गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

अविस्मरणीय जैतापूर !


जैतापूर : तुझा विसर न होई  !



नुकताच जैतापूरला जाऊन आलो . खरं म्हणजे , जाऊन आलो म्हणण्यापेक्षा पुन्हा (आणि बहुतेक पुन्हा पुन्हा ) जाण्यासाठीची पाहणी करून आलो . काही महिन्यांपूर्वीच मला माझ्या दहावीतल्या वर्गमित्रांना भेटण्याची ईच्छा झाली . त्या काळात मोबाईल नव्हते . कोण कोण कुठे कुठे आणि कसे कसे आहेत , हे चाळीस वर्षांनी बघण्याचे औत्सुक्य अचानक एके दिवशी मला का वाटावे , याचा विचार करण्यापेक्षा  अलिकडे माझ्या संपर्कात असलेल्या श्री . अश्रफ हसन मुक्री याला मला जैतापूरचा संपर्क दुवा देण्याची विनंती केली . त्यानुसार , त्यांने माझा वर्गमित्र श्री . विकास मांजरेकरचा अनेक वर्षांनी हल्लीच संपर्क घडवला होता . काल माझ्या मनात जैतापूरला जाण्याचा विचार येताच मी माझे तंत्रनिकेतनचे सहकारी मित्र श्री . शालिकराम लष्कर चव्हाण यांना विचारले . त्यांनी दुस-या दिवशी जाण्यास लगेच होकार कळवला . त्यानुसार , दि. 13.01.2019 रोजी दुपारी बाईकने जैतापूरला विकासकडे आम्ही दाखल झालो ! विकासबरोबर प्राथमिक गप्पा झाल्यावर त्याच्या मेडीकल स्टोअर्सला भेट दिली . त्याच्यापासून पन्नास पावलांवर असलेल्या आमच्या उदय भोपळे नामक वर्गमित्राचे चिकन सेंटर पाहिले. उदयही ब-याच काळानंतर भेटला . पुन्हा आम्ही विकासकडे आलो . तिथे  वहिनींनी एकटीने कमीत कमी वेळेत इतके सुंदर जेवण बनवले होते की ते जेवून आम्ही अगदी तृप्त झालो ! त्याची चव जिभेवर ठेवून विकास सोबत जैतापूरात फेरफटका मारला .

            पहिली पावले अर्थातच शाळेकडे वळली . शाळेच्या समोरच आमचा मित्र श्री . हरिदास देवळेकर राहतो . त्याला हाक दिली पण तो बाहेर गेल्याचे कळले . आमचे ज्येष्ठ मित्र श्री. दिवाकर आडविरकर हायस्कूलमध्येच भेटणार हा अंदाज खरा ठरला . अशा व्यक्ती जिथे उभ्या असतात तिथे चांगले कार्य निश्चितपणे घडत असते . समोरच हायस्कूलच्या सुशोभीकरणाचे कार्य सुरू होते . दिवाकरजी पटांगणातच होते.  त्यानंतर आम्ही हायस्कूलमध्ये प्रवेश केला . ज्या न्यू इंग्लिश स्कूल , जैतापूरच्या संस्कारांनी मी घडलो , त्या माझ्या शाळेपुढे आज अनेक वर्षांनी पुन्हा नतमस्तक झालो ! खूप समाधान वाटले . आपण इतकी वर्षे इकडे आलो नाही , ही बोचही थोडी कमी झाली . शाळेकडे माजी विद्यार्थ्यांनी लक्ष टाकणे गरजेचे आहे , हे दिवाकरजींचे म्हणणे कळकळीचे व खरे असल्याचे लक्षात आले . खरोखरच , दरवर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी बँचनिहाय मदत केल्यास शाळेच्या भरभराटीस हातभारच लागेल . हा विचार घेवूनच आम्ही शाळेचा आणि दिवाकरजींचाही निरोप घेतला . तितक्यात मशिदीतील आझान कानावर पडली . हया आवाजाने मला मांडवीकडे खेचले नसते , तरच नवल होतेे ! 

             वाटेत गुलाम हुसैनजींचा मेडिकल स्टोअर भेटला .  हया स्टोअरमध्ये त्यांचे सदैव हसमुख आणि बोलके व्यक्तीमत्व पाहून औषधे घ्यायला आलेला पेशंट किवा त्याचा नातेवाईक काही क्षण का होईना दु:खं विसरून जायचा ! आज त्यांना मला भेटता आलं नाही . नव्वदीत ते काळाबरोबर हासत विनोद करीत असल्याचा भास मला झाला आणि आम्ही सुनिता नारकरच्या घराजवळच्या जेटीकडे आम्ही वळलो . जेटीबद्दल विकास सांगत होता तेव्हा माझे मन समोरच्या खाडीच्या पाण्यावर तरंगत पलिकडच्या धाऊलवल्लीत गेले . त्याच काठावर मी जैतापूरला येण्यासाठी होडीत बसण्याकरिता आई , वडील आणि आजीबरोबर पहिले पाऊल उचलले होते .... तेव्हा मी बहुधा तीन चार वर्षांचा असेन ! तेव्हा लाटांवर वरखाली होणा-या होडीमधून मी जैतापूरच्या याच जेटीवर पहिले पाऊल टाकले होते ! तिथूनच बाजारपेठमार्गे  मांडवीकडचा माझा प्रवास सुरू झाला होता ! तेव्हा वाटेत समाधान हाँटेलमधून वडिलांनी घेतलेले नानकटक मला एवढे आवडले की मी त्यासाठी हट्ट करू लागलो होतो . नंतर दरवर्षी मी स्वत:च जाऊन ते नानकटक आणून खावू लागलो होतो . आम्ही याच समाधान हाँटेलसमोरून बाजारपेठेतून मांडवीकडे निघालो . वाटेत दत्ता टेलर अनेक वर्षांनी दिसला आणि पहिली फूलपँट त्याच्याकडे शिवल्याची आठवण आली . विकास मला दत्ताकडेही घेवून गेला . 

         दत्ताच्याच थोडे पुढे अाजही असलेले खुदबूचे दुकान आहे . हा खुदबू खूप प्रेमळ होता ! लहान मुले चणे शेंगदाणे विकत घ्यायला आली की तो स्वत: त्यांना मोफत गूळ दयायचा ! '' खुदबू वायच गाॅड दी '' असं जैतापूरी भाषेत मुलं सतत मागणी करतांना मी त्यावेळी खूपदा पाहिलं होतं . मीही हया खुदबू चाच्याचं आवडतं छोटं गि-हाईक होतो याचा मला आजही अभिमान आहे ! खुदबूचा नातू ते दुकान आता चालवतो . 

            तिथून पुढे निघालो . ती जुनी विहीर , खलील काझी व फाफा आजी यांची घरे आणि त्यापुढे कष्टम चाळ ! हयाच चाळीत दोन नंबरच्या रूममध्ये आम्ही रहायचो ! आता चाळ पडून बरीच वर्षे झाली . नवीन बांधलेली इमारतही पडायला आलीय . सर्वात दु:खं झालं ते चाळीसमोर बंदिस्त कंपाऊंड बघून ! तेव्हाची ती मोकळी हवा आता बंदिस्त झाली आहे ! पुढे गेलो तर मांडवी चौपाटीही अशीच बंदिस्त केलेली ! समोरच्या करगुटकरांच्या वाडयाचे कंपाउंडही साध्या दगडमातीचे उरले नव्हते . तेही पक्के बांधण्यात आले होते . कष्टम चाळीची ती दुरावस्था मला बघवेना ! कोणी तरी हृदयावर दगड ठेवले असल्याचे मला जाणवले ! मी मांडवीकडे सरकलो.  मांडवीत मोकळ्या वा-यावर , समोरच्या खाडीच्या पाण्यावर हेलकावणा-या लाटा आणि त्या लाटांवर हेलकावणा-या होडया पहात किती तरी वेळ त्या काळी बसलो होतो ... कधी वडिलांबरोबर , कधी मित्रांबरोबर तर कधी एकटाच .... ती बंदिस्त मांडवी बघून मी सून्नच झालो . कष्टम आँफीस तर बंदच होते . त्याच्यासमोरच्या महापुरूषाचे देऊळ मात् त्यामानाने सुस्थितीत होते . मला वडिलांची खूप आठवण आली ! दर सोमवारी इथे नारळ दयायचा मान माझ्या वडिलांचाच असायचा . माझे डोळे माझ्याही नकळत भरून आले . मी महापुरूषाच्यासमोर झुकलो . चाळीस वर्षापूर्वी याच मांडवीत मी किती तरी स्वप्नं पाहिली होती . इथेच मी आयुष्यातली पहिली कविता केली होती ; पहिला लेख लिहिला होता ! ती गजबजलेली मांडवी आज ओस पडली होती ! खरंच मांडवीची ती निर्मनुष्य अवस्था अधिक वेळ बघणे शक्यच नव्हते ... मी निघू या म्हटले व उदास अंत:करणाने चालू लागलो , तसे विकास व चव्हाण माझ्यासोबत परत फिरले . पुढे गेलो तोवर नमाज संपला होता . युसूफच्या घरातून त्याच्या पत्नीने आवाज दिला , पण पुढच्या वेळी नक्की येतो , असं सांगून पुढे निघालो . मशिदीसमोर थांबलो . हयाच मशिदीतली बांग ऐकून पहाटे लवकर उठण्याची सवय मला बालवयातच लागली होती . परमेश्वर आपल्याला असं किती वेळा जागे करीत असतो ! बालमित्र खलील आणि त्याचा छोटा भाऊ युसूफ बाहेर येताच पुन्हा एकदा आम्ही बालवयाच्या आठवणीत रमलो . वेळ खूप झाला होता . मी माझ्यासोबत चव्हाणांना आणले होते . वहिनी व त्यांची लहान मुलगी लक्षिता रत्नागिरीत एकटयाच होत्या . मी चव्हाणांचा फार वेळ घेतला आहे हे दुपारपासूनच मला जाणवत होतं. सायंकाळचे पाच वाजत आले होते . आता निघणे गरजेचे होते . आम्ही विकासच्या घरी आलो . वहिनी व विकासचा निरोप घेतला व बाईकवरून परत रत्नागिरीकडे निघालो तेव्हा जैतापूरच्या आठवणी दाटून आल्या होत्या . मनातले जैतापूरचे स्थान सायंकाळसारखेच अधिकाधिक गडद होत चालले होते !

            
..............

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

वाईतील गझलप्रेमी




                  Due to the great Bhimraoji Panchale and love for the great Suresh Bhat's marathi gazal , I was at Wai in Satara district.  It was one of the grand programmes . It was a lovely function ! I still have the sweet memories in my mind . Many Marathi Gazalkars were also there . It was a fantastic travel of Marathi Gazal that brought all of us at Wai . It was totally a different atmosphere and we all enjoyed it lot . I also presented my gazal and got a loud of applause and once more too to my gazal named Teer meaning arrow . I generally write with social angle . The gazal lovers really liked it ! The love of the viewers at Wai I will remember fovever !

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

मराठी गझल : गाणे


                       गाणे 


भेटल्या खाचखळग्यांचा वाटला आधार होता
हा असा रस्ता निघाला चालण्याच्या पार होता


मी जरी बोलून गेलो शब्द थोडेसेच होतो
लागले होते जिव्हारी...खोल झाला वार होता ...


बोललो नाही कधी मी हया उजेडाची कहाणी
हया उजेडामागचा मी पाहिला अंधार होता


फक्त दु:खानेच केली साथ आयुष्यास होती !
तू कधी माझा सुखा रे घेतला कैवार होता .... ?


जे नको ते छेडले मी ...एकदा गाणे जरासे ...
ओठ माझे पोळले अन् ; कंठही बेजार होता !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

गझल तुझी नि माझी एक आठवण कोल्हापूरची


sadarkarte Abhijat Marathi


शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?

हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?


निकालोत्तर धूमश्चक्री 


गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यात निवडणूक निकालोत्तर धूमश्चक्री चालू आहे . युती म्हणून निवडणूक लढून आणि जिंकूनही दोन मोठे पक्ष मोठा भाऊ छोटा भाऊच्या भाऊबंदकीत अडकले आहेत . यापैकी सर्वात मोठ्या पक्षाने सरकार स्थापनेत पुढाकार घेणे किंवा युतीधर्म म्हणून संपूर्ण युतीनेच पुढाकार घेवून सहजशक्य असलेले सरकार स्थापन करणे अपेक्षित होते .  निकालानंतर दहा दिवस उलटत आले तरी राज्यासमोरचे लोकांचे प्रश्न बाजूला ठेवण्याईतपत कोणते अडथळे आहेत , हे कोणीही जाहीर करीत नाहीत . मी येणार , मी येणारच्या अतीउत्साही आरोळयाही केव्हाच हवेत विरल्या आहेत . अजूनही कोणी वाघ बनतो आहे तर कोणी वनरक्षक बनतो आहे . हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ? कोण गाजराची शेती करतो आहे तर कोण राष्ट्रपती राजवटीचे भीतीयुक्त गाजर दाखवतो आहे . एकूण शिवरायांच्या या महाराष्ट्रात रयतेला राज्यकारभाराच्या पध्दतीचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे ! ही लढाई खरी आहे की लुटूपुटूची आहे , हेही जनतेला कळत नाहीय. निवडणूकीपूर्वी मोठमोठी भाषणे करून जनतेकडे मते मागायची आणि निवडून आल्यानंतर आपसात भांडत बसायचे , हे अनाकलनीय आहे . राजकीय अपरिपक्वतेचीच ही निशाणी आहे . राज्य ही गोष्ट गंभीरपणे घ्यायची असते . कोलांट्या  माकडउडयांसाठी कुणाला दिलेले मोकळे मैदान म्हणजे राज्य नव्हे . राज्यकारभार गंभीरपणे आणि खंबीरपणे करावयाची बाब आहे . त्यासाठी स्थिर सरकार देणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे . वैयक्तिक किंवा पक्षाच्या हीत वा अहंकारापेक्षा राज्य किंवा राष्ट्र नेहमीच मोठे असले पाहिजे .

उशीर होऊ शकतो , पण... 

सरकार स्थापनेला उशीर होऊ शकतो . पण त्याबाबतीतल्या हालचालींचे संकेत तरी लोकांना दिसले पाहिजेत. काही वेळा म्हणे ज्योतिषाला विचारून सत्ता स्थापनेचा मुहुर्त जाहीर केला जातो . पण इथे ठोस तारीख जाहीरच होत नाही . दहा दिवसात दोन पक्षात याबाबत कोणतीही चर्चाच होवू नये , हे संयुक्तिक नाही. दिवाळी असली तर तीही राज्याच्या सर्वात महत्वाच्या कामांसमोर किती दिवस करायची , हाही प्रश्न उरतोच. अती झाले की दिवाळीचाही शिमगा व्हायला वेळ लागत नाही . लोकांनी पारदर्शक वागावे ही अपेक्षा करतांना सरकारनेही तितकेच पारदर्शक असणेही महत्वाचे असते . पारदर्शक राज्यकारभार ही नंतरची गोष्ट झाली . राज्यकारभाराला शुभारंभ नक्की कधी होणार , हे तरी लोकांना वेळेवर कळले पाहिजे . नुसती मतदानाची लोकांना घाई करायला सांगून उपयोग नाही . त्यांनी केलेल्या मतदानाचा योग्य आदर राज्यकर्त्यांकडून झालाच पाहिजे . थोडक्यात , लोकांना अधिकृतपणे माहिती कळलीच पाहिजे . सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी चालविलेली एक यंत्रणा आहे . हया यंत्रणेने निवडून आल्यानंतर लोकांना अंधारात ठेवणे योग्य नाही .


लोकशाहीचे भान 

काही गोष्टी अशा असतात की तुमच्याही नकळत त्या तुमच्याविरूध्द आपोआप साचत असतात. सत्तेच्या धुंदीत वा अती कर्तव्यकठोर झाल्याने तुम्ही त्या केल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाहीत .  तुमची वेळ भरली की त्या तुमच्यासमोर उभ्या राहतात. या देशात लोकशाही आहे , याचे भान सतत ठेवावे लागते . ज्यांनी या देशाचा पाया रचला त्यांना पुढे तुम्ही काय करणार याची कल्पना होती . त्यांनी तुमच्या सगळया चावटपणावर आधीच इलाज करून ठेवला आहे आणि त्याची प्रचिती तुमचा फाजीलपणा वाढला की तुमच्या फाजील आत्मविश्वासाला      जाणा-या तडयातून तुम्हांला येतेच येते . लोकशाही ही कुणाला भीती दाखवून किंवा सतत गाजर दाखवून फार काळ करता येत नाही. ईतिहास नाकारला तर तोच बोकांडी बसतो ! मग सगळे सुरळीत होत असतांना अश्वमेधाचा वारूही रोखला जातो . कमावलेली किंवा नशिबाने लाभलेली ईज्जत पार धुळीस मिळते ! फाजील तोंड आणि फाजील आत्मविश्वास तोंडघशीच पाडतात !


सरकार स्थापन होणे आवश्यक आहे 


आता ही गेलेली ईज्जत मिळवायची झाली तर त्यासाठीही एकच मार्ग आहे . निमूटपणे लोकांना जाहीर सत्य निवेदन करून मुकाटपणे ,  आता अबकी बार वगैरे कुचकामी ठरलेल्या घोषणा न देता , कोणी तरी सरकार स्थापन करणे , म्हणजे लोकांचे काम शत प्रतिशत होईल . तेच होणे आवश्यक आहे .

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

कवितांचा पाऊस आणि मी

जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनी कवितांचा पाऊस!
काव्यसंमेलनाला उत्तम प्रतिसाद; काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
BOI



सविस्तर बातमीसाठी लिंक्ला क्लिक करा : janaseva granthalay ratnagiri new



बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

संमेलनात बरसल्या काव्यधारा!


संमेलनात बरसल्या काव्यधारा!
रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
BOI
जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित काव्यसंमेलनात व्यासपीठावर सहभागी झालेल्या निमंत्रित कवींमध्ये डॉ. स्वप्नजा मोहिते, नितीन देशमुख, देविदास पाटील, रश्मी कशेळकर, जयश्री बर्वे.
अधिक माहितीसाठी खलील लिंकला क्लिक करा
presiding the program

माझे प्रकाशित लेख


माझे प्रकाशित झालेले लेख


                गेला काही काळ मी वर्तमानपत्रात दीर्घ लेखन करीत आहे.  वाचकाना ते आवडतही आहे. 
ब्लॉगवरील वाचकांसाठी मी काही लेख संबधित वर्तमानपत्राच्या सौजन्याने स्वतंत्र पानावर (लिंक : My Published Marathi Articles  ) देत आहे.  माझी खात्री आहे की ते तुम्हालाही आवडतील . माझे हे तसे अलिकडील लेख आहेत . मी पंधरा वीस वर्षपूर्वीही दीर्घ लेखन केले होते  व् ते त्या काळी वर्तमानपत्रात प्रसिद्धही झाले आहेत .यथावकाश तेही इथे देईन  . आपण आपली प्रतिक्रिया अवश्य कमेंटबॉक्समधे दया , ही विनंती .

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

सुरेश भटांची एक विलक्षण आठवण

सुरेश भटांची एक विलक्षण आठवण 


इयत्ता नववीत मी लेखनास सुरवात केली . पुढे आठ दहा वर्षांनी  मराठी गझल भेटली . माझ्या बरोबरीने मराठी गझलला सुरवात करणारा आणि मराठी मातृभाषा नसताना उत्तम मराठी कविता आणि गझल लिहिणारा  अजीज हसन मुकरी भेटला. नजाकतीने लिहिणारा मधुसूदन नानिवडेकर भेटला.  त्याच्यामुळे आणि मराठी गझलच्या ओढीमुळे सुरेश भट भेटले . सर्वोत्तम केतकर , दीपक करंदीकर , म. भा . चव्हाण भेटले. पुढे मराठी गझलला वेगळ्याच उंचीवर नेणारे भीमराव पांचाळे भेटले. सुरेश भट आणि मराठी गझल यामुळे असंख्य गझलकार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भेटले .


सुरेश भटांचा आणि माझा पत्रव्यवहार सलग चार वर्षे सुरु होता. मी तो जपू शकलो नाही . त्यांना मी केवळ एकदाच भेटलो . बहुधा १९८८ मध्ये . पुण्यात . एक आख्खा दिवस मी त्यांच्या बरोबर होतो. त्यावेळी दीपक करंदीकर नीता जोशी आणि पंढरपुरचे एक गझलकारही येवून गेले. भटसाहेब न थकता गझला ऐकवत होते. आम्ही जेवायला  हॉटेलात गेलो तेव्हा वाटेत भटांचा वजनदार हात माझ्या खांद्यावर होता. त्यांना पेलवत रस्ता पार करण्याचे दिव्य मी कसेबसे पार पडले . दुसऱ्या  बाजूने माझ्यासोबत आलेला प्रदीप मुरारी हातिसकर चालत होता. साक्षात सुरेश भटाना  जेवताना आम्ही पहिले . जेवतानाही ते गझलबद्दल बोलत होते.





भट साहेबांचा निरोप घेवून रात्री आठ वाजता मी व हातिसकर पुणे  स्टेशनला पोचलो . आम्हाला रत्नागिरीला यायचे होते . कसे कोण जाणे पाठोपाठ भटसाहेब तिथे आले. आपला वजनदार हात पुन्हा एकदा माझ्या खांदयावर ठेवून मला म्हणाले देवीदास आज माझ्याकडेच थांब . पहाटे मुंबईला निघायचे आहे. मंगेशकरांकडे . लताआशा हृदयनाथही तिथे भेटणार आहेत . ते आग्रह करीत होते . एका दृष्ट्या कवीचा तो आग्रह होता. पण मी थांबू शकलो नाही. मी करंटा निघालो . भटांच्या मनात त्यावेळी काहीतरी होते . मी ते ओळखू शकलो नाही . त्यांचे मन मोडून मी रत्नागिरीला आलो . पण ते मनाने मोठे होते. मला रत्नागिरीला यायचे आहे असे त्यांच्या प्रत्येक पत्रात असायचे . पण अखेरपर्यंत ते येवू शकले नाहीत . त्यावेळी रेल्वे नव्हती  एसटीने त्यांना झेपणारे नव्हते  आणि गाडीने इतक्या दूर आणणे परवडणारे नव्हते . तो योग आलाच नाही . राहिली ती एक विलक्षण आठवण !

.............

टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  

.........

रक्ताच्या नात्यापलिकडचे नाते

खालची आई  !


               खरं तर ती माझी कुणीच नव्हती आणि तरीही ती माझी सारे काही होती ! माझं बालपण तिच्याच छायेत अधिक गेलं ! ती माझ्या आजीची मैत्रीण , आजीच्याच वयाची .पण मी तिला कधीपासून खालची आई म्हणू लागलो ते आठवत नाही ! आमचे घर तिच्या घरापेक्षा जरा उंचावरच होते . पाय-या उतरून खाली गेले की तिच्या अंगणात जायचो . त्यामुळेच मी तिला कधीतरी खालची आई म्हणू लागलो ! ती माझी संरक्षक भिंतच होती ! बालपणी मला काही बोलायची वा त्रास द्यायची कोणाची टाप नव्हती  ! हे अगदी मी चांगला मोठा झाल्यावर , म्हणजे मी चौवीस वर्षाचा होईपर्यंत चालू होते. त्याच वर्षी तिचे निधन झाले . सन 1984 मध्ये . अखेरच्या क्षणापर्यंत ती माझे संरक्षण करीत राहिली ! आजही मी आणि माझे कुटुंब तिच्याच छत्रछायेखाली सुरक्षित आहोत ! ही वस्तु:स्थिती आहे की सन 1984 ते आजतागायत आम्ही सुरक्षित आहोत ! मला आठवत नाही , म्हणजे मी तेव्हा खूपच लहान असणार , पण लोक सांगतात की ती चणेही आधी स्वत: चावून , बारीक करून मला भरवायची ! अगदी आख्यायिका वाटावी अशी ही सत्य घटना अनेकांनी पाहिली होती व मी मोठा झाल्यावर मला आवर्जून सांगितलीही होती ! ती माझी इतकी काळजी का घेत होती , हे मला कधीच समजू शकले नाही ! मी तिचा नातेवाईकही नव्हतो . पण तिचे नि माझे काही वेगळेच रुणानुबंध होते , हे अनेक घटनांनी सिध्द केले आहे ! 

तिचे किस्से 
                 मी अगदी लहान असतांना आशाआते मला घेऊन पाय-यांवरून खालच्या आईच्या अंगणात गडगडत गेली . सुदैवाने मला लागले नाही . आयुष्यातल्या त्या पहिल्यावहिल्या अपघातातून मी सहीसलामत वाचलो होतो ! पण खालच्या आईचे काळीज हलले होते . त्या दिवशी तिने आशाआतेला इतके धू धू धूतले की पुढे कित्यक महिने आशाआते तिच्यासमोर जायला धजत नव्हती ! अर्थात , मला हे कळण्याचे माझे तेव्हा  वय नव्हते . पण पुढे अनेकदा हा किस्सा सांगितला गेला . केवळ माझ्याच बाबतीत नव्हे ; तर गावातल्या अनेकांच्या बाबतीत तिचे किस्से आजही ऐकायला मिळतात . ती होतीच तशी ! अनेकांना तिने ऐन अडचणीच्या वेळेला मदत केलेली होती . कोणताही सण असो , तिने कधी एकटीने साजरा केला नव्हता ! प्रत्येक सणाला तिच्याकडे बायका जमायच्या . तिचे नातेवाईकही यायचे . पण ती स्वत: स्वयंपाक करून सगळ्यांना आवर्जून वाढायची !   तिच्या हाताला चवही सुंदर होती . तिचे एक मात्र होते , तिने केलेला प्रत्येक पदार्थ पहिल्यांदा ती मला खाऊ घालायची ! मग ती पुरी असो , पुरणपोळी असाे ! ती कोंबडीचे मटणही खूप मस्त करायची. गंमत म्हणजे , ती काळीज स्वत: होऊन माझ्या ताटात वाढायची ! मला आवडायचे म्हणून , मटणात ती आवर्जून बटाटे घालायची ! मीही ते आवडीने खायचो . पहिला पदार्थ मला देण्यात , तिची नातवंडं , पतवंडं तिथे असली तरीही कधी खंड पडला नाही ! हे असं का होतं , हे मला कधीच समजलं नाही ! तिला विचारण्याची कुणाची हिंमत झाला नाही . माझीसुध्दा ! खूप काही लिहायचं आहे . लवकरच अशा अनेक आठवणी मी सविस्तर लिहिणार आहे .... 

...............................