मंगळवार, २५ जून, २०२४

लोकांचं काय राव ...

लोकांचं काय राव ...


लोकांचं काय राव , लोक बोलून जातात... आपण ते खरं धरून बसतो ना ! पण खरं तसं नसतंच. कधी आपल्याला बरं वाटावं , दिलासा मिळावा म्हणून‌ तर कधी ही बला टळावी म्हणून तोंडदेखलंही लोक बोलतात... पण चूक आपलीच होते ना भाऊ ! आपण आपल्याच मूर्ख समजुतीपायी आपला प्रश्न आता नक्की सुटणार हेच स्वप्नरंजन करत राहतो ! मनात मांडे खात राहतो. पण पुढच्याच क्षणाला लोक दुसरीकडेच वळलेले असतात. आपण पुन्हा आपल्याच प्रश्नांच्या खोल गर्तेत फेकले गेलेलो असतो. दुनिया स्थिर नाही . सतत बदलत राहते हे आपल्या गावी नसते, लोक रिकामटेकडे नसतात, त्यांना त्यांचे आयुष्य असते, प्रश्न असतात, उद्योग असतात. त्याला लोक तरी काय करणार ? तेही जागा बदलतात. शब्द बदलतात. अनेक गोष्टी बदलतात. पण आपण आपल्याच कोषात असतो ना महाराजा ! आपला भाबडेपणाच मारतो आपल्याला. आपण समजतो तसे जग नाही चालत. जगाचा व्यवहार नाही चालत. आपण भावनेचे बुडबुडे बनून आपले आपणच फुटत राहतो.‌ बुडत्याला काडीचा आधार शोधत राहतो. पण जग आपला आधार आपणच तयार करते हे लक्षातच येत नाही आपल्या. आपण आपल्याच डोळयांवर आपलीच झापडे ओढून बसतो. कोणी तरी येईल आणि आपल्याला मदत करील म्हणून वेडी आशा लावत बसतो. स्वतःला फसवत बसतो. हे फसवणं आता सोडलं पाहिजे. जगरहाटीचं अनुकरण तरी केलं पाहिजे. तुमचा काय सल्ला आहे मित्रांनों... ?

जगरहाटी काय आहे ?

तसं उद्याचा विचार यावर अधिक विचार करायची गरज नाही. मी हल्ली इतर ठिकाणच्या कार्यमग्नतेमुळे व्हाॅटस अॅपवर क्वचितच असतो. ( मी एवढं काय करतो कोण जाणे ! ) कधी कधी खूपच जिवाभावाच्या मित्रांच्या संदेशांना प्रतिसाद देतो मी. तोही अलिकडे क्वचितच. तरीसुध्दा, मला बिचारे मित्र दररोज न चुकता ( मी कधी तरी सुधरेन या आशेवर ) मला संदेश पाठवतातच. मी त्यांचा खरंच ऋणी आहे आणि अपराधीही. कधी तरी मी माझ्या दोन व्हाॅटस अॅप ( " Devidas Patil Shares " आणि " चला मराठी गझलवर बोलू " ) चॅनेलवर पोस्ट करतो. पण तेही प्रमाण हल्ली कमीच झालंय. मला झालंय तरी काय ? मी करतोय तरी काय ? घाबरू नका. मी काही ना काही करीत असतोच. कधी यू ट्यूब, कधी फेसबूक. कधी ब्लॉगर. कधी रेडीफ. कधी कोरा...तर कधी गोरा ! नाही , गोरा हे कुठलंही समाज माध्यम नाही. निदान, असेल तर मला अजून ती ब्रेकींग न्यूज मिळालेली नाही. गोरा मी स्वतःच. माझा रंग थोडा गोरा आहे ना. लहानपणापासून ते फिल्मी गाणं ओठांवर असतं माझ्या. गोरे रंग पे इतना न गुमान कर... ! मी बालपणापासून कुठली गाणी गातो ते महत्वाचं नाहीय. माझ्यादृष्टीने आता महत्वाचा आहे तो उद्याचा विचार !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: