गुरुवार, १४ मे, २०२०

Chakarmani


मागे - पुढे

13.05.2020

        गेले काही दिवस काही लिहिलंच नाही. काळाचा अंदाज घेतो आहे. आताही अंदाज घेतघेतच लिहितो आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे.   दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  ( आणि आता आगामी चौथाही मनात ) धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे.  कालच मापंप्रनी नेहमीप्रमाणे रात्री 08 वाजता भाषण केले आहे. आत्मनिर्भरतेचा महान मंत्र त्यांनी दिला आहे. अर्थात , तुमचे तुम्ही बघा. निवडणूक आली की मी तुमच्याकडे बघतो. केवळ पंप्रच नाही तर कोणत्याच पक्षाचे लोक दिसायला पाहिजे तितके कुठे दिसत नाहीत. निवडणूक आली की प्रचार करायला बाहेर पडा, मतदान करायला बाहेर पडा , शंभर टक्के मतदान करा, असा प्रेमळ दम भरणारे ते लोकशाहीचे कार्यकर्ते आता जीवनमरणाच्या वेळी घरात बसा म्हणून सांगायलाही कुठे फिरकत नाहीत, असं आता लोकच म्हणू लागलेयत  ! म्हणजे, लोक फक्त निवडणुकीपुरतेच महत्वाचे असतात का ? असा प्रश्न खुद्द लोकांनाच पडू लागला आहे ! लॉक डाऊन वाढणार हे तर आता अपरिहार्यच झाले आहे. याबाबत 18 तारीखला तपशील जाहीर होणार आहे ! पुन्हा एकदा दोन्ही गटातल्या गैरशिस्त लोकांना आयत्या वेळचा गोंधळ घालायची संधी तर कोणी देत नाहीय ना ? काही गोष्टी वाटतात तितक्या सहज घडत नसतात.  देशात केवळ गोंधळ सुरू आहे. माणसे हैराण झाली आहेत . माणसांच्या या हवालदिल होण्याने देशात कोण कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत राहणार नाही व देश अराजकतेकडे वाटचाल करू लागेल ! अनेक ठिकाणी प्रशासन हताश होत आहे. काही ठिकाणी तर प्रशासनावर कुठून दबाव तर येत नाही ना, अशी शंका येण्याइतपत प्रशासन हतबलता व्यक्त करू लागले आहे. एकीकडे कोरोनाची होणारी लागण आणि न ऐकणारे लोक या कात्रीत प्रशासन सापडले आहे. न ऐकणा-या लोकांमागे काही बोलावते धनी ( मास्टरमाईंडस् ) असावेत की काय अशी शंका येण्याइतपत परिस्थितीचे केले जाणारे राजकारण बोट दाखवते आहे ! हजारो लोक उपाशी पोटी शहरे सोडून गावांकडे पायी चालत निघाले आहेत आणि आपण अजूनही त्यांच्याबद्दल चकार शब्द न काढता, आपलीच पाठ थोपटून स्वदेशीचे नारे भलत्याच वेळी देत आहोत की काय ? असे वाटत आहे. एकूण कशाचे काही तारतम्य उरलेले दिसत नाही. अवतारही ढेपाळत आहेत ! सतत परदेश वा-या करणा-यांकडून स्वदेशी हा शब्द ऐकतांना जरा कसेसेच वाटते, नाही का ? थोडक्यात , विमाने आणि रस्ते यातले अंतर उघड होत चालले आहे. हया लॉक डाऊनला नेमका काय अर्थ आहे ? माणसे इकडून तिकडे येत जात आहेतच , आणली आणि पोचवलीही जात आहेत. त्याच्याही बातम्याच केल्या जात आहेत ! काही जण योगींचे गुणगान गाता गाता योगींनी आपल्याच माणसांना घ्यायला नकार दिला या व्हिडीयोने विव्हळ झाले आहेत ! या पार्श्वभूमीवर काही लोक महाराष्ट्राला अधिक पसंती देत आहेत. कोरोनाने आधीच्याच दोन गटातली दरी वाढवली आहे. हे लोक देशभक्तीचे केवढे नारे देतात ! सोयीनुसार आम्ही सारे भारतीय (!) म्हणतात ! विसंगती तुला सलाम !

                 इकडे आमच्या मागील दारी सकाळी पाणी वेळेवर आले, ही कडक उन्हाळ्याच्या दिवसातली समाधानाची बाब ! बाकी तसे सगळे चालूच असते. घटना आणि लोकसुध्दा ! नाना येऊन मुलाची चौकशी करून गेला. गंमत म्हणजे त्याने तासाभरात मोदींबद्दल चकार शब्दही काढला नाही ! योगींचा उल्लेखही केवळ एकदाच केला ! मला हे खरोखरच आश्चर्यकारक वाटले. पण मी त्याला काहीच विचारले नाही. हे नेतेवगैरे खूप दूरचे आहेत. नेत्यांपेक्षा आमची नाती अधिक जवळची व पिढीजात आहेत. हे नेते येतील आणि जातील. त्यांच्यामुळे आपल्यात दुरावा निर्माण होण्याएवढे आपणच त्यांना मोठे करणे चूक आहे ! राजकारण हे राजकारणापुरतेच ! त्याची योग्यता तेवढीच आणि आपणही ती तेवढीच ठेवली पाहिजे. हे आता कोरोनाने पुन्हा एकदा शिकवले आहे. उद्या पाणी येणार नाही, असे संज्याने सांगितले. खरे तर पाणी न येण्याचे वार सोमवार आणि शुक्रवार आहेत. पण दुरूस्तीसाठी बदल करण्यात आला आहे. त्याला आपण सहकार्य केले पाहिजे. उद्या पाणी नाही म्हणजे आज झाडांना पाणी देता येणार नाही. संध्याकाळचे सहा वाजून गेले आहेत. मी अंगणात फिरतो आहे. वरच्या बाजुला कठडयाजवळ एक पांढरी लुकडी गाय येऊन उभी राहिली आहे. अशा गायी दररोज इथे येऊन उभ्या राहतात. मग आम्ही त्यांना चपाती, भात , भाकरी खायला देतो. यापैकी काहीच शिल्लक नसेल तर बिस्कीटेही खायला देतो. काही गायी हलता हलत नाहीत. काही मात्र जे मिळेल ते खातात आणखी निघून जातात. काही गायी तर थोडी वाट बघून आज काही मिळणार नाही हे समजतात व निघूनही जातात . हया गायीची परिक्षा घ्यायची म्हणून मी काहीच हालचाल केली नाही. गंमत म्हणजे ही गाय हुशार असावी. हा काही देणार नाही असे ओळखून ती लगेच निघालीही. मला कसेसेच झाले. कोरोनाचे दिवस आहेत. तिला काही मिळालेही नसेल. ती उपाशी असेल. मी विचार करीपर्यंत ती दहापंधरा फुटांवर गेली पण ! मी तिला हाका मारताच मात्र  ती माझ्याकडे यायला लागली. मी धावतच घरातून बिस्कीटे आणली . तोपर्यंत ती कठडयावर मान पुढे करून उभी राहिलीही. मी तिला बिस्कीटे दिली . ती तिने पटकन खाल्ली. मी तिला आता जा म्हटले तशी थोडया वेळाने ती गेलीही. आता वयाच्या साठीत पूर्वीसारखे धाऊन जमत नाही. पायरी चुकली तर अंगणात कपाळमोक्ष तर ठरलेलाच ! आता अंगण कोरी लादी असते ; प्रेमळ सारवलेली जमीन नसते !  म्हणून जपूनच धावलो होतो . दिवाबत्ती, प्रार्थनेची वेळ आहे. ते झाल्यावर बातम्या लावल्या तर आमच्या जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 74 झालेली . टीव्ही बंद केला. येणा-या चाकरमान्यांचा प्रश्न सारी रात्रभर आवासून बघत होता !


( क्रमश: )
...........











   








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: