शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

आमची दहीहंडी

 आमची दहीहंडी


श्रीकृष्णाने दहीहंडी सुरू केली तेव्हा बाळगोपाळांच्या मनात शिंक्यावरच्या हंडीतले दही, दूध , लोणीच होते.  श्रीकृष्णाचे खेळ श्रीकृष्णाला माहीत होते . पण  सोबत्यांचे तसे नव्हते. त्यांच्या मनात फक्त आणि फक्त दही , दूध, लोणीच पक्के ठसले होते.‌ युग बदलले. माणसे बदलली. पण स्वभाव बदलले नाहीत. तेव्हा एकच श्रीकृष्ण होता. कोणी कितीही लिहून ठेवले तरी तो पुन्हा आला नाही. येणारही नाही. कारण त्याच्या सोबत्यातूनच पुढे अनेक श्रीकृष्ण निर्माण झाले.‌ ते त्याला येऊच देणार नाहीत. एवढे तंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या गूप्त प्रयोगशाळांमधून विकसित केले आहे. कोरोनाच्या वेळी प्रयोगशाळा काय करू शकते याच्या बातम्या आपण पाहिल्याच आहेत.‌ 


तेव्हा एकटाच श्रीकृष्ण एकाच वेळी सर्वत्र दिसायचा . आता एकाच वेळी अनेक श्रीकृष्ण अनेक ठिकाणी अनेक उद्योग करतांना दिसतात. आज एकूण लोकसंख्येच्या मानाने ते मोजकेच आहेत.‌ उद्या ते वाढतील .आज ते कमी संख्येने एकत्र आले आहेत. जगभर एकत्र आले आहेत. उद्या ते अधिक संख्येने एकत्र येतील. ते उद्याचे जगावर राज्य करणारे नवे हुकूमशहा असतील. वसाहतवाद संपला नाही मित्रांनो. ते जगाच्या नव्या एमायडीश्या करतील.‌ नवा वसाहतवाद आणतील.‌


एकूण काय तर तो परमात्मा श्रीकृष्ण अवघे विश्व व्यापून वर दशांगुळे उरलाच आहे.‌ पण तरीही बदल होतो आहे. त्याला नकोसा बदल होतो आहे.  एक गोष्ट तशीच आहे.‌ आजही अनेक श्रीकृष्ण आणि त्यांचे पेंदे दही, दूध , लोण्यावर लक्ष ठेवून आहेत.‌ शिंके हा प्रकार बदलला तरी दही, दूध , लोण्यांनी भरलेले हंडे आहेतच .‌ काळ विरजण लावतोच आहे. माणूस त्याच्याभोवती फेर धरतो आहे.‌ अनेक श्रीकृष्णांना आणि त्यांच्या साथीदारांना हवा तसाच नाचतो आहे.‌ आजचे अनेक श्रीकृष्ण आणि त्यांचे अनेक  साथीदार आमचेच दही, दूध, लोणी आमच्याच घरातून चोरून आपल्याच सोबत्यांना आधी देत आहेत. उरलेसुरले काही तुकडे आमच्या तोंडावर फेकत आहेत. आम्ही लाचारीने ते चघळत आहोत.  ते सोबती हेच आहेत ज्यांना कोणतीही गरीबांसाठीची योजना आधी कळते आणि त्याचा ते गैरफायदा घेतात.‌  आम्ही आनंदाने त्यांच्याच भोवती फेर धरुन बेहोशपणे नाचत आहोत. सगळ्यात खालच्या थरावर माना खाली घालून वर वर कोण चढत चालले आहेत हे बघण्याचे टाळत आमची दहीहंडी आपण मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत ! 



....देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२७.०८.२०२४ 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

कायम ठणठणीत !

कायम ठणठणीत !

तुम्ही एक पाहिलंय का , ज्यांना आजार होतात, त्यांनाच आजार होतात. काही माणसं कशी कायम निरोगी, कायम ठणठणीत असतात ! अजूनही काही लोक दवाखान्याची पायरी चढत नाहीत ! काही म्हणा काही माणसं जन्मापासूनच धडधाकट असतात. आमच्या शेजारची एक आजी ( माझी आजी नव्हे ! ) तिच्या पतीच्या निरोगीपणाबद्दल गौरवोद्गार काढायची :   म्हणायची, " ह्यांचा पिंडच दगडाचा ! " आणि मग हळू आवाजात पुटपुटायची , " दगडावर डोकं आपटण्यात अर्थ नाही ! " अनुभवाचे बोल होते ते !😀😀 ते आजोबा होतेच तसे दगडासारखे ! सत्तरीतही एकदम ठणठणीत ! आणखी एक काका होते. तेही असेच कायम निरोगी ! त्यांना एकमेव वाईट खोड होती ती दारू पिण्याची ! ते आजोबा आपले निर्व्यसनी होते, पण हे काका पक्के दारूडे होते. म्हणजे ते सगळा डे दारूनेच साजरा करायचे. तेही सत्तर वर्षेच जगले. पण अखेरपर्यंत कधीही आजारी पडले नाहीत ! आम्ही पोरं तेव्हा लहान होतो. मोठी माणसं बोलायची ते कानावर पडायचं.एवढी पितो पण कधी आजारी पडत नाही. बहुतेक दारूमुळे ते अधिक मस्तवाल, बेडर, बेछूट, निडर बनले असावेत, म्हणूनच त्यांना आजारसुध्दा घाबरत असावेत , असं काहीसं मोठी माणसं म्हणायची . असेल का हो तसं ? दुसरीकडे दारूने पोखरलेली, रस्त्यात पडलेली काही पाप्यांची पितरेही आम्ही बघत होतोच की ! मग ते का असे रोगी होतात , हा प्रश्न तेव्हा पडायचा. तोच आजही पडतो !

मला तर वाटते की ती शेजारची आजी बरोबर बोलायची. येणारा प्रत्येक जण स्वतःचा पिंडच घेऊन जन्माला येतो. तुम्हांला सांगतो, कोरोनाच्या काळात सरकारी दवाखान्यात प्रेतं बाहेर काढायला आमचा एक असाच एकदम ठणठणीत मित्र जायचा. बिनधास्त जायचा ! समाजसेवा करायला म्हणून जायचा. कोरोनाच्या कहराच्या काळात महिना दोन महिने तो जात होता. प्रेते बाहेर काढून देत होता . विशेष म्हणजे तो मास्कही वापरत नव्हता ! हे कळलं तेव्हा काळजीच्या सुरात काही मित्रांनी असं करू नकोस , मास्क वापरच, असं त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो एवढंच म्हणाला, " अरे तुम्ही घरात बसून सल्ला देताय. तिकडे येऊन बघा. माणूसकी हरत चाललीय. प्रेतांची विल्हेवाट लावायला कोणीच पुढे येत नाही. उद्या ही प्रेते सडली तर ती दुर्गंधी तुमच्या घरापर्यंत येईल. तेव्हा तुमच्या मास्कचाही उपयोग होणार नाही. मग तुम्हीही मरणारच. घरात बसलात म्हणून तो तुम्हांला सोडील या भ्रमात राहू नका. त्याला भिडावेच लागेल.  आज ना उद्या मरायचेच आहे. कोणाच्या तरी उपयोगी पडून तरी मरू या. " त्याचं ते म्हणणं खबरदारीच्या ( आणि मित्रांच्याही ! ) पलिकडचं होतं... पण निधड्या छातीच्या माणूसकीचं होतं ! आजही तो एकदम ठणठणीत दिसतो आहे ! तोही ठणठणीत पिंड घेऊनच जन्माला आला आहे ! पटलं ना मी काय म्हणतो ते !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०७.०७.२०२४ सकाळी ११.००

....................

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

ही उपेक्षा का ?

 ही उपेक्षा का ? 


संगीतकार राम कदमांवरची किरण माने यांची पोस्ट अलिकडे फेसबूकवर वाचनात आली. तिची लिंक अशी आहे :

https://www.facebook.com/share/dycaxtaCZ3F1zNFY/?mibextid=oFDknk. 


राम कदमांसारखा मराठीतील एक संगीतकार आजच्या एका मराठी तरूणाला माहीत नसणे आणि कदमांची त्यांच्या हयातीत उपेक्षा होणे, या दोन गोष्टी किरण मानेंच्या मनाला फार लागल्या. त्याबाबत त्यांनी कदमांच्या प्रेमापोटी व आत्यंतिक तळमळीने लिहिले आहे. कोणी असे कोणाबद्दल कळकळीने लिहिते तेव्हा त्याला फार महत्व असते. त्यामागे एक युग असते.‌ त्या माणसाची साधना असते. जसे इथे संगीतकार राम कदमांनी निर्माण केलेले त्यांचे युग आणि त्यांची कलासाधना मानेंच्या समोर आहे. 


प्रश्न फक्त राम कदमांचा नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील  त्यांच्यासारख्याच अनेक विभुतींच्या नशिबी अवहेलना, फसवणूक , उपेक्षा अशा वाईट गोष्टी का आल्या हा आहे ! त्यांचे चुकले, दैवाचे चुकले, देवाचे चुकले, त्यांच्या आसपासच्या मोठ्या मोठ्या माणसांचे चुकले की त्यांच्या असंख्य सर्वसामान्य चाहत्यांचे चुकले ? देवाच्या निर्मितीचे माणूस केवढे कौतुक करतो ! पण माणूस सुंदर निर्मिती करतो त्याचे पुरेसे कौतुक माणसेच का करत नाहीत ? ती निर्मिती करण्यामागचे त्याचे अथक प्रयत्न लोकांना दिसत नाहीत , लोक फार तर मागाहून काही वेळा चुकचुकतात , तेवढ्यापुरते शाब्दिक पुळके दाखवून मोकळे होतात, पण त्याच कलावंताच्या कलेचा पुरेपूर आस्वाद घेऊन , काही जण तर फायदा उपटून मोकळे झालेले असतात. पण त्या माणसावर अन्याय होतो आहे हे लक्षात येताच आपण त्या गावचेच नाही असे दाखवतात. साधी ओळखही दाखवत नाहीत. समोरून आलात तर काटकोनात वळून पळ काढतात. कटतात. टाळता आले नाही तर थातूरमातूर बोलून कटवतात तरी ! याचसाठी केला का अट्टाहास असे त्या माणसाला वाटते ! ही उपेक्षा का हा प्रश्नं अनुत्तरीतच राहतो. किमान हे असे का होत असते यावर तरी चर्चा होणे हा या लेखाचा किमान उद्देश आहे . 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२०.०८.२०२४ 


शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह २०२४



मित्र हो, सोमवार दि. ०५ ते सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत माझ्या शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह सुरू होता. मी माझ्या फेसबूक प्रोफाईलवर व यू ट्यूब चॅनेल देवीदास पाटील क्रियेशनवर त्याचे थोडे व्हिडीओ पोस्ट केले होते. अजूनही काही व्हिडीओ आहेत जे येत्या काही दिवसांत पोस्ट करीनच.  आमच्या जाकीमिऱ्याप्रमाणेच भाटीमिऱ्यातील दत्तमंदिर व सडामिऱ्या भागातील नवलाई पावणाई मंदिरातील नाम सप्ताहही वरील नमूद कालावधीत संपन्न झाला. कोंकणात असे एक्का वा नाम सप्ताह अनेक ठिकाणी संपन्न होतात. ही इथली संस्कृती आहे.

आमचा मिऱ्या गाव तीन बाजुंनी पाण्याने वेढलेला आहे. शहराकडून येणारा एकमेव मुख्य रस्ता व त्यालाच फुटलेले उपरस्ते तसेच समुद्रसपाटीपासून चढत्या क्रमाने असलेले गावाचे भाटीमिऱ्या, जाकीमिऱ्या, आनंदनगर , सडामिऱ्या व पुन्हा उतारावरून समुद्रसपाटीला असणारे मिऱ्याबंदर हे भौगोलिक अर्धगोलाकार भाग . बंधारा एका बाजुने आहे. मध्ये मिऱ्या डोंगर उभा आहे. पण त्यानंतर उघडा समुद्र किनारा आहे , समुद्र खाडी स्वरूपात आत घुसलेल्या आहे. तिथूनही समुद्राचे पाणी घुसून हाहाकार उडू शकतो.

अशा भूभागातील लोकांना देवाचाच आधार वाटतो. त्याला अनुसरून, भाटीमिऱ्यात दोन , जाकीमिऱ्यात एक अशी तीन दत्तमंदिरे , जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे एक व हनुमंताची दोन मंदिरे, माझ्या हयातीत बांधलेली गणपतीची दोन मंदिरे व सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर ही इथली मंदिरे आहेत. खरे तर सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर हे प्रथम निर्माण केले गेले. पण नंतर वाढत्या लोकसंख्येमुळे  विविध सांस्कृतिक उपक्रमांना मंदिरातील जागा अपुरी पडू लागली.  जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे मंदिर कधी बांधले गेले तो उल्लेख त्याच्या सध्याच्या कमानीवर आढळतो. अर्थात, भूतकाळात कधी काय झाले यावर जाणूनबुजून वाद निर्माण करण्यापेक्षा आणि दाणे टाकून कोंबडया झुंजवण्यापेक्षाही , शंभर वर्षांहूनही अधिक काळाचा हा वारसा नामसप्ताहासारख्या उपक्रमांतून जुन्या व नव्या पिढीकडून पुढे आनंदाने आणि एकोप्याने चालवला जात आहे , हेच अधिक महत्वाचे व अभिमानाचे आहे ! हा सोहळा मानवी जीवनाच्या आनंदाचा भाग बनावा, हीच परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील. 
१३.०८.२०२४
........................

मी कालच्या पोस्टमध्ये दाणे टाकणारांचा व ते टिपण्यासाठी भांडणे करणाऱ्यांचा ओझरता उल्लेख केला होता.‌ संस्कृतीवर जाणकार भाष्य करतात. ते मी ऐकतो. चांगले भाष्य करतात. पण होते काय काही भाष्यकार इकडे प्रभावी बोलतात पण तिकडे दाणे टाकून कोंबड्या झुंजवतात. खरे तर चूक त्यांची नसतेच ! चूक त्यांचे दाणे टिपणाऱ्या आणि डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपसातच भांडणाऱ्या कोंबड्यांचीच असते ! भांडणे लावणे ही ज्यांची विकृती असते ते भांडणे लावून मजा घेतच बसणार ! त्याबद्दल त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या नादाला न लागणे केव्हाही श्रेष्ठच ! दाणे टाकणारे आणि ते दाणे टिपून आपसात भांडणारे हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत.

खरे तर संस्कृती ही जीवनाच्या उपक्रमांमधून बनते. या उपक्रमांशी व पर्यायाने संस्कृतीशी धर्माला जोडण्यात आले. माणूस अगोदरचा,  संस्कृती नंतरची आणि धर्म तर खूपच मागाहून आला आहे. पण तोच कानामागून येऊन तिखट झाला आहे. कारण मध्यंतरीच्या काळात तो सत्तेशी पर्यायाने राजकारणाशी जोडला गेला. राजकारण हे सत्तेतून आले असले तरी राजकारणी आपल्यातूनच येतात हे विसरता येत नाही ! तेव्हा लोकशाहीत अंतिम बोट कुणाकडे वळते आहे ते पहा.

मूळात माणसांच्या विविध संस्कृती विविध ठिकाणी अस्तित्वात होत्या. आजही आहेत. मग त्यांना धर्म ही संकल्पना कशासाठी जोडला गेली ? संस्कृतीत जसे सुष्ट लोक असतात तसेच दुष्टही असतात. वर दाणे टाकणारे आणि झुंजणारे या दोन्हींचा उल्लेख आलाच आहे. खरे तर चांगल्या वाईट ह्या दोन्ही प्रवृत्ती विश्व चालण्यासाठी आवश्यकच आहेत. तेव्हा त्यांचे स्वागतच आहे . एक तर समाजाला शिस्त लावण्यासाठी धर्म ही संकल्पना आली आणि वाईटांना निदान भीती वाटावी व ती कमी पडू लागली म्हणून पुढे देव ही संकल्पनाही धर्मांशी जोडली गेली. पण वाईट लोक देवाधर्माला विकून खाणारे निघतात आणि चांगले लोक सांस्कृतिक उपक्रम नित्य नेमाने व भक्तीभावाने करतात ! मानवी संस्कृतीचे हे दोन घटक अव्याहतपणे सुरू राहणार हे नक्की !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील.
१४.०८.२०२४

............

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

शरदाचे चांदणे....

 शरदाचे चांदणे....

नवलाई पावणाई मंदिर, जाकीमिऱ्या येथे श्रावण नाम सप्ताह २०२४ निमित्त देऊळवाडी महिला मंडळातर्फे भजन सादर झाले. त्यावेळी सौ. सुजाता देवीदास पाटील यांनी सुरेल आवाजात म्हटलेले शब्दांचे चांदणे हे गीत प्रत्यक्ष ऐका....



गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !

 आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !

परवा निवेंडीवाडीच्या शाळेत वह्या वाटप करण्यासाठी गेलो होतो. सौ. निरजा शेट्येला तिच्या घरून‌ गाडीत घेतलं. ती ग्रामपंचायत सदस्य आहे. निवेंडीवाडीची शाळा तिनेच सुचवली होती. तिने तिथली अधिक माहिती असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्या सौ. भरणकर यांनाही वाटेत सोबत घेतलं.‌ त्या असल्याने प्रवास योग्य रस्त्यावरून झाला. पाऊस सुरूच होता. वाट बिकट होती. निरजाचा भाऊ निलेश‌ पेडणेकर गाडी चालवत होता. त्याने गाडी सफाईने चालवली. शाळेच्या थोडं पुढे गाडी पार्क करावी लागली. आम्ही चौघेही पाऊस थांबण्याची वाट पहात बसलो.‌ दहा मिनिटे वाट पाहूनही पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसेना. माझी एकमेव छत्री कारमध्ये होती. तिचा आधार घेऊन एकाने शाळेत जावे , मग कोणी जावे , वह्या आणि छत्री एकाच वेळी कसे धरायचे आणि वह्या न भिजवता शाळेत कसे पोचायचे यावर पुढची पाच मिनिटे चर्चा करून झाल्या. आता काय करायचं याच प्रश्नावर चर्चेची गाडी पुन्हा थांबली. आम्ही उगाचच अडकून पडल्यासारखे झालो होतो. उगाचच टेंशन वाढले होते.  ते तिघे समस्येवर चर्चा करत होते आणि मी सोल्यूशनवर विचार करत होतो. मला उत्तरही सुचले. मी निरजाला म्हणालो, शाळेत फोन कर आणि मुलांना छत्र्या घेऊन पाठवायला सांग. झाले, तिच्याकडे मुख्याद्यापकांचा नंबर असल्याने, त्यानुसार तिने फोन केला आणि चार मिनिटातच चार मुलं छत्र्या घेऊन गाडीजवळ आली.  आम्ही आणि वह्याही शाळेत सुखरूप गेलो ! थोडक्यात, परिस्थिती आपण कशी घेतो हे फार महत्वाचे असते.

अशाच घटना अनेकदा आयुष्यात घडतात. ही घटना तर किरकोळ होती, पण त्यावर चर्चा किती मिनिटे  झाली ! मनाचा गोंधळ किती उडाला ! घटनेची सुरूवात हा घटनेचा सुरूवातीचा बिंदू . पण हा एकच बिंदू रहात नाही. या एका घटनेतून पुढे अनेक घटना घडू लागतात. हेच तुमचे कालचक्र असते. जीवन असते. अशा अनेक घटनांचे बिंदू पुढे सरकत राहतात. याच बिंदूंची एक रेषा बनते. कोणत्याही घटनेच्या सुरूवातीपासून निघालेली ही रेषा पुढे पुढे होत जाणाऱ्या घटनांना घेऊन पुढे सरकत राहते. तेव्हा आपण सावध झाले पाहिजे. ही रेषा कुठपर्यंत जाईल , तिची दिशा काय असेल याचा विचार सर्वसामान्य माणूस करत नाही. असं काही असतं हेच मुळी त्याच्या गावी नसतं. आपण काही घडलं की हबकून जातो. आपला गोंधळ उडतो. आपण विचार आणि विश्लेषण करत नाही. शक्याशक्यता पडताळून पहात नाही. आपण जे जीवन जगतो किंवा आपल्या वाटेला जे काही जीवन म्हणून येतं , त्या सर्व शक्यता असतात. त्या आधीपासूनच अस्तित्वात असतात. आपण त्यांना कुठे तरी भेटतो. नकळत सामोरे जातो. कोणत्या तरी अक्षांश रेखांशांवर ही भेट होते ! जे काही घडायला सुरूवात झाली आहे त्यात हे पण घडू शकते , घडेल ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही ! आपण अक्षांश रेखांशही काल्पनिक समजतो. पण इथे काहीच काल्पनिक नाही. ते अगोदरपासूनच अस्तित्वात असते म्हणून तर त्याचा विचार मानवी मेंदूत येतो. काही काळाने सत्य समोर येते पण तितका काळ खोटे असतेच ! काही काळ का होईना ; खोट्याचेही अस्तित्व असतेच ! थोडक्यात , शक्यतांचं अस्तित्व आधीपासूनच अस्तित्वात असतं. याचाच उपयोग करून काही जण प्रकरणांचा छडा लावतात ! आपण आपल्या आयुष्यात नवीन घटना घडायला सुरूवात झाली की ती चांगली असेल तर आनंदून जातो आणि वाईट असेल तर गोंधळून जातो. समस्यांमुळे तर आपण खचून जातो . स्वतःला स्थिर न करता अधिकच अस्थिर करतो . आपल्याला काही समजेनासं होतं. छोट्याश्या समस्येला आपण पार शनीच्या पीडेपर्यंत भिडवतो ! आपलं असं होणं हे अगदी स्वाभाविक असतं. हे असं का होतं ? एक तर मागील पिढ्यांनी वारंवर भीतीचे संस्कार केलेले असतात आणि दुसरे असे की आपलीही चूक होते ! आपण एखादी घटना कशी घेतो यावरच खरे तर तिच्या आपल्यावरील होणाऱ्या मनोकायिक परिणामांची तीव्रता व व्याप्ती अवलंबून असते. साधीच घटना घ्या. केळ्याच्या सालीवरून आपण घसरून पडलो तर आपणही हसतो की चार लोक आपल्याला हसले म्हणून आपल्या मनाला ते खूपच लागते ? खरं तर ही क्षणिक घटना असते. पण मनाला लावून घेतले तर त्या क्षणिक घटनेतूनही अगदी मारामारीचे प्रसंगही जन्म घेतात. थोडक्यात, आपण परिस्थितीच्या किती आहारी जातो , भावनेच्या भरात कसे अविचाराने वागतो , कसा विवेक हरवून बसतो , हे इथे लक्षात येते. इथे आपण हसत हसत उठून पुढे चालत गेलो असतो तर ते हसणारे लोक कधीच मागे पडले असते आणि आपल्यालाही त्या घटनेचा लगेचच विसर पडला असता. प्रकरण हातघाईवर येऊन राडा झाला नसता. शनीच्या पीडेचा तर मनास विचारही  शिवला नसता ! थोडक्यात , आपण परिस्थितीच्या दडपणाखाली येतो. परिस्थितीचा समतोलपणे विचार करत नाही . बरेचदा, परिस्थिती चुकीच्या पध्दतीने घेतल्यामुळे आपण दुष्टचक्रात सापडतो. स्वतःवरचा विश्वास हरवून वेगळ्याच मार्गाला लागतो . हे बदलता येतं . फक्त त्यासाठी आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे असते.


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

काळजी घ्या मित्रांनो !

काळजी घ्या मित्रांनो !

तुमचे आजार तुम्हीच निर्माण करता असं मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही आणि बसला तरी तुम्ही मान्य करणार नाही ! स्वतःवर कोण घेतो ! अनेकांची आजारपणं अनुभवली. स्वतः चौसष्ट वर्षात अनेक आजारपणातून गेलो ! सगळ्या आजारांची एक कार्यपध्दती असते. बरेचदा आजार कसल्या तरी माध्यमातून येतात. आधी व्हायरल आजार होतो आणि मग त्याची चर्चा व्हायरल होते. कोरोनाचे हेच झाले ! चर्चेनेच दहशत पसरली आणि अनेक लोक धक्क्यानेच गेले ! त्यांना तो आजार झालेलाच नव्हता ! किंबहुना ते निरोगी होते ! शोले सिनेमातला गब्बर सिंगचा, " जो डरेगा‌ वो मरेगा " हा डायलॉग ते विसरले ! त्यांनी त्यांचा नसलेला आजार स्वतःच निर्माण केला आणि ते प्राणास मुकले ! त्यांची वेळच आली हे समाधान आम्ही करुन घेतले !

मी माझा खूप जुना अनुभव सांगतो ! कॉलेजला असताना मी दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाने आजारी पडायचो. खरं तर ते वय लव्हेरियाने आजारी पडायचं होतं , पण ते आपल्या नशिबातच नव्हतं ( असं आपलं समाधान करून घ्यायचं ! दुसरं तरी काय करणार , नाही का ! )  मी पावसाळ्यातच आजारी पडायचो याचं कारण उघड होतं ! मी पावसात भिजल्यानेच मला थंडी भरून ताप यायचा. मी का भिजायचो तर मी कॉलेजकुमार होतो ! कॉलेजकुमार कसा रस्त्याने बेडरपणे पाऊस झेलत झेलत चालला पाहिजे ! छत्री धरुन कॉलेजकुमार रस्त्याने चालला आहे हे चित्र बावळट दिसतं ! काय विचित्र कल्पना होत्या तेव्हा ! रेनकोट मध्ये आपण चंद्रावरचा माणूस नाही तर ससा दिसणार असं वाटायचं ! ती तारूण्याची मस्ती होती आणि सिनेमातल्या हिरोंचा पगडा होता ! म्हणूनच माझा पावसाशी झगडा होता ! त्यामुळे मी पावसाला भीक न घालता गोगटे कॉलेज ते बसस्थानक असा टेचात भिजत जायचो ! हे तीन चार दिवस झाले की पुढील किमान  पंधरा दिवसांसाठी तरी मी अंथरूणात पडायचो ! आता मला सांगा माझा दरवर्षीचा हा आजार काय पावसाने निर्माण केला होता !

माझ्यासहीत अनेकांचे आजार अभ्यासले तेव्हा एक गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतांना आढळली ! काही आजार सुरू होण्याच्या आधी त्याचा विचार त्यांच्या मनात यायचा ! हे मी स्वतः माझ्याच काही आजारपणात अनुभवलं आहे ! असा विचार मनात आला म्हणून तो आजार मला झाला की पुढे जे होणार आहे त्याची लिंक कुठून तरी मनाला मिळाली ? मी आजारी पडणार हे मनाने आधीच ताडले होते की मनात आजाराचा विषय आल्यामुळे त्या धसक्यानेच मी आजारी पडायचो ? याच गोष्टी इतरांच्याही बाबतीत घडतांना मी पाहिले होते व म्हणूनच या निष्कर्षापर्यंत मी आलो ! माझा आणखी एक अनुभव असा की, आजाराची कसलीही कल्पना नसतांना मी काही दिवस जास्त वेळा बिस्कीटे खाऊ लागतो आणि विशेषतः बिस्कीटे खातांना माझ्या तोंडातील लाळ सुटण्याचे प्रमाण वाढते ! त्यानंतर मला कसले ना कसले आजारपण येते किंवा दुखापत होऊन तरी मी आजारी पडतो ! आता मी सावध झाल्याने जास्त खाणे आणि लाळ प्रकरण सुरू झाले की मी जास्त खाणेच बंद करतो  आणि शक्यतो दुखापत होणार नाही ही काळजी घेतो ! असे अनुभव व विचार अनेकांना आलेले असतील म्हणूनच या मुद्द्यांवर अधिक चर्चा होणे गरजेचे आहे.

एक नक्की, कोणताही आजार ही एक विचित्र परिस्थिती असते ! अशा वेळी माणूस दडपणाखाली येतो व अधिक  आजारी पडतो. एक पक्के लक्षात ठेवा : दडपण झुगारू शकलात तर  परिस्थितीच्या वर रहाल ! अन्यथा, तुम्ही स्वतःला स्वतःच परिस्थितीच्या खाली न्याल ! म्हणजे आजारी पडून बेड रेस्ट आणि औषधे घेत रहाल ! सद्या पावसाळा आहे. २६ जुलैही जवळ येतोय. काळजी घ्या मित्रांनो !

... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१५.०७.२०२४ सकाळी ०६.००

चाला ... चालत रहा...

  चाला ... चालत रहा...

चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण...पाय हे माणसाच्या उमेदीवर उभे असतात. टेंशनने माणूस खचला की तो पायातच मोडतो.‌ त्याला चालत जा म्हणणे  सोपे आहे, पण आधार देणे, उभे करणे कठीण आहे. हे टेंशन फार घातक असतं.

आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांच्या नावाचा एक संदेश व्हॉट्स अॅपवर वाचनात आला. त्यात ते म्हणतात :

" *वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*
*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !! ....* चाला.▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते▪️.... *३६५ दिवस चाला*▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.... " असं त्यांनी खूप लिहिलंय. कळकळीने लिहिलंय.

🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️

खूप छान संदेश आहे. पण एवढे पुरेसे नाही. म्हणूनच मी सुरूवातीला म्हटलंय : चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण... हा पण आज फार महत्वाचा आहे. खरंच, जीवनातील वाढत्या व्यापांमुळे जीवनात अनेक संकटे येतात. अनेक धक्के बसतात. हे सगळंच पचवून बसणं एवढं सोपं नसतं. त्यांचा परिणाम शरीरावर होतोच ! माणूस मनाने खचतो आणि तो खचला की पहिले पाय खचतात. पायातली शक्तीच निघून जाते.‌ कोरोना काळानंतर तर अनेक माणसे लंगडतानाच दिसतात. पाण्यातच खचलेली दिसतात. काही जण याचा बूस्टर डोसशीही संबंध जोडतात, पण त्याबाबत अधिकृत तपशिल हाती आलेला नाही. काय असेल ते असो , पण मन खचल्याने पायातली ताकत जाते, हे खरे !

आपल्या आसपास अशी खचलेल्या मनाची, लंगडणाऱ्या पायांची लटपटती माणसं दिसतात. तेव्हा एक विचार स्पर्शून जातो. ही माणसे कोणत्या धक्क्याने खचली असतील ? त्यापूर्वी तर ती धडधाकटपणे सहज चालत असतील. मग त्यानंतर काय झाले असेल त्यांच्या आयुष्यात ? खचलेली ती माणसे पुन्हा उभारी धरावीत म्हणून काय करता येईल ? ईश्वरानं त्यांना उभं करण्याचं सामर्थ्य मला दिलं तर त्यांना उभं करण्याची माझी इच्छा नक्कीच आहे !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०५.०७.२०२४ सकाळी ०६.००

मंगळवार, १६ जुलै, २०२४

उद्याचा विचार

 

उद्याचा विचार


हो, कितीही झालं तरी काल , काल रहातच नाही. नाही म्हणजे कितीही कालमध्ये म्हणजे भूतकाळात रमलात तरी वर्तमानात यावंच लागतं ! दुनिया व्यवहारांवर चालते राव ! स्वप्नरंजनात फार काळ राहता येत नाही. मनात मांडे खात राहिले तर आपलीच लाथ मडक्यावर बसते , मडकेही फुटते आणि स्वप्नंही तुटते ! हाती धुपाटणे येते. आपण अब की बार कशाच्या पार जाऊन पोचतो ते कळतच नाही. स्वप्ने पाहणे वेगळे आणि काहीच कृती न करता ती नुसतीच पहात बसणे वेगळे ! भानावर यावेच लागते. जसा आजचा विचार पडतो तसाच उद्याचाही विचार पडतोच. अर्थात जो विचारी असतो त्यालाच विचार पडतो म्हणा. बरोबर ना ? तुम्ही पण हाच विचार करताय ना ? विचारी आहात ! करणारच. दुसरा कसला विचार नाही पडलाय मला. उद्या लेखनासाठी कुठला विषय सुचतोय , हाच एकमेव विचार पडलाय मला ! मारून मुटकून आपण लिहीत नाही. तुम्हांला काय वाटलं ? नाही म्हणजे, तुम्हांला वेगळं वाटणं अगदी स्वाभाविकच आहे ! कारण, अनेक विचार पडतात माणसाला ! काय काय व्याप आणि उपदव्याप करावे लागतात ते ज्याचे त्यालाच माहिती ! बरोबर ना ? भोग असतात ते ! भोगायलाच लागतात ! त्याशिवाय पुढे जाताच येत नाही.

भीष्म पितामहांचा एक संदर्भ

ह्या भोगांवरून आठवलं. परवाच एक व्हिडीओ तोही व्हाॅटस अॅपवर पाहण्यात आला. त्यात भीष्म पितामहांचा एक संदर्भ देण्यात आला होता. त्यांना शरपंजरी मरण येणार ते पूर्वजन्मातील घटनेमुळे येणार असं श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. तेही मागच्या ५२ व्या वर्षातील घटनेमुळे. भीष्मांना एवढे पूर्वजन्म पाहण्याची शक्ती होती. आपल्याला याच जन्मातील कालचं आज आठवत नाही. ५२ पूर्वजन्म कुठले आठवणार ! ते न आठवो, पण एक प्रश्नं मात्र इथे पडतोच. तो म्हणजे भीष्मांच्या आयुष्यात ती घटना कोणी निर्माण केली ? तो सरडा त्यांच्या नेमका वाटेत कोणी आणला आणि बाणाच्या टोकाने त्याला उडवायची सणक भीष्मांना त्या पूर्वजन्मात आली कशी ? असा विचार त्यांच्या मनात आला कसा ? बरं, आला आणि त्यांनी तो सरडा बाणाच्याच टोकाने का उडवला ? उडवलाच का ? त्याला त्याच्या वाटेनं जाऊ का नाही दिलं ? तोही निवडुंगावर जाऊन पडलाच कसा ? तिथे नेमकं निवडुंगच कसं उगवून राहिलं होतं ? हे नियोजन इतक्या कल्पकतेने आणि अचूकपणे कोणी केलं असावं ? ही त्या मास्टरमाईंडची नैतिकवगैरे जबाबदारी नाही का ? हा कोण कट टू कट मास्टरमाईंड आहे ? कुणाला सापडला तर सांगा. तोवर उद्या कोणत्या विषयावर लिहावे याचे मी चिंतन करतो. तोपर्यंत आजचा लेख तर तयार झाला ! हेही नसे थोडके ! आता उद्याचा विचार...


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

पुढच्या वर्गात गेल्याबद्दल बक्षिस

 मोफत वह्या वाटप

गेली तीन वर्षे आम्ही दोघे बंधू शाळांमध्ये जमेल तेवढं  मोफत वह्या वाटप करतो. मी वाटप व्यवस्था बघतो.  वाटप करतांना एक गोष्ट लक्षात आली. काही मुलांनाच मोफत वह्या नको असतात. कदाचित , त्यांचा या सगळ्या सामाजिक कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकेल. कदाचित, त्यांच्या पालकांना ते आवडत नसावे. घरात या विषयावर बोलणे होत असावे. पालक श्रीमंत असोत वा गरीब असोत. ते स्वाभिमानी असू शकतात. त्यांना कोणाची मदत घेणे आवडत नसावे. ते त्यांच्या पाल्यांना वह्या विकत घेऊन देण्यास सक्षम असतील. साहजिकच,  त्यांच्या मुलांनाही काही मोफत घेणे आवडत नसावे. संस्कार असू शकतात. अशी मुलं वर्गातही घरच्या संस्कारांना अनुसरून मोफत वह्या घेण्यास नकार देतात यात गैर काहीच नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. मात्र, त्याचा परिणाम इतर विशेषतः गरीब मुलांवरही होऊ शकतो. गरज असूनही मदत ही भीक समजून विचार होऊ लागला तर प्रश्न उभा राहतोच.

In the school with students

मग हा प्रश्नं मुलांचा स्वाभिमान न दुखावता कसा सोडवता येईल याबाबत विचार सुरू केला. कारण , काहींचे ठीकच होते. ते वह्या विकत घेऊ शकत होते किंवा परवडत नसतांनाही विकत घेऊन स्वाभिमान जपू शकत होते. काही अपवादही असतात, तसेच समजायचे. म्हटलं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊदे.‌ तेही चुकत नसतील. आपणही चुकायचं नाही. आपण आपल्या मार्गाने जाऊ, पण मोफत वह्या वाटप करुच. विशेषत: ग्रामीण भागात याची फार मोठी आवश्यकता असल्याचे गेल्या तीन वर्षांत आढळून आले होते. पण आवश्यकता असूनही काही पालकांचा म्हणा, मुलांचा म्हणा, स्वाभिमान आडवा येत होता. नजरेसमोर गरजू दिसत होते. या मानसिकतेतून गरजूंना बाहेर कसे काढायचे ? गरजूंमध्ये अशा चुकीच्या प्रकारे स्वाभिमानाची साथ पसरली तर ते समाजहीताच्या दृष्टीने योग्य होणार नव्हते.  माझी तगमग, अस्वस्थता वाढत चालली होती.  काही तरी करणे भाग होते. कारण या वर्षीच्या वह्या वाटपाला सुरूवात करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती. शाळा पंधरा जूनला सुरू होणार होत्या.

अखेर , १४ जून उजाडला ! संस्कारवाली एक विद्यार्थीनीं घरासमोरच्या रस्त्याने जातांना दिसली आणि उत्तर सापडले ! मी तिला लगेच हाक मारून बोलावले. ती आलीही. मी उद्यापासून वह्या वाटप करणार आहे हे तिला सांगतानाच हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे, असं सांगितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती म्हणाली, " काका, उद्यापासून कशाला ? मला आजच, आताच द्या की वह्या ! " मी तिथेच यंदाच्या मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ केला ! आता मी ज्या शाळेत जातो तिथे आवर्जून ' हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे ' हे वाक्य ऐकवतो ! मुलं हसून वह्या स्वीकारतात. मुलं चांगली असतात. निर्मळ मनाची असतात. त्यांना फक्त योग्य प्रकारे संस्कारांकडे वळवावं लागतं , हा अनुभव आणि हे उत्तरही २०२४ च्या वह्या वाटपात सापडले !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील