गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

Corona virus capturing minds

मागे - पुढे

29.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग छत्तीसावा दिवस.  पिंपळपानाचा काढा उकळत ठेवला आणि पावणेसातला नेहमीच्या वेळेवर पाणी बघायला मागच्या दारी आलो. पाणी आलेले नाही.  तिकडे बंदू वाट बघतोय आणि  इकडे मी. अखेर सात वाजता पाणी आले. मी सौ. ला उठवले आणि पाणी भरायला आलो. पाणी भरून झाले तसा पुढे हाँलमध्ये येवून आत येणारी सूर्यकिरणे अंगावर घेत बसलो. साडेसातपर्यंत सूर्यप्रकाश बरा होता. पण मग आकाशात ढग जमू लागले. चहा पिऊन होईपर्यंत बारीक बारीक पाऊस पडू लागला ! लहानपणी या पहिल्या पावसाचे किती अप्रूप असायचे ! तेव्हा ऋतूचक्र कसे नियमित असायचे.  पण आता  कोणताही ऋतू कधीही सुरू होतो. अवेळी पाऊस येतो तरी किती वेळा ? निसर्गा , तुझे आता फारसे अप्रूप राहिले नाही, कदाचित माझी पिढी आता साठीत आली म्हणूनही असेल कदाचित ! याच साठीतल्या आणि पन्नाशीतल्या काही बायका डोंगरावर सकाळच चिकनपार्टी करायला चालल्या आहेत ! तिकडे खाली मासेबाजारात गर्दी झाली आहे . आज बुधवार आहे. वार कोणताही असो, महामारी असो वा पाऊस असो , माणसे जिथे जायची तिथे जातातच आणि करायचे ते करतातच ! गंमत म्हणजे माझ्या या शब्दांशी सौ. चिकनपार्टीला निघता निघता सहमती दर्शवत होती ! स्नेहाचे फोन येत होते. पाऊस नुसताच जरासा  रिमझिमला आणि गेला . ही बाहेर पडली तेव्हा सूर्य आशेची किरणे पुन्हा दाखऊ लागला होता. पावणेनऊ वाजता पुन्हा सूर्यकिरणे गायब झालीत तेव्हा मी मागच्या दारी आलो. बंदूच्या घरात नुकताच सत्त्या स्थानापन्न होऊन घाम पुसत बसला आहे. आजकी बात सुरू झाली आहे. हळूहळू बंदूमंडळातील इतर सभासद येतील. पुढच्या दारी आलो तर गेट उघडून लंबूवहिनी अलगद गच्चीवर सुकवण घालायला जाते आहे. मीही अलगदपणे दरवाजा लावला . म्हणजे मांजर जर डोळे पिऊन दूध पीत असेल व तिला वाटत असेल की आपल्याला कोणी पहात नाही , तर राहू दे ना तिला तिच्या भ्रमात ! सुकवण घालून झाले तशी लंबूवहिनी गेट उघडून मांजराच्या आल्या पावलांनी जाते आहे. आज काही बातमी नसावी ! त्यात ही घरात नाही ती बातमी तिला आधीच लागलेली आहे ! माणसे चँप्टर का असतात ? ती साधीसरळ का वागत नाहीत ?

       आंघोळीनंतर श्रीपाद श्रीवल्लभांवरील पुस्तकातली आरती म्हणून बाहेर आलो तोच ज्येष्ट गझलकार मित्र वा. न. सरदेसाईंचा फोन आला. सद्या ते भांडूपमध्येच आहेत. त्यांचा मुलगा प्रमोद हाच त्यांची प्रसिध्दी करत असतो ! आजकाल हे फारच दुर्मिळ आहे ! मला प्रमोदचे खूप अप्रूप वाटले. माझ्याही मुलाचा मी काय लिहितो इकडे बारीक लक्ष असतो , पण प्रमोद त्याही पलीकडे आहे. वडिलांच्या कविता, गझलावगैरे तोच प्रसारीत करीत असतो ! हा फोन झाला आणि दुसरा फोन आला. अननोन नंबरवरून . पण ती मुलगी विचारत मात्र होती की , '' पाटील सर , संकूलची चावी तुमच्याकडे आहे ना ? '' बोलणारी माणसं कोण बोलतंय हे न सांगताच सरळ बोलत सुटतात. मी संभ्रमात ! मी नाही म्हणालो आणि कोण बोल...म्हणतोय तोपर्यंत फोनच कट केला गेला ! तिला हवा होता तो मीच पाटील सर होतो की आणखी कुणी पाटील सरांना तिने माझ्याच नंबरवर फोन केला होता ? बरं सौ.कडे कोणी चावी दिल्याचंही ती बोललेली नाही ! दिवस असा पुढे सरकतो आहे. सौ. तिकडे साळकायामाळकायांसोबत हड्डी  तोडत असणार. मी इकडे लिहीतोय ! वागवली परिसरातले काही फोटो पहा .
 
 
 

 जाधव  मॅडमच्या गझलची आठवण झाली आहे. त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या गझलला व्हॉट्सॲपवरच थोडे लाईनवर आणतो आहे. नवी पिढी हुशार आहे. फारसा हात फिरवावा लागत नाही. लवकर पीकअप करतात. जाधव  मॅडम महाविद्यालयीन शिक्षिका असल्याने खूप बिझी असतात.  त्यांना गझलसंर्भात फोनवर चर्चा करणे वेळेअभावी शक्य नव्हते. म्हटले चला, आपण त्यांच्या मनाने त्यांची गझल समजून घेऊ आणि आवश्यक असेल तरच बदल करू. तेही थेट व्हॉट्सॲपवरच !  आवश्यक तो बदल करून गझल व्हॉट्सॲपवरच पाठवून दिली आहे ! मलाही हा नवा प्रयोग आहे. कागदावर मांडून वेळ घालवण्यापेक्षा थेट मोबाईलवर काँपीपेस्ट करून बदल करणे बरे वाटले ! जाधव  मॅडमचा आलेला प्रतिसाद पाहता मला हे ब-यापैकी जमेल असे दिसते आहे.  नव्या पिढीकडून अशा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गझल संपल्यानंतर सव्वा वाजता एकटाच जेवलो.  नंतर शतपावली तर दोन तास झाली ! वामकुक्षी काही जमलीच नाही. मोबाईलवरच होतो. टीव्ही मात्र लावला नाही. तेवढीच शांतता ! फेसबुकवर अभिनेता इमरान खान  गेल्याच्या पोस्टस् आल्यायत. एक कसलेला उमदा अभिनेता चटका लावून गेला.  भावपूर्ण श्रध्दांजली.

        चार वाजता पुन्हा आकाश भरून आले. हयावेळी खूपच . दहापंधरा मिनिटातच वारा आणि पाऊसही सुरू झाला. तो पंधरावीस मिनिटं पडला. पावसामुळे सौ. पार्टी डोंगरावरच अडकली होती. सव्वा पाच वाजता ती घरी आली. सहा वाजता लाईट गेली ती पावणेआठ वाजता आली. सौ. ने टीव्ही लावला आहे. केंद्राने प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नसल्याचे म्हटले असले तरी लीलावती रूग्णालयातील कोरोनाबाधितावर त्याव्दारेच यशस्वी उपचार झाले , अशी बातमी सुरू आहे. धारावीत 24 कोरोना फायटर्स स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहेत . याला खरी छाती म्हणतात, खरी हिंमत म्हणतात !  सर्वत्र कोरोनाचा विषय आहे. सर्वात वाईट म्हणजे काही थिल्लर बिनडोक अर्धवटराव याही स्थितीत राजकारण करत आहेत ! याहून वाईट म्हणजे त्यांच्याकडे आपली अक्कल गहाण टाकलेली शेंबडी पोरे फेसबूकवर राजकारण करत आहेत ! शिकूनही अडाणी असलेली काही कच्ची मडकी एकमेकांना अंधभक्त आणि गुलाम म्हणू लागली आहेत , यावरून यांना देश आणि देशभक्ती किती कळते, यांची पोच किती , हे कळते. कोरोनाने अनेकांच्या डोक्यावर परिणाम केलेला दिसत आहे. आपण झोपायला गेलेले बरे, कारण आपली साठी सुरू आहे ! बुध्दी नाठी होऊन उपयोग नाही !  झोपायला जाता जाता व्हॉट्सॲप पाहिले तर अमेय धोपटकरांचा मेसेज आलेला. त्यांनी कविता क्वारंटाईन या पेजवर माझा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याची लिंक येथे देत आहे. कविता क्वारंटाईनमध्ये गझल
( क्रमश: )
...........







   








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: