बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

माझे प्रकाशित लेख


माझे प्रकाशित झालेले लेख


                गेला काही काळ मी वर्तमानपत्रात दीर्घ लेखन करीत आहे.  वाचकाना ते आवडतही आहे. 
ब्लॉगवरील वाचकांसाठी मी काही लेख संबधित वर्तमानपत्राच्या सौजन्याने स्वतंत्र पानावर (लिंक : My Published Marathi Articles  ) देत आहे.  माझी खात्री आहे की ते तुम्हालाही आवडतील . माझे हे तसे अलिकडील लेख आहेत . मी पंधरा वीस वर्षपूर्वीही दीर्घ लेखन केले होते  व् ते त्या काळी वर्तमानपत्रात प्रसिद्धही झाले आहेत .यथावकाश तेही इथे देईन  . आपण आपली प्रतिक्रिया अवश्य कमेंटबॉक्समधे दया , ही विनंती .

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

सुरेश भटांची एक विलक्षण आठवण

सुरेश भटांची एक विलक्षण आठवण 


इयत्ता नववीत मी लेखनास सुरवात केली . पुढे आठ दहा वर्षांनी  मराठी गझल भेटली . माझ्या बरोबरीने मराठी गझलला सुरवात करणारा आणि मराठी मातृभाषा नसताना उत्तम मराठी कविता आणि गझल लिहिणारा  अजीज हसन मुकरी भेटला. नजाकतीने लिहिणारा मधुसूदन नानिवडेकर भेटला.  त्याच्यामुळे आणि मराठी गझलच्या ओढीमुळे सुरेश भट भेटले . सर्वोत्तम केतकर , दीपक करंदीकर , म. भा . चव्हाण भेटले. पुढे मराठी गझलला वेगळ्याच उंचीवर नेणारे भीमराव पांचाळे भेटले. सुरेश भट आणि मराठी गझल यामुळे असंख्य गझलकार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भेटले .


सुरेश भटांचा आणि माझा पत्रव्यवहार सलग चार वर्षे सुरु होता. मी तो जपू शकलो नाही . त्यांना मी केवळ एकदाच भेटलो . बहुधा १९८८ मध्ये . पुण्यात . एक आख्खा दिवस मी त्यांच्या बरोबर होतो. त्यावेळी दीपक करंदीकर नीता जोशी आणि पंढरपुरचे एक गझलकारही येवून गेले. भटसाहेब न थकता गझला ऐकवत होते. आम्ही जेवायला  हॉटेलात गेलो तेव्हा वाटेत भटांचा वजनदार हात माझ्या खांद्यावर होता. त्यांना पेलवत रस्ता पार करण्याचे दिव्य मी कसेबसे पार पडले . दुसऱ्या  बाजूने माझ्यासोबत आलेला प्रदीप मुरारी हातिसकर चालत होता. साक्षात सुरेश भटाना  जेवताना आम्ही पहिले . जेवतानाही ते गझलबद्दल बोलत होते.





भट साहेबांचा निरोप घेवून रात्री आठ वाजता मी व हातिसकर पुणे  स्टेशनला पोचलो . आम्हाला रत्नागिरीला यायचे होते . कसे कोण जाणे पाठोपाठ भटसाहेब तिथे आले. आपला वजनदार हात पुन्हा एकदा माझ्या खांदयावर ठेवून मला म्हणाले देवीदास आज माझ्याकडेच थांब . पहाटे मुंबईला निघायचे आहे. मंगेशकरांकडे . लताआशा हृदयनाथही तिथे भेटणार आहेत . ते आग्रह करीत होते . एका दृष्ट्या कवीचा तो आग्रह होता. पण मी थांबू शकलो नाही. मी करंटा निघालो . भटांच्या मनात त्यावेळी काहीतरी होते . मी ते ओळखू शकलो नाही . त्यांचे मन मोडून मी रत्नागिरीला आलो . पण ते मनाने मोठे होते. मला रत्नागिरीला यायचे आहे असे त्यांच्या प्रत्येक पत्रात असायचे . पण अखेरपर्यंत ते येवू शकले नाहीत . त्यावेळी रेल्वे नव्हती  एसटीने त्यांना झेपणारे नव्हते  आणि गाडीने इतक्या दूर आणणे परवडणारे नव्हते . तो योग आलाच नाही . राहिली ती एक विलक्षण आठवण !

.............

टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  

.........

रक्ताच्या नात्यापलिकडचे नाते

खालची आई  !


               खरं तर ती माझी कुणीच नव्हती आणि तरीही ती माझी सारे काही होती ! माझं बालपण तिच्याच छायेत अधिक गेलं ! ती माझ्या आजीची मैत्रीण , आजीच्याच वयाची .पण मी तिला कधीपासून खालची आई म्हणू लागलो ते आठवत नाही ! आमचे घर तिच्या घरापेक्षा जरा उंचावरच होते . पाय-या उतरून खाली गेले की तिच्या अंगणात जायचो . त्यामुळेच मी तिला कधीतरी खालची आई म्हणू लागलो ! ती माझी संरक्षक भिंतच होती ! बालपणी मला काही बोलायची वा त्रास द्यायची कोणाची टाप नव्हती  ! हे अगदी मी चांगला मोठा झाल्यावर , म्हणजे मी चौवीस वर्षाचा होईपर्यंत चालू होते. त्याच वर्षी तिचे निधन झाले . सन 1984 मध्ये . अखेरच्या क्षणापर्यंत ती माझे संरक्षण करीत राहिली ! आजही मी आणि माझे कुटुंब तिच्याच छत्रछायेखाली सुरक्षित आहोत ! ही वस्तु:स्थिती आहे की सन 1984 ते आजतागायत आम्ही सुरक्षित आहोत ! मला आठवत नाही , म्हणजे मी तेव्हा खूपच लहान असणार , पण लोक सांगतात की ती चणेही आधी स्वत: चावून , बारीक करून मला भरवायची ! अगदी आख्यायिका वाटावी अशी ही सत्य घटना अनेकांनी पाहिली होती व मी मोठा झाल्यावर मला आवर्जून सांगितलीही होती ! ती माझी इतकी काळजी का घेत होती , हे मला कधीच समजू शकले नाही ! मी तिचा नातेवाईकही नव्हतो . पण तिचे नि माझे काही वेगळेच रुणानुबंध होते , हे अनेक घटनांनी सिध्द केले आहे ! 

तिचे किस्से 
                 मी अगदी लहान असतांना आशाआते मला घेऊन पाय-यांवरून खालच्या आईच्या अंगणात गडगडत गेली . सुदैवाने मला लागले नाही . आयुष्यातल्या त्या पहिल्यावहिल्या अपघातातून मी सहीसलामत वाचलो होतो ! पण खालच्या आईचे काळीज हलले होते . त्या दिवशी तिने आशाआतेला इतके धू धू धूतले की पुढे कित्यक महिने आशाआते तिच्यासमोर जायला धजत नव्हती ! अर्थात , मला हे कळण्याचे माझे तेव्हा  वय नव्हते . पण पुढे अनेकदा हा किस्सा सांगितला गेला . केवळ माझ्याच बाबतीत नव्हे ; तर गावातल्या अनेकांच्या बाबतीत तिचे किस्से आजही ऐकायला मिळतात . ती होतीच तशी ! अनेकांना तिने ऐन अडचणीच्या वेळेला मदत केलेली होती . कोणताही सण असो , तिने कधी एकटीने साजरा केला नव्हता ! प्रत्येक सणाला तिच्याकडे बायका जमायच्या . तिचे नातेवाईकही यायचे . पण ती स्वत: स्वयंपाक करून सगळ्यांना आवर्जून वाढायची !   तिच्या हाताला चवही सुंदर होती . तिचे एक मात्र होते , तिने केलेला प्रत्येक पदार्थ पहिल्यांदा ती मला खाऊ घालायची ! मग ती पुरी असो , पुरणपोळी असाे ! ती कोंबडीचे मटणही खूप मस्त करायची. गंमत म्हणजे , ती काळीज स्वत: होऊन माझ्या ताटात वाढायची ! मला आवडायचे म्हणून , मटणात ती आवर्जून बटाटे घालायची ! मीही ते आवडीने खायचो . पहिला पदार्थ मला देण्यात , तिची नातवंडं , पतवंडं तिथे असली तरीही कधी खंड पडला नाही ! हे असं का होतं , हे मला कधीच समजलं नाही ! तिला विचारण्याची कुणाची हिंमत झाला नाही . माझीसुध्दा ! खूप काही लिहायचं आहे . लवकरच अशा अनेक आठवणी मी सविस्तर लिहिणार आहे .... 

...............................

प्रत्येक कुटुंबासाठी

Important Appeal to all families in the world




                  


 




MY DEAR FRIENDS , 

HERE IS AN APPEAL FOR YOU ! 

IT IS VERY VERY IMPORTANT TO ALL THE 

MEMBERS OF EVERY FAMILY . THERE ARE 

QUARRELS IN FAMILIESPLEASE GIVE 

YOUR REASON OR REASONS BEHIND THE 

FAMILY DISPUTES . IT IS A WORLWIDE 

QUESTION AND REALLY CLOSE TO EACH 

ONE AND EACH FAMILY . HOPE YOU WILL 

EXPRESS YOUR VIEWS ON THIS 

IMPORTANT ASPECT TO EVERYBODY. 

SEND ME EMAIL ON  devidaspatiljm@gmail.com


             मित्र हो !



                   या , आपण व्यक्त होऊ या !
                   मतांची देवाणघेवाण करू या !


विविध विषयांवर आपली अनेक मते असतात ; विचार असतात !  या मतांची आपण देवाणघेवाण केली तर ? नव्हे , करुयाच ! मला माहीत आहे तुम्हांला फार वेळ नसतो . म्हणून थोडक्यात भाष्य करु या . सुरुवात म्हणून , मी जिव्हाळ्याचा एक विषय इथे देतो आणि त्यावरचे माझे भाष्यही मांडतो . तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा असाच एक विषय आहे –
                      
               “ कुटुंबातील भांडणांची कारणे “

                
या विषयावर माझे मत पुढीलप्रमाणे आहे –

 “ एखाद्या किंवा अनेक विषयांवरील वेगवेगळी मते कुटुंबात मतभेद निर्माण करतात . परस्परांबद्दल आपुलकी कमी किंवा अजिबात नसेल तर कुटुंब सदस्यांमधली ही दरी अधिक रूंद होत जाते . कौटुंबिक वादावादींची किंवा भांडणाची ही दोन अत्यंत महत्वाची कारण आहेत . “


याशिवाय , इतरही अनेक कारणे आहेतच की ! बघु या , तुमच्यापैकी कोण कोण , कोणत्या कोणत्या कारणांवर भाष्य करतो ते ! तुमचे वास्तववादी , पारदर्शक भाष्य साधारणतः १०० शब्दात लिहा. आपण कृपया मंगल फॉंंट वापरून माझा ईमेल आयडी ' devidaspatiljm@gmail.com 'वर ईमेल करा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहा .

रविवार, ८ एप्रिल, २०१८

“ डोळ्यात आसवांच्या ”

“ डोळ्यात आसवांच्या ”



शोधतो मी रंग त्याचा मझिया रंगांमधे
काल जो सांगून गेला रंग माझावेगळा !

       हे जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हाच मी ओळखले की मीही तोच रंग तीस वर्षापूर्वी शोधत होतो ! तो आणखी असेही बोलला “ मी वरवर कोठे जगलो , आयुष्य गझलमय होते ! ” तेव्हाच मला त्याच्या खोलीचा अंदाज आला होता ! बंगल्यामधुनी निघाल्या चळवळी , घेत साध्या झोपड्यामधले बळी ”  , असे त्याने लिहिले आणि तो मला अधिक पटू लागला ! पुढे , “ मी दाखवतो डोळ्यांना जगण्याचे वास्तव माझ्या  स्वप्नांच्या येण्यावर केव्हाच विसंबत नाही ”, असाही त्याचा शेर भेटला ! होय , मी त्याच गझलगोविंदाबद्दल बोलतोय जो भयानक वास्तव गझलांमधून सहजतेने मांडतो आणि त्याच वेळी , “  कोण अंकुरले मघाशी माझिया गात्रांतुनी , हा कुणाचा श्वास आहे पाकळ्यांहुन कोवळा ”, असेही म्हणतोय ! “ पान अळवाचे तशी तू .. थेंब पाण्याचा असा मी , भेट होते .. स्पर्श होतो .. पण बिलगता येत नाही ! ” ही तरल लाडीक तक्रारही तो किती सहजतेने करतोय ! “  डोळे भरून माझ्या वाचू नकोस गझला , पडतील शब्द माझे प्रेमात आसवांच्या ” , असे गोविंद नाईक या ताज्या दमाच्या गझलकाराने सांगितल्यामुळे मग “ डोळ्यात आसवांच्या ” ह्या त्याच्या पहिल्या गझलसंग्रहाकडे वळणे स्वाभाविकच होते ! तसा मी वळलोही. पण गेले काही महिने त्यासाठी पुरेसा वेळ देवू शकलो नाही , याबद्दल मला अपराधीपणा जाणवतो .

        रंग पुन्हा ह्या रानाचा हिरवा झाला तर ?
        ढग एखादा ओलेता हळवा झाला तर ?

        असा हळवा होणारा गोविंदा ,

        एक तिरंगा जपून ठेवा काळजातही
        रंग उध्या झेंड्याचाही भगवा झाला तर ?

        असे उध्याचे वास्तव छातीठोकपणे लिहितो !

        पुतळ्यांनी आकाश गाठले
        माणुसकी तळ गाठत आहे

        अशी उंची ह्या संग्रहात गाठतोय ! पुढे तो असेही सांगतोय –

        सोडुनी गेलेत जे रण काळजी त्यांची नको
        जे उभे आहेत त्यांचे धैर्य टिकले पाहिजे !
         मग खरी समजेल रामाच्या मनाची थोरवी
          रावणाने शिवधनुष्याला उचलले पाहिजे ! म्हणजेच आपण फक्त एकाच बाजूचे कौतुक न  
    करता आयुष्याची दुसरी बाजूही तितक्याच समतोलपणे पाहिली पाहिजे ! हा खरा गझलकाराचा दृष्टीकोण असला पाहिजे आणि तो गोविंदाकडे आहेही !

          आसपासचे भयाण वास्तव गझलकारांने टिपून त्यावर तितकेच प्रत्यंतकारी लिहिले पाहिजे . केवळ स्वप्नंरंजन आणि मनोरंजन हा गझलचा हेतू नाही ! हे गोविंद जाणतो आणि म्हणूनच तो लिहितो -         
   केवढा श्रीमंत होता बाप .. कळले
   राख पोरांनी विकाया काढल्यावर !

हे तो लिहू शकतो , कारण , “ शिकवते बाराखडी आयुष्य माझे , पुस्तके मी पाळली नाहीत कुठली ! असे त्याचे आयुष्य त्याला शिकवून चुकले आहे !

           कधी तरी बघ डोळे उघडून वर देताना
           काय तुझ्या चरणावर अर्पण होते आहे … आणि
          
           दूरदूर माणसे चालती माणसांतली
           हे कुठल्या शतकात पदार्पण होते आहे , तसेच

           हळू हळू वाढत जाते इच्छांची उंची
           रोज तोकडी नशिबाची चादर आठवते

           हे शेर माणसांना विचार करायला लावणारे आहेत !

           अशाच काही सुंदर , प्रभावशाली ओळी मला ह्या संग्रहात मिळाल्या –

           मलाच देण्यास मी दिलासा फिरुन माझ्याकडे निघालो , बघून आक्रोश चाललेला समोर लाचार यौवनाचा , घरात मी घेतले उगीचच अनोळखी चेह-यास माझ्या , धरून हातात हात माझा कुठे तुझी सावली निघाली , अखेर मारेकरीच माझा जिवास माझ्या फितूर झाला, असे कसे हे भरून प्याले समोर तू ठेवलेस दैवा , हरेक क्षण ऐकवून गेला जगावयाची उदात्त गीता इ. मात्र , शेरांच्या ह्या पहिल्या ओळींना दुस-या ओळींची अधिक उंचीची साथ लाभायला हवी होती , म्हणजे गझलची अधिक मजा घेता आली असती , असे वाटते ! अर्थात , मी जुना गझलकार असलो तरी मी काही समीक्षक नाही . एक रसिक म्हणून लिहिले आहे . तेव्हा चुकल्यास जाणकारांनी क्षमा करावी . गोविंदाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतांना एक आश्वासकता जाणवते आहे . ती ही की तो यशाची हवा डोक्यात जावू देणार नाही ! जो रंग तो शोधतो आहे , त्या रंगाने डोक्यात हवा जावू देवू नका आणि अधिकाधिक चांगले लिहा असेच त्याच्यासोबतच्या आणि त्याच्या नंतर विजा घेवून येणा-या प्रत्येक गझलकाराला सांगितले आहे ! तो रंग म्हणजेच आदरणीय सुरेश भट ! मराठी गझलचा खराखुरा रंग ! गोविंद नाईक हा रंग नक्कीच ओळखतो !


…. श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील



       


शुक्रवार, ३० मार्च, २०१८

मराठी गझल : लोकशाही बंद झाली !

लोकशाही बंद झाली !



लोकशाही बंद झाली !
हुकुमशाही छंद झाली !

रंग बेरंगास आला !
संयमी स्वच्छंद झाली !

बेबनावाशीच नाते !
भावकी बेबंद झाली !

सभ्यता शरमे न आता !
शरमही बेधुंद झाली !

प्रतिक्रिया उमटे न कोठे !
माणसे का मंद झाली !

.... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील

मराठी गझल : सत्य ते गंगेस ठावे !

सत्य ते गंगेस ठावे !  


सत्य ते गंगेस ठावे !  मी कहाणी सांगणारा !
पाप न्हाते , पुण्य होते ; धन्य होतो नाहणारा !

ठेवले बगलेत ज्यांनी लपवुनी आहे सु-याला
वाटते त्यांना तसा तो राम नाही पावणारा !

भावनांना हात जेव्हा घातला काही खुळ्यांनी
कायद्याने हात त्यांचा कलम केला वाढणारा !

एक वेडा दाखवाया लागला स्वप्नें नको ती ...
वाटला त्याला अडाणी काय जो तो भेटणारा  ?

देश म्हणजे गावचा तो पार नाही बैठकीचा
गावगप्पांनी कधी हा देश नाही चालणारा !

... देह उर्फ देवीदास हरिश्चंद्र पाटील

मराठी गझल : अर्धे अर्धे !

Life is half half ... No full satisfaction you get from many incidents in life. This half half situation in life is described in the following marathi gazal . 


आयुष्य कसे अर्धे अर्धेसे ... ब-याच गोष्टी अशा अर्ध्या अर्ध्याच राहतात ! बोलणे अर्धे , आजमावणेही अर्धे ! रस्ता , चालणे , पौर्णिमा चांदणेही अर्धेच असते ! जीव जडतो तोही अर्धा आणि त्याचे किंवा तिचेही दुरावणेही अर्धेच ! असा आयुष्याचा रंग उडता उडता ... स्वाभाविकपणे रंगणेही अर्धेच राहते  ! आयुष्यात धड काही पूर्णत्वाने घडतच नाही ! अशा वेळी काय करायचे ?..... मग अशी मराठी गझल जन्मते !


कसे बोलणे होते ... अर्धे अर्धे !
आजमावणे होते ...अर्धे अर्धे !

कसा संपतो रस्ता फिरता फिरता ...
कसे चालणे होते  ... अर्धे अर्धे !

कशी पौर्णिमा होती अर्धी अर्धी !
कसे चांदणे होते ... अर्धे अर्धे !

कसा जीवही जडला अर्धा अर्धा
कसे तोडणे होते  ... अर्धे अर्धे !

कसा रंग होता तो उडता उडता ...
कसे रंगणे होते ... अर्धे अर्धे !

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !


खरेच सांगतो , ही कपोलकल्पित कहाणी नाही ! माझ्या दुस-या ब्लाॅगवर मी इंग्रजी भाषेत यापूर्वी या  विषयावर लिहिले आहेच . काल म्हणजे 10 जानेवारी 2018 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्याने मी अगदी जागा असतांना आणि पत्नीशी बोलत असतांना माझ्या डोळ्यांसमोर जे दिसले , त्याची प्रचिती दुस-या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता आलेल्या फोनमुळे आली ! हा विषय तसा थोडा विचित्रच आहे . सुरूवातीला तरी मलाच विचित्र वाटला होता ! तसे हे सारेच अविश्वसनीय आहे ! माझाही यावर विश्वास बसला नव्हता ! किमान मला पूर्ण जागेपणी , उघड्या डोळ्यांनी काही घटना घडत असतांना दिसतात ! काही माणसे , काही ठिकाणे बसल्या ठिकाणी दिसतात ! नंतर त्या घटना प्रत्यक्षात जशाच्यातशा किंवा थोड्याफार बदलाने घडतात !  !  अगदी अलिकडच्याच दोन घटना पहा . त्यानंतर 11 जानेवारी 2018 रोजी काय घडले ते सांगतो  !

2017 च्या डिसेंबर महिन्यात मी आजारी पडल्याने मला एका हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते . सकाळची वेळ होती . सलाईन लाऊन नर्स गेली होती . माझी पत्नी माझ्याशी बोलत होती . अशक्तपणामुळे मी डोळे मिटून बोलत होतो . अचानक मला आमच्या स्पेशल रूममध्ये पाद्री , नन आणि काही जण क्रॉस घेऊन आलेले दिसले . माझ्या ऊशाशी त्यांनी क्रॉस ठेवला आणि मी डोळे उघडून पाहिले तर तिथे फक्त माझी पत्नीच होती . मी दरवाजाकडे बघितले तर दरवाजा चक्क बंद होता ! मी पत्नीला ह्या चमत्कारिक  देखाव्याबद्दल सांगितले . तेवढयातच  वरच्या मजल्यावर जाणा-या जिन्यावर दाणदाण असे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले ! पाच मिनिटांनी चक्क प्रार्थनेचे शब्द माझ्या कांनी पडले ! डावीकडच्या खिडकीतून पाहिले तर त्या दिशेने वरच्या मजल्यावरून ते शब्द येत होते . तेव्हा मला मघाचच्या पाद्री , नन , क्रॉसचा अर्थबोध झाला  ! हे तसे लगेचच आलेले प्रत्यंतर ! मात्र ,  दुस-या दिवशी दिसलेल्या घटनेचे प्रत्यंतर दोन तीन दिवसांनी आले !

 ती घटना जबरदस्त आहे आणि जगाच्या चिंतेत भर घालणारी आहे !  त्या दिवशीही मला सलाईन लावलेलेच होते. मी आणि माझी पत्नी बोलत होतो . दुपारची वेळ होती . बोलणं थांबलं . मी क्षणभर डोळे मिटले ...आणि मला जे दिसले ते फार भयानक होते ! माझ्या रूमच्या समोरच्या रूममधून एक जगभरात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी बाहेर पडतांना दिसला ! त्याची पॅसेजमध्ये पडणारी पावले मी पाहिली ! पिवळसर सफेद झब्ब्यातल्या त्याला मी स्पष्ट पाहिले ! अवघ्या काही फुटांवरून चालतांना !  त्याच्या चेह-यावर गूढ स्मित होते ! मला या स्मिताचा अर्थ दोन तीन दिवसांनी तो त्याच्याच देशाच्या नजरकैदेतून सुटल्याची बातमी टीव्हीवर पाहिली , तेव्हा कळला ! माझ्या पत्नीलाही या प्रकाराने धक्काच बसला ! पुढे होणा-या घटना मला आधी अगदी जागेपणीसुध्दा दिसतात , यावर आता तिचाही विश्वास बसू लागला होता !

तर पहिल्या परिच्छेदातली ताजी घटना सांगतो . 10 जानेवारी 2018 ला मी माझ्या एका काकांच्या घरात एका खोलीत उभा दिसलो . वेळ रात्री 08 ते 09 ची असावी .  माझ्यासमोर माझे काका अंथरूणावर बसलेले आणि त्यांचे कुटुंबीय अंथरूणात आडवे झालेले दिसले . मी तिथे गेलो तेव्हा ते आपसात बोलत असावेत . मला एवढेच दिसले की माझे काका माझ्याकडे कटाक्ष टाकीत आहेत . ते खूप बारीक झालेले माझ्या लक्षात आले आणि माझी लिंक तुटली . प्रत्यक्षात माझ्या त्या काकांचे निधन होऊन दोन वर्षे झालेली आहेत . मयत काका जिवंत परंतु अतिशय बारीक  दिसले . असं कसं दिसलं असावं , याबद्दल माझी व पत्नीची चर्चा झाली आणि स्मरणकेंद्रात पडून राहिलेल्या काही घटना अशा अचानक डोळयासमोर तरळतात , असे आम्ही दोघेही म्हणालो . मला पटत नसूनही झोप महत्वाची असल्याने मी चर्चेला पूर्णविराम देऊन झोपी गेलो . पण मला काही तरी खटकत होते . मला भीती वाटत होती . काही तरी होणार , अशी मी मनाशी खूणगाठ बांधली होती . झालेही तसेच . मात्र मी शहरामध्ये माझ्या कामात काहीसा व्यस्त असल्याने मी काहीसा गाफील झालो होतो . पण घडणारे घडलेच होते . दुपारी 03.15 ला मला माझ्या एका शेजा-याचा फोन आला . बातमी वाईट होती . माझ्या मित्राच्या पत्नीचे निधन झाले होते ! काल डोळयासमोर मयत काका जिवंत दिसले होते आणि आज जिवंत वहिनी मयत झाली होती . ती नेमकी त्या काकांच्या मागच्या बाजुच्या लगतच्या घरातलीच ! ती बरीच वर्षे आजारीच होती आणि खूप बारीकही झाली होती ! माझ्या मनात ते काकांचे बारीकपण घोळू लागले आणि सगळी उकल झाली ! मी माझे काम गुंडाळले आणि तडक मित्राचे घर गाठले !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
१३.०१.२०१८