शनिवार, ५ एप्रिल, २०२५

लोकमान्य गद्दारी !

 लोकमान्य गद्दारी ! 


मला वाटते जे आरोप करत राहतात त्यांनी आत्मपरिक्षण करावे. त्यांच्या आरोपात उचित आरोप किती आणि बिनबुडाचे आरोप किती हे तपासावे.‌ ज्यांच्यावर ते आरोप करतात त्यांचे वागणे तपासावे. तुम्ही कितीही आरोप केलात तरी ते यशस्वी कसे होतात ? हे अभ्यासावे. ते काय डोके लढवतात, कोणत्या युक्त्या करतात, कसे झुलवतात ते तपासावे.‌ कोणती स्वप्ने दाखवतात आणि काय करण्याचे वा दाखवण्याचे कटाक्षाने टाळतात ते पहावे.‌ नुसतीच नांवे ठेवून, आरोप प्रत्यारोप करून , वार पलटवार करून उपयोग शून्यच होतो आहे तर आपली पध्दत नको का बदलायला ? 


एकाच चालीने चालत राहून तुमच्या मागून कोण चालत राहणार ? लोक एकसुरीपणाला , तोचतोचपणाला कंटाळतात. काही तरी नवीन तुमच्याजवळ हवे लोकांसाठी. नुसतीच शब्दबंबाळ वाचाळता उपयोगाची नाही. ते रेटून खोटे बोलत असतील आणि लोकांची लायकीही तेच खरे समजण्याची असेल, तर तुम्हीही रेटून खोटे बोला की ! कोण रोखणार तुम्हांला ? ते खोटे बोलत असतील तर त्यांना कोणी रोखले ? लोकांमध्ये एवढी हिंमत कधीच नसते. लोक कुठे प्रामाणिक असतात ? भावकीत कंदाल सुरूच असते !  तेव्हा तुम्हीही  प्रामाणिक असणे अजिबात उपयोगाचे नाही. तुमच्या निष्ठावंतपणाचा काहीच उपयोग नाही. दुनिया गद्दारीवर चालते. हजारो वर्षांचा इतिहास साक्षी आहे ! म्हणूनच गद्दारही प्रतिष्ठा मिळवून जातात. भाव खाऊन जातात. स्वच्छ चेहरा आता अडसर होतो ! मि. क्लीन गेले आता ! ती प्रतिमा वेगळी . ही प्रतिमा वेगळी . आता उपयुक्ततेची प्रतिमा उपयोगाची असते. काळ बदलला भाऊ. भाऊसुध्दा आपला राहिला नाही. मूळात तो आपला नव्हताच ! परक्यांच्या इशाऱ्यांवर नाचणारा तो आपला होताच कुठे ! खुद्द बाप आपल्या मुलाला ओळखू शकत नाही. तिथे भावाचे काय घेऊन बसलात राव ! भाव कोणाचा ? त्याचा भाव किती ? तो तुम्हांला भाव देतो का ? तर नाहीच ! उगाच वावडयांना खरे मानण्यात अर्थ नाही. भावडयांचे प्रेम खरे नाही ! ते तळ्यात मळ्यात ! नाद सोडून द्यावा. 


भगदाड पडलेले किल्ले जवळ बाळगण्याचा अट्टाहास उपयोगाचा नसतो. जाणार ते जाणार. भुलवणार ते नाणार. हल्ली तेही कुठे दिसत नाही. जाणार की राहणार हा विषयच नाही ! एके काळी केवढी रस्सीखेच होती ! ते आरोप प्रत्यारोप कुठे गेले ? तो खटाटोप कुठे गेला ? कशासाठी होता तो ड्रामा ? आता वेगळा ड्रामा करा. एकमेकांविरूध्द आरोप करण्यापेक्षा लोकांना फुकटचे देतो , आयते देतो , असे दाखवून लोकांचाच पैसा लोकांच्याच तोंडावर मारा की ! त्यांना मिंधे बनवा. नुसते म्हणत बसू नका की हे असे करतात, ते तसे करतात. लोकांना भुलवतात. भुलवाना लोकांना तुम्ही पण ! लोक भुलतातच. संतांनाही भुलतात. असंतानाही भुलतात. लोकांनी स्वतःला पर्यायच ठेवलेला नाही. तुम्ही मारल्यासारखे केलात आणि दुसऱ्यांनी लागल्यासारखे केले तरी लोक ते खरेच समजून रडू लागतात ! 


तेव्हा बिनधास्त. लोक काय म्हणतील यापेक्षा लोकांना उल्लू कसे बनवता येईल हा आजचा आदर्शवादी विचार तुम्हीही कृतीत आणा. उगाच आरोप प्रत्यारोप, उखाळयापाखाळया करू नका. ऐकून ऐकून लोक कंटाळले आणि दुसऱ्यांकडे गेले ! त्या दुसऱ्यांचे गूण घ्या. त्यांनी गद्दारी केली तर तुम्हीही करा. तीच हल्ली सर्वमान्य आहे ! लोकमान्य आहे ! 



...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

०९.१२.२०२४ सकाळी ०६.४५

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

वेळीच सावरले नाही तर

 वेळीच सावरले नाही तर

आपण जोडतो त्याला जोडपे म्हणतो. पती पत्नीचे नाते हे जोडण्यासाठी असते. जोडण्याची कला आणि दृष्टी ज्यांच्या अंगी असते ते सतत एकमेकाला एकमेकांशी जोडत राहतात. प्रसंगी राग गिळतात. कडू घोट गिळतात. पण दुसऱ्याला दुखवत नाहीत.‌ कटुता कटाक्षाने टाळतात.‌ एकमेकांना कायम धरुन राहतात. ते एकमेकांची किंमत जाणतात. ओळखतात. संसाराचे मर्म जाणतात. खरा संसार करतात. एकमेकांसाठी, कुटुंबासाठी जगतात.

काहींचे मात्र याच्या अगदी उलट असते. दोघांचेही अहंकार इतके आडवे येतात की कुटुंबात असूनही ते परस्परांना दोन स्वतंत्र व्यक्ती समजतात. रीतसर धार्मिक विवाह करून , धर्माला , देवादिकांना स्मरून लग्नमंडपात आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेऊन, शेवटी एकेरीवर , लढाई झगड्यांवर येतात. किती केले तरीही देव, धर्म, संस्कार हे सारे कुचकामी ठरतात. नवरा बायकोचे अहंकार डोके वर काढतात. आपण, आपला हे शब्द ती चुकूनही उच्चारत नाहीत. उलट मी, माझे हेच शब्द गोंजारत बसतात. याचा दुष्परिणाम आपल्या मुलांवर होतो आहे हे स्वतःला जाणवूच देत नाहीत. प्रसंगी मुले यांच्याच पावलांवर पाऊल टाकतात व त्यांनाही यांच्याप्रमाणेच कुटुंबापेक्षा स्वतःचेच मुद्दे व जीवन महत्वाचे वाटू लागते. ही मुले बिघडतात. पुन्हा मुलगा तुझ्यामुळे बिघडला असे नवरा पत्नीला म्हणतो तर मुलगी तुमच्यामुळे बिघडली असे तिची आई आपल्या नवऱ्याला म्हणते. मुलगा असो वा मुलगी , पती पत्नी एकमेकांवर मूल दुसऱ्यामुळे बिघडले हाच एकमेव आरोप करतात. यातून दोघेही एकमेकांचा उध्दारच करतात ! एकमेकांना शिवीगाळ करतात. प्रसंगी मारामारी करतात. पत्नी मिळेल ती वस्तू पतीला फेकून मारते.  पती दारू पिऊन पुन्हा पुहा धिंगाणा करतो. हे संसार चक्र असेच अव्याहतपणे चालू राहते. जीव गेलाच तर आपल्याच माणसाचा जाईल हे यांच्या गावीच नसते. पत्नी पतीचा मुलांसमोर अपमान करते. पती मुलांसमोर पत्नीला मारझोड करतो. हे चालूच राहते. मुले कधीच वाईट मार्गाला लागलेली असतात. चांगले जगण्याची कुटुंबाची वेळ कधीच निघून गेलेली असते. ते कुटुंबच उध्वस्त झालेले असते. मित्रांनो, त्यांचे त्यांनीच उध्वस्त करून घेतलेले असते.

असे दिसून येते की, जोडप्यांमध्ये ही भांडणे साधारणतः पन्नाशीच्या आसपास घोंघावतात. तेव्हा मुलेही मोठी होऊन त्यांचे गूण कळलेले असतात. पती पत्नी मधील नवेपण संपत आलेले असते. प्रत्येकाचे एक स्वतंत्र आयुष्य आता सुरू झालेले असते. खरे तर आतून ते हवेसे वाटू लागलेलेच असते.‌ आता मी सुटलो किंवा आता मी सुटले, माझ्या मनाप्रमाणे मी जगायला मोकळा किंवा मोकळी अशी वाक्यं सर्रास बाहेर पडू लागतात.‌ ह्यातल्या आता या शब्दाला विशेष महत्व आहे. कारण आता,  विशेष म्हणजे जीवनाचे वाढते व्याप वा वयाचा परिणाम म्हणून, या वयात पती पत्नीमधील शारिरिक संबंध कमी होऊन , त्यामुळेही त्यांना एकत्र ठेवणारा दुवा कमकुवत होऊ लागलेला असतो. प्रजननक्षमता हाच खरा  मानवाचा नैसर्गिक शक्ती स्त्रोत आहे. तोच कमी झाला तर हार्मोन्समध्ये बदल होऊन काही गोष्टी घडतात. शरिराची, मनाची तगमग, तडफड बुध्दीवरही परिणाम करते. विचारांचा समतोलपणा कमी होतो. चिडचीड होते. जरा काय झालं तर दुसऱ्याची चूक लगेच दिसतेच असे नाही, तर तिच्यावर बोटही ठेवले जाते ! पराचा कावळा होतो. संशयाची परिसीमा होते ! इथेच आग लागते !  सर्वांच्याच बाबतीत हे होईल असे नाही. पण काहींच्या बाबतीत हे होते एवढे नक्की ! वाढणारी भांडणे जोडप्यातले उरलेसुरले आकर्षण वा प्रेमही संपवतात. त्यातून आपुलकी संपते. बारिकसारीक कारणांवरून वाद होत राहतात. लक्षात घ्या मित्रांनो, वेळीच सावरले नाही तर संसार उध्वस्त होतात.

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
३०.०६.२०२४ सकाळी ०७.५०

मोबाईल व इंटरनेट

 

मोबाईल व इंटरनेट हे आताच्या काळाचे महान योग प्रशिक्षक

इंटरनेट सुरू झालं तेव्हा रंगीत संगणकही आम्ही नुकतेच वापरू लागलो होतो. डेस्कटॉप म्हटलं की कसं त्या जमान्यात गेल्यासारखं वाटतं. मला ते दिवस आठवतात. संगणकावर काम करायला खूप मजा यायची. मी पूर्वीही कुठेतरी लिहिलंय की विजय तुरळकर आणि मालवणहून आलेले सुनिल मयेकर हे आमचे ब्लॅक अॅंड व्हाईट ( काळे-गोरे म्हटल्यास उडदामाजी वाटण्याची शक्यता आहे ! ) संगणकाचे मास्टर्स होते. त्यावेळी साहेब या दोघांशिवाय कोणाला संगणकाला हात लावू देत नसत. मी पगारबिलाची रजिस्टर्स लिहून पुढ्यात घेऊन बसायचो. हे दोघे स्ट्रक्चर तयार करायचे आणि मी लिहिलेल्या रकमा पटापट संगणकात फीड करायचे.‌ मी नुसताच बघत बसायचो. मला ते काम करायला हे दोघेही सांगायचे. मनातून आवडत असले तरी संगणकाला हात लावायचा नाही हे साहेबांचे शब्द आठवायचे आणि माझ्या मनातली संगणकाची भीती आणखी वाढायची. पण सहा महिन्यांत ह्या दोघांनी मला संगणकावर काम करायला लावलंच. त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे मी भीत भीत का होईना संगणकाला हात लावला ! तो हात पुढे सेवानिवृत्त होईपर्यंत कायम राहिला. मी पुढे केलेला हात पाहून संगणकानेही हात पुढे केला असावा. पुढे आमची दोस्तीच झाली. संगणकामुळे माझं काम किती तरी  कमी झालं. मी तर त्याला गणपतीच समजायचो. माय फ्रेंड गणेशा हे गाणं तेव्हा जन्मालाही आलं नव्हतं तेव्हा आमची घट्ट मैत्री झाली होती ! रंगीत संगणक आणि इंटरनेट आल्यावर तर काय बहारच आली !  तेव्हा आम्ही  वरिष्ठांचे डोळे चुकवून कधी कधी इंटरनेटच्या जगात जायचो. गूगल, रेडीफमेल आणि ब्लॉगींगशी ओळख इथेच झाली. तेव्हा सगळं इंग्रजीत असायचं. माझं इंग्रजी चांगलं असल्यामुळे मला या गोष्टी फारशा कठीण गेल्या नाहीत. मात्र तेव्हा इंटरनेटची स्पीड फारच कमी असायची. ऑफीसची कामंही कधी कधी रात्री एक एक वाजेपर्यंत करावी लागायची. या कामातही आम्ही कधी कसूर केलेली नव्हती. उलट ही कामे ऑनलाईन असल्याने आनंदच वाटायचा. याच काळात कधी तरी स्पीडमास्टर भगवान मुकादम भेटला ! मी आणि आमचे काशिनाथ नार्वेकर तर त्याची संगणकाच्या कीबोर्डवर गतीने फिरणारी बोटं पाहून आमच्याच तोंडात बोटं घालायचो ! आमच्यादृष्टीने तो वेगाचा भगवान होता. हसतमुख भगवान बोलतोही गतीने . सद्या तो मित्रवर्य अभिजित हेगशेट्येच्या नवनिर्माण संस्थेत आहे. मध्यंतरी नवनिर्माणमध्ये माझा गझलांचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा तो भेटला होता. त्यानेच  रेडीफमेलवर आमची पहिली ईमेल आयडी तयार करून दिली होती. तेव्हा आम्हांला केवढा आनंद झाला होता ! जीमेलचा शोध आम्हांला खूप नंतर लागला !

ऑनलाईन समाज माध्यमे व व्यावसायिक

आता तर फेसबूक, इन्स्टाग्राम ( यातला ग्राम हा शब्द मराठी वाटावा इतका मराठी माणसांच्याही  ओळखीचा झालेला आहे ! ) , व्हॉट्स अॅप सारखे केवळ सोशल मिडीयाच नव्हेत तर अॅमेझॉन , फ्लिपकार्ट सारखे अनेक व्यावसायिक ऑनलाईन प्रकारही आता आले आहेत. बरेच जणं आता ऑनलाईन खरेदी करतात ! आता इंटरनेट त्यामानाने अधिक गतीमान झाले आहे. तेव्हा आम्ही शासकीय कामे करतांना भूकतहानही विसरून जायचो. आताही लोक तहानभूक विसरून कामं करतात. पण केवळ तहानभूकच नाही तर आपल्या बाजूला माणसंच आहेत हे विसरून जातात ! माणसाला माणसाची चाहूल लागत नाही. माणसांचा माणसाशी संवादच तुटला आहे. मौनव्रत हे कठीण काम मोबाईल व इंटरनेटने किती सहजपणे सोपं केलं आहे पहा ! ते शिकवायला आता कोण्या योगी महात्म्याची गरज पडत नाही. मोबाईल व इंटरनेट हे आताच्या काळाचे महान योग प्रशिक्षक झाले आहेत. हे गूण  ते बोलल्याशिवाय शिकवतात !! पण ते अबोलपणा व न ऐकणे हे दोन दोषही शिकवतात. पुढच्या पिढ्यांना बोलायची व ऐकायची सवय राहिली नाही तर अनेकजण मुके व बहिरे होतील, हे नक्की ! काळजी घ्या मित्रांनो ! जर शरीराचा एखादा भाग दीर्घ काळ वापरलाच नाही तर तो बंद पडतो किंवा गळून पडतो. आपल्या शेपटीसारखाच ! आता तरी कळलं ?

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

सौ. टीव्ही मालिका बघत असते

सौ. टीव्ही मालिका बघत असते. मी बाजुला माझे लेखन करत तिला साथ देत असतो. तसा आमच्याकडे दिवसातून फार तर दोन अडीच तास टीव्ही चालू असतो. टीव्ही चालू असतो म्हणजे काय , तर मालिका चालू असतात. त्याच त्या. बाकी बातम्या बघणे मी गेली काही वर्षे जवळजवळ सोडूनच दिले आहे. बऱ्याचश्या बातम्या राजकीयच असतात आणि त्याच त्याच ब्रेकींग न्यूज म्हणून दिवसरात्रभर हंबरडे फोडीत असतात. आता पाऊस नुकताच सुरू झालाय . नैसर्गिक गोष्ट आहे ती. पण यामागेही कोणी तरी माजी नेता असावा अशी राजकीय ओरड सुरू व्हायची शक्यता नाकारता येत नाही. हे उदाहरण मी हल्ली बातम्या राजकीय हेतूनेही दिल्या जातात , त्यांची त्यांची म्हणे चॅनेल्स असतात, आरोप-प्रत्यारोप होतच असतात, हे सांगण्यासाठी दिलंय. एरव्ही आता ही सगळी सोंगं आपल्या अंगवळणी पडून गेली आहेत. तुमच्याही 😂 ! आपल्याला सोंगे आणि सोंगाडे याविषयी काही बोलायचं नाही. आपला विषय समस्त महिला वर्गाच्या आवडीचा विषय आहे. टीव्हीमालिका ! 


जेवढ्या म्हणून सौ. मालिका बघते त्या सगळ्यांतच एक समान गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल दुसरं काय असणार, रटाळपणाच असणार ! अहो, तोही परवडला. नाही तरी आपल्याला कुठे ते पहायचंय ! आपला लेखन उद्योग करता करता कानाडोळयावर अधूनमधून ते पडत असतंच. शिवाय सौ. जोरात व्यक्त , रिअॅक्ट हो, झाली की आपलं लक्ष जातंच. सौ.साठीतरी आपल्यालाही प्रतिक्रिया द्यावीच लागते. कधी कधी अशी प्रतिक्रिया देता देता आपणच त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकतो. हो, मी टीव्हीला आता ईडीयट बॉक्स समजत नाही. आपल्याला धूर्तपणे त्याच्या जाळयात ओढणारा कोळी समजतो. होतं काय, एखाद्या प्रसंगाला रिअॅक्ट होतांना सौ.बरोबर आपणही नकळतपणे एवढे ओढले जातो की आपणही काही काळ का होईना ती मालिका बघत बसतो. ( सौ.चा ! ) गूण नाही तरी वाण लागतो म्हणतात ना तो असा. मग आता धूर्त कोळी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ? टीव्हीला म्हणतोय हा मी . हसू नका !


तर ह्या टीव्ही मालिका. त्यांच्यातला एक समान धागा. तो म्हणजे प्रत्येक मालिकेतल्या प्रत्येक कुटुंबात सतत चालणारी कपटनीती ! यात चांगल्या तीन चार महिला आणि त्यांना साथ देणारे किमान एक दोन पुरूष तर असतातच. ह्या पुरूषांना डोके नावाचा भाग नसतोच आणि त्या दुष्ट बाया नाचतील तसं नाचण्यावाचूनही पर्याय तिथे नसतोच, असं चित्र असतं !  त्या बायका सारखे आपल्याच घरातल्या एखाददुसऱ्या बाईला उध्वस्त करण्याचेच प्लॅन करत असतात. कधी कधी वाटतं आपल्या योजना आयोगात यांची भरती करावी. तिथे देशाच्या भल्यासाठी योजना करतात ! पण टॅलेंट यूजफूल ! उपयुक्त कौशल्य ! काही असो, पण मालिकेत किमान महाराष्ट्रातल्या तरी राजकारण्यांनाही हरवतील अशी कपटनीती त्या करतात ! तीही न थकता ! मी परत येईन, मी परत येईन, असं नुसतंच न म्हणत बसता, त्या हटकून परत येतात. परत , परत परत येतात ! चांगली माणसे बोलतांना तर त्या हटकून तिथे टपकतात आणि कितीही अंतरावरून शब्दनशब्द ऐकतात ! कर्णपिशाच्चंही त्यांच्यापुढे हात टेकतील ! बरं, हे एकदोनदा नव्हे तर अनेकदा होते ! ही कपटनीती थांबत नाही . मालिका संपत आली असं वाटत असतानाच त्या असा काही ट्विस्ट ( हा हल्ली तिथे परवलीचा शब्द झालेला आहे ! ) आणतात की ती मालिका मैलोनमैल लांबत जाते !! म्हणजे ह्या कपट नीती करणाऱ्या बायकां निर्मात्यांना अधिक हात देतात की काय असे वाटण्याजोगीच ही परिस्थिती आहे ! ही कपट नीती व मालिकांचे अनावश्यक लांबत जाणे कधी थांबणार , हाच खरा प्रश्न आहे ! 


भाग २ :


टीव्ही मालिकेतले लेडीज व्हिलन आणि त्यांची सततची वाढती कपटनीती हा कालचा लेखनप्रपंच तुम्ही वाचलात . त्यावर बोलक्या प्रतिक्रियाही दिल्यात याबद्दल मनापासून धन्यवाद. अर्थात, टीव्ही मालिकांचे जग हे काल्पनिक आहे. कधी कधी तर ते वास्तवाच्याही पुढे जाते. आपणही ते खरंच मानून जातो. हिरीरीने त्यावर चर्चाही करतो. माणसांचा गूणधर्म आहे तो ! माणसांचा आणखी एक गूणधर्म म्हणजे एकत्र येणे. काही ना काही निमित्तांनी, कारणांनी माणसे एकत्र येतात. माणसांचे गट बनतात. आता तर आॅनलाईनही गट बनतात. गटांचे उपक्रम ठरतात. ते मोठ्या उत्साहात  सुरूही होतात. त्यांचे फोटो होतात, व्हिडीओ होतात. मंडळी अगदी आनंदित होतात. एकमेकांच्या कौतुकात न्हाऊन निघतात. काय करू नि काय नको असं होऊन जातं. हात आभाळाला टेकले या उक्तीचा आनंद घेत तरंगत आपापल्या घरी जातात. यानंतरही काही कार्यक्रम होतात. पण तो पहिलेपणाचा उत्साह काहीसा कमी होतो.‌ प्रारंभ दिवशीची गटाची हजेरी घसरते. फोन करूनही काही जण काही ना काही कारणांनी त्यांच्या नाईलाजास्तव येऊ शकत नाहीत. गटाला गळती लागते. पुढेही अशीच काही ना काही माशी शिंकत राहते आणि एके दिवशी सर्वांचाच उत्साह मावळतो. आता कुणालाच रस उरत नाही. आरंभशूर लोकांचं हे असंच होतं. हे नाईलाजास्तव होत जातं. सतत बदलणे हा सृष्टीचा स्वभाव आहे. त्याला ते तरी बिचारे काय करणार ! 


मात्र, या उलटही घडत असतं. अनेक वर्षे लोक टिच्चून एकत्र येतात, नियमित कार्यक्रम करतात. आरंभशूर लोकांना याचेच आश्चर्य वाटते. ते आपलं असं का झालं याचा उहापोह करत नाहीत. आपला नाईलाज होता म्हणतात आणि याच कोषात पडून राहतात. पुन्हा कधी तरी कोणाला तरी उर्मी येते आणि तो नवा गट स्थापन करतो. पुन्हा तोच आरंभशूरपणा होतो. पुन्हा एक गट थंड होतो. त्याचवेळी दुसरीकडे एखादा गट आपला कितवा तरी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. त्यातही फोटो होतात, व्हिडीओ होतात. पण शेवट होत नाही. मंडळी त्याच उत्साहाने पुढील उपक्रमाच्या नियोजनाकडे वळतात आणि तो उपक्रम करूनही मोकळे होतात. हा क्रम वर्षोनवर्षे सुरू राहतो.  दुसरीकडे मात्र शिथिलता येते जाते. मग एकमेकांवर खापर फोडले जाते . दोषारोप होतात किंवा सोयीस्करपणे सारे विसरले जाते. काहीही होवो, हे गट गटांगळ्या खात राहतात. उपक्रमांच्या जगात ह्या दोन घडामोडी घडतच राहतात ; घडतच राहतात. 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील




वडाच्या झाडावरून

 वडाच्या झाडावरून जमिनीवर !  


काल वटपौर्णिमा संपन्न झाली. मीही सौ. बरोबर गेलो होतो वडाच्या झाडाकडे. मी वड वड म्हणतोय पण ती तर वटपौर्णिमा आहे. मला हा प्रश्न पडतो की वडाच्या झाडावर सत्यवानाला बसवूनही वडपौर्णिमा ऐवजी वटपौर्णिमा का म्हणतात ? संसारात सौ.ची चालणारी वट आणि ह्या ' वट ' चा काही पूर्वापार संबंध तर नाही ना ? की संसारातल्या माझ्या काही चावटपणाचा ह्या वटशी संबंध आहे. गंमत केली हा. वड म्हणजेच वट हे माहिती आहे मला. वटावर म्हणजेच वडावर चढून बसलो होतो मी ! असो, अखेरीस आता जमिनीवर आलोय बा ! नाही आलो असतो तरी सौ. ने आणलेच असते की ! सावित्रीची शक्ती आहे ना तिच्याकडे ! 

तर सांगत होतो काय काल तिच्या एका भावजयीचा फोन आला होता. विषय अर्थात वटपौर्णिमा हाच होता. तू पूजा कधी केलीस ? मी पूजा कधी केली ? माझा सत्यवान माझ्या सोबत आला होता , तुझा तुझ्यासोबत आला होता का ? मुहूर्त अमूक ते अमूक होता. मी साधला . तू साधलास की नाही ? आमच्याकडे काही लोकांनी तर आज मासे पण खाल्ले ! तुमच्याकडे नाही खाल्ले का ? .... काय काय चविष्ट प्रश्नं होते तुम्हांला सांगू ! आमचा उपवास होता हो ! पूर्ण शाकाहारी ! तरी बरं , डाळ भात लोणचं कोण नाय कोणचं , असं असलं तरी मला तेच आवडतं. मी तसा बऱ्यापैकी शाकाहारी आहे .

माझं पुराण राहुदे. पुढचा प्रश्नं ऐका. मग बोला. विषय गर्दीवर आला. गर्दीच्या उत्साहावर आला. पण तो काही फारसा उत्साहवर्धक दिसला नाही. तू गेलीस तिकडे किती गर्दी होती ? किती जणी आल्या होत्या पूजा करायला ? या प्रश्नावर ती उद्गारली, अगं, कसली गर्दी नि कसलं काय ! नव्या सुनांना फारसं कौतुकच नाही मेलं ! आम्ही पण आता सवयीनेच करतो म्हणा ! इथे एक जन्म व्यवस्थित जमत नाहीय, चालत नाहीय तिथे सात जन्म म्हणजे फारच अवघड बाई ! आजकाल याच जन्मात पतींची अदलाबदल करतात म्हणे, तिथे तर पुढच्या जन्मात नक्कीच बदलून मागतील ! यावर नणंद भावजयीचं प्रचंड एकमत होऊन त्या खदखदा हसू लागल्या !  हे ऐकून व पाहून मी वडाच्या किंवा वटाच्या झाडावरून खाली सरसरत आलो नसतो तरच नवल ! मला सत्यवानांची ( दुरा )अवस्था कळली आणि मी सौ. आणि तिच्या भावजयीसमोर नतमस्तक झालो ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील



भावव्याकुळ !

 भावव्याकुळ ! 


तुम्ही म्हणाल परमेश्वर तर कणाकणात भरलेला आहे. क्षणाक्षणात आहे. पणापणात आहे.‌ मनामनात आहे. अनेक शहाण्यांनी त्याच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. हा अतीशहाणा आता काय परमेश्वराबद्दल सांगणार ! अगदी बरोबर आहे. ते थोर. त्यांची प्रतिभा असामान्य. त्यांची झेप मोठी. आवाका मोठा. कुवत मोठी. जनकल्याणाची तळमळ मोठी. मी यत्किंचित. एवढासा. माझी बालीश बडबड असेही म्हणायची मला चोरी. कारण आधी हेटाळून, फेटाळून मग माऊली म्हटलेल्या ज्ञानेश्वरांनी ते आधीच म्हणून ठेवले आहे ! तसे इतरही अनेक आधुनिक प्रभावशाली लोकही बरेच काही म्हणतात . ते म्हणतील तिथे परमेश्वर धावतो. कोरोना आला. ते म्हणाले आवर त्याला. थांबव त्याला. तो धावला. त्याने कोरोना थांबवला. गरीबी संपवण्यासाठीही म्हणे कोरोना आला होता. गरीब संपले. त्याचा धावा करण्यासाठी, लाचार होऊन याचना करण्यासाठी, गरीबी तिथेच राहिली. तो सामान्यांचा वाली ! पण सामान्य कुठे भाग्यशाली ! ते न दिसणाऱ्या त्याच्या पायाशी लोळण घेत राहिले तर त्याचे अस्तित्व राहील. कारण त्यांचे एकमत होत नसले तरी सामान्यांकडे बहूमत आहे. बहूमताचाच विजय होतो. महाभारतात सर्वनाश होऊनही अल्पमतातील पांडव जिंकले. कारण परमेश्वराने त्यांची बाजू घेतली. तिथे बहूमत असूनही कौरव पडले ! पराभूत झाले ! ही एक समजूत आहे. आपण आपल्या मनाच्या अशा बऱ्याच समजुती करुन घेत आलो आहोत. परमेश्वर असा आहे, तो तसाही आहे. एकाच वेळी तो निर्गुण आहे, निराकार आहे आणि त्याच वेळी तो अनेक गूण व आकार घेऊन चमत्कारही करतो आहे. खरे तर चमत्कार म्हणजे त्या घटनेबाबत आपण अंधारात असणे. तिचे आकलन होत नसल्याने वर्तमानात काही गोष्टी चमत्कारच वाटतात. पण आपण फार उदात्तीकरणवाले आहोत. त्यामुळे कोणत्याही घटनेचे पूर्ण आकलन होण्याआधीच उचलली जीभ लावली टाळ्याला असे करतो. काही लोक तर अशा घटना मुद्दाम पसरवतात. स्तोम माजवतात. रेटून रेटून पुन्हा पुन्हा तेच तेच ठसवतात.  त्यांना त्यांची दुकाने चालवून सामान्यांना लुटायचे धंदे करायचे असतात. परमेश्वर कोरोना थांबवू शकतो पण ह्या लबाड दुकानदारांना नाही ! 


तर अशा घटना घडतात. सामान्य , असामान्य. साध्या विलक्षण. सरळ, वाकड्या. थेट, संभ्रमात टाकणाऱ्या.  कधी ह्या घटनांकडे आपण नीट पाहू शकत नाही. कारण आपण घटना चक्रात ओढले जातो. आपल्या डोळ्यांवर गांधारीची पट्टी येते ती इथेच ! घटना केवळ एकच घडून थांबत नाही. एक घटना दुसरीला, तिसरीला अशा अनेक घटनांना जन्म देते. आपण स्वतः काही करायला जातो तेव्हा आपणही घटनांना जन्म देतो ! केवळ परमेश्वरच देतो असे नाही. कारण हे परमेश्वराचे कारस्थान नाही, ही मानवा तुझ्याच बुद्धीने तूच केलेल्या कर्मांची फळे आहेत, असे आपणच कोणाकडे तरी बोट दाखवून सांगतो ! म्हणजे माणूस काही घटनांना स्वतःच निर्माण करतो. निदान पहिली घटना तरी निर्माण करतो. मग कदाचित ती घटनाच पुढच्या घटनांना जन्म देत असेल. माणसांच्या हातात शेवटी काही उरतही नसेल. त्या घटनेचा गैरफायदा दोन्ही बाजूचे लोक उचलू लागले तर मग हताश होऊन हाक कुणाला मारणार ? परमेश्वरालाच ! थोडक्यात, परमेश्वर घटनाचक्रातच कुठे तरी आहे. कारण परमेश्वराची निर्मिती हीसुध्दा एक घटनाच आहे ! प्रसंगच आहे. म्हणूनही प्रसंग आला की अजूनही आपण  परमेश्वरालाच हाक मारतो ! खरे तर, जे व्हायचेच असते तेच होते. जे होणारच नसते ते कधीच होत नाही. आपण भावव्याकुळ होतो हे मात्र खरे ! 




...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

०२.१२.२०२४ सकाळी १०.५०

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

ऐन दिवाळीत पाऊस

 पणत्यांवर पाणी ...


ऐन दिवाळीत पाऊस पडतो आहे. भक्तीभावाने लावलेल्या पणत्यांवर पाणी पडते आहे. बहुतेक पाऊस पडू दे , बहुतेक पाऊस पडू दे च्या प्रार्थना जास्त झाल्या असाव्यात. माणसाने बाकी काय केले ते बोलायचे नाही. कित्येक वर्षे रस्त्यांची कामे रखडत सुरू आहेत. हजारो किलोमीटर दूतर्फा असलेल्या झाडांच्या कत्तलीबद्दल बोलायचे नाही. माणसाने काय केले याबद्दल माणसानेच  ब्र देखील काढायचा नाही. आयाराम गयारामगिरीबद्दल बोलायचे नाही. भ्रष्टाचार हा मुद्दा तर आता गेल्यातच जमा आहे. 


कालच लक्ष्मी पूजन झाले. लक्ष्मीसाठी काहीही करावे लागते. करतात. पण त्याबद्दल बोलायचे नसते. लक्ष्मीचा कोप होतो अशा कहाण्या आधीच पेरलेल्या आहेत. वाट्टेल ते केले , भ्रष्टाचार केला तरी चालते , त्याने लक्ष्मीच प्रसन्न होणार. किती चांगले आहे ना ! उपासतपास करून, साधना करून लक्ष्मी प्रसन्न होते ही भावना आहे. दुसऱ्यांना गंडवून, भ्रष्टाचार करून लक्ष्मी प्रसन्न होते हा शुध्द व्यवहार आहे. जग व्यवहाराने चालते. तुमच्या भावनांचे मतांमध्ये रूपांतर केले जाते त्याला व्यवहार म्हणतात. कथांच्या आणि स्लोगन्सच्या माध्यमातून तुम्हांला भावनिक बनवले आहेच. उल्लू बनवले की नाही तुम्हांला ? या उक्तीमध्ये प्रचंड व्यवहार असतो. हा व्यवहार जे साधतात त्यांच्याकडे लक्ष्मी येते. बाकीचे संध्याकाळचे दरवाजे उघडून आयुष्यभर वाटच बघत बसतात . वर म्हणत बसतात, दिवाळीत पाऊस कसा , दिवाळीत पाऊस कसा  ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

०२.११.२०२४. सकाळी ०६.३०

ते अनारसे वेगळे होते !

 ते अनारसे वेगळे होते ! 


दिवाळी म्हटली की फराळ आला. फराळ म्हटले की अनारसेही आलेच. आता ते दुकानात कधीही मिळतात. पण आमच्या लहानपणी ते दिवाळीतच केले जायचे. मला ते खूप प्रिय झाले होते. घरच्यापेक्षा सुगंधाकाकूच्या हातचेच अनारसे मला जास्त आवडू लागले होते. सुगंधाकाकू म्हणजे सीताराम गुरव काकांची पत्नी.‌ आमच्या देऊळवाडीत त्यांचे घर शेवटी तर पहिले घर आमचे होते. मधली पंचवीस तीस घरे ओलांडून ती माऊली माझ्यासाठी दिवाळीच्या सकाळीच अगदी नुकतेच केलेले अनारसे घेऊन न चुकता यायची ! तिच्या हातचे पहिले अनारसे खाण्याचे भाग्य अनेक वर्षे मलाच मिळायचे !


तिचा माझ्यावर खूप जीव होता. त्यालाही वेगळेच कारण होते.  तिचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. ती गाईम्हैशी खरेदी करायला स्वतः जायची. एकदा ती अशीच निघाली होती तेव्हा जाण्यापूर्वी आमच्याकडे थांबली होती. आमचे घर वाटेवरच होते. तिच्या काय मनात आले कोण जाणे , तिने अचानक मला विचारले की म्हैस आणायला जाते आहे, जाऊ का ? मी हो म्हणालो तशी ती उठली आणि येते म्हणून म्हैस खरेदीला निघून गेली. त्या दिवशी तिने खरोखरच एक म्हैस खरेदी करून तिच्या घरी आणली. त्या म्हैशीने तिला खरी बरकत दिली. दुधाचा धंदा वाढला. काकू तिला लक्ष्मी म्हणू लागली आणि ही लक्ष्मी तिला माझ्या शब्दांमुळे मिळाली हे ती सगळ्यांना सांगू लागली. इतकेच नाही तर पुढे ती कोणत्याही कामाला निघाली की मला विचारायला यायची. अशा अशा कामाला जातेय, ते काम होईल की नाही ते सांग म्हणायची. मीही सहजपणे बरेचदा हो म्हणायचो. कामही व्हायचे. 


एके दिवशी मी तिला जाऊ नको म्हणालो . पण तिचे घरात काही तरी बिनसले असावे. ती इरेसच पेटून आली होती. मी नको म्हटल्यावर ती पेचात सापडली खरी. पण अखेर ती गेलीच. तिकडून आली ती माझ्याकडेच ! ती म्हणाली मी तुझे ऐकले नाही , हट्टास पेटले आणि व्यवहार करायला गेले. पण तो फिसकटलाच. यापुढे तू जा म्हणालास तरच जाईन. नाही तर जाणारच नाही. हे काय चालले होते ते कळण्याचे माझे वय नव्हते. मी तेव्हा अवघा चारपाच वर्षांचा होतो. पण हे प्रसंग ज्या चुलत आजीच्या समोर बरेचदा होत होते, तीही मला तिच्या नातवाची मुंबईहून मनीऑर्डर कधी येईल ते विचारू लागली. इथेही बरेचदा मी सांगेन तेव्हा मनीऑर्डर यायची ! हे माझ्या आकलनापलिकडचे होते. पुढे थोडा मोठा झाल्यावर मी जगाच्या व्यवहाराच्या दरीत ढकलला गेलो आणि माझे ते खरे होणारे शब्दही त्या दरीत हरवले ! 


सुगंधा काकूचा जीव‌ माझ्यावर असल्याने ती दर दिवाळीत मला आवडणारे अनारसे घेऊन यायची. तिच्या हातच्या अनारशांची चव वेगळीच होती. काही वर्षांनी काकू अपघाताने गेली पण तिच्या त्या अनारशांची चव आजही जिभेवर आहे. काकू गेल्यानंतर मी अनारसे खाणे सोडले. त्या काळी लोक दिवाळीला एकमेकांकडे फराळाला जायचे. आज कोणी जात नाही. पन्नास साठ वर्षांत केवढा बदल झाला माणसांत ! ती माणसे राहिली नाहीत, राहिल्या त्या त्यांच्या आठवणी... सुगंधाकाकूच्या हातच्या चविष्ट अनारशांसारख्या ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

०१.११.२०२४ सकाळी ०६.१५

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

देवपूजा

 देवपूजा

करून करून भागल्यावर मीही देवपूजेला लागणार हे उघडच होतं. थोडक्यात, वृध्दापकाळाची चाहूल लागल्याची उपरती सुरू झाली आहे. तारूण्याची उर्मी, नवनिर्मितीचे धुमारे सरून आयुष्य सुमारे म्हणजेच कशाच्या तरी आधारे जगणे सुरू झाले आहे. आता मन रमवायला जगात कुठे तरी जाऊन जमण्यातले नाही , घरातच मन रमवायचे दिवस आलेत हे उमगले आहे. लहानपणापासून बघत आणि ऐकत आलेला देव आता थोडा थोडासा तरी दिसू लागला आहे. साहजिकच, मी हल्ली निदान नियमितपणे देवपूजा तरी करू लागलो आहे ! हे चांगले आहे , नाही का ? अर्थात, पूर्वी मी कधी कधी देवपूजा करायचो, तेव्हा देवावर फुले टाकायचो. आता ती नीट घालतो, ठेवतो. इतकाच फरक झाला आहे. स्वभाव पूर्णपणे थोडाच बदलणार आहे ! 

तर देवपूजा म्हटली की फुले हवीतच. मी फुले शोधायला जगभर जात नाही. इतकेच काय, शेजारच्या कंपाऊंडबाहेरूनही फांद्या वाकवून वाकवून फुले चोरत नाही. कधीच नाही. माझ्या कंपाऊंडमध्ये माझ्या सौ.ने ही सोय हौसेने करून ठेवलेली आहे. म्हणजे आपला पती सकाळच आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊ नये ही दक्षता तिने आधीच घेतली आहे. शेजाऱ्याची फुले कितीही आकर्षक वाटली तरी मीही कधी त्या फंदात पडत नाही. पण शेजारची काही जणं किंवा जणीं मात्र परवानगी न घेता माझ्या कंपाऊंडमध्ये सरळ सरळ घुसून माझा डोळा चुकवून किंवा अगदी माझ्या नाकासमोरूही  माझ्याच फुलझाडांची फुले बिनदिक्कतपणे घेऊन जातात ! म्हणजे अगदी उघड उघड चोरी ! मग मलाच माझीच फुले वेचायची चोरी होऊन बसते.  कधी कधी तर फुलझाडांजवळ जाऊन फुलाला हात घालतांना मीच माझ्या फुलांची चोरी करतोय की काय असे मला वाटून मीच क्षणभर हात मागे घेतो  ! कधी कधी तर मलाच फुले मिळत नाहीत. लोकांच्या या देवभक्तीपुढे मी नतमस्तक होऊन हात जोडतो आणि निमूटपणे फुलांविना देवपूजा करतो. देव काहीच बोलत नाही पण सौ. शेजारुन ( मला न बोलता ) फुले घेऊन येते आणि देवपूजेला पूर्णविराम देते ! मी निमूटपणे देवाला आणि सौ.लाही हात जोडतो !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील