गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

कशामुळे काय घडते ?


कशामुळे काय घडते ?


           हे विश्व निर्माण झाले ही जर विश्वातली पहिली घटना मानली तर त्या क्षणापासून घटना घडायला सुरूवात झाली असे म्हणता येते. यानंतर दुसरी , तिसरी , चौथी , पाचवी अशाप्रकारे क्रमाने घटना घडल्या की एकाच क्षणाला काही घटना एकदम घडल्या ? जर घटना क्रमाने घडत गेल्या असतील तर त्यामध्ये काही परस्पर संबंध होता की प्रत्येक घटनेचे घडणे स्वतंत्र होते , हेही प्रश्न उपस्थित होतात. कदाचित सुरूवातीला प्रत्येक घटनेचे घडणे स्वतंत्र होते असेलही आणि कधी तरी घटनांमध्ये परस्पर संबंध निर्माण झाले असण्याचीही शक्यता वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असतेच. कारणाशिवाय काही घडत नाही असे म्हणतात. थोडक्यात, एक घटना दुस-या घटनेच्या घडण्याला कारणीभूत होत असली पाहिजे. म्हणजेच, एका घटनेतूनच दुसरी घटना जन्म घेत असावी , असे वाटते. अशाप्रकारे, घटनांचे एक चक्र चालू झाले असावे , जे काळ फिरवत असावा. घटनांच्या ह्या चक्रालाच कालचक्र म्हटले गेले असावे. याचाच अर्थ, एक घटना घडली की तिच्यातून दुसरी , दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी अशा असंख्य घटना घडत असल्या पाहिजेत. जर घटनांचा क्रम , त्यातला परस्पर संबंध व कार्यकारणभाव माणसाला निश्चितपणे समजला तर पुढे होणा-या घटनांचे आकलन होवून माणूस सावध होईल व काही उपाययोजनाही करू शकेल. याबाबतीत जगभरातील शास्त्रञांनी व ज्योतिषांनीही अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.    

             

 विश्वातील वैशिष्ठ्यपूर्ण घटनाक्रम


               आपण ज्याला विश्व म्हणतो किंवा निसर्ग म्हणतो त्यात हा जो क्रम आहे तो निश्चितपणे न समजल्याने अनेक अडचणी येतात. नुकसान होते. हा क्रम एका गणितीय मांडणीत बसला असता तर निश्चित असे काही हाती लागले असते. कदाचित तो मूळातच गणितीय मांडणीत असावा पण मानवाला अजून ही गणितीय मांडणी सापडली नसावी. जर ती सापडली तर अनेक समस्यांवर उपाय करता येतील. काही वेळा काही चांगल्यावाईट घटनांची सुरूवात ही आपल्याच मनात होत असते. विशेषतः वाईट गोष्टींची होणारी सुरूवात लक्षात घ्यावी लागेल. याचे कारण वाईटाला असलेली अधिकची तीव्रता आपल्या अंतरमनाला फार भीडत असावी आणि म्हणूनच की काय मनात वाईट आले तर ते प्रत्यक्षातही फार लवकर घडते. कधी कधी एखादा विचार मनात येतो आणि काही वेळातच तो प्रत्यक्षातदेखील येतो. इतकेच नाही तर त्या घटनेपासून अनेक घटना क्रमाने घडत जातात. मन चिंती ते वैरी न चिंती असे का म्हटले जाते , ते मी स्वतः अनुभवले आहे. मी तेव्हा नोकरीत होतो. एके दिवशी चारच्या सुमारास हातातले काम संपले म्हणून जरा खुर्चीत निवांत बसलो होतो. क्षणात अचानक मनात विचार आला की आपले कसे बरे चालले आहे. अलिकडे काही वाईट घडलेले नाही. पुढ्च्याच क्षणी मी चपापलो . भानावर आलो. आपण वाईट घडले नाही म्हणून चुकचुकलो तर नाही ना ? ते खरेच होते आणि केवळ दीड तासात मला मुंबईहून मित्राचा फोन आला. माझ्या बदलीचे आदेश बाहेर पडले असून पाच मिनिटातच ऑफिसला फॅक्स पाठवला जातोय. पाच मिनिटात तो आलाही. त्यावेळी मला बदली नको होती. मी घराचे कंपाऊंड करायला दोन दिवसातच सुरूवात करणार होतो आणि इतरही कामे होती. मी कंत्राटही दिले होते. पण बदली झाल्याने मला ते सर्व काम पत्नीवर सोडून जावे लागले होते. घरात माझी आई , पत्नी व मुलगा होते. मुलगा तर खूपच लहान होता. घरात अन्य कोणी मोठा पुरूष माणूसही नव्हता . वेळ अशी होती की एक तर बारा वर्षांनी मला बढती मिळत होती. बदलीचे ठिकाण दूर आणि जंगलात वसलेल्या एका खेडेगावात होते . तिकडे भलतेच झाले. कामाची पध्दत आणि प्रामाणिकपणा पाहून साहेब माझ्या प्रेमात पडले. त्यांनी सहा महिन्यांशिवाय बदलीचा अर्जच वरिष्ट कार्यालाकडे पाठवणार नाही म्हणून सांगितले. ईश्वरकृपेने मी केवळ पाचच महिन्यांत बदलून आलो . पण ते पाच महिने मला खूप त्रासाचे गेले. प्रत्येक क्षण मी परमेश्वराची मनोमन मनधरणी करीत होतो व अखेर त्याने ऐकले होते. पण आदेश येवूनही ते साहेब मला सोडायलाच तयार होत नव्हते. आणखी किमान दीड दोन महिने तरी मी त्यांना तिथे पाहिजे होतो असे त्यांचे म्हणणे होते. मी नंतर कामाला काही काळ येईन पण मला आता सोडा असे मी खूप सांगून पाहिले. मला तो ताण सहन होईनासा झाला होता . अटॅक येईल की काय असे वाटले होते. अखेर त्यांनी माझ्या दोन वरिष्ठ अधिका-यांची अर्धा तास मिटींग घेतली . त्यात मला आता सोडायचे व मागाहून कामाला बोलवायचे असे ठरले. खुद्द साहेबांनी येवून मला हे सांगितले. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. एकातून दुसरा व दुस-यातून तिसरा अशी वाईट प्रसंगांची साखळी अशा वेळी तयार होते . फार विचित्र घटना घडतात. ते एक दुष्ट चक्र असते.

           आणखी एक उदाहरण

          
काही वेळेला कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा योगायोग होतोही. शिवाय , तुमची मनःस्थिती नेमकी त्यावेळेला कशी आहे त्यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. मात्र, काही वेळेला काही गोष्टी क्रमाने घडतात हे नक्की ! पहिल्या घटनेनंतरच दुसरी घटना घडते अशा वेळी मात्र त्या दोन गोष्टींचा काही ना काही संबंध असूही शकतो. इथे प्रत्यक्ष माझ्या जीवनातले आणखी एक उदाहरण देतो. मला अशा गोष्टी पटत नसूनही एक विचित्र अनुभव आला होता. सन २०१४ मध्ये मी घर बांधायला घेतले होते. त्यावेळी प्लॅस्टर करणारे शोधत होतो. कोणी मिळत नव्हते. एके दिवशी एकाने एक सुचवला. मी फोन केला तसा तो त्याचे दोन साथीदार आले. चर्चा करता करता मी त्यांना घर दाखवायला जात असतांनाच आमच्या दारात एक विचित्रसा काळा कुत्रा आम्हांला आडवा गेला. क्षणभर त्याची माझी नजरानजरही झाली. त्याच्या डोळ्यांचा रंग बदलून तीव्र गडद पिवळा झाल्याचे मला दिसले . मला त्या नजरेत काही तरी विचित्र जाणवलेही. त्याच क्षणी त्या लोकांना कंत्राट देवू नये अशी भावनाही मनात निर्माण झाली. पण इतके होवुनही माझ्यापुढे मला पर्याय दिसल्याने मी त्यांना ते कंत्राट दिले व वर रू. २०००० ॲडव्हान्सही दिले.     दुस-याच दिवशी सकाळीच त्याचा फोन आला की त्याच्या शेजारीच प्रेत झाले आहे त्यामुळे उद्या येतो. मी म्हटले ठीक आहे. दुस-या दिवशी त्याची भावजय घरात पडली आणि तिला कोल्हापूरला न्यावे लागल्याचा फोन आला. ते चार पाच दिवस तसेच गेले. आठवड्याने ते लोक आले आणि काम सुरू झाले. मी निश्वास सोडतोय तोच त्यांची मशीन सतत बिघडू लागली. ती शहरात नेवून दुरुस्त करून आणावी लागली. त्यातच कामापेक्षा त्यांची सतत बडबडच चाललेली असायची. प्लॅस्टरही खराब होत होते. शेवटी मी त्यांना झालेल्या कामाचे पैसे विचारले चार हजार कमी देवून घालवून दिले. उरलेले काम मी दुस-याकडून पुर्ण करून घेतले ! हे नक्की त्या कुत्र्याने मला नजरेतून सूचित केले असावे का ? काही कळत नाही. अजूनही निसर्गातला घटनाक्रम आपल्याला निश्चितपणे समजलेला नाही. कशामुळे काय होते हे समजलेले नाही. हे समजल्याशिवाय निश्चितपणे नेमके भाष्य करणे उचित वाटत नाही

२ टिप्पण्या:

Vasundhara Jadhav म्हणाले...

सुंदर लेख

DEVIDAS PATIL म्हणाले...

मनापासून धन्यवाद मॅडम ! तुमचे दोन्ही ब्लाॅग्ज वाचल ! तुम्ही खूपच सुंदर लिहिता