बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

भावव्याकुळ !

 भावव्याकुळ ! 


तुम्ही म्हणाल परमेश्वर तर कणाकणात भरलेला आहे. क्षणाक्षणात आहे. पणापणात आहे.‌ मनामनात आहे. अनेक शहाण्यांनी त्याच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. हा अतीशहाणा आता काय परमेश्वराबद्दल सांगणार ! अगदी बरोबर आहे. ते थोर. त्यांची प्रतिभा असामान्य. त्यांची झेप मोठी. आवाका मोठा. कुवत मोठी. जनकल्याणाची तळमळ मोठी. मी यत्किंचित. एवढासा. माझी बालीश बडबड असेही म्हणायची मला चोरी. कारण आधी हेटाळून, फेटाळून मग माऊली म्हटलेल्या ज्ञानेश्वरांनी ते आधीच म्हणून ठेवले आहे ! तसे इतरही अनेक आधुनिक प्रभावशाली लोकही बरेच काही म्हणतात . ते म्हणतील तिथे परमेश्वर धावतो. कोरोना आला. ते म्हणाले आवर त्याला. थांबव त्याला. तो धावला. त्याने कोरोना थांबवला. गरीबी संपवण्यासाठीही म्हणे कोरोना आला होता. गरीब संपले. त्याचा धावा करण्यासाठी, लाचार होऊन याचना करण्यासाठी, गरीबी तिथेच राहिली. तो सामान्यांचा वाली ! पण सामान्य कुठे भाग्यशाली ! ते न दिसणाऱ्या त्याच्या पायाशी लोळण घेत राहिले तर त्याचे अस्तित्व राहील. कारण त्यांचे एकमत होत नसले तरी सामान्यांकडे बहूमत आहे. बहूमताचाच विजय होतो. महाभारतात सर्वनाश होऊनही अल्पमतातील पांडव जिंकले. कारण परमेश्वराने त्यांची बाजू घेतली. तिथे बहूमत असूनही कौरव पडले ! पराभूत झाले ! ही एक समजूत आहे. आपण आपल्या मनाच्या अशा बऱ्याच समजुती करुन घेत आलो आहोत. परमेश्वर असा आहे, तो तसाही आहे. एकाच वेळी तो निर्गुण आहे, निराकार आहे आणि त्याच वेळी तो अनेक गूण व आकार घेऊन चमत्कारही करतो आहे. खरे तर चमत्कार म्हणजे त्या घटनेबाबत आपण अंधारात असणे. तिचे आकलन होत नसल्याने वर्तमानात काही गोष्टी चमत्कारच वाटतात. पण आपण फार उदात्तीकरणवाले आहोत. त्यामुळे कोणत्याही घटनेचे पूर्ण आकलन होण्याआधीच उचलली जीभ लावली टाळ्याला असे करतो. काही लोक तर अशा घटना मुद्दाम पसरवतात. स्तोम माजवतात. रेटून रेटून पुन्हा पुन्हा तेच तेच ठसवतात.  त्यांना त्यांची दुकाने चालवून सामान्यांना लुटायचे धंदे करायचे असतात. परमेश्वर कोरोना थांबवू शकतो पण ह्या लबाड दुकानदारांना नाही ! 


तर अशा घटना घडतात. सामान्य , असामान्य. साध्या विलक्षण. सरळ, वाकड्या. थेट, संभ्रमात टाकणाऱ्या.  कधी ह्या घटनांकडे आपण नीट पाहू शकत नाही. कारण आपण घटना चक्रात ओढले जातो. आपल्या डोळ्यांवर गांधारीची पट्टी येते ती इथेच ! घटना केवळ एकच घडून थांबत नाही. एक घटना दुसरीला, तिसरीला अशा अनेक घटनांना जन्म देते. आपण स्वतः काही करायला जातो तेव्हा आपणही घटनांना जन्म देतो ! केवळ परमेश्वरच देतो असे नाही. कारण हे परमेश्वराचे कारस्थान नाही, ही मानवा तुझ्याच बुद्धीने तूच केलेल्या कर्मांची फळे आहेत, असे आपणच कोणाकडे तरी बोट दाखवून सांगतो ! म्हणजे माणूस काही घटनांना स्वतःच निर्माण करतो. निदान पहिली घटना तरी निर्माण करतो. मग कदाचित ती घटनाच पुढच्या घटनांना जन्म देत असेल. माणसांच्या हातात शेवटी काही उरतही नसेल. त्या घटनेचा गैरफायदा दोन्ही बाजूचे लोक उचलू लागले तर मग हताश होऊन हाक कुणाला मारणार ? परमेश्वरालाच ! थोडक्यात, परमेश्वर घटनाचक्रातच कुठे तरी आहे. कारण परमेश्वराची निर्मिती हीसुध्दा एक घटनाच आहे ! प्रसंगच आहे. म्हणूनही प्रसंग आला की अजूनही आपण  परमेश्वरालाच हाक मारतो ! खरे तर, जे व्हायचेच असते तेच होते. जे होणारच नसते ते कधीच होत नाही. आपण भावव्याकुळ होतो हे मात्र खरे ! 




...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

०२.१२.२०२४ सकाळी १०.५०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: