सवय आपल्याला नडली. घरातले वेगळे दारातले वेगळे हे आपल्याला कळलेच नाही ! आपल्याला वाटायचे निदान आपल्या आसपास तरी भांडणे असता नयेत. सर्वांनी गोडीगुलाबीने रहावे . पण शेवटी त्या भांडणाऱ्या माणसांचीच गोडीगुलाबी होते आणि सोडवणारा वाईट ठरतो, हे आपल्याला कळले नाही . दोघांच्या भांडणात पडून आपण आपले तोंड फोडून घेतले . ते लबाड स्वार्थी ; आपण निस्वार्थी मूर्ख !    माझ्या एका गझलेच्या शेरात मी काहीसा असाच व्यक्त झालो आहे :

          आयुष्यभर मी माझा भाबडेपणा जपला
           मी टग्यांशी लढाई नेहमी हरलो होतो !

तो म्हणाला गॅस एजन्सीकडून आलोय !


मला कोणाचेच अंतरंग कधीच कळले नाहीत . त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा , कुणावर ठेवू नये , याचे जलद राहुदेत , पण कुणी फसवून गेल्यावरही त्याने आपल्याला फसवले आहे , याचे सावकाशपणीही आकलन झाले नाही . माझ्या वडीलांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी संध्याकाळी एक तरूण माझ्या घरी आला . गॅस एजन्सीकडून आलोय म्हणाला . मला खरंच वाटलं . त्याने सिलेंडरच्या खाली ठेवण्याची ट्राॅली दाखवली . तिचे उपयोग पाहून शेजारपाजारच्या लोकांनी ब-याच  ट्राँलीज घेतल्या , असं सांगून त्याने दोन नग माझ्या गळ्यात मारले आणि हजार रूपये घेऊन तो गेला पण ! तरी मी त्याची ती कंपनी कुठली होती , हेच त्याला का विचारले नाही याचाच विचार 
करीत किती तरी वेळ  बसलो होतो . तो गॅस एजन्सीकडून आला होता का किंवा त्या ट्राॅलीज कोणत्या कंपनीच्या आहेत , याचीही विचारणा मी केली नव्हती ! असा मी ....

जीवनाच्या महाभारतात मी गोंधळून गेलो... 
जग कुठले कळणार जिथे ; मलाच मी कळलो नाही ! 

#महाभारत

#जीवनाचे_महाभारत

#mahabharat

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

कोणीतरी आहे तिथे

                     चाहूल  ...

सारे मजेत चालले होते . कालपर्यंत . तसे आज थोडेसे बिनसले . आपली मनात शंका येते ना ! पुन्हा ग्रह फिरले की काय ? पुन्हा संकटांची सुरूवात ? जरा आपण काही ठीक केले की कुठेतरी बिनसते . असे तरी का व्हावे ? सतत सगळे सुरळीत का चालू नये ? नवे प्रसंग , नवी वाट , नवी लढाई की काय ? आपले मनात येते. बाकी तसे ठीक आहे. फारसे बिघडले नाही . थोडी चाहूल मात्र लागली. पाहूया काय होते ते . . .


निराळा अनुभव 


नाही . वाटले होते तसे आणि तितके काहीच वाईट झाले नाही. उलट परिस्थिती माझ्याच हातात आली ! तसा हा अनुभव मला तरी निराळाच आहे .  अनेक वर्षे झाली . सुखाची साधी चाहूलही लागली नव्हती . आता सुख बरेचसे मला ओळखू लागले आहे. प्रथम आपण स्थिर होणे आवश्यक आहे. ईश्वर तेही करीलच . त्यानेच तर एवढे केले आहे. मी प्रथमच त्याचा मनापासून आभारी आहे. शेवटी त्याच्याशिवाय आपले कोणी नाही . तो तर सर्वांचाच आहे.

तीन महिन्यानंतर :


तीन महिन्यानंतर थोडासा वाईट अनुभव आला . पण प्रसंगावर प्रसंगावधानाने मात करता येते हेही आपण अनुभवले ते त्या ईश्वरामुळेच ! ईश्वर सर्वाना सद्बुद्धी देईलच ! काही वेळा कळत नाही.  खरंच कळत नाही.  आपल्या हातात काहीच नसते,  असे वाटते. आपण फक्त पुढे जात रहायचं . आपले आयुष्य आपले असतेच कुठे  ? म्हणजे आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच ! कोण घडवतो हे सगळे ? दिसत नाही पण कोणी तरी आहे तिथे ! त्यालाच आपण ईश्वर म्हणतो का ?

२० जून , २०२३

ये रे माझ्या मागल्या 

अनेक वर्षांनंतर असे अनुभव येत आहेत की ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच मनात शंका निर्माण होत आहे. शंकाच काय , दोन तीनदा तर खात्रीच होत गेली.... पण पुन्हा आपले ये रे माझ्या मागले होत आहे ! आपण केवढे , विश्व केवढे ! आपल्याला यातले नक्की काय कळते ? हा जो अज्ञानीपणा आपण घेत आहोत ना तो चिकित्सकपणाला आणि संशोधनाला मारक ठरतो आहे . पण आपण तरी काय करणार ? काय ते नक्की होत नाहीय. असलाच परमेश्वर तर त्याने यावे की समोर ! तो असा लपून का बसला आहे ? जीवनात इतकी उलथापालथ होत असतांना तो कुठे झोपून राहिला आहे , हेच कळत नाही. चांगले वागा , वाईट वागा , जीवनात दु:खं आहेच ! शांती करा , नवस बोला, काहीही करा , भोग टळता टळत नाहीत ! अशा वेळी ज्याचा #आधार घ्यायचा तोच बेपत्ता ! त्या अज्ञाताची #KYC कशी करायची ? तो आहे तर संभ्रमात का टाकतो आहे ? की त्यालाही कधी प्रगट व्हायचं हा संभ्रम पडलाय ? त्याचाही ये रे माझ्या मागल्या झालाय ?  आपला मेंदू माणूस म्हणे दहा टक्केच वापरतो. पण मग नव्वद टक्के कुठे लपून राहिलाय ? तो कसा कळणार ? त्याला कुठे शोधायचे ? की नुसतेच म्हणत बसायचे : कोणी तरी आहे तिथे ! खरंच का आहे तो तिथे ? दिसला , भेटला कधी तुम्हांला तर सांगा मला !

#kyc


#kyc_of_god


#kycofunknown


#somebody_is_there


#कोणीतरीआहेतिथे

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

मना तुला सलाम !


माझ्या मना, तुला सलाम !


आता असे काही विशेष नाही. पुन्हा केव्हातरी बघू.  भेटू.  बोलू.  थोडं विचित्र  वाटत असेल पण त्याला इलाज नाही. काही काही वेळेला हे असेच असते. त्याला तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार ? बरोबर ना ? हुशार  आहेस. बरोबर ओळखलंस. . . . . .


एक वर्षानंतर :

आपण दोघे आहोतच कुठे ?

माझ्या मना , एक वर्षापूर्वी मी हे तुझ्याशी बोललो होतो ! एक वर्षानंतर आपण इथे  भेटतोय ! तसे आपण खूप ठिकाणी सतत भेटत आलोय . आपण दोघे आहोतच कुठे ? आपण एकच तर आहोत. हे माझ्या मना , एक वर्ष आपण ह्या पोस्टवर भेटलोच नाही . पण आपलं स्वगत चालूच होतं ! अनेक प्रसंग या दरम्यान आले . बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले . आपण दोघांनी ते मिळून पहिले ! अनेक  विसंगत बाबी आयुष्यात आल्या . आपणच त्या सुसंगत करीत गेलो ! अश्यावेळी तुझी साथ नसती तर ? माझे एकट्याचे काय झाले असते कोणजाणे ! पण तू सतत सोबत राहिलास ! अनेकदा मी नाउमेद झालो ! खचून गेलो ! डोळ्यात पाणी भरून आले ! पण तू धीर दिलास ! समजावलेस ! खरेच मी तुझा किती आभारी आहे याची कदाचित तुलाही कल्पना नसेल !

शनीच्या साडेसातीतले ते दिवस


शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होतो ! खूप खोल घाव झाले होते ! पण माझ्या बरोबरीने तू ते सारे सोसलेस ! तू  माझा सखा झालास . तू माझा परमेश्वर झालास ! माझे  प्रत्येक खचणारे पाऊल तू उचलून धरलेस ! कधीही तोल जाऊ दिलास नाही !  हे माझ्या मना , केवळ तू होतास म्हणून मी तरलो !

तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता . त्यातला गेल्या वर्षभरातला कालावधी तर अंत पाहणारा होता .  पण तुझ्या सोबतीने हा सारा प्रवास बराच सौम्य झाला ! आज १२ नोव्हेंबर २०१२ . दिवाळीचा आधला दिवस . ह्या पवित्र दिवशी , माझ्या मना, माझा तुला सलाम !


.............

सहा वर्षांनंतर....


आज 30.01.2018 ! सहा वर्षांनी मनाला पुन्हा सलाम करावासा वाटला ! 24.01.2018 ला 11.00 , 11.15 च्या दरम्याने माझ्या आईचे निधन झाले . ती नव्वद वर्षे जगली . वडील गेल्यानंतरही 17 वर्षे ती माझ्या सोबत होती . खरे तर , माझ्यापेक्षा माझ्या पत्नीच्या सोबत होती ! माझ्या पत्नीचे आणि तिचे नाते सासू सुनेचे कधीच नव्हते ! माझ्या लग्नाला 27 वर्षे झाली . एवढ्या वर्षात सासू सुनेची भांडणे झालीच नाहीत , असे स्वप्नवत विधान मी करणार नाही . माझी आई तशी कडकच ! पण माझ्या पत्नीने तिकडे पूर्णपणे कानाडोळा करून तिला माया लावून बरीच नरम केली होती . आई , आई म्हणून तिने आईला आपलीशी केली होती . संपूर्ण गावात सून कशी हवी , याचं उदाहरण म्हणून लोक माझ्या पत्नीचं नांव गेली कित्येक वर्षे घेत होते. तेव्हा आईच्या जाण्याचा धक्का तिलाच अधिक बसला . जाण्याच्या आदल्या रात्री आई यमयांतनांनी विव्हळत होती . ते बघून पत्नीला ताप आला . आजपर्यंत ती त्यातून सावरलेली नाही . 23.01.2018 च्या रात्रीपासून आजपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा नाही !  मना , तू सोबत आहेस म्हणून मी उभा आहे . म्हणूनच , तुला सलाम !

.......

०७ जून , २०२३ सकाळ ०९.२४


मी पूर्वी लिहिले होते : 

शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होतो ! खूप खोल घाव झाले होते ! ... आणि ...

तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता.‌

आणि आता...

त्या भयानक कालखंडातून बाहेर पडलो खरा... पण ....

आगीतून फुफाट्यात....


त्याहूनही खराब कालावधी सेवानिवृत्तीनंतर आला ! ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मी सेवानिवृत्त झालो ! नोकरीचा तो निरोपाचा क्षण... वाटलं आता आयुष्य साधं , सरळ, सहजसोपं जगता येईल. पण तसं व्हायचं नव्हतं...

आतापर्यंत तसं आयुष्य सरळ चाललच नव्हतं. पण आता नोकरीतील दगदग संपली होती. उशिरा का आलात , लवकर का चाललाय , रजा कशाला हवी , असले प्रश्नं आता तरी कोणी विचारणारे नव्हतं. तुम्हांला अमक्या ठिकाणी जावंच लागेल , तुमची तमक्या ठिकाणी बदलीच करतो , असंही धमकावणारं आता कोणीच नव्हतं. त्यामुळे मला हवं तसं निवांत आयुष्य आखता येईल आणि त्यानुसार चालता येईल , असं वाटलं तर वावगं नव्हतं. बरोबर ना ?  फार मोठ्या अपेक्षा नव्हत्याच , फार हौसमौज करायची नव्हतीच . पण किमान मुलाचं चांगलं लग्नं करावं , चांगल्या घराण्यातील, सालस पण खमकी , व्यवहारी सून मिळावी , आमच्या सारखीच हसून खेळून रहावी , घराचे गोकुळ व्हावे , हीच साधी अपेक्षा होती. पण... हाच गळ्याचा फास होऊन बसला....

मुलाची निवड त्याच्या आईला मान्य नाही. त्याने विचारताक्षणीच , हे होणार नाही , ही काळया दगडावरची रेघ आहे , हे तिचे उत्तर होते ! त्याला आता चार वर्षे झाली . या चार वर्षांत एकही क्षण खऱ्या अर्थाने सुखाचा झालेला नाही.  

गेली चार वर्षे घरात दोन विरूध्द प्रवृतींना सांभाळत जगतोय . कधी दोघांना फटकारून भानावर आणावं लागतं , कधी आंजारागोंजारावं लागतं... तर कधी दोघांनाही उमेद दयावी लागते. उभारी द्यावी लागते. उभे करावे लागते. पण मी ? मी कसा उभा रहात असेन ? मला कोण उभा करीत असेल ? 

अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या दोन ओळी सतत आठवत राहतात : 

माझ्यात बांधल्या मी साऱ्या अजिंक्य भींती
माझी मला दिली मी सारी इथे उभारी !


इथे हे मना, मी म्हणजे केवळ मी एकटा नव्हे ! तू सोबत आहेस ! बुध्दी साथ देते आहे आणि शरीर हे सर्व सहन करते आहे. पण हे मना , तू खंबीर आहेस , म्हणून मी उभा आहे ! तुला पुन्हा एकदा सलाम ! 

थोडं अधिक अवघड झालं आहे 

आज २९ जून , २०२३ .‌ आज पायाचा पट्टा डाॅक्टरला दाखवण्यासाठी सौ. ला दवाखान्यात न्यायचे होते. पण सकाळपासूनच धुंवाधार पाऊस सुरू झाला तो तू पाहिलासच. तीही म्हणाली आज नको जाऊया. तू हेही ऐकलंस .‌ आपण दोघेही घरीच थांबलो मग. पण माझी कमरदुखी आज वाढलीय. हे प्रकरण आता थोडं अधिक अवघड झालं आहे. हे कधी बरं होणार ? मला हिंडता फिरता येणार नाही का ? कुठेच प्रवास करता येणार नाही का ?  माझ्या मना ,  तू खंबीर रहा. मला लुळं पडायचं नाहीय.‌ 


#salute_to_mind

#mostpowerfulmind

#mindispowerful

#मनाला_सलाम

#मन

#मन आणि शरीर
 
#मनाचे आरोग्य

#मनशांती

#मनाची शक्ती

#मनाचे विचार

#भावनांचे व्यवस्थापन

#मनाचे तंत्र

#स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

#जीवनशैली आणि मन

#आत्मपरीक्षण