रविवार, ३ मे, २०२०

Nothing to say more अधिक सांगण्यासारखे काही नाही


मागे - पुढे

02.05.2020

         आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकोणचाळीसावा दिवस.  सकाळपासून फारसे मागच्या वा पुढच्या दारावर विशेष असे काही घडलेच नाही.   चिपळूण व संगमेश्वर येथे मिळून दोन कोरोनाबाधित रूग्ण मिळाल्याची बातमी आली आहे. संपूर्ण दिवसांत लंबूवहिनी कुठे झळकली नाही , हेच आजच्या दिवसाचे विशेष ! तिकडे चीन अमेरिका जोरात सुरू आहे. भारतासारखे देश मध्येच लटकत राहणार हे उघड आहे. धड चीनचा बहिष्कारही करता येत नाही आणि अमेरिकेच्या पुरस्काराचा मोहही सोडवत नाही. अमेरिका जे करायचे ते करतेच आहे. ते पक्के व्यापारी लोक . आपल्याला सोयीनुसार वापरायलाच बघणार. आम्ही त्यांच्याकडून आमच्याबद्दल  साधारणसे का होईना पण दोन शब्द आमच्याच कानावर कधी पडतात त्यासाठी तोंड उघडे करून बघत बसलेलो असतो ! प्रजासत्ताक लोकशाही देशाची मान आपण किती ताठ ठेवतो आहोत ! इकडे महाराष्ट्रात उतावळा नवरा आणि नाच्या कंपनी व-हाड लिमिटेड आपल्याच गळयात माळ पडणार या कल्पनेने कोरोनात लोकांचे जीव जात असतांनाही सतत मोहरलेले असतात ! मुंबईचे आयएफसी गुजरातला हलवून मुंबईला अनेक वर्षे तरी फारसा फरक पडणार नाही. मुंबई ही काही एक दोन वर्षात उभे राहिलेले ठिकाण नव्हे ! त्यामागे अनेकांचे कष्ट , प्रामाणिकपणा , नीतीमत्ता , कल्पकता व हुशारी हे गूण आहेत. हा पाया भक्कम आहे. बालीश प्रयत्नांनी तडा जाण्याएवढा तो नक्कीच कमकुवत नाही !
बाकी कोरोनाचा प्रसार होतोच आहे. बरे होणा-यांचेही प्रमाण ब-यापैकी आहे. तिन्ही सेनादलांकडून कोरोना वॉरीयर्सवर पुष्पवृष्टी केली जात आहे. तिकडे नाशिकहून परप्रांतीयांना ट्रेनने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे. आता इतर ठिकाणांहूनही हेच होणार आहे. पुण्यात  तहसिलदार कार्यालयात प्रवासासाठी परवाने मिळणार असा संभ्रम पसरल्याने लोकांनी तोबा गर्दी केली आहे. वास्तविक पुढील सूचना मिळण्यासाठी लोकांकडून फक्त त्यांचे ईमेल अॅड्रेस तेही अाॅनलाईनच मागविण्यात आले होते.  एकूणच लॉक डाऊनबाबत लोक प्रचंड संभ्रमात पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा त्रासही प्रचंड वाढतो आहे. लोकांसाठी काही करायला जा , ते त्यांना करायचे तेच करतात ! थाळया वाजवायला सांगितले की ड्रम वाजवतात. फटाके वाजवतात. कोणत्या वेळी काय करावे हेच त्यांना कळत नाही असे झाले आहे. हे लोक भारताला जागतिक महासत्ता बनवण्यात महान योगदान देणार आहेत म्हणे ! तेही बुलेट ट्रेनच्या ( काल्पनिक ) वेगाने !
            बाकी सकाळ , दुपार क्रमाने पार पडली आहे. आता संध्याकाळ झाली आहे. ही खालच्या अंगणात ईव्हीनिंग वॉक करतेय. मी पाण्याचा साठा पाहून झाडे शिंपू की नको या विचारात पडलो आहे. अखेर मागच्या अंगणातली दोन झाडे शिंपली. खालच्या बाजूची झाडे शिंपण्याएवढे पाणी शिल्लकच नव्हते. आज लंबूवहिनी अजून खाली आलेली नाही. रस्त्याने दुकानात जाणा-या चिंग्याला सौ.ने बिस्कीट पुडे व दूध आणायला पैसे दिले . रात्र झाली. आज दूध बिस्कीटे खाऊन पोटाला आराम दिला . रात्री अकरा वाजता लादीवर पहूडलो.

( क्रमश: )
...........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: