रविवार, २६ एप्रिल, २०२०

Koronapasun aapan ky shiku shakto ka ? ?

मागे - पुढे

25.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग बत्त्तीसावा दिवस. आज सकाळी सौ.चा फोन चार्जिंगला लावतांना मुलाच्या मेसेजचे नोटीफिकेशन वरती दिसले. कधी नव्हे तो सकाळच त्याचा मेसेज का,  म्हणून मेसेज वाचला. माझ्या त्याला उद्देशून लिहिलेल्या सबुरीच्या सल्लावजा एका कवितेला त्याने कवितेतूनच दिलेले उत्तर होते ते ! आधीच मनावर ताण होता. मला दोन चार ओळींच्या पुढे वाचवेचना. मी सरळ मोबाईल चार्जींगला लावला आणि सहा वाजून गेल्याने नित्य कर्मांकडे वळलो. आता मुलाला उद्देशून कधीही कविता करायची नाही हा कानाला खडा लावला ! चहानंतर मी सौ.ला चिरंजीवही कवी झाल्याचे सांगितले. तिने ती कविता वाचली. म्हणाली त्याला फोन करते. मी तिला थांबवले. तो तिथे चक्रव्युहात एकटाच आहे. त्याची मन:स्थिती चांगली राहिली पाहिजे. कडू घोट हे मोठयांनीच मोठया मनाने गिळायचे असतात.  आता परत भांडण करू नका. व्यक्तींमधली भांडणे कुटुंबात पसरली , कुटुंबातली गावभर झाली , गावाची गावागावांशी व शहरांशी भांडणे झाली, शहरांची शहरांशी , राज्याशी , राज्याराज्यांची राज्याराज्यांशी अशी भांडणे देशभर पसरली आणि मग देशादेशांची देशादेशांशी भांडणे सुरू झाली. याच भांडणांनी कोरोनाला देशादेशात निमंत्रण दिलं आहे ! निदान या महामारीत तरी सावध व्हा. प्लीज , आता कोणीच भांडू नका. माझे हे कळकळीचे सांगणे सौ.लाही पटले असावे . ती म्हणाली तोच फोन करू देत किंवा मी केला तर हा विषय काढत नाही. मी म्हटले चला विषयच संपला ! आज शनिवार. मासे नाहीत. रिता , सुना बाजार. भाजीही मिळत नाही. शहरात चालत जाणे शक्य नाही. कधी तरी एवढे चालले तर या वयात त्रासच होणार. शिवाय , शहरातही भाजी कितपत मिळेल हे सांगता येत नाही. मासे लॉक डाऊन . भाजी लॉक डाऊन . कडधान्य झिंदाबाद ! दुपारी तेच केलं. आज संध्याकाळपर्यंत लंबूवहिनी आली नाही. आता कमीच येते. आली तरी फारशी उत्साहात नसते. बहुतेक खात्यात अपेक्षित पैसे पडले नसावेत. पैसा बोलतो. राजकीय वक्तव्यांना किती महत्व द्यायचे हे काही शिकलेल्यांना कळत नाही तिथे हया अशिक्षित बाईला कुठून कळणार ! त्यात गरीबी माणसाला हतबल करते. काय काय करायला लावते. एक मात्र जाणवले की तिला चिथवणारे मास्टरमाईंडसच थंडावलेले आहेत ! मा. मुख्यमंत्र्यांनी भरलेला दमच त्यांना पुरेसा पडला ! काहीही घडले की त्याला एकच रंग द्यायचा , एवढेच हया व्देषप्रसारकांना माहीत असते. हयांनी आपली अक्कल गहाण टाकलेली असते . रिकामा वेळही भरपूर असतो , त्याचा सदुपयोग करायचीही बुध्दी त्यांना नसते. मग पडदयाआडून समाजात लंबूवहिनीसारख्यांना चिथवून द्यायचेे , एवढाच खेळ उरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका खेडयात कसले विचारमंथन होते ते बघा ! चांगले समाजकार्य करणे तर दूरच , दारूमटणाच्या पार्ट्यात पैसे उडवायला सांगायलाही लागत नाही ! ही माणसे खरी तर वाईट नसतात , पण ती दुष्टांच्या कटकारस्थांनाना चटकन बळी पडतात. त्यांच्या हातात सापडलेले आयते कोलीत म्हणजे हे दारूमटणाला हपापलेले छुपे रुस्तम ! हयांच्यामार्फत विषारी विचार पसरवणे काहींना किती सोपे झाले असेल ते बघा ! आपण परदेशांच्या नावाने बोंबा मारतो , पण आपणच दूषित केलेली आपलीच गंगा स्वच्छ करायचा आपल्यात दम नाही , हे मान्य करीत नाही. त्यासाठी कोरोना यावा लागतो ! कोरोना हे विषाचे फळ आहे. 

            हळूहळू संध्याकाळ झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. आज स्नेहा सौ.ला भेटायला आली आहे. बायकाही आता पार्ट्या करू लागल्या आहेत. तेही दूर डोंगरात जाऊन ! तोच बेत शिजतो आहे ! कोरोनाने हाच चंगळवाद संपेल व लोक घरचे अन्न घरातच शिजवून घरातच खातील , आपल्या माणसांना खरे आपलेसे करतील व असेल ते घरातच सुखाने मिळूनमिसळून , हसूनखेळून खातील, पर्यटनाचा अतिरेक थांबेल , ही आशा कोरोना जगभर थैमान घालीत असतांना हया खेडयातच फोल ठरते आहे ! एका खेडयातल्या बायकांची ही एवढी प्रगती आहे , तिथे शहरातल्या हुशार लोकांचे काय सांगावे ब्बा ! हे विचार अनेकांना झोंबतील , पण अजून वेळ गेलेली नाही . पाचसहा महिन्यांपूर्वी ओठांवर आलेल्या दोन ओळी मला इथे आठवतात :

             तुला आता जरी सुखाची मजा येत आहे 
             सुखामागून बघ सुखाची सजा येत आहे

       खरेच सांगतो , तेव्हा मला ती सजा कोरोनाच्या रूपात असेल हे स्वप्नातही आले नव्हते. पण सुखाच्या अतिरेकी पर्यटकीय चंगळवादाची आणि माणसानेच माणसाला हीन मानण्याची ही शिक्षा आहे हे नक्की ! मगर हम नहीं सुधरेंगे !
      

( क्रमश: )
.......







     








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: