बुधवार, २० मे, २०२०

Amphan coming


मागे - पुढे

18.05.2020

        चार पाच दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि आज दि  18.05.2020 पासूनचा चौथाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात आजपासून म्हणजेच 18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात सुमारे पंधरा हजार चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. इथेही राजकारण आहेच. राजकीय पक्ष हीच गेल्या काही वर्षात अनेकांची जात झालेली आहे. हया पक्षाची माणसे त्या पक्षाविरूध्द ओरडणार आणि त्या पक्षाची माणसे हया पक्षाविरूध्द ओरडणार, सगळेच काही ना काही राजकारण करणार , हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. आयटी सेलचे महात्म्य बघून सगळयांचेच आयटी सेल आता जागे होऊ लागले आहेत . काही शिकूनही अडाणी आणि काही अडाणी असून उपद्व्यापी ! तर सांगायचं म्हणजे सकाळपासून नेहमीचे कार्यक्रम यथासांग पार पडले. सकाळी बीनाने पुन्हा डाॅक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला. तिला काही गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्याश्या वाटतात. काय करायचे ? मिलेश तिला डाॅक्टरकडे घेऊन गेला. आम्ही दुपारी जेवत असतांना बीना डाॅक्टर काय म्हणाले ते सांगायलाही आली. ती लगेच गेलीही. नंतर आली नाही. तर चहा घेऊन बीनाच्या आईबरोबर ही आनंदनगरला कुणाचे तरी घर बघायला गेली. मी अंगणात फिरत होतो. फिरता फिरता एक पोलीस व्हँन खालच्या बाजुच्या शाळेजवळ येऊन थांबली. बघता बघता तिच्या भोवती माणसे गोळा होऊ लागली. नंतर कळले की घरेलू कामगारतर्फे घरेलू महिला कामगारना मदत म्हणून अन्नधान्य देत होते. काहींना याची आगावू कल्पना दिली गेल्याने काहींनी आधीच नंबर लावले आणि त्या गेल्याही धान्य घेऊन घरी. लंबूवहिनीला कशी कोणजाणे पण ही खबर उशिरा मिळाली. ती धावत गेली , तिथे जाऊन तिचे नावच त्या यादीत नसल्याचे सांगण्यात आले. तिने बोंबलायला सुरूवात केली पण कोणीच तिच्या बाजुने बोलायला तयार नव्हते.  ती एकचीच बोंबलतेय हे तिच्या लक्षात आले असावे. ती एकदम नरमलेली दिसली . ती तशीच आमच्याकडे येवून मला म्हणाली हया राजकारण्यांबरोबर काय लागणार ! आता बोला ! काही लबाड राजकीय नेतेच सोयीनुसार यू टर्न घेतात असे नाही, तर लंबूवहिनीसारखी दारिद्र्य रेषेखालची सामान्य माणसेही यू टर्न घेऊ शकतात ! साठा संपल्याने गाडी निघून गेली. काही महिला कुरकुरत थोडा वेळ तिथेच घोटाळल्या आणि उद्या गाडी येईल या आशेवर घरी परतल्या. मी हे सारं अंगणातून बघत होतो. अजून आपल्या देशात समतोल वाटप व्यवस्थेचे नीट नियोजन होत नाही, अंमलबजावणी तर फारच दूरची गोष्ट आहे ! आणि इकडे आपण बुलेट ट्रेनच्या वेगाने जागतिक महासत्ता बनण्याच्या वल्गनेचे ढोल बडवत असतो ! जागतिक सोडा , ही आगतिक महासत्ता झाली आहे.


       मी हा आगतिकपणा सोडून मागे गेलो. म्हणजे घराच्या मागच्या बाजुला गेलो. आज पाण्याचा शिल्लक साठा कमी आहे. त्यामुळे आज आमची दोनच झाडे शिंपून घेतली.  तेवढयानेही मन प्रसन्न झाले. निसर्ग आजही आपल्याला प्रामाणिकपणाने देत असतो. पण आपण आजही लांडीलबाडीने राजकारण करून आपलीच वाट लाऊन घेत आहोत. मग कोरोना येईल नाही तर काय ? मग अम्फान सुपर चक्रीवादळ येईल नाही तर काय ?


( क्रमश: )
...........











   








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: