शनिवार, २ मे, २०२०

The missing clue हरवलेला दुवा


मागे - पुढे

01.05.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग अडतीसावा दिवस. 01 मे. महाराष्ट्र दिन + कामगार दिन. त्याच्या पूर्वरात्रीला अर्धी रात्र झोपच आली नाही. आधीच गरम्यामुळे झोप येत नव्हती.  त्यात रात्री 11.15 ला मेसेंजरवर झोप उडवणारा मेसेज आला. तो असा :

 🔴 *रत्नागिरी खबरदार ब्रेकिंग न्यूज : मुंबई ते आंध्रप्रदेश व्हाया रत्नागिरी गाडीतून जाणारा एकजण आढळला कोरोना पॉझिटिव्ह*

➡️ *रत्नागिरी :* पाईपच्या गाडीतून रत्नागिरी ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या तीन इसमांना मलकापूर चेक नाक्यावर पकडले असता त्यातील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर इसमाला शाहुवाडी पोलिसांनी मलकापूर चेक पोस्टवर २६ एप्रिल रोजी पकडले आहे. हा इसम मुंबईतून रत्नागिरीत आणि रत्नागिरीतून कोल्हापूरकडे जात होता अशी माहिती मिळत आहे. रत्नागिरी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस या इसमाच्या प्रवासाची साखळी शोधत आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रत्नागिरी खबरदारला दिली आहे. रत्नागिरीतील एका नामांकित कंपनीत हा ट्रक आला होता व या ट्रक मधून या इसमाने प्रवास केला आहे अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

*रत्नागिरी खबरदार*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
www.ratnagirikhabardar.com
10:30 PM 30/Apr/2020

              तिकडे कोरोना मुक्त म्हटला गेलेला सिंधुदूर्ग जिल्हा असाच पुन्हा कुणा बाहेरून आलेल्या कोरोनाग्रस्तामुळे धास्तावला आहे. आता मलकापूरात सापडलेला माणूस रत्नागिरीत कुणाकुणाला भेटून गेला आहे , काय माहीत ! पुन्हा एकदा पोलीसांना साखळी शोधायचे काम करीत बसावे लागणार. लोकांनाच शिस्त नसेल तर पोलीस तरी कुणाकुणाच्या मागून धावणार !  यानंतर तर परदेशातून माणसे आणली जाणार आणि पुण्यामुंबईतून चाकरमानी कोंकणात आणण्यात येणार , यावरही चर्चा सुरू आहेत. हा जर विचार असेल तर पुण्यामुंबईत ज्यांच्या मुलांना नोकरीधंदयामुळे एकटे राहणे आजही अपरिहार्य झाले आहे , त्यांच्या मदतीला  किमान त्यांच्या आईवडिलांना कोंकणातूनही पुण्यामुंबईला जायचे असल्यास जाता यावे , अशी त्यांची अपेक्षा असणारच आहे. याही विचाराचा विचार शासनाला करावा लागेल असे दिसते.  असो. तर शेवटी रात्री एक वाजता पलंगावरून खाली नुसत्या लादीवर जाऊन झोपलो. तेव्हा कुठे दोनच्या दरम्याने जरा झोप लागली . सकाळी नळाला पाणी येणार नसल्याने सहा वाजता जाग येऊनही पुन्हा झोपलो तो पावणेआठला उठलो. अकरा वाजता उदू येऊन गेला. बाकी कुणीही आलेले नाही. दुपारी दोन वाजता जेवलो . जेवताजेवता मला मिनाक्षीच्या माहेरच्या घराकडे जाणारा रस्ता दिसू लागला. विशेषत: तो पूल आणि त्यापलीकडील भाग दिसला आणि माझी लिंक तुटली. ब-याच दिवसांनी मला हा अनुभव आला. मी लगेच सौ. ला मिनाक्षी संदर्भात एक दोन प्रश्न विचारले. लिंकबाबत काहीच सांगितले नाही. जेवल्यानंतर शतपावली झाली. वामकुक्षी  करता करता झोपच लागली ! पाच वाजता मुलाचा फोन आला तो घेतांनाच पुढच्या दरवाजावर जोरातच थापा ऐकायला आल्या तसा मी धडपडत उठलो. एवढी कोणाला अर्जन्सी आहे म्हणून शर्ट न घालताच दरवाजा उघडला तर बाहेर मराठवाडीतल्या दोघीजणी !  त्यांना बसायला सांगून सौ. ला उठवलं. सौ.ला त्यांनी बीनाच्या आईला बोलवायला सांगितले. मला जेवतानाची माझी लिंक व मीनाक्षीची मी सौ.कडे केलेली चौकशी आठवली. आतापर्यंत पार हिमालयातल्यावगैरे दूरच्या गोष्टी डोळयावर दिसत होत्या, आता तर जवळच्याच गोष्टी दिसतायत आणि त्याची प्रचितीही अवघ्या तीन तासातच येत आहे ! हे गूढ काय आहे ? काही गोष्टी मला उघडया डोळयांनी का दिसतात ? त्या कोण दाखवतंय आणि का ? कळत नाही !  बीनाची आई आली आहे. त्यामुळे  त्यांची चर्चा सुरू झाली आहे. मी आतल्या खोलीत बसून ऐकतो आहे.  प्रकरण गळयाशी आलेले आहे असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. मीनाक्षीने उसने पैसे घेतले आणि त्यानंतर काही कारणांनी ती जी माहेरी जाऊन बसली ती वर्ष होत आले तरी सासरी येतच नाहीय. फोनही उचलत नाही.  बीनाच्या आईने त्या कर्ज प्रकरणात मीनाक्षीची जबाबदारी घेतल्याने ती अडचणीत आली आहे. मीनाक्षीचा नवरा पैसे देतो देतो एवढेच सांगतो आहे. थोडे थोडेही देत नाहीय. त्यामुळे त्याचा विश्वास हया बायकांना नाहीय. शेवटी तुम्ही दोन दिवसांत पैसे द्या नाही तर वाईटपणा येईल , असे बीनाच्या आईला निक्षून सांगून त्या दोघीही गेल्या.  आता सात वाजले आहेत. हिने बातम्या लावल्या होत्या पण फोन आल्याने ती बीनाकडे गेली आहे तोपर्यंत मी चँनेल बदलले. बीबीसीवर इंग्लंडमधल्या चीनच्या अँम्बँसीडरची मुलाखत चालू आहे. ते महाशय प्रत्येक आरोप नाकारत आहेत. सत्य अजूनही जगापासून दूर आहे. राहवत नाही अशावेळी हटकून कविता जन्म घेते. वाचा माझी ताजी कविता इथल्याइथे....

ज्याला त्याला आपापल्या देशात आपापली खुर्ची टिकवायची आहे  !
सत्ताचक्रात अडकलेल्यांची तडफड बघवत नाही !
कोरोनाचा कोणताच धागा कोणाशीच कोणी जुळवत नाही !
कोरोनापूर्व वर्षभर झालेल्या मान्यवरांच्या सगळयाच गळाभेटी पारदर्शक असतील काय ?
राजकीय व्यापारीकरणाची महत्वाकांक्षा जागतिक महासत्तेचे गाजर दाखवून काय साधत होती बरे ?
करोडो माणसांचे कोरोनामागचे असलेच जर खुनी तर ते मूठभर असतील काय ?
चीन अमेरिकेकडे आणि अमेरिका चीनकडे बोट दाखवीत राहीलही ,
कदाचित चीनला शिक्षा होईलही पण त्यानंतर घडलेल्या मानवी हत्याकांडात जगाचा इटली होऊन गेला आहे , हे सत्य राहीलच !
विमानातून आयात केलेल्या कोरोनामुळे मधल्यामध्ये आपलाच इटली होतांनाही आपण भांडत राहू आपल्यातच,
कुणाच्या तरी राजकीय महत्वाकांक्षांना खतपाणी घालीत ,
डोळयांवर भक्तीची आणि गुलामीची पट्टी लाऊन !

                   बघा कवितेतून काही दुवा मिळतो का ? नाही तरी  बातम्या सुरू आहेतच ...भारतात केंद्र सरकारने 03 मे रोजी संपत असलेला लॉक डाऊन 04 मे ते 17 मे 20  पर्यंत वाढवला आहे. झोननिहाय शहरांची विभागणी झाली आहे. बातम्या सुरू आहेत. बातम्याच सुरू राहणार आहेत. जगाचा अंत झालाच तर त्याची शेवटची ब्रेकींग न्यूज कोण सांगणार आहे आणि कोण ऐकणार आहे ?

( क्रमश: )
...........






   








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: