गुरुवार, ७ मे, २०२०

Think twice


मागे - पुढे

07.05.2020

          दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे, एवढेच खूप झाले ! गेले तीन दिवस वैतागून इथे तरी काहीच लिहिले नाही. काय लिहायचे ? सगळे तेच तर सुरू आहे. जागतिक महासत्तेचा विनोद करणारी माणसे स्वयंशिस्त पाळतील ही अपेक्षा तरी कशी करायची ! संचारबंदीतच माणसे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुक्तपणे रस्त्यावर विनाकारण वावरत असतील तर ती हे जाणूनबुजून करतात असेच म्हणावे लागते. अतिशय उच्चवगैरे संस्कृतीचा टेंभा मिरवून फायदा नसतो, तर ती आचरणात दिसावी लागते. ईतिहासाची पुण्याई ही खरे तर पूर्वीच्या खरोखरच्या महान माणसांची कमाई असते. आपले दिवे लावणारे कर्तृत्व पाहता , त्या कमाईवर आपला वर्तमान फार काळ तग धरू शकत नाही. अर्थात आपल्याला आपल्या वर्तनानाची पर्वा नाही तिथे भविष्याबद्दल न बोललेलेच बरे ! बेशिस्त मेंढरांचे कळप सांभाळत तरी किती बसणार ! ही मेंढरे बेशिस्त असली तरी एका बाबतीत हुशार आहेत. ती गनिमी काव्याने कळप सोडून अवैधरित्या स्वत:चीच वाहतूक करीत आहेत वा करून घेत आहेत. सुरूवातीला कसे आहात तिथेच थांबा, सर्व व्यवस्था करण्यात येत आहे , असे आवाहन हया मेंढरांना करण्यात येत होते. पण तरीही ही मेंढरे कधी पायी तर कधी अधिकचे पैसे देऊन वाहनाने गावाकडे पळत सुटली. आता त्यांना गांव आठवला. गावात जाऊन काय पराक्रम गाजवणार , तर गावाला कोरोना महामारीची अभूतपूर्व भेट देणार ! हे थांबायला हवे होते , पण बुलेट ट्रेनच्या तयार करण्यात आलेल्या हवेच्या गतीने चालूच राहिले. कधी मालगाडी तर कधी आंबा वा जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीच्या ट्रकने ! शेवटी अधिकृतपणे रेल्वेगाडया सोडून रवानगी करावी लागली. काय झाले त्या आवाहनांचे ? सारा देश माझ्यासोबत हे दाखवण्याची संधी काळाने कोणालाच मिळू दिली नाही ! जेव्हा गोष्ट दाखवण्यावर जाते तेव्हा काळ असेच करतो. लोक खरोखरच तुमच्यासोबत तेव्हाच असतात जेव्हा तुम्ही लोकांसोबत खरोखरच असता ! नीतीमत्तेने असता ! वंदनीय महात्म्यांना बाजूला सारून त्यांची जागा घेणे एवढे सोपे नाही. लोकांनीच त्यांना महात्मा बनवलेले असते. शब्दांतली खरी कळकळ आणि मतांची आकडेेमोड करण्यामागची तळमळ यातला फरक बेशिस्त लोकही चांगलाच ओळखतात. थोडक्यात , आवाहनांचा फारसा उपयोग न होण्यामागची ही पोटतिडकीने केलेली कारणमीमांसा. ती चुकूही शकते. म्हणूनच म्हणतो , की काय लिहिणार सद्यस्थितीत ! आता कोरोनामुक्त म्हटले गेलेले व अभिमानाने अभिनंदन करून मोकळे झालेले कोंकणचे सिंधूदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे पुन्हा कोरोनायुक्त झाले आहेत. म्हणून मुक्त मुक्त असे हजारदा बोंबलू नका , तुम्हीच युक्त होता ! हा ताजा ईतिहास आहे ! लोकांचे जीव जात असतांना जो उतावीळ राजकीय कोरोना सुरू आहे तो निंदनीयच आहे व त्याबद्दल बोललेच पाहिजे. ती लोकांचीच जबाबदारी आहे. शेवटी लोकांच्याच भावनांशी आणि जीवनाशी खेळले जाते. काही मूठभरांचे नुकसान टाळण्यापायी लाखोंचे नुकसान करणे चूक आहे. हे कोरोना महामारीच्या काळात तर पाळले गेलेच पाहिजे. अर्थव्यवस्था रस्त्यात कशी  कोलमडते ते दारू दुकाने उघडल्यानंतर केवळ काही तासातच दिसले ! माझ्या दोन फेसबूक पोस्ट पहा 


  प्यायला अधीर झालेले लोक सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा वाजवणार हे आपल्याला आधीच कळत नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल ! इतकेच नव्हे तर लोक दारूसाठी किंवा दारू पिऊन धुमाकूळ करीत आहेत. कांदीवलीत दारूडयाने चक्क महिवेवर व दुकानदारावरच हल्ला केल्याची बातमी जय महाराष्ट्र चँनेलवर दाखवत आहेत. टाळया ते थाळया ते दिवे हया प्रवासाला फार काळ लोटलेला नाही. आपले निर्णय आणि आपल्या आवाहनांचे असे का होते याचा ( जर विचार केला जाणार असेल तर ) विचार करावा लागेल ! आवाहनांचे परिणाम माहीत असल्याने कोणती आवाहने करायची याचे तारतम्य बाळगावेच लागेल. आता चाकरमांनी लपूनछपून येऊन कोंकण कोरोनाबाधित करीत आहेत. ते अधिकृतपणे आणले गेले तर इथली अवस्था काय होईल हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची गरज नाही. प्रशासनातही आता कोरोना शिरू लागला आहे. अधिका-याचा कोरोनामुळे जीव गेल्याची बातमी सुरू आहे.  आपण पोलीसांवरचा भार वाढवून त्यांना अधिकच कमकुवत करीत चाललो आहोत. लोकांपुढे पोलीस हताश झाले तर अराजक होईल. पोलीसही माणसेच आहेत. त्यांनाही कुटुंब आहे , जे डोळ्यांत प्राण आणून त्यांची वाट बघत असते . त्यांनाही गांव आहे. पोलीसांचे अधिक हाल होणे म्हणजे आपलेच संकटमोचक आपण हरवून बसणे होय. पोलीस हतबल झाले तर प्रशासनावरही त्याचा परिणाम होईल. प्रशासन हैराण झाले तर लोक सैराट होतील. अपप्रवृत्ती डोके क्षणात वर काढतील आणि मग मारामा-या , खून , लुटालूट , दंगली, दरोडे, बलात्कार हे ओघाने येईलच.

         कोरोनाबाबत अनेक भाकिते वर्तवली जात आहेत. लसीबाबत संभ्रम आहेच. एक मात्र खरे आहे की, कोरोना चीनने जगाला दिला असे ट्रंफतात्यांनी म्हटले तरी अमेरिकेनेच तो चीनमघ्ये नेला असावा असा खुद्द अमेरिकन लोकांत संभ्रम आहे म्हणा वा निर्माण केला गेला आहे !  म्हणूनच अजूनही जग याबाबतीत ठोस बोलतांनाही दिसत नाही. जग बोलणार नाही तिथे बोलणारे आणि आपल्याकडचे चीनच्या बहिष्काराच्या बाता मारणारे ( चीनचेच ! ) मूग गिळून गप आहेत. अधूनमधून ते सोयीनुसार आणि सवयीनुसार फेसबूकवर उसळी मारतीलच. 😀😀😀😀 आपण वाचून करमणूक करून घेऊया !

             आज सकाळी मित्रवर्य जादूगार मनोहर  भाटकर यांनी दत्ता डावजेकरांच्या संग्राह्य आठवणींचा सुंदर संदेश  पाठविला आहे. त्याची फेसबूक पोस्ट टाकली आहे. तिची लिंक इथे पहा दत्ता डावजेकरांच्या आठवणी. काल  रात्री दोन पंखे लावून झोपलो. त्यामुळे जराशी झोप तरी मिळाली. सकाळी सहा वाजता उठलो , थोडया हालचाली केल्या आणि पावणेसातला उठूया म्हणून झोपलो तो सात वाजता धडपडत उठलो. मागच्या दारी जाऊन पाहिले तर नळाला पाणी चालू होते. लगेच भांडी नेली. पुरेसे पाणी मिळाले आणि पाणी गेले ! सुटलो. नाही तर विहिरीवरून पाणी आणावे लागले असते. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून विहिरीवर गेलोच नाहीय ! या गडबडीत बंदू कुठे दिसला नाही. मला उशीर झाला असल्याने मीही लक्ष दिले नाही. काही वेळाने आंघोेळ करून सहजच मागचा दरवाजा उघडला तर बंदूकडे पाण्याचा टँकर आलेला. तसा तो अधूनमधून येतोच पण गडबड झाली होती. बंदू आणि कंपनी काल रात्रभर गरम्यामुळे झोपलेली नसल्याने सकाळी पाणी आले तेव्हा उठलीच नव्हती ! हे बंदूनेच सांगितले.  तरीच सकाळी बंदू कुठे पाणी भरतांना दिसला नव्हता.  मी समजलो होतो की तो पाणी भरून झोपला असावा. उद्या शुक्रवार म्हणजे पाणी येणार नाही. पाणी प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे.
   


( क्रमश: )
...........

........................ ........ 











   








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: